Saturday, May 15, 2021

पुस्तक ते पडदा - प्रवास ’परिणीता’चा


लाईट- साउंड -कॅमेरा- अ‍ॅक्शन... आणि आपण एका दुसर्‍याच जगात प्रवेश केलेला असतो. अर्थात सिनेमा या कलाप्रकाराचे दर्शनी रुप ही चतु:सूत्री ठरवत असली तरी सिनेमाचा आत्मा असतो त्याचा आशय, त्याची पटकथा. ती जर सशक्त असेल तर त्यावर उभा राहणारा सिनेमा एखाद्या मनोर्‍यासारखा लक्षवेधी असतो, पिढ्यानपिढ्या चर्चेत राहतो नाहीतर भुईसपाट होतो. साहित्य शब्दांच्या माध्यमातून अविष्कृत होते तर सिनेमा बोलतो ते कॅमेर्‍याच्या माध्यमातून. गाजलेल्या साहित्यावर आधारित सिनेमे म्हणजे दोन लोकप्रिय कलाप्रकारांचे मीलन. यामुळे अभिजन वर्गापर्यंत मर्यादित राहिलेले साहित्य  जनसामान्यांपर्यंत पोचणे सोपे होते. वाचक आणि प्रेक्षक या दोघांचे रुपांतर ’रसिका’मध्ये होते. सिनेमा हा जणू धर्म असलेल्या आपल्या भारतीयांसाठी साहित्य आणि सिनेमा यांचे दृढ नाते परिचयाचे आहे ते अगदी 
दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र’ या पहिल्या भारतीय सिनेमापासून. 

भारतीय कलाविश्वात दोन वैचारिक परंपरा मानल्या जातात. रामायण परंपरेत मांगल्य, सौंदर्य, आदर्शवादाचे चित्रण केले जाते तर महाभारत परंपरेत मानवी विकार, लालसा, क्रौर्य, हिंसा, विकृती, विखार यांचे चित्रण परखडपणे केले जाते. ओटीटी वाहिन्यांचे प्राबल्य असलेल्या आजच्या काळात प्रेक्षकांचा कल पाहून बहुसंख्य नव्या सिनेमांनी किंवा वेबमालिकांनी आपला मोहरा महाभारत परंपरेकडे वळवल्याचे दिसून येते. याउलट रामायण परंपरेचे पाईक म्हणता येतील असे सिद्धहस्त लेखक शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ’परिणीता’ या साहित्यकृतीवर आधारित याच नावाचा हिंदी सिनेमा ओटीटी वाहिन्यांच्या प्रेक्षकांसाठीही आकर्षणाचा विषय ठरतो आहे हे विशेष. प्रदीप सरकार दिग्दर्शित हा ’परिणीता’ सिनेमा २००५ सालचा. त्या आधी १९५३ मध्ये याच कादंबरीवर आधारित बिमल रॉय दिग्दर्शित हिंदी आणि १९६९ मध्ये अजॉय कर दिग्दर्शित बंगाली ’परिणीता’ येऊन गेला असला तरी कथेच्या आशयघनतेमुळे ही कलाकृती कालातीत ठरते. मूळ कादंबरी १९१४ मध्ये म्हणजे अगदी पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी लिहिली गेली असली तरी त्यातली प्रेमाची अभिव्यक्ती आधुनिकच नव्हे तर काळाच्या कितीतरी पुढची आहे. कदाचित त्यामुळेच आज शतक उलटले तरी ’परिणीता’ची जादू कायम आहे. 


