Tuesday, October 29, 2019

वेब सिरिजचे मुक्तपीठ

 ’कभी कभी लगता है हम खुद ही भगवान है’- नेटफ्लिक्स या तुफान लोकप्रिय वेब वाहिनी वरच्या ’सॅक्रेड गेम्स’ मधला गणेश गायतोंडे म्हणजेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकी अंडरप्ले पद्धतीने हे वाक्य उच्चारतो. विक्रम चंद्रांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित वेगवान, उत्कंठावर्धक कथानक, बोल्ड चित्रण आणि मोकळ्याढाकळया भाषेमुळे या वेब सिरिज प्रकरणाकडे खेचले गेलेले चाहते त्यांच्या टॅब, स्मार्ट टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉपला खिळून उत्सुकतेने पुढचा एपिसोड पाहू लागतात. सैफ अली खान, राधिका आपटे सारखे प्रथितयश कलाकार त्यात भूमिका करत असतात. चित्रपटातील कलाकारांनी टीव्हीवर काम करणं हे कमीपणाचं मानण्याचा काळ अमिताभच्या केबीसीतल्या दणदणीत पदार्पणाबरोबरच संपला. काळाची पावलं ओळखून हे कलाकार मधली पायरी ओलांडून आता थेट वेब सिरिज मध्ये झळकू लागले आहेत. माध्यमांच्या ग्राहकांचे दोन गट तयार झाले आहेत. प्रस्थापित प्रसिद्ध वाहिन्यांचे प्रेक्षक आणि वेब सीरिजचे प्रेक्षक. पहिल्या गटात बहुसंख्य मध्यमवयीन मध्यमवर्गी येतात तर दुसर्‍या गटात सर्व वर्गातली तरुणाई आणि उच्चभ्रू वर्ग येतो. दुसरा गट प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. आपण साँस-बहूच्या कालबाह्य फालतू मालिकांऐवजी वेब सिरिज म्हणजे काहीतरी इंटलेक्चुअल स्वरुपाचं कंटेंट पाहतो, हे सांगणं हा सुरूवातीला नवश्रीमंतांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा असला तरी आता तो सर्व वर्गीयांच्या सवयीचा भाग होऊ लागला आहे.  

असं आहे तरी काय या वेब सीरिजमध्ये! काय आहे यामागचं अर्थकारण! कौन है ये लोग, कहाँसे आ रहे है, असे प्रश्न अनेकांच्या मनातलं वेब सिरिज बद्दलचं कुतूहल वाढवत आहेत.

वेब सीरिजच्या वाढत्या आकर्षणामागची कारणं इथे जाणून घेऊयात. टॉलस्टॉयच्या मते कला हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा, त्याचबरोबर कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे. जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. नव्वदच्या दशकातल्या बुनियाद, अडोसपडोस, नुक्कड, यात्रा, उडान, लाईफलाईन यासारख्या मालिका सहज आकलन होणार्‍या तरीही कलेशी इमान राखणार्‍या आणि प्रेक्षकांची अभिरुची उंचावणार्‍या होत्या. जागतिकीकरणानंतर सॅटेलाईट वाहिन्यांनी २४ तास मनोरंजनाचा पूर आणला आणि बालिश पातळीवर जाऊन टीआरपीच्या नावाखाली काहीही दाखवणार्‍या टुकार मालिकांचे पेव फुटले. त्यांची झगमगाटी पण अत्यंत सुमार दर्जाची आणि शेकडो भाग चालणारी रटाळ हाताळणी पाहता, आजचा तरुण वर्ग त्याला पर्याय म्हणून ताकदीचे कलाकार, तांत्रिक सफाई असलेल्या आणि भन्नाट कथानकांवर आधारित मर्यादित भागांच्या दमदार वेब सिरीजकडे न वळता तरच नवल! 

