Friday, August 9, 2024

वाचन -आनंदसोहळा

 चला, जरा आपल्या व्यक्तिमत्वाचा किनई विकास करूया, असं म्हणून कुणी वाचत नसतं. अपवाद म्हणून सुद्धा तशा उद्देशाने कुणी वाचत असेल तर तो सफल होणे नाही. तरीही तुमच्या आयुष्य़ातला टर्निंग पॉईंट कोणता असं कुणी विचारलं तर मी म्हणेन ’पुस्तक’ माझ्या अयुष्य़ात आलं तो. चांगली पुस्तक तुम्हाला सुखासुखी लाभत नाहीत, पण लाभली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. म्हणजे अगदी काही भव्यदिव्य घडलं नाही तरी ते मस्त होतं.

मी पहिलं मोठठं पुस्तक वाचलं ते मॅक्झीम गॉर्कीच ’आई’, तेव्हा सहावी सातवीत असेन, बरचसं कळलं नाही पण एका वेगळ्याच रशियन पार्श्वभूमीच्या जगाची ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्र जुळलं ते कायमचं. मग नवे शब्द मनात रूंजी घालायला लागले. कवी लेखकांच्या प्रतिभेने थक्क व्हायला लागले. त्या वयात मला अतिशय अद्भुत वाटलेलं एक वाक्य आजही आठवतं, बहुधा ह.ना.आपट्यांच असावं. "चंद्र सूर्य यांच्या झांजा वाजवत काळ वेगाने पुढे सरकत होता" किती सुंदर प्रतिमा, चंद्र सूर्याच्या गोलाकाराला झांजेची उपमा, झांजेच्या दोन पाखी एकमेकाला चाटून जातात निनाद करतात, तसा दिवस आणि रात्रीचा सुरेल संबंध, जगाचं पुढे जाणं ..हे सगळं फक्त एका वाक्यात किती कौशल्याने गुंफता येतं. त्या वाक्यावर खिळून राहिल्याचं आठवतं. असं वाचता वाचता "हा मुग्ध सोहळा हिरवा, मौनाला अंकुर फुटले...." अशी आपली गत होते. कवयित्री अरूणा ढेरे या सृजनशीलतेची अचूक व्याख्या करतात. कवी किंवा लेखक आपल्या संजीवक प्रतिभेतून शब्दांवर अर्थाचं पाणी शिंपडून त्याला जिवंत करतात, हेच खरं सृजन. आपलं मन मोकळं करण्यासाठी आपल्याला नेमक्या शब्दांची आणि आंतरिक उर्मीची खूप गरज असते! या दोन्ही गोष्टी वाचनाने साध्य होतात. वाचन आणि रसग्रहण याचा अनुभव "अणूहुनिया तोकडा, तुका आकाशाएवढा ॥" असा असतो. 


जिव्होर्दानो ब्रुनो या विचारवंतांनी असं म्हटलंय की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. इथे पुलंचा अविस्मरणीय सखाराम गटणे आठवतो. जगणं आणि वाचणं याचा सुतराम संबंध नसेल तर गटणे सारखं भाबडं वाचन म्हणजे पुलंच्या भाषेत जीवनाच्या प्रवाहात अडकलेला साहित्याचा बोळा. आपली वाचनाची दिशा योग्य आहे की नाही हे एकदा समजून घेतलं तर आपली स्वयंनिर्णयाची शक्ती वाढून नवनव्या आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या वाङ्मयीन प्रयोगाला (बापरे!) आपण सामोरे जाऊ शकतो. पण मग उत्तम साहित्याची निवड करायची तरी कशी? याचं उत्तर नाटककार विजय तेंडुलकर देतात. आयुष्याबदलची आपली समजूत जे वाढवतं ते उत्तम साहित्य अशी नेमकी व्याख्या ते करतात. साहित्य एनरिचिंग असायला हवं. पहिल्या दोन-चार पानात ते जोखता येतं. 

बर्‍याच यशस्वी व्यक्तींमागे एखादं पुस्तक असतं. धीरूभाई अंबानी म्हणतात मी पुस्तके वाचली म्हणून माझे क्षितीज विस्तारले, मी मोठी स्वप्ने पाहू लागलो, मोठा विचार करू लागलो आणि म्हणून मी मोठा झालो. मायक्रोसोऑफ्टचे बिल गेट्स शाळेतून मधेच बाहेर पडलेले पण वाचन सोडले नाही, त्यांचे ’द रोड अहेड’ हे पुस्तक त्यांच्या प्रवासाची साक्ष देतं. विप्रोचे अझीम प्रेमजी म्हणतात नेतृत्व गुण वाढत राहण्यासाठी आणि आत्मचिंतनासाठी मी प्रवासात कायम वाचन करतो. अमिताभ बच्चनच्या अतिशय प्रभावी व्यक्तिमत्वाला उत्तम वाचनाचा भक्कम पाया आहे. हे तर सगळे सेलेब्रिटीज आहेत. अनेक चळवळीतील कार्यकर्ते मग ते समाजवादी असोत, संघाचे असोत, अंनिस चे असोत, कोणत्याही विचारधारेचे असोत पण त्यांच्यात एक समान धागा असतो, बहुतेक कार्यकर्ते म्हणतात वाचन माझा सोबती आहे. ते नसतं तर अशा काही वेळा होत्या, जेव्हा आम्ही जगावं की नाही, कशासाठी जगावं या द्वंद्वात होतो तेव्हा आमच्या जगण्याच्या अंधारवाटा या वाचनानं प्रकाशमान केल्यात. त्या सर्व ग्रंथांबद्दल, पुस्तकांबद्दल आम्ही कृतज्ञच रहायला पाहिजे. बहुसंख्य यशस्वी व्यक्तींच्या आयुष्यात पुस्तकांची भूमिका मह्त्त्वाची असली तरी वाचन हे जीवनात  यशस्वी होण्याचा हेतू समोर ठेवून करायची गरज नसते. यश हे दर्जेदार वाचनाचं बायप्रॉडक्ट आहे.


प्रेरणादायी पुस्तकं काय करू शकतात याचं एक उदाहरण म्हणजे लक्ष्मण गोळे. वयाच्या १६व्या वर्षी याने भांडणातून एकावर वस्त-याने वार केला, केस झाली, तो तुरुंगात गेला, घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. इतर लहान सहान गुन्हे नावावर होतेच. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. गांधींजींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि त्यानेदेखील न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. चांगल्या वर्तणूकीमुळे त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगी झाली. ही बातमी मटामअध्ये वाचल्याचं मला स्मरतंय. एकूण व्यक्तीला आमूलाग्र बदलवण्याचं सामर्थ्य पुस्तकांमधे आहे. 


