हल्ली बहुसंख्य लोकांची धार्मिक, सामाजिक मतं ही त्यांनी इंटरनेट किंवा सोशल मिडीयावर वरवर वाचलेल्या सुमार पोस्टवर आधारित असतात. व्यासंगाशी, संशोधनाशी त्यांना घेणेदेणे नसते. जगाचं जाऊ द्या, अगदी आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तरी इथल्या लोकपरंपरा, दैवतशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, कला अशा विषयांच्या खोलात कुणी फारसं शिरत नाही. मुळात त्यासाठी आटापिटा करायचा कशाला, त्याने जगण्य़ात असा काय फरक पडणार आहे असे प्रश्न विचारले जातात. याचं उत्तर असामान्य प्रतिभेचे साहित्य संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे आपल्या साहित्यकृतींमधून देतात. हा शोध म्हणजे भावनिक अट्टाहास नसतो. तो समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध असतो. त्यातून समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. शिवाय या समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.

(pic- From google- not for commercial purpose )
१ जुलै, अर्थात काल डॉ. ढेरे उर्फ अण्णा यांचा प्रथम स्मृतीदिन होता. या अनुषंगाने अण्णांनी वाई इथल्या सॅनिटोरियम मध्ये वैद्यकीय उपचारासाठी राहत असताना लिहीलेली, माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन किती भव्य आणि उदात्त असू शकतं याची प्रचिती देणारी कविता त्यांच्या जीवनाचं सार सांगून जाते.
’ माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास ..आणि वितीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास
परी आकाराची कारा, कशी सरावी क्षरावी.. आणि अ-क्षराची सुरा कशी अक्षरी भरावी?’
पुलं देशपाड्य़ांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ,"कपाळावर विद्वत्तेची आठी नसलेला आणि अकारण रसिकतेचा फाया कानात घालून न मिरवणारा ज्ञानयोगी म्हणजे डॉ. ढेरे" असं चपखल वर्णन केलं होतं. महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा अण्णांचा केवळ ध्यास नव्हे श्वास होता. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, आज्ञापत्र, "त्रिविधा' (गाणपत्य ,जैन आणि मुकुंदराज या ३ परंपरांचा आढावा घेणारं लेखन,) असे त्यांचे अनेक पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा म्हणजे त्यांची अभ्यासाची सामुग्री. १९६२ च्या पुरात पुण्यातील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतरही त्यांनी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवले परंतु पुस्तकखरेदीत व्यत्यय येऊ दिला नाही. आज त्यांचा जवळपास ४०००० ग्रंथांचा संग्रह त्यांच्या विश्वस्त मंडळाने अभ्यासकांसाठी खुला केला आहे.
मध्यंतरी जय मल्हार ही पोशाखी धार्मिक मालिका अतिशय गाजली. त्याच्या टीआरपी पलिकडचा खरा खंडोबा समजून घ्यायचा असेल तर अण्णांचं ’दक्षिणेचा लोकदेव खंडोबा’ या ग्रंथातलं या दैवतावर त्यांनी केलेलं संशोधन वाचायला हवं. खंडोबाची उपासना ११ व्या शतकात कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, खंडॊबाची पत्नी म्हाळसा ही माळव्व या नावाने कर्नाटकात ओळखली जाते. खंडोबाची मुखवट्याने सजवण्य़ाची पद्धती , कानडीतल्या मारी या शब्दाशी नातं सांगते, ज्याचा मराठीत तोंड असा अर्थ होतो. मारितोंड म्हणजेच मार्तंड म्हणजेच मल्लारि. मल्लारीचं ७ कोटी सैन्य होते असा पोथीत उल्लेख आहे. कानडीत सात म्हणजे येळ आणि म्हणून ते नाव यळकोट यळकोट जय मल्हार असं खूप काही यातलं अण्णांचं विश्लेषण सांगतं. अण्णांचं साहित्य वाचताना आपण तत्कालीन भारतीय-महाराष्ट्रीय संस्कृतीच्या वाटांवरून फिरून येतो.
