Friday, May 31, 2024

सहजीवन ६०

देणेघेणे टाळून साधेपणाने लग्न करण्याची अट आम्ही मोडकांना पत्रातून कळवली होती. ती मान्य करताना भावी सुनेनंही नवं घर ’आपलं’ म्हणून स्वीकारताना कसा विचार करावा आणि कुटुंब म्हणजे काय याविषयी भाऊंनी अतिशय संयत आणि नेमक्या शब्दात पत्रोत्तर दिलं होतं. ते विचार फक्त पत्रातून छाप पाडायला नव्हते तर ते त्यांच्या जगण्याचा भाग आहेत याचा प्रत्यय मी (आणि मानसीही) सून म्हणून घेत आलो आहोत. एकंदरीत ते फक्त सासरे म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच अतिशय कूल आहेत.

ते जितकं छान लिहितात तितकं उत्तम विनोदबुद्धीमुळे कोणत्याही मंचावर झकास बोलतातही पण असे प्रसंग क्वचित येतात कारण एखादं पद मिळावं, सामाजिक सन्मान मिळावा यासाठी धडपडणं हा भाऊंचा स्वभाव नाही. त्यांच्या संयतपणाला वैतागून सासूबाई (आई) कधीकधी ’एक नाही न दोन नाही, आपणच आपली एकट्याने बडबड करायची’ असं स्वगत पुटपुटतात हा भाग वेगळा !
त्यांचं वाचन, इंग्रजीचं आणि खरं तर आयुष्याचंही आकलन खोल आहे त्यामुळे त्यांच्याकडून ऐकण्यासारखं बरंच असतं. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. मी लहानपणी शाळेतून आल्यावर आईला इत्यंभूत हकीकत सांगत असे तसं महत्वाचं काही घडलं की घरी आल्यावर त्यांना आजही सांगत असते. ते ही उत्सुक चेहरा करून ऐकत असतात (सांगता कुणाला !) नातवंडंही त्यांना वेगळा फोन करून काहीबाही सतत सांगत असतात. त्यांच्या काही इब्लिस सहकार्यांचा, प्र. के अत्र्यांच्या भाषणाचा असे खास विषय निघाले की ते विशेष खुलतात. हातात दाढीचा ब्रश तसाच धरून अर्धी झालेली दाढी आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत तेव्हाचे सामाजिक, राजकीय गमतीदार किस्से सांगण्यात रंगून जातात.
आप्त-संबंधितांना जी काय मदत केली, करतायत त्याचा मात्र ते कधीही उल्लेख करत नाहीत. ते कुणाकडून तरी कळतं. आईवडिलांची शब्दश: सेवा करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. गरिबीतून वर येऊन निवृत्त सिव्हिल इंजिनीयर म्हणून स्वच्छ कारकीर्दीनंतरचं सुस्थिर आयुष्य जगताना जुन्या अप्रिय घटनांविषयी मनात कोणताही कडवटपणा कधी दिसला नाही. त्यांच्यातली अंगभूत शांतता या ’सोडून देण्यातून आली असावी. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा त्यांना गाढ झोपेतून उठवून ’चला, आपल्याला हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचंय’ सांगितलं, त्यावर त्यांनी फक्त ’चला’ म्हटलं. कोणतेही प्रतिप्रश्न, त्रागा नाही.
एखादी टेस्ट करावी लागली तर तोंडून ’स्स’ ही ऐकू येत नाही. त्यांच्यासारखा प्राप्त परिस्थितीचा समजूतदार स्वीकार करता आला पाहिजे असं नेहमी वाटतं. सुरुवातीला एकदा जवळच्या भागातून जाताना महेशने सांगितलं ’हा पूल भाऊंनी बांधला आहे’. मी आश्चर्याने ’हो का, अरे वा, केव्हा, कधी’ वगैरे म्हणायच्या आत ’कामच होतं आमचं ते आणि मी म्हणजे टीम असते बांधणारी’ एवढं म्हणून त्यांनी विषय संपवला. पदाचा दुराभिमान ,त्यावर अवलंबून असलेल्या प्रतिष्ठेच्या व्याख्या यापासून ते कायम लांब राहत आले आहेत.