माझे नेटवर्किंगचे विद्यार्थी म्हणत की आम्ही आपल्या क्षेत्रातलं वाचलं की पुरे ना, हे अवांतर बिवांतर वाचन हवंच कशाला? परंतु उत्तम करियर साठी तुमच्याकडे वैश्विक नजर व्हावी. शाम मनोहर या उत्सुकतेने झोपणार्‍या लेखकाचं लेखन फारसं झेपलं नसलं तरी त्यांचा ’वर्ल्ड व्ह्यू’ हा शब्द मला फार आवडतो. ही नजर पुस्तकच आपल्याला देतात. ज्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे करियर करायचं आहे त्यांनी तर वेगवेगळ्या भाषांमधलं ,इंग्रजीतलं वाचन देखील वाढवायला हवं. पुस्तकांच्या साथीने चढलेल्या पायर्‍या मानसिक समृद्धीबरोबरच आर्थिक समृद्धीलाही जाऊन भिडतात. परंतु आजच्या मार्क्सवादी पिढीला हे पटवणं सोपं नाहीये. जागतिकीकरणाच्या लाटेनं आजच्या पिढीला या संतसाहित्यापासून दूर नेलं आहे. आपण कसे दिसतो त्याचा म्हणजे बहिरंगाचा विचार ही पिढी जास्त करते. सेलेब्रिटींचा आपल्यावर इतका प्रभाव आहे की स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. इथेच पुस्तकं मदतीला येतात. पुस्तकं आपल्याला जमिनीवर ठेवतात. हा दिखाऊपणा, उथळपणा आपण मुलांच्या माथी तर मारत नाही आहोत हे समजून घेण्यासाठी आधी आपण आतून विकसित व्हायला हवं. त्यासाठी वेगवेगळ्या विचारधारांबद्दल आपलं वाचन उत्तम असायला हवं. ललित साहित्य आयुष्याला पंख देतं तर वैचारिक साहित्य त्याला वास्तवाच्या जमिनीवर परत आणतं. ललित वाचक पटकन दुसर्‍याची बाजू समजून घेऊ शकतो. कारण वाचताना त्याला प्रत्येक पात्राची बाजू समजून घ्यायची सवय लागलेली असते. त्याला सहवेदना पटकन जाणवतात. एखादी कलाकृती वाचता-वाचता तो आतून बदलून गेलेला असतो. वैचारिक वाचनाच्या बाबतीत मी असं म्हणेन त्यातून व्यक्तिमत्वात ठामपणा येतो, प्रगल्भता येते. 


होरे ल्रुई बोऱ्हेसची एक कथा आहे. ‘बुक ऑफ सॅण्ड’ नावाच्या या कथेत लेखकाला दुर्मीळ बायबल मिळतं. त्या पुस्तकाला अनेक पानं असतात. त्याचं शेवटचं पान कधीच येत नाही. म्हणजे त्यातला ज्ञानाचा झरा कधीच आटत नाही. माझी मावशी अवांतर वाचन करतेच पण धार्मिक ग्रंथांचं पारायण करत असते.. मी तिला म्हणायचे की तेच ते वाचण्यापेक्षा त्या वेळात तू इतर काही उत्पादक काम का करत नाहीस, दुसरं काही का वाचत का नाहीस. तीच ज्ञानेश्वरी, दासबोध, रामायण, गीता तू कितीवेळा वाचशील आता. तिच्याशी बोललयानंतर नीटच कळलं की प्रत्येक वाचनात आकलनाचं नवं दार उघडलं जाण्याच्या शक्यता असतात. त्यातल्या नवनव्या मार्मिक ठिकाणांचा शोध लागतो. ठरावीक विचारांचं केंद्र बदललं की प्रश्न पडतात. उत्तरं मिळवण्याच्या प्रयत्नात नवं, स्वत:चं ‘चिंतन’ सुरू होतं आणि शेवटचं पान कधी येतच नाही. 


मी जरी तंत्रशाखेकडे वळले तरी वाचनाची साथ सुटली नाही. सुरूवातीला मला वाटायचं की जगातलं सार शहाणपण आहे ते फक्त पुस्तकात. हे वाचू की ते वाचू . मात्र बहिणाबाई वाचताना जाणवतं की आपल्या अवतीभवती असणारे अनेक साधे सरळ लोक आपल्यापेक्षा शहाणे आहेत, कारण  हे ‘शहाणपण’ त्यांच्या जगण्यामधून आलेलं असतं. जगण्याला भिडण्यासाठी साहित्यासारख्या मध्यस्थाची त्यांना गरज नसते. ते थेटपणे, निधड्या छातीने जगण्याला भिडतात आणि धडपडत नव्याने घडतात . किशोर शांताबाई काळ्यांचं कोल्हाट्याचं पोर, अशोक पवार सारख्या भटक्या माणसाचं जग, बलुतं, गोलपीठा, बालकांड सारखी आत्मचरित्र आपल्या काळजाला भिडतात याचं कारण ते लेखक जे ‘जगतात’ तेच लिहितात. अभिनेता भूमिका संपली की नामानिराळा होऊ शकतो पण लेखक/कवी आणि त्याचे साहित्यातून उमटणारे विचार हे कायम एकच असायला हवे ना. नाहीतर एखाद्या पर्यावरणवाद्याने स्वत:च पाण्याचा अपव्यय करावा तसं मला हे विसंगत वाटतं. 

समजा एखादा उत्तम वाचक ऑफीसमधली स्टेशनरी सर्रास घरी आणत असेल किंवा भाजीवालीने चुकून पाच रूपये कमी घेतले म्हणून खूश होत असेल तर माझ्या मते त्याचं वाचन हा निव्वळ टाईमपास आहे. चांगला वाचक नकळतपणे एक चांगला माणूस व्हायला हवा. जगण्याबद्द्लचा एकूणच विधीनिषेध वाचनातून आपल्या मनात रूजायलाच हवा .‘चांगला माणूस’ होण्यासाठी साहित्य आणि इतर सर्व कलांची काही एक ओळख, त्याचं भान असणं खूप गरजेचं आहे. सामाजिक विषयांवरची पुस्तकं यासाठी मदत करतात. मग ते राजेंद्र्सिंह यांच जोहड असो, अनील अवचटांची पुस्तकं असो, कोसला असो किंवा व्हिक्टर ह्यूगोचं ’ला मिझरेबल्स’.  


