Thursday, June 19, 2014

प्रतीकांमागच्या संकल्पनांचा बोध !


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १८ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

ब्राझीलमधील रिओ द जानेरिओ येथील पापविमोचक येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यावर वीज कोसळली. उत्तराखंडमध्ये महापुरात केदारनाथाचे मंदिर पाण्याखाली गेले. ईश्वरावर निस्सीम श्रद्धा असणाऱ्यांना त्या वीजेत आणि पाण्यातही त्याचेच रूप दिसत असल्याने त्यांच्या श्रद्धेवर ओरखडा उमटला नाही. विचारपूर्वक ईश्वर नाकारणाऱ्यांसाठी ही केवळ नैसर्गिक उलथापालथ, तर सर्वसामान्य माणूस मात्र श्रद्धा-अश्रद्धेबाबत साशंक होतो आणि समाधान घालवून बसतो. अंधश्रद्धेच्या आहारी जातो किंवा ईश्वराचा तिटकारा करू लागतो. कारण ईश्वराला कोणत्या ना कोणत्या प्रतीकाच्या स्वरूपातच पाहण्याचा त्याचा अट्टाहास.

सगुण प्रतीकांमधे ईश्वर शोधणे संतांना देखील मान्य नाही. समर्थ म्हणतात,
धातु, पाषाण, मृत्तिका। चित्रलेप, काष्ठ देखा । तेथे देव कैचा मूर्खा । भ्रांति पडिली ।
प्रतीकांच्या मनावरील पगड्यामुळे पारंपरिक, पौराणिक कथा एक प्रकारच्या धार्मिक दडपणातून ऐकल्या जातात. त्याला अभ्यासाची जोड नसली की, त्यातून सहजपणे आध्यात्माचा बाजार मांडला जातो. याउलट काहींना धार्मिक ग्रंथांमधले सगळेच बाळबोध, विसंगत किंवा अतार्किक वाटू लागते. ईसापच्या कथांमधले प्राणी बोलतात हे आपण स्वीकारतो, कारण त्यातला आशय आणि बोध आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. याच न्यायाने पौराणिक कथांना सत्य-असत्याचे, श्रद्धा-अश्रद्धेचे किंवा तर्काचे निकष लावण्यापेक्षा त्यातले तथ्य आणि प्रतीकांमागच्या संकल्पना समजाव्यात.' देवीला आठ हात? काहीतरी काय!' असे प्रतीकाबाबत नकारात्मक बोलताना संगणकाच्या भाषेतलं मल्टीटास्कींग मात्र आपण सहज स्वीकारतो. या अष्टभुजांमागे 'जो जे वांछील तो ते लाहो' हा संदेश असू शकतो असा विचार देखील आपण करू शकतो.

भारतीय आध्यात्मिक अभ्यासक रामायणाचं विश्लेषण वेगवेगळ्या कोनांतून करतात. काहींनी रामाला विवेकाची, सीतेला मनाची, दशानन रावणाला अनंत विकारांची आणि हनुमानाला योगसाधनेची उपमा दिली आहे. ते म्हणतात मनरूपी सीतेचं ज्यावेळी विकाररूपी रावण हरण करतो, त्या वेळी मन आणि विवेक यांचे पुनर्मिलन योगसाधना घडवते. विनोबांनी महाभारताला रूपक म्हणून अभ्यासले. शरीर म्हणजे कुरूक्षेत्र,त्यातील चांगल्या आणि वाईट प्रवृत्तींचं द्वंद्व म्हणजेच तामसी कौरव आणि सात्त्विक पांडव यांच्यात सुरू असलेलं युद्ध.
बुद्धिवाद आणि आध्यात्म हे विरुद्धार्थी शब्द नाहीत. सत्त्व आणि सालपट यातला फरक ओळखण्याचा , प्रतीकांमागचा संकेत आणि संदर्भ जाणून घेण्याचा नीरक्षीरविवेक जिथे वाढतो त्याच समाजाची प्रगती होऊ शकते. ईश्वराच्या रूपाबद्दलचे किंतु-परंतु विरण्यासाठी आधी स्वत:ची तर नीट ओळख व्हायला हवी. 'स्व-रूप' या शब्दातच ते उत्तर दडलं असेल का?

