Tuesday, February 9, 2021

लेका सांगे ब्रह्मज्ञान

 


"आमची मुलं अवांतर काही अजिबात वाचत नाहीत!" आजच्या बहुतेक पालकांची ही तक्रार असते. मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेल्या आपल्या मुलाच्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता हे आठवून वैतागणार्‍या वडिलांना आपल्या वयाचे असताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हे ही आठवत असतं. तेव्हा मुलांनी खूप वाचावं अशी अपेक्षा करताना वाचनाच्या बाबतीत आपण किती पाण्यात आहोत, काय आणि किती वाचतो या्चा विचार पालकांनी करायला हवा. ’तुम्ही सध्या काय वाचता?’ या प्रश्नाला (अपवाद वगळता) बहुतेकांचं उत्तर ’हॅ हॅ हॅ, वेळच होत नाही हल्ली वाचाबिचायला’ हे असतं. नाही म्हणायला लॉकडाऊनमध्ये बर्‍याच जणांनी वाचनाकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न केला पण घरातली कामं बरीच वाढल्याने तो उत्साह हळूहळू मावळायला लागला. 


या पार्श्वभूमीवर एखादी ट्विंकल खन्ना लेकीसोबत रोज पंचवीस पानं वाचायचा संकल्प करुन त्या दोघींचा वाचतानाचा फोटो social media वर शेअर करते तेव्हा साधारणपणे पहिली प्रतिक्रिया उमटते -’तिच्याकडे छप्पन नोकर असतील कामाला मग काय वेळच वेळ!’ खरं तर ’मिसेस फनीबोन्स’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी ट्विंकल एक प्रसिद्ध लेखिका, ब्लॉगर, उत्तम वाचक आणि यशस्वी व्यावसायिक आहे. "पाहिलेलं किंवा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळेच मी अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले असले तरी लेखिका म्हणून यशस्वी ठरले आहे", असं ती म्हणते. वाचावंसं न वाटण्याचं किंवा वाचन कमी होण्यामागचं खरं कारण ’वेळ नाही’ हे नाही हे आपल्यालाही मनातून मान्य असतं. माहितीच्या महापुरात तग धरताना जग हळूहळू समजून घेण्याविषयीची कमी झालेली असोशी आणि वाचनातून मिळणार्‍या आनंदापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून विनासायास होणार्‍या रंजनाचे वाढते आकर्षण हे त्यामागचे कारण आहे. मुलांवर या माध्यमांचा पगडा पालकांपेक्षा जास्त असल्याने याचा परिणाम त्यांच्या वाचनावर होणार हे स्वाभाविकच. 

मग या अपराधी भावनेतून देण्याघेण्याच्या ब्लाउजपीससारख्या चार मोफत पीडीएफ इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या म्हणजे आपली वाचनविषयक जबाबदारी संपत नाही. उलट त्यातून लेखक, प्रकाशकाच्या पोटावर पाय येण्याची शक्यता असते. बाहेर जेवायला हजारएक रुपये खर्च करणार्‍या पण दोनशे रुपयाचं पुस्तक विकत घेताना खळखळ करणार्‍या, ह्ल्ली ’चांगले’ लेखक सापडत नाहीत अशी ओरड करणार्‍या पालकांना आज एका क्लिकवर जागतिक साहित्य उपलब्ध आहे. अरविंद गुप्तांसारख्यांनी बालसाहित्याचा खजिना ऑनलाईन खुला केलेला आहे. मुळात आपण वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी, स्वत:चा विकास घडवण्यासाठी, स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी, अमुक तमुक अशा भव्यदिव्य कारणासाठी करण्याचा जितका प्रयत्न करतो तितके आपण वाचनापासून दूर जातो. वाचन निर्हेतूक असावं. असं वाचन आपच आत मुरत जातं. बाकी ज्ञानबिन, यशबिश मिळालंच तर ते त्याचे साईड इफेक्ट्स आहेत.अजिबात किंवा फारसं न वाचताही आयुष्यात आनंदी, समाधानी, यशस्वी असलेले लोक अर्थातच आहेत पण वाचन हे स्वत:साठी करायचं असतं हे कळलं आणि त्या प्रक्रियेतला निर्भेळ आनंद गवसला की वाचन आपसूक होत जातं. 