या माध्यमावर अद्याप तरी कुणाचे नियंत्रण नाही. सुरूवातीला लैंगिक व्यवहारांचे उन्मुक्त चित्रण, हिंसाचार किंवा फाईटसीनचे अंगावर येणारे, श्वास रोखून धरायला लावणारे सनसनाटी चित्रण हा मसाला पेरून प्रस्थापित माध्यमांच्या प्रेक्षकांना या वेब सिरिजनी स्वत:कडे खेचून घेतले. परंतु असा मसाला तर क दर्जाच्या चित्रपटात आधीच होता त्यामुळे केवळ या मसाल्यावर ही बाजारपेठ फार काळ काबीज करता येणार नाही हे लक्षात येताच उत्कृष्ट निर्मितीमूल्ये, दर्जेदार अभिनेते आणि चटपटीत पण आशयघन कथानक हे या वेब सिरिजचे वैशिष्ट्य ठरले. अर्थात या सगळ्याच्या केंद्रस्थानी सवंगतेकडे झुकणारा बोल्डनेस अजूनही ठळकपणे आहेच. भारतात आज सुमारे २/३ एवढ्य़ा संख्येने तरुण आहेत. मुबलक वेगवान फोर-जी डाटापॅक हाती आलेल्या या तरुणाईचा अनुनय करत, त्यांच्या अभिरुचीचा लसावि काढून मागणीनुसार पुरवठा हे बाजाराचे मुलभूत तत्त्व या वाहिन्यांनी अंगीकारले आहे. पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये असा आग्रह धरणार्‍या क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्या भागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असे अपेक्षित होते. परंतु आता या कलाप्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरूवात केली आहे. हल्ली त्याची जागा चित्रपटातील ’आयटम सॉंग’ने आणि रोरावत मनोरंजनाच्या बाजारपेठेत शिरलेल्या वेब सीरिजने घेतली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सेन्सॉरशिप नसल्याने अनुराग कश्यप, मुकेश भट सारखे लेखक-दिग्दर्शक नवनवीन प्रयोग करत आपापल्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीला पूरक असा आशय सहजगत्या व्हायरल करणारे मुक्त व्यासपीठ म्हणून वेब सिरिजकडे पाहू लागले आहेत. 

मनोरंजनाच्या विश्वात या बदलाची सुरूवात झाली नेटफ्लिक्स पासून. यूट्यूबच्या वाढत्या लोकप्रियतेबरोबर अमेरिकेत नवीन कल्पना डिजीटल माध्यमात साकारू लागल्या. त्यापैकी एक म्हणजे नेटफ्लिक्स. १९९७ च्या सुमाराला नेटफ्लिक्स.कॉम या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक आपल्याला हव्या असलेल्या चित्रपटाची मागणी नोंदवली की त्याची डीव्हीडी त्यांना घरपोच मिळे. २००७ मध्ये नेटफ्लिक्सने आपल्या वर्गणीदारांसाठी इंटरनेटद्वारे संगणकावर चित्रपट दाखवण्याची अनोखी सेवाही सुरू केली. डिजीटल क्रांतीचे पुढचे पाऊल म्हणजे नेटफ्लिक्सने २०१३ मध्ये केलेली ’हाऊस ऑफ कार्ड्स’ची निर्मिती. अमेरिकेतल्या वरच्या स्तरावरील राजकारणातल्या पडद्याआडच्या घडामोडी त्यात अतिशय रोचक पद्धतीने दाखवल्या गेल्या. एचबीओच्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ची लोकप्रियता त्याहून अधिक होती. आठ ते दहा भागांचा एक सीझन अशी सुटसुटीत रचना आणि आपल्या सोयीने डाउनलोड करुन हवे ते भाग पाहण्याचे स्वातंत्र्य ही पद्धत वेब सिरिजच्या नव्या प्रेक्षकांना भावली. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड मिळाल्याने या वाहिन्यांची मागणी वाढू लागली. भारतातूनही काही गुंतवणूकदार या नव्या उद्योगात उमेदीने उतरले. उदा: यशराज फिल्म्सचे ’वाय फिल्म्स’ किंवा एकता कपूरचे ’ऑल्ट बालाजी’ अ‍ॅप. या स्पर्धेमुळे एकाहून एक हटके आशय असलेल्या वेब सिरिजची निर्मिती होऊ लागली. 

