Wednesday, August 10, 2016

सावळे की गोमटे


महाराष्ट्र टाईम्स मधे (3-7-2016) प्रसिद्ध झालेला माझा लेख ’सावळे की गोमटे’
http://epaperbeta.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=03072016013013

सध्या प्रसिदधीच्या ’हवेत’ असलेला विनोदी कार्यक्रम एका उपग्रहवाहिनीवर सुरू आहे. त्यातले दोन गुणी कलाकार व्यावसायिक गरजेतून स्वत:च्याच काळ्य़ा रंगावर बरेचदा विनोद करतात. या वर्षी एप्रिल महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडला पराभवाची धूळ चारून क्रिकेट २०-२० विश्वचषक घेऊन गेला. भारतीय क्रिकेटरसिकांनी आपला संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमधे पोचू न शकल्याच्या उद्वेगाला वेस्टइंडिज संघावर मनमुराद विनोद करून वाट करून दिली. ह्यातील बहुतेक विनोद त्यांच्या काळ्या वर्णाला उद्देशून होते. अर्थात या विनोदांमागे द्वेषभावनेपेक्षा टीम इंडिय़ाच्या अपयशामुळे आलेले नैराश्य होते कारण ते शल्य बोथट होताच सोशल माध्यमांवर प्रसारित होणारे वर्णविषयक विनोद आपोआप थांबले. मात्र अशा घटनांमधून काळ्य़ा रंगाकडे चेष्टेने, कुत्सितपणे, नकारात्मक दृष्टीने पाहण्य़ाची भारतीय मानसिकता अधोरेखित होते. हा सामना इंग्लंड जिंकला असता तर त्यांच्यावरही नक्कीच विनोद झाले असते पण ते त्यांच्या ’गोरेपणा’वरून नाही. कारण ’गोरा’ हा आपल्या बहुसंख्य ’ब्राऊन’ भारतीयांच्या ’स्वप्नातला’ आवडता रंग आहे. आपल्या जैविक, भौगोलिक परिस्थितीला आणि निसर्गदत्त मेलॅनिनला न जुमानता आपल्याला काहीही करून अधिकाधिक गोरे व्हायचे आहे.

विश्वविख्यात मुष्टीयोद्धा मोहम्मद अली उर्फ कॅशियस क्ले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना बालवयात नेहमी प्रश्न पडायचे, ’देवाचा पुत्र असलेला येशू असो वा नाताळचा सांताक्लॉज, सगळे गोरेच कसे! यातलं कुणीच आपल्यासारख्या काळ्य़ा रंगाचं का नाही?". अखेर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अव्वल ठरून या जगाला दाखवून दिले की ’ब्लॅक सुपरहिरो’ही असू शकतो. याउलट विठूरायाला आळवणारा ’सावळे सुंदर..रूप मनोहर’ हा संत तुकाराम यांचा अभंग असो, ’सावळा ग रामचंद्र’ सारखे गदिमांचे गीत असो किंवा ब्रजवासी कान्हावर रचलेला ’ज्यों ज्यों बूड़े श्याम रंग, त्यों-त्यों उज्जवल होय’ असा दोहा असो, सगुण ईश्वराचे सावळे स्वरूपच भारतीय समाजाने भक्तिभावाने, कौतुकाने स्वीकारलेले दिसून येते. मार्को पोलो च्या ( पेंग्वीन प्रकाशन १९५८, आर लेथम यांनी अनुवादित केलेल्या) सफरनाम्यामधे १३ व्या शतकातील भारताचे वर्णन आहे. ’येथे कृष्णवर्णीय व्यक्तींना अधिक सामाजिक प्रतिष्ठा असल्याचे दिसून येते ,त्यांच्या ईश्वराचा रंग काळा-सावळा मानला जातो हे कदाचित यामागील कारण असावे’ असा त्यात उल्लेख आहे. मग आजच्या भारतीय समाजाला मानवाचे काळे-सावळे रूप का आवडेनासे झाले असावे! गोर्‍या रंगाचे आकर्षण आर्य-द्रविड संघर्षाच्या काळापासूनचे मानले जात असले तरी भारतात ते पोर्तुजीज, डच, फ्रेंच, ब्रिटीश आक्रमणामुळे वाढत गेले आणि ब्रिटीश राजवटीपासून खर्‍या अर्थाने रूजले. ’जेत्यांचा’ वर्ण आपल्यालाही लाभावा यासाठीच्या धडपडीला गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणार्‍या क्रीम्सच्या जाहिराती खतपाणी घालू लागल्या. ब्रिटीश देश सोडून गेले परंतु जागतिकीकरणापासून भारतीयांच्या मनाचे ’अमेरिकीकरण’ होऊ लागले. अमेरिकन जीवनशैली आणि त्यांचा गोरा रंग याचे गारूड बहुतेक विकसनशील देशांप्रमाणे भारतीय जनमानसावर देखील पडले. आज अमेरिकेतील काळा-गोरा भेद वरकरणी संपुष्टात आला आहे असे वाटत असले तरी तेथील लॉ स्कूल चे प्राध्यापक जोनी हर्श यांच्या अहवालानुसार, अमेरिकेत जगभरातून स्थलांतरित होणार्‍या कामगारवर्गापैकी गोर्‍या मंडळींना होणारी कमाई इतरांपेक्षा १६ ते २३ % अधिक आहे. अमेरिकेत मार्टीन ल्यूथर किंग सारख्या नेत्यांना या समस्येविरोधात द्यावा लागला तसा लढा देण्य़ाइतका हा प्रश्न, भारतात सामाजिक स्तरावर तीव्र नव्हता. लैंगस्टन ह्यूज या निग्रो कवीची
’मी आहे निग्रो.. काळ्याशार रात्रीसारखा काळा’
अशी विमनस्कपणे लिहीलेली, वर्णविषमतेतून वाट्याला आलेल्या भोगाची दाहकता मांडणारी कविता भारतीय साहित्यात फारशी उमटली नाही. परंतु भारताभोवती वेटोळे घालून बसलेल्या जातीभेदाला वर्णभेदाचीही दाट किनार आहे हे आपण नाकारू शकत नाही.

