Monday, November 19, 2018

सेल्फीश चक्रव्यूह !

३६ फोटोंचा रोल पुरवून पुरवून वापरणारी मागची मध्यमवर्गी पिढी. एडिट करायची सोय नसल्याने, बरेवाईट आलेले फोटो तसेच अल्बममध्ये लावून अधूनमधून पाहत स्मरणरंजन करणारी. आजची नागरी पिढी नुसत्या डोळ्यांऐवजी मोबाईल कॅमेर्‍याच्या लेन्समधून दिसेल तेवढयाच जगाकडे बघणारी. बसता उठता चकचकीत सेल्फी काढणारी. क्लिक करो, पोस्ट करो, लाईक करो, भला उसके लाईक्स मेरे लाईक्स से जादा कैसे, फिर क्लिक करो... या चक्रात गुरफटलेली. पण कायम फिलिंग हॅपी विथ अमुकतमुक. 

याचा अर्थ मागची पिढी फार गुणी आणि आजची वाईट असा नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलतंय की अजून दहा वर्षांनी येत्या पिढीला हे सेल्फी प्रकरण अगदी जुनाट आणि बावळटपणाचं वाटू शकेल. आज मात्र सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी म्हणजे अर्थात स्वत:च स्वत:चा काढलेला फोटो. जवळ स्मार्ट्फोन असेल तर कुणाला ’फोटो काढून द्या ना हो’ म्हणत त्यांचा कॅमेरा सेट होईतो जबडा दुखेतो ’चीsssज’ करुन हसायची गरज नाही. तरुणाईला त्यांचं दैनंदिन जीवन सेल्फीमधून दाखवायला आवडतंय. ते आत्ता काय करतायत, कुठे आहेत, काय खातायत, काय अनुभवतायत हे सारं ते सेल्फीतून शेअर करतात तर मध्यमवयीन लोक फक्त विशेष प्रसंगी काहीशा ताणलेल्या, घाबर्‍या चेहर्‍याने सेल्फी काढतात. अनेकांना त्यासाठी कॅमेर्‍यात नेमके कुठे पाहावे ते कळत नाही. काहीही असलं तरी सेल्फी काढल्यावर त्यात स्वत:ला बघण्यातली मजा काही औरच. 

रॉबर्ट कॉर्नेलिस या अमेरिकन छायाचित्रकाराने १८३९ मध्ये एकदा तांत्रिक खटाटोप करुन स्वत:चा फोटो काढला होता. त्याला पहिला सेल्फी म्हणता येईल. १९९० मध्ये कोडॅक कंपनीने स्वप्रतिमा घेता येईल असा एक कॅमेरा बाजारात आणला. २००२ मध्ये ’सेल्फी’ हा शब्द ऑस्ट्रेलियन इंटरनेट फोरमवरच्या एका पोस्टमध्ये पहिल्यांदा वापरण्य़ात आला. २००३ मध्ये पुढच्या बाजूला असलेल्या कॅमेर्‍यासह म्हणजेच सेल्फी सुविधेसह सोनी एरिक्सनचा पहिला मोबाईल फोन बाजारात आला. २०११ मध्ये चर्चेत आलेल्या ’इन्स्टाग्राम’ या सोशल मिडीयामुळे सेल्फीला हवे तसे इफेक्ट देऊन ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’ करण्य़ाची सोय झाली. २०१२ मध्ये वापरातला हा सर्वात लोकप्रिय शब्द असल्याची नोंद टाईम मॅगॅझिनने घेतली होती तर २०१३ मध्ये या शब्दाचा थेट ऑक्सफर्ड शब्दकोशात समावेश करण्य़ात आला. सेल्फीची लोकप्रियता इथेच न थांबता पार अंतराळात जाऊन पोचलीय. रोव्हर यान मंगळावर गेले तेव्हा त्यातील अंतराळवीरांच्या सेल्फी नासाने प्रसिद्ध केल्या होत्या. 

