Friday, July 6, 2018

रणांगण

 ’रणांगण’ वाचताना असे वाटू लागते जणू आपण ’नो मॅन्स लँड’वर (म्हणजे दोन देशांच्यामधली अशी जागा ज्यावर कोणत्याच देशाचा हक्क नाही) उभे आहोत. त्यातली ’राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याची चिकित्सा आपल्याला हादरवून सोडते. रोकडे सवाल करते. मराठी साहित्याचा मानदंड मानली गेलेली, विश्राम बेडेकरांनी लिहिलेली ही (एकमेव) कादंबरी.

वैश्विक पटावरुन राष्ट्रीयत्वाकडे, माणसाच्या मनोव्यापारांकडे, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची प्रगल्भ नजर देणारी त्याचबरोबर आपल्या वैचारिक खुजेपणाची जाणीव करुन देणारी. "समुद्र जमिनीच्या कुशीत शिरत होता, बोट जवळ जाऊ लागली तसतसे तिच्यावर दीपमाळेचे रोमांच उभे राहू लागले.." यासारख्या त्यातल्या शब्दप्रतिमा थक्क करतात. केवळ सव्वाशे पानांची कादंबरी त्यातल्या आशयामुळे आणि बेडेकरांच्या चित्रमय लेखनशैलीमुळे आपल्याला झपाटून टाकते.

’रणांगण’ १९३० च्या सुमारास घडते. पहिल्या महायुद्धाचे सावट आणि दुसर्‍या महायुद्धाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर ही कथा साकारली आहे. कथानायक चक्रधर इंग्लंडहून मुंबईमार्गे शांघायला जाणार्‍या बोटीवर जर्मन ज्यू असलेल्या हॅर्टाला भेटतो. दोघे प्रेमात पडतात. भारत ब्रिटिश अंमलाखाली असल्याने चक्रधर ब्रिटिश पारपत्र बाळगणारा तर हॅर्टा स्वदेशातून हद्दपार करण्यात आलेली. इंग्लंड-जर्मनी द्वेषभावनेमुळे तिला मुंबईतच नव्हे तर पॅलेस्टाईनला उतरण्याचीही परवानगी नसते. प्रेमाची परिणीती लग्नात होणे शक्य नाही याची जाणीव असलेल्या हॅर्टाला, बोटीवरचा प्रत्येक क्षण चक्रधरसह उपभोगायचा असतो. त्यात समर्पणाचा निस्संकोच आवेगही असतो. चक्रधर म्हणजेच तिचा ’बॉब’, मुंबईला उतरुन गेल्यावर विरहवेदनेने वैफल्यग्रस्त झालेली हॅर्टा अखेर आयुष्य संपवते.

परंतु ही कादंबरी केवळ या दोघांची अयशस्वी प्रेमकथा नाही. यात कातडीच्या रंगभेदाचे अडसर ओलांडून बोटीवरच्या सर्वांना लळा लावणा‍‍र्‍या चिमुकल्या लुईसारखी इतर पात्रे देखील आहेत. विवाह हाच प्रेमाचा चरमबिंदू आणि अंतिम ध्येय मानावे का? विश्व व्यापून उरणार्‍या प्रेमाला अशा मर्यादा घालता येतात? माणसाने कोणत्या सीमारेषा महत्वाच्या मानाव्यात? नैतिकतेच्या ? मग ती नीतीमूल्यं नेमकी कोणी, कोणत्या देशाने, कोणत्या धर्माने ठरवलेली असावी? की राष्ट्रीयत्वाच्या? वेगवेगळया वंश-धर्मांचे आणि देशांचे लोकही या बोटीवर होते मग समुद्रावर तरंगणार्‍या विश्वाच्या या लघुरुपाला राष्ट्रीयत्वाचे नेमके कोणते निकष लागू होतात? महायुद्धांमुळे अवघ्या जगाचं रुपांतर एका रणांगणात होतं, त्यांच्या प्रभाव आणि परिणामांमुळे निर्माण होणार्‍या अशा अनेक प्रश्नांचं काहूर आणि भावनांचं रण आपल्या मनात माजतं.