त्यांना आम्ही कधीही संतापताना, मोठ्या आवाजात बोलताना पाहिलेलं नाही. त्यामुळे आई-भाऊ चुकून कधी भांडत असले तर ते ही कळत नाही. आई कधी कधी रमीचा डाव (जो भाऊंना कंपलसरी रोज दुपारी खेळावा लागतो) अर्धवट टाकून तरातरा आत आल्या आणि भराभरा चहा ठेवला तर काहीतरी बिनसल्याचा अंदाज येतो. पण दुसर्या दिवशी पुन्हा दोघं तितक्याच शांतपणे टीव्हीवर पाच वाजेची चित्रगीतं पाहात रमी खेळताना दिसतात. (त्या खेळाचे सगळे नियम आई म्हणतात ते असतात). म्हातारपणी यांची मुलं पण अशीच गुणी वागतील या आशेवर मी व मानसी आहोत. 😃
आम्हा दोन्ही जोड्यांच्या भांडणात मात्र ते कायम आमच्या म्हणजे सुनांच्या बाजूने असतात. त्यांची मुलं आमची तक्रार करत असली तर ते नरो वा कुंजरोवा करत आढ्याकडे पाहतात. चूक मुलांची असली तर थंड चेहर्याने एखादा जोरदार सिक्सर लगावतात. नातलगांवर त्यांचा प्रचंड जीव आहे. त्या बाबतीत आमच्याकडून हयगय झाली तरच त्यांच्या चेहर्यावर आठी दिसते.
त्यांच्या आणि आईच्या समाधानी सहजीवनाचं मूळ दोघांच्या व्यक्तिमत्वांमधल्या वेगळेपणामध्ये असावं. भाऊ वर्क इज वर्शिपवाले तर आई पारंपरिक विचारांच्या. कोकणातली अगदी समुद्रकिनार्यालगतच्या घरातली मुलगी विदर्भातल्या विरूद्ध तापमानाच्या आणि रुक्ष वातावरणातल्या घरात आली त्याला आज ६० वर्ष पूर्ण झाली. उकडीच्या मोदकाला न सोडता त्यांनी तळणीच्या मोदकालाही सहज स्वीकारलं. तेव्हाच्या पद्धतीनुसार दहावीपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी त्यांनी स्वत: बँकेचे व्यवहार करण्यापासून घराचा अर्थविभाग आणि नातलगांचा गोतावळा एकहाती समर्थपणे सांभाळला. आजही ते पाश घट्ट आहेत पण गुंता झालेले नाहीत.
आई म्हटली की पहिली आठवण तिची खासीयत असलेल्या पदार्थांची येते. त्यांच्यासारखे पाकातले लाडू, चकल्या, कोशिंबीरी आजही आम्हाला जमत नाहीत. मी पहिल्यांदा यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी साधा उपमा पण इतका चविष्ट केला होता की तेव्हा धड स्वयंपाक न येणार्या मला धस्सच झालं होतं. सुरुवातीला मी त्यांना नुसत्या भाज्या चिरून देत असे, आता त्या मला भाज्या चिरून देतात. पुढच्या महिन्यात येणार्या सणाला काय करायचं याची त्यांना या महिन्यापासूनच चिंता असते. त्या शेंगोळ्यांइतक्याच आवडीने पास्ताही खातात. तसं नको, असंच हवं वगैरे फारशा भानगडी नाहीत त्यामुळे त्यांचं (आणि त्यामुळे आमचंही) आयुष्य सोपं झालं आहे.