मनात येईल तेव्हा, हवा तसा स्वत:चा फोटो घेता येणं आणि इंटरनेटद्वारे लगेच तो शेअर करता येणं हे सेल्फीचं वैशिष्ट्य. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात १३ ऑस्कर सेलेब्रेटींनी काढलेला ग्रुप सेल्फी शब्दश: वार्‍याच्या वेगाने शेअर झाला. कार्यक्रम संपायच्या आत त्याच्या रिट्विटच्या संख्येने बराक ओबामांनी अध्यक्षीय निवडणुकीतील विजयानंतर काढलेल्या सेल्फीच्या रिट्वीट्सचा विक्रम मोडला होता. भारताचे पंतप्रधान मोदी असोत किंवा स्वीस, पोर्तुगालचे अध्यक्ष, सेल्फीचा अचूक उपयोग राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमानिर्मितीसाठी करुन घेणारे अनेक जण दिसतात. ग्रुप सेल्फी किंवा ग्रुफी हे सेल्फीचं इतरांनाही सामावून घेणारं बहिर्मुख रुप.

सेल्फीचा मोह आवरणं सगळ्य़ांनाच अवघड. मुख्यमंत्र्यांची पत्नीही त्याला अपवाद नाही. नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई-गोवा क्रुजवर त्यांनी सेल्फी काढले. यावरील विरोधकांच्या टीकेला ’आता आमचं वयच सेल्फी काढण्याचे आहे, मग त्यात गैर काय? माझ्या पत्नीने एक व्यक्ती म्हणून काय करायचे हे मी ठरवत नाही’ असं प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. यादृष्टीने महिलांच्या बाबतीत विचार केला तर एक चांगलं स्थित्यंतर लक्षात येतं. तरुण वयात स्टुडिओत अवघडल्या अवस्थेत बसून किंवा अटेंशन पोझमध्ये उभं राहून फक्त ’दाखवण्यासाठी’ काढायच्या फोटोपासून, मुक्तपणे स्वत:च्या छबीतून स्वत:ला हवं तसं बिनधास्त व्यक्त करण्यापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही. अर्थात या फोटोंच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेणार्‍यांचं प्रमाण फारच कमी त्यामुळे सायबर गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाण वाढलंय हे ही खरं. 

सुरुवातीला स्वत:ला फोटोत निरखून पाहण्याचं नैसर्गिक कुतूहल मग छंद आणि मग वेड हे टप्पे वेगाने पार करत ’सेल्फीग्रस्त’ झालेले अनेक जण सभोवताली दिसू लागलेत. जगाला दाखवण्य़ालायक आपल्याजवळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपला मुखडा असं कित्येकांना वाटू लागलं आहे. स्वकेंद्रित जगणार्‍या, आत्मविश्वासाचा अभाव असल्याने सतत लक्ष वेधून घेण्याची वृत्ती असलेल्या लोकांना सारखे सेल्फी पोस्ट करावेसे वाटतात असं मनोविश्लेषक म्हणतात परंतु सतत फोटो पोस्ट केल्याने प्रतिमा खालावते असा निष्कर्ष फेसबुकने एका पाहणीत काढला आहे. समाजशास्त्रज्ञ प्रा. गेल डाईन यांच्या मते स्वत:हून वारंवार सेल्फी पोस्ट करणार्‍या बहुतेक स्त्रिया, पुरुषांना आकर्षक वाटेल अशा पद्धतीने सेल्फी घेतात. त्यांच्या मते सेल्फीचे वाढते वेड हे पॉर्न संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्याचे द्योतक आहे.
मुलांचं अतिरेकी सेल्फीप्रेम हे कित्येक पालकांच्या काळजीचा विषय ठरलं आहे. हे लिहितानाच बातमी वाचतेय, सिंहगडावर फिरण्यासाठी आलेला तरुण कड्यावरून सेल्फी काढण्याच्या उत्साहात अडीचशे फूट खोल दरीत कोसळला. १५ मार्च २०१४ रोजी चालत्या गाडीच्या टपावर सेल्फी काढताना वीजेचा धक्का बसून मृत्यु झाल्याची पहिली नोंद आहे. त्यानंतर जगभरात आजवर किती जणांनी केवळ आपली छाप पडावी म्हणून ’हटके’ सेल्फी काढताना जीव गमावले याची गणती नाही. दुसरीकडे, समोर कुणीतरी बुडतो आहे तेव्हा त्याला वाचवायचं सोडून हे रोमहर्षक(!) दृश्य स्वत:च्या छबीसह कॅमेर्‍यात टिपण्याची विचित्र वृत्ती वाढते आहे. 

