Friday, May 8, 2015

जनरेशन गॅप - विज्ञान


"भगवान की लीला" सांगणारा एक मेसेज आला, त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल असही लिहीलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अ‍ॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप(!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा. "ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस असं आई म्हणाली" असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टाईलिश राहणीवरून, चटपटीत वागण्य़ावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्य़ावरून. वृत्ती आणि विचारांनी देखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोन बाळगणारी असती तरच त्यांना खर्‍या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धीवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठेतरी कमी पडली असावी का!

 आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्य मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकीत्सेची भिती असते ती फक्त अंधश्रद्धेला, खर्‍या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ’उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे ’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असाय़ला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. पाकिस्तानसारख्या देशात तर धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की त्याची परिणीती जिहादी तरूणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढ्त्या संख्येत होताना दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍र्‍या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.

 या वर्षाच्या सुरूवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स कॉंग्रेसच्या एका परिसंवादात राईट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षापूर्वी भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’ पासून ते आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणाऱ्या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव तार्‍याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ’सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वला संदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्य़ापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी तरूणांमधे वैज्ञानिक दॄष्टीकोन विकसित करायला हवा. भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्य़ासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवांशासह त्या नावेस बुडविल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग वर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्ती सांगड घालण्य़ाचा तरूणाईचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा "खरा सनातन धर्म कोणता,' हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, "हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने पुढे थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्र्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्र्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.'

 भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपी च्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दॄष्टीकोनावर ही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर ती सुद्धा एक देशसेवाच ठरेल. प्रत्येक बाब बुध्दीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठिण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करणे आणि त्यांची उत्तरे शोधण्य़ासाठी प्रयत्नशील राहणे हे आजच्या पालकांनी केलं तरच इतिहासासारखे आपले भविष्य देखील अभिमान बाळगावा असे घडेल. 

Friday, April 24, 2015

जनरेशन गॅप - अलिया आणि आयक्यू


आजच्या पिढीची स्मार्ट सिनेतारका, ’अलिया भट्ट’ वरून केलेला विनोद कुणीतरी आपल्याला (आणि साधारणपणे आपणही कुणालातरी) पाठवल्याशिवाय सध्या कित्येकांचा दिवस मावळत नाही. एक बरय की हे विनोद निखळ असतात, अश्लील नसतात, फक्त तिच्या बुद्धूपणाची खिल्ली उडवणारे असतात. या विनोदांना हसताना आपला बुद्ध्यांक तिच्यापेक्षा किती बरं उच्च आहे हे जाणवून वाचणारा आतून खूष होतो. मुळात ही आजची अभिनेत्री विनोदाचा विषय ठरली ते एका वाहिनीवरील ’कॉफी विथ करण’ या शोमुळे. यात प्रश्नांच्या फैरीला उत्तर देताना, पृथ्वीराज चव्हाण यांना देशाचे राष्ट्रपती घोषित करून तिने तिच्या अचाट 'सामान्य ज्ञाना'ची झलक दाखवली होती. तिच्यावर ’मूर्खशिरोमणि’ असा शिक्का बसायला हे निमित्त झाले. आता किमान देशाच्या राष्ट्रपतींचं नाव तिला माहीत असायला हवं होतं हे निर्विवाद. मात्र केवळ स्मरणशक्ती म्हणजे बुद्धीमत्ता नाही आणि 'टीका सकारात्मकपणे, खिलाडूवृत्तीनेही घेता येते' हे दाखवून देण्यासाठी आलियाने तिच्यावर हसणा-यांना प्रत्युत्तर देणारा ’जीनीयस ऑफ द इयर’ हा एक झकास व्हिडिओ पोस्ट केला आहे. ’ब्रेन जिम’ च्या मदतीने ती तिचं सामान्यज्ञान चांगलच वाढवते हे यात अगदी गमतीदार पद्धतीने दाखवलय. तरीही ’तिला माहीत नाही’ असं काहीतरी या जगात शिल्लक राहतच असा या व्हिडीओचा मार्मिक शेवट, बुद्ध्यांकाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीवर शब्दांवाचून भाष्य करतो.