वाचनाची देणगी माणसाला लाभली नसती तर! दळवी, माडगूळकर, पाध्ये असे लेखक सांगतात की वाचनानं त्यांचं जगणं समूहलक्ष्यी बनवलं. जेवढं आत खळबळत असतं ते अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरवायचं असेल तर त्याला लागणारा शब्दसाठा केवळ वाचनातून उपसता येतो. आपण जगताना वेगवेगळ्या पातळ्यांवर जगात असतो. हे उद्धृत कुठे वाचलं आठवत नाही पण त्याचं सार असं -भोवतीचं जगड्ब्याळ विश्व, असंख्य आकाशगंगा, सूर्य, चंद्र, तारे, डोंगर, नद्यानाले, झाडं, फुलं, फळं, पशुपक्षी, अफाट पसरलेला निसर्ग- आपल्याआधी अब्जावधी वर्षांपासून... आपल्यानंतरही असणारा, आपल्या आसपास वावरणारी, नात्यानी-बिननात्यांनी, रक्तानं-बिनारक्तानं, इच्छेनं-अनिच्छेनं, प्रसंग-घटनांनी, भावना-संवेदनांनी, व्यवहारांनी, सहेतुक-अहेतुक, जोडलेली-तोडलेली असंख्य माणसं.आणि आपल्या आत - स्वतःच्या आतलं एक अतिशय गूढ, अनाकलनीय, गुंतागुंतीचं असं आंतरिक विश्व ...या सगळ्यातलं अवाढव्यपण, विराटपण, विशालपण, औदार्य आणि संकुचितपण, अथांगता आणि उथळपण, सौंदर्य आणि कुरुपपण, भव्यदिव्यता आणि क्षूद्रपण, रौद्रभीषणता आणि नाजूकपण, क्रूरता आणि प्रसन्नपण, शांतता आणि कल्लोळ, नियमबद्धता आणि गोंधळ, सुसंगती आणि विसंगती, अर्थपूर्णता आणि निरर्थकत्व या सगळ्याशी आपण एकाचवेळी जोडले आणि जखडले जात असतो. हे जोडलेपण आपल्याला हवं असतं आणि नसतंही. या जखडण्यातून तर आपली सुटकाच नसते. या सगळ्या जोडण्या-जखडण्याच्या ताणतणावातून, संघर्षातून, अस्वस्थतेतून या सगळ्याचा अर्थ शोधण्याचा ध्यास आपल्याला लागतो. अच्युत गोडबोले म्हणतात तसं हे सारं आपल्याला कळलं पाहिजे असं वाटायला लागतं. वाचन नसले तर आपले अडत नाही पण ते नसले तर आपण सहजपणे घडतही नाही. जगण्याबद्दलच प्रचंड कुतूहल आपल्याला वाचनातून शमवता येतं. स्वान्त सुखाय वाचता येतं, समूहलक्ष्यी होण्यासाठी वाचता येतं, आणि जगणं सुंदर करण्यासाठी वाचता येत. 


त्यामुळे आमचा मुलगा वाचतच नाही हो, अशी तक्रार करणार्‍या पालकांनी स्वत:ला विचारावं ,आधी ते किती वाचतात? गांधीजींच्या आश्रमात एकदा एक बाई आपल्या अतिशय लठ्ठ मुलाला घेऊन गेली आणि त्यांना म्हणाली ’याला वजन कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा, तो तुमचं तरी नक्की ऐकेल’. गांधीजींनी तिला एक महिन्याने यायला सांगितले. ती १ महिन्याने पुन्हा गेली. गांधीजींनी त्या मुलाला ’बाळा, तू गोड खाणे बंद कर’ असे सांगितले. ती आई काहीशी वैतागून म्हणाली की मग हे तुम्ही महिन्याभरापूर्वीच का नाही सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले की ’मी स्वत: आधी गेला महिनाभर साखर सोडली, त्या मुलाला तसं कर म्हणून सांगण्याचा नैतिक हक्क मिळवला आणि आज मी त्याला हे ठामपणे सांगतो आहे’. आता हे खरंच घलं आहे का, मला माहीत नाही. ह्याचा मथितार्थ इतकाच की मुलांकडून काही अपेक्षा करण्यापूर्वी आपण स्वत: काय वाचतो आणि किती वाचतो ते तपासून पाहूया. आपलं वाचन whatsapp च्या मेसेज पुरतं मर्यादित आहे? पेपरमधल्या मुख्य बातम्यांपर्यंत मर्यादित आहे की ग्रंथालयापर्यंत पोचलय! 

माझ्या लहान भाचीला कुणी बसून आकडे म्हण असं शिकवलेलं नाही. मग लक्षात आलं की ‘एक दोन तीन चार - राने झाली हिरवीगार’ असं आकड्यांशी यमक जुळवलेलं एक गाणं तिची आजी तिला म्हणून दाखवते. शब्दांशी खेळायला जर आपण मुलांना शिकवलं तर  मुलांची आस्वादक्षमता वाढते, त्यांना कविता आवडायला लागतात. आपल्याकडे बालकवींपासून आजच्या संदीप खरेंपर्यंत उतामोत्तम कविता उपलब्ध आहेत. कमीत कमी शब्दात मोठा आशय सांगणार्‍या कविता त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला हव्यात. हे कुतूहल वाढत गेलं तर मुलांना पर्यावरणासह आजूबाजूचं जग, वेगवेगळे देश जाणून घ्यावेसे वाटतात. काळ बदलला तरी देशोदेशीची माणसं आतून तशीच असतात हे सांगणारी पुलंची अपूर्वाई आणि पूर्वरंग त्यांच्या मदतीला येतील. संदर्भांच्या विपुलतेसह देशोदेशीचं पर्यटन घडवून आणणारी मीना प्रभूंची पुस्तकं इथे मदतीला येतील.

मुलं वाचतच नसतील तर या वेळात आपण त्यांना महत्वाच्या घडामोडी सांगू शकतो, पुस्तकाचा गोषवारा गोष्टीच्या रूपात सांगू शकतो. आपण त्यांना वेळ दिला नाही तर त्याची भरपाई करायला माध्यमं २४ तास उपलब्ध आहेत. मग उद्या मुलं आपल्याला म्हणतील, this मिडीया ie टीव्ही or कॉम्प्युटर, it has spent more time raising us than you have तेव्हा उशीर झालेला असेल. 