मालिकांच्या कथानकातील विषयाचे वैविध्य देखील वाखाणण्याजोगे ठरते आहे. उदाहरणे द्यायची तर ’मिर्झापूर’ ही अ‍ॅमेझोन प्राइमवरची गुन्हेगारी विश्व आणि प्रेम या चलनी नाण्यांवर बेतलेली मालिका, ’द टेस्ट केस’ ही भारतीय सेनेची कॅप्टन शिखा शर्माच्या धडाडीवर रेखलेली नागेश कुकनूर दिग्दर्शित मालिका, ’मेमरीज’ ही विक्रम भट दिग्दर्शित मालिका, मुलाच्या दुर्धर आजारासाठी लढताना गुन्हेगारीकडे वळलेला बाप माधवनने उत्कटपणे उभा केला ती अ‍ॅमेझॉन प्राईमवरची ’ब्रीद’ ही मालिका (ब्रीद २ द्वारे आता अभिषेक बच्चनचे पदार्पण होत आहे), ’ऑल्ट बालाजी’वरची राजकुमार राव अभिनीत सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरची ’बोस’ ही मालिका, राधिका आपटे अभिनीत ’घौल’ ही नेटफ्लिक्स वरची भयकथामालिका, आयपीएलमध्ये झालेल्या मॅच फिक्सिंगची पार्श्वभूमी असलेली क्रिकेटविश्वाचे अंतरंग उलगडणारी, फरहान अख्तरची निर्मिती असलेली ’इनसाईड एज’ ही विवेक ओबेरोयने गाजवलेली मालिका, टीव्हीएफ वरची ’पीचर्स’ ही स्वत:ची कंपनी निर्मिण्याचे स्वप्न पाहणार्‍या ४ मित्रांची कहाणी किंवा सुरुवातीला उल्लेख केलेल्या मालिकांचे पुढचे सीझन्स. या मालिका पूर्वीच्या भारतीय सिनेमा किंवा मालिकांसारख्या गोड गोड, साध्या-सोप्या आणि भाबड्या नाहीत. हिरो म्हणजे सद्गुणांचा पुतळा आणि व्हिलन म्हणजे महावाईट्ट माणूस, इस्टेटीसाठी विषप्रयोगापासून काळ्या जादूपर्यंत हरत-हेचे उद्योग करणारी दुष्ट सासू आणि गरीब, सोज्ज्वळ, महापतिव्रता, सोशीक सून अशा काळया किंवा पांढर्‍या दोनच रंगांपलिकडे जाऊन या मालिका त्या त्या माणसातल्या ग्रे शेड्स दाखवतात. समाजाची बधीर, गोठलेली अवस्था भंग करतात. व्यवस्थेला प्रश्न विचारतात. कधी प्रेक्षकांना विचारात पाडतात तर कधी भव्य काल्पनिक पट उलगडवत निखळ मनोरंजन करतात.

या तुलनेने मराठी वेब सीरिज मात्र अद्याप बाल्यावस्थेत आहेत. एखाद्या हिंदी वेब सिरीजच्या एका एपिसोडचे बजेट हे मराठीतील संपूर्ण सिरीजचे बजेट असते. साहजिक त्याचा गुणवत्तेवर परिणाम होतो. ’गावाकडच्या गोष्टी’ किंवा ’सोनी लिव्ह’ वरची ’योलो’ यांनी बर्‍यापैकी लोकप्रियता मिळवली असली तरी बहुतेक मराठी वेब सीरिजमधली अश्लील, शिवराळ भाषा आणि बोल्डपणाचा आव हा हिंदी-इंग्रजी वेबसिरिज ची नक्कल करण्य़ाचा केविलवाणा प्रकार वाटतो. मात्र याला खणखणीत अपवाद आहे ’भाडिपा’चा. सारंग साठ्ये आणि पॉला मॅग्लेनने निपुण धर्माधिकारीच्या साथीने या क्षेत्रात हिट व्हिडिओजपासून जोरदार सुरुवात करुन आता एम एक्स प्लेयरद्वारे वेबसीरिजच्या जगात मुसंडी मारली आहे. त्यांची परदेशी मराठी मंडळींमध्ये विशेष दखल घेतली जाते आहे.  

