कालांतराने त्याला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी तो घरी परतला. जगाचे अनुभव घेऊन आता तो समंजस झाला होता. कागदपत्रे बघता बघता त्याला वडिलांनी दिलेले पुस्तक सापडले. त्याने सहज पुस्तकाचे वेष्टन उघडले आणि त्यात त्याला बाईकची किल्ली अडकवून ठेवलेली दिसली. मुलाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते; पण आता उशीर झाला होता. एव्हरीवन इज गिफ्टेड, बट सम पिपल डू नॉट ओपन देअर पॅकेज, हे सांगणारी ही गोष्ट...
माणसाचं आणि नियतीचं नातं काहीसं असंच आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आकांक्षांना प्रयत्नांची जोड दिली, तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मात्र ती आपल्याला अपेक्षित असलेल्या वेष्टनात असेलच असे नाही. आपल्या वाट्याला आलेल्या कित्येक गोष्टी केवळ वेगळ्या आवरणात असल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. कवी अशोक नायगावकर म्हणतात, 'निसर्ग पाहायला म्हणून निघालो... गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती'... तशी आपली अवस्था असते.
कुणाला कलेची, कुणाला बुद्धिमत्तेची, कुणाला सर्जनशीलतेची, कुणाला रूपाची तर कुणाला असाधारण क्षमतेची, अशा वेगवेगळ्या देणग्या जन्मजात लाभलेल्या असतात. मात्र 'काय नाही' याची यादी करण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्यामुळे 'काय आहे' याकडे आपले दुर्लक्ष होते.
'स्थिती आहे तैशापरी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे॥'
म्हणणारे तुकाराम महाराज, काय गमावलंय यापेक्षा काय कमावलंय इकडे लक्ष द्या हेच सांगतात.
आनंदात चालणं व आपलं वेगळेपण शोधणं हा जगण्याच्या चकव्यातनं बाहेर पडायचा चांगला मार्ग आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार द्विधा मनाला शांत करतो आणि नि:शंक मनच प्रगती करू शकतं. ओशोंनी मनाची दोलायमान स्थिती सहज शब्दात मांडली आहे,
'मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'
याचं कारण आपण उद्याच्या विचारात इतके हरवतो की 'आजचा क्षण' साजरा करायचा राहूनच जातो.तेव्हा आपल्याला मिळालेला आयुष्याचा सुंदर नजराणा स्वत: उघडून पाहायला हवा, आजच! आत्ता !
(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)