Saturday, February 18, 2023

पेंच - गोठणगाव व्याघ्र प्रकल्प : काही नोंदी

 तारखा ठरल्या. रिसोर्ट बुक झाले. सफारी बुक केल्या. आता गाडी ठरवायची. म्हणजे वरातीमागून घोडं असा प्रकार.इनोव्हाबद्दल जुजबी बोलणे झाले. दरम्यान मध्य प्रदेशात एक रूद्राक्ष बाबा उगवले. त्यांनी फेकलेला रूद्राक्ष घ्यायला गावातली, आसपासची माणसे गाड्या भरभरून जाऊ लागली आणि आमची ठरल्या तारखेला ’कुणी गाडी देता का गाडी’ अशी स्थिती झाली. एकदाची नागपूरहून गाडी मिळाली. 

स्टेशनवरच हल्दीराम बोगी रेस्टॉरंटला नाश्ता करून पहिले ठिकाण -नागपूरहून जेमतेम सव्वा तास - उमरेड कर्‍हांडला अभयारण्याचे गोठणगाव गेट.

नागपूर आणि भंडार्‍यापासून 60 किमी, भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भिवापुर तालुक्यानजीकचा हा भाग. जंगली कुत्री, (अस्वलं बरीच असतात असं ऐकलेलं.  दुपारी २ ते ६ ची सफारी. टळटळीत उन्ह. 

गेटपाशी थर्माकोलच्या पेटीत पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक विकणारी आजी आणि २ वनरक्षक सोडून शांतता. फक्त वार्‍याचा आणि पानांचा आवाज. २ वाजताच भरारा जिप्सी, गाईड येऊन धडकल्या. वनपर्यटक बायनॉक्युलर, मोठ्या लेन्सचे कॅमेरे वगैरे सरंजामासह टोप्या घालून तय्यार. वाळकी पाने खसाखस चेंगरत जिप्सी ४ तास गरागरा फिरत होत्या. अर्थात वाघाच्या शोधात. वाटेत अनेकदा टी पॉइंट लागायचा. मध्ये पाणवठ्यापाशी एक दीर्घ विश्रांती. तर्‍हेतर्‍हेच्या पक्ष्यांचे शांतता चिरत जाणारे वेगवेगळे आवाज. जवळचे मचाण, त्याआडून चकाकणारा सूर्य. तपकिरी, राखाडी, पिवळसर हिरवी, हिरवट पिवळी, काळपट अशा छटांची असंख्य झाडे. त्यातून डोळे दिपवत येणारी उन्हाची तिरीप. काहीशे वर्ष वयाचा स्वत:च्याच पारंब्याच्या जाळ्यात स्तब्ध बसलेला वटवृक्ष. सूर्य कलल्यावर परतताना जंगलाचा बदललेला सावळा चेहरा.


वाघाने शेवटपर्यंत दर्शन दिले नाही पण अचानक सामोरे आलेले आणि बिचकून झाडात लपलेले दोन उंचपुरे धिप्पाड नीलगाय नर, चमचमणार्‍या सोनेरी कातडीचे काळवीट, काही वानरं एवढा लाभ झाला. पुढे दोनच दिवसांनी इथे पोचलेल्या सचिन तेंडुलकरला बच्चे धरून ४ वाघ दिसले म्हणे.



रात्री मुक्काम- नागपूर-वायुसेना नगर इंद्राणीकडे. आखीवरेखीव रस्ते , ऐसपैस क्वार्टर्सची शिस्तबद्ध रचना. छोटे गावच जणू. तिने अगत्याने केलेली निवांत सोय.उशीरापर्यंत गप्पा. झकास ब्रंच करून पेंचला रवाना. दही संपवा अमुक संपवा मंजि जवळपास मिनी किचन घेऊन आली होती. 

आता मुक्काम -पेंच -पलाश रेसॉर्ट. ’जी’ एवढाच शब्द बोलणारा साधासुधा उत्तर भारतीय कुक आणि सेवेला तत्पर तिथल्याच खेड्यातला पोरगेलासा चुणचुणीत तरूण. व्हरांड्यात बसून कॉफीपान, रेसॉर्टची पाहणी, पुन्हा गप्पा. मागच्या स्विमिंग पूलमध्ये यथेच्छ डुंबून झाल्यावर स्थानिक खेडेगावात परतणार्‍या गुरांच्या कळपांना चुकवत अंधार पडेतो भटकंती. आल्यावर डेरेदार झाडाखाली पैज (पैसे नव्हे) लावून पत्ते, चहापान.मीनलचे मुठिये. कुकने तयार ठेवलेले गरमागरम जेवण. तव्यावरून पानात पडणारे गरगरीत फुलके. और क्या चाहिए !