आयुष्य़ प्रसन्न मनाने जगण्यासाठी त्यात थोडा विनोद हवाच परंतु अलियावरच्या विनोदांच्या निमित्त्याने आपला बुद्ध्यांक किती आहे हे विशेषत: आजच्या पिढीने तपासून पाहायला हवं. स्मरणशक्तीला कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, प्रतिभा आणि विवेक यांची जोड असेल तरच ती सर्वंकष बुद्धीमत्ता. ह्याची जाणीव नसलेली मुलं केवळ घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवतात आणि पालकांसह समाजही त्यांना बुद्धीमान मानू लागतो. इतर चार पैलूंचे ज्ञान नसले तर ही मुलं यशाचं सातत्य राखू शकत नाहीत. आजच्या शिक्षणपद्धतीत केवळ विश्‍लेषण कौशल्य (ऍनॅलॅटिकल स्किल्स) विकसित करण्यावर भर असतो. एकाग्रतेचे कौशल्य (अटेन्शन स्किल्स), सर्जनशीलता वाढवणे, चिंतन-मननाची कौशल्ये याकडे लक्ष दिले जात नाही. या कौशल्यांशिवाय व्यवहाराचा आणि यशापयशासह जगण्याचा तोल सावरता येणे कठीणच.

 मध्यंतरी एका स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासकेंद्रातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा योग आला. मुलं निमशहरी भागातली पण चुणचुणीत वाटली. त्यांना काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले. बहुतेक उत्तरं मुलांनी अचूक आणि त्वरित दिली. बरे वाटले, मग सहज त्यांना विचारले,’ ’नक्षलवाद’ म्हणजे काय?’ एकदम शांतता पसरली. जेमतेम एकदोन मुलांनी ’सरकार अन्याय करतं त्याला विरोध’ अशी ढोबळ उत्तरं दिली. उद्या करियर करताना या मुलांना चर्चा, मुलाखती, ग्रुप डिस्कशन्स याला सामोरे जावे लागेल. तिथे बाजी मारण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी नाही तिथे खर्‍या बुद्धीमत्तेचा कस लागेल तेव्हा रोजचे वर्तमानपत्र देखील वाचायचा कंटाळा असलेली ही मुलं त्याला कसं तोंड देणार ! मोबाईलचे नवनवे मॉडेल्स आणि ऍप्स सहजतेने हाताळणार्‍या तरूणाईला बरेचदा अनेक मुलभूत गोष्टी माहीत नसतात. ’पेपरमधे छापून आलय ना! मग ते खरच असलं पाहिजे’ असा मागच्या पिढीचा भाबडा समज असायचा. आजच्या पिढीतील अनेकांचा ’इंटरनेट वर असलेलं सगळं शंभर टक्के अचूक असतं’ असा समज आहे. सर्च इंजिन हा फक्त माहिती पर्यंत पोचवणारा दुवा आहे हे लक्षात घेतलं जात नाही. ’गुगल’ वापरून सामान्यज्ञान उत्तम असण्याचा आभास
म्हणजे चांगला बुद्ध्यांक नव्हे. गुगल किंवा एकूणच तंत्रज्ञानाची मदत घेण्यात गैर काहीच नाही परंतु त्याला व्यासंगाचा, विचारांचा पाया हवा. अन्यथा ही मुलं बरेचदा वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यात अयशस्वी ठरतात, वैफल्यग्रस्त होतात. ह्याला जबाबदार आहे ’हुशारी’ ची तोकडी व्याख्या.

