तुम्हाला आदिती आर्या कोण हे माहीत आहे? तिने या वर्षीचा मिस इंडीय़ा किताब पटकावला आहे. बरं, गेल्या वर्षीची विजेती ,कोयल राणा आठवत असेल. ती ही नाही? तुम्हाला ऐश्वर्या, सुश्मिता, प्रियांका, लारा मात्र अजूनही लगेच आठवतात. लकाकते मुकुट घातलेले त्यांचे रूपवान चेहरे, त्यांचे निकाल ऐकून विस्फारलेले चमकदार डोळे आजही तुमच्या नजरेसमोर आहेत, मग या आजच्या सुंदरी तुम्हाला का आठवत नाहीत? कारण सोपं आहे, या आजच्या मुली फक्त भारतसुंदरी आहेत, त्या जगतसुंदरी किंवा विश्वसुंदरी होऊ शकलेल्या नाहीत. ९० च्या दशकानंतर कुणीही भारतीय सुंदरी विश्वसुंदरी ठरलेली नाही.
अचानक असे काय झाले की जागतिक पातळीवर पोचलेल्या भारतीय सौंदर्याला पार ओहोटी लागली? कारण सोपे आहे, ते जागतिकीकरणाचे दशक होते. भारतातील नव्या मध्यमवर्गाचे रूपांतर ग्राहकामधे करण्याचा, या स्पर्धांचे प्रायोजक म्हणून मिरवणार्य़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मनसुबा या सहस्त्रकाच्या आगमनापावेतो सफल झाला.
१९३४ मध्ये डी मिले ने दिग्दर्शित केलेला ‘क्लिओपात्रा’ हा सिनेमा व त्याच्या निर्मितीची कथा यादृष्टीने लक्षात घेण्याजोगी आहे. त्यात कलेचा भागही होता पण अमेरिकन उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची निर्मिती हा अंतस्थ हेतू होता. जबरदस्त जाहिरातीमुळे या चित्रपटाने जगभरात जोरदार धंदा केला. मुख्य भूमिकेतली क्लाउडेटी कोलबर्ट ही अमेरिकन अभिनेत्री युरोपियन प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. मूळ युरोपियन संस्कृतीत अमेरिकन उत्पादनांविषयीचे आकर्षण रूजले. चित्रपट संस्थांशी जोडलेल्या साखळी-दुकानांतून पिनांपासून कपड्य़ांपर्यंत अनेक ’क्लिओपात्रा उत्पादने’ विक्रीस आली. लक्स साबणापासून ओल्ड गोल्ड सिगारेट पर्यंत अनेक कंपन्यांशी व्यावसायिक संधान बांधले गेले. (संदर्भ: मेरी हमर) कपडे किंवा वस्तूच नव्हे तर दृष्टिकोन, विचार, मूल्ये, श्रध्दा सगळ्यांचेच अमेरिकीकरण करण्याची ताकद हॉलिवूडच्या चित्रप्रदर्शनात होती आणि आहे. ९० च्या दशकात हीच क्लॄप्ती बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय मानसिकतेला व राहणीला बदलवण्य़ासाठी सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून वापरली.
तसे पाहता भारतीय स्त्री विश्वसुंदरी होण्यात गैर काय, असे मनात येते. (प्रख्यात वृत्तपत्रांनी सुद्धा त्या यशाचे वार्तांकन ’world's envy, India's pride' असे केले होते). त्यासाठी या स्पर्धांची परिणीती लक्षात घ्यायला हवी. प्राचीन काळी मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी माहिती आढळते. यूरोपमध्ये ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे कलाकार, कवी, बुद्धिवंत, आणि सेनापती असत. (संदर्भ- विश्वकोश) १९५४ मध्ये ‘मिस् अमेरिका’ ही सौंदर्यस्पर्धा तेथील दूरचित्र-वाणीवर प्रसारित झाली आणि मग हे लोण जगभर पसरत गेले. जागतिकीकरणानंतर एकाएकी या स्पर्धा भारतीय सुंदरी जिंकू लागल्या, मग निदान यातून भारतीय स्त्रीचे सामाजिक स्थान वगैरे बदलले का! नाही. नव्वदच्या दशकानंतर तमाम मध्यम -उच्चमध्यमवर्गीय पालकांना आपली मुलगी जागतिक व्यासपीठावर चमकत असल्याची दिवास्वप्ने मात्र पडू लागली होती. असे निरिक्षण संतोष देसाई हे जाहिरात क्षेत्रातले तज्ज्ञ नोंदवतात.