"काळ चंद्र सूर्यांच्या झांजा वाजवत पुढे चालला होता.." एका वाक्यात असं अद्भुत लिहिणार्‍या गेल्या पिढीतल्या ह.ना.आपटयांपासून, "discomfort is good. In discomfort we are real” असं रोखठोक लिहिणार्‍या गेल्या वर्षीच्या बुकरविजेत्या मारिएके रिज्नेवेल्डपर्यंत, काहीही निरुद्देश वाचताना जे धक्के, तरंग, विलक्षण क्षण अनुभवायला मिळतात ते अलौकिक असतात. त्यात अनेक उत्तरं नकळत सापडत जातात. ती आपली मालमत्ता असते. अर्थात काय वाचावं याबाबत मतभिन्नता असू शकते पण "तुम्ही जर चारचौघांसारखं चाकोरीतच वाचन केलं तर तुमचे विचारही चारचौंघांसारखेच राहतील" असं मुराकामी बजावतात. तेव्हा वाणसामान गुंडाळलेल्या कागदांपासून वेब कंटेंटपर्यंत सरसनिरस न ठरवता वाचत जाणं आणि एका ट्प्प्यावर आपला कल कळला की त्यानुसार निवडक वाचन करणं या वाचनाच्या पायर्‍या म्हणता येतील. प्रत्येक पायरीवरची मौज अनुभवत पालकांना पुढे जाता आलं तर त्यांना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. तरुणपणी आपण उत्तम वाचक होतो म्हणणार्‍या अनेक मराठी पालकांच्या वाचनाच्या कल्पना त्याच पठडीत अडकून पडलेल्या दिसतात. ’श्यामची आई’ वाचताना आजची पिढी गहिवरुन येणार नाही, स्वामी-मृत्युंजय तिला कृत्रिम आणि भाबडं वाटू शकेल, अत्रे-पुलंचे विनोद काळ बदलल्यामुळे डोक्यावरुन जाऊ शकतील, बोरकर-कुसुमाग्रज फारच ’डिफिकल्ट’ वाटू शकतील, विद्रोही साहित्य एकसुरी वाटू शकेल. पालकांनी हे समजून घ्यावं. काय उत्तम ते सांगत राहावं परंतु मुलांचं वाचन जगाबरोबर बदलू द्यावं. पालक स्वत: छापील पुस्तकांना प्राधान्य देत असले तरी मुलांच्या वाचनाच्या पद्धती ई- बुक, ऑडिओ बुक, किंडल, व्लॉग (v-log) अशा बदलत जात आहेत, त्यांच्या वाचनाचं माध्यम मराठीच राहणार नाहीये हे ही त्यांनी स्वीकारावं. 

’फेरारी की सवारी’ या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. वडिल मुलाला पाठीमागे बसवून स्कूटरवरुन वेगाने जाताना घाईगडबडीत सिग्नल तोडतात. तो त्यांचा नेहमीचा रस्ता असल्याने परिचयाचा हवालदार त्यांना टोकत नाही. आपल्याकडून सिग्नल तोडला गेल्याचे लक्षात येताच वडिल परत फिरतात आणि हवालदाराला दंडाची पावती करायला सांगतात. हवालदार ’जाने दो साब, किसीने नही देखा’ असं म्हणतो. त्यावर वडिल म्हणतात,’लेकिन मेरे बच्चेने देखा ना! बच्चा जो देखेगा वही सिखेगा’ पालकत्वाचं सार कदाचित या वाक्यात आहे. वाचनही त्याला अपवाद नाही. थोडक्यात मुलांनी वाचायला हवं असेल तर नाक मुरडण्याऐवजी ट्विंकलकडून प्रेरणा घेऊन त्यांना पुस्तकांचं सान्निध्य द्यावं लागेल, वाचनातला आनंद आपल्याला त्यांच्या सोबतीने नव्याने शोधावा लागेल. 

(published in Divya Marathi - Madhurima - 9 feb 2021)

Tuesday, January 5, 2021

हाँ तो मै कहाँ थी...