भारतात फॅशन, उपग्रह वाहिन्या, सिने जगत यासारख्या क्षेत्रात आजही गौरवर्णीयांना प्राधान्य मिळते. त्या क्षेत्राभोवती असलेल्या वलयामुळॆ सर्वसामान्य प्रेक्षकांना गोरेपणाची भुरळ पडते. गोरेपणा देण्य़ाचा दावा करणार्‍या प्रसाधनांची निर्मिती करणार्‍या कंपन्या, हमखास यशस्वी व्हायचं असेल तर फक्त तुमचा रंग गोरा असायला हवा, हे समाजमनावर बिंबवू लागल्या. चांगला जोडीदार, मनासारखी नोकरी, हवी ती संधी मिळवायची असेल, तर आत्मविश्वास हवा आणि त्यासाठी तुम्ही गोरंच असायला हवं हे त्या जाहिरातीतून ठासून सांगू लागल्या. १९७८ ला पहिले व्हाईटनींग क्रीम भारतीय बाजारपेठेत आले. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्‍य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपये होता ,तो आता ४०० अब्जांवर जाऊन पोचला आहे. या महागड्या क्रीम्सच्या किंमती ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी सध्या चार ते दहा टक्के प्रमाणात स्टेरॉइडच्या मलमामध्ये स्वस्त पण घातक मिश्रणे बाजारात आली आहेत. ही खरं तर अॅलर्जीसाठी वापरावयाची मलम चेहऱ्यावर वापरल्याने त्यातल्या स्टेरॉइडमुळे त्वचा लाल होणे, त्यावर पुरळ येणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत अशा रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली असल्याचे मत त्वचारोगतज्ञ नोंदवतात. २००५ सालापासून तर भारतीय पुरूषांसाठी गोरेपणा मिळवून देण्याचा दावा करणारी खास ’मर्दोवाली’ क्रीम्स बाजारात आली आहेत.