म्हणायला या स्पर्धांमधे बुद्धीचातुर्याचा समावेश होता परंतु प्रत्यक्षात स्त्रीने कसे दिसावे, बोलावे, चालावे, बसावे किंवा वावरावे याचे निकष यातून ठरू लागले. या बिरूदांमधे भारतीयत्वाचा सन्मान नव्हताच उलट आंतरराष्ट्रीय मानका नुसार चेहरा-३० टक्के, बांधा-२० टक्के, चाल-२० टक्के, व्यक्तिमत्व-२० टक्के आणि हजरजबाबीपणा-१० टक्के अशी चक्क विभागणी करून सौंदर्यवती(!) घडवण्य़ासाठी प्रशिक्षण दिले जाऊ लागले. बाईची कचकड्याची बाहुली झाली, पण हे इथेच थांबले नाही.
कार्ल मार्क्सच्या उक्तीनुसार, उत्पादनं आणि देवाणघेवाणीची इतकी प्रचंड साधनं तयार केली गेली आहेत की आता त्याची परिस्थिती एका गोष्टीतल्या जादूगारासारखी झाली आहे. त्याने जगावर राज्य करण्य़ासाठी आपल्या जादूटोण्याने इतकी भुतं निर्माण केली की त्यांच्यावर ताबा ठेवण्याला आता त्याची स्वत:ची शक्ती अपुरी पडू लागली आहे. या साधनांच्या धुंदीमधे सौंदर्याचे सारे संदर्भ बदलू लागले. भारतीय स्त्री सौंदर्य किंवा शरीरसौष्ठवाच्या व्याख्या राजा रविवर्मा किंवा दीनानाथ दलालांच्या चित्रांमधे अडकून पडणं शक्य नव्हतं, त्या कालानुरूप नैसर्गिकपणॆ बदलत गेल्या असत्या. मात्र सौंदर्यस्पर्धांच्या माध्यमातून पाश्चात्य जगाने त्यांच्या व्याख्या भारतीयांवर लादल्या आहेत. भारतीय सिनेअभिनेत्रीच नव्हे तर सर्वसामान्य स्त्रियादेखील त्या व्याख्येला अनुरूप होण्य़ासाठी जीवाचा आटापिटा करत असतात. भारतीय आहारशास्त्राला अव्हेरणारे ’झीरो फिगरचे’ खूळ त्यातूनच निर्माण झाले. कुपोषित मॉडेल्सच्या फौजा रॅम्पवर चालू लागल्या. यातून झालेली रोजगारनिर्मिती काही अंशी फायद्याची मानली तरी या ग्लॅमरजगातली स्पर्धा आणि त्यातून जगाला स्त्री शोषणाचा मिळालेला नवा मार्ग हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. ग्लॅमरचे वेड आणि दिखाऊपणाच्या नादात आजची तरूणाई सोशल नेटवर्किंगच्या आभासी जगात आणि स्वप्रतिमेत गुरफटत गेली आहे. जगण्य़ातली साधी सोपी मूल्य झाकोळून गेली. सौंदर्यस्पर्धा किंवा फॅशन शोकरिता अनेक मॉडेल बोटॉक्स उपचार करून घेत. पण आता मात्र लहान मोठ्या समारंभाला जाण्यासाठी केवळ तीन-चार माहिनेच परिणाम टिकणार्या अशा उपचारांना तरुणी प्राधान्य देत आहेत. मानसोपचारतजज्ज्ञ म्हणतात, त्याच्या अतिवापराने चेहरा निर्विकार होतो. कित्येकदा कॉस्मेटिक शस्त्रक्रिया फसतात, तसे झाल्यास ती तरुणी नैराश्याने ग्रासली जाण्याचीही शक्यता असते. सध्या भारतात चरबी काढण्य़ासाठी होणार्या लिपोसक्शन शस्त्रक्रियेला जास्त मागणी आहे. याचा खर्च दोन लाखांपर्यंत असतो. पुरूषही यात मागे नाहीत. आत्तापर्यंत स्त्रियांच्या जगणय़ाभोवती असलेल्या कृत्रिमतेच्या विळख्यात पुरूषही सापडले आहेत.