धावतपळत मी जस्ट सुटलेली झेलम एक्सप्रेस पकडली. नोकरी करत असतानाचे अपडाऊनचे दिवस. नेहमी स्टेशनवर किंवा माझ्याच गाडीत किंवा परतीची गाडी पकडण्य़ासाठी बस स्टँडपासून स्टेशनकडे धावणार्‍या आम्हा सर्वांबरोबर दिसणार्‍या त्या टपोर्‍या डोळ्यांच्या ख्रिश्चन मुलीने मला शाहरुख स्टाईल हात देऊन आत ओढलं. आम्ही एकमेकींना छान स्माईल दिलं. मग चेहर्‍यावर करुण भाव आणून नेहमीची आयडिया करुन एक बरी फॅमिली पाहून मी बसायला जागा पटकावली. तिलाही बोलावलं. शेजारी बसल्याने आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती माझ्याच शाळेत मला दोन वर्ष सिनीयर होती हे कळलं. मग जुन्या शिक्षक-शिक्षिकांचे, इतरही बरेच विषय निघाले. तिलाही माझ्याबद्दल खूप उत्सुकता होती. आपण तिला सुझी म्हणूया. बॉयकट, सावळा वर्ण, स्कर्ट किंवा मॉडर्न पद्धतीचा पंजाबी ड्रॆस घालणार्‍या आणि लालचुटुक्क लिपस्टीक लावणार्‍या या गोड गोबर्‍या, सुझीची आणि माझी त्या प्रवासात जी भयंकर गट्टी जमली ती आजतागायत तश्शीच टिकून आहे.

आता सकाळी स्टॆशनवर निघताना ती मला हाक मारायची. माझी कायम धांदल असायची. त्यात माझी शिस्तप्रिय आई, ’मोहिनी मागे फिर, तुझा चमचा विसळायचा राहिला आहे’ असं काहीतरी प्रचंड घाईत असताना सांगायची. ’अग माझे आई, माझी गाडी चुकेल, हाफ डे लागेल नं’ म्हटलं तरी, ’चुकू दे, त्याशिवाय तुला सवय लागणार नाही’ असं शांतपणे म्हणायची. सुझी फाटकात उभी राहून आमचे हे संवाद ऐकत हसत असायची. ’तेरेको ये लिपस्टिक वगैरे लगानेको टाईम कैसे मिलता रे’, असं मग मी रस्त्याने धावता धावता तिला विचारायचे. तिची इंग्लीशमिश्रित बंबईया हिंदी खासच असायची. उदा: ’रास्ते मे ये गायलोगको कही भी कायको बैठने देते रे, आय गेट फ्रायटन्ड इसलिए मै गाडीच नई चलाती’.  

तिला झोपेची देणगी आहे. ’मेरेको जहाँ कही भी होरिझॉंटल किया, वही मै सो जाती’ असा तिचा प्रकार होता. गाडीत, वेटिंग रुममध्ये ती अशीच पटकन जरा तिरकी झाली की झोपून जायची त्यामुळे ती कायम फ्रेश असे. आमची कंपनी वेगवेगळी असल्याने आणि कामाच्या लोडप्रमाणे आमच्या परतण्याच्या वेळा कधी कधी जुळत नसत. मग दुसर्‍या दिवशी सांगायला आमच्याकडे, काल काय झाले, पवन भोत लेट आई, कर्नाटक कैसे अचानक रुक गयी, बोगी मे क्या गडबड हुई, वो मनमाडका मुछ्छड टीसी फिरसे मेरेको बोला की ये पास इदर नही चलेगा, वगैरे ढीगभर किस्से असत. तिला सविस्तर आणि संगतवार सांगायला आवडे. उदा: - ५.१२ को मैने कॉम्प्युटर शटडाऊन किया और बस पर्स हाथ मे ली तो ये साला डेरिक आके बोलता है, इतना पेज अर्जंट बनानेका है. इधर नवजीवन का टाईम होयेला. मैने फटाफट बनाया. ५.१७ को उसको दिया तो उसको उसमे एक गलती मिला. उसको क्या रे, घर जाके पैर दीवाल को लगाके टीव्ही देखनेका रहता खाली, बीबी बनाती होगी खाना. बच्चो की पढाई पक्का वो ही लेती. हाँ, तो मै कहाँ थी!’ मी- ’डेरिक के पास’. मग ५.४५ पर्यंतचे नवजीवन चुकली, मुश्कील से कुर्ला मिली, वो मोटे अंकल कैसे गिर गये जीनेपे, वगैरे वगैरे धावते समालोचन ऐकवायची.

