Thursday, June 19, 2014

यशस्वी नात्याचे आधारस्तंभ...


नातेसंबंध म्हणजे माणसाच्या अस्तित्वाचा पाया. नात्याची अंत:प्रेरणा ही माणसाला मिळालेली अद‍्भुत भेट आहे. जगातले सगळे जीव या सूत्रात बांधले गेले आहेत. जे कृष्णमूर्ती म्हणतात, 'टु बी इज टु बी रिलेटेड अँड टु बी रिलेटेड इज टु बी इन कॉन्फ्लीक्ट.' दोन माणसं एकत्र आली की त्यांच्यात विसंवादाचं का होईना, पण एक नातं निर्माण होतंच. मात्र माणसा-माणसामधलं नातं क्वचितच निकोप आणि सहज असतं; कारण ते निरपेक्ष नसतं.
बहुतेक वेळा आपण समोरच्या व्यक्तीकडे सोयीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. नातं जुळलंच तरी ते व्यक्तीसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष असतं. सगळं अनुकूल असेल तरच ते टिकून राहतं. अशा नात्याने व्यक्ती म्हणून आपण समृद्ध होऊ शकत नाही.

ज्या नात्याने आपण झळाळून उठतो, जे नातं जोडणं किंवा तोडणं आपल्या हातात नसतं ते नातं एकच; माणसाचं आणि ईश्वरी तत्त्वाचं. 'त्वमेव माता च पिता त्वमेव... त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव.'
निरीश्वरवादीदेखील चराचराशी नातं जोडतात. ईश्वर मानणारे त्याची रूपं आयुष्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या माध्यमातून अनुभवतात. हे नातं निरपेक्ष असतं. कदाचित म्हणूनच या नात्याची असोशी टिकून राहते, मैत्रभाव उधळून दिला जातो. या नात्यात ऋजुता असते, अहंकार नसतो. या नात्याला अनेक पदर असू शकतात. जगाच्या पसाऱ्यात आपण कुठेही हरवलो, तरी ज्या भूमीशी आपली नाळ जुळलेली असते तिची ओढ तशीच राहते, त्याला आपण माझं गाव, माझा देश अशी नावं देतो.
संतांना 'वृक्षवल्ली सोयरी' वाटू लागते. 'कांदा, मुळा, भाजी अवघी विठाई माझी' भासू लागते. कितीतरी माणसं निसर्गाशी नातं जोडतात. एखाद्या रोपाचं रूजणं, फुलणं, तारकांनी खच्चून भरलेलं आकाश, वाऱ्याची झुळूक, खळाळत वाहणारं पाणी, यात कित्येकजण रमतात. कुणी विज्ञानातल्या कुतूहलांची उकल करण्याच्या पाशात स्वेच्छेने अडकतात. 'नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही... साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही' असा तो अनोखा, अनामिक बंध असतो. या नात्यांतलं सौंदर्य कायम राहतं; कारण यामागे अपार श्रद्धा असते. या साऱ्या नात्यांत फक्त देणं असतं, घेणं नसतं.

माणसांचं आपसातलं नातं इतकं सहजसोपं व्हायला हवं असेल, तर एकमेकांचा गुण-दोषासकट स्वीकार करता यायला हवा. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, एकमेकांना दिलेला वेळ, शब्द, एकमेकांवरील विश्वास, श्रद्धा आणि आश्वासक स्पर्श हे कोणत्याही यशस्वी नात्याचे आधारस्तंभ असतात. नातेसंबंधाच्या बाबतीत हे समजून घ्यायला हवं की आपल्याला जे हवं आहे ते आपण कधी दुसऱ्याला दिलं का? हे उमजलं तर तो खरा मैत्रभाव. तो जपला तर आपसूक माणूस निर्वैर होऊ लागतो. वात्सल्य, क्षमाशीलता, करुणा, कळकळ हा त्याचा स्वभावधर्म होतो. मनातला मैत्रभाव बाह्य व्यक्तिमत्त्वात दिसतो. अवघं जगणं सुंदर होतं. आरती प्रभूंच्या शब्दात दडलेला नात्याचा खरा अर्थ गवसतो.
 'अशी पांखरून छाया, लावोनिया माया। आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.'

महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ८ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

करा साजरा ‘आजचा क्षण’!


'या अठराव्या वाढदिवसाला मला नवी कोरी बाईक हवी म्हणजे हवी', लाडावलेल्या मुलाने आपल्या श्रीमंत वडिलांकडे लकडा लावला होता. वडिलांनी अट घातली, त्यासाठी उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखव. मुलाने अट पूर्ण केली. वडील त्याला रोज एका छान पुस्तकातले उतारे वाचून दाखवत असत. वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी मुलाला आशीर्वाद दिला आणि सुंदर वेष्टन घातलेले ते पुस्तक भेट दिले. अपेक्षाभंगाने संतप्त झालेला मुलगा वडिलांचे बोलणे अजिबात ऐकून न घेता ते पुस्तक तिथेच फेकून घर सोडून निघून गेला.

कालांतराने त्याला वडिलांचे निधन झाल्याची बातमी कळली आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी तो घरी परतला. जगाचे अनुभव घेऊन आता तो समंजस झाला होता. कागदपत्रे बघता बघता त्याला वडिलांनी दिलेले पुस्तक सापडले. त्याने सहज पुस्तकाचे वेष्टन उघडले आणि त्यात त्याला बाईकची किल्ली अडकवून ठेवलेली दिसली. मुलाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते; पण आता उशीर झाला होता. एव्हरीवन इज गिफ्टेड, बट सम पिपल डू नॉट ओपन देअर पॅकेज, हे सांगणारी ही गोष्ट...

माणसाचं आणि नियतीचं नातं काहीसं असंच आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आकांक्षांना प्रयत्नांची जोड दिली, तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मात्र ती आपल्याला अपेक्षित असलेल्या वेष्टनात असेलच असे नाही. आपल्या वाट्याला आलेल्या कित्येक गोष्टी केवळ वेगळ्या आवरणात असल्यामुळे आपल्याला त्यांची किंमत कळत नाही. कवी अशोक नायगावकर म्हणतात, 'निसर्ग पाहायला म्हणून निघालो... गाडीच्या खिडकीतून बेटी झाडंच मधे मधे येत होती'... तशी आपली अवस्था असते.
कुणाला कलेची, कुणाला बुद्धिमत्तेची, कुणाला सर्जनशीलतेची, कुणाला रूपाची तर कुणाला असाधारण क्षमतेची, अशा वेगवेगळ्या देणग्या जन्मजात लाभलेल्या असतात. मात्र 'काय नाही' याची यादी करण्यात आपण इतके गुंतलेले असतो की त्यामुळे 'काय आहे' याकडे आपले दुर्लक्ष होते.
 'स्थिती आहे तैशापरी राहे। कौतुक तू पाहे संचिताचे॥'
म्हणणारे तुकाराम महाराज, काय गमावलंय यापेक्षा काय कमावलंय इकडे लक्ष द्या हेच सांगतात.

आनंदात चालणं व आपलं वेगळेपण शोधणं हा जगण्याच्या चकव्यातनं बाहेर पडायचा चांगला मार्ग आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार द्विधा मनाला शांत करतो आणि नि:शंक मनच प्रगती करू शकतं. ओशोंनी मनाची दोलायमान स्थिती सहज शब्दात मांडली आहे,
'मन का स्वभाव ही कुछ ऐसा है, उसे जो मिल गया वह व्यर्थ हो गया!'
याचं कारण आपण उद्याच्या विचारात इतके हरवतो की 'आजचा क्षण' साजरा करायचा राहूनच जातो.तेव्हा आपल्याला मिळालेला आयुष्याचा सुंदर नजराणा स्वत: उघडून पाहायला हवा, आजच! आत्ता !

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)


आनंदाचा विचार म्हणजेच परमार्थ!


