Monday, April 20, 2020
पिंकीपॉलिसी
Friday, April 10, 2020
दिवे : यांचे - त्यांचे - माझे - आपले
![]() |
दिवा लावायचा होता तो सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी- ती झाली का? नक्कीच. बरेच जण आपापल्या घरासमोर, गॅलरीत येऊन शेजार्यापाजार्यांशी बोलले, हसले, काही जणांनी घराघरांवर लखलखणारे दिवे आपापल्या मोबाईल कॅमेर्यात कैद केले. काहींनी सोशल मिडियावर जरा त्रागा केला पण त्यापैकी संकल्पनेला विरोध नसलेल्यांनी दिवे लावले.
दिवा लावायचा होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी- वैद्यकीय क्षेत्रातले, शासकीय कर्तव्य बजावणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, पोलिस, समाजसेवक, ज्यांच्याकडे दिवा लावायलाच काय चटणीवर घ्यायलाही तेल नाही किंवा लॉकडाऊनमुळे मिळवणं शक्य नाही अशांची काळजी घेणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते.. यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी.
तर दिवे लागले. वरवर सगळं रुटीन चालू असलं तरी कदाचित आपण सगळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, अशा वेळी आपण एकटे नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, ही उमेद देऊन गेले.
आता पुढे काय!
सोशल मिडीयावर राजकीय दंभ मिरवत हमरीतुमरीवर येऊन वादावादी करणारे सोफापटू, टाळ्य़ा वाजवण्याऐवजी थाळ्य़ा वाजवत जत्थ्याने मिरवणुका काढणारे थोर लोक, शासकीय आदेश धुडकावून अकारण बाहेर हिंडणारे अतिहुशार नागरिक, छद्म विज्ञानावर आधारित पोस्ट उपरोधिक आहे एवढीही समज नसल्याने ती अभिमानाने फॉरवर्ड करणारे भाबडे जीव, स्वयंघोषित कोरोना तज्ज्ञ- ग्रीड तज्ज्ञ, सामाजिक विलगीकरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय समोर दिसत नसतानासुद्धा लॉकडाऊनमुळे देशाची कशी वाट लागणार आहे याबद्दल घरबसल्या टीका एके टीका करत राहणारे स्वयंप्रकाशित अर्थ तज्ज्ञ.... अशी ज्ञानदीप पाजळणारी बरीच मंडळी सभोवती दिसत असल्याने खंत वाटत असली तरी प्रत्यक्षात माणुसकीने वागणार्यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे पाहून बरं वाटतंय. मग तो गरीब रुग्णाची राहिलेली इच्छा म्हणून त्याला मासे-भात भरवणारा चेन्नईचा डॉक्टर असेल किंवा एखाद्या पालावर अन्नाची पाकिटे वाटणारा अनाम तरुण. स्वयंसेवी संस्थांचे, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा लंगर मध्ये मुस्लीम बालकांच्या भोजनाची सोय करणारे शीख बांधव. मदत करताना आपल्यालाही लागण होण्याचा धोका पत्करुन, विरुद्ध राजकीय कल, वैचारिक भिन्नता हे सगळं बाजूला ठेवून या जैविक युद्धात आपल्या समाजासोबत ठामपणे उभे असलेले असे निरलस नागरिक प्रत्यक्ष कृतीतून दिवा लावतायत. उजेड पेरतायत.
यात आपल्या परीने आपणही सामील आहोत का?
आपल्या घरच्या मदतनीसांना पगारी रजा देणं, व्यावसायिक असलो तर कर्मचार्यांना पगारी रजा देणं किंवा शक्य असेल तिथे घरुन काम करण्य़ाचा पर्याय देणं, जे रोजंदारीविना किंवा आपल्या घरी पोचू न शकल्याने अडकून पडले आहेत त्यांची पोटापाण्याची सोय करणार्यांना आर्थिक बळ देणं. इतकं तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार करु शकतो ना!
ते ही करुन झालं?