मी कंटाळून मध्येच काही पुढचे विचारले की ते तिला आवडत नसे. ’रुक तू, हाँ, तो मै कहाँ थी!’, ’वो आर्थर हॅले के बाजू मे’. (एक अपडाऊनवाला मुलगा आम्हाला कव्हर दिसेल अशी मुद्दाम धरुन जाड जाड इंग्लीश पुस्तके वाचायचा. त्याला आम्ही आर्थर हॅले म्हणत असू. ’समझता भी है के खाली स्टाईल मारता है’ अशी तिला शंका होती.)

रोज नवी गाडी, नवे प्रवासी, नवे अनुभव, धमाल यायची. तिच्या बॉयकट आणि शर्ट ट्राऊजर मुळे मागून तिला पुरुष समजून एकदा ट्रॆनच्या दुसर्‍या बाजूने चढणार्‍या एका बाईने तिला ’भैया जरा हाथ देना तो’ असे म्हणून एक गाठोडे हिच्या डोक्यावरच ठेवून दिले होते. पास संपलेला आहे याची ट्यूब पेटली आणि तेव्हाच नेमका टीसी आला तर आम्ही क्लुप्त्या लढवत असू पण तेव्हा खिदकन हसून सुझी आम्हाला तोंडघशी पाडत असे. दरम्यान आम्हा दोघींना माझी आणखी एक जवळची मैत्रिण जॉइन झाली होती. एव्हाना आम्हाला एकमेकींच्या घरची, कंपन्यांची, त्यातल्या आमच्या डिपार्ट्मेंटच्या लोकांची इतकेच नव्हे तर त्यांच्या खानदानाची सुद्धा इत्यंभूत माहिती झाली होती’.

रविवारी सुझी लवकर उठून लालचुटुक्क लिपस्टिक लावून संडॆ मासला न चुकता जात असे. येताना भाजी घेऊन, मला भेटून घरी जात असे. मग चिकन खानेका आणि सोनेका असा तिचा सोपा कार्यक्रम असायचा. प्रवासात सोबत नसेल तेव्हा वाचन बरं म्हणून मी जवळ कायम पुस्तक ठेवायचे, क्या करती तू इतना पढके, आजूबाजू देखकेही तो कितना पढनेको मिलता है, असं तिचं सोपं प्रिन्सिपल. पुरणपोळी तिला खूप आवडायची म्हणून घरी केली की तिच्यासाठी मी डबा न्यायचे. माझं ख्रिस्मस लंच इतर ख्रिश्चन मैत्रिणींसह तिच्याकडे असायचं. तिची आई अप्रतिम डोनट्स बनवायची. जेवण मग थोडं म्युझिक, डान्स वगैरे. मजा यायची. ख्रिश्चन लग्नाच्या रिसेप्शनला ती सोबत असली तरच मी जायचे. भेटवस्तू देताना नवरा-नवरीला हलका किस करण्य़ाची त्यांची पद्धत मला झेपायची नाही मग मी तिच्या मागे लपून लांब हात करून भेट देऊन सटकायचे. गावात धर्मांतरित ख्रिशचन भरपूर. एक कॉलोनी अँग्लोइंडियन्सची. यांची चर्चेस वेगळी. त्यातून मराठी ख्रिशचन्सची चर्चेस अजून वेगळी. त्यांचं सर्कल वेगळं. जो भेद नको म्हणून धर्मांतर झालेलं तो भेद शेवटी तसाच. सुझीचं कुटुंब कॅथोलिक. प्रेयरशिवाय जेवण नाही. अगदी कट्टर धार्मिक, वडील नव्हते. मोठी बहिण त्यांच्या जागेवर नोकरीला लागली होती. धाकटी बहिण एक जुजबी नोकरी करत होती. धाकटा भाऊ शिकत होता. तशातच तिच्या धाकट्या बहिणीने एका मूळ यूपीतल्या हिंदू मुलाशी पळून जाऊन लग्न केले. त्यांना तो मोठा धक्का होता. पांढर्‍या सॅटीनच्या झालरवाल्या गाऊन मधल्या, हातात गुलाबांचा बुके घेतलेल्या ब्राईड ऐवजी त्यांना लालजर्द शालू, सोनेरी ओढणी, हातात चुडा, भांगात सिंदूर, हातभर मेहंदी, मोठठं कुंकू अशा वेशातल्या वधूच्या रुपात बहिणीला बघवेना. सुझी रडली, संतापली, वो सुखी नही रहेगी म्हणाली. हळूहळू ते निवळलं. (आता त्या बहिणीचं कुटुंब हिंदूच असलं तरी ख्रिश्चनांच्या वरताण त्यांच्यामध्ये मिसळून गेलंय)