शाहरूखसारखे कलाकार गोरेपणाच्या क्रीमची ट्यूब आपल्याकडे भिरकावतात आणि जाहिरातीतून सांगतात, "यशासाठी मेहनतीपेक्षा महत्वाचं काहीतरी आहे ते म्हणजे गोरेपण." आपण सुंदर दिसावे ही स्वाभाविक भावना आहे, पण सौंदर्याचा संबंध ’गोरेपणाशी’ जोडून आपण आपलीच फसवणूक करून घेत आहोत. एखादे मूल जन्माला आले की त्याचा रंग पाहून बर्‍यावाईट प्रतिक्रिया दिल्या जातात. बायको काळी आहे म्हणून तिला ’टाकून दिल्याच्या’ बातम्या आपण वाचतो त्यातला नवरा स्वत: देखील काळा असतो. तरीही लग्नविषयक जाहिरातींमधे ’गोरी बायको हवी’ असे लिहीण्य़ात काही गैर आहे असे अजिबात मानले जात नाही. मुलगी सावळी असली तरी सामाजिक दडपणामुळे तिचा उल्लेख ’गव्हाळ वर्णाची’ असा केला जातो. अगदी भावंडांमधेही एखादे मूल तुलनेने काळे असेल तर त्याच्या रंगाचा वारंवार अपमानास्पद उल्लेख होतो. अशावेळी काळ्या सावळ्या रंगाच्या लोकांच्या मनात अतिशय न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. काळ्या रंगामुळे निर्माण होणारी हीनत्वाची भावना, कुचंबणा दुर्लक्षित करता येणार नाही. याचे खोलवर होणारे सामाजिक परिणाम भीषण असू शकतात.

नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी ३ वर्षांपूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. लक्ष्मी मेनन ही सावळी भारतीय तरूणी टीकेला वैतागून भारताबाहेर गेली आणि सुपरमॉडेल झाली. अमेरिकेत ओप्रा विन्फ्रेमुळे कृष्णवर्णीय महिलांचा आत्मसन्मान दुणावला. अमेरिकेचे पहिले ’काळे’ अध्यक्ष बराक ओबामा आत्मविश्वासाने सांगतात, ’बी कंफर्टेबल इन युअर स्कीन’. ऑस्ट्रेलियातल्या टेक्‍सास विद्यापीठातील तिघींनी देखील ‘काळ्या रंगातही सौंदर्य असते‘ हे ठामपणे सांगणारी "अनफेअर अँड लव्हली‘ ही ऑनलाईन मोहीम सुरू केली आहे. ‘हो, आम्ही सुंदर आहोत, कारण आम्ही सावळ्या आहोत.‘ हे या मोहिमेचं घोषवाक्य. ‘रंगभेद हा सामाजिक कलंक आहे.‘ हे बजावणारी ही चळवळ गोरेपणाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान देते आहे. भारतात असेच आशेचे किरण आता दिसू लागले आहेत. येथील प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन गोरेपणा देणार्‍या प्रसाधनांच्या जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे. तिने मेकअपच्या मदतीने रंग उजळवण्याची तयारी दाखवली नाही तर तिला समाजाच्या खालच्या स्तराचे प्रतिनिधित्व करणार्‍या भूमिकाच मिळू शकतात असे तिला अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले होते. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीत तिच्या मुलाखतीसह प्रसिद्ध झालेला तिचा फोटॊ संगणकाच्या मदतीने ’गोरा’ करण्यात आला होता. तिने त्यावर आक्षेप घेऊन तो फोटो मूळ जसा होता तसा प्रसिद्ध करायला लावला. ’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची ही खंदी प्रचारकर्ती म्हणते, "आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या."

आपण आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी ही साधी सहज मानवी भावना आहे पण ही भावना अवघे आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! आपले दिसणे हेच फक्त आपले जगणे आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपण कधी करणार की नाही ! आपण माणसं आहोत की फक्त ग्राहक! " देशाची ’आंतरिक प्रगती’ अशा अनेक मूल्यांवर अवलंबून असते. वर्ण, वंश, जात यासारख्या गोष्टींना आपण अजूनही महत्व देत राहिलो तर समाजामधली आपसातली तिरस्काराची भावना संपणार कशी! घानाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने येत्या ऑगस्ट २०१६ पासून हायड्रोक्विनन हा ब्लीच करणारा घटक पदार्थ असलेल्या सर्व सौंदर्यप्रसाधनांवर बंदी जाहीर केली आहे. हायड्रोक्विननमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात आणि त्यामुळॆच घाना सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतातही जनहितार्थ असे निर्णय घेतले जातील का!
आजचा भारतीय समाज रातोरात बदलला नाही तरी येणारी पिढी तरी काळ्या रंगाला गोर्‍या रंगाइतकीच प्रतिष्ठा बहाल करेल का!
कवी बोरकरांच्या ’देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे ,सावळे की गोमटे या मोल नाही फारसे’.. या ओळींचा अर्थ आपल्याला उमगेल का!