अशी वेळ निघून जाते आणि पालकांवर काय वेळ येते पाहा, "काल घरातली वीज गेली होती. कॉम्प्युटर ,टीव्ही सगळं बंद त्यामुळे मी माझ्या घरातल्या लोकांशी जरा गप्पा मारल्या आणि मला कळलं ...अरे वा...मस्त आहेत की ही माणसं !!! " एका टीनएजर मुलाची, आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारी ही प्रतिक्रिया बोचरा विनोद म्हणून सोशल नेटवर्किंग साईट्स वर फिरत असते. त्यामुळे पुस्तकांचा आजच्या घडीचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तंत्रज्ञान असं समाज म्हणतो ! आजच्या प्रत्येक पालकाची एक तक्रार आहे की मुलं सारखी मोबाईल, कॉम्प्युटर मधे मान खुपसून बसलेली बसतात मग ती वाचणार केव्हा. एक स्नेही म्हणाले, जे ’श्यामची आई’ वाचून मी घळाघळा रडलो, ते मुलाला वाचायला दिलं. चार पाच पानं वाचून होताच मुलगा म्हणाला ," यात काय इंटरेस्टींग आहे? यातलं लाईफ किती स्लो आहे." तेव्हा मला धक्का बसला आणि जाणवलं की आमच्या आस्वादक्षमतेत केवढी दरी निर्माण झालीय. यात चूक कुणाचीच नाही. बदललेला सभोवताल याला कारणीभूत आहे. त्या पुस्तकातल्या काळाशी, वातावरणाशी, भावनांशी हा  मुलगा आपली नाळ जुळवून घेऊन शकत नाहीये. हाच श्याम त्याला ऍनिमेशन रूपात भेटला तर तो त्याला कदाचित आवडेलही. त्यामुळे मुलं जर छापील पुस्तकं वाचत नसतील तर त्यांना ई-बुक्स बद्दल सांगायला हवं. तेवढही वाचण शक्य नसेल तर आता ऑडीओ बुक्स चा पर्यार सुद्धा उपलब्ध आहे. इंटरनेटवर कुमारवयातील मुलांना वाचनाला गोडी लावणार्‍या कितीतरी साईट्स उपलब्ध आहेत. http://www.awesomelibrary.org/Classroom/English/Literature/Elementary_Li... ह्या साईटवर रुडयार्ड किपलींगच्या 'जंगल बुक' पासून ते चार्ल डिकन्सच्या 'ए क्रिस्मस कॅरल' पर्यंत ऑनलाईन पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. http://www.pitara.com, पाच वर्षांपूर्वी अरविंद गुप्तांनी arvindguptatoys.com हे संकेतस्थळ चालू करून त्यावर डिजिटाईज केलेली पुस्तके ठेवायला सुरुवात केली. आणि आजमितीला एक हजारच्यावर दर्जेदार पुस्तके ह्या संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध आहेत. शिक्षणशास्त्र, जागतिक शांतता, पर्यावरण, विज्ञान-गणितातले प्रयोग, उत्तम बालसाहित्य अशा अनेक विषयांवरची पुस्तके इथे आहेत. 

http://www.arvindguptatoys.com या साईट वर हिंदी, मराठी आणि इंग्रजी पुस्तकांचा खजिना आहे. ब्रिटीश काउंन्सीलच्या साईटवरचा बालविभाग http://www.britishcouncil.org/kids अत्यंत वाचनिय आणि माहितीपूर्ण आहे. थोडक्यात वाचनाची आवड निर्माण करणं आणि जोआपसणं हे कॉम्प्युटरच्या मदतीने सहज शक्य आहे. काळाबरोबर मनोरंजनाची माध्यमं बदलणार हे आपण स्वीकारतो मग वाचनाची माध्यमं पारंपरिकच हवी हा अट्टाहास का! 


अर्थात हे खरय की हातात पुस्तक घेऊन वाचणं आणि डिजीटल वाचन यात खूप फरक आहे. कॉम्प्युटर वर टाईप करण्यापेक्षा हातात लेखणी धरून लिहीणं हा एक उत्कट मानसशास्त्रीय अनुभव असतो. हेही खरं आहे की पुस्तकातले शब्द वाचून, त्याचं आकलन होऊन त्यातून ते चित्र, त्यातली पात्र आपल्या मनावर उमटून मग डोळ्यासमोर उभी राहणं, ती आपण अनुभवणं आणि वाचत जाताना स्वत:मधे वेगळ्या विचाराचं बीज रूजताना पाहाणं.. यातला आनंद, थरार आजची न वाचणारी किंवा जेमतेम वाचणारी पिढी समजू शकत नाही, आजच्या ’इन्स्टंट’ ज्ञान आणि मनोरंजनाच्या धबधब्याखाली यातलं काही अनुभवता येत नाही. नाही म्हणायला आता परीकथा, पौराणिक कथा, देशी-विदेशी लोककथा मल्टीमिडीया सीडीज, कार्टून नेटवर्क वर देखण्या रूपात मुलांसमोर अवतरतात. कदाचित त्या त्यांना अधिक छान समजतात. कमी वेळात खूप मोठा पट मुलांसमोर उलगडतो. पण त्यात दोन धोके आहेत, सगळं दृश्य समोर असल्याने मुलांच्या कल्पनाशक्तीला पुस्तकातून मिळतो तसा वाव न मिळणं आणि मुलांचं माध्यमांच्या आहारी जाणं. 

कवी गुलजार म्हणतात.. 

"जुबान पर जायका आता था जो सफहे पलटने का

अब उंगली क्लिक करने से बस इक झपकी गुजरती है

वो इल्म (ज्ञान) तो मिलता रहेगा आईंदा भी, लेकिन .....

किताबों से जो जाती राब्ता था ,कट गया है "

हे कटू सत्य स्वीकारतानाच वाचनाचं माध्यम बदलतं आहे याची आपण आता सकारात्मक नोंद घ्यायला हवी. 

भाषाविकास, मानसिक- वैचारिक विकास व्हावा, निरीक्षणशक्ती, आकलन आणि जगाबद्दलची-जीवनाबद्दलची समज वाढावी हा वाचनाचा हेतू तत्वत: असायला हवा पण निखळ आनंद मिळवणं हाच त्यामागचा खरा हेतू. मग ते छापील पुस्तक असो किंवा किंडल, इ बुक, ऑडीओ बुक,व्ह्लॉग सारखं डिजीटल माध्यम, छापील वर्तमानपत्र असो किंवा त्याची इंटरनेट आवृती, त्याच्या बाह्यस्वरूपापेक्षा महत्वाचा आहे त्यातला आशय. तो वाचकांपर्यंत पोचला म्हणजे झालं. वाचन हा स्वतःशीच साजरा केला जाणारा आनंदसोहळा आहे. त्या तरी कोणाशीही स्पर्धा संभवत नाही. स्वतःच्या साथीने गायला पाहिजे असा हा राग आहे. 