आपल्याकडे ख्रिश्चन लोक सैल चारित्र्याचे असतात असा फार गैरसमज आहे. एकदा स्टुडिओत लग्नासाठी फोटो काढायला गेली असताना फोटोग्राफरने तिला निगरगट्टपणॆ ’आप लोगोमे इतना चलता है’ म्हणत काही ऑड पोझेस द्यायला सुचवल्या. तिने खिन्न होऊन मला हे सांगितल्रं तेव्हा मला अतिशय वाईट वाटलं. मी तर तिला घेऊन त्याच्याशी भांडायलाच निघाले पण ’वो सॉरी बोल भी दिया तो तु उसको अंदरसे बदल सकेगी क्या’ असा मला निरूत्तर करणारा प्रश्न टाकून तिने तो विषय संपवला. सुझीला जी स्थळं यायची त्यात शिकलेली फार कमी. ख्रिश्चनांमध्ये उच्चशिक्षित (तेव्हा) फार कमी, दारु पिणे नॉर्मल. इंग्लीशच्या जोरावर नोकर्‍या मिळून जात. चंकीफंकी हेअर स्टाईल, हातात गिटार असे ’मुलांचे फोटो’ पाहून ती वैतागायची. ’इन मिथुन चक्रवर्तीयोंमेसेही कोई सिलेक्ट करना पडेगा क्योंकी किसिको पटाना अपने बस की बात नही’ असं म्हणायची. मग तिला एक चांगलं मुंबईचं स्थळ आलं. मुलाला जssरा टक्कल होतं पण शिक्षण, नोकरी उत्तम. बाकी माहिती काढली, ते ही उत्तम. ’ये कितना टकला है मॅन ..कैसा लगेगा जोडा रिसेप्शन के फोटोमे’ अशी तिला काळजी पडली. मी तिची बरीच समजूत घातली की ’शादी के बाद घने बालोवाला भी टकला हुआ तो तू क्या उसे छोड देगी! शादी क्या सिर्फ रिसेप्शनके फोटो अच्छे आने के लिए करते है क्या’ वगैरे. अखेर तिने त्याला होकार दिला. तिची निवड सार्थ ठरली. माझं लग्न ठरलं तेव्हा महेश टकला नसल्याचं तिला हायसं वाटलं.

आता सगळे फोनवर. व्हॉट्सअ‍ॅप वर संपर्कात असतोच. एकदोनदा ठरवून आणि एकदा योगायोगाने आम्ही भेटलो. एकमेकींच्या घरी मात्र अजून जाणं झालं नाही पण तिचा फोन आला नाही असा माझाच काय , मुलांचा वाढदिवसही जात नाही. फोन उचलला की सुझी सुरु होते, "कैसी है रे! मै तो बस दिनभर जॉब, बॉस, टार्गेट, सब्जी, बच्चे.. खाली सोने के लिए घर आती रे, इस्से अच्छा ऑफीसमे ही सो जानेका! कल की बात, ५.१५ को मै उठी, हजबंड के लिए चाय बनाई, वो भी बनाता रे मेरे लिए लेकिन इतनी टेरिबल बनाता की कोरोनाका काडा भी उससे अच्छा. पीही नही सकते. फिर बोलता आज मेरा ऑफ है, पहले बोलता तो मै आधा घंटा जादा नही सोती थी क्या, सोना तो मेरी जान है. बॉंबेमे इन्सान को कहाँ सोनेको मिलता रे, अपना अपडाऊन बहोत आसान था, ऐ अब तेरी साँस मम्मी के जैसा टॊकती क्या रे, मोहिनी मागे फिर !!" मग खिदळत पुन्हा विचारते , ’हाँ तो मै कहाँ थी..!!!.’