Tuesday, May 10, 2016

शनि आणि आत्मसन्मान


"’काका हलवाईच’ का? आता ’काकू हलवाई म्हणा. चितळे बंधूच का?चितळे ’भगिनी’ म्हणा, इ-मेल का? आता ’फिमेल’ म्हणा’ वगैरे छापाच्या तृप्ती देसाई आणि मंदीर प्रवेशासाठी लढा देणार्‍या बायकांवरील विनोदांची सध्या चलती आहे. चला, श्री आणि जान्हवी सुटले. विनोद हवेच, त्याने तणाव हलका होतो, गंमत वाटते पण काही जण आता सभ्यतेची पातळी ओलांडून बोलू किंवा पोस्ट करू लागले आहेत. ’आता बापाच्या श्राद्धाला स्त्रियाही टक्कल करणार काय’, यासारख्या शब्दात त्यांची आणि पर्यायाने स्त्री वर्गाची खिल्ली उडवली जात आहे. तर्कहीन आक्षेप घेतले जात आहेत. चारित्र्यहननापासून अर्वाच्य शिव्यागाळीपर्यंत शस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. एक साधा अधिकार मागितला यात समाजाने इतका थयथयाट करण्य़ासारखे आहे तरी काय हे मला कळू शकलेले नाही. व्यक्तीश: माझ्यासाठी ’शनी’ हा एक ’ग्रह’ आहे, साहजिकच त्याचे ’दर्शन’ अवकाश विभागाच्या दुर्बिणीमधून घ्यायचे असते. तरीही शनीचा चौथरा, एखादा गाभारा, किंवा देवस्थानातल्या प्रवेशासाठी या स्त्रियांनी केलेलं बंड हा टवाळीचा विषय नक्कीच नाही. ’शनी मला नाकारत असेल तर मीच त्याचं दर्शन नाकारते,’ असा आक्रमक पवित्रा घेऊ शकणार्‍या काही तरूणींना अशा आंदोलनांची गरज वाटत नाही. ’धार्मिक परंपरा निमूटपणे पाळायलाच हव्यात’ असं म्हणणार्‍या स्त्रियांनाही डोक्याला ’नसते ताप’ नको आहेत. या दोन टोकांमधल्या, ’का?’ हा प्रश्न मनात येऊ लागलेल्या, सर्वसामान्य स्त्रियांसाठी हा लढा आहे हे मुळात लक्षात घ्यायला हवे.

अर्थात हे पटवून देण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्या स्त्री संघटनांनी विवीध व्यासपीठांवरून करायला हवा होता. त्यांना आपली भूमिका आक्रस्ताळेपणा न करता, वैचारिक चर्चा करून, ठामपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडता आलेली नाही , त्यामुळॆ या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा मिळवण्यात त्या कमी पडल्या. यामागे त्यांचा केवळ तात्कालिक आवेश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. स्त्रियांच्या प्रश्नांची सखोल जाण किंवा पुढच्या वाटचालीबद्दल स्वच्छ भूमिका तृप्ती देसाई आणि मंडळींच्या विचारात दिसून येत नाही. आपण हिंदूविरोधी नाही हे सिद्ध करायला आता दर्ग्यात प्रवेश करून दाखवायलाच हवा अशा स्वत:च निर्माण केलेल्या भोवर्‍यात त्या गरगरत आहेत. त्यांनी आपले भरकटत चाललेले तारू वेळीच सावरायला ह्वे आहे. अन्यथा मंदिरप्रवेश हा प्रतीकात्मक लढा न राहता, स्त्रियांना प्रवेश नाकारलेल्या जागांची यादी करणॆ आणि तिथे प्रवेशाची मागणी करत ठिय्या देणे हेच त्यांचे अनुत्पादक जीवितकार्य होऊन बसेल. त्यांची उर्जा अधिक विधायक कामांऐवजी ह्यातच खर्च होईल. त्यामुळे एकूणच त्यांच्या आंदोलनाची पद्धत आणि दिशा योग्य आहे किंवा नाही याबद्दल दुमत असू शकते, पण हेतूबद्दल शंका घेणे, हीन टीका करणे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला शोभत नाही.