पहाटेची सफारी ठरवल्याने सकाळच्या चहाबरोबर पाणी बिस्कीटासहित सफारी बास्केट व्हरांड्यात तयार होती. पहाटे साडे ५ च्या कुडकुडत्या थंडीत स्वत:ला नखशिखांत लपेटून घेऊन खुरसापार गेटला पोचलो. 

सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर जवळपास तीनशे चौरस किलोमीटर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प. लगतच्या पेंच नदीच्या नावावरून यालाही पेंच म्हणतात.

रूडयार्ड किपलिंगला जंगल बुक लिहिण्याची प्रेरणा पेंचमधून मिळाली असं म्हणतात. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या प्रकल्पात हिमालयातल्या सुमारे २१० पक्ष्यांच्या प्रजाती येतात, गिधाडांच्या दुर्मिळ जाती आणि गवेही खूप आढळतात असं ऐकलं होतं. यातलं काय काय दिसतं याची उत्सुकता होती. पक्षीप्रेमी मैत्रिणींना थोडी जास्तच.

दिव्याच्या धुवट प्रकाशात १५-२० जिप्सी रांगेत उभ्या. ५,६ जिप्सीमध्ये उत्सुक चेहर्‍याचे गोरे पर्यटक. सराईतपणे वावरणारे आपसात गोंड भाषेत चटरपटर करणारे स्थानिक चालक आणि गाईडची गर्दी. गाईडमध्ये मुलींची संख्या लक्षणीय. ६ च्या ठोक्याला एकामागोमाग एक जिप्सी सुटल्या. आमची पहिलीच म्हणून आम्ही ऐटीत पण हाय राम ! नंतर कळलं की पहिल्या ५,६ पुढे जाताच मागच्या बर्‍याच जिप्सींना गेटच्या लगतच वाघोबांनी निवांत दर्शन दिलं. जाऊदे! वाघ म्हणजेच जंगल नव्हे, नाही का! आता फटफटायला लागल्याने दात वाजणार्‍या थंडीतही पेंचच्या घनदाट जंगल सफारीचा आनंद वेगळाच होता. 

एका पुलावर पंधरा-वीस मिनीटं गाडी बंद. चालक गाईड खाटखुट करत होते. तेव्हा दर्शन दिलं असतं तर! पाचांवर धारण बसणे म्हणजे काय हे कळलं.

कोवळ्या उन्हात पक्ष्यांच्या चिवचिवाटात सोलर नियंत्रित पाणवठे, हिरव्या रंगाच्या अगणित छटा, अधूनमधून दिसणारे सांबर, रानकुत्रे, मोर, वानरं यांना टिपत ब्रेक पॉइंटला पोचलो. तिथे चहापाणी आटोपून नव्या उमेदीने कूच. 

जिप्सी एकमेकांना क्रॉस होत तेव्हा एकच प्रश्न ’दिखा क्या !’ आणि गोंड भाषेत त्यांची खुसूरपुसूर. शेवटपर्यंत नहीच दिखा पण उंचच उंच झाडांनी वेढलेल्या जंगलाचा विशिष्ट वास, कुठे पाण्याचा नाजूक आवाज, प्राण्यांची चाहूल, त्यांचं ओझरतं दर्शन, डोळे भरून पाहावं की कॅमेर्‍यात टिपून आपल्या पिल्लांना पण दाखवावं याचा गोंधळ, ’त्या’ची प्रतीक्षा, प्राण्यांचे कॉल समजून घेण्याची धडपड, ते सांगणारे गाईड, रोरावत इकडून तिकडे खडबडीत रस्त्यांवरून धावणार्‍या जिप्सी, ’तो’ दिसलेल्यांच्या विजयी आणि न दिसलेल्यांच्या नाराज मुद्रा या नादात मन रोजच्या आयुष्याला विसरून पार जंगलमय झालेलं.

 हा हिरवा अनुभव आणि सोबतीने सफारीचा अपवाद वगळता अखंड गप्पांसह केलेली धमाल केवळ अविस्मरणीय. 









