Friday, February 1, 2019

गोवा डायरी- २

इतकं दमून झोपल्यावरही पाचला टक्क जाग आली आणि डोळ्यापुढे समुद्र दिसायला लागला. 
तीन तारांकित रेसॉर्ट मधला व्हिला असला तरी तिघी, चौघींनी मिळून एक एक खोली शेअर केल्याने बाथरुमसाठी नंबर लावावे लागणार होते. एकदम होस्टेलचे दिवस आठवले पण तेव्हा साडेसात मिनीटात आवरुन व्हायचे. ’उठा उठा सकाळ झाली, समुद्रावर जायची वेळ झाली’ करत सगळ्यांची दार ठोठावली. रात्री कंबरदुखीने हैराण असल्याने ’जमलं तर येईन बॉ’ म्हणणारी मीनल सर्वात पुढे. आरतीने तर झोपेतून ’मै कौन हूँ, कहा हूँ’ टाईप लुक दिला त्यामुळे अखेर पहिली टीम सिंक्यूरिम बीचच्या शोधात बाहेर पडली. मस्त गार वारं होतं. रस्त्यात कुणीच नव्हतं म्हणजे कुत्रं सुद्धा नव्हतं असं मात्र नाही. समोरच्या ’स्पा’ जवळ अचानक काही कुत्री अंगावर आली आणि आम्हाला पळता भुई थोडी झाली. पल्लवीला तिच्या ’टोबो’ची सवय असल्याने ती त्यातल्या त्यात शूर होती. तिच्या मागे लपत चालेतो एकदाची कुत्री भुंकायची थांबली, रस्ता अजूनही रिकामाच. रात्री नाचून गाऊन पहाटे झोपणारं गोवा, हे सकाळी उशीरा उठणारं राज्य आहे हे दिसलंच. ’बस दो सौ मीटर’वर सांगितलेला बीच प्रत्यक्षात पाचसहाशे मीटर तरी लांब होता. वाटेत व्यवस्थित पाट्या असल्याने सहजपणे बीचवर पोचलो. उत्तर गोव्यातला हा बार्डॆझ भाग. डाव्या बाजूला टाटा कंपनीचा ’दर्या किनारी एक बंगलो’, मधे लाल मातीचा खडबडीत रस्ता आणि उजवीकडे खाली वळणं घेत पसरलेला जवळपास निर्मनुष्य, स्वच्छ, लखलखता सिंक्यूरिम बीच. एक पाठमोरा गोवन कोळी तेवढा समुद्रात आत शिरुन मासे पकडत होता. पुरतं उगवलंही नव्हतं. पाठीमागे सिंक्यूरिम किल्ला दिसत होता.

Experience Seekers, Nirvana Seekers ,Party Animals साठी विशेष प्रसिद्ध, असं या बीचबद्दल वाचलं होतं. आम्ही फक्त यातल्या पहिल्या विभागात बसणारे. विदर्भात तीन, चार दिवसांनी पाणी आलं की ते भरण्यासाठी वेळेची, माणसांची सेटिंग करणारी आम्ही रूक्ष मंडळी. दुबईचे शेख मुंबईचा पाऊस पाहायला येतात तसं, इतक्या दिवसांनी हे एवढं, पार क्षितीजापर्यंत पसरलेलं फेसाळतं पाणी पाहून अक्षरश: हरखून जायला झालं.
’फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे’
हे नजरेत साठवेतो दुसरी टीम पण येऊन पोचली. मग मात्र मऊ रेती आणि लाटांबरोबर मस्ती सुरु झाली. किनार्‍यावरच्या बंद शॅक्ससमोर रिकाम्या खुर्च्या तशाच पडलेल्या होत्या. त्यावर बसून, पाण्य़ात पाय नाचवून, आदिवासी पद्धतीने कमरेत हात गुंफून, ट्रस्ट वॉक करताना (डोळे बंद करून मैत्रिण नेईल तिकडे समुद्रात चालत राहायचे) असे सुचतील तसे अनंत प्रकारचे फोटो काढून झाले. ’गोव्याला जातेय’ असं सांगून ऑफीसमधून रजा मिळणे शक्य दिसत नसल्याने शीतलने इमोशनल टच देत ’गावी जातेय’ असे सांगितले होते. त्यामुळे ती दर फोटोला गयावया करून ’ए हा फेसबुकला टाकू नका गं’ असं ओरडायची. शेवटी आम्ही काही फोटो ’हा फेसबुकसाठी :-) गं’ असे म्हणून तिलाच काढायला लावत होतो. नंतर ’टाक गं बिनधास्त, मात्रा चुकली ऑटोटाईपमुळे, असं सांग’ वगैरे सल्ले देऊन झाले.