सखेद आश्चर्य म्हणजे जागतिकीकरणानंतरचं आजचं जग आणि दोन महायुद्ध्यांच्या दरम्यानचं या कादंबरीतलं जग, दोहोंतल्या भावभावना, अस्मिता आजही तितक्याच टोकदार आहेत. चकित करणारे भौतिक बदल घडले पण माणूस म्हणून आपण कितपत प्रगत झालो याचे उत्तर शोधायला ही कादंबरी बाध्य करते. वाचताना मला नकळत जावेद अख्तर यांच्या या ओळी आठवल्या.
पंछी, नदीयाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके..
सरहदे इन्सानोंके लिए है, सोचो तुमने और मैने क्या पायाँ इन्साँ होके..



Friday, June 15, 2018

शशिकाका


शशिकाका

प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्‍या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.

८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.

पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.

रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.

 केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्‍या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.

मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्‍याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.

गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.

Friday, May 11, 2018

आंजर्ले

चोविशीपर्यंत माझा कोकणाशी अजिबातच संपर्क किंवा संबंध आलेला नव्हता. त्यामुळे कोकणविषयक माझ्या कल्पना अगदी पुस्तकी होत्या. लहानपणी त्या ’श्यामची आई’ पुस्तकात आलेल्या वर्णनावर आधारलेल्या होत्या. त्यात नंतर वाढत्या वयानुसार ’तुंबाडचे खोत’, गारंबीचा बापू', पुलंची ’म्हैस’ कथा आणि ’अंतू बर्वा’ या व्यक्तिचित्राची भर पडली. त्यामुळे कोकणात सगळी इरसाल माणसेच राहतात असे मनात पक्के बसलेले. प्रत्यक्ष पाहिल्यावर कळले की तो फक्त पुलंच्या शैलीचा प्रभाव होता. माणसे ही शेवटी सगळीकडे सारखीच असतात. निसर्गसुंदर परिसर, त्याचे वर्णन याबाबतीत मात्र  मनातले कोकण आणि नंतर प्रत्यक्ष पाहिलेले कोकण.. त्यात अर्थात नवर्‍याचे आजोळ, आंजर्लेही आलेच, यात अजिबात फरक नव्हता. विशेषत: उंचावरून दिसणारा आंजर्ल्याचा इंग्लीश C आकाराचा किनारा केवळ अद्भुत. आजच्या भाषेत, फेसबुकच्या कव्हर फोटोला शोभेल असा.


गावात मात्र आता थोडा फरक जाणवतो. तीन वर्षापूर्वीच्या आंजर्ले भेटीत वाढ्त्य़ा पर्यटनामुळे झालेले बदल प्रकर्षाने जाणवले. पहिल्या भेटीत अनुभवलेली दुपारची नीरव शांतता, इतकी नीरव की वाडीत एखादा नारळ पडला तरी आवाज यावा... आता गाड्यांच्या कचाकच दाबलेल्या ब्रेकच्या आवाजात नाहीशी झालेली होती. त्यातच शनिवार-रविवार जोडून आल्याने पर्यटकांची संख्या अजूनच जास्त असावी.

पहिल्यांदा आंजर्ल्याला आम्ही दोघच गेलो होतो. मामांचं टुमदार घर, लगतचं सुरेख प्रशस्त देवीचं देऊळ, आजूबाजूची गच्च झाडी हे सगळं पाहताना अप्रूप वाटलं. खान्देश आणि विदर्भात इतकी हिरवाई कधीच पाहायला मिळत नाही. कोकणी पदार्थांशी संबंध फक्त मिरगुंड आणि उकडीच्या मोदकांपुरता. त्यामुळे गुरगुट्या भात, त्यावर रवाळ तूप ,मेतकूट, पोह्याचा पापड अशी मामांच्या घरची पहिली कोकणी न्याहारी मला अजून आठवते. मी नवी सून असल्याने मामींवर छाप पाडण्य़ाच्या प्रयत्नात ’द्या, मी फणस चिरते’ म्हणाले खरी, पण ते चिकट खाजरे प्रकरण आपले काम नोहे हे मला लगेच लक्षात आलं. दुसरं काम खोबरे खवणे, तेही इवल्याशा विळीवर बसून सफाईने करणे मला जरा कठीणच वाटले. मामी मात्र हे अगदी सहज करत होत्या. खांदेशी तिखटाची जीभेला सवय, पण फारसे मसाले न वापरलेला त्यांचा कोकणी स्वैपाक अतिशय वेगळा पण रूचकर वाटला. डोंगरावरच्या आमराईतले आंबे, गरे, फणसपोळ्या, खांडवी यांच्या चवीबद्दल तर काय सांगाव!

