Tuesday, March 15, 2016

किताबे (भावानुवाद)


पुस्तकं.. बंद कपाटाच्या काचेआडून डोकावणारी
जगाकडे आसुसून बघणारी..  पुस्तकं !
आता महिनोन् महिने भेट होत नाही.. माणसांशी
पुस्तकांच्या सान्निध्यातल्या उबदार तिन्हीसांजा
खिळल्यायत आता.. संगणकाच्या थंड पडद्यावर.
बेचैन.. अस्वस्थ झालीयत पुस्तकं.
ग्लानीत नकळत अवतरतात ..कपाटातून मेजावर
वाट बघत राहतात..आशेनं.. 
कुणी तरी चाळेल म्हणून

ज्या गाथा गायल्या त्यांनी ..एके काळी
ज्यांनी भारलेलं असायचं.. सारं घर
त्याचा मागमूसही
नाही उरला कुठे.
ज्यांच्या कथा असत..त्यात गुंफलेल्या
ती नातीसुद्धा आता छिन्नविछिन्न.. उसवलेली.
नकळत मी उलटलंच एखादं पान.. 
तर
ऐकू येतो..  त्यातून एक अनावर हुंदका.
शब्दांचे विखरून गेलेले मोती तेवढे घरंगळतात.. पानांवरून.
पर्णहीन फांद्यांसारखी.. ती शुष्क बोडकी अक्षरं
ज्यावर बहरतही नाही.. प्रतिभेची कोवळी पालवी
काचपात्रांच्या दिमाखापुढे
निष्प्रभ झालेल्या मातीच्या भांड्यासारखी...
निरूपयोगी.. केविलवाणी.. 
पुस्तकं !

पानं उलटताना जाणवणारी.. संमोहित करणारी..
हरवली ती आगळीवेगळी चव.
आता बोटं फक्त क्लिक करतात...निमिषार्धात
अन उलगडत जातं एक अफाट विश्व.. संगणकाच्या पडद्यावर
पुस्तकांशी असलेलं ते नातं.. 
उत्कट 
हळुवार
आपुलकीचं
संपलं...!!

वाचता वाचता निद्रेच्या कुशीत शिरताना.. हृदयाशी बिलगलेली पुस्तकं
कधी मांडीवर घेऊन.. तन्मय होऊन.. अनुभवलेली पुस्तकं
कधी दुमडलेल्या गुडघ्यांवर ठेवून .. तर कधी
घनदाट लिंबाच्या निवांत छायेत...भान हरपून वाचलेली पुस्तकं.
हरवला.. त्यांचा तो अलवार तरल स्पर्श.
’ज्ञान’ वगैरे...  आजही मिळवता येतंच की
पण 
त्या अवीट.. अबोल स्मृतींच्या पाकळ्या
पुस्तकातून जपलेल्या.. सुगंधी पानखुणा
पुस्तकं मागता घेताना, पडल्यावर हलकेच उचलून देताना
फुलत जाणार्‍या नवथर नात्यांच्या 
त्या नाजूक कळ्या
त्यांचं काय !! 
त्या कधीच उमलणार नाहीत आता
कदाचित.

( गुलजार यांच्या ’किताबे’ या कवितेचा मी केलेला भावानुवाद)

Friday, January 22, 2016

स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची (अनुवाद)


स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची

ऐकलय का कधी
पुरूषांपेक्षा वेगळया..
अशा स्त्रीच्या भावविश्वाबद्दल....?

घर, प्रेम, समाज याशिवाय..
तिची स्वत:चीही जमीन असल्याचं
सांगू शकता तुम्ही...
एखाद्या स्त्रीला?

देऊ शकता
युगानुयुगे स्वत:चं घर शोधणार्‍या
एखाद्या अस्वस्थ स्त्रीला
तिच्या घराचा पत्ता?

कसं शक्य होतं असेल स्त्रीला
आपल्या भावजीवनात
रममाणं होणं..
अन त्याच क्षणी ते सारं पुसून टाकणं !
केलात विचार कधी..?