या वेबसीरिज ज्या तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्यापर्यंत पोचतात त्याला ओटीटी (ओव्हर द टॉप) किंवा ओव्हर द इंटरनेट असे म्हणतात. हे मनोरंजन वेबसाईट किंवा अ‍ॅपच्या मार्फत मुख्य सर्व्हरवरुन थेट आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अवतरते. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझोन प्राइम, जी5, हॉटस्टार, वूट किंवा सोनी लिव सारख्या ओटीटी सेवांमुळे हे मनोरंजन पोर्टेबल स्वरुपात, बसल्या जागी, ह्वे तेव्हा उपलब्ध झाले आहे. मल्टीप्लेक्सला एखादा सिनेमा बघावा तेवढ्या दरात या वेबसिरिज आपल्या सोयीने बघता येत असल्याने ग्राहक त्यांना प्राधान्य देत आहेत. 'वूट' अजून नि:शुल्क आहे. इतर ओटीटी त्यांच्या बाजारातील रेटिंगप्रमाणे पैसे आकारतात. सुरुवातीला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ किंवा सॅटेलाईट वाहिन्यांनी मोफत सेवा दिली मग पेड योजना जाहीर केल्या तसेच बहुतेक ओटीटी एक ते दोन महिने फुकट सबस्क्रिप्शन देताना दिसतात. त्यानंतर उदा: 'नेटफ्लिक्स'साठी आवडीच्या प्लॅननुसार भारतात ३०० ते ८०० रु., 'हॉटस्टार प्रीमियम'साठी २०० रु. महिन्याला आकारले जातात तर 'ऑल्ट बालाजी'चे वार्षिक सबस्क्रिप्शन्स ३०० रुपये आहे. याशिवाय आशयानुसार ब्रँड प्रायोजक मिळवून नफा कमावला जातो. 

टीव्ही वरील हिंदी मराठी मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना वेब सिरिजच्या रूपाने मनोरंजनाचे एक विलक्षण झपाटून टाकणारे दालन खुले झाले आहे. सॅटेलाईट टीव्हीच्या आगमनाबरोबरच प्रेक्षकांचे रुपांतर ग्राहकामध्ये झाले होते. एव्हाना डिजिटली स्मार्ट आणि जाग्या झालेल्या या ग्राहकराजाला आपल्या पैशाच्या मोबदल्यात सतत ताजा आशय असलेले कोरे करकरीत मनोरंजन हवे आहे. साहजिकच येता काळ ओटीटी माध्यमांचा आणि त्यावरील वेब सिरीजचा असणार आहे. अद्याप या वाटेला न गेलेल्यांना त्याबद्दल औत्स्युक्य आहे, तर काहींची ते काहीतरी वाह्यात प्रकारचे मनोरंजन आहे अशी धारणा आहे. डिजीटल भारत हा एक संधी आणि त्याचबरोबर समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक आव्हान बनून उभा राहिला आहे. साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा


आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाटयसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान, डोळे आणि मेंदू तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कसब निर्माण होते. वेब सिरिजच्या नव-प्रेक्षकांना अद्याप हे भान आलेले नाही. कित्येक जण त्याचा आनंद घेता घेता त्याच्या अगदी अधीन होताना दिसत आहेत. २५ ते ४५ मिनिटाचा एक भाग असे सलग आठ -दहा भाग एका बैठकीत पाहून अख्खा सीझन संपवणार्‍यांचं वेब सिरिजचं व्यसन हा माध्यम अभ्यासक आणि समाजशास्त्रज्ञांसाठी गेमिंग, सेक्सटिंग किंवा इंटरनेट अ‍ॅडिक्शनइतकाच चिंतेचा विषय आहे. याच्या आहारी गेलेली तरुणाई सतत एका आभासी जगात वावरत राहते. उत्तेजित मनोवस्थेच्या परिणामांमुळे त्यांच्या शारिरिक आणि मानसिक आजारांमध्ये वाढ होताना दिसते आहे. 

 एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी त्यातली गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. वेबसीरिजच्या माध्यमातून चौकटीबाहेरच्या ज्या अफाट, अद्भुत विश्वाशी प्रेक्षकांचा खोलवर परिचय होतो आहे त्यामुळे एकाच वेळी त्यांचा वैचारिक आवाका वाढतो आहे तर दुसरीकडे त्यांच्या नैतिकतेच्या व्याख्या बदलू लागलेल्या आहेत. आजची पिढी ही वाचणारी नाही तर फक्त ’बघणारी’ पिढी झाली आहे. अभिरुचीचे सांधे वेगाने बदलत आहेत, तेवढ्यापुरता हा खडखडाट आहे की नव्या पिढीची आस्वादक्षमताच आमूलाग्र बदलते आहे हे येणारा काळच ठरवेल. तोवर ’जुन्यातले चांगले टिकून राहो, जे नवे चांगले घडते आहे ते टिकून राहो आणि इंटरनेट शिवाय सुद्धा ज्ञान आणि अनुभव घेण्याच्या जिवंत जागा टिकून राहोत असे मला नव्या पिढीसाठी म्हणावेसे वाटते’ हा लेखक दिग्दर्शक सचिन कुंडलकरांनी ’१९९०’ या पुस्तकात व्यक्त केलेला आशावाद इथे अधोरेखित करावासा वाटतो. 

(published in Sakal Varhad Vishesh Diwali Ank 2019)