Wednesday, February 1, 2023

साहित्य संमेलन आणि तरूणाई

वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील ,काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण तरूणींशी संवाद साधला. 

कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परिक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. 

काही जणांना कसले तरी संमेलन वर्ध्याला होते आहे हे माहित होते तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत  हे माहित होते तसेच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सला भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’, असे उत्तर दिले.

एकीने सांगितले, " मला एकदा कवीकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी  इतर कार्यक्रम पाहू शकले नाही. "

एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता. 


यंदाचे संमेलन अगोदरच झाले असून त्याचे अध्यक्ष  नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे एक जण म्हणाला. 

मंजुळ्यांचे ते वक्तव्य संमेलनातले नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ मधले होते असे मी सांगितले. 

एकीने विचारले ,"गेल्या महिन्यात मुंबईला झालं ते काय होतं मग?" ’ते राज्य सरकारने आयोजित केलेले ’विश्व मराठी संमेलन’ होते असे मी सांगितले. 

"मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत ?" यावर मी ’अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ असे सांगितले. 

यावर काही जणांनी ’अशी एकूण किती संमेलने असतात’ असे विचारले.  

’विद्रोही संमेलने असतात. जाती धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलने आयोजित करत असतात. अ.भा.साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते’, असे मी सांगितले.

प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरे मी देते आहे असे या संवादाचे स्वरूप उलट झाले होते.

हे तरूण समस्त मराठी युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करतात असा माझा दावा नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते,  हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. संमेलने बहु झाली या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचे आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.  

तरूणांचा वरचा वर्ग इंग्लीश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. ती ही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गी तरूण समाज माध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली तरी पदरमोड करून संमेलनास जाणे त्यांना परवडत नाही.  

मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात? 

पन्नाशीला पोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाज माध्यमावर लाईक मिळू लागल्याने आपल्या कविता, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरूण. 

तरूणांशी बोलल्यावर जाणवले की साहित्य संमेलने युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचार पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येते तेच साहित्य नसते हे स्वीकारायला हवे. साहित्य म्हणजे भोवताल टिपणे. त्याचे स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरीक्त  स्कीट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मीम असेही असू शकते. 

चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनांतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लीकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा.  संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपतत्रातून या विषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात. 

अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.

संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हे देखील तरूणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचे मह्त्वाचे कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावे लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावे पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी व्यासपीठाचा वापर आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरूणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचे असेल तर त्यांनी संमेलनाला का यावे ! 

या तरूणांशी बोलताना लक्षात आले की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा:  समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचे म्हणणे, आम्हाला मोबाईलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडीओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे एवढेच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडियोबुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोचले असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी- मृत्युंजय, पुलं-वपु” मध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात. 

याचे प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असले तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे अनेक लेखनविषयक स्पर्धा होत असतात. तरूणांचे साहित्य कट्टे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडीट व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत तसेच प्रमाण भाषेत सकस लिहीणारे शहरी तरूणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रूंदावून या सार्‍याला सामावून घेतले तर तरूणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल. 

लोकशाही व्यवस्था बदलण्याचे आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मिडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलने कालबाह्य ठरतील. 

वर्धा संमेलनातील कार्यक्रम बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजकांनी मनापासून प्रयत्न केलेला दिसतो आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडते आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणे, लेखकांनी थेट व्यक्त होणे, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचे  वैविध्य हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचेच नव्हे तर सक्रियतेचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमधून समाजातले साचलेपण दूर होते. वैचारिक जळमटे दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय , हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसते आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात देखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचे निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवे. जागतिक बदलांचे वारे इथवर पोचायला हवे तरच तरुणांना साहित्य संमेलने हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.

https://www.evivek.com/Encyc/2023/2/1/Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan-2023-and-youth.html?fbclid=IwAR15eOevuHKKYhrIyOtn04ZlhwM6qyrhDorFmn9-VUHyg8MxvM4pIP8kNag

साप्ताहिक विवेक - साहित्य संमेलन विशेष अंकातील ’युवाकट्टा’ या सदरातील लेख 

Saturday, January 21, 2023

जो हुकुम मेरे आका - चॅटजीपीटी #chatGPT

आपल्याला सध्या गुगल वापरायची इतकी सवय झाली आहे की आपण गुगलवर काहीच शोधले नाही असा आपला एक दिवस देखील जात नाही. आपण एखादा शब्द किंवा वाक्य टाईप करायचा अवकाश की गुगल (किंवा इतर सर्च इंजिन) त्याच्याशी जोडलेलेल्या लाखो वेबसाईट्समधल्या माहितीचा ढिगारा भराभर उपसू लागतो. त्यातून आपण दिलेल्या शब्दाशी संबंधित माहिती असलेल्या लिंक्सची भलीमोठी यादी आपल्यासमोर आणून टाकतो आणि हे सारे क्षणार्धात.