मामांचं कौलारू घर, पडवीतला झोपाळा, माळा असलेली काहीशी अंधारी खोली, दोन पाख्यांची दारं.. सगळं पाहात मी कुतूहलाने वर चढून माळ्य़ावर डोकावून आले. प्रत्येक घराची स्वत:ची एक कहाणी असते.

आईंच्या तोंडून त्यांच्या आई, दादा, त्यांची आजी यांच्याबद्दल काही ना काही किस्से ऐकलेले.अतिशय कडक, संतापी स्वभावाचे दादा म्हणजे सासूबाईंचे वडील. मुलाबाळात राबून दमून गेलेली आणि घरच्या रामरगाडयात दुर्लक्ष झाल्याने डोळा गमावलेली त्यांची घाबर्‍याघुबर्‍या स्वभावाची आई. दूधदुभतं, पैपाहुणा बघणारी खमक्या स्वभावाची आजी  ही न पाहिलेली माणसे कशी असतील, ती तिथे कितीतरी वर्ष वावरली असतील असे काही काही विचार मनात आले.

सासर्‍यांनी दादांच्या आणि एकूणच जावई भूमिकेतून पाहिलेल्या आंजर्ल्याच्या जुन्या म्हणजे तब्बल ४०-४५ वर्षांपूर्वीच्या कितीतरी धमाल आठवणी सांगितलेल्या. त्या त्यांच्याच शब्दात.
--------------------------------------------------
"कडयावरच्या गणपतीचे दर्शन झाले. मुरडीच्या बनूआत्या पेंडसेंकडे जाऊन झाले की नंतर मात्र पुढे ओसरीत बाकड्य़ावर बसून झोपाळ्य़ावर झोके घेत सुपारी कातरत असलेल्या दादांशी गप्पा मारणॆ हाच एकमेव कार्यक्रम असे. त्यातही अधूनमधून बर्‍यापैकी मनोरंजन होत असे. समोरच्या रस्त्यावरून येणारा जाणारा फक्त ’दादा हो ssss ’ म्हणून आवाज देणार आणि दादा त्याला प्रतिसाद म्हणून ’हो sss ’ असा आवाज देणार ही सहज संपर्काची प्रथा मला फार आवडली.
मधेच काही लोक विशेषत: कोळी, दादांना भविष्य विचारावयास येत असत. त्यावेळची प्रश्नोत्तरे तर फारच गमतीदार असत. दादांच्या ज्योतिषशास्त्राच्या ज्ञानाला अजिबात चॅलेंज न करता त्यांची क्षमा मागून खाली काही मासलेवाईक प्रश्नोत्तरे देत आहे.
प्र. १ चेडवाचे (मुलीचे) लग्नाकरता गेल्या सालपासून प्रयत्न चालू आहेत, कधी हुईल?
उत्तर - या वर्षी पण अजून ग्रह बराबर नाहीत, तरी देवीला नवस बोला आणि मजबूत प्रयत्न करा, पुढल्या वर्षीपर्यंत नक्की होईल.
प्र. २ समुद्रात होडी कधी टाकू ?
उत्तर - (पंचांगात बघून) अजून ४ दिवस थांब, ५ व्या दिवशी टाक ( दादा दापोलीच्या दैनिकातील हवामानाचा अंदाज न चुकता वाचत असत)
प्र. ३  हर्णेला आपलं स्वत:चं घर आहे, ,मालकीची होडी आहे हे समजावून सांगितलं तरी पोरगा ऐकत नाही. नोकरीच करायची म्हणतो. २ दिवस झाले रागावून घरातून निघून गेला, कुठे शोधावा.
उत्तर -  (पंचांगात बघून) उत्तर दिशेला शोध घ्या. (कोकणातला कोळी तरूण रागावून नोकरी शोधायला मुंबई शिवाय कुठे जाणार..)