'परिणीता' ही एक प्रेमकथा आहे त्याचबरोबर सामाजिक चालीरिती आणि त्यांचे उतरंडीच्या रचनेनुसार होणारे परिणाम यात भरडलेल्या जीवांची ही कहाणी आहे. नायक, नायिका आणि प्रेमाचा त्रिकोण देखील यात आहे परंतु या कादंबरीतले प्रेम पठडीतले नाही. ते अपारंपारिक आहे, तो भावनांचा अनेकपदरी गोफ आहे. ललिता ही 13 वर्षाची सालस आणि गुणी मुलगी. आपल्या मात्यापित्यांना गमावल्यामुळे ती आपल्या मामाकडे राहत असते. तिचे मामा गुरुचरण हे बँकेत लिपीक असतात. त्यांना पाचवी मुलगी झाल्याची वार्ता कळते तेव्हा ते खचून जातात. मोठ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी अगोदरच वडिलोपार्जित घर गहाण ठेवलेले असते. परिस्थितीची जाणीव असलेली ललिता मूकपणे मामा मामीला हातभार लावत असते. मामाच्या शेजारी राहणार्‍या धनाढ्य नवीनचंद्र राय यांचा मुलगा शेखर म्हणजे ललिताचा बालमित्र. ती आठ वर्षांची असल्यापासून या शेखरभैय्याकडे येत असते. तो तिला लिहावाचायला शिकवे, ललिताही त्याची लहानमोठी कामे आपुलकीने करी. शेखरला विचारल्याशिवाय ललिता काहीही करत नसे. अधूनमधून हातखर्चासाठी थेट त्याच्या कपाटातून पैसे घेण्याचीही तिला मुभा असे.  


जाणत्या वयात या लोभस मैत्रीचे रुपांतर नकळत अव्यक्त प्रीतीमध्ये होऊ लागते. वडील आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत याची शेखरला खात्री असते. यामुळे तिचे इतरत्र लग्न होईल याची त्याला भीती वाटू लागते. एके दिवशी ललिता सहज गमतीने अभावितपणे त्याच्या गळ्यात माळ घालते. शेखर मात्र तिच्यावरील गाढ प्रेम उमजून तीच माळ तिच्या गळ्यात घालतो. अचानक घडलेल्या या परिणय सोहळ्याला साक्षी असते ते फक्त त्या दोघांमधले मुग्ध प्रेम आणि योगायोगाने याचवेळी शेजारच्या घरी सुरु असलेल्या लग्नसोहळ्यातले मंत्रोच्चार. दरम्यान पाहुणे म्हणून आलेले शेजारच्या चारुबालाचे मामा गिरिंद्र ललिताकडे आकर्षित होऊ लागतात. तिच्या कुटुंबियांना मदत म्हणून ते गुरुचरण यांना कर्जमुक्त करतात इतकेच नव्हे तर ते आजारी पडल्यावर हवापालटासाठी त्यांना स्वत:च्या घरी घेऊन जातात. दुर्दैवाने गुरुचरण तिथेच शेवटचा श्वास घेतात. शेखर-ललिताच्या नात्याबद्दल अनभिज्ञ असलेले गुरुचरण ललिताची जबाबदारी आणि हात गिरींद्रच्या हाती सोपवून इहलोकाचा निरोप घेतात. शेखरला पती म्हणून मनानेच नव्हे तर कृतीनेही वरणारी आणि त्यामुळे स्वत:ला परिणीता मानणारी ललिता स्वत:ऐवजी आपल्या धाकट्या मामेबहिणीशी गिरींद्रचा विवाह घडवून आणते. गिरिंद्रचे देखणे रुप, श्रीमंती आणि एक सुरक्षित भविष्य यातले काहीही ललिताच्या पतीनिष्ठेच्या आड येत नाही. तिच्या अंतर्मनातील या उत्कट भावनेचे कादंबरीतले स्थान कृष्णासाठी मोरपिसाचे असावे तसे अलौकिक आहे. ललिताच्या दृष्टीने आपल्या दोघातील बंधन अतूट आहे, जणू विवाह-संस्काराच्या दर्जाचे आहे हे शेखरला अंत:करणातून जाणवते. ललिता आणि गिरींद्रबाबत झालेला त्याचा गैरसमज दूर होतो आणि दुसर्‍याच मुलीशी होऊ घातलेल्या लग्नाची तयारी शेखर थांबवतो. ललितावर नेहमीच माया करणारी शेखरची आई भुवनेश्वरी ललिताचा सून म्हणून अत्यानंदाने स्वीकार करते. अनुरक्तीच्या पल्याड जाऊन सर्वस्व झोकून देणार्‍या प्रेमाची ही हृद्य कहाणी, ती ही शरदबाबूंच्या प्रतिभ लेखणीतून उतरलेली.