आता आपलं कसं होणार याची चिंता अनेकांना विशेषत: खाजगी उद्योगक्षेत्राला सतावते आहे. नोकरी टिकेल ना! व्यवसाय पुन्हा पहिल्यासारखा उभा होईल ना! अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याच्या नवलाईचं रुपांतर आता रुटीनमध्ये झालंय. लहान घरं असलेल्यांना घरात सतत माणसं असल्याने अडचण होऊ लागली आहे. अशा स्थितीत घरुन काम करणं अवघड व्हायला लागलंय. मनसोक्त आराम करुन झाला, नातलगांशी, जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारुन झाल्यात, आता पुढच्या कॉल मध्ये नव्याने बोलायचं काय असे प्रश्न पडू लागलेत. आवडीचे मेनू चाखून झालेत, राहिलेले सिनेमे, वेब सिरीज पाहून झालेत. खरं तर आता मनोरंजनात जास्त वेळ घालवला की अपराधी वाटायला लागलंय. एकूण वरवर आपण खूष असल्याचं दाखवत असलो, एकमेकांना मीम्स पाठवत असलो तरी आतून आपण घाबरलेलो आहोत. मग वस्तुस्थितीचा स्वीकार करुन कोणालाही दूषणं न देता, येत्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का!
त्यासाठी घरात सतत सोबत असलेल्या व्यक्तींमध्ये तणाव वाढू नये यासाठी शब्द जपून वापरायला हवे आहेत. सोशल मिडियावर तावातावात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याला प्राधान्य द्यायला हवे आहे. काळ कठीण आहे पण अशा वेळीच परिपक्वतेची कसोटी असते. आपण आजवर माणूस म्हणून जसं घडलो आहोत ते योग्य आहे ना हे तपासायची, आपल्या आतला दिवा लख्ख करण्याची ही संधी आहे. नैराश्य वाटत असेल तर ते मान्य करणं ही त्यातून बाहेर पडण्य़ाची पहिली पायरी आहे. एकदा ते कळलं तर संगीत, वाचन, अध्यात्म, सकारात्मक विचार, व्यायाम, कुटुंबासह केलेली एखादी अॅक्टिव्हिटी, ऑनलाईन समुपदेशकांची मदत अशा पर्यायांच्या साहाय्याने या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य नाही.
कोरोनाने जगाला वेढलं आहे ,या पार्श्वभूमीवर भविष्यात काम करण्याच्या पद्धती, ग्राहकाची मानसिकता, गरजा यात आणि त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
या बदलांसाठी आपण तयार आहोत का?
ASK (अॅटिट्यूड-स्कील- नॉलेज) या त्रयीच्या साथीने प्रगती होते हे सत्य मात्र अद्यापही बदललं नाही मग या उरलेल्या ब्रेकचा उपयोग आपण त्यासाठी नक्कीच करु शकतो. या ब्रेकमध्ये काही नवीन स्कील्स शिकता येतील, एखादा वेगळा विषय नीट समजून घेता येईल, आपले व्यावसायिक संबंध संवादी राहून दृढ करता येतील, अशा काळात साधलेला संवाद अधिक चांगली प्रतिमानिर्मिती करणारा ठरेल. आजवर शिकलेलं रिचवण्यासाठी आणि पचवण्य़ासाठी या वेळेचा वापर करुन आपण स्वत:ची मानसिक आणि बौद्धिक स्थिती सावरु आणि उंचावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्वाच्या नेत्यांनी कारावासात असताना जागतिक दर्जाची साहित्यनिर्मिती केलेली आहे. आपला तेवढा व्यासंग, आवाका नसला तरी आपल्याच घराच्या चार भिंतीत कैद असल्याने आपल्या वकुबानुसार आपल्या सर्जनशीलतेला वाव नक्कीच देता