Friday, January 22, 2016

स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची (अनुवाद)


स्त्री: शेजे आणि पेजेपलीकडची

ऐकलय का कधी
पुरूषांपेक्षा वेगळया..
अशा स्त्रीच्या भावविश्वाबद्दल....?

घर, प्रेम, समाज याशिवाय..
तिची स्वत:चीही जमीन असल्याचं
सांगू शकता तुम्ही...
एखाद्या स्त्रीला?

देऊ शकता
युगानुयुगे स्वत:चं घर शोधणार्‍या
एखाद्या अस्वस्थ स्त्रीला
तिच्या घराचा पत्ता?

कसं शक्य होतं असेल स्त्रीला
आपल्या भावजीवनात
रममाणं होणं..
अन त्याच क्षणी ते सारं पुसून टाकणं !
केलात विचार कधी..?

स्वप्नात एखादीमागे धावताना..
पाहिलत कधी तुम्ही तिला
नात्यांच्या युद्धभूमीवर..
स्वत:शीच लढताना?

शरीराच्या भूगोलापल्याड जाऊन
तिच्या मनाची गाठ उकलून..
जाणून घ्यावासा वाटला कधी...
तिच्या आतला.. उफाळणारा इतिहास?

वाचलात कधी
मौनाच्या उंबरठ्य़ाआड दडलेला
’ब्र’ उच्चारायाला आसुसलेला.. तिचा चेहरा?

तिच्यात वंशाचं बीज रूजवताना
अनुभवलत कधी..
तुमच्यामधे खोलवर विस्तारत..
सामावत गेलेल्या..तिच्या मुळांना ?

उमगलं कधी तुम्हाला
एका स्त्रीभोवती गुरफटलेलं..
नात्यागोत्याचं व्याकरण ?

उलगडता येईल तुम्हाला
एखाद्या स्त्रीला?
येईल का करून पाहता
एका स्त्रीच्या नजरेतून ...
’स्त्रीत्वा’ची व्याख्या?

आणि नसेल जमत यातलं काहीच..
तर
काय माहितीये हो तुम्हाला
एका ’स्त्री’बद्दल !!
शेजे आणि पेजेच्या गरजेपलीकडे..???

मूळ संथाली कवयित्री : निर्मला पुतुल
अनुवाद : मोहिनी मोडक

Friday, December 25, 2015

जनरेशन गॅप- रस्सीखेच


जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी या विषयावरील ’रस्सीखेच’ हे सदर सरत्या वर्षाबरोबर आपलाही निरोप घेतं आहे. या विषयाशी निगडीत पिढ्यांमधील वैचारिक तफावत, सामाजिक, कौटुंबिक, राहणीमानातील बदल, पालकत्वाकडे पाहण्यात झालेला फरक, स्त्रियांकडे बघण्य़ाचे कालचे आणि आजचे दृष्टीकोन, वाचनाच्या बदललेल्या पद्धती, जुनी आणि नवी शैक्षणिक मूल्ये, अभिव्यक्तीची बदलत गेलेली शैली, तंत्रज्ञानामुळे रूंदावलेली दरी यासारख्या अनेक मुद्द्यांचा परामर्ष या सदरात घेतला गेला. इ-मेल वर बर्‍याच वाचकांनी आपले अभिप्राय दिले. वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं हा एक अतिशय आनंदाचा अनुभव होता. जगाचा विचार केला तर दोन पिढ्यांमधील अंतराची- जनरेशन गॅपची- कल्पना आक्रसते आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी पिढी बदलते, असे साधारणपणे मानले जाते. आता जगभरातली दोन पिढ्यांमधील अंतराची कल्पना जेमतेम सहा वर्षांवर येऊन पोचली आहे