एखाद्या प्रसिद्ध साहित्यकृतीवर सिनेमा बेतला असेल तर तो यशस्वी होण्याची शक्यता वाढते. त्यातून प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यासाठी कथेत जे जे हवे ते सारे या कथानकात आहे त्यामुळे ’परिणीता’ची निवड या सिनेमांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांनी केली असावी. शरच्चंद्रांच्या १५-२० साहित्यकृतींवर हिंदी चित्रपट निघाले आहेत. ‘अपने-पराए’, ‘छोटी बहू’, ‘खुशबू’,‘स्वामी’ हे त्यातील काही मह्त्वाचे. त्यांच्या ‘देवदास’ची मोहिनी तर अजूनही उतरलेली नाही. सैगल, दिलीप कुमार, शाहरुख खानच्या कादंबरीशी बर्‍यापैकी प्रामाणिक असणार्‍या ’देवदास’पासून अभय देओलच्या देव-डी मधल्या आधुनिक देवदासपर्यंत याची अनेक रुपे सिनेसृष्टीत गाजली. शब्दातून निर्मिलेली कथा पडद्यावर यावी आणि प्रत्येक पिढीतील रसिक त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेत राहावे हे भाग्य अशा काही मोजक्याच साहित्यिकांना लाभते. विश्वस्तरावर प्रख्यात असलेल्या बंगाली साहित्यिकांचे उदाहरण द्यायचे झाले तर रवींद्रनाथ टागोर (‘चोखेर बाली’, ‘काबुलीवाला’, ‘तीन कन्या’, ‘उपहार’,’चारुलता’ इ.), विभूतिभूषण बंदोपाध्याय, सत्यजित रे ही नावे अग्रक्रमाने घ्यायला हवी. सत्यजित रे हे स्वत: जागतिक कीर्तिचे दिग्दर्शक असल्याने आपल्या किंवा इतरांच्या साहित्याला पडद्यावर अचूक साकारत. त्यांचे प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित ’शतरंज के खिलाडी’चे व्यावहारिक गणित मात्र जमून आले नाही. कथेचा किंवा कवितेचा जीव लहान असल्याने ती फुलवणे कठीण होत असावे. मराठीतल्या महानोरांच्या ’अजिंठा’लाही ते आव्हान पेलले नाही. एकंदर सिनेमा निर्मितीसाठी कादंबरीला प्राधान्य मिळण्यामागे हेच कारण असावे.  

निर्माते - दिग्दर्शकांसाठी दर्जाशी तडजोड न करता साहित्यावर आधारित सिनेमा तयार करणे हे कायम एक आव्हान राहिले आहे. माध्यमांतर करताना बदल करणे अपरिहार्य असते. साहित्य हे बहुतेक वेळा आत्मविष्कारातून मिळणार्‍या आनंदासाठी निर्माण केले जाते. सिनेमाच्या बाबतीत मात्र अर्थकारण विसरुन चालत नाही. या ताणाचा परिणाम सिनेमावर होतो. अनेकदा तो कथेशी प्रतारणा करत रसिकानुययी होतो तर कधी भरकटतो. उदा: भंसालींच्या ’देवदास’मधल्या भपकेबाज आणि अतिविशाल सेट्च्या आवाक्यासमोर मूळ कथेतील प्रेमाची भव्यता खुजी ठरली. अशा अनुभवांमुळे जातीचे साहित्यप्रेमी सिनेमाला दुय्यम लेखतात. चिंतन, तत्त्वज्ञानाशी संबंध नसलेला सवंग कलाप्रकार मानतात. सिनेमाकडे प्रेक्षकाऐवजी कायम ’टीका’काराच्या भूमिकेतून पाहतात. त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी देखील दिग्दर्शकावर असते. परिणीताच्या बाबतीत दिग्दर्शकांनी दोन्हीचे उत्तम संतुलन साधले आहे.  

