Monday, November 21, 2022

ज्यूस

 

’ज्यूस’ हा २०१७ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेला फिल्मफेअर विजेता लघुपट तुम्ही पाहिला आहे का! 

एका मध्यमवर्गीय स्त्रीची तेरा मिनीटात सांगितलेली ही अंतर्मुख करणारी कथा आहे. एका संध्याकाळी एका घरी मित्रपरिवार सहकुटुंब जमलेला आहे. सगळे पुरुष मित्र बाहेरच्या खोलीत कुलर लावून ड्रिंक्स घेत, स्टार्टर्स खात, गप्पा मारत ऐसपैस बसले आहेत. मुलं बेडरुममध्ये खेळत आहेत.आहेत. मित्रांच्या बायका मंजू (शेफाली छाया) म्हणजेच यजमानीण बाईला हातभार लावायला म्हणून तिच्या काहीशा कोंदट स्वयंपाकघरात जमल्या आहेत. कामाच्या धांदलीमुळे, गॅसवर सतत पदार्थ शिजत असल्यामुळे आणि ४,५ बायकांची गर्दी झाल्याने आत प्रचंड उकडते आहे.

काम सुसह्य व्हावे म्हणून मंजूने माळ्यावरून काढलेला टेबलफॅन जेमतेम सुरु होऊन बंद पडला आहे. बायका हवालदिल झाल्या आहेत. मंजू बाहेर येऊन "पंखा सुरू होत नाहीये, जरा बघता का" असं नवर्‍याला हलक्या आवाजात सांगते. तो ’हो’ म्हणून पुन्हा गप्पांमध्ये दंग होतो. यांच्या गप्पांचे विषय म्हणजे ऑफीसमधल्या सह्कारी महिलेबद्द्ल गॉसीप, पाचकळ विनोद, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आपल्याला खूप समज असल्याचे भासवणार्‍या चर्चा तर आत बायकांचे गप्पांचे विषय म्हणजे घर, स्वयंपाक, मूल झाल्यावर नोकरी सोडणे योग्य आहे की नाही वगैरे. विषयांमधला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

इकडे आतला उकाडा वाढत चालला आहे. स्वैपाक होत आल्यावर यातली एक बाई बेडरूममध्ये डोकावून आपल्या लहान मुलीला "आता खेळ पुरे, आधी तुझ्या भावांना वाढ" असं जरबेच्या आवाजात सांगते. हे ऐकून मंजूच्या डोक्यात तिडिक गेलेली आहे. बाहेरून नवर्‍याच्या "मंजू, आता जेवायचं बघ जरा" अशा हाका सुरु आहेत. आतल्या बायकांपैकी एक तरुण बाई गर्भवती आहे. तिने नोकरी सोडली नाही तर तिच्या बाळाकडे कोण बघणार हा विषय सुरु आहे. आपण नाही का मुलांसाठी नोकरी सोडली, असं एक बाई म्हणताच मंजू उद्वेगाने विचारते, "जे आपण केलं ते हिनेही केलंच पाहिजे का?" मंजू पुढे उपहासाने म्हणते " अर्थात डायपर तर आईनेच बदलला पाहिजे, वडील हातातला रिमोट सोडून ते काम कसे करतील!" 


हा तिचा तिसरा आणि शेवटचा संवाद आहे. बाकी सगळं तिची नजर बोलते. आधी थंड, मग असहाय्य, मग क्रुद्ध. आता तिला हे सगळं असह्य झालेलं आहे. ही एक घटना नव्हे, पुरुषसत्ताक पद्धतीत घुसमटलेलं अवघं जगणंच. मंजू खाटकन गॅस बंद करते. फ्रीजमधला ज्यूसचा जार घेऊन बाहेर येते. कुलरच्या झोतात एका खुर्चीवर पुरुषांमध्ये येऊन बसते. तिच्या अचानक येण्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नवरा आश्चर्याने व काहीशा रागाने तिच्याकडे बघतो आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतून भरल्या डोळ्यांनी एक तीव्र आणि अर्थपूर्ण कटाक्ष ती नवर्‍याकडे टाकते आणि डोळे मिटून जगाची पर्वा न करता शांतपणे थंडगार ज्यूसचा एक एक घोट घेऊ लागते. इथे लघुपट संपतो. मंजू भांडत नाही, ओरडत नाही, कुणाला काहीही ऐकवत नाही. तिला काय म्हणायचं आहे हे तिच्या नजरेवरुन नवर्‍याला कळतंच पण आपल्यालाही त्या मूक स्फोटामागची धग, तडफड आतपर्यंत जाणवते. 

हा लघुपट फक्त स्क्रीनवर नाही तर थोड्या फार फरकाने बहुसंख्य मध्यमवर्गीय घरात घडत असतो. आर्थिक स्थितीनुसार जागा, सोयी कमी जास्त असतात पण आत बायका राबतायत आणि पुरुष एकत्रीकरणाचा आनंद घेत आहेत हे चित्र सर्वत्र दिसते. अर्थात याला अपवाद असू शकतात आणि यावर आक्षेपही. 