’पुरोगामी विचारसरणी' हे महाराष्ट्राचे नेहमीच एक वैशिष्ट्य़ मानले गेले आहे. परंतु मुलभूत मूल्यांशी फारकत घ्यायची असेल तर महाराष्ट्राने स्वत:ला पुरोगामी नेमके कशासाठी म्हणवून घ्यायचे, फक्त नेत्यांच्या भाषणापुरते?  प्रत्येक धर्मात कोणत्या तरी काळी काही कारणामुळे पडलेला पायंडा आधी प्रथा मग नियम मानला जाऊ लागतो. तो कालसुसंगत आणि तर्कशुद्ध आहे काय, हे आपण तपासायचे की नाही? मूल्ये शाश्वत असली तरी त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे तपासले गेले नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एके काळी सर्वात महत्वाची ठरलेली पुरोगामी विचारसरणी नव्या विचारप्रवाहांसह पुढे जाणे थांबवून गाळासारखी साचून राहील. तसे घडू नये म्हणून काही नाकारलेली सत्ये एका टप्प्यावर स्वीकारावी लागतात तर काही बदलांचे स्वागत करावे लागते. जुनाट विचारांची कावड झापडे बांधून वाहणार्‍यांचा प्रवास अखेर विनाशाकडे होतो हा जगाचा इतिहास आहे. मग ’धर्माची चिकित्सा’ हे अतिशय महत्त्वाचे मूल्य ’आमच्या भावना का दुखावल्या’ या बडग्याखाली चिरडले जाऊ द्यायचे का! खरं म्हणजे मागे वळून पाहिलं तर गेल्या शंभर वर्षापासून सुरु असलेल्या कठोर धर्मचिकित्सेमुळे हिंदु समाजाचे नेहमीच भले झाले आहे.

’पण मग बायका पुन्हा कर्मकांडाकडेच तर जात आहेत, मग ही कसली डोंबलाची धर्मसुधारणा!’ असा जोरदार आक्षेप घेतला जातो आहे. आस्तिक समाजाच्या ’देव’ या संकल्पना विविध स्वरूपाच्या असतात. आस्तिकतेमुळे जगणं आश्वासक होतं. मात्र बहुसंख्य आस्तिक हे कर्मकांड मानणारे असतात. त्यातूनही महिलांवर कर्मकांडांचा आणि त्यातून तयार झालेल्या धार्मिक संकेतांचा प्रचंड पगडा असतो. आयटी इंजिनीयर मुलींनाही डिझाईनर नऊवारी नेसून केलेल्या पूजाअर्चेचे फोटो शेअर करायला आवडतात. जगण्य़ातल्या समस्यांशी लढताना काव्य शास्त्र विनोदातील आनंदापासून अजून खूप दूर असलेल्या ग्रामीण महिला व्रतवैकल्यांच्या निमित्त्याने थोडीफार हौसमौज करून आपला आनंद शोधतात ही वस्तुस्थिती आहे. इथवर कर्मकांडांचा त्यांना स्वत:ला किंवा समाजाला त्रास नसतो. मात्र कर्मकांडाच्या कह्यात गेलेल्या महिला ’साडेसातीतून’ सुटका होण्य़ासाठी शनीला साकडे घालतात, मासिक धर्माच्या काळात त्या देवालयात पाऊल टाकत नाही. असे नियम स्त्रियांनी मोडले तर ’पाप’ लागते हे त्यांच्या मनावर पक्के बिंबलेले आहे. काहींची तर हे नियम ’देवानेच’ केले आहेत अशी ठाम समजूत आहे. आंदोलनकर्त्यांना विरोध करणार्‍या महिला याच मानसिकतेच्या बळी आहेत. परंतु कायद्याने खणखणीतपणे आणि विश्वस्तांनी नाईलाजाने का होईना, प्रवेशाला दिलेल्या परवानगीमुळे एवीतेवी कर्मकांडे सोडू न शकणार्‍या श्रद्धाळूंना एक नवा दॄष्टीकोन तर गवसला. तो म्हणजे, ’काळानुसार विचार आणि नियम बदलणे म्हणजे पाप नाही, धर्म ही पुरूषांची मक्तेदारी नाही आणि स्त्रिया अपवित्र नाहीत, त्यांनाही दर्शनाचा समान अधिकार आहे.’ शनीला तेल वाहत राहणे कालांतराने बंद होईलही पण निदान आपण अपवित्र असल्याची भावना या स्त्रियांच्या मनातून आज जात असेल तर ते सुचिन्ह नाही का! तरी देखील, ’हाजी अली दर्गाप्रवेशाचं नाव काढताच पाहा, कडव्या मुस्लीम संघटना कशा चवताळून उठल्या, एकत्र झाल्या, नाहीतर आपण! ’ अशी अजब मते व्यक्त होतात तेव्हा खेद वाटतो. धार्मिक कट्टरतेचे समर्थन करून आपल्याला तालिबानकडे वाटचाल करायची आहे काय? या घडामोडींमुळे उलट हिंदु धर्म हा काळानुसार बदलणारा सहिष्णु धर्म आहे हे सिद्ध करता आले आहे. पूर्वीचे शाहबानो, आजचे शायराबानो प्रकरण किंवा दर्गाप्रवेश विरोध पाहता मंदीर प्रवेशाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे हिंदू धर्माचे काही बिघडले तर नाहीच उलट हिंदू धर्माची मान उंचावली हे लक्षात घ्यायला हवे. मग ही प्रगतीशील धर्मसुधारणा नव्हे काय?