Tuesday, December 29, 2020

कोविड- सरते वर्ष आणि भारतीय महिला

 २०२० हे वर्ष अवघ्या जगात प्रचंड उलथापालथ करून आता निरोपाच्या उंबरठ्यावर उभे आहे. कोविड प्रादुर्भावानंतर अनेकांनी जानेवारीत लिहायला घेतलेल्या डायर्‍या मार्चनंतर कोर्‍या सोडल्या किंवा अनेकांचे हाती घेतलेले संकल्प अपुरे राहिले. आधी लॉकडाउन आणि नंतरच्या अनलॉकचे समाजावार, अर्थव्यवस्थेवर, नातेसंबंधांवर खोलवर परिणाम झालेत. या पार्श्वभूमीवर सरत्या वर्षाने भारतीय महिलांना काय दिले आणि काय हिरावून नेले याचा हा लेखाजोखा. 

भारतात आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ७०% आहे. वेगवेगळ्या श्रेणींचा विचार केला तर नर्सेस आणि सुईणी यांचे प्रमाण तब्बल ८८.९% इतके आहे. कोविडशी लढा देताना या क्षेत्रातील बहुसंख्य महिलांनी अतुलनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण महिला सरपंचांनीही आपल्य स्तरावर परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. खरे तर प्रादुर्भावाचा सर्वाधिक धोका या महिलांना होता. दुय्यम लेखले गेल्याने भारतीय स्त्रीच्या आरोग्याबाबत समाजात आजही अनास्था दिसून येते. अशा परिस्थितीतही कोविडचा संसर्ग झालेल्या स्त्रिया आणि पुरुषांच्या मृत्यूदरातला फरक चकित करणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी 73 टक्के पुरुष आहेत. महिलांमध्ये असणाऱ्या X क्रोमोझोममुळे त्यांच्याबाबत या विषाणूचा धोका कमी होत असावा याशिवाय भारतीय महिलांमध्ये पुरुषांपेक्षा ध्रूमपानाचे प्रमाण खूपच कमी असल्याने कॅन्सर, श्वसनसंस्थेचे आजार किंवा हृदयरोग यांचा धोकाही कमी असतो, ही त्यामागील कारणे असू शकतात असे अभ्यासकांचे मत आहे. 

मिशेल टेरटिल्ट या जर्मनीतल्या माईनहाईन विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ सध्या कोरोना संकटाच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्यामते येत्या काळात वाढत्या बेरोजगारीचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होणार आहे. एरवी मंदीची पहिली झळ पुरुषांना लागते कारण ते अर्थव्यवस्थेची मदार असलेल्या क्षेत्रात काम करतात तर महिला मात्र शिक्षण, आरोग्य, शेती आणि सेवा क्षेत्रात जास्त प्रमाणात काम करत असतात. पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसत असल्याने महिलांची आर्थिक घडी विस्कटली आहे. शेतीचा विचार केला तर ८० टक्के जमीन पुरुषांच्या नावे मात्र शेतातील ८० टक्के कामे स्त्रिया करतात. दुसर्‍याकडे शेतमजुरी किंवा औद्योगिक क्षेत्रात मजुरीचे काम करणार्‍या महिलांना, अगदी गर्भवती महिलांना सुद्धा वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मुलाबाळांसह पायपीट करत आपले गाव गाठावे लागले. उद्योग बंद झाल्याने कंत्राटीपद्धतीने दिल्या जाणाऱ्या पगारी रजांच्या धोरणाचा लाभ देखील त्यांना मिळू शकला नाही. बेताची पण दुहेरी कमाई असलेल्या अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये महिलांनी नोकरी गमावण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात करताना सुरुवात महिलांपासून केली. महिला घराच्या पोशिंद्या नसतात असे समाज आजही मानतो हे यावरून सहज लक्षात येईल. परंतु विजिगीषु वृतीच्या महिला राज्य ते राष्ट्रीय स्तरावर मास्क तयार करणार्‍या बचतगटांपासून ऑनलाईन क्लासेसपर्यंत आणि गृहोद्योगांपासून मधापासून वाईन तयार करणार्‌या विविध उद्योगापर्यंत विविध स्टार्टअप्स स्वत: सुरु करून परिस्थितीवर मात करत आहेत.  