स्वप्नात एखादीमागे धावताना..
पाहिलत कधी तुम्ही तिला
नात्यांच्या युद्धभूमीवर..
स्वत:शीच लढताना?

शरीराच्या भूगोलापल्याड जाऊन
तिच्या मनाची गाठ उकलून..
जाणून घ्यावासा वाटला कधी...
तिच्या आतला.. उफाळणारा इतिहास?

वाचलात कधी
मौनाच्या उंबरठ्य़ाआड दडलेला
’ब्र’ उच्चारायाला आसुसलेला.. तिचा चेहरा?

तिच्यात वंशाचं बीज रूजवताना
अनुभवलत कधी..
तुमच्यामधे खोलवर विस्तारत..
सामावत गेलेल्या..तिच्या मुळांना ?

उमगलं कधी तुम्हाला
एका स्त्रीभोवती गुरफटलेलं..
नात्यागोत्याचं व्याकरण ?

उलगडता येईल तुम्हाला
एखाद्या स्त्रीला?
येईल का करून पाहता
एका स्त्रीच्या नजरेतून ...
’स्त्रीत्वा’ची व्याख्या?

आणि नसेल जमत यातलं काहीच..
तर
काय माहितीये हो तुम्हाला
एका ’स्त्री’बद्दल !!
शेजे आणि पेजेच्या गरजेपलीकडे..???

मूळ संथाली कवयित्री : निर्मला पुतुल
अनुवाद : मोहिनी मोडक

Friday, December 25, 2015

जनरेशन गॅप- रस्सीखेच


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी या विषयावरील ’रस्सीखेच’ हे सदर सरत्या वर्षाबरोबर आपलाही निरोप घेतं आहे. या विषयाशी निगडीत पिढ्यांमधील वैचारिक तफावत, सामाजिक, कौटुंबिक, राहणीमानातील बदल, पालकत्वाकडे पाहण्यात झालेला फरक, स्त्रियांकडे बघण्य़ाचे कालचे आणि आजचे दृष्टीकोन, वाचनाच्या बदललेल्या पद्धती, जुनी आणि नवी शैक्षणिक मूल्ये, अभिव्यक्तीची बदलत गेलेली शैली, तंत्रज्ञानामुळे रूंदावलेली दरी यासारख्या अनेक मुद्द्यांचा परामर्ष या सदरात घेतला गेला. इ-मेल वर बर्‍याच वाचकांनी आपले अभिप्राय दिले. वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हा एक अतिशय आनंदाचा अनुभव होता. जगाचा विचार केला तर दोन पिढ्यांमधील अंतराची- जनरेशन गॅपची- कल्पना आक्रसते आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी पिढी बदलते, असे साधारणपणे मानले जाते. आता जगभरातली दोन पिढ्यांमधील अंतराची कल्पना जेमतेम सहा वर्षांवर येऊन पोचली आहे

काही बाबतीत मात्र भारतीय पिढ्यांमधे जनरेशन गॅप नाहीच की काय असं वाटायला लागतं. सन्माननीय अपवाद वगळता जुन्या मंडळींच्या कल्पना इतक्या पक्क्या झालेल्या असतात की, नवं सगळं त्यांना वाईट, अयोग्य, असभ्य वगैरे वाटत राहतं. नुकत्याच घडलेल्या शबरीमला मंदीरातील महिलांच्या स्कॅनिंग विषयीच्या विचाराचं उदाहरण घेतलं तर वरवर यावर नाराजी प्रकट करणार्‍या बहुसंख्य महिला सुद्धा मनातून मासिक धर्माला पिढ्या न पिढ्य़ा अपवित्रच मानत आल्या आहेत. शिवाय ते इतकं ठासून बिंबवलं जातं की आजच्या पिढीच्या देखील कित्येक तरूणी त्या बाबतीत विज्ञाननिष्ठ विचार करायला धजावत नाहीत. त्याच वेळेला दुसरीकडे भारतीय पिढ्यांमधे प्रचंड जनरेशन गॅप आढळून येते, उदा. द्यायचे तर आपणच कौतुकाने इंग्रजी माध्यमात घातलेला मुलगा किती सहजतेने संगणक, मोबाईल वापरतो, फाडफाड इंग्लिश बोलतो आणि आपण किती अडाणी आहोत, अशा न्यूनगंडाने अनेक पालक आज ग्रासलेले आहेत.