शहरी सुशिक्षित घरातल्या  लहान कुटुंबात हल्ली पुरुष मदत करताना दिसतात, काही पुरुष भाजी, किराणा, खाद्यपदार्थ किंवा आवश्यक वस्तू आणून देणे किंवा ऑनलाईन मागवणे या स्वरुपाची मदत करताना दिसतात. क्वचित एखादा विशेष पदार्थ करतात. बायकोला यापेक्षा जास्त मदत केली तर लोक नावं ठेवतीला अशी भीती काही पुरुषांना वाटते. न पेक्षा या सकारात्मक बदलाचं निश्चितच स्वागत करायला हवं परंतु माझा नवरा, भाऊ किंवा वडील मदत करतात म्हणजे आता सगळंच बदललं आहे असा निष्कर्ष काढणं बालीशपणाचं ठरेल. 

मुळात ’मदत’ या शब्दातच गोम आहे. आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे ते काम ज्याचे आहे त्याचा भार हलका करतो. इथे आपली भूमिका संपते. परंतु त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते. जोवर जबाबदारीचा निम्मा वाटा उचलला जात नाही तोवर त्याला न्याय्य श्रमविभागणी म्हणता येणार नाही. 

मुख्य आक्षेप हा असतो की पुरुषांनाही बाहेर राबावंच लागतं न! त्यांना पण त्यांचं काम करताना कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून ’ज्यूस’ मध्ये दाखवलंय तसं स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. निम्न व मध्यमवर्गीय स्त्रियांना मात्र अव्याहत चालणार्‍या कामातून उसंत मिळत नाही. त्यांच्या कामाला सुट्टी अशी नाहीच. सगळी कामे इतरांवर ढकलून स्वत: काहीही न करणार्‍या आयतोबा स्त्रियाही असतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यमवर्गात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांना त्याचा उपयोग कमावण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावासा वाटतो. त्यासाठी सासरचे ’परवानगी’ तर देतात पण तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. या दडपणामुळे सवड काढून त्या कुठे गेल्याच तर राहिलेली कामं त्यांच्या डोळयासमोर नाचू लागतात. थोडक्यात हे तुझंच काम म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो, त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्‍या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड वैताग येऊ शकतो. 

याउलट घरकाम, स्वैपाक हे बाईचंच काम असल्याचं पुरुषांबरोबरच कित्येक बायकांच्याही मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की त्यांनी ’राबणं’ हे आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं असतं. खेड्यात नवर्‍याच्या बरोबरीने शेतात काम करून दमून आलेली स्त्री घरी परतल्यावर लगबगीने भाकरी थापायला घेते. ऑफीसमधून येताना भाजी ,वस्तू घेत थकून आलेली मध्यमवर्गीय स्त्री  कुकर लावायला घेते एवढाच काय तो फरक. तिच्या दिमतीला मिक्सर, मायक्रोवेव्ह सारख्या सुविधा आल्याने ’तिला असतंच काय काम! ’ असा अनेकांचा ग्रह असतो. गृहिणी असेल तर मग तिच्याकडे काय, वेळच वेळ असतो असा सार्वत्रिक समज असतो. प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने गृहित धरण्याचा तिला अधिक त्रास होतो. कधीतरी तिचा ’मंजू’चा झाला तसा उद्रेक होतो. त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर, घरावर, नातेसंबंधांवर आणि अखेर समाजावर होताना दिसू लागले आहेत. 

नुकतेच गौरी-गणपती पार पडले. एक मध्यमवयीन मैत्रिण म्हणाली ,"माझ्याच्याने आता ही दगदग सहन होत नाही पण घरी इतक्या वर्षांची प्रथा आहे ती मोडणं मनाला बरं वाटत नाही. इतर नातलग बायका ’मदत’  करतात, तरीही सगळी तयारी करणं, इतक्या जणांची सोय करणं, नैवेद्यासह सगळं यथासांग पार पांडणं याने मी इतकी थकून जाते की मला वैद्यकीय उपचार घ्यायची वेळ येते. त्यामुळे सणवार जवळ आले की माझ्या पोटात खड्डाच पडतो." काही सुपरवुमन व्हायच्या आकांक्षेने पछाडलेल्या स्त्रियांचा अपवाद वगळला तर हे प्रातिनिधीक चित्र म्हणता येईल. सुजाण स्त्रिया यावर जमतील तसे उपाय शोधतात. अनावश्यक कर्मकांडाला परिस्थितीनुसार फाटा देतात, काही गोष्टी विकत आणण्यात कमीपणा मानत नाहीत. एखादी गोष्ट राहिली, पर्फेक्ट झाली नाही तरी त्रास करून घेत नाहीत, आपल्यावाचून घराचं अडत नाही याची खंत न करता मुलांना स्वावलंबी बनवतात. पण अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अद्याप कमी आहे. शिवाय त्यांना बेजबाबदार, आळशी वगैरे विशेषणं स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. 

बहुतेक पुरुष मात्र यावर उपाय शोधण्याऐवजी ’तू दुर्गा तू अन्नपूर्णा, तू अमुक ..... तुला वंदन’ असे मढवलेले मेसेज सोशल मिडीयावर पाठवले की आपण स्त्रियांना आणि त्यांच्या कष्टांना पुरेसा आदर दर्शवला आहे असे मानून निश्चिंत होतात. (काही भाबड्या बायका पण खूष होतात आणि आणखी चार डबे घासायला काढतात.) 