Thursday, August 15, 2019

श्रावण आणि जेवण

परवा श्रावणातल्या जिवतीचं म्हणून मैत्रिणीने जेवायला बोलावलं होतं. तिच्या हातची पुरणपोळी खास असते. कुणी कुमारिका पण यायची होती पण
शाळेच्या भानगडीत तिचं म्हणे जमलं नाही (मी जमवलंच. आयतं जेवण्याची मजा काही और असते हे तुम्हाला मी सांगायला नकोच.) तर इतकी रुचकर पुरणपोळी मिस करणार्या कुमारिकेवरुन आमच्या लहानपणीच्या बर्याच आठवणी निघाल्या.
तेव्हा कुमारिका म्हणून जेवायची बरीच आमंत्रणं येत. लहान असले तरी मी वाढणार्या बाईचं नीट निरिक्षण करत असे. त्या कर्तव्यभावनेने पदार्थ पानात पटकत असतील तर मी पुन्हा त्या घरी जात नसे. एका खास आजींकडे बोलावलं की मात्र धाराच्या जाहिरातीतला मुलगा त्याचे भोकराएवढे डोळे विस्फारून ’जलेबी!!!’ असं म्हणायचा तसं माझं व्हायचं. मग मी अगदी नवीन झगा वगैरे घालून, ’पानात काही टाकायचं नाही’ टाईप आईच्या सूचनांना हो हो करून धावत त्यांच्याकडे पोचत असे. जेमतेम दोन खोल्यांचं पण नेटकं घर. गोर्यापान, बेताच्या उंचीच्या, मोठं लालचुटूक कुंकू लावणार्या, फुलांचं सुरेख लुगडं नेसलेल्या त्या प्रसन्नवदना आजी कानडी हेल काढून ’आलीस! ये हो’ म्हणत माझं गोड हसून स्वागत करायच्या. लाकडी पाट, पाण्याचा पेला, सुबक रांगोळी अशी तयारी असायचीच. मी पाय धुवून येऊन बसले की त्या मला कुंकू लावून, दक्षिणा देऊन, बाकी पदार्थ वाढून गरम पुरणपोळ्या करायला बैठ्या ओट्यावर बसायच्या. एकीकडे त्या घोसाळ्याची गरमागरम, खुसखुशीत भजी तळायला घेत तर दुसरीकडे काठोकाठ पुरण भरलेली गोलमटोल पोळी मऊ हाताने सरसर लाटत आणि सोनेरी रंगावर टम्म भाजून तशीच माझ्या पानात ठेवून तीवर तुपाची धार धरत. मी त्यांच्या हालचाली पाहण्य़ातच दंग होऊन जाई. मग वाढता वाढता त्या माझी शाळेची बिळेची चौकशी करत, काय हवं नको विचारत. सट्ट जेवून मी अगदी खुशीत उड्या मारत घरी येत असे.
तेच आजीच्या दुसर्या एका मैत्रिणीकडे बोलावणं आलं की मी नाक उडवत असे. पण त्या आजी खूप गोड होत्या आणि माझा गालगुच्चा घेऊन त्या मला काहीतरी छान वस्तू देत असत त्यामुळे त्या मोहाने का होईना मी जायचे. त्यांचं घर मोठं आणि अगदी मोकळं होतं. त्यांची सून नोकरी करायची.स्वयंपाकाला बाई होती. तिने केव्हातरी केलेले अगोड श्रीखंड, वातड पुर्या आणि गोटा झालेली अळणी भजी एक वाजेतो गारढोण होत असत. या आजी काही लोड न घेता मी येईतो पेपर वाचत बसत. त्यांची नात अबोल होती. मी गेले की ती पलंगावर लांब बसून पाय हलवत माझं नुसतं निरिक्षण करायची, तिचे बाबा लंच ब्रेकमध्ये आलेले असले तर अतिशय शुष्क आवाजात ’काय म्हणते शाळा’ असा एक औपचारिक प्रश्न विचारून उत्तराची वाट न पाहता भिंतीकडे बघत मुकाट्याने जेवत राहायचे, मग कुणीच काही बोलायचे नाही, जुन्या पंख्याचा कंटाळवाणा आवाज येत राहायचा आणि डायनिंग टेबलवर आधीच झाकून ठेवलेल्या ताटात आजी त्या गार गार पदार्थांचा आग्रह करायच्या जे माझ्या घशाखाली उतरत नसत. पुढे पिना, बांगड्यांचे आकर्षण संपले तसं मी त्यांचं आमंत्रण टाळू लागले.
एक नातलग पण मला नेहमी बोलावत, रूचकर स्वैपाक करत आणि प्रेमाने गरम गरम वाढत सुद्धा परंतु त्यांचे मिस्टर म्हणजे आजोबा मला फार पीडत असत. म्हणजे तसं तर जगालाच पीडत असत. ते वयाच्या मानाने फारच खुटखुटीत होते आणि याचा त्यांना कोण अभिमान. मग ते सतत, माझं वय काय असेल सांग पाहू, दात बघ माझे, अजून अक्रोड फोडून खाऊ शकतो.. इ. बोलत असत. मी वय साठ म्हटले की खूश होऊन, ’हॅ, सत्तर पूर्ण. किती?’ मी- ’सत्तर’. ’वाटत नाही की नाही!’ मी-’अज्जिबात नाही’. पण दरवेळा हीच प्रश्नोत्तरं. मला वैतागून एकदातरी त्यांचे ’शंभर’ वय सांगावेसे वाटायचे पण मग आपले आमंत्रण बंद झाले तर काय घ्या म्हणून मी आपली माना डोलवत अक्रोडकथा ऐकत बसायचे.