Thursday, August 1, 2024

पंचायत - निखळ देशी करमणूक

तांत्रिक सफाई असलेले सुस्पष्ट पण बटबटीत चित्रण, खणखणीत अभिनय पण वास्तव दाखविण्याच्या नावाखाली शिव्या पेरलेले रासवट संवाद, उत्तम कथानक पण त्यात कामुक दृश्यांचा भडिमार. हा आहे हल्लीच्या ओटीटीवरील वेबमालिकांचा ल.सा.वि. 
"पोहण्याच्या तलावावर बिकीनी नाही घालायची तर काय साडी नेसायची का?" असा अगदी तर्कसंगत प्रश्न विचारणार्‍या तथाकथित बोल्ड नायिका त्या प्रसंगात पोहण्याचा तलाव मुदलात आवश्यक होता का हे मात्र विचारत नाहीत. ’मागणी तसा पुरवठा’ म्हणत भारतीय प्रेक्षकांची अभिरूची अधिक सुमार करण्याला ही सगळी मंडळी हातभार लावत आहेत. स्वघोषित पुरोगामी मंडळी ’वास्तव बिस्तव- कला बिला- अभिव्यक्ती-फलाणा’ वगैरे झेंडे घेऊन याची भलावण करत आहेत.

या सार्‍यांना सणसणीत चपराक लगावली आहे ती ’पंचायत’ या अमेझॉन प्राईमवरील वेबमालिकेने. वरच्या यादीतील कोणतेही मसाले नसूनही अतिशय रूचकर लागणार्‍या या पाककृतीला ओटीटीवरील सर्व स्तरातल्या प्रेक्षकांनी एकमुखाने पसंतीची पावती दिली आहे. काय वेगळेपण आहे या मालिकेचं! यात कोणत्याही चुकीच्या गोष्टीचं उदात्तीकरण नाही, चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे. कोणताही चकचकाट, अश्लीलतेचा आधार न घेताही नर्मविनोदी संवाद, बांधीव पटकथा, समयोचित पार्श्वसंगीत, पारदर्शक पात्रं आणि मातीचा गंध असलेला अस्सल उत्तर भारतीय  ग्रामीण जीवनाचा पट म्हणजे ही मालिका. सतत काहीतरी हॅपनींग पाहण्याची, ट्वीस्ट आणि धक्के बसायला हवेत अशी अपेक्षा असणार्‍या बेचैन वृत्तीच्या प्रेक्षकांनी मात्र या मालिकेच्या वाटेला जाऊ नये. पडद्यावरचा सुकून अनुभवायला तो आधी मनातही हवा तरच या मालिकेशी तार जुळते.

उपदेशाचा कोणताही आव न आणता प्रेक्षकाला मूक करण्याची, आत्मपरिक्षण करायला भाग पाडणारी अनोखी दिग्दर्शकीय शैली हे ’टीव्हीएफ’चं वैशिष्ट्य इथेही आहे. या मालिकेचे तीनही सीझन लोकप्रिय ठरले आहेत. कुटुंबासह बसून मजेत पाहू शकू असं काही ओटीटीवर दुर्मिळ होत असताना "पंचायत" किंवा "गुल्लक" सारख्या मालिका सुखद झुळूक होऊन येतात. 

’पंचायत’ ची कथा अभिषेक त्रिपाठी (जितेंद्रकुमार) नावाच्या शहरी तरूणाभोवती फिरत असली तरी तो नायक नाही. यातील इतर पात्रं कथेत तितक्याच ताकदीने उभी आहेत. 

अभिषेकला अभियंता झाल्यावर अपेक्षित पॅकेजची नोकरी मिळत नाही. चांगल्या कॉलेजमधून एम.बी.ए करून मनासारखी नोकरी मिळवायची हे त्याचं स्वप्न असतं. प्रवेशपरिक्षेचा अभ्यास करताना रिकामं बसण्यापेक्षा हातात आलेली ग्रामपंचायत सचिवाची जेमतेम वीस हजाराची नोकरी स्वीकारून अभिषेक ’फुलेरा’ या खेडेगावात येतो. नाईलाजाने पदरी पडलेला तो गाव, तिथला हातपंप, पाण्याची टाकी, तिथले लोकांचे नमुने हळूहळू त्याला आपले वाटू लागतात.

गावची प्रधान मंजुदेवी (नीना गुप्ता), प्रत्यक्षात तिच्या ऐवजी कारभार सांभाळणारा तिचा प्रधानजी नवरा (रघुबीर यादव), उपप्रधान प्रल्हाद (फैसल मलिक), सहसचिव (चंदन रॉय) व  विधायक (पंकज झा) सारख्या दमदार कलाकारांनी आपापल्या भूमिकेत बहार उडवून दिली आहे. स्टँड-अप कॉमेडीने हल्ली बोचरा विनोद लोकप्रिय केला आहे पण यातला अंगभूत विनोद गावकर्‍यांसारखाच निर्मळ आहे. पिझ्झा टॉपींगसारखा पेरलेला नाही. काही समीक्षक त्याला "डंब अँड डंबर" ची सौम्य किंवा वास्तववादी आवृत्ती म्हणतात. "पंचायत" हा लाइफ कॉमेडीचा एक भाग आहे, उत्तर प्रदेशात (खरं तर मध्यप्रदेश, बिहार, किंवा उत्तर भारतात कुठेही आणि स्वभाववैशिष्ट्यांचा विचार केला तर अख्ख्या भारतात कुठेही) जशी माणसं खऱ्या आयुष्यात भेटली असती तशीच आपल्याला ‘पंचायत’ मालिकेतही भेटतात. काही सरळ आहेत तर काही बेरकी पण ती सच्ची आहेत. त्यांच्यात काहीही टोकाचे किंवा वाईट घडत नाही. नाही म्हणायला सीझन ३ च्या शेवटी काही डोकी फुटतात, परंतु ते देखील ’चला, आता तुफान हाणामारी दाखवू’ या अभिनिवेशाने नाही तर कथेचा सहज भाग म्हणून. 