प्रत्येक मागच्या पिढीजवळ नव्या पिढीच्या तुलनेने संयम, आदर, त्यागी वृत्ती असते तर नव्या पिढीजवळ उमेद, बंडखोरी आणि ’मला काय हवय’ या बाबतीत स्पष्टपणा असतो. वेगाने धावू पाहणारी पिढी आर्थिकदृष्ट्या बऱ्याच लवकर सक्षम होत आहे. वडिलांनी निवृत्तीच्या वेळेतो केली तेवढी कमाई मुलं वर्षात करतात. त्यातून आत्मविश्वास वाढतो पण काहीसा अहंकार ही निर्माण होतो. यात समन्वय साधायचा तर मागच्या पिढीने दिलेल्या संस्कारांचे दोर बळकट हवेत. संस्कार म्हणजे फक्त ’शुभंकरोति’ म्हणणे नव्हे, माणूस घडवणे. कुठलीही असली तरी पौगंडावस्थेतील पिढी नेहमीच सैरभैर अवस्थेत असते. संस्कृतीतून, इतिहासामधून नेमकं काय घ्यायला हवं हे त्यांना समजत नसतं. परंतु सभोवतालातून, आजूबाजूच्या व्यक्तींमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांकडून ते अभावितपणे खूप काही घेत असतात. नैतिक अधिकार प्रत्यक्ष कृतीतूनच कमवावा लागतो हे निश्चित. मुलं आपलं सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण आपल्या मागच्या पिढीशी वागायला हवं.

पिढ्यांमधलं अंतर आवर्जून कमी करायचं तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या जागी उभे राहून परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित एकमेकांच्या वागण्य़ाचा कार्यकारणभाव समजणं सोपं जाईल. नव्या पिढीचे जगण्याचे मार्ग वेगळे असतील पण ते अयोग्य नसतील असा विश्वास निर्माण होईल आणि मागची पिढी तरूणाई ला ’आऊटडेटेड’ वाटणार नाही.

जुनं ते सोनं हे बहुतांशी खरं असलं तरी सर्वच जुनं ते सोनं नाही. सरसकट एखाद्या पिढीला दोष देण्य़ापेक्षा जुन्यातलं आजही काय लागू होतं किंवा ते नव्या रूपात लागू करता ये ईल का याचा विचार करणं आणि काळानुसार बदलणं खरच इतकं अवघड आहे का! आल्फ्रेड नोबेल यांनी डायनॅमाईट सारख्या विनाशकाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की एकीकडे संशोधनातून जगाला विध्वंसाची साधने उपलब्ध करून देणारे नोबेल आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून हादरले, बदलले, इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल पारितोषिक..विशेषत: शांततेसाठी, जगविख्यात आहे. म्हणजे माणसात अगदी आमूलाग्र बदल होणं सुद्धा अशक्य नसतं. बदलाच्या लाटांमुळे थोडी खळबळ होईलही पण अथांग काळाबरोबर वाहत चाललेलं माणूसपणाचं तारू भरकटणार नाही एवढं नक्की. असा विचार केला तर जगणं सुखकर आणि आयुष्य सुंदर होईल. त्यासाठी मागच्या ,आजच्या आणि सळसळत्या वयातल्या उद्याच्या पिढीनही एकमेकांना इतकच सांगावं, ’कुछ तुम चलो, कुछ हम चले, दूरियां यों मिटाते चलें’.