लग्नानंतर जेवायची बरीच आमंत्रण यायला लागली. सुरूवातीला ओळख व्हावी म्हणून मी आपली सगळीकडे जात असे. नंतर (काही घरी) माझे जमेनासे झाले. का ते वाचा. एका घरी त्या बाईंना मला (एकदाचे) जेवू घालून ऑफिसची वेळ गाठायची असायची. त्या तशा चटपटीत आणि सुगरण होत्या पण कर्मकांडं आणि नोकरी या घोळात त्यांचा कल उरकण्याकडे जास्त असायचा. मी बरीच वेगाने जेवते तरीही मला त्यांची बॉडी लँग्वेज पाहून बकाबका जेवावे लागायचे. माझेही सकाळचे क्लासेस असायचे त्यामुळे मी म्हणून पाहिलं, की मी रविवारी येत जाईन तर त्या शुक्रवार आणि त्याच्याशी निगडीत पुण्यावर(!) ठाम होत्या. जरा तिखट लागले की भर्रकन पाणी देत, फटाफटा पाठ ठोकत, घड्याळाकडे एक डोळा ठेवून भराभरा वाढत. मला आपण पुण्य़ातल्या हॉटेलमध्ये जेवत असून आपल्या पाठीला वेटिंगवाल्यांचे डोळे टोचत असल्याचा किंवा कुणीतरी ’बापरे हिचा तर अजून भात खाऊन व्हायचाय, किती जेवते ही बया’ असं काही तरी पुटपुटत असल्याचा फील येई आणि घास घशात अडकत असे.
दुसर्या एका घरी त्या बाई फारच सुंदर स्वैपाक करत, निगुतीने वाढत. केळीच्या पानावर वाफवलेले शुभ्र कळीदार सुबक उकडीचे मोदक ही तर त्यांची खासीयत. त्या सासवासुनांचे आपसात मात्र अजिबातच पटत नसे. मग जेवणपूर्व काळात सासूबाई मला त्यांच्या खोलीत नेऊन सुनेच्या 'अजून हिला अंदाज म्हणून नाही...’ आणि जेवणोत्तर सूनबाई त्यांच्या खोलीत नेऊन सासूबाईंच्या ’आता शुगर असताना खायचं कशाला यांनी इतकं गोड’ टाईप तक्रारी कुजबुजत्या स्वरात ऐकवत. मला कोणतीच पार्टी निवडून चालणार नसल्याने मी गंभीर चेहर्याने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेई पण मत मात्र मोदकांना देई. पुढे सासूबाई देवाघरी आणि सूनबाई त्यांच्या सुनेकडे पुण्याला गेल्या. आता पुढील एपिसोड पाहण्य़ासाठी त्यांच्याकडच्या पुण्याच्या आमंत्रणाची मला प्रतीक्षा आहे.
एका सुगरण बाईंनी मात्र मला चांगलंच जेरीस आणलं. त्यांना सार्या मुलुखाची घाई. माणसं उठून आन्हिक आवरतायत तोवर या बाई स्वैपाक करून नैवेद्य दाखवून मोकळ्या. मला मात्र वेळ द्यायच्या त्यांच्या नवर्याच्या सोयीनुसार म्हणजे एक वाजता. सोबत आणखी एखादे मेहूण असे. त्या सगळं छान गरम करून या मंडळींना वाढत असत आणि मला मानाचं म्हणून ते रामप्रहरी दाखवलेल्या नैवेद्याचं ताट समोर ठेवत. बरं, ते पण इतकं वाढलेलं की पुन्हा काही मागायची सोयच नाही. त्यातल्या पालेभाजीने गारगुट्ट होऊन पापुद्रा धरला असे. भाताची मूद कुडकुडीत झालेली असे. त्यावरचे वरण वाळून त्रिकोणी होत असे. कढीचे आळून पिठले झालेले असे. पापड कोशिंबीरीतून ओघळलेल्या पाण्य़ात भिजून मान टाकून निजलेला असे. त्या ऐवजी पोळीचाच पापड झालेला असे आणि कोरडा लाडू बोटाने सरकवला तरी ताटात डंगडंग करीत धावत असे. बाकी लोक मात्र वाफाळत्या भातात ताजे वडे कुस्करत, गरमागरम कढीचे भुरके मारत, लुसलुशीत लाडूंच्या आग्रहाला नको नको, पुरे पुरे करत माझ्या जखमेवर मीठ चोळत असत. शेवटी मी नाना हिकमती लढवून ते आमंत्रण कायमचे परतवून लावण्य़ात आता यशस्वी झालेय. हे सगळं लिहिल्यानंतर आता मला नवी आमंत्रणं येण्याची शक्यता तशीही फारच कमी. 😃
अर्थात मी कुणाला बोलावलं तर हे सगळं लक्षात ठेवून टाळते. वरच्या काही उदाहरणांच्या तुलनेने कर्मकांडाचा उगाच बाऊ न करता मोजका पण सुग्रास स्वैपाक करणार्या, या मैत्रिणीसारखं मायेने वाढणार्या किंवा त्या मऊ हातांच्या कानडी आजींसारख्या माऊलींच्या आठवणी तुलनेने खूप जास्त आहेत. (म्हणूनच तर जग सुंदर आहे) 🙂