कोकणी शिडशिडीत वाण असल्याने त्यांचा कामाचा झपाटा आणि चटपटीतपणा अजूनही जोरदार आहे. त्यांना वयाची आठवण करून देऊन स्टुलावरून खाली उतरवावं लागतं. हळू चाला सांगावं लागतं. घरात कुणी अचानक आलं आणि नेमकं काही संपलेलं असलं तर त्या मी को... म्हणेपर्यंत चटकन साडी बदलून बाहेर पडलेल्या असतात आणि कांदा चिरेतो ...थिंबीर कोपर्यावरून आणलेली असते. चेंगटपणा त्यांना अजिबात आवडत नाही. कुणाला १२ ला जेवायला बोलावलं तर यांचा स्वयंपाक दहालाच तयार असे. सुनांच्या रेजिम मध्ये समजा मी ’गरम वाढू’ म्हणून भात लावायचा राहू दिला आणि घर आवरत बसले तर त्या अस्वस्थ होतात. आमची चुकून भांडणं झालीच तर ती अशा जागतिक कारणांवरून होतात. त्यामुळे कारण विसरून त्या दोन तासात पूर्ववत बोलू लागतात.
पहाटे उठून पोथी वाचन, जप, फुलं तोडणं, पूजा हे जितकं नियमित तितकं मैत्रिणींचा अड्डा जमवून व्हॉट्सअॅपवर प्लॅनिंग करून आठवड्याला किमान एक डबापार्टीही नियमित. ती नं झाल्यास ’कसं तरी’ होत असल्याने दवाखान्यात चक्कर मारावी लागते. भ्रमंतीच्या आवडीमुळे त्यांनी बहुतांश राज्य आणि लगतचे २,४ देश पाहिले आहेत. आता वयानुसार लांबचे प्रवास शक्य नसले तरी एक दिवसाच्या सहली अखंड सुरु असतात, तेच त्यांचं टॉनीक आहे. त्यांना भरभरून जगायला आवडतं. तरूणपणात जबाबदार्यांना प्राधान्य दिल्यानं करायचं राहून गेलेलं त्या उत्साहाने करत असतात. त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त दुधावरच्या सायीचा, नातवंडांचा. आता त्यात नातसुनेची भर पडली आहे. आजी त्यांचाही वीक पॉइंट आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत रमत असल्याने आईंना कंटाळा येत नाही. त्यांनी आजवर एकही टीव्ही मालिका पाहिलेली नाही, पाहत नाहीत हे तर त्यांच्या पिढीकडे बघता आठवं आश्चर्यच आहे. टीव्हीसमोर कधीतरी बसल्याच तर पाच मिनीटात ’सारखं आपलं शरद पवार आणि मोदी..बरं एक वेळ ते ठीक आहे पण रेल्वे बजेटची भाषणं ही काय तासंतास ऐकायची गोष्ट आहे का !’ असं भाऊंना उद्देशून पण स्वगत म्हणत त्या आत जातात. 🙂 टीव्ही सारखाच गॉसीप, हेवेदावे या गोष्टींशी त्यांचा संबंध नाही.
आम्हा दोन्ही सुनांना त्यांनी कोणतीही तुलना न करता कायम कृतीशील पाठिंबा दिला आहे. जे काय अवांतर कामधाम आम्ही करू शकलो/ शकतो आहोत ते त्यांच्या जीवावर. जुळ्यांच्या जन्मानंतर एक दोनदा मध्यरात्री जाग आली तर त्या आईच्या मायेने माझे पाय दाबत बसलेल्या होत्या. अशा अमूल्य आणि चिरंजीव आठवणींपुढे सगळे राग लोभ क्षुल्लक आणि क्षणिक वाटतात.
आई भाऊंच्या सहजीवनातही अनेक राग लोभाचे प्रसंग येऊन गेले असतील पण अशाच काही अनमोल आठवणींच्या बळावर त्यांनी त्याची साठी आज कृतार्थतेनं पार केली आहे. त्यांचं घरात असणं हीच आमची उर्जा आहे. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लाभोत. त्यांचे हास्य कायम राहो ही आजच्या शुभदिनी प्रार्थना. दोघांनाही आम्हा सर्व कुटुंबियांकडून अधिक समृद्ध सहजीवनाच्या आणि निरामय आरोग्याच्या अनेकानेक शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार 🙏💫