प्रदीप सरकार यांनी मूळ कादंबरीत केवळ करडी छटा असलेल्या नवीनचंद्र राय (शेखरचे वडील ) यांच्या पात्राला पूर्ण काळ्या रंगात रंगवले आहे. ललिताच्या मामांच्या वाड्याचा ताबा मिळवून त्यांना बेघर करुन त्या वाड्याचे तारांकित हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनसुबा ललिता ओळखते. गिरिंद्रने (इथे गिरिश) वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे तो धुळीला मिळतो. यामुळे संतापलेले नवीनचंद्र, शेखरच्या अनुपस्थितीत ललिताचा अपमान करुन तिला नोकरीवरून काढून टाकतात. दोन्ही घरांमध्ये रातोरात भिंत उभी करतात. तिने शेखरचा हवा तेव्हा वापर करुन घेतला आणि आता गिरिशला स्वत:ला विकले आहे असा ते शेखरचा समज करुन देतात. २००५ च्या काळात अपेक्षित असलेले धारदार नाट्य मूळ कादंबरीत नाही असे वाटल्याने त्यांनी हे बदल केले असावे. चोखंदळ प्रेक्षकांना ते कदाचित खटकतील परंतु सर्वसामान्य भावनाप्रधान भारतीय प्रेक्षकाला त्याच्या जातकुळीची वेदना, त्याचं शोषण पडद्यावर दिसल्याने तो सिनेमाशी घट्ट जोडला जातो आणि कादंबरीतून साकारलेली ’परिणीता’ सिनेमातूनही तितक्याच ताकदीने समोर येते. ललिताच्या मुख्य भूमिकेतील मीनाकुमारी (१९५३) आणि विद्या बालन (२००५) यांच्या सोज्ज्वळ सौंदर्य आणि परिणामकारक अभिनयाला यशाचे बरेचसे श्रेय जाते. मीनाकुमारी तर कसलेली कलावंत होती पण विद्द्याचा हा पहिलाच चित्रपट असल्याचे कुठेही जाणवत नाही. 

माध्यमांतर होताना कितीही काळजी घेतली तरी काही गोंधळ होतात. विद्या बालन, सैफ अलीखान, संजय दत्त अभिनीत ’परिणीता’ मधला एक प्रसंग. त्यात काळ दाखवला आहे १९६० चा. तपशीलातील बारकाव्यांमुळे वाफेच्या इंजिनांपासून व्हिंटेज कारपर्यंत यातली प्रत्येक गोष्ट नेमकी. प्रेक्षकाला त्या काळात घेऊन जाणारी. त्यातले एक स्त्रीपात्रं शिवणमशीनवर काम करताना दाखवले आहे. ते आधुनिक ’उषा’मशीन मात्र तोवर बाजारात आलेच नव्हते. अर्थात अशा चिमुकल्या गडबडीमुळे सिनेमाचा दर्जा कुठेही उणावत नाही पण माध्यमांतर करून एखाद्या साहित्यकृतीला पड्द्यावर दाखवण्याचे शिवधनुष्य़ पेलणे हे केवढे अवघड काम आहे याची कल्पना त्यावरून येते. ’परिणीता’च्या बाबतीत लेखक आणि सगळे दिग्दर्शक बंगाली असल्याने हे अधिक सहजपणे होऊ शकले असावे. साड्या नेसण्याच्या बंगाली पद्धतीपासून दुर्गापूजेपर्यंत बंगाली संस्कृतीचे असंख्य ताणेबाणे सिनेमाच्या दृक्श्राव्य अनुभवाला एक नवे परिमाण देतात.