 मेंदूचा उजवा भाग हा भावनिक, कलात्मक तर डावा भाग तर्क बुद्धीशी निगडित असतो असे मानले जाते. तरीही मेंदूचे दोन्ही भाग एकमेकांच्या साह्याने काम करतात, हे आता सिद्ध झाले आहे. कलेच्या निर्मितीसाठी भावनात्मक उजव्या मेंदूला डाव्याची मदत होते त्याचप्रमाणे विज्ञानातील शोध नुसत्या तर्कबुद्धीने लागत नाहीत. त्याला ऊर्मीची, म्हणजे उजव्या मेंदूची गरज लागते असे या क्षेत्रातले एक तज्ञ डॉ. आनंद जोशी सांगतात. सखोल वाचन, बहुश्रुतता, पर्यटन, वेगवेगळ्या कलांचा आस्वाद, विशेष प्रशिक्षण अशा अनेक मार्गांनी या दोन्ही मेंदूंना चालना दिली जाऊ शकते. हे सगळे केवळ व्यावसायिक यशासाठी करायचे नसून निखळ बौद्धिक आनंदासाठी आणि जगणं सुंदर करण्यासाठी करायचे आहे. तेव्हा विनोदांवर हसता हसता, आपल्यातही एक ’अलिया भट्ट’ लपलेली असते, तिला शोधून काढून तिचा बुद्ध्यांक वाढवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू करायला हरकत नाही.

Friday, March 27, 2015

जनरेशन गॅप - अभिरूची


एका संगीतविषयक कार्यक्रमात प्रसिद्ध सिंथेसायझर वादक सत्यजीत प्रभू मागील पिढ्यांपासून आजच्या पिढीपर्यंत संगीतात होत गेलेल्या बदलाबद्दल बोलत होते. सहवादकाने त्यांना म्हटलं, "मेलडी हरवत चाललीय, हल्लीच्या कित्येक गाण्यांचा ’राग’ कोणता हे देखील ओळखता येत नाही, आता ’लुंगी डान्स’ चा राग कुणाला ओळखता तरी येतो का? त्यावर प्रभूंचं उत्तर होत, "मला येतो ना! ....राग ’अनावर’ ". यातला गमतीचा भाग सोडला तरीही आजच्या पिढीच्या कलेबाबतच्या..विशेषत: जनमानस व्यापणार्‍या संगीतकलेबाबतच्या अभिरूचीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहतं.

 असं म्हणतात की साहिर लुधियानवी चित्रपटासाठी गीतलेखन करताना संगीतकारापेक्षा एक रूपया जास्त मानधन घेत असत. गाण्यात सुरांइतकच किंवा त्याही पेक्षा शब्दांचं महत्व अधिक असं त्यांना वाटत असायचं. सिनेगीतातल्या ’काव्या’ला इतकी किंमत असण्याचा तो काळ केव्हाच मागे पडला. आता शब्दांवर सुरांचं केवळ आक्रमणच झालेलं नाही तर अतिक्रमण झालेलं आहे. हिंदी सिनेसंगीतात पंजाबी, इंग्रजी शब्दांच्या मधे आणि वाद्यांच्या दणदणाटात त्यातल्या काव्याला अगदी खालचं स्थान असतं. टॉलस्टॉयच्या मते कला माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा. कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे, जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. हा निकष अनेक टीकाकारांना मान्य नव्ह्ता. आजही तो संगीताच्या बाबतीत मान्य करायचा तर केवळ ठेक्यामुळे सर्वसामान्यांना (मासेस) चटकन भावणारी हिंदीत धुमाकूळ घालणारी ’मुन्नी, फेविकॉल, शीला’ वगैरे प्रकरणं आणि मराठीतली त्याची ’कोंबडी, रिक्षावाला’ वगैरे रूपं महान कलाकृती म्हणून गणली गेली असती. या विरोधी टीकाकारांच्या मते कलाकृती व्यवस्थित कळायला आस्वादकाची तेवढी पात्रता व तयारी असायला हवी आणि म्हणूनच खालावलेल्या अभिरूचीबद्दल फक्त आजच्या पिढीला दोष देता येणार नाही.