येईल, उद्योग-व्यवसायातील नव्या कल्पनांवर खोलवर विचार करता येईल. असं म्हणतात व्यावसायिकाने किमान पुढच्या ५ वर्षांचं नियोजन करावं. सध्या पुढचं सगळं इतकं संदिग्ध असताना ते कसं करणार! परवा सॅटर्डे क्लबच्या आमच्या एका ’झूम’ मिटिंग मध्ये वक्ते आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी याबाबत छान उदाहरण दिलं. जसं धुक्यात गाडी चालवताना आपण हेडलाईटच्या झोतात अंदाज घेत हळू हळू थोडं पुढे जात राहतो तसंच आपल्याला करावं लागणार आहे. वेगात निघालो तर पुढे दरीही असू शकते. हे सगळं केवळ व्यावसायिकांना नाही तर नोकरी करणार्यांना, गृहिणींना, विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. केवळ व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या पलिकडे मोबाईलचा वापर करुन आपण बरंच काही करु, शिकू शकतो हे एव्हाना बहुतेकांच्या लक्षात आलंय. याकडे संधी म्हणून पाहूया. माझंच उदाहरण द्यायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याबाबत मी काहीशी निरुत्साही होते. वेबिनार अनेकदा अटेंड केले असले तरी स्वत: शिकवताना प्रत्यक्षात वाटणारी सहजता, थेट संवादातून येणारा नेमकेपणा त्यात नाही असं मला वाटायचं. आता शिकणारे यासाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार झाले आहेत मग ऑनलाईन तीच सहजता असणं शक्य असल्याचा प्रकाश डोक्यात पडला आहे.
कोरोनानंतरचा समाज अतिशय वेगळा असू शकेल. त्या समाजाचा भाग म्हणून देखील आपल्याला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. भातात एक मटारदाणा घातला तरी आता तो पुलाव वाटतोय, पण सध्या जरी आपण ९० च्या दशकात गेल्यासारखं आणि साधं सोपं जगतोय असं वाटत असलं तरी ही उपरती तात्पुरती आहे हे आपल्याला माहित आहे. लॉकडाऊन संपताच सगळे जण जे काय मिस केलं त्यावर तुटून पडणार आहेत. मी माझ्या पातळीवर यावर नियंत्रण ठेवू शकेन का! फार अर्जंट असं काही नसतं हे कळलंय तर जरा ’माईंडफुलनेस’ कडे लक्ष देऊ शकेन का! भांडी घासणार्या पुरुषांवरच्या विनोदांपलिकडे जाऊन बर्याच भारतीय पुरुषांना घरकामाला हातभार लावण्याची चांगली सवय लागलीय ती ते जपू शकतील का! विकसीत, विकसीनशील सगळे स्तर भेदून जग आता नाईलाजाने एका पातळीवर आलंय. बदलतंय. मग लॉकडाऊन संपल्यानंतर मी पुन्हा पूर्वीचीच व्यक्ती तर होणार नाही ना! नसेन, तर हे ही दिवा लावणंच आहे.
Thursday, March 5, 2020
अॅक्वेरियम
इंडस्ट्री कशी चालते, टेलिकम्युनिकेशन मेंटेनन्स म्हणजे नेमकं काय, थिअरीपलिकडे फारसं कळत नव्हतं. वय २१. फायनल रिझल्ट नुकताच लागलेला. इंटरव्ह्यूतल्या एकाही टेक्नीकल प्रश्नाचं मला धड उत्तर देता आलं नव्हतं. निघताना अचानक मी त्यांना इतकच म्हटलं होतं,’ सर, तुम्ही पण करियरच्या सुरुवातीला या स्टेजमधून गेला असाल ना! मला एक संधी द्या. मी २ महिन्यात सगळं शिकून दाखवेन.’ ते संमिश्र अर्थाने हसले आणि आठवड्याभरात चक्क मला ’ट्रेनी इंजिनीयर’ म्हणून नेमणूक पत्र आलं.