पण याला एखादा निबंध , लेख, सारांश किंवा एखादे पत्र लिही म्हटले तर ?
अर्थातच ते शक्य नाही. गुगल फार तर पत्रांचे नमुने दाखवेल, निबंधातले मुद्दे शीर्षकावरून शोधून देईल, पण ही विखुरलेली माहिती गोळा करून , त्यावर विचार करून त्यातून एखादा लेख, पत्र, निबंध, सारांश लिहिण्यासाठी किंवा कोणताही मजकूर तयार करण्यासाठी आवश्यक असते ती मानवी बुद्धीमत्ता. त्यामुळे ही गुगलची फार मोठी मर्यादा ठरते.
अर्थात अशी माहिती गोळा करून एस-ई-ओ पुरते जुजबी लेख तयार करून देणारी काही सुमार चर्नर सॉफ्टवेअर्स बाजारात आहेत पण त्यात अनेक त्रुटी आहेत.
आता मात्र एक बलाढ्यअसा जिन आपल्या हाती आला आहे ज्याला हुकूम केला की तो हे सगळे लेखनप्रकार सहज हाताळू शकतो. नागरी समस्येविषयी थेट महापालिका आयुक्तांना पत्र लिहायचे असो किंवा रजेचा अर्ज असो. तो चक्क प्रेमपत्रही लिहू शकतो. पेस्ट करण्यापूर्वी नाव तेवढे योग्य व्यक्तीचे घाला अन्यथा गोंधळ होऊ शकतो. तसे झाल्यास तो तितक्याच निर्विकारपणे क्षमापत्र व ते ही निरुपयोगी ठरल्यास ब्रेक-अपचा मेसेज सुद्धा लिहून देऊ शकतो.
तो गृहपाठ करून देऊ शकतो हा विद्यार्थ्यांसाठी नवलाईचा आणि पालक-शिक्षकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरणार आहे.
तो कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो.
म्हणाल त्या विषयावर म्हणाल तितक्या शब्दांमध्ये किंवा ओळींमध्ये मुद्देसूद निबंध, लेख किंवा शोधनिबंध लिहू शकतो.
उत्तर आवडले नाही तर नव्याने लिहून देऊ शकतो.
’रशिया-युक्रेन समस्ये’ पासून ’शक्तीपीठांपर्यंत’ ’कचर्यापासून खतनिर्मिती’ पासून रोबोटीक्स पर्यंत, दिक्षित-दिवेकर डाएट पासून पाककृतींपर्यंत, लोककलांपासून विटी-दांडू सारख्या खेळापर्यंत, चीनमधील कोरोनाच्या परिणामांपासून काफ्काच्या साहित्यापर्यंत कोणताही देशी-विदेशी विषय त्याला वर्ज्य नाही.
या अद्भुत जिनचे नाव आहे ’चॅट-जीपीटी’. ChatGPT (Generative Pre-trained Transformer)
आपण त्याला चुकीचा प्रश्न विचारला तर तो प्रश्न दुरुस्त करतो. आपण दिलेले विषय, आपले संभाषण लक्षात ठेवतो. आता मुद्दाम त्याला आपण ’माझा आवडता नेता’ यासारखा विषय दिला तर तो मनकवडा नसल्याने स्पष्ट सांगतो ’हे पाहा, मी एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे, तुम्ही नाव सांगितले तर मी माहिती देऊ शकेन.’ एकूण आपण त्याला आगाऊ, तर्कहीन प्रश्न विचारले तर तो नम्रपणे नकार देतो. पण योग्य आज्ञा देताच त्याचे काम झरझर सुरु.
भयचकित होऊन पाहत राहणे एवढेच आपल्या हाती उरते.
म्हणूनच या तंत्रज्ञानाचे वर्णन एलोन मस्क यांनी ’भयंकर सुंदर’ असे केले आहे.
हा चॅट-जीपीटी नामक कॉम्प्युटर प्रोग्राम किंवाअत्याधुनिक चॅटबॉट ओपन-एआय (OpenAI) या अमेरिकेतील स्टार्ट अप ने नोव्हेंबर २०२२ मध्ये तयार केला आहे. अॅलेक रॅडफ़ोर्ड आणि चमू यावर काम करते आहे.