हे कमी की काय म्हणून परवा एक मेसेजमध्ये वाचलं ’जाहिरातीत दागिने ल्यालेल्या, हसर्‍या, सुंदर स्त्रिया दाखवतात पण घरात दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी करताना घामेजलेली, केस विस्कटलेली स्त्री कुणीच दाखवत नाही’. इथपर्यंत तो मेसेज स्त्रियांच्या श्रमाकडे लक्ष वेधतोय असं वाटलं. पुढे लिहिलं होतं "नकोय त्यांना तुमची मदत, फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. एखादं ग्रिटींग, चॉकलेट त्यांच्यासाठी राखून ठेवा मग बघा दिवाळी कशी झक्कास जाते ते". 

धन्य आहे! तुम्ही कोण ठरवणारे की यांना मदत नकोय. नुसत्या शाब्दिक जाणीवेचं काय लोणचं घालणार! या ग्रिटींग, चॉकलेटच्या कौतुकाने बाईचा थकवा गायब होणार आहे का! आवडीनुसार काही वेगळं करायला तिला सवड मिळणार आहे का! निम्मी जबाबदारी घ्यायला हवी खरं तर तुम्ही. घरी केलेलेच लाडू आवडतात तर एकदा स्वत: अर्धा तास गॅसपाशी उभं राहून तूप सुटेस्तो पीठ भाजून पाहा. कामं ,फराळ करून दमलेल्या बायकांना त्या रात्रीचा स्वैपाक करून गरम, आयतं जेवायला वाढा. एका खोलीची पूर्ण सफाई करा. ती असेल खरी जाणीव. सुरुवात तर करा. (जे करतात त्या मूठभर मंडळींनी यातून स्वत:ला वगळावं) 

घरोघरच्या मंजूंना व्हॉट्सअ‍ॅपवरचे हारतुरे, कौतुकाचे भारे नको आहेत. प्रत्यक्ष साथ हवी आहे. कृतीतून सन्मान हवा आहे. घर सगळ्यांचं असेल तर कामंही सगळ्यांची असायला हवी इतका हा सोपा नियम आहे. आपली आवड, कौशल्य, वेळ, गरज याचा समन्वय साधून कामं वाटून घेतली तर घराघरातल्या मंजूलाही बाहेरच्या खोलीतल्या जगाकडे उघडणार्‍या खिडकीत बसून गप्पा मारता येतील. सर्वांबरोबर बसून 'ज्यूस' किंवा फराळाचा आस्वाद घेता येईल. अशी समाधानी मंजू जाहिरातीतल्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसेल. 

published in Madhurima Divya Marathi November 2022

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Saturday, October 29, 2022

भविष्यातला सोशल मिडिया कसा असेल ! - व्हाईट स्पेस दिवाळी अंक 2022

सोशल मिडियाचा प्राण म्हणजे लाईक, कॉमेंट, शेअर हे त्रिकूट. कोणी काही म्हणो, इथे लोक जे काय पोस्ट करतात ते स्वान्तसुखाय वगैरे नाही तर लाईक मिळवण्यासाठी, एखाद्या पोस्ट वर मत देतात ते व्यक्त होण्याच्या नैसर्गिक इच्छेतून आणि शेअर करतात ते ’शहाणे करून सोडावे सकळ जन’ या भावनेतून. सोशल मिडियाचा श्वास म्हणजे फोमो (फीअर ऑफ मिसिंग आऊट). पॅट्रीक मॅगगिनीसने हार्वर्ड बिझनेसच्या नियतकालिकात पहिल्यांदा वापरलेला हा शब्द.आपल्या आजूबाजूच्या रंगीबिरंगी अनुभवसृष्टीतून आपण वगळले तर जात नाही आहोत ना, इतरांना माहित आहे आणि आपल्याला नाही असे काही घडले तर नाहीये ना, या चिंतेत आपण इतके गुंतून जातो की सोशल मिडियात सतत डोकावत राहणे ही आपली भावनिक गरज होऊन बसते. भविष्यात तंत्रज्ञानात कितीही क्रांती झाली आणि सोशल मिडिया कितीही बदलला तरी या चौकडीला मरण नाही. मग बदलणार आहे ते नेमके काय हे समजून घेण्याआधी आजचा सोशल मिडिया कुठले तंत्र वापरतो ते जाणून घेऊया.

समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमधल्या मित्राशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत आहात. त्याने त्याच्या कंपनीतल्या एका माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगितले. या माणसाबद्द्ल तुम्ही आज प्रथमच ऐकले आहे. नंतर तुम्ही फेसबुक उघडता तेव्हा या माणसाचे नाव तुम्हाला अचानक ’पीपल यू मे नो’ मध्ये दिसू लागते.

किंवा समजा तुम्ही गोव्याला जाणार्‍या विमान किंवा रेल्वेबद्द्ल इंटरनेवर सर्च केले तर तुम्हाला प्रत्येक सोशल मिडियावर अचानक गोव्यातील हॉटेल्स, सेवा कंपन्या  किंवा गोव्यातील दुकानांच्या जाहिराती दिसू लागतात.