गोर्या रंगाचे आकर्षण भारतात ब्रिटीश राजवटीपासून रूजले, जेत्यांचा रंग आपल्यालाही लाभावा यासाठीच्या आकांताला सौंदर्यस्पर्धांमधल्या विजेत्या युवतींनी जाहिरातींमधून खतपाणी घातले. ACNielsen या कंपनीच्या अहवालानुसार भारतातला गोरेपणा देण्याचा दावा करणार्य़ा क्रीम्सचा खप २०१० साली २६० अब्ज रूपयांवर वर होता ,तो दरवर्षी १८ % इतक्या वेगाने वाढतो आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री भक्कम मानधन घेऊन अशा जाहिराती करत असताना अभिनेत्री नंदिता दासने मात्र ’सौंदर्य आणि यश हे गोरेपणावर अवलंबून असते,’ या समजुतीला आव्हान दिले आहे.’ डार्क इज ब्युटिफुल’ या मोहिमेची प्रचारकर्ती नंदिता दास म्हणते, आपण जसे, ज्या वर्णाचे आहोत तसेच स्वत:ला स्वीकारा, त्वचेच्या रंगापेक्षा महत्वाचे आयुष्यात खूप काही आहे, त्याचा शोध घ्या. आपण सुंदर, आकर्षक दिसावे, आपली छाप पडावी ही साधी सहज मानवी भावना आहे. त्यात काहीही गैर नाही पण ही भावना आयुष्य व्यापून टाकेल इतकी मह्त्त्वाची आहे का! कर्तृत्वाचे, विचारांचे सौंदर्य वाढवण्य़ाचा विचार आपल्या मनांमधे कधी डोकावणार की नाही !
तुलनेने इतर देश आता या संदर्भात बदलू लागले आहेत. नीना दावुलुरी ही भारतीय वंशाची उच्चविद्याविभूषित सावळी तरूणी दोन वषापूर्वी ’मिस अमेरिका’ म्हणून निवडली गेली. त्यावर अनेक भारतीय अमेरिकनांनी, ही मुलगी भारतातल्या सौंदर्यस्पर्धात कधीच यशस्वी ठरू शकली नसती अशी प्रतिक्रिया दिली. पुरूषसत्ताक समाजाने निर्माण केलेली ही स्पर्धा आहे या भावनेतून आजच्या सुविद्य मुली यापासून काहीशा दूर राहायला लागल्या आहेत. मिस ग्रेट ब्रिटन साठी गेल्या वर्षी फक्त एका भारतीय वंशाच्या मुलीची प्रवेशिका आली होती. तरूणाईने दर्जेदार व्यक्तिमत्व स्पर्धा जरूर गाजवाव्यात परंतु तथाकथित सौंदर्याच्या छोट्य़ा आणि कोत्या व्याख्यांपलीकडे जाऊन स्वत:ची रेघ मोठी करावी. संस्कॄतीतल्या उत्तम मूल्यांशी तडजोड न करता आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्य़ाचे आव्हान पेलायला हवे. भारतीय स्त्रीने खुज्या आणि तकलादू स्पर्धांच्या पलीकडे जाऊन आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या आंतरिक सौंदर्याची मोहोर जगावर उमटवता येईल इतकी उंची गाठायला हवी.
('दिव्य मराठी' मध्ये कॅन्व्हास पानावर प्रसिद्ध झालेला लेख )