कंपनीची अनेक चित्रविचित्र उत्पादनं. अमेरिकेत पोर्कसाठी डुकरांची वाढ जोमाने व्हावी म्हणून ज्याचं इंजेक्शन दिलं जातं ते ’पपेन’, इरिगेशनची उपकरणं, सोलर सिस्टीम्स, पाईप्स, परदेशात घरांच्या तावदानासाठी वापरल्या जाणार्या Polycarbonate शीट्स, कांदा-लसूण आणि फळांच्या पावडरी वगैरे. हे सगळं तयार करणारे, एकमेकांपासून १०,१२ किमी अंतरावरचे ३ भलेमोठे प्लांट्स, आयटीआय ते आयआयटी रेंजमधले दोनेक हजार कर्मचारी, त्यांचे पर्सोनल, स्टोअर, प्रॉडक्शन, पॅकेजिंग, एक्स्पोर्ट, डिस्पॅच वगैरे अनेक विभाग. शिवाय राज्यातल्या महत्वाच्या शरीरांमधली मार्केटिंग कार्यालयं. हे सगळं एकमेकांना जोडण्यासाठी वापरण्य़ात येणारे हजार एक इंटरकॉम्स, मिनी एक्स्चेंज, शे दोनशे टेलेक्स, फॅक्स, पेजर्स, अधिकार्यांच्या कारमधल्या वायरलेस यंत्रणा. या अवाढव्य जंजाळाचा मेंटेनन्स करणार्या डिपार्ट्मेंटला मी रुजू झाले. यातल्या काही गोष्टी मी जन्मात पाहिल्या नव्हत्या, हाताळणं तर दूरच. डिपार्ट्मेंटला मी एकटीच मुलगी. टेक्नीकल मेंटेनन्सला मुली निरुपयोगी असं सार्वत्रिक मत. अगदी पुण्य़ाच्या बजाज ऑटोनेही आमच्या वर्गातल्या ८ मुलांना निवडले तेव्हा ’लेडिज कँडिडेट्स डू नॉट अप्लाय’ अशी नोटीस लावली होती. या सहकार्यांनाही ’मुलगाच' हवा होता. माझी ब्याद लवकर टळावी म्हणून त्यांनी जणू असहकार पुकारला. एक प्रकारचे रॅगिंगच. कशाच्याही नीट नोंदी नसल्याने कसे काम करावे ते कळेना. दुसर्याच दिवशी त्यांनी २०० कनेक्शनच्या सर्किटचे टेस्टींग दिले. संदर्भ न सांगितल्याने गोंधळून जाऊन मी पूर्ण चुकवले. पुण्याच्या कॉलेजमध्ये इतकंही शिकवलं नाही वाटतं- या टाईपचे टोमणे जिव्हारी लागले. जेवायच्या सुट्टीत एकटीच कँटीन शोधत गेले. बरीच गर्दी होती पण मुलींची संख्या नगण्य त्यामुळे ’कौन नया पंछी आयेला है’ टाईप बोचणार्या नजरा. चुकलेले टेस्टींग. खाल्लेली बोलणी. कुणीही ओळखीचे नाही. त्यात अपडाउनचे दोन दिवसाचे विचित्र अनुभव. आदल्या दिवशी ट्रेन लेट झाल्याने घरी पोचायला झालेला उशीर. आज जेमतेम चहा घेऊन कशीबशी धावत पकडलेली गाडी. कसं होईल इथे आपलं! नोकरीची तर प्रचंड गरज होती. मला घास जाता जाईना.
तेवढ्यात समोर तिशीची एक स्मार्ट, सावळी बाई येऊन बसली. सरस्वती. माझा नवखा, रडवा चेहरा पाहून मला डबा ऑफर करत साउथ टोनमधल्या इंग्लीशमध्ये म्हणाली, ’नवीन आहेस ना! घाबरु नकोस. न लाजता, न चिडता, न रडता, काय ते निगरगट्टपणे विचारत जायचं. हिमतीने शिकत जायचं. सगळं जमतं.’ मग हसत हिंदीत म्हणाली, ’गब्बरसिंग क्या कह कर गया, जो डर गया..?’ ’वो मर गया’ असं म्हणताना मला खूप धीर आला आणि हसूही. आमची पुढे घट्ट मैत्री झाली. ती एमडींची सेक्रेटरी होती. कॉर्पोरेट जग कोळून प्यायली होती. मग असेच एक एक गुरु भेटत गेले.