आता आमचा मोर्चा बीचकडे तटस्थपणे बघत उभ्या असलेल्या सिंक्यूरिम किल्ल्याकडे वळला. या किल्ल्याच्या तटबंदीमुळे लाटांचा आवेग काहीसा रोखला जातो, कदाचित त्यामुळे पाण्यातल्या चित्तथरारक खेळांसाठी बीचचा हा भाग सुरक्षित मानला जात असावा. पाट्यांवर लिहिलेले खेळांचे दर जास्त वाटले. पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग करायचे का, यावर अगदीच माफक चर्चा झाली पण कोणी फारसा उत्साह दाखवला नाही. ’आधीच नवराबिवरा बरोबर नाही. उगाच अतिउत्साहात दोरी तुटून समुद्रात पडलो बिडलो तर काय घ्या, विकतचा ताप’ वगैरे विचार बहुतेकींच्या मनात तरळून गेले असावेत. त्यामुळे सगळ्य़ांनी एकमेकींकडे पाहत, हसत, 'नको, नको' अशा माना हलवल्या. मुळात तेव्हा, इतक्या सकाळी सगळे खेळ बंदच होते. मला आमच्या अलिबाग ट्रीपची आठवण झाली. बनाना राईड म्हणजे केळ्याच्या आकाराच्या फुग्यावर एकमेकांना धरुन बसायचे आणि ते गदागदा हलवून आपल्याला पाण्य़ात पाडणार मग जीव खाऊन ओरडायचे. आम्ही एक मॅट राईड का काय केली होती, वॉटरस्कूटरच्या मागे एक चटई दोरीने बांधलेली, त्यावर पालथे पडून स्कूटरच्या दिशेने असलेला दांडा घट्ट धरायचा. मग ती स्कूटर ते रोरावत पाण्यावरुन फिरवणार आणि मागचे चटईस्वार त्यांच्यामागून फरफटत, भेलकांडत, बोंबा ठोकत बेफाम वेगाने लाटांवरून फिरणार. किनार्‍यावर सुखरूप आणून पटकल्यावर मात्र पाण्य़ाच्या सपकार्‍यांनी आणि भन्नाट वार्‍याने लालबुंद झालेल्या डोळ्यातलं पाणी पुसत सगळे चटईस्वार एकमेकांना ’ हॅहॅहॅ काय मज्जा आली ना’ असं अवसान आणून म्हणणार. बापरे, मला आठवणीनेच काटा आला. अर्थात तेव्हा खरंच मजा आली होती कारण वय लहान आणि सोबत मुलं होती.

एकूण आता किल्लादर्शनाचे वय झाले होते, तेव्हा आम्ही तिकडे निघालो. हा सिंक्यूरिम किल्ला डच आणि मराठ्यांपासून रक्षण व्हावे म्हणून  बांधण्यात आला. १६१२ साली. १६ व्या आणि १७ व्या शतकात मात्र इथे डच जहाजं तळ ठोकत असत. आता तिथे एक देखणा गोल बुरुज, खिडक्यांच्या भिंती असलेला दुसरा बुरुज आणि त्याला जोडणारी दगडी वाट यापलिकडे फार काही नव्हतं. घंटेच्या आकाराची फुलं असलेली काहीशी वेगळीच झाडं बाजूने होती. बॉटनी प्रकरण दहावीनंतर सुटल्याने तसंही मला झाडाफुलांची नावं आणि त्यातून ते लॅटिन शब्द तर अजिबातच लक्षात राहत नाही. नजरेने काय तो आनंद घ्यायचा, उगाच डोक्याला भुंगा नको. गोल बुरुजावर निवांत बसलो असताना आरती उर्फ आमच्या अन्नपूर्णा मातेने अचानक थर्मास उघडला, इन्स्टंट चहाची पाकीटं काढली आणि आम्हाला फर्मास चहा बनवून दिला.
सासूची मैत्रिण आली आणि सुनेने न सांगता त्या दोघींसाठी कॉफी करुन आणली की सासू ज्या विशेष कौतुकाने सुनेकडे पाहते तसे आम्ही आरतीकडे पाहत होतो. आता भुकेची जाणीव झाली आणि आम्ही लगबगीने रेसॉर्टकडे धावलो. झकास कॉंटिनेंटल नाश्त्याचा बुफे लावून तयारच होता. बहुतेक टेबल्सवर साधारण पन्नाशीची परदेशी पाहुणॆमंडळी खातपीत बसली होती. आपापलं आटोपून रेसॉर्टजवळच्या रस्त्यावर आम्ही चक्कर मारली. कपड्यांची आणि दागिन्यांची ’सस्ते मे मस्त’ अशी बरीच दुकानं तिथे होती. पाय दुखेतो तिथेच थोडीफार खरेदी करुन ’करी हाऊस’ म्हणून एका रेस्तरामध्ये जेवून परतलो. शाकाहारी, पंजाबी उत्तम जेवण मिळालं. एका थालीत दोन जणी सहज जेवू शकलो. रोटीचे दर दुप्पट असले तरी बाकी पदार्थांचे दर ठीक होते. तिथेही पुन्हा बहुसंख्य परदेशी मंडळी अन्न चिवडत बसली होती. कुणी गाणं ऐकत एकटं शांत बसलेलं, कुणी हुक्का पीत किंवा  ड्रींक घेत. आपण भारतीय लोक सहसा एकटे बसत नाही. आपल्याला भोवती सतत माणसं, आवाज असण्य़ाची सवय असते.