कुठे असते दुःख दडलेले?


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ११ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

आपण एखाद्याच्या दु:खात सहज सहभागी होतो पण त्याच्या सुखात खरच असूया बाजूला ठेवून सहभागी होऊ शकतो का? की त्यात कुठेतरी आपले दु:ख दडलेले असते? आपण आनंदात असताना कधीही हा विचार करत नाही की हे सगळं सुख माझ्याच वाट्याला का यावं? तेव्हा आपण हर्षोल्हासात मग्न असतो. त्या आनंदाचा पुरेपूर उपभोग घेत असतो. वेदना किंवा दु:ख वाट्याला आलं तर मात्र मनात पहिला विचार येतो तो, 'मीच का?', 'हे माझ्याच बाबतीत का घडतं?' प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, 'जीवनात घडणाऱ्या सर्व घटना या आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, बाह्य परिस्थितीमुळे किंवा संभाव्यताशास्त्राच्या (probability) नियमानुसार घडतात.' वाट्याला आलेल्या सुखाचं श्रेय बहुतेक लोक स्वकर्तृत्वाला, स्वयंनिर्णयाला देतात; मात्र पदरी आलेल्या दु:खाची जबाबदारी सोयिस्करपणे दैवावर ढकलतात. तेव्हा त्यांना अचानक ईश्वराची आठवण होते. परंतु 'सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद। कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद॥'

खरं तर जगातल्या कुरूपतेमुळेच सौंदर्य या शब्दाला अर्थ आहे. सगळे नेहमी छान छान, सुंदर, मनाजोगे घडत गेले तर कालांतराने जगण्यात कुठलेच आव्हान न उरल्याने नीरसता येईल. जगात अंधार नावाची गोष्टच नाही, प्रकाशाच्या अभावाला आपण ते नाव दिले आहे. तसेच कदाचित सुखाच्या अभावाला आपण दु:ख मानतो. कशाला सुख मानायचे आणि कशाला दु:ख हे नीट कळले नाही आणि त्यासाठी फक्त ऐहिक निकष वापरले तर 'मै फकीरोसे भी सौदा करता हू अक्सर...। जो एक रूपए मे लाख दुवाए देता है' अशी आपली परिस्थिती होते. 'सुख दु:खे समे कृत्वा। लाभा लाभौ जयाजयौ॥' हे गीतेतील वचन 'सुखामुळे हुरळून जाऊ नका आणि दु:खामुळे खचून जाऊ नका,' असे सांगते. प्रत्यक्षात सुख दु:खाचा तटस्थपणे स्वीकार करणे आपल्याला शक्य होत नसले तरी गीतेने सांगितल्याप्रमाणे कर्म करत राहणे तर शक्य आहे ना!

भुकेल्या पोटाला उपदेश नाही, भाकरी हवी असते. त्यामुळे सकारात्मक असंतोष हवाच; कारण त्यातच प्रयत्नांचे आणि प्रगतीचे बीज रूजते. आपल्या आवाक्यात असलेल्या गोष्टीत आपले सुख आणि आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीत आपले दु:ख दडलेले असते. यावर प्रयत्नवादी राहून आपला आवाका वाढवणं हाच उपाय आहे..
लो.टिळकांनी एक सोपे उदाहरण दिले आहे. तहान लागल्यावर प्यायला मिळणारे पाणी हे जर सुख असेल तर मनुष्य पाण्यात बुडाला तेव्हा तो सुखात बुडाला असे आपण का म्हणत नाही? म्हणूनच ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे इंद्रिय सुखापेक्षा मनाचे सुख आणि त्याहीपेक्षा बुद्धीचे सुख श्रेष्ठ आहे.