सेल्फी ही गंमत आहे, सुविधा आहे, एक झकास तंत्र आहे, आयुष्य नाही हे भान त्यासाठी येणं गरजेचं आहे. प्रथमपुरुषी, ’मी’ ला गोंजारणारी कोणतीही गोष्ट आपल्याला आवडते. त्यापलिकडे जाऊन ’मी’ चा परिघ रुंदावणारा, एखादा प्रश्न सूचकतेने मांडणारी पार्श्वभूमी असलेला, कलात्मकता दाखवणारा सेल्फी सुद्धा काढता येईल की. स्वत:ला कायम कृत्रिम आणि आकर्षक पद्धतीनेच सादर करण्याचं दडपण न घेता #MeriRealLife सारख्या टॅगचा वापर करुन आपलं खरंखुरं, मुखवटेविरहीत आयुष्य सेल्फीद्वारे शेअर करण्याचं आवाहन नुकतच एका फोनकंपनीने केलंय. फोटो सजवणारे अ‍ॅप डिलिट करुन स्वत:ला आहोत तसं स्वीकारुन सोशल मिडीयावर असं निखळ आणि निर्भेळपणे वावरता आलं तर तो खरा सेल्फी. आतला सेल्फी. आपला सेल्फी.

 नार्सिसस नावाचा एक रुपवान शिकारी होता. त्याने म्हणे एका तळ्य़ात आपले प्रतिबिंब पाहिले. आपल्या रुपावरच्या अतिरेकी प्रेमामुळे त्याची नजर अगदी जीव जाईतो त्यावर खिळून राहिली. तहानभूक हरपून आपल्या प्रतिमेकडे एकटक पाहणार्‍या नार्सिससचं शरीर नष्ट होऊन पुढे त्याजागी एक फूल उमललं. हा नार्सिसस ग्रीक लोककथेतला पण आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात एक नार्सिसस दडलेला असतो. त्याच्यावर ताबा मिळवण्य़ाचा प्रवास म्हणजेच जगणं. या प्रवासात स्वत:च्या प्रेमात पडण्यात काही गैर नाही, त्यातच गुंतून राहणं मात्र चूक आहे. तेव्हा आपल्या आतल्या नार्सिसस उर्फ कौतुकराव किंवा कौतिकाबाईंना वेळीच बाहेरचा रस्ता दाखवला तर ’पाऊट’ न करताही आपला सेल्फी नि:संशय देखणा निघेल.

Monday, October 15, 2018

मी टू

#MeToo बाबत काही आक्षेप निदर्शनास आले. ’हे सगळं प्रसिद्धीसाठी’, ’आता दाद न देणार्या पुरुषांना आयुष्यातून उठवण्यासाठी’, ’आताच बरं ह्यांना हे आठवलं’, ’यातून काहीही निष्पन्न होणार नाहीये मग उगाच कशाला’, ’तक्रार करायची ना.. इथे लिहून काय उपयोग आहे’, ’हे पेज थ्री बायकांचं फॅड आहे’, तिथल्या तिथे कानफटात वाजवायची नंतर गळे काढण्यापेक्षा’, वगैरे वगैरे.
शोषितांमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे आणि बहुतेक आक्षेपही महिलांच्या बाबतीत आहेत म्हणून तूर्त फक्त महिलांबद्दल.. पण हे सर्व शोषितांना लागू व्हावं.
संमतीचे आणि लादलेले लैंगिक संबंध यातली सीमारेषा निश्चित करणे तसे अवघड आणि व्यक्तीसापेक्ष. A date went wrong असंही घडण्याची शक्यता असते.अशा वेळेस No हा एकमेव शब्द पुरेसा ठरायला हवा.