संगणक राज्याच्या पहिल्या पायदानवर याच्या मदतीने पोचून पुन्हा एकदा सरताज होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट यात अफाट गुंतवणूक करतो आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचा तसेच मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर करून मजकूर तयार करणे हे चॅट-जीपीटीचे मुख्य काम आहे. हा मजकूर वाचनीय, दिलेल्या संदर्भाशी सुसंगत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक असतो हे त्याचे वैशिष्ट्य.
चॅट-जीपीटी openai.com वर सध्या नि:शुल्क उपलब्ध असून चाचणी स्वरूपात काम करतो आहे.
त्याचा वापर करण्यासाठी आपण मेल अकाऊंट उघडतो तसे येथे अकाउंट तयार करावे लागते.
मजकूर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच डाटा (विदा). सुमारे ५७० जीबी डाटा त्याने इंटरनेटवरील विविध माध्यमातून गोळा केला आहे. हा प्रचंड डाटा जसे त्याचे बलस्थान आहे तशीच त्याची मर्यादा देखील.
माहिती अपुरी असेल तर येणारे उत्तर ही अपुरे असू शकेल. माहिती चुकीची असेल तर त्या आधारे लिहिलेल्या लेखातही चुका होणारच. अर्थात चुकीचे उत्तर दिल्यास आपण त्याला दुरुस्ती सुचवू शकतो. तो त्याची नोंद करून घेतो.
सध्या त्याच्याकडे २०२१ पर्यंतचाच विदा उपलब्ध आहे त्यामुळे तो अमिताभचा नवा सिनेमा ’झुंड’ आहे असे सांगेल, ’उँचाई’ नाही.
स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन सह अनेक भाषात तो काम करतो, मराठीत देखील. मात्र सध्या इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा त्यावर वापरता येत नाहीत. मराठीत प्रयोग करून पाहिल्यास सध्या तरी ’भयंकर सुंदर’ मधले भयंकर रूपच अस्तित्वात आहे.
तरीही अधिकाधिक संसाधनांचा वापर करून या समस्यांवर उपाय शोधणे सुरु आहे. परिपूर्णतेसाठी तो व्ही-आर , ए-आर तंत्रज्ञानाचीही मदत घेणार आहे.
यामुळे येत्या काळात एखाद्या वेबसाईटवर गेल्यावर ’आपल्याला काय मदत हवी आहे’ असे विचारणारे स्वयंचलित बॉट अजून चतुर होतील. ग्राहक सेवेची गुणवत्ता वाढेल. शिक्षण, वित्त, डीजिटल मार्केटिंग, आरोग्यसेवा तसेच मनोरंजन क्षेत्रात याचा प्रचंड वापर केला जाईल.
भविष्यात ’जो हुकूम मेरे आका’ म्हणत कदाचित हे प्रकरण गुगलला गिळून टाकेल.
गुगल आपल्याला आपण सांगू त्या विषयाचा शिधा गोळा करून देत होता. त्यातून काय ते निवडून रांधायचे काम आपल्याला करावे लागत होते. चॅट-जीपीटी आपल्याला नुसता स्वैपाक करून नव्हे तर घास सुद्धा भरवून देतो आहे. आपल्याला बसल्याजागी ’आ’ करायचा आहे. घास घेताना उद्या त्याने आपल्यासाठी उखाणा घ्यावा असे वाटले तर लवकरच तो ती ही इच्छा पूर्ण करेल. आत्ताही करतो आहे पण सध्या तो ’समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता..’ प्रकारचा उखाणा घेतो. तेव्हा थोडी वाट पाहूया.
पण मग सगळे काही तोच करणार असेल तर आपल्या डोकं नामक अवयवाचा उपयोग आपण करायचा तरी कुठे, तर तो या जिन उर्फ आचार्याला बिनचूक ’ऑर्डर’ देण्याचे कौशल्य मिळवण्यात. हे शिकवणार्या प्रशिक्षकांना आता मागणी असणार आहे.