अनेक हलकेफुलके पण गाभ्याशी गंभीर असलेले प्रसंग यात खुबीने दर्शवले आहेत. उदा: झपाटलेल्या झाडाची कथा पहिल्या सीझन मध्ये आहे. झपाटलेले झाड ही फक्त अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करायला सचिव विकासला भर रात्री डबलसीट घेऊन जातो. सहसचिव विकास घाबरून बायकोला सांगून जातो, "खुसबू... जर आम्ही परतलो नाही तर दुसरं लग्न कर. आपला सहवास एवढाच लिहिलेला होता. वरच्या खोलीत बाबांच्या डब्यात त्यांनी दिलेली चांदीची काही नाणी ठेवली आहेत. त्यात तीन ते चार महिन्यांचा खर्च भागेल." घटना, नातेसंबंध, खटकेबाज संवाद आणि त्यातून पात्रनिर्मिती ही पंचायतची खास शैली. गावात एखाद्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा सारं गाव मिळून भावी जावयाचे नखरे कसं सहन करतं हा भागही मार्मिक. पंचायत कचेरीतून कॉम्प्युटर मॉनिटर चोरीला गेल्याची घटनाही धमाल आहे. शेवटी चोर तो मॉनीटर दाराशी आणून ठेवून देतात. तिथे एक चिठ्ठी ठेवलेली असते. त्यात लिहिलेलं असतं "आम्हाला वाटलं की तो टीव्ही आहे, कृपया माफ करा." मॉनीटरचा उपयोग करण्याचीही क्षमता नसलेलं किंवा उपयोग माहित नसलेलं चिमुकलं साधं गाव, हे आहे खेडोपाडी विस्तारलेल्या भारताचं वास्तव. ते कळायला शहरी भारतीयांना ’ओटीटी’चं माध्यम लागतं इतकंच. आपल्या मातीतल्या गमती विनासायास बघताना परदेशस्थ भारतीय प्रेक्षकही रंगून जातो आहे.

एका प्रसंगात सचिव(जी)अभिषेकचा मित्र प्रतीक, दोन्ही हातात शॉपिंग बॅग घेऊन चकाचक मॉलमध्ये एस्केलेटरवरून उतरताना अभिषेकला साध्या जीवनाचे महत्व सांगतो. बर्‍याच शहरी लोकांना ग्रामीण जीवनात डोकावून आपल्या ’रूट्स’ चा परिचय मुलाबाळांना करून देण्याची एक फॅशनेबल ओढ असते. एवढे उरकले की ते आपल्या अत्याधुनिक जगात परतायला मोकळे होतात. प्रतीक यांचा प्रतिनीधी. तो अभिषेकला न उपभोगता येणार्‍या शहरी जीवनशैलीच्या बदल्यात किती गुणवत्तापूर्ण अनुभव मिळतायत हे सांगून मित्राचं सांत्वन करतो. "तुला स्वदेसमधला मोहन भार्गव बनण्याची संधी मिळते आहे. मातीचा गंध सोडून माझ्यासारख्या कॉर्पोरेट उंदरांच्या शर्यतीत तुला का अडकायचे आहे?" वगैरे ऐकल्यावर अभिषेकचाही सल जरा कमी होतो. प्रधान की बेटी रिंकी (सान्विका) भेटते तेव्हा त्याला गावात राहणं जरा आवडू लागतं. रिंकीला अचानक कचेरीकडे येताना पाहून सचिवजींची तारांबळ उडण्याचा प्रसंग चुरचुरीत झाला आहे. तालुक्याच्या गावच्या मोहन भांडारचे समोसे खाणं ही त्यांच्या ’एंजॉयमेंट’ची एक भाबडी पद्धत आहे. रिंकी आणि सचिवजी यांच्यात फुलत गेलेलं अदमुरं रोमँटिक नातं साधं, प्रांजळ पण फार गोड आहे. त्यांचे अनेक रील्स आज व्हायरल आहेत.

ज्या कच्च्या रस्त्यावर धडपडत बाईक चालवत त्याने पहिल्या सीझनच्या पहिल्या पर्वात फुलेरा गाठलेलं असतं तो रस्ता सीझन ३ मध्ये मोठा प्रश्न होऊन पुढे आलेला दिसतो. खंतावलेल्या मनाने या रस्त्याने गावात दाखल झालेला सचिव मात्र त्याच्या ग्रामीण मित्रांच्या सहजीवनात त्याच्याही नकळत विरघळून जातो. सुरुवातीला पंचायत कचेरीत पाऊल न टाकणारी मंजुदेवी आता राजकारणात बिनधास्तपणे उतरते. हा बदलही सचिवामुळे होतो. भूषणने (दुर्गेश कुमार) आपल्या पत्नीला (सुनीता राजवार) मंजुदेवीसमोर प्रबळ विरोधी उमेदवार म्हणून आणलं आहे. 

नसलेले प्रश्न वाढवण्यात किरकिरा भूषण हुशार आहे. ’किजिए मिटिंग मिटिंग, खेलिए मिटींग मिटींग’, ’देख रहा है बिनोद’ यासारखे भूषणचे संवाद लोकप्रिय झाले आहेत. प्रधान पती तर फारच निरागस माणूस आहे. पद हातून निसटू नये या नादात कधी चुका करतो त्यामुळे कधी अस्वस्थ होतो तर कधी खमकेपणे योग्य बाजूने उभा असतो. शहरी सुविधांऐवजी अभावात जगत तडजोड करणार्‍या सचिवाबद्दल याच्या मनात कळवळा आहे आणि त्यातून फुललेली मैत्री तर धमाल आहे. एका ’हाय’ या व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वर ही मंडळी बियर प्यायला एकत्र जमतात, सुखदु:ख वाटून घेतात, हसतात, रागावतात, एकमेकांची टर उडवतात आणि पाठीशीही उभी राहतात. यात बियर हे केवळ माध्यम आहे, गंतव्य नाही म्हणूनच कदाचित इथे ’दारू पिणे स्वास्थ्यासाठी अहितकारक’ असल्याचा संदेश किंवा मालिकेला दिलेलं १६ + वयाचं प्रमाणपत्र अनावश्यक वाटतं.

प्रधानमंत्री गरीब आवास किंवा हर घर शौचालय योजनेपासून विधायकाच्या बेमुर्वतखोरपणापर्यंत ग्रामीण जीवनाचे अनेक पैलू इथे आरशात प्रतिबिंब दिसावं तसे उमटतात. विधायकाचं गावाकडे ’गर्दी म्हणजे ताकद’ या भूमिकेतून पाहणं, कोणतीही पातळी गाठणं,सगळं कसं आपल्या भारतीयांच्या अगदी परिचयाचं. पार्श्वभूमीवर अत्यंत लोकप्रिय झालेलं ’राजाजी ’ गाणं तर भारतीय राजकारणाला चांगले चिमटे काढत रंगत जातं. ४ थ्या सीझनची वाट पाहायला भाग पाडतं. 