आता आमच्या दुचाकी येणार होत्या. त्यावरुन स्वैर भटकत गोवादर्शनाची मजा काही और असणार होती पण काहीतरी लोचा झाला आणि पाच ऐवजी दोनच दुचाकी आल्या. ऐसा कैसा करत, समोरच्या दुसर्‍या गाडीवाल्याकडे चौकशी करुन, बरीच फोनाफोनी करुन अखेर पाचही गाड्य़ा हातात आल्या. आपल्याला फिरायचं किती आणि अंतर किती याचा गुगलवर हिशेब करुन झाल्याने पेट्रॊल जुजबी, अगदी लागेल तेवढंच भरुन घेतलं. हेल्मेट तर अगदी लुटुपुटीच्या लढाईतलं वाटत होतं. ते अनिवार्य होतं म्हणे. आम्ही आधी गुगल करुन रेसॉर्टच्या डावीकडे वळायचं की उजवीकडे यावर वाद घातला, मग एकदा पक्कं झाल्यावर मात्र वार्‍यावर स्वार होऊन, वळणावळणाच्या झोकदार रस्त्यांवरून निघालो ते थेट (अग्वादा) अगुडा किल्ल्याकडे.
हा किल्ला सुद्धा १६१२ च्या सुमारास बांधलेला. मांडवी नदीत प्रवेश करणार्‍या घुसखोरांना रोखण्य़ासाठी याचा वापर होई. या किल्ल्यावरच्या स्त्रोतावरुन जहाजांना पिण्य़ाच्या पाण्य़ाचा पुरवठा केला जात असे. पोर्तुगीज भाषेत अग्वा म्हणजे पाणी. दहा लक्ष लि. पाणी साठवण्य़ाच्या क्षमतेची टाकी इथे होती. किल्ल्याच्या वाटेवर सेंट लॉरेन्स चर्च आहे. चर्च आड आले म्हणजे किल्ल्यावर गोळीबार होणार नाही असा हेतू असायचा. मुस्लीम घुसखोर भारतात आगेकूच करताना सैन्याच्या पुढच्या फळीत गाईंना ठेवायचे काहीसे तसेच. हिंदू लोक गाईंवर शस्त्र चालवत नसत आणि त्यांचा हेतू साध्य होई. किल्लाचा वरचा भाग पाणीपुरवठ्य़ासाठी वापरात येई तर खालच्या भागात जहाजं पार्क करुन ठेवली जात. प्रत्येक ठिकाणी फोटोसेशन करत किल्ला फिरुन झाल्यावर दीपगृह पाहिलं.
ते अगदी १९७६ पर्यंत दिवे मिचकावून जहाजांना मार्गदर्शन करत होतं. अरुंद ,गोलाकार जिन्याने त्याच्या उंच टोकावर पोचणं म्हणजे सर्कसच होती. त्यातून शिरता आल्याने आपण अजून बारीकच आहोत असा सगळ्यांना कॉन्फिडन्स आला. वरून मावळतीचा सूर्य अप्रतिम दिसत होता पण वेळ संपायच्या आत खाली उतरावं लागलं. मागच्या कड्यावरुन सूर्यास्त बघा असा सल्ला तिथल्या एका माणसाने देताच आम्ही कड्याकडे पळत सुटलो.

सूर्य अस्तंगत होतच होता. पाय खाली सोडून दम खात शांत बसलो अगदी नि:शब्द होऊन, पण
’प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी’
ही स्थिती शब्दश: अनुभवत होतो.