इतकेच काय एखादी गर्भार स्त्री डिपार्ट्मेंटल स्टोअरमध्ये लहान मुलांना लागणार्‍या वस्तूंपाशी जास्त रेंगाळली तर तिच्या सोशल मिडियावर या वस्तूंच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. तिचे हे गुपित तिच्या जवळच्यांना माहित असेल, नसेल पण सोशल मिडियाला कळलेले असते. 

या अद्भुत तंत्रज्ञानाला आर्टीफिशल इंटेलिजन्स असे म्हणतात. 

समजा तुम्ही ट्वीटरवर एखादी कॉमेंट रागीट शब्दात केली तर तुम्हाला तुमच्या फीडमध्ये त्या विषयाच्याच जास्त पोस्ट दिसू लागतात. 

तुम्ही एखाद्याच्या पब्लिक पोस्टवर जाऊन काही मत व्यक्त केले तर त्या व्यक्तीच्या पोस्ट तुम्हाला वरचेवर दिसू लागतात.

दुसर्‍या बाजूला सतत पोस्ट करणार्‍या मित्रांच्या नव्या पोस्ट्स येऊन गेल्याचे तुम्हाला कळतही नाही. मित्र सारखे असले तरी प्रत्येकाला वेगळा कंटेंट पाहावयास मिळतो, तुमचा स्वभाव आणि आवड लक्षात घेऊन तो डिझाइन केलेला असतो.  हे सगळे ज्या तंत्ररचनेमुळे घडते त्याला अल्गोरिदम म्हणतात.  

दोन वर्षांपूर्वी ‘द सोशल डिलेमा’ हा जेफ ओर्लोवस्की दिग्दर्शित केलेला माहितीपटवजा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. कथानकाशिवाय ‘फेसबुक’वरच्या लाईक बटनचे जनक जस्टीन रोसिस्टीन, सेंटर फॉर ह्युमन टेक्नोलॉजी’चे संस्थापक ट्रिस्टन हॅरीस, ‘पिंटरेस्ट’चे माजी अध्यक्ष टीम केंडल वगैरेंच्या मुलाखती त्यात आहेत. आपल्यावर म्हणजेच सोशल मिडीया वापरणार्‍या प्रत्येकावर, वर स्पष्ट केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदम या दोन गोष्टींचा इतका प्रभाव पडतो की त्यामुळे आपले सोशल मिडियावरचे वागणे, व्यक्त होणे अगदी विचार सुद्धा बदलू शकतात.  ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’ने जगातल्या अनेक राजकीय पक्षांप्रमाणेच भारतात फेसबुकचा वापर सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याकडे लक्ष वेधणार्‍या विरोधकांनी स्वत:चेही आयटीसेल तयार केले आहेत आणि ते सक्रीय असतात. आपल्या लाईक्स, कॉमेंट्सवरून  आपला राजकीय कल ओळखून त्यानुसार आपले मन वळवणार्‍या किंवा मनावर पूर्वीचे मत बिंबवणार्‍या  जाहिराती आणि पोस्ट दिसू लागतात. याचा परिणाम थेट निवडणूक निकालावर होताना दिसून येतो इतकी ही प्रणाली प्रभावी आणि तितकीच भीतीदायक आहे. 

सोप्या भाषेत सांगायचे तर आपण सोशल मिडियाच्या हातातले प्यादे आहोत. हे व्हायला नको असेल तर ! तर आपल्याला सोशल मिडिया वापरणे बंद करावे लागेल. ते आता शक्य आहे का ! अर्थातच नाही कारण आपली मनोरंजनाची गरज, नेटवर्किंगची गरज, माहिती मिळवण्याची गरज, आपल्या विचारांना, सेवा व्यवसायाला, उत्पादनाला प्लॅटफॉर्म मिळवण्याची गरज इतकेच काय स्वत:ची प्रतिमानिर्मितीची गरज भागवायची असेल तर सोशल मिडीयाला पर्याय नाही. गंमत म्हणजे आपण इथे वापरले जात आहोत पण आपल्याला यूजर म्हटले जाते. अर्थात द सोशल डिलेमा’ मध्ये म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला ‘यूजर’ म्हणणारे केवळ दोनच व्यवसाय या जगात आहेत आणि ते म्हणजे ‘ड्रग्स व्यवसाय’ आणि ‘सॉफ्टवेअर’. 

---------------- 

या पार्श्वभूमीवर आपले म्हणजे यूजरचे सोशल मिडियाशी नाते ’तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना’ असे आहे. 

हे नाते भविष्यात आपले अधिक शोषण करेल की आपल्या खासगी स्पेसचा मान ठेवेल! सोशल मिडीयाचे स्वरुप आगामी काळात नेमके कसे असेल. कोणे एके काळी प्रचलित असलेले ऑर्कुट आज गायब झाले आहे. यूजर साठी ’फेसबुक आजीवन मोफत असेल’ असा दावा करणार्‍या फेसबुकच्या स्वत:च्या जीवनाचे काय? ते दीर्घकाळ टिकून राहील का ! मोबाईलचा सर्वाधिक वापर लोक सोशल मिडीयाशी जोडलेले राहण्यासाठी करतात मग येत्या काळात यासाठी मोबाईल वापरणे आवश्यक राहील की तंत्रज्ञानात मोठे बदल होतील , वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक कंटेंटकडे सोशल मिडिया कसा बघेल, सोशल मीडियाचे भविष्य कसे असेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून शोधणार आहोत. 