अर्थात अनेक पुरुषांनीही नोकर्‍या गमावल्या आहेत किंवा पगारकपातीला तोंड दिले आहे. सतत घरी राहावे लागल्याने जिथे जागेची अडचण आहे, कुटुंबात जास्त सदस्यसंख्या आहे अशा घरातून विसंवाद, त्रागा वाढू लागला. खासगीपणावर मर्यादा आल्या. शाळाही बंद झाल्या. याची परिणीती म्हणजे बाललैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झालेली वाढ. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सहजसाध्य नसल्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, विशेषत: ग्रामीण भागात, आधीपासूनच असलेले औदासिन्य आणि त्यामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढले. देशातील सर्वात जास्त बालविवाह होणार्‍या ७० जिल्ह्यात महाराष्ट्रातील १७ जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील २५ % विवाह हे बालविवाह असल्याचे वास्तव अतिशय गंभीर आहे. ज्येष्ठ किंवा एकट्या महिलांना असुरक्षित अवस्थेत दिवस काढावे लागल्याने नैराश्य, मनोविकाराच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. 


२०२० मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. घरातल्या महिलांना काहीवेळा मानसिक छळ तसेच लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे --लागले आहे. नारी समता मंचच्या अहवालानुसार लॉकडाऊनमध्ये १०% टक्के महिलांचा अमानुष छळ झाला. अर्थात सर्वेक्षण ऑनलाईन केल्याने इंटरनेट परवडू शकणारा सुशिक्षित वर्गच यात सहभागी होऊ शकला, १०% महिलांनी ’हिंसेत वाढ झाली आहे का’ हा रकाना रिकामा सोडला आहे. हे मौन पुरेसे बोलके आहे. शक्य ती कामे ऑनलाईन करण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांविषयक सायबर गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. या वर्षाच्या अखेरीस या संदर्भात आलेली सकारात्मक बातमी म्हणजे महिला व बालकांवरील अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावीपणे कार्यवाही करता यावी, यासाठी राज्यसरकार 'शक्ती कायदा’ करणार आहे. या विधेयकानुसार बलात्कार, अॅसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी फाशीची शिक्षा प्रस्तावित केली आहे. याशिवाय समाजमाध्यमांवरून धमकावणे, बदनामी करणे, खोट्या तक्रारी करणे या नवीन गुन्ह्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर २० मार्चला घडलेली एक मह्त्वाची व आश्वासक घटना म्हणजे निर्भयाला तब्बल ८ वर्षांनी मिळालेला न्याय. महिला वकील सीमा कुशवाहा यांनी प्रतिकूल स्थितीला ताकदीनिशी तोंड देत हा लढा अखेर जिंकला.


२०२० च्या मधल्या काळात हाताला काम नसल्याने सतत घरात पडून असलेल्या व्यसनी पुरुषांच्या अरेरावीमुळे व आर्थिक चणचणीमुळे दारिद्र्यरेषेखालील महिला मेटाकुटीला आल्या. 

त्यांच्या तुलनेने आपण सुखाचे चार घास खाऊ शकतो यात समाधान मानणार्‍या मध्यमवर्गीय महिलांनी सुरुवातीला हौस म्हणून नवनवे पदार्थ कुटुंबियांना खाऊ घातले. नंतर मात्र सततच्या फर्माईशींमुळे आणि स्वयंपाकाचा बोजा वाढल्याने त्या वैतागून गेल्या. गृहिणी असलेल्या महिलांनी नवरा-मुले आपापल्या कामाला गेल्यानंतर मिळणारा हक्काचा मोकळा वेळ गमावला. 