आतापर्यंत सीता असलेल्या मुली एकदम गीता बनून तयार झाल्या. पब जो जाना था. बर्‍याच जणींनी उत्साहाने ते घरी कळवल्याने काहींच्या घरची मंडळी काळजीत पडली.”कानठळ्य़ा बसवणारे संगीत सुरू आहे, रंगीत दिव्यांच्या झगमगाटात डीजे उलटी टोपी घालून थिरकत ट्रॅक बदलतो आहे, लोक बेताल झिंगत आहेत, अंधार्‍या कोपर्‍यात रग्गेल ड्रग्ज डीलर्सची सौदेबाजी सुरू आहे, अर्धावृत गौरांगना सिगारेट फुंकत धुमाकूळ घालत आहेत आणि आपल्या भाबड्या बायका बाजूला भेदरुन उभ्या आहेत’ वगैरे दृश्य त्यांनी कपाळी हात मारत इमॅजिन केले असावे. प्रत्यक्षात आम्ही कॅंडोलिम बीचजवळच्या ऑन डिमांड पबमध्ये म्हणजे खरं तर फक्त आमच्यासाठी उघडून दिलेल्या ब्राऊन टाऊन हॉटेलच्या डान्सफ्लोरवर तासभर धमाल केली. मनसोक्त नाचलो. एरवी गाणी सुद्धा ’जनी उकलिते वेणी तुळशीचे बनी’ टाईपची, सात्विकच गाणारी मंजिरी चक्क ’बॉलीवूड मसाला’ गाण्य़ांवर ठेका धरताना पाहून आम्ही चाट झालो. नाच अनेकदा विरेचक म्हणून काम करतो. भररस्त्यावर कोणत्याही लग्नाच्या वरातीत नाचणं वेगळं आणि खाजगी फ्लोरवर मैत्रिणींच्या संगतीत नाचणं वेगळं. इतकं दमलो तरीही खूप रिलॅक्स झालो. न पिताही नशा चढल्यासारखं तरंगत होतो. तिथलं जेवणंही रुचकर होतं. जेवताना अधूनमधून कर्कश वाटत असलं तरी लाईव्ह म्युझिकने अजूनच बहार आणली. गायकाचा आवाज खूपच खास होता. गोव्यातले बरेच संगीत शिक्षक, त्यांचे विद्यार्थी, संध्याकाळी या स्वरुपाची कामं करतात. पर्यटन आणि मनोरंजन ही अर्थातच तिथली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे.

कॅंडोलिम बीच इथे येण्य़ाआधीच भटकून झाला होता. निरागस सिंक्यूरिमच्या तुलनेने हा बीच फारच झकपक वाटला. तिथली वाळू अशी अजब की त्यात पाय रुतत होते, पुढचं पाऊल टाकणं मुश्कील होत होतं. किनार्‍यावरच्या लखलखाटातल्या दुकानातले डोळे दिपवणारे दर पाहून फक्त विंडो शॉपींग केलं. रात्रीचे किती वाजले ते कळू नये इतकं ’हॅपनींग’ वातावरण सर्वत्र होतं. तरीही सुरक्षित वाटत होतं. इव्ह टिजिंग अजिबात नाही. परतीच्या रस्त्यावर दुतर्फा गजबजलेली उपहारगृह, त्यातून ऐकू येणारं त-ह्त-हेचं लाईव्ह संगीत, दिव्यांचा चमचमाट, दारूचे पाट आणि परदेशी चेहर्‍यांची इतकी दाटी की जणू आपणच त्यांच्या देशात गेलो आहोत की काय. रात्रीची थंड झुळूक अनुभवत, ही सारी नेत्रदीपक, रंगीली दुनिया बघत दुचाकयांवर रेसॉर्टकडे परत जाताना जाणवलं की हे सगळं खूप चैतन्यमयी आहे, मस्त आहे पण बदल म्हणूनच ठीक आहे. नेवार्क विमानतळावरचा प्रचंड झगमगाट पाहून मला एकदम आपली भारनियमनामुळे काळोखात बुडालेली खेडी आठवली होती. तसं म्हटल्यावर माझे कलिग म्हणाले होते, ’कुणीतरी खर्च करतो म्हणूनच कुणीतरी कमवू शकतो. टेक इट इझी’. तेवढं अर्थशास्त्र पटलं असलं तरी.. गड्या आपुला गाव बरा. 

गोवा भाग ३
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_2.html
गोवा भाग ४
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_3.html
गोवा भाग ५
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_4.
------------------------
गोवा भाग १
https://mohinimodak.blogspot.com/2019/01/blog-post.html 