काही स्वार्थी, संधीसाधू बायका प्रसिद्धीसाठी किंवा सूड घेण्यासाठी असा आरोप करत असतील हे अगदी शक्य आहे. यात तथ्य आहे. पण
आपली समाजधारणा अशी काही आहे की यात त्या महिलेची आरोपीइतकीच किंबहुना जास्तच बदनामी होते. ती खरोखर पीडित असो वा नसो. हे माहित असताना केवळ प्रसिद्धीसाठी हा उद्योग करायला किती जणी धजावतील? त्यांचं प्रमाण नक्कीच अत्यंत कमी असेल. गुन्ह्यांच्या प्रोबॅबिलिटीचा विचार करता केवळ या कारणामुळे या चळवळीत सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीकडे शंकेने पाहणं अन्यायकारक ठरणार नाही का?
यात सगळ्य़ा आर्थिक उच्चवर्गीय महिला दिसतायत म्हणून ते फॅड ठरत नाही. सोशल मिडीयावर व्यक्त होण्य़ासाठी जुजबी तांत्रिक माहिती, भाषेचं ज्ञान आणि इंटरनेटची उपलब्धता असावी लागते. त्यामुळे तळागाळातल्या बायका तिथवर पोचून व्यक्त होऊ शकत नाहीत. याचा अर्थ त्यांना हे प्रश्न भेडसावत नाहीत असा होत नाही. उलट सामाजिक उतरंडीवर शेवटच्या स्तरावर असल्याने त्यांच्या समस्या याहून गंभीर असण्याची शक्यता जास्त आहे.
तिथल्या तिथे प्रत्युत्तर द्यायला, वाचा फोडायला लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच असं नाही. कालांतराने धीर एकवटता येऊ शकतो. जुन्या झाल्या म्हणून जखमा तशाच राहू द्यायच्या का? की तेव्हा प्रतिकार केला/करता आला नाही म्हणून आता त्याविरोधात बोलायची मुदत संपली? हे जर नकळत्या स्थितीत, बालपणी, अपंग व्यक्तिबाबत घडलं असेल तर विरोध नेमका कसा करणं अपेक्षित होतं? यातून काही निष्पन्न झालं नाही तरी आजवर कुढत राहिलेल्या कित्येक जणींना, नावानिशी/ निनावी व्यक्त होता आल्याने त्यांचं मन हलकं झालं असेल तर तो एक महत्वाचा मानसोपचार ठरेल. भूतकाळाची ओझी फेकून नव्याने जगण्याचा तो एक उमदा प्रयत्न ठरेल.
’हे जरा अती होतं आहे’ असं वाटणार्यांनी फक्त रोजच्या वर्तमानपत्राकडे नजर टाकावी. त्यातल्या बातम्यांमधील घटनांपेक्षा प्रत्यक्षात नोंदच न झालेल्या गुन्ह्यांची संख्या प्रचंड असते. तक्रार करायची, हा सल्ला तर्कसंगत असला तरी कितपत उपयोगी आहे हे कोर्टाची किंवा पोलिसस्टेशनची पायरी चढून पस्तावलेली कोणतीही व्यक्ति सांगेल. तरीही तक्रार करायला हवी परंतु तेवढे मनोबल आपली समाजरचना देते आहे का याचाही विचार व्हावा. एकच ताजे उदाहरण देते. परवा येथील एका कोचिंग क्लासच्या संचालकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केला. तिने हे मैत्रिणींना सांगितले तेव्हा त्यांनाही असाच अनुभव आल्याचे कळले. विद्यार्थिनीने पालकांसह पोलिस स्टॆशन गाठले. संचालकाच्या जातीतील वरिष्ठ लोकांनी चक्रे फिरवून पालकांवर दबाव आणला, मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हे त्यांच्या मनावर बिंबवले आणि पालक तक्रार न करताच घरी परतले.
मुळात हा पुरुषांविरुद्धचा लढा अजिबात नाही. बहुतेक स्त्रियांच्या प्रश्नांना पुरुषांनीच उत्तरं शोधली किंवा त्यासाठी पाठिंबा दिला आहे, असं इतिहास सांगतो. लैंगिक अत्याचाराविरोधात, अन्यायी, मग्रूर, लंपट वृत्तीच्या विरोधात हा शोषितांनी उठवलेला आवाज आहे. कर नसेल तिथे डर कशाला, ज्यांची नावे यात आली आहेत त्यांना त्यांची बाजू मांडण्य़ाची पूर्ण संधी मिळावी. तोवर त्यांच्याबद्दल अनुकूल किंवा प्रतिकूल ग्रह करुन घेणे तितकेच अन्यायकारक आहे. 

