Thursday, June 19, 2014

काय आहे अंतिम सत्य?


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २१ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

' या जगात संपूर्णतया चूक असं काहीच नसतं, अगदी बंद पडलेलं घड्याळही दिवसातून दोनदा योग्य वेळ दाखवतंच ना! ' असं पाऊलो कोएलो या लेखकाने म्हटलंय. या वाक्यातली खोच माणसाच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यालाही लागू पडते. काळाच्या कोणत्या तुकड्यावरून, कोणत्या बाजूला उभे राहून आणि कोणत्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे पाहतो त्यानुसार आपली भूमिका ठरते. ईश्वराविषयीच नव्हे, कोणत्याही स्वरूपातील श्रद्धा म्हणजे ' आस्तिकता ' आणि ' डोळे झाकून एखादी गोष्ट स्वीकारायला दिलेला नकार ' म्हणजे ' नास्तिकता '. परंतु हे शब्द प्रामुख्याने ईश्वरनिष्ठेशीच जोडले गेले आहेत. ' माणसातला देव ' शोधणाऱ्या व्यक्तीला नास्तिक म्हणता येणार नाही. नवस बोलून देवाशी देण्याघेण्याचे ठरवणाऱ्याला आस्तिक कसे म्हणता येईल? विवेक महत्त्वाचा असतो. धर्मातील तत्त्वांवर बऱ्याचदा त्याच्या अनुयायांचा अहंकार मात करतो; तसेच काहीसे या बाबतीत घडताना दिसते.

खलील जिब्रानच्या एका लघुकथेमधे एक आस्तिक आणि एक नास्तिक विद्वानांचा वाद होतो. दोघेही तावातावाने सभेत आपापली बाजू मांडतात. सभा संपते. परंतु त्याचा परिणाम होऊन आस्तिक विद्वान नास्तिक होतो. जवळचे सारे धार्मिक ग्रंथ जाळून टाकतो. तर नास्तिक विद्वान देवालयात जाऊन आजवरच्या पापांसाठी देवाची क्षमा याचना करू लागतो; तो आस्तिक होतो. ज्यांच्या निष्कर्षांमागे वैश्विक विचार नसतो, अशा आततायी आणि संभ्रमित आस्तिक/नास्तिकांचे व्यक्तिश: आणि समाज म्हणूनही नुकसान होते. मूल्यबैठक नसलेले विज्ञान विध्वंसाच्या दिशेने जाऊ शकते; तर तर्कसंगत नसलेली श्रद्धा अंधश्रद्धेला जाऊन भिडू शकते. ज्यांच्या आस्तिक/नास्तिकतेला अभ्यासाचं आणि चिंतनाचं पाठबळ आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या-त्या भूमिकेमुळे अधिकाधिक उन्नत होते. त्याला अध्यात्मिक प्रगती म्हणायचे की वस्तुनिष्ठ विकास हे त्यांनीच ठरवायचे. गांधीजींच्या आस्तिकतेला सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरिण या भूमिका बदलतानाही दिसतात; पण त्यामागे सर्वंकष विचार, विशिष्ट अनुभूती असते. सुरुवातीला आपल्या कवितेतून ' तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन ' असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा कवितेचे उत्तर असते.. ' स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही | उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||'

प्रख्यात विचारवंत रिचर्ड डॉकिन्स एका टप्प्यावर स्वत:ला ' अज्ञेयवादी ' मानू लागले. ' देवाच्या अस्तित्वाचं ज्ञान मला अजून झालेलं नाही त्यामुळे मी नास्तिकही नाही, ' अशी त्यांची भूमिका होती. गौतम बुद्धांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकजण सत्याचा शोध घेता घेता ज्ञानी झाले. आस्तिकता असो वा नास्तिकता; तो या सत्यशोधनाच्या मार्गावरचा एक थांबा आहे. अंतिम सत्य नव्हे. आपल्यासारख्यांना किमान या थांब्यापर्यंत पोचायचे असेल तर त्यासाठी वैचारिक घुसळण व्हायला हवी. वैयक्तिक अनुभवांवर आधारलेली आपलीच भूमिका योग्य असा अट्टाहास नसावा. हा प्रवास ज्ञानाच्या दिशेने होत असल्याने त्यात आपले आणि पर्यायाने मानवजातीचे कल्याणच आहे.
 ' तुका म्हणे होय मनासी संवाद,
आपुलाचि वाद आपणासी।
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही,
मानियेलें नाही बहुमत।। '