एकदा यात्रेच्या वेळी आंजर्ल्याला होतो. गाव जेवणाचा मुख्य दिवस होता. मी ओसरीवर बसलो होतो. इतक्यात भाऊसाहेब टिळक छाप पुणेरी पगडी,धोतर, पायात पुणेरी जोडा, हातात काठी अशा थाटात आतून आले व मला बरोबर घेऊन समोरच्या घरात जेथे जेवणावळीचा स्वैपाक सुरू होता तेथे पोचले. तिथे ८-१० जण आपल्या कामात मग्न होते. ’काय सगळे व्यवस्थित सुरू आहे ना?’ असा टिळकछाप आवाजात प्रश्न विचारून २-४ मि. तिथे थांबून आम्ही परत आलो. 
नंतर असे कळले की त्यावेळी तसा प्रश्न करण्य़ाचा मान काळे घराण्यातील पुरूषाला आहे. परंतु या प्रश्नाला उत्तर देण्य़ाचा किंवा प्रश्नकर्त्याकडे किमान पाहण्याचा मान तिथल्या कुणाला नसावा याची गंमत वाटली. यात्रेत असेच काही गमतीदार मान पाहवयास मिळाले. 

एका दिवाळीत दादांच्या एकसष्टीनिमित्त सगळी मुलं, सुना, लेकी, जावई एकत्र जमले होते. पहिल्याच दिवशी अभ्यंग स्नान, फराळ झाल्यानंतर आम्ही पाचही जावई व मेहुणे भाऊसाहेबासह वर्तमान तरी बंदरावर फिरावयास गेलो. तिथे सगळ्य़ांनी किमाम युक्त पान खाल्ले आणि ते भाऊ काळेंना इतके लागले की ते खोकून खोकून बेजार झाले. तशातच किमाम पानाची नशा चढल्याचे सोंग सगळ्य़ांनी करावयाचे ठरले. (चरस हेरॉइनच्या आताच्या जमान्यात किमामची नशा हा टिंगलीचा विषय व्हावा) 
ठरल्याप्रमाणॆ घरी येता येता सर्वांचा नाट्यप्रयोग सुरू झाला. भाऊसाहेबांना पानाचा खरोखर त्रास होतच होता त्यामुळॆ त्यांना अभिनयाची गरज नव्हती. बापू जोशी अतिउत्साहात अतिरंजित अभिनय करत होते. भाऊ ओक कसलेले नाट्यकलावंत त्यामुळे त्यांच्या अभिनयाविषयी बोलायलाच नको. अण्णा रानडे पूर्णपणे फितूर झाले होते. नशाखोरीचे नाटक ही त्यांना पापाची भावना वाटत होती. त्यामुळे ते हळूच त्यांच्या बायकोला खूण करून हे खोटे खोटे चालल्याचे दर्शवत होते. मी आणि पटवर्धन किमामच काय पण तंबाखूचे पान देखील अधूनमधून खात असू. त्यामुळे किमामच्या नशेचा नेमका काय अभिनय करावा अशा गोंधळलेल्या अवस्थेत जसे सुचेल तसे करत होतो. अशा रितीने काळ्यांच्या घरात काही वेळ का होईना पण नुसता गोंधळ उडाला होता. समस्त महिला वर्ग तर भयंकर संतापलेला होता. आपल्या माहेरी जावयांनी सगळी इज्जत घालवली या जाणीवेतून त्या नवर्‍याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होत्या. 
दादाही काही वेळ हा सर्व प्रकार बघून गोंधळले होते पण लवकरच खरे काय ते त्यांच्या लक्षात आले. त्यांनी सासूबाईंना आदेश दिला "सगळेजण उन्हातून आले आहेत, छानसे थंडगार लिंबू सरबत द्या सगळ्यांना" आम्हालाही हा ईलाज मनापासून आवडला. पुढील दहा मिनीटात सरबत पोटात जाताच पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही नाटक संपविले.
पण आमच्यापेक्षाही महिलावर्गाचे संतापण्य़ाचे नाटक जास्त चांगले झाले होते असे माझे आजही मत आहे. असो.

असाच स्मरणशक्तीला आणखी ताण दिल्यास अजून काही घटना आठवतीलही. पण सर्व आठवणी सांगायच्या नसतात. काही तर आवर्जून विसरायच्याच असतात. :-)
------------------------------------------------------------
हं, तर मी मामांच्या घराबद्दल सांगत होते. मामांच्या घरा समोरचं घर पण अतिशय देखणं.. ’कोकण’ हा शब्द उच्चारून डोळे मिटले, तर जसं घर डोळ्यासमोर उभं राहील, अगदी तसं. मला चित्रं बरी काढता येतात. मला या घराचं, रस्त्याचं चित्र काढायचंय म्हटल्यावर नवर्‍याने धावत जाऊन माझ्यासाठी ताबडतोब स्केच बुक, पेन्सील वगैरे आणून दिली होती. अर्थात ते सुरूवातीच्या दिवसातच वाट्य़ाला येणारं कौतुक होतं हे मला लवकरच कळून चुकलं. नंतरच्या आंजर्ले भेटीत जुळ्य़ांना सांभाळण्य़ाच्या गोंधळात निसर्गाबिसर्गाचे चित्रातून कौतुक करायच्या मनस्थितीत मी (आणि माझे कौतुक करायच्या मनस्थितीत नवरा) मुळीच नव्हते, असो.