तंत्रज्ञ आणि माध्यमतज्ज्ञांच्या मते आगामी काळात घडणारे मह्त्वाचे बदल कोणते ते पाहूया.

 १.. AR मोठ्या प्रमाणात वापरले जाईल. मुख्य प्रवाहात येईल - 

“एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. ए-आर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. याउलट व्हि-आर मध्ये एक पूर्णपणे नवे आभासी जग तयार केले जाते, हेडसेटच्या मदतीने दृश्यानुसार विशिष्ट आवाजाचा वापर करून ते खरे असल्याचा भास निर्माण केला  जातो.  उदा: हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  

गुगल लेन्ससारख्या माध्यमातून आपण एआर आताही अगदी दररोज वापरतो आहोत पण ह्याला ए-आर म्हणतात हे माहित नसते. समजा तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर मूळ फोटो किंवा व्हिडिओ रंजक व्हावा म्हणून  काही कृत्रिम गोष्टी किंवा फिल्टर्स त्यात मिसळता म्हणजेच तुम्ही AR वापरता. परंतु सोशल मीडियावरील AR चे ऍप्लिकेशन्स फक्त यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत. समजा तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या खोलीसाठी फर्निचर घ्यायचे आहे तर प्रत्यक्ष खोली कॅमेर्‍यात क्लिक करुन त्यात फर्निचरची वेगवेगळी रचना तुम्हाला दाखवली जाईल. त्यामुळे निवड करणे सोपे होईल आणि तुम्ही ही सोय असलेल्या पोर्ट्लवरून खरेदी कराल. काही अ‍ॅप्स ही सुविधा आताच देऊ लागले आहेत जी येत्या काळात सार्वत्रिक होईल. ए-आर हा आपल्या सोशल मिडियाचा अविभाज्य भाग होईल.

२. वैयक्तिक माहिती जतन करण्याला आणि खासगी निवडीला प्राधान्य मिळेल. सोशल मीडिया आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला वेढून घेईल. 

आपण सध्या थर्मोस्टॅट्स वापरतो. उदा: फिटबिट सारखी फिटनेस टूल्स आपण घड्याळासारखी वापरतो. अशी गॅजेट आपली नाडी बघतात , हृदयाचे ठोके तपासतात, आपण किती वेळ झोपलो ते सांगतात. आपण किती वेळा आणि किती वेगाने धावतो हे Nike च्या बुटांना माहीत असते. ही फक्त सुरुवात आहे. थोड्या डेटाच्या बदल्यात वैयक्तिक माहिती पुढे आपल्याला याहून सहज उपलब्ध असेल. ती ही हव्या त्या वेळी हवी तिथून म्हणजेच हव्या त्या ब्रँडकडून, घड्याळाद्वारे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सवर देखील मिळू शकेल. त्यासाठी मोबाईलच जवळ हवा अशी गरज राहणार नाही. सोशल मिडीयाचे मास मिडियात रुपांतर होईल. दुसरीकडे आपण जसे एका जीमेल आयडीवरून गुगलच्या अनेक सेवा वापरु शकतो तसे आपल्या एका जागी ठेवलेल्या डाटाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचे अधिकार भावी सोशल मिडियावर आपल्याला अधिक मिळतील. 

३. यूजरचे मॅपिंग मोठ्या प्रमाणात होईल. 

आपण विविध वेबसाइटवर सर्फिंग करताना ते किती वेळ केले, त्यावर काय पाहिले , किती वेळा पाहिले याची आजही नोंद होते. ब्लॉग किंवा ई-मेल यूजरचे लिंग, वय हे देखील विचारात घेतले जाते. मोठे ऑनलाइन जाहिरातदार यूजरने पाठविलेले मेल स्कॅन करून त्यातील मजकुराच्या अनुषंगाने जाहिराती पाठवतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा गोड शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये व्हॅकेशन किंवा सुट्टी असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल, प्रत्येक क्षण सतत ट्रॅक केला जाईल व आपल्याच डाटाचा स्रोत म्हणून अधिकाधिक वापर होत राहील म्हणजेच तो डाटा मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. 

सोशल मिडीया मोफत नाही, त्याचे बिल आपण आपल्याच डाटाच्या रुपात पुढेही भरत राहणार आहोत.  विविध उद्योगात मॅपिंगचा बराच वापर होण्याची शक्यता आहे. उदा: विक्री न झालेला स्टॉक सोशल मीडिया आणि मॅपिंगच्या माध्यमातून  खुला करणे, टेस्ट ड्राइव्हसाठी निमंत्रित करणे असे प्रकार करून वाहन उद्योग स्वतःची भरभराट करून घेऊ शकतात.