अनेक जीवनविषयक सूत्र या बहुअस्तरी मालिकेच्या आत दडलेली आहेत. ती शोधावी लागत नाहीत, गवसत जातात, खिन्न करतात, गालात हसवतात, स्वत:लाच प्रश्न विचारायला लावतात. ३ रा सीझन कथानकात जरा गंडला आहे, काही ठिकाणी जास्तच संथ झाला आहे पण त्याची भरपाई संवाद, अभिनयातून पुरेपूर झाली आहे. 

भारतीय ओटीटी प्रेक्षकाला पुन्हा एकदा निखळ आणि अस्सल देशी मनोरंजनाकडे वळवणार्‍या ’टीव्हीएफ’चे आणि दिग्दर्शक दीपककुमार मिश्रांचे आभारच मानायला हवेत. पंचायत गाजू लागल्यावर दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते," दरअसल मुझे सबकुछ बीस चाहिए, कही भी उन्नीस नही चलता " 

 #पंचायत - निखळ देशी करमणूक Published in ओटीटी कट्टा (#daut_lekhani)  


Tuesday, July 16, 2024

रोबोच्या ’अंतर्मना’त


महाराष्ट्र टाईम्स मध्ये संपादकीय पानावरील लेख -रोबोच्या ’अंतर्मना’त !#Artificial_Intelligence_Appreciation_Day #July16
दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोने ९ तास ड्युटीच्या बहुधा अतिश्रमाला वैतागून ’आत्महत्या’ (!) केल्याच्या बातम्या देशविदेशातील वर्तमानपत्रातून झळकल्या. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी या रोबोचा ’मृत्यू’ झाला. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या (!) केल्याचे सांगितले जात आहे. मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम रोबोकडे पहिल्यंदाच सोपवण्यात आले होते. त्याला लिफ्टचा वापर करता येई. कॅलिफोर्नियाच्या बीअर रोबोटीक्स या कंपनीने हा रोबो विकसित केला होता. रोबोंचा प्रभावीपणे वापर करणार्या देशांच्या यादीत दक्षिण कोरिया बराच वर आहे. International Federation of Robotics नुसार दर १० कर्मचार्यांमागे तिथे एक रोबो काम करतो.
आत्महत्येच्या (!) घटनेच्या वेळी काही साक्षीदारांच्या मते त्यांनी सायबोर्गला जागीच गरगरताना आणि मग स्वत:ला झोकून देताना पाहिले. रोबो खाली कोसळताना त्याचे तुकडे झाले. या तुकड्यांचे कंपनीद्वारे यथावकाश विश्लेषण केले जाईल. एखादे यंत्र कायमचे नादुरूस्त होते किंवा बंद पडते तेव्हा आपण ते यंत्र ’कामातून गेले’ म्हणतो. इंग्रजीत ’डेड’ म्हणत असल्याने ’मृत’ शब्द वापरला गेला हे आपण समजू शकतो पण ही ’आत्महत्या’ असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे.
मुळात रोबो ’आत्महत्या’ करू शकेल का!
’तेरी बातोंने ऐसा उलझा दिया’ या चित्रपटातली नायिका सिफ्रा (क्रिती सनॉन) एक आधुनिक गृहकृत्यदक्ष युवती रोबो असते. तिला पहिल्यांदा साडी नेसलेली पाहून तिच्या सौंदर्याची स्तुती करताना नायकाची आत्या म्हणते,"आज तो तुम पुरे शहर में आग लगा दोगी". सिफ्रा विचारते, "क्या आप चाहती है मै पूरे शहर में आग लगा दूँ ?" नायक घाईघाईने तिला सांगतो, "अरे,ये मजाक कर रही है!" यावर ’ओह ! जोक!" असे म्हणत सिफ्रा यांत्रिक (अमानवी) पद्धतीने ही ही ही करते. सिनेमातल्या या गमतीदार प्रसंगात कथा फुलविण्यासाठी थोडे स्वातंत्र्य घेतले गेले असले तरी असे रोबो केवळ ’प्रतिसाद’ देऊ शकतात व ते ही त्यांना जसे ’प्रोग्राम’ किंवा डिझाईन केले आहे त्यानुसार, हे या दृश्यावरून स्पष्ट होईल.

मदतनीस किंवा सेवा देणारे रोबो माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. पण माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. म्हणजे मानवी भाषाच नव्हे तर मानवी चर्येवरचे भाव आणि देहबोली सुद्धा या मदतनीस रोबोंना समजायला हवी. तरच ते अचूक संवाद साधू शकतील.
यावरही संशोधन झाले आहे.
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धीमत्ता परिषद २०२४ मध्ये फुदन विद्यापीठाने ’ग्युआनघुआ क्र. १’ या नावाचा भावनाशील ह्युमनॉईड सादर केला. याला चेहर्यावर राग, खिन्नता, दु:ख, आनंद व उल्हास यासारखे भाव प्रतिसाद स्वरूपात दर्शवता येतात. १६५ सेंमी उंची व ६२ किलोग्रॅम वजन असलेल्या या ह्युमनॉईडमध्ये ४५ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सांधे बसवले आहेत. यामुळे तो ’कठपुतळी’ सारख्या कडक हालचाली न करता माणसासारख्या सहजतेने हालचाली करू शकतो व माणसासारखी उठबस करू शकतो. चीनमधल्या वृद्धांना मदत व्हावी या हेतूने या ह्युमनॉईडची निर्मिती करण्यात आली आहे. आवश्यक ते वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रेमाने त्यांची काळजी घेऊ शकेल अशी त्याची ’इमोशनली इंटेलिजंट’ रचना आहे. तरीही माणसाचे रूप त्याला कसे येणार !

लवकरच येणार. जपानमध्ये मानवी त्वचेसारख्या प्रतीचे रासायनिक आवरणाचे रोपण रोबोवर करण्याचे प्रयोग सुरु आहेत. जसे हसताना माणसाची जबड्याची त्वचा ताणली जाते, वैतागल्यावर कपाळावर आठ्या पडतात तसे या कृत्रिम त्वचेचा वापर करून रोबोच्या चेहर्यावर घडताना दिसले तर त्याच्या आणि माणसाच्या दिसण्यातले आणि वागण्यातले अंतर हळूहळू नाहीसे होत जाईल.
आता त्याच्यात आणि माणसात फरक राहीला तो समानुभूतीचा आणि त्यायोगे होणार्या भावनानिर्मितीचा. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिला समजून घेणे, तिचे विचार, भावना, वृत्ती जाणून घेणे.
सादरीकरण प्रभावी असेल तर नाटक / सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून आपल्यालाही वाईट वाटते. त्यांना आनंद झालेला पाहून आनंद होतो. समोर जे दिसते आहे ते वास्तव नाही याची कल्पना असूनही हे घडते. जित्याजागत्या माणसांबाबत तर आपण अधिकच संवेदनशील असतो. द्वेष, मत्सर, राग, प्रेम, आकर्षण या सगळ्या भावना आतून निर्माण होतात.

