आंबा आणि आईस्क्रीम न आवडणारे काही लोक या भूतलावर आहेत, पण अमिताभ आवडत नाही असं म्हणणारं कुणी माझ्या तरी ऐकण्या-पाहाण्यात नाही. (असल्यास ईश्वर त्यांना माफ करो :-) ) अप्रतिम अभिनय, जबरदस्त संवादफेक, उत्तम विनोदबुद्धी, देखणी देहबोली, काळजात रुतणारा आवाज, वेधक ड्रेस सेन्स, भाषेची अचूक जाण, पडदा भारून टाकण्याची क्षमता या सगळ्यासाठी अमिताभ एक कलाकार म्हणून आवडतोच, पण त्याहीपेक्षा पडत्या काळात आरोप, टीका होत असताना- आर्थिक तणावातही परिपक्वतेने वागणं, पुन्हा यशाच्या शिखरावर पोचल्यावर माज न करणं, या गुणांमुळे विशेष आवडतो.
सिनेमा ही फक्त गोष्ट सांगण्याची कला आहे. अमिताभने फक्त ’मासेस’वर नाही तर ’क्लासेस’वरही राज्य केलं. व्यावसायिक सिनेमाबरोबरच अमिताभचे काही पठडीबाहेरचे सिनेमे आणि अलिकडच्या काळात केलेले भूमिकांचे कमाल प्रयोग मला थक्क करतात. कलात्मकतेच्या नावाखाली प्रेक्षकांना पडद्यावरच्या अंधाराकडे डोळे फाडून बघायला लावणार्या सिनेमांच्या तुलनेत अमिताभचे सिनेमे हटके असत. व्यावसायिकता आणि कला याचा त्याने नेहमीच सुरेख मेळ घातला. हॉलीवूडची भ्रष्ट नक्कल करणारा बॉलीवूड हा शब्द वापरणं बंद केलं, उलट देशी सिनेमालाच ग्लोबल केलं. मुलभूत सुविधांच्या अभावामुळे वैतागलेल्या सामान्य ’जन्ते’ला आणि संध्याकाळच्या भाकरीची खात्री नसलेल्या पिटातल्या पब्लीकला अपार आनंदाचे कितीतरी क्षण दिले. त्यांच्या मनातल्या खदखदीला ’अॅंग्री यंग मॅन’च्या भूमिकेतून आऊटलेट दिलं. काळाची पावलं ओळखून बदलत्या जगाशी कनेक्ट राखत पुढे चाललेला हा टेक्नोसॅव्ही ’बडी’ समाजमाध्यमांवरचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता न होता तरच नवल. कित्येक समीक्षक त्याला चांगला अभिनेता देखील मानत नाहीत पण याचा अर्थ ’मला अजून चांगलं काम करायला हवंय’ असं नम्रतेने म्हणायला जे विशाल मन हवं त्याचंही प्रत्यंतर अमिताभने अनेकदा दिलंय.
काही लोकांना त्यांचे सगळेच सिनेमे आवडले नसतील. खरंय, शोले, डॉन, दीवार ज्यांनी डोळे भरून पाहिला, त्यांना ’लाल बादशाह’ वगैरे कसा बघवणार पण दुसर्या इनिंगमध्ये पुन्हा उत्तम भूमिका करत त्याने अस्वस्थ झालेल्या रसिकांना नि:शंक केलं. त्याचे काही राजकीय लागेबांधे अनेकांना खटकले परंतु राजकीय चिखलफेकीत तो कधीच उतरला नाही. परिस्थिती पालटल्यावर मात्र त्याने स्वत:चंच एका ’प्रॉडक्ट’ मध्ये रुपांतर केलं. ’कुछ दिन तो गुजारिएँ गुजरात में’ पासून ’नवरत्न तेल’ पर्यंत यत्र तत्र सर्वत्र अमिताभ. काही जाहिराती बघताना आता त्याने थांबावं असंही वाटतं तोच त्या जाहिरातीची पंचलाईन तो अशी काही उच्चारतो की आपल्या चेहर्यावर पुन्हा स्मित येतंच.
कलाकार हा एक चांगला माणूस असला पाहिजे अशी अपेक्षा असली तरी ती काही अट नाही. अमिताभ माणूस म्हणून अनेक मूल्यांचा नुसता विचार करत नाही तर ते कृतीतही आणतो.
’केबीसी’ मध्ये हॉट सीटवर बसलेल्या रिक्षावाल्यापासून सेलेब्रिटी पर्यंत कुणालाही अवघडल्यासारखं वाटणार नाही असं त्याचं ’स्क्रिप्ट’च्या बाहेरचं सुसंस्कृत वागणं पाहिलं की इतरांना त्याची ’उंची’ का गाठता येत नाही ते सहज लक्षात येतं. रेखाविषयी कधीही जाहीर वाच्यता न करणं त्याच्या ’तहजीब’ला शोभतं. सार्वजनिक कार्यक्रमात दोघांची उपस्थिती असताना त्यांच्यावर फ्लॅश होणार्या कॅमेर्यांच्या सूचक नजरांनाही त्याने कधी खाद्य पुरवलं नाही. आई तेजी बच्चन यांच्यावर लिहीलेला ब्लॉग आणि नात काव्या नंदा हिला लिहिलेलं पत्रं हा माणूस स्त्रियांकडे कसं बघतो याची झलक दाखवतात. ते पत्र ’पिंक’ या सिनेमाच्या प्रमोशनचा भाग होता असंही म्हटलं जातं. असेना का, पण त्यातला आशय तर त्याच्या विचारांचाच आरसा आहे. त्याच्या ब्लॉगवरचे इतर लेख वाचले की हा आशय केवळ त्याच्या लेखणीतून उतरला आहे त्यासाठी त्याला भाडोत्री लेखणीची गरज नाही हे नक्कीच लक्षात येईल. या कवीपुत्रावर शब्द किती प्रसन्न आहेत याची त्या ब्लॉगवर, तो हरिवंशराय यांच्या कविता ज्या ताकदीने सादर करतो तेव्हा, कोणत्याही व्यासपीठावर चार शब्द बोलतो तेव्हा.. पदोपदी साक्ष पटते.
काही वेळेस सामाजिक प्रश्नांवर तो सावध भूमिका घेतो असाही आरोप होतो, तेव्हा गाढव- बाप- मुलगा ही गोष्ट आठवते. प्रसिद्धीबरोबरच टीका पचवण्याची ताकद त्याने कमावली आहे.
रूबाबदारपणे संयत वागणं हा तर त्याचा यूएसपी आहे. प्रेक्षकांच्या आयुष्यात केवळ आनंद पेरणार्या या महानायकाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. :-)
#HappyBirthDayBigB