४. ’थांबला तो संपला’ त्यामुळे लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील-

आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे १.७ अब्ज वापरकर्ते आहेत. ७२% इंटरनेट वापरकर्त्यांकडे फेसबुक खाते आहे. लवचिक धोरण ठेवलेले असल्याने फेसबुक आगामी काळात टिकून राहील मात्र त्याचे रुपडे अगदी वेगळे असेल. Twitter, Instagram आणि Snapchat चे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित आजपासून दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ काय ते शोधतील. फेसबुक काळानुसार आणि गरजेनुसार बदलत राहील. त्यात सतत नवनवीन वैशिष्ट्ये दिसत राहतील. काही नवे प्लॅटफॉर्म येऊ शकतील. ते कसे असतील हे  आताच सांगता येणे अवघड असले तरी ते होलोग्राम, वेअरेबल तंत्रज्ञान किंवा व्ही आर चष्म्यांच्या माध्यमातून वापरले जातील. होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा, वेअरेबल म्हणजे परिधान करता येणारे तंत्रज्ञान. आपला कुर्ता किंवा त्यावरील एखादे बटन, शरीरावर बसवलेली इलेक्ट्रॉनिक चिप असे त्याचे स्वरूप असेल. विचित्र वाटते आहे ना! काही वर्षांपूर्वी आपण रस्त्याने फोनवर बोलत हवे तिथे जातो आहोत हे देखील विचित्र आणि अकल्पनीय वाटत होते. 

५. जगाचे राजकारण आणि राजकीय जग यात सोशल मिडियाच्या साहाय्याने प्रचंड उलथापालथ होत राहील. 

डिसेंबर 2010 मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. त्याने मध्य पूर्वेत कितीतरी घडामोडी झाल्या. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने लोक दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात क्रांती करु शकले. ब्लॅक लाईव्हज मॅटर किंवा मीटू सारख्या विविध हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. यूजरच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात असे ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.

दुसर्‍या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच तो ग्रुप डिलिट केला जातो. 

आगामी काळात नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. फेक आयडीवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.  आज तब्बल १.७ अब्ज सक्रिय फेसबुक वापरकर्ते आहेत, त्यापैकी 82 टक्के यूएस आणि कॅनडाबाहेरील आहेत. ट्विटरवर 270 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत, दररोज, 4 अब्ज व्हिडिओ YouTube वर पाहिले जातात आणि 6 कोटी फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले जातात. सातत्याने वाढत चाललेली ही अवाढव्य आकडेवारी पाहिली तर सोशल मिडियाची ताकद लक्षात येईल. 

येत्या ४ ते ५ वर्षात जगातील २.४४ अब्ज लोकसंख्या सोशल मिडियावर असेल. राजकीय क्षेत्रात सोशल मिडीया विश्लेषकांच्या मदतीने त्यावर आलेल्या नवनव्या टूल्सचा वारेमाप वापर केला जाईल. दहा वर्षांनी सोशल मीडियाचा वापर सर्वव्यापी होईल. 

६. सोशल मिडियामुळे अर्थजगत, व्यवसायाचे जग आमूलाग्र बदलेल -

सध्या सोशल मिडिया कंपन्या जाहिरातबाजीसाठी इन्फ्ल्युअर्सना भरपूर पैसा देतात. इन्फ्ल्युअर्स म्हणजे ग्राहकावर प्रभाव टाकू शकणार्‍या व सोशल मिडीयावर प्रचंड चाहते असणार्‍या वलयांकित व्यक्ती. कलाकार, खेळाडूंचे प्रमाण यात जास्त असते. उदा: विराट कोहलीने घातलेल्या ब्रँडचा टीशर्ट आपल्याकडे असावा किंवा प्रियांका चोप्राच्या हातात दिसली तशी पर्स आपल्याकडे असावी असे त्यांच्या चाहत्यांना वाटते. येत्या काळात मायक्रो व नॅनो इन्फ्ल्युअर्सना महत्व मिळू लागेल. यांचे फॉलोअर्स कमी असले तरी ते अधिक खोलवर विचार करणारे व त्या व्यक्तीचे निकटवर्तीय समजले जातात. मोठे इन्फ्ल्युअर्स लाखो लोकांवर प्रभाव पाडत असले तरी प्रत्यक्षात त्यातले काही शे लोक खरेदी करतात. मायक्रो इन्फ्ल्युअर्स काही हजारांवरच प्रभाव पाडत असले तरी अंतिम खरेदी करणार्‍यांची संख्या साधारण सारखीच असते. मायक्रो इन्फ्ल्युअर्सना तुलनेने कमी व नॅनो इन्फ्ल्युअर्सना त्याहून कमी पैसे द्यावे लागतात असे हे गणित असणार आहे. सोशल मिडीयावर विशिष्ट जाहिरातींवर घुटमळणार्‍या ग्राहकांना हेरून चॅटबॉटच्या मदतीने ’मदत हवी का’विचारले जाते आणि या संवादातून संभाव्य ग्राहक तयार होतात.  असे चॅटबॉटचे अजून आधुनिक आणि वेगवान पद्धतीने काम करतील. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल व त्यासाठी अनेक सुविधा देऊन त्याचे आकर्षण वाढते ठेवले जाईल. लाईव्ह व्हिडिओचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. प्रत्यक्ष संवाद साधता येत असल्याने त्यात असलेला जिवंतपणा ग्राहकाला अधिक भावतो त्यामुळे हे तंत्रज्ञान अत्याधुनिक होईल. 


७. ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल -कंटेंट (माहिती) अगदी थोडक्यात आणि वेगात पोचवली जाईल.

कोरी बर्गमन,  या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शेकडो व्हिडिओ अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या वेळी घटनास्थळी उपस्थित राहून सगळे काही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर तो कसा घडला असेल याचे सध्या ग्राफीक्स दाखवले जातात. त्याचे अनेक व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्यातून असा काही परिणाम साध्य होईल की बघणार्‍याला आपण तो अपघात होताना पाहत आहोत असा अनुभव येईल,. एकूणच प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिकाधिक थेटपणे घेता यावा यावर भर दिला जाईल. 

टीव्ही वाहिन्यांवर ५ मिनीटात १०० बातम्यांचा पाऊस यासारखे प्रकार आधीच सुरु आहेत. येत्या काळात जेन-झी म्हणजेच टीनएज ते पंचविशी या वयोगटातली जनरेशन झेड शॉर्ट्स (कमी वेळेतले छोटे व्हिडिओ) ला प्राधान्य देईल. नामवंत ब्रँड्स ग्राहकांची काळजी थेट सोशल मिडीयावरून घेतील. जाहिरातविश्व त्यावर विसंबून राहील. तातडीची मदत हवी असल्यास ती येथेच उपलब्ध असेल. ऑडिओ तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येईल. 

८. सोशल मिडिया वापरण्याची आयुधे  वेगळी असतील कारण तंत्रज्ञानात अफाट बदल होतील

जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, दूरसंवाद आणि अनेक कामे प्रामुख्याने आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण अ‍ॅलेक्सासारख्या सुविधा पाहतोय त्या बाळबोध वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल आणि कीबोर्ड, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन हळूहळू कालबाह्य होऊ लागतील. नोकियाचे सीईओ पेक्का लुन्डमार्क यांच्या मते ए-आर आणि व्हि-आर (ऑगमेंटेन्ड रिऍलिटी आणि व्हर्चुअल रिऍलिटी) यावर  आधारित प्रणाली स्मार्टफोनची जागा घेईल. माणसाच्या शरीरातच एखादी इलेक्ट्रॉनिक चिप इन्स्टॉल केली जाईल. त्यांचा हातच विशीष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल. इलेक्ट्रॉनिक टॅटू जैवतंत्रज्ञानावर संशोधन सुरु झाले आहे. ओटिस किमझे हे सिंपली मेजर्डचे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याच्या फॅब्रिकचा भाग असेल किंवा आपण घालतो त्या चष्म्याचा किंवा आपण घातलेल्या बुटाचा सुद्धा. गॅझेट्स हे यापुढे आपल्या हातात धरण्यासाठी उपलब्ध नसतील तर आपल्या स्वतःचा भाग असतील." 

VR म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर प्रचंड वाढेल. उदा: एखादे चित्र-प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा इव्हेंट, शिक्षण, पर्यटन, प्रवास, व्यावसायिक मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी आणि बरेच काही व्ही आर द्वारे नियंत्रित केले जाईल. 

या दशकाच्या अखेरीस ६जी येईल. दुसर्‍या बाजूला बायोमेट्रीक तंत्रज्ञान विकसित होते आहे त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचे होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा संवादात भाग घेऊ शकतील. एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन या तंत्रज्ञानावर काम करते आहे. या न्यूरो तंत्रज्ञानात काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने मानवी शरीरात इम्प्लांट होऊ शकतील असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) विकसित केले जात आहेत. 

९. मानवी वर्तनात बदल होतील. तंत्रज्ञानातील प्रगती धोकादायक ठरू शकेल.

जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक प्रमुख घटक आहे. सोशल मीडिया सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अक्षरश: घुसला आहे. त्यामुळे त्याच्या वर्तनात असंख्य बदल झाले आहेत. लाईक्सचा आकडाखाली गेला तर निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, कटू प्रतिक्रियेने अस्वस्थ होऊन आक्रमक उत्तर देणे, सहज उपलब्ध झालेला पॉर्न आशय स्क्रोल् करताना वारंवार दिसत राहिल्याने  त्याची चटक लागणे, स्वत:ची माध्यमातील आकर्षक प्रोफाईल आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यातील फरकामुळे नकारात्मक वृत्ती वाढीस लागणे वगैरे दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. येत्या काळात आपली कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता अधिक कमी होत जाईल. ए-आर , व्हि-आर मुळे सगळे काही हातात येऊन आपल्यातल्या सर्जनशीलतेला फारसा वाव मिळणार नाही. 