काही बाबतीत मात्र भारतीय पिढ्यांमधे जनरेशन गॅप नाहीच की काय असं वाटायला लागतं. सन्माननीय अपवाद वगळता जुन्या मंडळींच्या कल्पना इतक्या पक्क्या झालेल्या असतात की, नवं सगळं त्यांना वाईट, अयोग्य, असभ्य वगैरे वाटत राहतं. नुकत्याच घडलेल्या शबरीमला मंदीरातील महिलांच्या स्कॅनिंग विषयीच्या विचाराचं उदाहरण घेतलं तर वरवर यावर नाराजी प्रकट करणार्‍या बहुसंख्य महिला सुद्धा मनातून मासिक धर्माला पिढ्या न पिढ्य़ा अपवित्रच मानत आल्या आहेत. शिवाय ते इतकं ठासून बिंबवलं जातं की आजच्या पिढीच्या देखील कित्येक तरूणी त्या बाबतीत विज्ञाननिष्ठ विचार करायला धजावत नाहीत. त्याच वेळेला दुसरीकडे भारतीय पिढ्यांमधे प्रचंड जनरेशन गॅप आढळून येते, उदा. द्यायचे तर आपणच कौतुकाने इंग्रजी माध्यमात घातलेला मुलगा किती सहजतेने संगणक, मोबाईल वापरतो, फाडफाड इंग्लिश बोलतो आणि आपण किती अडाणी आहोत, अशा न्यूनगंडाने अनेक पालक आज ग्रासलेले आहेत.

प्रत्येक मागच्या पिढीजवळ नव्या पिढीच्या तुलनेने संयम, आदर, त्यागी वृत्ती असते तर नव्या पिढीजवळ उमेद, बंडखोरी आणि ’मला काय हवय’ या बाबतीत स्पष्टपणा असतो. वेगाने धावू पाहणारी पिढी आर्थिकदृष्ट्या बऱ्याच लवकर सक्षम होत आहे. वडिलांनी निवृत्तीच्या वेळेतो केली तेवढी कमाई मुलं वर्षात करतात. त्यातून आत्मविश्वास वाढतो पण काहीसा अहंकार ही निर्माण होतो. यात समन्वय साधायचा तर मागच्या पिढीने दिलेल्या संस्कारांचे दोर बळकट हवेत. संस्कार म्हणजे फक्त ’शुभंकरोति’ म्हणणे नव्हे, माणूस घडवणे. कुठलीही असली तरी पौगंडावस्थेतील पिढी नेहमीच सैरभैर अवस्थेत असते. संस्कृतीतून, इतिहासामधून नेमकं काय घ्यायला हवं हे त्यांना समजत नसतं. परंतु सभोवतालातून, आजूबाजूच्या व्यक्तींमधून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पालकांकडून ते अभावितपणे खूप काही घेत असतात. नैतिक अधिकार प्रत्यक्ष कृतीतूनच कमवावा लागतो हे निश्चित. मुलं आपलं सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे पुढच्या पिढीने आपल्याशी जसे वागावे असे आपल्याला वाटते तसे आपण आपल्या मागच्या पिढीशी वागायला हवं.

पिढ्यांमधलं अंतर आवर्जून कमी करायचं तर दोन्ही पिढ्यांनी एकमेकांच्या जागी उभे राहून परिस्थितीकडे पाहिलं तर कदाचित एकमेकांच्या वागण्य़ाचा कार्यकारणभाव समजणं सोपं जाईल. नव्या पिढीचे जगण्याचे मार्ग वेगळे असतील पण ते अयोग्य नसतील असा विश्वास निर्माण होईल आणि मागची पिढी तरूणाई ला ’आऊटडेटेड’ वाटणार नाही.

जुनं ते सोनं हे बहुतांशी खरं असलं तरी सर्वच जुनं ते सोनं नाही. सरसकट एखाद्या पिढीला दोष देण्य़ापेक्षा जुन्यातलं आजही काय लागू होतं किंवा ते नव्या रूपात लागू करता ये ईल का याचा विचार करणं आणि काळानुसार बदलणं खरच इतकं अवघड आहे का! आल्फ्रेड नोबेल यांनी डायनॅमाईट सारख्या विनाशकाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की एकीकडे संशोधनातून जगाला विध्वंसाची साधने उपलब्ध करून देणारे नोबेल आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून हादरले, बदलले, इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल पारितोषिक..विशेषत: शांततेसाठी, जगविख्यात आहे. म्हणजे माणसात अगदी आमूलाग्र बदल होणं सुद्धा अशक्य नसतं. बदलाच्या लाटांमुळे थोडी खळबळ होईलही पण अथांग काळाबरोबर वाहत चाललेलं माणूसपणाचं तारू भरकटणार नाही एवढं नक्की. असा विचार केला तर जगणं सुखकर आणि आयुष्य सुंदर होईल. त्यासाठी मागच्या ,आजच्या आणि सळसळत्या वयातल्या उद्याच्या पिढीनही एकमेकांना इतकच सांगावं, ’कुछ तुम चलो, कुछ हम चले, दूरियां यों मिटाते चलें’.