Thursday, January 31, 2019

गोवा डायरी १

अकोला स्टेशनवर साडेआठला सगळ्या जमलो तेव्हा गोव्याला एकत्र धमाल करण्य़ाच्या कल्पनेने आम्हा मैत्रिणींचे आणि बायका गावाला जात असल्याने मिळणार्‍या मोकळीकीच्या कल्पनेने आमच्या नवर्‍यांचे डोळे आनंदातिशयाने चमकत होते.
गाडी रात्री ११ वाजता अकोल्याहून भुसावळला पोचली. गोव्याला विमानाने जायचे तर आधी रेल्वेने नागपूर किंवा मुंबईला जाणे, मधली अंतरे, तिथे अगोदर चेकइन वगैरे बघता फार तर एखादा दिवस वाचला असता. त्यामुळे तो बेत रहित केला होता. आम्हा दहा जणींना आता भुसावळ रेल्वेस्टेशनवर महिला प्रतीक्षालयात तीन तास काढायचे होते, पण आरतीने निगुतीने आणलेलं वाफाळतं मसाला दूध पीत आणि dumb charades खेळत वेळ केव्हा गेला कळलंच नाही. झोपेने तारवटलेल्या डोळ्यांनी जांभया आवरत तिथे टेकलेल्या तीन-चार बायकांचीही आमचे हातवारे पाहत बसल्याने झकास करमणूक झाली. बाजूला एक आडदांड महिला पोलीस फोनवर कुजबूजत अखंड बोलत होती. ’अग बाई, चार्जिंग सुरू असताना बोलू नये’ असं तिला सांगावसं वाटलं पण केस अवघड होती. तिचा आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. फोन हातातून काढला असता तर बहुतेक तिने जागीच प्राण सोडला असता.
तिचा नाद सोडून पत्ते विकत आणायला म्हणून मी आणि भाग्यश्री बाहेर पडलो. खाण्यापिण्याचे स्टॉल्स फक्त सुरू होते. वडा, दोसा, ऑमलेटचे संमिश्र वास येत होते. मग जाणवलं की रात्री १२ वाजता स्टेशनवर फिरणार्‍या आम्हा दोघींकडे लागलेल्या नजरा जरा विचित्र होत्या. नुकत्याच केलेल्या नाशिक प्रवासाची मला आठवण झाली. एकटीने परत येत होते आणि रात्री साडे १२ची गाडी. गाडी येत असल्याची सूचना ऐकून मी अपेक्षित प्लॅटफॉर्मवर अपेक्षित बोगीसमोरच्या एका पारावर घाईने येऊन बसले. तिथे फारसा उजेड नव्हता. अचानक लक्षात आलं, आजूबाजूला पन्नास एक मजूर कांबळं पांघरून कुठल्याशा गाडीची वाट पाहत उकिडवे बसलेत. क्षणभर माझा श्वासच अडकला. माझी गाडी येईपर्यंत ते १००एक डोळे आपल्यावरच रोखलेले आहेत याचा ताण न घेता बसणे म्हणजे परिक्षाच होती. त्या नजरा विचित्र होत्या हे खरं कारण त्यांच्यात बायका एकटीने फिरत नाहीत पण त्या वाईटच असतील असं का गृहीत धरावं, असा विचार करत अखेर मी शांत बसले होते. असो.
तर मंगला एक्सप्रेसची घोषणा झाली आणि सगळ्य़ा जणी लगबगीने उठल्या. बहुतेक जणी आपल्या कुटुंबासह गोव्याला एकदा तरी जाऊन आलेल्या, काही जणींचे देशभर, काहींचे परदेश प्रवास देखील झालेले पण फक्त मैत्रिणींसह स्वत: आखलेल्या या गोवा प्रवासासाठी सगळ्या प्रचंड उत्सुक होत्या. बायको बालवाडीत असल्यासारख्या नवर्‍यांच्या सूचना, मुलांच्या मागण्या, अमुक घेतलं का, आता तमुक कशाला घेतलं, वगैरे प्रतिक्रियांविरहीत अशी ही निवांत, मनमुक्त,स्वनियोजित ट्रीप असणार होती. रेसॉर्ट आणि दुचाकी, चारचाकी वाहनांचं मात्र बुकिंग करून घेतलं होतं. बुकीच्या सहाय्याने आराखडा ठरवून घेतला होता. पण आमच्या सोबत इतर कुणीही असणार नव्हतं.आपल्या जबाबदारीवर प्रवास करण्य़ात, अकल्पित प्रसंगांना सामोरे जाण्य़ातली गंमत मला नेहमीच आवडते. ’निरगाठी’ मध्ये गौरी देशपांडे लिहितात नं, ’मुलींनो सावध असा पण इतकेही जपू नका की अनुभव तुमच्या कुंपणांना घाबरुन पाठ फिरवून निघून जातील’.