एक वेळ इतिहास, भूगोल, विज्ञान वगैरे विषय ठीक आहेत पण एकांकिका, नाटक, पटकथा लिहिता येईल का त्याला, शेवटी ते काम माणसाचेच. तर लोकहो, त्याला नाटक वगैरे सारे काही लिहिता येते. आपण फक्त विषय द्यायचा, त्यानुसार तो पात्रनिर्मिती करतो. संवाद आणि प्रसंग लिहितो. हवा तसा सांगाडा तयार करून देतो.
पण कविता करता येतात का त्याला? त्याला वेगळी प्रतिभा हवी. येतात, त्याला उत्तम कविता करता येतात. म्हणाल तर बडबडगीत स्वरूपाच्या म्हणाल तर अव्वल साहित्यिक दर्जाच्या. अगदी कीट्स किंवा वर्ड्सवर्थ किंवा आपल्याला आवडेल त्या शैलीत सुद्धा. त्याला काय कमाल प्रशिक्षित केले गेले आहे याची यावरून कल्पना येईल.
उदा:
With books in hand and a smile so bright, A school girl walks with all her might.
With dreams in her eyes and hope in her heart, She sets out to learn, a brand new start
ही त्याने शाळकरी मुलीवर केलेली कविता आहे तर
Buy or sell, hold or trade, The market's mood is never staid,
A gamble, a risk, a thrill, A dance with the market still.
ही शेअर मार्केटवरची. लवकरच हे सगळ्या भाषांमध्ये घडेल.
केशवसुत के किशोर कदम ... आपण सांगू त्या कवीच्या शैलीत दिलेल्या विषयावर बुंदीसारख्या पटापट कविता ’पाडून’ तो तुमच्या स्क्रीनवर आणून देईल. ’साडी के फॉल सा मॅच किया रे, छोड दिया दिल कभी कॅच किया रे’ असल्या धन्य गाण्यांपेक्षा कितीतरी बरी गाणी लिहून देऊ शकेल.
ट ला ट जोडून लाईक्स लुटणार्या कुडमुड्या कवींची आणि कॉपी पेस्ट लेखकांची आता खैर नाही. आज हा स्तंभ मी लिहिते आहे. येत्या काळात वर्तमानपत्राला माझ्यासारख्या स्तंभलेखकांची सुद्धा गरज राहणार नाही. बहुधा पत्रकार, वकील, ब्लॉगर, शिक्षक, सल्लागार, विश्लेषकांचीही. चॅट-जीपीटी करेल ना ही सगळी कामे.
मग आपले भविष्य काय ! चॅट-जीपीटी हा सर्जनशीलतेच्या प्रांतातला उद्याचा भस्मासूर तर ठरणार नाही ना !
नाही. या जिनला भाषेतले बारकावे आणि गर्भितार्थ समजत नाही. आपल्याला कॉमन सेन्स नाही असे तो मान्य करतो. या अनुषंगाने अमुक लेख माणसाने लिहिला आहे की चॅट-जीपीटीने, हे सांगू शकणारे GPTZero अॅप प्रिन्स्टन विद्यापीठातील एडवर्ड टिआन या २२ वर्षीय विद्यार्थ्याने नुकतेच विकसित केले आहे.
चॅट-जीपीटीला मन नाही त्यामुळे भावना नाहीत. अस्सल सर्जनशीलतेसाठी तल्लख मेंदूचे संवेदनशील मनाशी घट्ट नाते असणे आवश्यक असते हे समजून घेऊन त्या बळावर आपल्याला त्याच्या दोन पावले पुढे राहावे लागेल.
असे जिन किंवा साबू हाताळायचे तर आपल्याला सुद्धा चाचा चौधरी व्हावे लागेल, जिनका दिमाग कम्प्युटरसे या चॅट-जीपीटी से भी तेज चलता है ।

Published in पुण्यनगरी- माध्यमतंत्र सदर
http://epunyanagari.com/articlepage.php?articleid=PNAGARI_PU_20230120_04_3&width=371px&edition=Pune&curpage=4&fbclid=IwAR2NmrXX8hNk-g5cFHgVv7Fs246DCER75V3q0MJTwBchbrOHzHqcW0VrFrU