समाजात काळानुसार घडणार्‍या सांस्कृतिक, नैतिक उलथापालथींचा विचारही सिनेमा सादर करताना करावा लागतो. कादंबरी प्रकाशित झाली त्या काळात म्हणजे ऐन इंग्रजी राजवटीत, १९१४ मध्ये भारतीय स्त्री-पुरुषाची मैत्री ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. १९५३ च्या काळातील स्वतंत्र भारतात बदलाचे वारे वाहू लागले असले तरीही भारतीय आचारविचार कायम होते. त्यामुळे तेव्हाच्या पडद्यावरच्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना केवळ हार घातल्याने, तो ही काहीशा गमतीच्या नादात, कुणी कुणाला थेट आयुष्याचा जोडीदार मानावे हे पचणारे होते. त्यातली नायिका खालमानेने बोलते, या मानलेल्या पतीला वाकून नमस्कार करते, नायक-नायिका एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. ती अंतर्मनाने त्याची होते. २००५ च्या ’परिणीता’मध्ये एकमेकांना आधी थट्टेत मग गंभीरपणे माळा घातल्यानंतर भावनिक आवेगात ते शरीराने एकरुप होतात. मूळ कादंबरीत असे काही घडते तर कदाचित कादंबरीवर बहिष्कार टाकला गेला असता. २००५ च्या सादरीकरणात तिने अंतर्बाह्य त्याची होणे, असे न घडते तर त्यांच्या प्रेमाची उत्कटता आणि नात्याचे गांभीर्य कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोचले नसते. दोन्ही सिनेमात सामाईक गोष्ट म्हणजे या प्रसंगी ऐकू येणारे शेजारघरच्या लग्नातले मंत्रोच्चार आणि त्यामुळे या गुप्त नात्याला नकळत लाभलेले धार्मिक अधिष्ठान. त्यामुळे सामाजिक चौकटी मान्य असणार्‍या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनातून या नात्यावर आपसूक नैतिकतेची मोहोर उमटवली जाते. जागतिकीकरणानंतरच्या लिव्ह-इनच्या दिशेने पावले टाकणार्‍या पिढीला अशी अपघाताने घडलेली कृती म्हणजे जन्मभराचे लग्नबंधन ही गोष्ट स्वीकारार्ह वाटते किंवा पटू शकते ते केवळ एकाच कारणाने, कथेचा प्राण ज्याभोवती गुंफला आहे ते अलांच्छित, निरपेक्ष आणि नि:शंक प्रेम. पिढ्या बदलल्या, परिणयाच्या आणि सहजीवनाच्या संकल्पना बदलल्या तरी असे प्रेम जीवनाच्या गाभ्याशी होते, आहे आणि राहील. ते प्रेम जोवर तितक्याच आर्ततेने पडद्यावर साकारले जाते आहे तोवर ते प्रेक्षकांच्या मनात झिरपत, काळजात उतरत राहील आणि ’परिणीता’ एक सिनेमा म्हणूनही त्या त्या आवृत्तीत यशस्वी होत राहील.

कादंबरीचे यश हे लेखकाचे एकट्याचे असते. (हल्ली ते बरेचसे विपणन कौशल्यावरही अवलंबून असते हा भाग अलाहिदा) परंतु सिनेमाचे यश हे नेहमीच सांघिक कौशल्यावर अवलंबून असते. नाही म्हणायला विशाल भारद्वाजसारखे कसलेले दिग्दर्शक पटकथेपासून संगीतसंयोजनापर्यंत बहुतेक कामांचा भार एकट्याच्या शिरावर घेऊन थेट शेक्सपियरच्या कलाकृतींचे देखणे माध्यमांतर करून दाखवतात. (ऑथेल्लोवरुन ओंकारा, हॅम्लेटवरुन हैदर, मॅकबेथवरुन मकबूल इ.) त्यांनी तर ही कथानकं भारतीय मातीत अशी काही घोळवली आहेत की ते परकीय साहित्यावर बेतल्याचे प्रेक्षक पार विसरुन जातो. साहित्य असो वा सिनेमा दोन्हीचा ’रंजकपणे कथा सांगणे’ हाच मुख्य उद्देश असतो. सादरीकरणाच्या पद्धती आणि साधनं काळानुरुप बदलत जातात पण त्या कथेद्वारे वाचक/ प्रेक्षकांना एका उत्तम कलाप्रकाराचा आस्वाद घेता यावा आणि त्यांचे बौद्धिक उन्नयन व्हावे हा हेतू बदलत नाही. ‘उत्तम कलाकृती त्याला म्हणतात जी आपली आयुष्यविषयक जाण वाढवते.’ कोणत्याही कलाकृतीच्या गुणवत्तेच्या मापनाचा विजय तेंडुलकरांनी सांगितलेला हा चपखल निकष. ’परिणीता’बाबत बोलायचे तर स्थळ, काळ, दृश्य, ध्वनी आणि अभिव्यक्ती या सगळ्या कसोटींवर बंगालीसह दोन्ही हिंदी चित्रपट चोख ठरले आहेत. शरच्चंद्रांसारख्या प्रतिभावंताच्या कथेमुळे आशयाबद्द्ल बोलायलाच नको. याशिवाय कलाकारांचा दर्जेदार अभिनय, कथेला पुढे नेणारी श्रवणीय, अर्थपूर्ण, सुरेल गाणी, सिनेमाच्या तरलतेला पोषक संगीत, कॅमेर्‍याने दिलेली नेमकी नजर आणि दिग्दर्शकाला सापडलेली प्रेक्षकांची नस या सर्व घटकांच्या बळावर शरच्चंद्रांच्या ’परिणीता’ला सिनेमातूनही न्याय मिळाला आहे असे नक्कीच म्हणता येईल. 