Saturday, August 10, 2019

पीपल इन द शेड

परवा तब्बल पंधरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले. नेहमीप्रमाणे वार्‍यावर विरून न जाता बरसूही लागले. पाऊस कोसळू लागायच्या आत आपण इच्छित स्थळी पोचू हा माझा अंदाज चुकला. रेनकोट वगैरे वापरणं हा इथल्या जेमतेम सडा घालून जाणार्‍या पावसाचा घोर अपमान मानला जातो त्यामुळे तो जवळ नव्हताच. पावसाचा जोर चक्क वाढतोय हे पाहून मी मेडिकल कॉलेजलगतच्या एका चहाच्या टपरीसमोर गाडी लावून तिथल्या इवल्याशा शेडखाली धावले. 

माझ्याहून चतुर लोकांची तिथे अगोदरच गर्दी झाली होती. कफनी आणि बर्‍याच रूद्राक्ष माळा घालून चहा घेत उकिडवा बसलेला एक बैरागी, बाजूच्या रूग्णालयातल्या आपल्या पेशंटसाठी चहा घेऊन जायला आलेले कुणी कुणी, ’ओह नो, ओ माय गॉड’ म्हणत पावसाकडे वैतागलेली नजर टाकत उभी असलेली एक जीन्सधारी कॉलेजकन्यका आणि एक जरा खेडवळ कपड्यातलं नवविवाहित जोडपं. म्हणजे माझा आपला तर्क, कारण जोराचा वारा येऊन शेड फडफडू लागताच त्याने तिला नीट धरून ठेवलं आणि अचानक तिच्या कानातल्या डुलाला झोका दिला. ती हळूच इकडेतिकडे बघत लाजली. मला त्यांच्यामुळे नीट उभं राहता येत नव्हतं पण काही वर्षांनी समजा अशाच परिस्थितीत ते सापडले तर तो खेकसून ’नीट उभी राह्य नं बह्यकाने’ असं तिला म्हणणारच आहे तेव्हा हा पाऊस तिला एंजॉय करू द्यावा अशा उदात्त विचाराने मी आपली अंग चोरून उभी राहिले. ती बाई माझ्याकडे पाहून गोड हसली. बैरागी बुवांना जगाशी काहीच सोयरसुतक नसल्याने ते हातात पार्लेजीचा पुडा घेऊन आकाशात किंवा शून्यात नजर लावून बसले होते. शेड पाणी साठून खाली झुकली होती. जोडप्यातल्या नवर्‍याने ऐटीत बायकोकडे पाहात चहावाल्याकडच्या बांबूने ते उंच केले पण जमा झालेले पाणी आमच्यापैकी बहुतेकांच्या अंगावर सांडले. त्यामुळे सगळ्य़ांनी नापसंतीचे उद्गार काढल्याने वरमलेला नवरा समाजसेवा सोडून मुकाट उभा राहिला. 

एव्हाना एका जागी उभं राहून कंटाळलेला शेडखालचा एक जण चहाचा ग्लास हातात हिंदकळवत भर पावसात वेगाने धावत रूग्णालयाच्या दिशेने गेला. त्याच्या बौद्धिक क्षमतेवर शंका घेऊन ’येडंच दिसतंय’ म्हणत उरलेले पावने पाऊस, कर्जमाफी, फडणवीस सरकार इ. एव्हरग्रीन विषयांवर आपसात चर्चा करू लागले. बाजूच्या टपरीतून चुर्रर्र आवाज आला, तिकडे भजी तळायला सुरूवात झाली होती. त्या वासाने आणि आवाजाने उल्हासित होऊन एक पावना मधल्या चिखलाच्या ओहोळातून लांब उडी खेळत त्या शेडखाली पोचला. बाकीच्या चर्चकांनी पावसाने आपली आज या ठिकाणी लई पंचाईत केली असली तरी ’कास्तकारांसाठी पाऊस तं पाईजेच नं राजेहो’ असा निष्कर्ष काढला. चहावाल्याने प्लास्टिकच्या टबात जवळपास चहाचा रंग ल्यालेल्या पाण्यात चुबूकडुबूक करून दोन ग्लास धुतल्यासारखे केले. ते ’अनहायजिन’ पाहून कॉलेजकन्यका शहारली आणि तिने चाळा म्हणून मोबाईल पर्सबाहेर काढला. बहुधा इन्स्टा उघडलं असावं. सेल्फीच्या प्रत्येक फ्रेममध्ये बैरागी बुवांचा मख्ख चेहरा बॅकग्राऊंडला येत असावा, कारण तिने त्रासिक चेहरा करून मोबाईल पुन्हा आत ठेवला. त्यामुळे ’फिलींग रोमँटिक इन द फर्स्ट रेन’ या पोस्ट्ला जग मुकलं.  

दरम्यान पावसाचा वेग ओसरला आणि भुरभुरत्या पावसात आमचा तात्पुरता पण रिअल, ’पीपल इन द शेड’ हा व्हॉट्सअप ग्रुप लेफ्ट केलेली मंडळी आपापल्या कामाच्या दिशेने पांगली. बरं मग? मग काही नाही, पाऊस एकच पण कुणाचं काय तर कुणाचं काय.