Friday, November 20, 2015

जनरेशन गॅप - परदेश


’आजीबाई आजीबाई थकलात का? नेटवर नातवाला भेटलात का?
मुलांना शिकवून केला गुन्हा (!), परदेशी गेल्या लेकी सुना
नातवा नातवा येऊन जा, आजीच्या प्रेमात न्हाऊन जा
नातवाने वाचला नन्नाचा पाढा, रिकामा राहिला आजीचा वाडा’
या विषादपूर्ण ओळी व्हॉट्स ऍप वर वाचल्या. सहानुभूती साहजिक आजीच्या वाट्याला जाते आणि आजची पिढी- मुलं, सुना, नातवंडं दुष्ट ठरतात. खरं तर कुठलीच पिढी सरसकट काळी किंवा पांढर्‍या रंगाची नसते. मागच्या पिढीला येथेच सोडून परदेशी गेलेले सगळेच निष्ठूर, कृतघ्न वगैरे नसतात.

एका स्नेह्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला, संशोधन केले आणि पुढे लग्न करून तेथेच स्थायिक झाला. सुरूवातीला ते मुलाच्या प्रगतीचे गोडवे गाताना थकत नसत कारण मुलाला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात यशस्वी होताना बघणे हेच प्रत्येक पालकाप्रमाणे त्यांच्याही आयुष्याचे ध्येय होते. त्यातले अप्रूप आणि नावीन्य ओसरल्यावर आणि विशेषत: पत्नी निवर्तल्यावर त्यांना एकटे वाटू लागले. मुलाने तिकडे राहण्यास बोलावले परंतु तिथले हवामान, तिथली संस्कृती याच्याशी जुळवून न घेऊ शकल्याने ते भारतात परतले आणि एकटे राहू लागले. काही नातलगांनी ’एवढं शिकवलं मुलाला पण संस्कार तेवढे करायचे राहिले, आता घ्या’, ’आपल्या देशासाठी काही करायला नको, नुसती डॉलरची हाव!" वगैरे मुक्ताफळे उधळली. अशा नातलगांपैकी कित्येकांना परदेशी गेलेल्यांबद्दल असूया असते, आपल्याही मुलांनी परदेशी जावं असं स्वप्न असतं आणि नाहीच जमलं तर त्यांना एकदम ’देशप्रेम’ वगैरे आठवतं. आपल्याकडेही स्वेच्छेने किंवा नाईलाजाने गावी राहणारे आईबाप आणि शहरात स्थायिक झालेली पुढची पिढी हे चित्र काहीसे असेच नाही का! भारतात राहणारे सगळेच आपल्या देशासाठी काही महान कार्य वगैरे करतात का? कित्येक जण इथेच आयुष्य घालवूनही मॉल संस्कृतीचे गुणगान करीत येथील प्रत्येक गोष्टीला नाके मुरडत असतात. आजच्या काळात नवनवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, वैश्विक अनुभव घेण्यासाठी परदेशी जाणे म्हणजे पाप नाही. अर्थात आजन्म तिथे राहून स्वत:ला अकारण श्रेष्ट समजणे आणि स्वदेशाला नावे ठेवणे नक्कीच गैर आहे.

 'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात अपर्णा वेलणकर यांनी मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. विदेशात व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर परत आलेले अनेक जण भारतातील लाल फीतीच्या कारभाराला, भ्रष्टाचाराला कंटाळून पुन्हा परदेशी जातात. आपल्या समाजात अनेक रुढी,परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते त्यामुळे काहींच्या पत्नीचा परत येण्याला विरोध असतो. तिकडे जाऊन लोक संस्कृती विसरतात असाही एक आक्षेप घेतला जातो. ते तिकडे पूर्ण समरस होऊ शकत नाहीत आणि इकडे पुन्हा स्वीकारले जात नाहीत. एक अनुभव वाचनात आला, त्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या एका स्त्रीला तिच्या भारतातल्या आईने सुचवलं, "दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस." त्यातल्या त्यात तिथे भारतीय सणवार एकत्र येऊन साजरे करून भारतात नसल्याची उणीव भरून काढण्याचा ते आपल्या परीने प्रयत्न करतात. भारतीय कार्यक्रमांचे, कलाकारांचे तिकडे आवर्जून स्वागत करतात. इंटरनेटच्या माध्यमातून आपली नाळ देशाशी जोडून ठेवतात. आपल्या परकीय चलनाच्या गंगाजळीत त्यांच्यामुळे भर पडत राहते. अनेक परदेशस्थ भारतीयांनी येथील अनेक सामाजिक प्रकल्पांना भरघोस मदत दिलेली आहे. ती घ्यायला आणि त्यांच्यातल्या कुणाला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला की लगेच ते ’भारतीय वंशाचे’ आहेत म्हणून श्रेय घ्यायला मात्र आपण तयार असतो.

थोडक्यात परदेशी गेलेल्या सगळ्यांना एक तर नायक नाहीतर खलनायक ठरवण्याची टोकाची मानसिकता आपण बदलायला हवी. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न उरतोच की आपण आपल्या देशाचे काही देणे लागतो की नाही! निश्चितच. विशेषत: येथील आयआयएम, आयआयटी सारख्या अनेक नामांकित शिक्षणसंस्थातील विद्यार्थी त्या संस्थांचा शिडीसारखा उपयोग करतात आणि परदेशी निघून जातात. या पिढीने हे विसरता कामा नये की येथील सवलतींचा फायदा घेऊन मिळवलेल्या विशेष ज्ञानाचा देशाला उपयोग करून देणे त्यांचेही कर्तव्य आहे. ते त्यांनी इथे राहून पार पाडावे अथवा तंत्रज्ञानाच्या मदतीने तिथून. आजच्या पिढीत हे भान जपणार्‍यांची संख्या हळूहळू वाढते आहे ही फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे. ब्रेनड्रेनच्या प्रश्नाचा सुवर्णमध्य साधणार्‍यांची, परदेशात जाऊन उच्चशिक्षण आणि अनुभव घेऊन, जगाच्या स्पर्धेला तोडीस तोड उत्तर देऊ शकतील असे फॅशन, वैद्यकीय क्षेत्रा पासून सौर उर्जेपर्यंत अनेक बहुराष्ट्रीय प्रकल्प भारतात सुरू करण्यासाठी परतणार्‍यांची संख्या वाढते आहे. (संदर्भ: इकॉ. टाईम्स २४-१-१५) ’स्नॅपडील’ या वेबसाईटद्वारा येथील रोजगारनिर्मितीत भर घालणार्‍या रोहित बन्सल आणि कुणाल बहल सारखे, अनेक परदेशस्थ भारतीय तरूण विवीध उद्योगधंद्यांच्या विस्तारासाठी मायदेशाची निवड करू लागले आहेत. स्वदेशाबद्दलची बांधीलकी केवळ देशात राहूनच जपता येते आणि तरच देशप्रेम सिद्ध होते असे नाही तर देशासाठी असे काही तरी केल्यामुळे सिद्ध होते.

प्रत्येक दोन पिढ्यांमधला हा संघर्ष आता पंचक्रोशी किंवा प्रांत ओलांडण्यापुरता उरला नाही तर सातासमुद्रापार पोचला आहे. वेलणकरांनी म्हटल्यानुसार जागतिकीकरणाची अपरिहार्यता म्हणून पुढच्या पिढीच्या रूपाने स्वदेश-परदेशाच्या निवडीचा संघर्ष तुमच्याही आयुष्यात रोरावत येईल तेव्हा मूल्यसंस्कारांची मुळे घट्ट रोवून त्याला आनंदाने आणि खुल्या मनाने सामोरे जायला हवे.