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २५ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

जगातला प्रत्येक जीव एकमेकाशी एका अदृश्य धाग्याने जोडला गेला आहे असं अध्यात्म सांगतं. आपण आज कुणाला काही दिले तर हे सूत्र पुढे जात राहते आणि एक दिवस ते आपल्याकडे परत येते. उर्जेची रूपे फक्त बदलतात तसेच काहीसे हे आहे. आपण धन, कृती किंवा ज्ञानरूपाने कुणाला काही देत असू तर ते आनंद किंवा समाधान अशा रूपात आपल्याकडे परत येते. म्हणूनच 'घर से मस्जिद है बहोत दूर... चलो कुछ यू कर ले, किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए...'

दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करणे म्हणजेच परमार्थ. यातून खरं तर आपण स्वत:लाच मदत करत असतो. त्यासाठी मनात स्वच्छ दातृत्वभाव हवा. मात्र आपला परमार्थाचा स्वार्थ साधण्याच्या नादात आपण याचकवृत्तीला खतपाणी तर घालत नाही ना, याचा विचार करायला हवा. वस्तुनिष्ठावादाची कट्टर पुरस्कर्ती, लेखिका ऍन रँड म्हणते, 'गरज हा लायकीचा पर्याय बनला तर समाजातली कार्यक्षमता संपून जाईल, शिवाय सर्वात गरजू, दुर्बल कोण हे सिद्ध करायची चढाओढ लागेल.' दान हे नेहमीच सत्पात्री असायला हवे.

स्वहिताचा म्हणजेच स्वार्थाचा विचार म्हणजे पाप आणि परमार्थाचा विचार म्हणजेच पुण्य हे आपल्यावर बिंबवले गेले आहे. त्यागाच्या चमत्कारिक कल्पनांनी भारावून, श्रीमंत होणे हे पाप मानले जाऊ लागले आहे. दुसऱ्याला आर्थिक मदत करायची असेल तर आधी स्वत: संपत्ती निर्माण करायला नको का? त्यासाठी स्वतंत्र विचार, कृती आणि बुद्धीची गरज असते. अशा अर्थाने स्वहित जपणाऱ्या वृत्तीच्या व्यक्तीला स्वार्थी कसे म्हणता येईल? एखादी निस्संग व्यक्ती मोक्ष मिळावा अशी अभिलाषा करत असेल, तर तोही एक प्रकारचा स्वार्थच ना! केवळ देत राहणे म्हणजे परमार्थ नव्हे, तर आपले काम व्यवस्थित करणे हादेखील परमार्थच.

फुटक्या वस्तू अनाथालयाला देऊ करणारे किंवा काळ्या धनातील काही भाग देवस्थानाला देणगी देऊन मनातली टोचणी कमी करू पाहणारे परमार्थ साधत नसून, त्याचा केवळ आव आणतात. अशा भोंदूंना तुकाराम महाराज सांगतात,
स्वार्थ परमार्थ संपादिले दोन्ही। एकही निदानीं नव्हे त्यासी।
दोहों पेंवांवरी ठेवूं जातां हात। होय अपघात शरीराचा॥
जपानी लोक तलवार, रत्न आणि आरसा यांना मानतात. तलवार हे शारीरिक शक्तीचं, रत्न हे पैशाचं आणि आरसा हे स्वत:बद्दलच्या ज्ञानाचं प्रतीक आहे. परमार्थासाठी शक्ती, धन आणि वृत्ती एकत्र आले तर उत्तमच. धनवृद्धी करण्याचा आपला मार्ग योग्य आहे की नाही हे आरसा सांगू शकेल. अशी धनवृद्धी समाजाला उपकारक असते आणि त्यातून नकळत परमार्थ साधला जातो. इतर मार्गांनीही परमार्थ साधणे शक्य आहे. गुरूद्वारांमध्ये 'कारसेवा' आचरली जाते. तिथला कचरा झाडणारी व्यक्ती अगदी करोडपती असू शकते किंवा अतिशय गरीब. तिथे प्रत्येकजण 'दाता' होण्याचे समाधान मिळवू शकतो. तेव्हा या जपानी आरशालाच विचारू या, आपण सच्चा स्वार्थ जपतो आहोत की ढोंगी परमार्थ जपून स्वत:लाच फसवतो आहोत?