एकंदरीत या दैवतांशी, लोकसंस्कृतीशी अण्णा इतके एकरूप कसे त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात लपलेलं आहे. १९३५ च्या सुमारास त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले तेव्हा अण्णा अवघे ५ वर्षाचे होते. त्यापुढचा आठ वर्षांचा काळ अवघ्या अण्णांनी पुण्य़ाजवळ त्यांच्या व्यतीत केला. आजीजवळ मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- अशा लोकसंस्कृतीचा खोलवर संस्कार अण्णांवर झाला. उपजत शहाणीव, बुद्धीमत्तेला पुढे व्यासंगाबरोबरच विवेकी, ऋजु व्यक्तिमत्वाची जोड मिळाली आणि त्यांची १०५ पुस्तकं प्रसिद्ध होऊ शकली.
त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ’लज्जागौरी’ या पुस्तकात अण्णा दाखवून देतात - स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. आज आपण ज्या मूर्तीरूपात देवीची उपासना करतो ते रूप आदिमानवापुढे असणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यामागे अध्यात्मिक भावनेचा संबंधही नव्हता. अण्णांचे हे प्रतिपादन पारंपरिक श्रद्धांना हादरा देणारं होतं, पण अण्णा लालित्य व मार्दवयुक्त भाषेत पुराव्यानिशी दाखवून देतात की विजापूरची लज्जगौरी, माहूरची रेणुकामाता किंवा कर्नाटकची यल्लमा या ठिकाणच्या देवता मूर्तीरूप नसून स्त्रीच्या सर्जनेंद्रियाच्या रूपात आहेत. त्यांच्या ’अमृतकन्या’ या पुस्तकात सीता, उमा, शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया, यक्षप्रिया, वसंतसेना आणि राधा अशी ८ कन्याचित्रे आहेत. भवभूतींची सीता आणि वाल्मिकींची सीता या अगदी भिन्न आहेत, तर कालिदासांची शकुंतला आणि व्यासांची शकुंतला अगदी भिन्न आहेत हे कळल्यावर वाचकाला नवल वाटते.
अण्णांबद्दल लिहीताना त्यांच्या ’श्रीविट्ठल एक महासमन्वय ’ या पुस्तकाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १२-१३ व्या शतकात म्हणजेच वारकरी पंथाच्या उत्कर्षकालात श्रीविठ्ठल हे सुप्रतिष्ठीत दैवत झाले होते. विठ्ठलाचे हेच रूप आपल्याला ज्ञात असते. मात्र अण्णा त्याच्याही मागे जाऊन विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतात. विठ्ठल मूलत: दक्षिणेकडील गोपजनांचा किंवा पशुपालकांचा म्हणजेच धनगरांचा देव. याचे पुरावे या पुस्तकात देत ’विठ्ठलाचे वैदिकीकरण’ ही जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे हे त्यांनी सिद्ध केलं. लोकांच्या पूर्वापार श्रद्धांना वेगळॆच सत्य सप्रमाण सांगणारे अण्णांचं हे संशोधन अतिशय खळबळ माजवून गेले होते.
त्यांच्या अशा ग्रंथसंपदेमुळे वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी काही प्रमाणात रुजू शकली. आजच्या प्रखर धार्मिक संवेदनांच्या पार्श्वभूमीवर ज्यांना एखादे संशोधन मान्य नाही त्यांनी पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध संगती मांडणे असे मार्ग निवडायला हवे. त्याऐवजी सर्वसामान्य समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा मानतो, त्यांनी तसे मानावे याची काळजी काही नेतेमंडळी मुद्दाम घेतात. अण्णांनी मात्र सत्याशी कधीही तडजोड केली नाही. अण्णांच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहीलच. परंतु संयम आणि विवेक हरवत चाललेला आजचा समाज अण्णांच्या व्यासंगी-संशोधक वृतीतून, साहित्यकृतींमधून काही बोध घेईल का!

(pic- From google- not for commercial purpose )
१ जुलै, अर्थात काल डॉ. ढेरे उर्फ अण्णा यांचा प्रथम स्मृतीदिन होता. या अनुषंगाने अण्णांनी वाई इथल्या सॅनिटोरियम मध्ये वैद्यकीय उपचारासाठी राहत असताना लिहीलेली, माणसाच्या आयुष्याचं प्रयोजन किती भव्य आणि उदात्त असू शकतं याची प्रचिती देणारी कविता त्यांच्या जीवनाचं सार सांगून जाते.