दुसर्‍या बाजूला, कर्मकांडाशी संबंधित अधिकार मागितल्याने, स्त्री-पुरूष समानतेच्या प्रश्नासाठी गंभीरपणे लढणार्‍या चळवळींची यामुळे हानी झाली असे काही बुद्धीवादी मंडळींना भय वाटू लागले आहे. उलट ज्या सर्वसाधारण महिला अशा चळवळींना ’नास्तिक शहरी बायकांचा गट’ समजून त्यापासून चार हात दूर राहत होत्या, त्या या निमित्त्याने बदलाची भाषा शिकू लागल्या आहेत. कमीत कमी चाकोरीबाहेरचा विचार करू लागल्या आहेत. त्यांना कर्मकांडापासून पूर्णत: तोडण्याचा हेका धरला तर स्त्रीवादी चळवळी आणि सर्वसामान्य स्त्रिया यांच्यातली दरी कधीच भरून निघणार नाही. प्रस्तुत समाजव्यवस्थेतच समानतेचा आग्रह धरण्य़ाच्या उद्देशाने, स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मंदिरप्रवेशासाठी याचिका दाखल करून समंजस मार्ग निवडला. धर्म नाकारून आततायी क्रांती करण्य़ापेक्षा धर्मातील कालबाह्य रूढींना फाटा देऊन हळूहळू बदल घडवणे अधिक व्यवहार्य आहे हा विचार या निमित्त्याने रूजतो आहे.

तरीही ’आत्ताच बरे यांना हे सुचले’ असा सवाल केला जातो आहे. याची सुरूवात नेमक्या कोणत्या घटनेने झाली ते आठवून पाहा, एक मुलगी चुकून चौथर्‍यावर गेली तर तो चौथरा गोमूत्राने ’शुद्ध’ करण्यात आला, याला स्त्रियांनी अपमान समजायचा नाही का? ज्या स्त्रियांना स्वेच्छॆने नियम पाळायचेत त्यांनी पाळावे, परंतु स्त्री प्रवेशाने ती जागा अपवित्र होते या अंधश्रद्धेला आव्हान द्यायचे की नाही? मग सावित्रीबाई, जिजाऊंची जयंती-पुण्य़तिथी साजरी करायची कशाला? कर्वे ,फुले, आगरकरांचा वारसा सांगायचा, तो कशाला? ’बरं, मिळाली ना एकदाची परवानगी, मग आता जाणार आहेत का या ’दांभिक’ बायका रोज दर्शनाला?’ असा प्रश्न विचारणार्‍यांना हे ’प्रतीकात्मक’ दर्शन होते हे कळायला हवे. स्त्रियांना देवाजवळ प्रवेश हवा आहे तो फक्त धार्मिक भावनेपोटी नाही. दलित हिंदूंना प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह आठवा. त्यांनी सांगितले होते ’आम्हाला देवाचे दर्शन घेऊन काहीही पुण्य कमवायचे नाही, परंतु ’प्रवेशबंदी’ हा अपमान आहे, कलंक आहे, तो आम्हाला पुसायचा आहे’.