Sunday, March 31, 2024

प्रोजेक्शन रुम आणि सिनेमा

 ज्येष्ठ मंडळींना जिना चढायचा त्रास नको म्हणून बर्याच दिवसांनी जवळच्या जुन्या सिनेमाहॉलला गेलो होतो. आधीचा शो संपायला जरा वेळ होता. सोबत आलेले वझेकाका म्हणाले ’आपण प्रोजेक्शन रुम पाहायची का!'

एके काळी भुसावळकर असल्याने आणि सिनेमाच्या रीळांच्या पेट्या गावोगावी जात तेव्हा #भुसावळ हे प्रमुख वितरण केंद्र असल्याने लागेल तो प्रत्येक #सिनेमा पाहायचा जणू दंडक होता.
ब दर्जा सोडला तर मासेस, क्लासेस, समांतर, मसाला असा कोणताही भेदभाव न करता आम्ही सगळे सिनेमे सारख्याच उत्साहाने आणि मनोभावे पाहत असू. सर्व वडिल मंडळींनी रेल्वेत नोकरी करणे (व मुलांनी सिनेमे पाहाणे) हा गावचा शिरस्ता होता.
तेव्हापासून या प्रोजेक्शन रूम बद्दल आणि तिथून येणार्या झोतातून पडद्यावर जादुई जग निर्माण करणार्या तंत्राबद्द्ल कुतूहल होते.

तिथल्या दादांनी परवानगी तर दिलीच , फोटोही काढू दिले. रीळ/रील लावायची मशीन बाजूला अँटिक पीस सारखी मुकाट्याने उभी होती. मशीनचे सगळे भाग, त्यावर रील कशी चढवली जाई, आवाज कसा नियंत्रित केला जाई याचीही त्यांनी माहिती दिली. चाळीस वर्षांपासून ते प्रोजेक्शन रुम सांभाळतअसल्याने त्यांच्याकडे सगळी उत्तरे तयार होती.


Old Projector
Latest Projector
सध्या वापरात असलेले आधुनिक वेब app, त्याची लायसन्स पद्धत, त्याचे बॅटरी बॅकअप याबद्दलही त्यांनी तितकीच सविस्तर माहिती दिली. (Photos attached) या तंत्रामुळे रील तुटणे, पडद्यावर चांदण्या चमकणे, मध्येच म्यूट होणे (मग आवाssज म्हणून प्रेक्षकांनी ओरडणे), रीलचा नंबर चुकणे (त्यामुळे भलताच सीन सुरु होणे) वगैरे गमतीला आपण मुकलो.
रीलचे जुने प्रोजेक्टर बघताना भुसावळच्या म्युनिसिपल पार्कची आठवण आली. तिथल्या प्रत्येक गल्लीत एकेका सिनेमा कंपनीचे ऑफीस असे. प्रिमियरच्या आधी दोन्ही बाजूंनी सिनेमाचे पोस्टर चिकटवलेल्या त्रिकोणी ढकलगाडीची बँडवाजा व गॅसबत्तीसह वरात निघे. पुढे एक जण हँडबिल फेकत चालत असे. पोस्टरवरचे नट नट्यांचे चेहरे गुबगुबीत असत आणि ते एकाच गुलाबी रंगात रंगवलेले असत. शिवाय दररोज सिनेमाच्या जाहिरातीची रेकॉर्ड वाजवत सायकलरिक्षा फिरत असे. त्यात आधी सिनेमातले काही डायलॉग असत. मग सिनेमातल्या एखाद्या गाण्याचा तुकडा. शेवटी स्थानिक, गरिबांच्या अमीन सयानीच्या आवाजात ’तो बहना भाईयो देखना ना भूलिए, अपने पूss रे परिवार के साथ, रोजाना चाssर खेलो में ,भुसावल के अलिशाssss न शिरि मामाजी टाकीज के इर्रुपेरी परदेपर.... पुढे सिनेमाचे नाव इको इफेक्ट देऊन तीन वेळा’.
हे ऐकताच सिनेमा पाहायचा दिवस , शो आणि कंपनी ठरवणे, परवानगी मिळावी म्हणून घरात विशेष चांगले वागणे, ठरल्या दिवशी गर्दीत घुसून तिकिटे काढणे आणि आधीचा शो संपताच मुंबईच्या लोकलमध्ये ज्या वेगाने शिरावे लागते तशी आत मुसंडी मारून धावत पंख्याखालची जागा पकडणे यात आम्ही तरबेज असू.
हा आहे रामू, याला आहेत नऊ मुलं.. मग रामूचे आयुष्य कसे दु:खी , त्यानंतर श्यामू येई त्याला दोनच मुले असल्याने तो कसा सुखी.. ही जाहिरात येई, मग पडद्यावर थरथरणारी तुटत जुळत कशीबशी दिसणारी इंदिरा गांधी किंवा बापूंची छोटी लपलपती डॉक्य़ुमेंटरी (ती मध्येच फास्ट फॉरवर्ड होई त्यामुळे बापूंची दांडीयात्रा चार्ली चॅप्लिनच्या वेगाने सुरू होई), एक तितली अनेक्क तितलियाँ वगैरे. विको, निरमा आणि लिरिलच्या जाहिरातीने सांगता आणि मग सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट एकदाचे दिसले की सगळ्या मेहनतीचे चीज होई.
नंतर अद्याप तो सिनेमा न बघितलेल्या मैत्रिणीला त्याची स्टोरी सांगितल्याशिवाय हे प्रकरण सुफळ संपूर्ण होत नसे. या सगळ्या planning to narration स्किलचा पुढे फार उपयोग झाला 🙂
तूर्त प्रोजेक्टर दादांना धन्यवाद. त्या गूढ खोलीबद्दलचे कुतूहल शमविल्याबद्दल आणि नॉस्टेल्जिक केल्याबद्दल. तुमच्या काय आहेत पूर्वीच्या सिनेमाविषयीच्या आठवणी !