’ माझ्या क्षयी फुफ्फुसांना हवा अक्षयाचा श्वास ..आणि वितीच्या मेंदूला हवा अनंताचा ध्यास
परी आकाराची कारा, कशी सरावी क्षरावी.. आणि अ-क्षराची सुरा कशी अक्षरी भरावी?’
पुलं देशपाड्य़ांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाचं ,"कपाळावर विद्वत्तेची आठी नसलेला आणि अकारण रसिकतेचा फाया कानात घालून न मिरवणारा ज्ञानयोगी म्हणजे डॉ. ढेरे" असं चपखल वर्णन केलं होतं. महाराष्ट्रीय सांस्कृतिक-सामाजिक इतिहास हा अण्णांचा केवळ ध्यास नव्हे श्वास होता. नाथसंप्रदायाचा इतिहास, दक्षिणेचा लोकदेव खंडोबा, शक्तिपीठांचा शोध, चक्रपाणि, शोधशिल्प, लज्जागौरी, श्रीतुळजाभवानी, श्रीविठ्ठल एक महासमन्वय, आज्ञापत्र, "त्रिविधा' (गाणपत्य ,जैन आणि मुकुंदराज या ३ परंपरांचा आढावा घेणारं लेखन,) असे त्यांचे अनेक पायाभूत महत्त्वाचे ग्रंथ आणि लेख हे जगभरच्या संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे आहेत. नाणी, शिलालेख, प्राचीन मराठी, संतसाहित्य, स्थानमहात्म्यपोथ्या, मूर्ती-शिल्प, देवळे-राऊळे, वाक्प्रचार-म्हणी, व्युत्पत्ती, रुढी-उपचार-परंपरा- हा सर्व पसारा म्हणजे त्यांची अभ्यासाची सामुग्री. १९६२ च्या पुरात पुण्यातील घरात साठवून ठेवलेली ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतरही त्यांनी प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवले परंतु पुस्तकखरेदीत व्यत्यय येऊ दिला नाही. आज त्यांचा जवळपास ४०००० ग्रंथांचा संग्रह त्यांच्या विश्वस्त मंडळाने अभ्यासकांसाठी खुला केला आहे.
मध्यंतरी जय मल्हार ही पोशाखी धार्मिक मालिका अतिशय गाजली. त्याच्या टीआरपी पलिकडचा खरा खंडोबा समजून घ्यायचा असेल तर अण्णांचं ’दक्षिणेचा लोकदेव खंडोबा’ या ग्रंथातलं या दैवतावर त्यांनी केलेलं संशोधन वाचायला हवं. खंडोबाची उपासना ११ व्या शतकात कर्नाटकातून महाराष्ट्रात आली, खंडॊबाची पत्नी म्हाळसा ही माळव्व या नावाने कर्नाटकात ओळखली जाते. खंडोबाची मुखवट्याने सजवण्य़ाची पद्धती , कानडीतल्या मारी या शब्दाशी नातं सांगते, ज्याचा मराठीत तोंड असा अर्थ होतो. मारितोंड म्हणजेच मार्तंड म्हणजेच मल्लारि. मल्लारीचं ७ कोटी सैन्य होते असा पोथीत उल्लेख आहे. कानडीत सात म्हणजे येळ आणि म्हणून ते नाव यळकोट यळकोट जय मल्हार असं खूप काही यातलं अण्णांचं विश्लेषण सांगतं. अण्णांचं साहित्य वाचताना आपण तत्कालीन भारतीय-महाराष्ट्रीय संस्कृतीच्या वाटांवरून फिरून येतो.
एकंदरीत या दैवतांशी, लोकसंस्कृतीशी अण्णा इतके एकरूप कसे त्याचं उत्तर त्यांच्या बालपणात लपलेलं आहे. १९३५ च्या सुमारास त्यांचे आई-वडील दोघेही मृत्यू पावले तेव्हा अण्णा अवघे ५ वर्षाचे होते. त्यापुढचा आठ वर्षांचा काळ अवघ्या अण्णांनी पुण्य़ाजवळ त्यांच्या व्यतीत केला. आजीजवळ मौखिक परंपरागत ज्ञानाचे भांडार होते. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, घरोघरची व्रतवैकल्ये, दाराशी येणारे भुत्ये, वासुदेव, पोतराज- अशा लोकसंस्कृतीचा खोलवर संस्कार अण्णांवर झाला. उपजत शहाणीव, बुद्धीमत्तेला पुढे व्यासंगाबरोबरच विवेकी, ऋजु व्यक्तिमत्वाची जोड मिळाली आणि त्यांची १०५ पुस्तकं प्रसिद्ध होऊ शकली.