तरुण वयात मुलींना छेडणं हे समाजात चक्क नॉर्मल मानलं जातं. मित्रांमध्ये आपले पौरुष सिद्ध करण्याचा तो कित्येकांना सोपा मार्ग वाटतो. कालांतराने ते चूक होतं याची जाणीवही होते. दरम्यान काही गंभीर घटना घडली असेल आणि ती घडल्यानंतर त्याबद्दल पश्चाताप होत असेल तर शोषण करणार्यांनी क्षमा मागण्याचा मोठेपणा दाखवावा. करून सवरून संभावितासारखं वावरणाऱ्याना या घडामोडींमुळे चाप आणि धाक बसावा.
सर्वात महत्वाचं #MeToo उच्चारु देखील न शकणारे म्यूट झालेले अनेक आवाज सभोवती आहेत याचं भान यावं.
ज्यांना हे सगळं प्रकरणच निरर्थक वाटतं त्यांनी याकडे सरळ दुर्लक्ष करावं पण निदान कुचेष्टा करु नये.
ज्यांना यात तथ्य वाटतं त्यांनी आत्मपरिक्षण करावं.
ही चळवळ काही दिवसांनी कदाचित मंदावेल पण याद्वारे समाज निकोप होण्याकडे काही पावलं टाकत असेल तर त्यात शेवटी आपलं भलंच आहे.
यावर अनेक विनोद व्हायरल होत आहेत. एका मर्यादेपर्यंत सोशल मिडियावर पसरलेलं काहीसं नकारात्मक सावट कमी व्हायला यामुळे मदत होते आहे पण आपण जर स्वत:ला संवेदनशील समजत असू तर खरोखर जी व्यक्ति त्या वेदनांमधून गेली आहे तिचा अपमान होणार नाही, तिची खिल्ली उडवली जाणार नाही याची काळजी घ्यायला नको का!

Monday, October 1, 2018

हयवदन


परवा एक व्हिडिओ पाहिला. आईचा मृत्यु झाला आहे. नवजात बाळ रडतं आहे. त्याला शांत करण्य़ाचा बरेच जण प्रयत्न करतात पण बाळाचं आक्रंदन सुरुच आहे. इतक्यात एक पुरुष त्या बाळाला छातीशी धरतो आणि बाळ हळूहळू रडायचं थांबतं. खाली ओळ लिहुन येते की मरणापूर्वी बाळाच्या आईचं हृदय काढून त्याचं प्रत्यारोपण या पुरुषाच्या शरीरात करण्य़ात आलं आहे. मग प्रश्न आला की त्या आईची किंवा कोणत्याही माणसाची ओळख म्हणजे त्याचं हृदय/मन की मेंदू/बुद्धी ? बाळाने आईच्या हृदयाचे ठोके ओळखले असं म्हणावं तर बाळाला ही उमज त्याच्या मेंदूतल्या सूचनांमधूनच आली. हा व्हिडिऒ पाहून नुकतच पुन्हा वाचनात आलेलं ’हयवदन’ आठवलं कारण मेंदू (बुद्धी/विचार) सर्वात श्रेष्ठ आणि तीच माणसाची ओळख हेच हे नाटक सांगतं.