Friday, December 15, 2023

कसे असेल उद्याचे तंत्रज्ञान !

FutureTechnology 

आज चाळीशी ओलांडलेल्या पिढीने कॅसेट ते म्युझिक अॅप्स असा भारतीय संगीताचा प्रवास पाहिला आहे. डायल करावे लागणारे फोन ते व्हिडिओ कॉल, दूरदर्शन ते ओटीटी, टाईपरायटर ते व्हॉईस टायपिंग. आगगाडी ते मेट्रो रेल्वे असे बदल अनुभवले आहेत. काळाबरोबर सतत बदलणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. १० कोटी लोकांपर्यंत पोचायला फेसबुकला ९ वर्ष लागली पण चॅटजीपीटीला फक्त २ महिने. हे बघता बदलाचा वेग किती वाढला आहे हे लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर २०२३ हे वर्ष संपत आलेले असताना उद्याचे म्हणजे येत्या दोन दशकातले तंत्रज्ञान कसे असू शकेल याबाबत तंत्रज्ञ, माध्यमतज्ञ व अभ्यासक काय म्हणतात ते पाहूया.

पुढील दोन दशकात एआर आणि व्हीआर मुख्य प्रवाहात येईल. एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअॅलिटी. एआर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. यामुळे गुगल मॅप सारखी सुविधा जणू आपले बोट धरून प्रत्यक्ष वाटचाल करेल. व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी. खरे असल्याचा भास. सध्या हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण आभासी आकाशात दिले जाते. भविष्यात व्हीआरच्या मदतीने दुसर्या गावातील किंवा देशातील प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा सामने, शिक्षण, पर्यटन, मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी इ. बरेच काही व्हीआर द्वारे नियंत्रित केले जाईल.
जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, अनेक कामे केवळ आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण सिरी, अॅलेक्सासारख्या ज्या सुविधा पाहतोय त्या फारच साधारण वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल.
ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल. कोरी बर्गमन, या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे शेकडो व्हिडिओ साक्षीदार अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर बातमी बघणार्याला आपण तो अपघात होताना तिथे हजर आहोत असा अनुभव येईल,.
मोबाईल फोन वापरून आपण सध्या जी कामे करतो त्यातली बहुतेक कामे स्मार्ट घड्याळे करतील. वेअरेबल म्हणजे परिधान करता येणार्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु होईल. ओटिस किमझे हे ’सिंपली मेजर्ड’चे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याचा भाग असेल किंवा आपल्या चष्म्याचा किंवा बुटाचा सुद्धा. तेव्हाची गॅझेट्स आतासारखी हातात धरायची गरज राहणार नाही कारण ती आपल्या अंगाखांद्यावर कुठेतरी असतील. आपला हात किंवा तळवा विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल.
अशक्य वाटते आहे ना ! काही वर्षांपूर्वी आज नॉर्मल वाटणारा व्हिडिओ कॉल सुद्धा अशक्य वाटत असे.
बायोमेट्रीक तंत्रज्ञान सध्या विकसित होते आहे. येत्या काळात प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचा होलोग्राम म्हणजे त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा त्या व्यक्तीच्या वतीने मिटींगला उपस्थित राहू शकेल. एलॉन मस्क यांची न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन ही कंपनी या न्यूरो तंत्रज्ञानावर काम करते आहे. मानवी शरीरात रोपण करता येईल असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) ही कंपनी विकसित करते आहे.
लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील. आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे सुमारे ३ अब्ज वापरकर्ते आहेत. ते टिकून राहील मात्र त्याचे रुप वेगळे असेल. अन्य प्लॅटफॉर्मचे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ शोधतील. पॉडकास्ट ,शॉर्ट व्हिडिओ व लाईव्ह व्हिडिओची चलती असेल. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल. त्यात अत्याकर्षक फीचर्स येतील.
जागतिक राजकारणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भल्याबुर्या घडामोडी होत राहतील.
डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात लोक क्रांती करु शकले. ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ किंवा ’मी टू’ सारख्या हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. भविष्यात असे ट्रेंड जास्त मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.
दुसर्या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच ग्रुप डिलिट केला जातो. आगामी काळात ए-आय व नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. बनावट खात्यांवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.
जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक घातक परिणाम आहे. लाईक्स कमी आले की निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, ट्रोल करणे, सहज उपलब्ध झालेल्या पॉर्न आशयाची चटक लागणे इ. दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. हे प्रचंड वाढतील.
आपण विविध वेबसाइटवर फिरत असताना त्यावर कोणी, काय व किती वेळ पाहिले याची नोंद होते. त्यावरू आपली आवड लक्षात येते. आपल्या आवडीशी जुळणार्या जाहिराती आपल्याला सोशल मिडिया फीडमध्ये दिसू लागतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा राजरोस शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये किंवा फोनवर बोलताना ’व्हॅकेशन’ किंवा ’सुट्टी’ असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल. तो डाटा अधिक मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. खासगीपण फारसे उरणार नाही.
खोट्या बातम्या, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळामुळे ते अधिक क्रूर होत जातील. ए-आयबरोबर डीप फेकचा वापर वाढेल. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थांनी याबाबत वेळीच कठोर पावले उचलली नाही तर हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकेदायक असेल.
ए-आय (कृत्रिम बुद्धीमत्ते) मुळे सर्जनशीलतेला आव्हान निर्माण होईल. माणसाच्या आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडियामुळे नकारात्मक परिणाम होतील. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाईल.
या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. विस्मृती किंवा त्यासारख्या आजारांसाठी हे उपकारक ठरेल. पण कदाचित स्मृती हॅक होऊ शकेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही.
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. दुर्दैवाने ती न शिकताच बेधडकपणे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. सोशल मिडिया व ए-आय वापरताना कुठे थांबायचे हे आतापासूनच प्रत्येकाने ठरवायला हवे. (उदा: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला असला तरी चालकांचे काम हिरावून घेणारी ए-आय आधारित स्वयंचलित वाहने भारतात धावणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.)
तांत्रिक सुविधा आणि गॅझेट्सच्या ढिगार्यातून आपण किती व काय निवडतो, त्यावर किती विसंबून राहतो आणि काय फॉरवर्ड करतो यावर आपल्या मनाचे, कुटुंबाचे आणि समाजाचे स्थैर्य अवलंबून असणार आहे.

#futuretechnology #punyanagari