मीपण फोडिता फुटेना


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

उसळणाऱ्या लाटांचे रौद्र रूप पाहात एखाद्या महासागराच्या तीरावर किंवा खळाळत कोसळणाऱ्या एखाद्या महाकाय प्रपातासमोर आपण उभे असलो तर निसर्गाचे हे विराट रूप पाहून आपण स्तिमित होतो, स्तब्ध होतो. आपल्या आयुष्याची पत आणि प्रत काहीही असली तरी या भव्यतेपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. एका अर्थी ' मी ' आपल्यापासून बाजूला होतो. परंतु ही भावना बऱ्याचदा क्षणभंगुर असते.
' जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।। ' असे कवी बा. भ. बोरकर सांगून जातात. दासबोधात सांगितलेले ' मी पणा ' चे हे परिणामदेखील आपल्याला उमजत असतात. ' मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे। अभिमान अंगी।। मीपणे विकल्प उठे। मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा।। ' आपल्याला हेदेखील मान्य असते... ' मीपण कोणासिच न साहे। ते भगवंती कैसेनि साहे। म्हणौनि मीपण सांडूनि राहे। तोचि समाधानी।। ' मात्र भल्याभल्यांचा ' मी ' पणा सुटत नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय! आपण रोजच्या आयुष्याकडे वळताच, दूर नेऊन सोडून दिलेल्या मांजराच्या पिल्लासारखा, हा ' मी ' पुन्हा मूळ जागी परत येतो. समर्थ रामदास म्हणतात, ' मीपण शस्त्रे तुटेना। मीपण फोडिता फुटेना। मीपण सोडिता सुटेना। काही केल्या।। '

मग ' मी या सगुण-निर्गुणाचाच एक सूक्ष्मतम अंश आहे ' या दृष्टीने ' मी ' कडे पाहिले तर कदाचित त्याचा सकारात्मक स्वीकार करणे शक्य होईल. जपानी भाषेमधे ' वाताशी ' या शब्दाचा अर्थ ' मी ' असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ' वाताशी ' या शब्दाचा उपयोग करतात. जिथे ' मी ' आवश्यक असतो तिथेही ' वाताशी ' शिवायच क्रियापद वापरता येते, असे निरीक्षण लेखिका सानिया नोंदवतात. ' मी ' पासून ' आम्ही ' पर्यंतचा प्रवास हेच तर जपानच्या प्रगतीचे मर्म नसावे? मात्र हे वैयक्तिक स्तरावर सोपे नाही. ' मी पणा ' सोडणं दूरच, ' मी ' शोधायचा प्रयत्न केला तरी ' बुरा जो देखन मै चला बुरा न मिलया कोय। दिल खोजा जो मै अपना मुझसे बुरा न कोय।। ' या संत कबीरांच्या दोह्यातून त्याचे खरे रूप दिसते. ' मी ' शोधावासा वाटणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी असावी आणि ' मी पणा ' सुटणं ही अंतिम.

रात्रीच्या सुमारास एक मित्र दुसऱ्या मित्राला घ्यायला रेल्वे स्थानकावर आला. घरी जाताना सिग्नलचा लाल दिवा पाहताच त्याने गाडी थांबवली. चौकात चिटपाखरूही नव्हते. मित्र म्हणाला, ' कोणीच पाहत नाहीये, चल की! ' तेव्हा तो म्हणाला, ' अरे, आपण तर पाहत आहोत ना? '
 ' मी ' सुटला नाही, पण ' जागा ' असला तर हेही नसे थोडके.