सध्या विरोधकांमधे प्रत्येक घटनेचा दोष मोदींना देण्याची आणि मोदी समर्थकांनी सगळ्य़ाचे खापर गेल्या ६० वर्षाच्या अकार्यक्षमतेवर फोडण्य़ाची स्पर्धा सुरू आहे. अशा काही मंडळींना हे विरोधकांचे राजकीय कारस्थान वाटते. या बायकांना प्यादे म्हणून वापरून फडणीस सरकारविरूद्ध केलेलं षडयंत्र वाटते. तसे असेल तर उलट हे पुरोगामी बदल फडणीस सरकारच्या पथ्यावरच पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सकारात्मक कौल दिला होता. विरोध केला तर प्रतिगामी ठरू या भीतीने का होईना ,या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे निर्णय फडणीस सरकारच्या कार्यकाळात झाल्याने उलट त्या सरकारला याचे श्रेय जाते आहे. थोडक्यात विरोधकांनी सरकारच्या शिरपेचात आयता तुरा खोवून दिल्याबद्दल समर्थकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. आंदोलनकर्त्या स्त्रियांचा हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, असा काहींचा आक्षेप आहे. आंदोलनकर्त्या संघटनेतील फूट आणि दर्शनाला सर्वात आधी पोचायची चढाओढ बघता यात तथ्य असावे. परंतु ’२४ तास काय बरे दाखवावे’ या चिंतेत असल्याने देसाई यांच्या प्रत्येक शब्दाला ’मथळा’ बनवणार्‍या माध्यमांची ही देण आहे. अर्थात ही प्रसिद्धी देसाईंना पूनम पांडे छाप सवंग पद्धतीने फुकटात मिळालेली नाही. या बदल्यात धमक्यांचे फोन, शारिरीक मारहाण आणि मानसिक दडपणाचा ’आहेर’ त्यांना समाजाने दिला आहे. शिवाय ’आपण काय जेवलो, आत्ता काय करतोय’ हे जगाला सतत सांगून प्रसिद्धीचा खटाटोप करण्य़ाच्या फेसबुकी जमान्यात समाजात काही सकारात्मक बदल घडवून प्रसिद्धी मिळवणे केव्हाही श्रेयस्कर!

या बायकांवर बहुतेक जणांचा आरोप आहे असा आहे की, ’ मंदीर प्रवेशाचा हट्ट कशाला? स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्य़ासाठी छळ अशा शंभर समस्या आहेत, त्या सोडवा ना आधी’ हातात कधीही बॅट न धरलेली मंडळी ’धोनीचे’ काय चुकले यावर तावातावाने चर्चा करतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आपण स्वत:लाच विचारावं, १०० तल्या एका तरी प्रश्नाला या महिलांनी हात घातला. आपण यातल्या किती प्रश्नांना भिडलो? आयुष्यात एका तरी ध्येयासाठी आपण असा जिगरबाज लढा दिला आहे काय? नसेल तर हरकत नाही, आपलं रोजचं काम नीट करणं सुद्धा कमी महत्वाचं नाही पण जे त्या पलीकडे काही करू पाहतात त्यांच्यावर किमान विखारी टीका करून आपण त्यांचं खच्चीकरण करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांशी संबंधित तमाम समस्यांच्या मुळाशी ’स्त्री दुय्यम आणि अपवित्र आहे’ ही घट्ट बसलेली भावना आहे, ती आपापल्या बुद्धी आणि कुवतीनुसार उखाडण्य़ाचा प्रयत्न तरी करण्य़ाचे धाडस या महिलांनी दाखवले आहे. वर्षानुवर्षे बंद असलेली दारे किलकिली करण्य़ाचा प्रयत्न केला तर ती करकर वाजणारच पण त्याशिवाय नवे मार्ग चोखाळता येत नाहीत. आपण अशा धडपडींना, अडखळत्या पावलांना समजून घ्यायला हवे. बदल पचवून पुढे जायला हवे, हेच खर्‍या प्रगत आणि प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. तेव्हा मंदिर अथवा गाभारा अथवा दर्गा प्रवेश हे अंतिम ध्येय नाही हे देसाईंनी समजून घ्यावे. त्याचबरोबर आपण देखील हा आत्मपरिक्षणाच्या मार्गावरचा केवळ एक टप्पा मानायला हवा.

हे खरय की हा हक्क झगडून मिळवल्याने आजच्या स्त्रियांच्या दैनंदिन जगण्यात फारसा (टीकाकारांच्या मते ’कवडीचा’) दर्शनी फरक पडलेला नाही. परंतु आत्मसन्मानाच्या भानाचा दिवा असाच अंतरी पेटता राहिला तर त्या प्रकाशात निदान पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या पाऊलवाटा निश्चित उजळून निघतील.