आपल्या राज्यघटनेने १९ (१) (अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्याबरोबरच मर्यादाही राज्यघटनेत नमूद केल्या आहेत. पण, त्याची नेमकी अंमलबजावणी सोशल मिडीयावर होताना दिसत नाही. मुळात त्यावरील माहितीचाअ विचार करता सत्यता आणि अचूकपणा यासारख्या तत्त्वांचा तिथे अनेकदा अभाव असल्याचे दिसते. माहिती हे आता नवे चलन म्हणून वापरले जात असल्याने व्ह्यूज वाढण्यासाठी एकांगी, सनसनाटी निर्माण करणारा बटबटीत आशय वाढत जाणार आहे.  अशा माहितीचा इतका भडीमार अपल्यावर होतो आहे की माहिती साठवणे  हे आजच मेंदू समोरील एक आव्हान आहे. तिचे आकलन आणि विश्लेषण करणे यातच मेंदूचा बराच वेळ आणि उर्जा खर्च  होत असल्याने मेंदू शिणून पुढील प्रक्रिया थांबवतो. थोडक्यात आपण डोके वापरणे कमी करतो आणि जे दिसेल, पोस्ट होईल ते तसेच्या तसे स्वीकारू लागतो. येत्या काळात मानवाच्या  आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडिया चे  दूरगामी परिणाम होणार आहेत. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाणार आहे. 

सोशल मिडियाचे अर्थकारण मानवी भावनांवर चालते त्यामुळे या परिणामांशी सोशल मिडीयाला आजही देणेघेणे नाही व पुढेही नसेल, उलट भावना जितक्या तीव्र तितके सोशल मिडीयाचे अल्गोरिदम अचूक काम करतात आणि त्यावर आपली पोळी भाजून घेतात. त्या भावनांना अनुकूल अशा पोस्ट्स यूजरला दिसू लागल्या की तशी सांख्यिकीमध्ये नोंद होऊन जाहिरातदाराला पोच मिळाल्याचे समाधान सोशल मिडीया देतो. भावनिक गुंत्यात जास्त यूजर जास्त काळ सोशल मिडिया वापरत राहतात आणि सोशल मिडियाला तेच हवे आहे. 

या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने  मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे त्या व्यक्तीच्या स्मृतींमध्ये उलथापालथ होईल. कदाचित स्मृती हॅक होऊ शकतील. नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. रील आणि रिअल मधली रेष अदृश्य होऊ लागेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही. 

फोटोशॉप वापरून खोट्या पोस्ट, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळावर ते अधिक क्रूर होत जातील. डीप फेकचा वापर वाढेल. डीप फेक म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज व दृश्य स्वरुपाचे अनेक सॅंपल वापरून त्याची अगदी खरीखुरी वाटेल अशी डिजिटल प्रतिमा तयार करणे. यामुळे खर्‍या खोट्यातील सीमारेषा धूसर होईल. उदा:  एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या भाषणाचा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. तो संदेश खरा मानून स्वीकारत आहोत पण तो माणूसच कृत्रिम /खोटा असेल तर! डिप फेक वापरले असल्यास व्हिडीओमधली व्यक्ती अगदी खरी वाटते. त्याचाआवाजही अस्सल वाटतो. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. हे भयावह तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक असेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थाना याबाबत या दशकाच्या उत्तरार्धात कठोर पावले उचलावी लागतील. 


-----

माणसा सारखाच सोशल मीडिया उत्क्रांत होत चालला आहे. त्याने अगोदरच आपल्याभोवती विळखा घालायला सुरुवात केली आहे. भविष्यात आपण त्याच्या कह्यात गेलेलो असू.  दीर्घकालीन मानवी विकासासाठी सोशल मिडीया फारसा उपयोगी ठरणार नाही असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. नवनवीन आशय आणि माहिती ऐकण्यात , पाहण्यात आणि वाचण्यात आपला बहुमोल वेळ जात राहिला तर नवे काही निर्माणाधीन होणे अवघड होईल.  कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. सोशल मिडिया यासाठी एका मर्यादेपर्यंत मदत करेल , पण बरेचसे अंतर आपल्याला त्याचे बोट सोडून चालावे लागणार आहे. तो आपले दैनंदिन जीवन अधिक  सोपे , सुटसुटीत करेल यात शंका नाही पण ते साधे आणि  सुखकर करणे मात्र आपल्या हातात आहे. आपण काय निवडतो, कुठे क्लिक करतो यावर ते अवलंबून असणार आहे. यासाठी आतापासूनच आपला समाज माध्यमशिक्षित होणे अतिशय गरजेचे आहे. 

एक सूत्र आपण भविष्यातील सोशल मिडीयाला सामोरे जाताना कायम लक्षात ठेवायला हवे.  सोशल मिडीयाचा वापर आनंद वाटण्यासाठी आणि विकासप्रक्रियेला हातभार लावण्यासाठी व्हायला हवा आहे. ते शक्य नसेल तर निदान आपण  त्यात नकारात्मकता पेरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सोशल मिडीया हे एक सामूहिक विश्व आहे. इथली प्रत्येक व्यक्ती आपल्याइतकीच मूल्यवान आहे त्यामुळे वैयक्तिक आकांक्षेच्या पलिकडे जाऊन येथील समूहाच्या भल्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. शेवटी सोशल मिडीयावर कुणीही असलो तरी आपण सगळेच प्रत्यक्ष जगाचे यूजर आहोत... नाही का!   

Published in White Space Diwali Issue 2022