प्रचंड थंडीमुळे प्रत्येकीने सगळं अंग कपडयात गुंडाळलेलं पण तरीही या हौशी गाठोड्यांनी ’निघतानाचा’ फोटो काढलाच. मंगलाताई वेळेवर आल्याने सुरुवात तर छान झाली. आपापल्या बर्थवर पथारी पसरुन सगळ्य़ा गुडूप झोपल्या. नाशिकला शीतल जॉईन झाली. तिला एकटीलाच वेगळ्य़ा बोगीचे तिकिट मिळाल्याने चिंता वाटत होती. त्यावर, इकडचा एखादा बुवा गोड हसून तिकडे पाठवायचा, त्यात काय, वगैरे आमचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलणे झाले होते. ’बुवा पटेल का’ या तिच्या प्रश्नावर ’इतक्या बायका गोड हसल्यावरही पटणार नाही असा बुवा अजून जन्माला यायचा आहे’ वगैरे सांगून आम्ही तिला धीर दिला होता :-) पण मुदलात पहाटे पाच वाजताच्या झोपाळू अवतारात एक तर गोड हसता येत नाही आणि अगदी ऐश्वर्या हसली तरी साखरझोपेतून उठून कोण बुवा तिकडे जाणार हे लक्षात घेऊन ती बापडी तिकडेच झोपली. सकाळी ग्रुपवर चर्चा करुन मग सामानासह ’मोठया घरी’ आली. ९ ला पनवेलला अंजू जॉईन झाली आणि कोरम पूर्ण झाला. गरमागरम वडापाव घेऊन अश्विनीची नणंद तिथे हजर होती. तसंही झोपेतून उठल्यापासून आमचं चरणं सुरूच होतं. एसीच्या दुधाळ खिडकीतून बाहेरचा रम्य निसर्गबिसर्ग फार नीट दिसत नव्हता. दुपारी जेवताना मेथीचे जगातले बहुतेक प्रकार खाऊन झाले. सगळ्य़ा सुगरणींनी इतके प्रकार आणले होते की खाण्य़ापेक्षा, आपलं यातलं काही खायचं सुटलं तर नाही ना हे शोधण्यात जास्त वेळ जात होता. पत्ते नेहमीप्रमाणे रंगले. फार हुशारी वगैरे वापरुन जजमेंट खेळून झाल्यावर कळले की बरेच पत्ते खाली पडलेले होते. मी आणि पल्लवी ३०४ चे नियम चिकाटीने समजावून, दोघीदोघींची मानगूट पकडून दोन चार देवाचे डाव खेळलो पण मेथीच्या अतिसेवनामुळे जडावलेल्या मेंदूंना बदामसत्तीपलिकडे फार काही झेपेना. पत्ते, गप्पा, गाणी आणि वाम तसेच दक्षिणकुक्षीमध्ये हा दीर्घ प्रवास केव्हाच संपला आणि थिविम (किहिम नही रे मीनल थिविम, थिविम) स्टेशनला काफिला अखेर उतरला.

प्रशस्त पार्किंगमध्य,  पिकअपसाठी आलेल्या गाडीवाल्याशी थोडा वेळ लपाछपी खेळून झाल्यावर ’काळा गुलाब’ वगैरे कोडवर्ड ठरवलेला नसतानाही एकदाची आमची-त्याची ओळख पटली आणि आम्ही हुश्श करून कँडोलिममधल्या आमच्या सँटारिटा रेसॉर्टकडे वेगाने निघालो.
आपापल्या घरी सुखरूप पोचल्याचं कळवून होताच बाहेरच्या गोव्याकडे लक्ष गेलं. स्वच्छ रस्ते, टुमदार घरं, अधूनमधून दिसणारी चर्चेस, देवळांच्या आवारातल्या दीपमाळा, माडाची डौलदार झाडं, नीटनेटक्या अंगणांतली सुंदर फुलझाडं, दिवाळी असावी तशी अनेक घरांवरची, उपहारगृहांची नेत्रदीपक रोषणाई आणि वातावरणात भरून राहिलेली उत्फुल्लता. कोकण आणि गोव्यातला हा महत्वाचा फरक. दोन्ही ठिकाणी निसर्गसौंदर्यांची लयलूट सारखीच पण कोकणातली संध्याकाळ मला कायम उदास वाटत आलेली आहे. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसतशी तिथल्या वातावरणात एक खिन्नता दाटून येऊ लागते. याउलट गोव्याची मदिर संध्याकाळ प्रचंड उर्जा घेऊन नाचतच येते. गाडी रेसॉर्टच्या जवळ आली तसतशी दुतर्फा गजबजलेली दुकानं दिसू लागली. दोन्ही बाजूंच्या रेस्टॉरंट्समध्ये निवांत बसलेली परदेशी मंडळी हुक्क्याचा, (अ)पेयांचा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होती. संगीत मोठयाने वाजत होतं. गाडी रेसॉर्टमध्ये शिरली. आम्हाला खाली एक आणि वर दोन खोल्या असा व्हिला मिळाला. त्या रेसॉर्टमधली व्हिलाजची रचना, पार्किंगमध्ये फुललेला डेरेदार चाफा, पोहोण्याचा निळाशार तलाव बघताना पहली नजरमें दिल गार्डन गार्डन हो गया. या सगळ्यामुळे आमच्या बुकीने म्हटलं होतं तशी सगळ्य़ांना एकदम ’गोवावाली फिलिंग’ आली होती.


गोवा भाग २
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post.html
गोवा भाग ३
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_2.html
गोवा भाग ४
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_3.html
गोवा भाग ५
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_4.html

Monday, November 19, 2018

सेल्फीश चक्रव्यूह !