नेमके काय हवे ?


' जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते ; ती म्हणजे ' प्रयोजन ;.कुठेसे हे वाचले' या जगण्याचे काय करू ?' हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मनात येतच असतो . त्याचे उत्तर शोधण्याची धडपड म्हणजेच आयुष्य . माणूस समाजाशी इतका जोडला गेलेला असतो की हे प्रयोजन कालांतराने वैयक्तिक राहात नाही . देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर दुसऱ्याच दिवशी , सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते , ' आपण राज्य नीट चालविले नाही , तर तो कुणा एका व्यक्तीचा नाकर्तेपणा असणार नाही , सबंध देशाचा असेल .' स्वातंत्र्यानंतर भारताने आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने , पहिली पावले साधारणपणे एकाच वेळी टाकली . उद्दिष्ट्य नजरेसमोर असलेल्या जपानने वेगाने प्रगती केली ; आपण अजून चाचपडत आहोत , त्याचे कारण हेच असावे . स्वत : च्या मूलभूत गरजा भागवणे यालाच ध्येय मानले तर माणूस आणि प्राण्यात फरक तो काय ?

जगण्यासाठी पैसा हवाच ; पण पैसा हेच प्रयोजन उरले तर त्या नादात आपण आयुष्यच तर विकून टाकत नाही ना , हे भानही हवे . ' मी , माझे घर आणि नोकरी ' याच परिघात फिरणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर करावे तरी काय असा बिकट प्रश्न पडतो . साहित्य , संगीत , खेळ , समाजकारण अशा जीवनाच्या विवीध अंगांना भिडणाऱ्या मंडळींना या इवल्याशा आयुष्यात ' करावे तरी काय काय ' असा प्रश्न पडतो .
सामाजिक कार्यकर्ते डॉ . अभय बंग म्हणतात , ' एक प्रश्न सोडविणे हा जीवनातील सर्वात उज्ज्वल क्षण असतो . प्रश्न दिसतात , ते पाहिले पाहिजेत . हाक कानी पडते , ती ऐकली पाहिजे . आपल्या कर्तृत्वाने जग बदलून जाईल , असे वाटले पाहिजे . एखादे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करून तर पाहा .' एक मुलगा भरतीबरोबर किनाऱ्यावर येऊन पडलेले मासे एक एक करून पुन्हा समुद्रात फेकत होता . हे दृश्य बघणाऱ्या एकाने त्याला विचारले , ' या हजारो माशांपैकी दोन - चार माशांना जीवदान देऊन असा काय फरक पडणार आहे ?' त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फेकत म्हटले , ' या माशाला विचारा , काय फरक पडतो ते .'

प्रत्येकजण अशा चिमुकल्या प्रयत्नांनी किमान आपापले जग नक्कीच सुंदर बनवू शकतो . ' जगण्याचे प्रयोजन ' भारतीयांसह साऱ्या जगाला समजावून सांगणारा ग्रंथ म्हणजे भगवद्गीता . मनुष्याच्या वृत्ती - प्रवृत्ती , गुण - अवगुण , स्वार्थ - परमार्थ , लौकिक - अलौकिक अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह करणारा हा ग्रंथ , ' जगावे का ' याचे उत्तर अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या मानवजातीला देतो . वय , विचार , अनुभव , परिस्थिती यानुसार उद्दिष्ट्यप्राप्तीचे साधन बदलत राहते . एखाद्या गावाला जाताना आपण वाहनाचा वापर करतो आणि इच्छित स्थळी पोचल्यावर ते सोडून देतो . त्या वाहनात आणि मार्गात आपण फार गुंतून पडत नाही . सगुण जीवनात असे करणे सहजी जमत नाही . मात्र बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद म्हणतो , ' यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे , हे मी सांगू शकणार नाही . पण स्वतःला ओळखून स्वतःला , स्वतःसाठी , स्वतःकडून नेमके काय हवे आहे हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय .'

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ७ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)