(Published in Dault-Lekhani magazine - Cinema and Literature special edition)

Monday, May 10, 2021

ठहराव

 


#या_जगण्यावर #सकाळ #ठहराव

आजवर आपण खूप धावलो. साहजिकच आपली प्रवासाची साधनं, आपली संवादाची साधनं, आपल्याला लागणारी यंत्र फक्त वेगाची ’सबसे तेज’ भाषा बोलत होती. आपल्याला लागणार्या रोजच्या वस्तू सुद्धा ’झटपट आराम’, ’बस दो मिनट मे तैयार’, ’बंटी, तुझा साबण स्लो आहे का’ असं म्हणत आपल्या बरोबरीने पळत होत्या. ’फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट’ हे जमलं तरच या जगात ’हॉट सीट’ मिळते रे बाबा, हे सांगत आपण मुलांनाही धावायला शिकवत होतो. कोरोनाआपत्तीने या शर्यतीला करकचून ब्रेक लावला आहे किंवा खरं तर लादला आहे. चढावर अचानक ब्रेक लावला की आपण आपोआप घरंगळत मागे येतो. तसे मागे येताना आपण आपल्याच जगण्याकडे नवलाईने बघायला लागलो आहोत. मग जाणवतं की वर चढण्याच्या धावपळीत वाटेतले अनेक सुंदर थांबे बघायचे राहून गेले. निगुतीने करायच्या बर्याच गोष्टी राहून गेल्या. कितीतरी छंद अपूर्ण राहिले. मोठ्या सुखाच्या शोधात आयुष्यात येऊन गेलेल्या किंवा अजूनही भोवताली असलेल्या लहान लहान सुखांकडे आपलं दुर्लक्ष होत गेलं.
एक लोककथा आहे. गळ्यात लोखंडी साखळी घालून एक माणूस परीस शोधायला निघाला. वाटेतला प्रत्येक दगड त्या साखळीला लावून ती सोन्याची होते का हे बघत आणि नसेल तर तो दगड फेकत भराभर पुढे जात राहिला. त्या नादात ती साखळी केव्हा आणि कोणत्या दगडामुळे सोन्याची झाली हे त्याला कळलंच नाही. त्याच्यासारखीच आपल्याला घाई होती, इतकी की आपण श्वास सुद्धा पुरेसा दीर्घ घेत नव्हतो. १९८० च्या सुमारास सुरु झालेली स्लो फूड चळवळ आतापर्यंत फारशी महत्वाची वाटत नव्हती. भौतिक समृद्धी आणि आंतरिक समाधानाचा समन्वय साधण्याऐवजी भव्यदिव्य यश म्हणजे सुख हे जणू आपण ठरवून टाकलं होतं. त्या टप्प्यावर पोचेतो आपली ’भव्यदिव्य’ची व्याख्या पुन्हा बदलत होती त्यामुळे नेमकं कुठे थांबायचं हे कळेनासं झालं होतं. आता मागे येता येता आपण नोंद न घेतलेले सुखाचे चिमुकले स्त्रोत लख्ख दिसू लागले आहेत. एखाद्या कलेच्या अद्वितीय अविष्कारापासून नि:शब्द शांततेपर्यंत, विज्ञानातल्या एखाद्या रहस्याचा स्वत:ला उलगडा होण्यापासून एखाद्या अनामिक पक्षाची शीळ ऐकण्यापर्यंत, एखाद्या पुस्तकातल्या शब्दाने, विचाराने झपाटून जाण्यापासून हळव्या स्पर्शापर्यंत, मृद्गंधाच्या दरवळापासून बाळाच्या निरागस हास्यापर्यंत, मदतीसाठी पुढे केलेल्या हातापासून टाळीसाठी पुढे केलेल्या हातापर्यंत ते कुठेही विखुरलेले असू शकतात. याचे निकष प्रत्येकाच्या वृत्तीप्रमाणे वेगळे असतात आणि ते वेगळे असण्यातच मजा आहे पण शोधण्याची असोशी मात्र तीच आहे. अशी छोटी सुखं खिसा भरलेला किंवा हलका असला तरी तितकीच तृप्ती देतात पण केव्हा! तो अनुभव, तल्लीनतेमधलं ते सौंदर्य मनातल्या अवकाशात मुरवत त्याचा तब्येतीने आस्वाद घ्यायला वेळ असेल तरच. स्वच्छ, शांत मन आणि अशा रुपेरी क्षणांच्या स्वागतासाठी सताड उघडं ठेवलेलं त्याचं दार, एवढं यासाठी पुरेसं आहे. याने जग वगैरे बदलत नाही पण आपण जगण्याच्या प्रेमात नक्कीच पडतो.
एका प्रसिद्ध सिनेमातलं दृश्य आहे. नायक नायिका एका पर्यटन स्थळावर गेले आहेत. कडयावर निवांत बसून ती त्याच्या साक्षीने सूर्यास्त बघते आहे. त्याच्या हातात तिथल्या प्रेक्षणीय स्थळांची यादी आहे. त्याचं म्हणणं असतं- सूर्यास्त सगळीकडे सारखाच तर दिसतो, त्यात किती वेळ घालवायचा, अंधार पडेल मग बाकीची स्थळं बघणं राहून जाईल, चल निघूया. त्याच्या हातातल्या यादीचे तुकडे करुन दरीत भिरकावत ती म्हणते, "लाईफमें कुछ ना कुछ तो छुटेगाँही, तो जहाँ है, वही का मजा लेते है." जिथे आहोत तिथेच भिरभिरणारी सुखाची इवलीशी फुलपाखरं बघायला हवी असलेली उसंत आता आपल्याला मिळालीय. अर्थात हा ब्रेक आहे. आकाशातल्या चंद्राच्या कला बघण्यात आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारण्यात कितीही मौज वाटत असली तरी शेवटी भाकरीच्या चंद्रामागे प्रत्येकाला अपरिहार्यपणे धावावंच लागणार आहे पण आधीसारखं उर फाटेस्तो नाही, एवढं एव्हाना आपल्याला कळलंय. गती हवीच पण किती! तोल राखता येईल आणि जगण्यात कुतूहलाने डोकावत रमतगमत पुढे जाता येईल एवढीच.