३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी मागची मध्यमवर्गी पिढी. एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी. आजची नागरी पिढी नुसत्या डोळ्यांऐवजी मोबाईल कॅमेर्‍याच्या लेन्समधून दिसेल तेवढयाच जगाकडे बघणारी. बसता उठता चकचकीत सेल्फी काढणारी. क्लिक करो, पोस्ट करो, लाईक करो, भला उसके लाईक्स मेरे लाईक्स से जादा कैसे, फिर क्लिक करो... या चक्रात गुरफटलेली. पण कायम फिलिंग हॅपी विथ अमुकतमुक. 

याचा अर्थ मागची पिढी फार गुणी आणि आजची वाईट असा नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की अजून दहा वर्षांनी येत्या पिढीला हे सेल्फी प्रकरण अगदी जुनाट आणि बावळटपणाचं वाटू शकेल. आज मात्र सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी म्हणजे अर्थात स्वत:च स्वत:चा काढलेला फोटो. जवळ स्मार्ट्फोन असेल तर कुणाला ’फोटो काढून द्या ना हो’ म्हणत त्यांचा कॅमेरा सेट होईतो जबडा दुखेतो ’चीsssज’ करुन हसायची गरज नाही. तरुणाईला त्यांचं दैनंदिन जीवन सेल्फीमधून दाखवायला आवडतंय. ते आत्ता काय करतायत, कुठे आहेत, काय खातायत, काय अनुभवतायत हे सारं ते सेल्फीतून शेअर करतात तर मध्यमवयीन लोक फक्त विशेष प्रसंगी काहीशा ताणलेल्या, घाबर्‍या चेहर्‍याने सेल्फी काढतात. अनेकांना त्यासाठी कॅमेर्‍यात नेमके कुठे पाहावे ते कळत नाही. काहीही असलं तरी सेल्फी काढल्यावर त्यात स्वत:ला बघण्यातली मजा काही औरच. 

रॉबर्ट कॉर्नेलिस या अमेरिकन छायाचित्रकाराने १८३९ मध्ये एकदा तांत्रिक खटाटोप करुन स्वत:चा फोटो काढला होता. त्याला पहिला सेल्फी म्हणता येईल. १९९० मध्ये कोडॅक कंपनीने स्वप्रतिमा घेता येईल असा एक कॅमेरा बाजारात आणला. २००२ मध्ये ’सेल्फी’ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंटरनेट फोरमवरच्या एका पोस्टमध्ये पहिल्यांदा वापरण्य़ात आला. २००३ मध्ये पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेर्‍यासह म्हणजेच सेल्फी सुविधेसह सोनी एरिक्सनचा पहिला मोबाईल फोन बाजारात आला. २०११ मध्ये चर्चेत आलेल्या ’इन्स्टाग्राम’ या सोशल मिडीयामुळे सेल्फीला हवे तसे इफेक्ट देऊन ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’ करण्य़ाची सोय झाली. २०१२ मध्ये वापरातला हा सर्वात लोकप्रिय शब्द असल्याची नोंद टाईम मॅगॅझिनने घेतली होती तर २०१३ मध्ये या शब्दाचा थेट ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्य़ात आला. सेल्फीची लोकप्रियता इथेच न थांबता पार अंतराळात जाऊन पोचलीय. रोव्हर यान मंगळावर गेले तेव्हा त्यातील अंतराळवीरांच्या सेल्फी नासाने प्रसिद्ध केल्या होत्या. 

मनात येईल तेव्हा, हवा तसा स्वत:चा फोटो घेता येणं आणि इंटरनेटद्वारे लगेच तो शेअर करता येणं हे सेल्फीचं वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात १३ ऑस्कर सेलेब्रेटींनी काढलेला ग्रुप सेल्फी शब्दश: वार्‍याच्या वेगाने शेअर झाला. कार्यक्रम संपायच्या आत त्याच्या रिट्विटच्या संख्येने बराक ओबामांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर काढलेल्या सेल्फीच्या रिट्वीट्सचा विक्रम मोडला होता. भारताचे पंतप्रधान मोदी असोत किंवा स्वीस, पोर्तुगालचे अध्यक्ष, सेल्फीचा अचूक उपयोग राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमानिर्मितीसाठी करुन घेणारे अनेक जण दिसतात. ग्रुप सेल्फी किंवा ग्रुफी हे सेल्फीचं इतरांनाही सामावून घेणारं बहिर्मुख रुप.

सेल्फीचा मोह आवरणं सगळ्य़ांनाच अवघड. मुख्यमंत्र्यांची पत्नीही त्याला अपवाद नाही. नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई-गोवा क्रुजवर त्यांनी सेल्फी काढले. यावरील विरोधकांच्या टीकेला ’आता आमचं वयच सेल्फी काढण्याचे आहे, मग त्यात गैर काय? माझ्या पत्नीने एक व्यक्ती म्हणून काय करायचे हे मी ठरवत नाही’ असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. यादृष्टीने महिलांच्या बाबतीत विचार केला तर एक चांगलं स्थित्यंतर लक्षात येतं. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. अर्थात या फोटोंच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणार्‍यांचं प्रमाण फारच कमी त्यामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढलंय हे ही खरं. 