कॉम्युटर मेंटेनन्स विभागातली, केसांच्या बटा मानेने उडवत, मनगटाभोवती बांधलेल्या रुमालात स्क्रू ड्रायव्हर खोचून तरातरा चालणारी रुबीना. वाटेत भेटणार्यांना ’क्या भिडू, काय मंता जोशीसाहेब, गुडमॉर्नींग सिन्हा सर’ असं व्यक्तीनुसार विश करत लीलया दुरुस्त्या करणारी. मला घेऊन सगळे प्लांट फिरुन आली. तिने तिच्या बोहरी हिंदीत कानमंत्र दिला, ’इथे मुलगी असण्याचं कौतुक करत बसशील तर आहे तिथेच राहशील. कोणी एक दिली तर आपण दोन द्यायच्या पण आवाज न करता. आवाज केला तर बाईलाच एक्स्प्लनेशन देत बसावं लागतं. वायर खाली घ्यायचीय तर प्रसंगी स्वत: शिडी चढायची, उई वुई करत इलेक्ट्रीशियनची वाट नाही पाहत बसायचं.’
माझ्या इंग्लीश मधल्या चुका काढणारे डायरेक्टर रामचंद्रन सर. परतीची बस चुकल्याने एकदा त्यांनी आम्हा तीन जणांना स्टेशनपर्यंत लिफ्ट दिली. दोघे पुरुष कारमध्ये मागे बसले, एवढ्य़ा सिनियर साहेबाच्या शेजारी कसं बसायचं म्हणून मी पण मागेच बसू लागले. ते डाफरले, ’मै क्या तुम्हारा ड्रायव्हर हूँ? कल कॅबीन मे आना, तुम्हारा एक एटिकेट्स ट्रेनिंग लेता हूँ।’ दुसर्या दिवशी त्यांनी खरंच फोन करुन बोलावलं. शिकवलं. कार मध्ये बसतानाच्या मॅनर्सपासून, मिटिंगमध्ये कसे बसावे, काटे-चमचे वापरायचे नियम.. इथपर्यंत. पुढे एकदा म्हणाले होते की त्यांची फॅमिली मद्रासला असते. माझ्याकडे पाहून त्यांना लेकीची आठवण येते. वर हसत म्हणाले होते, ’ती पण तुझ्यासारखीच धांदरट आहे.’
कंपनीच्या ’आयएसओ’ विभागात इंग्लीश कागदपत्रांचे अनुवाद कामगारांना समजेल अशा मराठीत करण्य़ाचं काम निवृत्त प्राध्यापक पाटीलसर करायचे. माझी वाचनाची आवड कळल्यावर, मेन बिल्डिंगच्या काचेतून माझ्या बिल्डिंगकडे जाताना मी त्यांना दिसले की ते काही शब्द काढून ठेवत. मी एमआयएसचा सर्व्हर चालू करुन पहिला फोन त्यांना करायचे. शब्द ऐकायचे आणि दिवसभरात आठवतील तेवढॆ प्रतिशब्द जिथे मेंटेनन्स सुरु असेल तिथून त्यांना फोनवर कळवायचे. आवडले तर ते वापरायचे नाहीतर अधिक चपखल शब्द सांगायचे.