घर बघून मग आम्ही मागच्या वाडीत गेलो. वाडी हे प्रकरण पण मी तेव्हा पहिल्यांदाच पाहिले. उंचच उंच नारळ सुपारीच्या झाडांमधून सोनेरी प्रकाशाच्या तिरीप येत होत्या. गच्च भरलेली अशी हिरवीगार वाडी, त्यात खेळवायच्या पाण्य़ाच्या पाईपची मोठी धार, अधूनमधून फुलझाडं ..बघावं तिथे हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्य़ा छटा.. मन ’निवणं’ म्हणजे काय हे तिथे कळले. वाडी संपते न संपते तोच समुद्राची गाज जोरात ऐकू यायला लागली. नजर जाईल तिथवर पसरलेला चंदेरी चमचमता समुद्र. चक्क घराला अटॅच्ड समुद्र !!! याहून वेगळं सुख ते काय! त्यानंतरची आंजर्ला भेट मुलांसह, तेव्हा सर्वात आवडलेले आणि नव्याने जाणवलेले दृश्य म्हणजे ’टेकडी गणपती’च्या स्पॉटवरून खाली दिसणारा निळाशार समुद्राचा तुकडा.. त्यातल्या नावा.. आणि तशाच छटांचं आभाळ. गाडीने तिथून खाली उतरताना निथळत्या पावसात पाहिलेली इरली घेतलेली तुरूतुरू चालणारी सडसडीत कामसू माणसं. दुसर्‍या दिवशी सकाळी मुलांना दचकून जाग आली ती देवीच्या देवळात वाजू लागलेल्या नगार्‍याने. हे सगळं त्यांच्यासाठी खूप वेगळं होतं. ’गणपतीचं पाऊल’ आणि त्यांच्या आजीची ’खांबेटे शाळा’ पाहताना मुलांना गंमत वाटली. रात्रीच्या वेळी काहीशी गूढ वाटणारी वाडी. ’रात्रीचं तिकडे जाऊ नका’ असं मामांनी बजावल्याने तरीकडच्या रस्त्यावर आम्ही जेवणं आटोपून टॉर्च घेऊन चक्कर मारायला गेलो, वीज गेली असावी. जनावराची थोडी भीती मनात होती. तेव्हा बाहेरून साधारण सारखीच दिसणारी माडात दडलेली कौलारू घरं, त्यात लुकलुकणारे कंदील आणि बहुतेक घरांच्या पडवीत बसलेली वयस्कर जोडपी. कोकणचं ते वास्तव.. आता पर्यटनामुळे वाढलेल्या संधी बघता थोडंफार बदलायला लागलंय.

शेवटची आंजर्ला भेट आठवते तेव्हा आम्ही शब्दश: तिन्हीत्रिकाळ समुद्रावर जात होतो. पहाटे लवकर उठून पाहिलेला कोवळ्य़ा किरणांमधला सतेज समुद्र, उन्ह वाढ्त गेल्यावरचा लखलखणारा, डोळे दिपवणारा समुद्र आणि मावळतीच्या वेळचा मंद चमकणारा समुद्र.. प्रत्येक वेळी निराळा भासणारा.  हर्णे वरून पुढे जाताना तो चमचमता समुद्र आणि कोळ्य़ांनी जमा केलेले माशांचे रूपेरी चकाकते ढीग आणि केळशीकडे जाताना गाडी बराच वेळ समुद्राला समांतर जात असते ते  दृश्य तर मला नेहमीच आठवतं.


 नवर्‍याचं आजोळ कोकणात नसतं तर कधीतरी फिरायला म्हणून कोकणात नक्की गेलो असतो पण त्या टूरीस्ट रिसॉर्टच्या आठवणींना नात्यांचा नैसर्गिक गंध लाभला नसता.