अर्थात या काळ्या ढगांना रुपेरी कडाही आहेत. भारतीय बायका दररोज सहा तास घरकाम करतात, तर पुरुषांचा हा वेळ आहे फक्त ५२ मिनिटे. 'करोना'मुळे घरात अडकून पडल्यामुळे हा वेळ चक्क वाढला, म्हणजेच मदतनीस उपलब्ध नसल्याने आणि परिस्थितीची गरज म्हणून का होईना पुरुषांनी घरकामाला हातभार लावायला सुरुवात केली. मार्च ते डिसेंबर या काळात ’गरज- हौस- कौतुक- वैताग- जमल्यास मदत- वेळच नाही’ असे पुरुषांचे घरकामातील मदतीबाबत उत्क्रांतीचे टप्पे असले तरी किमान घरकाम कमीपणाचे नाही तसेच मदतनीस महिलांना किती कष्टाची कामे करावी लागतात याची जाणीव मात्र नक्कीच निर्माण झाल्याचे चित्र आता दिसते आहे. कामाचे वाटप करु शकलेल्या अनेक महिलांना आपले जुने छंद जोपासता आले. कुटुंबाला वेळ देता आला. नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असलेली मुले घरी राहत असल्याने आनंद आणि समाधानाचा अनुभव घेता आला.


मनोरंजन क्षेत्राला या वर्षी आर्थिक फटका बसला असला तरी महिलाकेंद्री विषय असलेले चित्रपट यशस्वी होण्याचे प्रमाण या वर्षी लक्षणीय आहे. ’गुल मकाई’ हा मलाला युसूफजाईच्या जीवनावरील चित्रपट वगळता दीपिका पदुकोनचा स्त्रियांवर होणार्‍या अ‍ॅसिड हल्ल्यावर आधारित ’छपाक’, संसारातल्या जबाबदार्‍यांमुळे कबड्डीपासून दुरावलेल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महिला खेळाडूच्या कमबॅक वरील ’पंगा’, मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणार्‍या ’शकुंतलादेवीं’चा विद्या बालन अभिनीत बायोपिक, जान्हवी कपूरने साकारलेली कारगिल गर्ल ’गुंजन सक्सेना’, स्त्रियांना गृहित धरण्याबाबत भाष्य करणारा तापसी पन्नूचा ’थप्पड’ असे वैविध्यपूर्ण चित्रपट यंदा गाजले. भारतीय महिलांनी याही वर्षी नवनव्या क्षेत्रात आपले नाव कोरले. क्रीडाक्षेत्रात मणीपूर पोलिस विभागातील बालादेवी ही एखाद्या नामवंत (स्कॉटीश जायंट रेंजर्स) फूटबॉल क्लबशी करार करणारी पहिली भारतीय महिला ठरली. डॉ. माधुरी कानिटकर यांची भारतीय सैन्यदलातल्या ३ र्‍या महिला लेफ्ट्नंट जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. मिशन मंगळच्या पदाधिकारी रितू करिधल यांनी फोर्ब्सच्या सेल्फमेड महिलांच्या वार्षिक यादीत स्थान पटकावले. शिक्षण क्षेत्रात धुमाकूळ घालणार्‍या बायजू रवींद्रन यांच्या पत्नी व सहसंस्थापक दिव्यांका गोकुळनाथ यांनी २८०० करोड रु.चे रेव्हेन्यू टार्गेट साध्य केले. भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांची याच वर्षी अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. कमला यांच्या मूळ भारतीय तमिळ आईची त्यावर प्रतिक्रिया होती ‘अनेक गोष्टी करणारी तू पहिलीच असणार आहेस. मात्र, तू शेवटची नसशील, याची खात्री द्यायला हवी.’ 

कठीण परिक्षा घेणार्‍या सरत्या वर्षाने जाता जाता ननवर्षाच्या शुभेच्छांसह भारतीय महिलांनाही हाच संदेश दिला असावा.  


*(लेखातील टक्केवारी ही युनेस्को, वर्ल्ड बॅंक तसेच नारी समता मंच सर्वेक्षण अहवालांनुसार दिलेली आहे)

-Published in Divya Marathi -Madhurima - 29/12/21