वर्षभराने भेटलेली ब्रिटीश जोआन. नवर्याचा आमच्या कंपनीतला रिसर्च लांबला म्हणून लंडनमधली नोकरी सोडून त्याच्यासोबत येऊन राहिलेली. सकाळी शॉर्ट्स घालून गावभर सुळकन सायकलिंग करत फिरणारी, आवड म्हणून कॉर्पोरेट लेखनाचे प्रशिक्षण देणारी, सोनेरी केसांची अवखळ जोआन. एकमेकींचे अॅक्सेंट नीट कळत नसतानाही कशी कोण जाणे आमची मैत्री झाली. त्यामुळे केवळ ऑफीसर्ससाठी असलेल्या बॅचमध्ये ज्युनिअर असूनही शिकता आले. मेमो लिहिणे, निगोशिएशन स्किल्स वगैरे भानगडी तेव्हा प्रथमच ऐकल्या. थोड्याफार कळल्या.
दोनच वर्षात, कंपनीने विकत घेतलेल्या नव्या टेलीकॉम कंपनीत उत्तम पदावर इंटर्नल ट्रान्सफर मिळाली. भविष्य आमूलाग्र बदलून टाकणारी संधी होती. उत्साहात पेढे वाटप सुद्धा केलं. नव्या ट्रेनींचे इन्टरव्ह्यू घेण्याचा अनुभव मिळाला. उद्यापासून औपचारिकरित्या काम सुरु करायचे या आनंदात असतानाच कदाचित असूयेपोटी, मी पर्यायी व्यक्ती ट्रेन करेतो ही ट्रान्सफर स्थगित व्हावी असा मेल रातोरात एमडींना गेला. हा धक्का इंडस्ट्रीचा क्रूर चेहरा दाखवून गेला. इथल्या गळेकापू स्पर्धेत किती सावध राहावं लागतं याचा धडा शिकवून गेला. मी खर्या अर्थाने ’सज्ञान’ झाले.
’फाईंडिंग निमो’ मधला निमो दोन विश्वं अनुभवतो. एक अॅक्वेरियममधलं आणि एक विशाल समुद्रातलं. पुण्य़ाला शिकताना एकटीने केलेले प्रवास, होस्टेलचे खास अनुभव यामुळे आपल्याला खूपच जग कळलंय या भ्रमाचा भोपळा म्हणजेच माझ्या अॅक्वेरियमची काच या सगळ्या भल्याबुर्या गुरुंच्या कृपेने अखेर फुटली आणि धडपडत का होईना पण समुद्रात हात-पाय मारणं मला जमायला लागलं.
पावणेचार वर्षात कंपनीत शेकडो परिचय झाले. काही माणसं जवळची झाली. काही दुखावून गेली. त्यांना सरळ करायला, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला एव्हाना मी शिकले होते पण त्यांचे प्रमाण फार कमी. मुळात माणसं पूर्ण चांगली किंवा पूर्ण वाईट नसतात. त्यांच्या वागण्य़ामागे परिस्थितीजन्य कारणं असतात. आपण तेवढ्याच अनुभवाच्या तुकड्यांवरुन मत बनवतो हे लक्षात आलं. बदली रोखणार्याला माफ केलं तेव्हा मलाच मोकळं वाटू लागलं. ज्यांनी सुरुवातीला सासुरवास केला होता त्यांच्याशी तर कौटुंबिक संबंध निर्माण झाले. माझ्यासह त्यांचेही डोळे सेंड ऑफ पार्टीमध्ये ओलावले होते. आता दोन दशकं उलटूनही बहुतेकांनी मैत्री जपली आहे. काहींशी मधल्या काळात तुटलेला संपर्क सोशल मिडीय़ामुळे पुन्हा जुळला. सिनियर मंडळी काळाच्या पडद्याआड गेलीच पण रुबीना सुद्धा अल्पशा आजाराचे निमित्त होऊन गेली. मला ’ती’ पहिली संधी देणारे सर म्हणजे श्रीराम पुढे माझा चांगला मित्र झाला. आता तो परदेशात असला तरी मैत्री टिकून आहे. मला आयुष्यात पाय रोवून उभं राहायला शिकवणारी सरस्वती मात्र कुठेतरी हरवलीय.
'अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोंमें मिलें
जिस तर सूखे हुऎँ फूल किताबों में मिलें ..'
पण मी तिला अजूनही शोधते आहे.