आजच्या पिढीचा ’कान’ आणि ’डोळे’ तयार करण्याची जबाबदारी या आधीच्या पिढीची होती. परंतु ८० च्या दशकापासून ’उमराव जान, बाजार’ सारख्या चित्रपटांचे अपवाद सोडले तर सिनेसंगीताचा दर्जा उतरणीला लागला. संगीत नाटकं जवळपास बंद झाली, शास्त्रीय संगीताची समज आणि रसिकांची टक्केवारी अधिकच उणावली. जागतिकीकरणानंतर वाढत गेलेल्या चंगळवादाचा परिणाम संगीतावरही झाला. बाजाराची मागणी तसा पुरवठा करण्याच्या नादात भाषेचा दर्जाही खालावत गेला. आज सोशल नेटवर्किंगवर कित्येकदा अगदी सुमार दर्जाच्या, ट ला ट जुळवणार्‍या कविता शेअर केल्या जातात, त्याला हजारो लाईक्स मिळतात. त्याचीच पुढे ’गाणी’ होतात. ती ’गाजतात’. आशयघन साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्याइतका वेळ आजच्या धावपळीच्या जगात आहे कुणाला! मैफिलींचा श्रोता म्हणून आनंद लुटण्याइतका निवांतपणा कुणाजवळ फारसा नाही. शिवाय आजच्या ’सबकुछ इन्स्टंट’ पिढीला लगेच ’बोssssर होतं’. कलेमधे गुणवत्तेपेक्षा, रियाजापेक्षा सादरीकरणाला अवास्तव महत्व आलं आहे. क्वचित एखादं उत्तम गाणं गायक उत्कटपणे सादर करत असतो आणि अचानक विंगेतून वेगाने एक नर्तकांची फौज येते आणि गायकाला घेरून नाचू लागते, रंगीबिरंगी दिव्यांची जोरात उघडझाप सुरू होते आणि या गदारोळात ते गाणं कुठेतरी हरवून जातं.

 पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये असा आग्रह धरणार्‍या क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्या भागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हल्ली त्याची जागा सवंग ’आयटम सॉंग’ ने घेतली आहे. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असा संकेत होता. दुर्दैवाने या कला(!) प्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरूवात केली आहे, ’नाही रे’ गटाने नव्हे तर गटनेत्यांनी ’आहे रे’ गटाच्या अभिरुचीच्या व्याख्यांना आव्हान द्यायला सुरूवात केली आहे. खरं तर एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी तिच्यातली नैतिक बाजू आणि पर्यायाने गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. या पार्श्वभूमीवर आजही जेव्हा एखादा अभिजीत पोहनकर ’पिया बावरी..’ सारखी दर्जेदार फ्यूजन कलाकृती निर्माण करतो, एखादे काळजाला हात घालणारे सूफी गीत कानावर पडते, ’बिलनच्या नागीनी; पलिकडे जाऊन आनंद शिंदे ’चल ग सखे पंढरीला’ म्हणतात, बालगंधर्व मधली ’चिन्मया सकल हृदया..’ सारखी रिंगटोन एखाद्या विशीतल्या मुलाच्या मोबाईलवर वाजते, विवीध वाहिन्यांवरचे लिटील चॅम्प्स तयारीने गातात, गुलजार, जावेद अख्तर सारख्यांच्या रचना, अमिताभ भट्टाचार्यचे ’रे कबीरा ....’ सारखे अर्थगर्भ गीत मनाचा ठाव घेते तेव्हा जाणवतं..सगळच काही संपलेलं नाही. अल्प प्रमाणात का होईना पण संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत आणि माध्यमांच्या मदतीने ते वेगाने सर्वदूर पोचत आहेत. पिढी बदलते आहे, आस्वादक्षमता बदलते आहे. ती जोपासायला हवी.

साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाटयसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कौशल्य निर्माण होते. लोकप्रियता आणि गुणवत्तेचा समन्वय साधला जाऊ शकतो. तेव्हा गरज आहे ती उमद्या कलाकारांना प्रोत्साहन आणि कलेतील प्रयोगांना दाद देण्याची, नवतेचा स्वीकार करण्याची आणि वैविध्यपूर्ण संगीतकलेचे संस्कार आजच्या पिढीवर करण्याची.