Sunday, April 17, 2016

विराट विचार


http://epaperdivyamarathi.bhaskar.com/akola/354/17042016/0/1/ published in Divya Marathi

  नुकताच क्रिकेट २०-२० विश्वचषक २०१६ सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीपर्यंतच पोचू शकला मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. क्रिकेटप्रेमी भारतीयांना तेव्हा आनंदाचे उधाण आले होते आणि त्या भावनांना सर्वांनी सोशल मिडीयावर वाट करून दिली. कथित प्रेमप्रकरणामुळे विराटबद्दलच्या संदेशांमधे अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले. एका मर्यादेपर्यंत गंमत म्हणून हे ठीक होते. परंतु अनेक संदेशांमधे सभ्य विनोदाची पातळी ओलांडली गेली. अश्लाघ्य पद्धतीने टीकाटीप्पणी केली गेली तेव्हा मात्र ही परिस्थिती विराटने अतिशय खंबीरपणे हाताळली. या अतिरेकामुळे उद्विग्न होउनही त्यांने खणखणीत शब्दात सुशिक्षितांना त्यांच्या वाढत्या ‘सवंग’पणाची जाणीव करून दिली. ‘‘माझ्या खेळातील गुण-दोषांनंतर अनुष्काला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या लोकांची मला कीव कराविशी वाटते. अशा व्यक्ती जर स्वत:ला सुशिक्षित समजत असतील तर ही शरमेची बाब आहे.’’असे त्याने सुनावले. अनुष्काशी त्याचे ‘ब्रेक-अप’ झाले की नाही ही खाजगी बाब चघळणार्‍यांना चपराक देत कोहली म्हणाला, "तिने मला कायम प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनच दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी टीकेचे लक्ष्य करत असेल तर ते कसे वाटेल, याचा एकदा विचार करा’’

ज्या सोशल मिडीयातून विराट-अनुष्का वर कॉमेंट्स झाल्या त्याच सोशल मिडीयाचा वापर करून विराटने सर्वांना भानावर आणले. याची प्रशंसनीय परिणीती म्हणजे भारतीय संघ वेस्ट इंडीजविरूद्धचा सामना हरल्यानंतर विराट-अनुष्कासंबंधात एकही पोस्ट आली नाही. आपल्या परिचयातील सहकारी किंवा नातलग स्त्रिया, मैत्रिणी यांची आपल्यामुळे अकारण बदनामी होत असेल तर त्यांची प्रतिष्ठा कशी जपावी याचा धडाच यानिमित्त्याने विराटने घालून दिला. विराट एक उत्तम खेळाडू आहेच पण तो विचारांनीही उमदा आहे हे त्याने त्याच्या सडेतोड वक्तव्याने आणि नेमक्या कृतीने दाखवून दिले आहे. आजचे तरूण विराटला आदर्श (आयडॉल) मानत असतील तर त्यांनी फक्त त्याच्या खेळाचे, केशरचनेचे किंवा त्याच्या हातांवरील टॅटूचे अनुकरण न करता त्याच्या विचारांचे आणि वर्तनाचे अनुकरणही करायला हवे.

हल्ली ’व्हायोरिझम’ म्हणजेच ’दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात डोकावायचे आणि त्यातून विकृत आनंद मिळवायचा’ ही वृत्ती वाढत चालली आहे. विकृतीच्या टोकाला न जाता कमी अधिक प्रमाणात ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात असते, पण त्यावर मात करणे आणि सामाजिक संकेत जपणे यालाच आपण सुसंस्कृतपणा म्हणतो. दुर्दैवाने सोशल मिडीयासारखे हत्यार मिळाल्याने ही दडपलेली भावना अजूनच वर येऊ लागली आहे. याच व्हायोरिझम चा वापर करून ’बिग बॉस’ सारख्या कार्यक्रमांचे उखळ पांढरे होते कारण आपल्या मनोरंजनाच्या कल्पना सवंग होऊ लागल्या आहेत. समाजधुरीणांसह प्रत्येक संवेदनशील व्यक्तींने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्य पुरूषांनाही याचे चटके बसू लागले आहेत. परंतु याचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे महिलांविषयक वाढते सायबर गुन्हे. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाला यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण यांची मी मुलाखत घेतली होती. त्यांनी खंत व्यक्त केली की सायबर सेल, ’दृष्टी’ सारखे अ‍ॅप, ’जागर तरूणाईचा’ यासारखे उपक्रम असे पर्याय देऊनही मुली-महिला तक्रार करायला पुढे येत नाही. मुळात गुन्हे कमी होण्य़ासाठी ,झालेच तर दाद मागण्य़ासाठी आणि समाजभान जागे करण्यासाठी मुलींना त्यांच्या परिचित सहकारी-नातलग पुरूष, महाविद्यालयीन मित्रांकडून विराटसारखी भक्कम साथ मिळायला हवी. तसे घडले तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.