सुरुवातीला स्वत:ला फोटोत निरखून पाहण्याचं नैसर्गिक कुतूहल मग छंद आणि मग वेड हे टप्पे वेगाने पार करत ’सेल्फीग्रस्त’ झालेले अनेक जण सभोवताली दिसू लागलेत. जगाला दाखवण्य़ालायक आपल्याजवळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपला मुखडा असं कित्येकांना वाटू लागलं आहे. स्वकेंद्रित जगणार्‍या, आत्मविश्वासाचा अभाव असल्याने सतत लक्ष वेधून घेण्याची वृत्ती असलेल्या लोकांना सारखे सेल्फी पोस्ट करावेसे वाटतात असं मनोविश्लेषक म्हणतात परंतु सतत फोटो पोस्ट केल्याने प्रतिमा खालावते असा निष्कर्ष फेसबुकने एका पाहणीत काढला आहे. समाजशास्त्रज्ञ प्रा. गेल डाईन यांच्या मते स्वत:हून वारंवार सेल्फी पोस्ट करणार्‍या बहुतेक स्त्रिया, पुरुषांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने सेल्फी घेतात. त्यांच्या मते सेल्फीचे वाढते वेड हे पॉर्न संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्याचे द्योतक आहे.
मुलांचं अतिरेकी सेल्फीप्रेम हे कित्येक पालकांच्या काळजीचा विषय ठरलं आहे. हे लिहितानाच बातमी वाचतेय, सिंहगडावर फिरण्यासाठी आलेला तरुण कड्यावरून सेल्फी काढण्याच्या उत्साहात अडीचशे फूट खोल दरीत कोसळला. १५ मार्च २०१४ रोजी चालत्या गाडीच्या टपावर सेल्फी काढताना वीजेचा धक्का बसून मृत्यु झाल्याची पहिली नोंद आहे. त्यानंतर जगभरात आजवर किती जणांनी केवळ आपली छाप पडावी म्हणून ’हटके’ सेल्फी काढताना जीव गमावले याची गणती नाही. दुसरीकडे, समोर कुणीतरी बुडतो आहे तेव्हा त्याला वाचवायचं सोडून हे रोमहर्षक(!) दृश्य स्वत:च्या छबीसह कॅमेर्‍यात टिपण्याची विचित्र वृत्ती वाढते आहे. 

सेल्फी ही गंमत आहे, सुविधा आहे, एक झकास तंत्र आहे, आयुष्य नाही हे भान त्यासाठी येणं गरजेचं आहे. प्रथमपुरुषी, ’मी’ ला गोंजारणारी कोणतीही गोष्ट आपल्याला आवडते. त्यापलिकडे जाऊन ’मी’ चा परिघ रुंदावणारा, एखादा प्रश्न सूचकतेने मांडणारी पार्श्वभूमी असलेला, कलात्मकता दाखवणारा सेल्फी सुद्धा काढता येईल की. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife सारख्या टॅगचा वापर करुन आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य सेल्फीद्वारे शेअर करण्याचं आवाहन नुकतच एका फोनकंपनीने केलंय. फोटो सजवणारे अ‍ॅप डिलिट करुन स्वत:ला आहोत तसं स्वीकारुन सोशल मिडीयावर असं निखळ आणि निर्भेळपणे वावरता आलं तर तो खरा सेल्फी. आतला सेल्फी. आपला सेल्फी.

 नार्सिसस नावाचा एक रुपवान शिकारी होता. त्याने म्हणे एका तळ्य़ात आपले प्रतिबिंब पाहिले. आपल्या रुपावरच्या अतिरेकी प्रेमामुळे त्याची नजर अगदी जीव जाईतो त्यावर खिळून राहिली. तहानभूक हरपून आपल्या प्रतिमेकडे एकटक पाहणार्‍या नार्सिससचं शरीर नष्ट होऊन पुढे त्याजागी एक फूल उमललं. हा नार्सिसस ग्रीक लोककथेतला पण आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात एक नार्सिसस दडलेला असतो. त्याच्यावर ताबा मिळवण्य़ाचा प्रवास म्हणजेच जगणं. या प्रवासात स्वत:च्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही, त्यातच गुंतून राहणं मात्र चूक आहे. तेव्हा आपल्या आतल्या नार्सिसस उर्फ कौतुकराव किंवा कौतिकाबाईंना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला तर ’पाऊट’ न करताही आपला सेल्फी नि:संशय देखणा निघेल.