त्यांच्या सर्वाधिक गाजलेल्या ’लज्जागौरी’ या पुस्तकात अण्णा दाखवून देतात - स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. आज आपण ज्या मूर्तीरूपात देवीची उपासना करतो ते रूप आदिमानवापुढे असणे शक्यच नव्हते. तेव्हा त्यामागे अध्यात्मिक भावनेचा संबंधही नव्हता. अण्णांचे हे प्रतिपादन पारंपरिक श्रद्धांना हादरा देणारं होतं, पण अण्णा लालित्य व मार्दवयुक्त भाषेत पुराव्यानिशी दाखवून देतात की विजापूरची लज्जगौरी, माहूरची रेणुकामाता किंवा कर्नाटकची यल्लमा या ठिकाणच्या देवता मूर्तीरूप नसून स्त्रीच्या सर्जनेंद्रियाच्या रूपात आहेत. त्यांच्या ’अमृतकन्या’ या पुस्तकात सीता, उमा, शकुंतला, प्रियंवदा, अनुसूया, यक्षप्रिया, वसंतसेना आणि राधा अशी ८ कन्याचित्रे आहेत. भवभूतींची सीता आणि वाल्मिकींची सीता या अगदी भिन्न आहेत, तर कालिदासांची शकुंतला आणि व्यासांची शकुंतला अगदी भिन्न आहेत हे कळल्यावर वाचकाला नवल वाटते.
अण्णांबद्दल लिहीताना त्यांच्या ’श्रीविट्ठल एक महासमन्वय ’ या पुस्तकाचा उल्लेख अपरिहार्य आहे. १२-१३ व्या शतकात म्हणजेच वारकरी पंथाच्या उत्कर्षकालात श्रीविठ्ठल हे सुप्रतिष्ठीत दैवत झाले होते. विठ्ठलाचे हेच रूप आपल्याला ज्ञात असते. मात्र अण्णा त्याच्याही मागे जाऊन विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेतात. विठ्ठल मूलत: दक्षिणेकडील गोपजनांचा किंवा पशुपालकांचा म्हणजेच धनगरांचा देव. याचे पुरावे या पुस्तकात देत ’विठ्ठलाचे वैदिकीकरण’ ही जाणीवपूर्वक घडवलेली प्रक्रिया आहे हे त्यांनी सिद्ध केलं. लोकांच्या पूर्वापार श्रद्धांना वेगळॆच सत्य सप्रमाण सांगणारे अण्णांचं हे संशोधन अतिशय खळबळ माजवून गेले होते.
त्यांच्या अशा ग्रंथसंपदेमुळे वाचकांच्या मनातही आधुनिकता आणि संशोधकीय दृष्टी काही प्रमाणात रुजू शकली. आजच्या प्रखर धार्मिक संवेदनांच्या पार्श्वभूमीवर ज्यांना एखादे संशोधन मान्य नाही त्यांनी पुरावा समोर ठेवणे, तर्कशुद्ध संगती मांडणे असे मार्ग निवडायला हवे. त्याऐवजी सर्वसामान्य समाज ‘श्रद्धा’ हाच पुरावा मानतो, त्यांनी तसे मानावे याची काळजी काही नेतेमंडळी मुद्दाम घेतात. अण्णांनी मात्र सत्याशी कधीही तडजोड केली नाही. अण्णांच्या सांस्कृतिक व वाङ्मयीन योगदानाबद्दल महाराष्ट्र त्यांचा सदैव ऋणी राहीलच. परंतु संयम आणि विवेक हरवत चाललेला आजचा समाज अण्णांच्या व्यासंगी-संशोधक वृतीतून, साहित्यकृतींमधून काही बोध घेईल का!