तंत्रहृदयी ए-आय किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेला संवेदना नाहीत त्यामुळे तिला सहानुभूती कळत नाही आणि समानुभूती घेता येत नाही. अनुभूती राहो, कसलाही ’अनुभव’ घेता येत नाही. त्यांच्या डिझाइननुसार ते वस्तुनिष्ठ चिन्हांच्या आधारे समोरच्या माणसाच्या भावना ओळखून शब्दातून किंवा स्पर्शातून सहानुभूती व समानुभूती जाणवल्याचा भास निर्माण करू शकतात. मानवी वर्तनाचे अनुकरण करून त्यासाठी आवश्यक त्या हालचाली ,कृती, संवाद करू शकतात. परंतु भावनिक दृष्ट्या समरस न झाल्याने त्यायोगे कोणतेही भाव त्यांच्यात आपसूक निर्माण होत नाहीत.
मुन्नाभाई एमबीबीएस- या चित्रपटात एका बधीरावस्थेतल्या पेशंटला मॉडेलसारखे वापरून एक डॉक्टर प्रशिक्षण देताना दिसतात. ते त्या पेशंटचा उल्लेख सतत 'ऑब्जेक्ट' असा करत असतात. मुन्नाभाई त्यावर चिडून म्हणतो, ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्या लगा रखा है , इनका कोई नाम तो होगा". हा मानवी भाव रोबोमध्ये येऊ शकणार नाही कारण त्यांच्यासाठी सारे मानव हे फक्त 'ऑब्जेक्ट' आहेत.

इसापनीतीत प्राण्यांचे मानवीकरण केले आहे तसे माणसाने रोबोचे मानवीकरण केल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता संपणे या द. कोरियातील घटनेला माणसाने ’आत्महत्या’ नाव दिले आहे. मुळात आत्महत्येआधी मानवी मनात जी प्रचंड उलथापालथ व मेंदूत ज्या घडामोडी होत असतील त्या रोबोमध्ये होणे शक्य नाही कारण त्याला ’मन’ नाही. आत्महत्या करण्याइतक्या नैराश्याच्या टोकाला जाण्यासाठी आधी ’स्व’ची जाणीव हवी. अद्याप जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाकडे ’स्व’ विकसित करण्याची प्रणाली उपलब्ध नाही. म्हणजेच हा रोबो एक यंत्र म्हणून ’मृत’ झाला आहे
तरीही अशा मदतनीस रोबोंची गरज माणसाला भावनिक पातळीवर का वाटते ! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) हे रियल बॉटिक्स कंपनी चालवतात. त्याद्वारे डिजिटल बाहुल्यांची (रोबो) निर्मिती करताना २०१७ मध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता. रोबो मदतनीसांबाबत माणसाच्या प्रतिक्रिया त्यांना आजमावून पाहायच्या होत्या. त्यांनी काही रूग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही रूग्णांना डॉक्टरांच्या डिजिटल ’अवतारा’शी बोलायला सांगितले. पेशंटच्या मते ते डिजिटल अवताराशी जास्त सहजपणे बोलू शकले कारण तो आपल्याला ’जज’ करत नाही.
सॅन यांच्या मते यातून अशीही शक्यता आहे की भावनाप्रधान माणसे या निरपेक्ष पण निर्विकार म्हणजेच यंत्रहृदयी बाहुल्यांच्या (रोबोंच्या) प्रेमातही पडतील. काही त्यांच्या इतके आहारी जातील की त्यांच्यावाचून माणसाचे जगणे अवघड होईल. यातून मानसिक आरोग्याचे नवे प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, "सजीव आणि रोबो सखी किंवा माणूस आणि रोबो मदतनीस यांची बलस्थाने व मर्यादा ओळखता यायला हव्यात. अन्यथा आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. "
आज म्हणजेच १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भल्याबुर्या परिणामांचे विश्लेषण करण्याचा आणि त्याविषयी नव्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे.

कार्यक्षमता व उत्पादकता वाढावी या हेतूने माणसाऐवजी रोबो अधिकार्यांवर प्रचंड काम सोपवल्याने होणार्या परिणामांचा विचार करण्याची वेळ द.कोरियावरच नव्हे तर जगावर आली आहे. मुळात अतिताणामुळे मृत पावण्याइतपत म्हणजेच दुरूस्त होऊ शकणार नाही इतके बिघडण्याइतपत काम यंत्र असले तरी त्यावर लादणे योग्य किंवा नैतिक आहे का यास्वरूपाच्या चर्चा या घटनेनंतर सुरू झाल्या आहेत.
रोबोने माणसाचे काम हलके करणे अपेक्षित आहे की माणसाऐवजी काम करणे अपेक्षित आहे ! आवश्यक तिथे मजूर, परिचारक म्हणून किंवा माणसासाठी धोकेदायक अशा ठिकाणी रोबोचा वापर होतो तेवढे पुरेसे नाही का!
या संदर्भात एक मार्मिक व्यंगचित्र बघण्यात आले. त्यात एक आधुनिक महिला म्हणते आहे," ए-आय ने माझी सर्जनशील कामे करावी म्हणजे मला घरकामाला पुरेसा वेळ मिळेल हे मला नकोय. उलट ए-आय ने मला घरकामात मदत करावी म्हणजे मला माझ्या आवडीची सर्जनशील कामे करायला पुरेसा वेळ मिळेल."

तूर्त गुमी सिटी कौन्सीलने मृत सायबोर्गच्या जागी दुसरा रोबो नियुक्त करायचा विचार सध्या स्थगित केला आहे.
लक्षावधी वाहनचालकांना बेरोजगार करणार्या स्वयंचलित गाड्यांना मी भारतात प्रवेश करू देण्याच्या विरोधात आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. ए-आय मुळे करियरच्या अनेक संधी निर्माण होत असल्या आणि जगणे सुकर होत असले तरीही त्या त्या देशातील धुरीणांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा व त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ठाम भूमिका घेणे आता आवश्यक आहे.

माणूस दिवसेंदिवस यांत्रिक आणि रोबो ह्युमनॉईड होत चाललेला असताना या दोघांच्या मधली पुसट होत चाललेली सीमारेषा वेळीच ठळक करायला हवी आहे.
#robotics #AI