sakal-ya jagnyavar -May 21

Monday, May 3, 2021

प्रेरणा


 #Sakal #या_जगण्यावर #ध्यासपंथ

वांगणी रेल्वे स्थानकाच्या दिशेने एक गाडी धडाडत येते. अंध आईचा हात धरुन चालणारं एक मूल अचानक फलाटावरुन रुळावर पडतं. तेवढ्यात त्या रुळांवरुन मयूर शेळके धावत येतो. झपकन त्या मुलाला उचलून फलाटावर टाकतो आणि त्याचा जीव वाचवतो. हे कमी की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने दिलेल्या ५०,००० रु.च्या बक्षीसातले निम्मे पैसे तो त्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत म्हणून देतो. नॅन्सी मिस्त्री ही सुरतची परिचारिका कोरोनाबाधिंताच्या सेवेच्या आड आपले गरोदरपण येऊ देत नाही. मागच्या लाटेत पोटचा पोर गमावलेले अहमदाबादचे मेहता मुलाची १५ लाखांची एफडी इतर रुग्णांच्या उपचारासाठी वापरतात. नागपूरचे ८५ वर्षांचे दाभाडकर तर ’आपलं जगून झालंय, इतरांचं सगळं बाकी आहे’ या समर्पण भावाने रुग्णालयातला स्वत:चा बेड देऊन टाकतात आणि अनंतात विलीन होतात. किती उदाहरणं द्यावी! यांच्या दर्शनाने विझू लागलेलं समाजमन उजळून निघतं. जगाला समपातळीवर आणणार्‍या या आपत्तीने आपलं बरंच काही हिरावून नेलं असलं तरी आपल्याजवळही देण्यासारखं खूप काही शिल्लक आहे हे जाणवू लागतं. 