हे समजावं म्हणून यात वापरली गेलेली शरीर आणि मस्तक अदलाबदलीची कल्पना भन्नाट. ही कल्पना थॉमस मॅनच्या ’द ट्रान्स्पोज्ड हेड्स’ वरुन घेतल्याचे लेखक गिरिश कर्नाड यांनी स्वत:च स्पष्ट केलंय. देवीला झोप येणं, मेलेली माणसं जिवंत होणं, बाहुल्यांनी चर्चा करणं हे सगळं अनाकलनीय वाटतं पण हे अर्थातच रुपक आहे. रामायण, महाभारत या महाकाव्यात किंवा पुराणात अशा घटनांचा संदर्भ असलेल्या अनेक कथा आहेत. अगदी इसापनीती, वेताळ पंचविशीमध्ये, कितीतरी लोककथांमध्ये सुद्धा असं घडतं. चिरंतन प्रश्न मांडणार्‍या या बोधकथेमध्ये अशा मिथकांचा वापर केल्याने भारतीय परंपरेतली प्रतीकं नवनाट्याशी जोडण्याचा कर्नाडांचा प्रयोग वेगळा ठरतो. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा झाली असावी.

नाटकाच्या केंद्रस्थानी नेमकं काय आहे? अपूर्णतेचा शाप घेऊनच आपण जन्मतो. त्यावर मात करुन पूर्णत्वाचा धरलेला अंतहीन ध्यास म्हणजेच आपलं जगणं. या नाटकातल्या पद्मिनीला दोन्ही पुरूष आकर्षित करतात. एकाच्या रुपवान शरीरावर तर दुसर्‍याच्या तेजस्वी बुद्धीवर ती भाळते. मस्तक आणि धड यांची अदलाबदल झाल्यावर तर तिला देवदत्तची बुद्धी आणि कपिलचं देखणं शरीर असा पूर्ण पुरुष लाभतो. परंतु आता कपिलचं शरीर देवदत्तच्या बुद्धीनुसार वर्तन करतं, त्याचा कणखरपणा, चपळाई, क्षमता कमी होऊ लागतात. थोडक्यात अपूर्णत्व कायम राहतं. काहीही मिळालं,तरी काहीतरी ’मिसिंग’ असतंच. अगदी ’दिंड्या पताकांनी, दुमदुमली पंढरी, तरी मी श्रीहरी, कासावीस’ ही अवस्था राहतेच. हा अंतर्विरोध, त्यातून निर्माण होणारी भावनिक आंदोलनं आणि कूटप्रश्न या नाटकात फार छान मांडले आहेत. मन आणि बुद्धीमधला अंतर्विरोध हा मुद्दा केवळ भारतीयांशी संबंधित नाही तर जागतिक आहे त्यामुळे या थिमवर लोकनाट्याचा बाज घेऊन सादर होणारं आणि नेपथ्य प्रकाशयोजनेचे अनोखे प्रयोग करणारं हे नाटक भारताबाहेर सुद्धा गाजलंय.

नाटक वाचलं, पाहिलं, समजून घेतलं तरी शेवटी प्रश्न उरतो की हे द्वंद्व आणि पूर्णत्वाचा शोध कधी संपणार की नाही. याचं उत्तर ईशावास्योपनिषदातल्या ’ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते! पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाविशिष्यते!’ या ओळीतच आहे. परंतु अपूर्णत्वातलं पूर्णत्व समजणं सोपं आहे, सापडणं कठीण.