कोरोनाच्या तडाख्यामुळे मनावर चरे उमटत असतानाही जगणं थांबलेलं नाही. धावत सुटलेल्या जगाला या आपत्तीने स्वल्पविराम मात्र दिला. अंतर्मुख केलं. आपल्या खर्‍या गरजा किती, खरी नाती कोणती आणि आपल्या आयुष्यात सर्वात महत्वाचं काय याचा विचार करायला भाग पाडलं. निसर्गचक्र मंदावलं नाही. भुई भेगाळली तरी पळसाला नेहमीसारखाच लालबुंद फुलोरा आला. नियमांच्या बंधनात का होईना विवाहासारखी मंगलकार्य, इवल्या जीवांचं आगमन सगळं अव्याहत सुरु राहिलं. वठलेल्या खोडातून बाहेर डोकावणार्‍या कोवळ्या पोपटी पालवीसारखी माणसाची जीवनेच्छा टिकून राहिली. कुणासाठी ती केवळ तग धरुन राहिली तर कुणासाठी ती पुन्हा तरारुन वर आली. बहरत राहिली. काय वेगळेपण असावं या दुसर्‍या प्रकारच्या माणसांचं! सिग्मंड फ्रॉइडने म्हटलं होतं, "वेगवेगळ्या विचारांच्या, कुवतीच्या काही माणसांना एकत्र करा आणि उपाशी राहायला लावा. भुकेच्या वाढत्या तीव्रतेबरोबर सगळे आव, भेद गळून पडतील, माणसं एका स्तरावर येतील आणि उरेल फक्त भूक!!" याउलट स्वतःवर विश्वास असलेली, खर्‍या अर्थाने सुजाण असणारी, जगण्याचा उद्देश गवसलेली माणसं अत्यंत प्रतिकूल स्थितीतही सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहू शकतात, मार्ग शोधू शकतात, स्थिरचित्तपणे निर्णय घेऊ शकतात हे ’लोगोथेरपी’चे जनक डॉक्टर फ्रँकल यांनी दाखवून दिलं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अमानुष छळछावणीतून बाहेर पडल्यावर अशी माणसं निराशेच्या गर्तेत तर गेली नाहीच, त्यांनी अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. 

गीतेतल्या ’कर्मयोग्या’च्या व्याख्येत चपखल बसणार्‍या अशा नि:शंक लोकांमुळे आपली जगण्यावरची श्रद्धा अबाधित राहते. ही माणसं स्वतःच स्वतःची प्रेरणा असतात, ती इतरांना नकळत बळ देतात, दिशा देतात. उसवलेलं जग माणुसकीच्या धाग्याने सांधत जातात. त्यांची नावं सोनू सूदपासून रतन टाटांपर्यंत काहीही असू शकतात. कधी ही माणसं निनावी असतात. त्यांच्या बातम्या येत नाहीत. वैद्यकीय, वित्तीय, सुरक्षा विभागातले जिगरबाज कोरोना योद्धे, प्रयोगशील शिक्षक, जेवणाची सुट्टी न घेता ऑक्सीजन रिफील करणारे कामगार, हाडाचे संशोधक, तळमळीचे समुपदेशक, प्रेक्षकांचं मन रमवणारे सर्जनशील कलाकार, धडपडे क्रियाशील उद्यमी, निरपेक्ष समाजसेवक, अपरात्री देखील ओ देणारे मित्र, हतबल न होता कोंड्याचा मांडा करणार्‍या गृहिणी अशा कोणत्याही रुपात ती भेटतात. त्यांच्या परिघात येणार्‍यांना लागण होते पण ती उर्जेची. 

आपापलं उद्दिष्ट्य शोधून या मांदियाळीत प्रत्येक जण आपल्या परीने सामील होऊ शकतो. स्वत:च्या क्षमता तपासून एकमेकांच्या जगण्याला उमेदीचं तोरण लावण्याची संधी कोरोनाच्या संकटातही दार ठोठावते आहे. तिचं स्वागत करुया.


- मोहिनी

सकाळ सदर - या जगण्यावर May2021

लेख १