शरीराला क्लेश होत असताना मन प्रसन्न आणि सुखी ठेवण्याची ताकद प्रार्थनेत आहे. 'मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥' एकदा मनाचे आणि बुद्धीचे सुख गवसले की कितीही मोठे दु:ख आले तरी ते पेलण्याची क्षमता निर्माण होते. त्याचे कारण शोधून त्यावर मात करण्याची ईर्षा जागी होते आणि पुढच्या वाटचालीत दगडाला अडखळून पडण्याऐवजी त्याच दगडावर उभे राहून दूरवर नजर टाकता येते.

अंतरात्म्याची तार मौनातच...


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ४ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

' बोलणाऱ्याचे चणे विकले जातात , न बोलणाऱ्याचे सोनेही विकले जात नाही ' असा आजचा काळ. साहजिकच शब्दांच्या वापराला प्रचंड महत्त्व आलं आहे. माध्यमातून माहितीचा भडिमार शब्दरूपानेच आपल्यावर होत असतो. या शब्दबंबाळ , वेगवान जगात आपणही सतत बोलत राहतो. क्वचित एकटं बसायची वेळ आलीच तर आपण स्वत:ला मोबाइल किंवा तत्सम यंत्राच्या स्वाधीन करतो.

आपण बोलतो ते काहीतरी मिळावं म्हणून. याउलट ' शून्य ' होण्यातला निर्गुण आनंद अनुभवलेले महापुरुष केवळ करूणेने बोलतात. ते मौनाचे सामर्थ्य जाणतात. अर्थाचा विचार केला तर मौन म्हणजे नि:शब्दता. परंतु मौन ही एक तन्मय मानसिक अवस्था आहे. आयुष्याच्या कोलाहलात सहसा ऐकू न येणारा आपला आतला सच्चा आवाज ऐकायचा असेल तर मौनाला पर्याय नाही. अंतरात्म्याची तार केवळ मौनातच छेडली जाऊ शकते आणि हे ज्याला साध्य झालं त्याचं अवघं जगणं झंकारून उठतं.
 ' न सांगताच तू मला उमगते सारे , कळतात तुलाही मौनातील इशारे...
दोघांत कशाला मग शब्दांचे बांध , कळण्याचा चाले कळण्याशी संवाद '
कवी सुधीर मोघ्यांच्या या ओळी प्रेमाभोवती गुंफलेल्या असल्या तरी संत व ईश्वराच्या नात्यालाही त्या चपखल लागू होतात. मौन म्हणजे अंतर्मुखता , उमज , संयम , निग्रह , निर्लेपता! संत ज्ञानेश्वर ईश्वराशी ' बोलतात ' ते ' शब्देविण संवादु दुजेविण अनुवादु... ' अशा मौनातूनच. मौनाशिवाय मनन नाही , चिंतन नाही , नवनिर्मिती नाही.

एकदा एक प्रांतप्रमुख प्रवासाला निघाला. वाटेत लाओत्सु यांचा आश्रम होता. त्यांना वंदन करावे आणि जमेल तेवढे ज्ञान ओंजळीत घ्यावे या हेतूने तो आश्रमात आला. ' राज्यकारभारात व्यस्त झाल्यामुळे माझ्याजवळ सत्संगासाठी वेळ उरत नाही. मला आपण एक-दोन वाक्यात धर्माचे सार सांगू शकाल का ?' त्याने लाओत्सुंना विनंती केली. लाओत्सु उत्तरले ' अवश्य सांगेन! हे सारं फक्त एका शब्दात सामावलं आहे. ' तो चकित झाला. ' कोणत्या ?' लाओत्सु म्हणाले , ' मौन. ' त्याने विचारले , ' मौनाचे उद्दिष्ट काय ?' लाओत्सु म्हणाले , ध्यान. ' आणि ध्यान म्हणजे ?' लाओत्सु पुन्हा म्हणाले मौन. ज्यांना मौन साधलं त्यांचं निरीक्षण केलं तर जाणवतं त्यानंतर निर्मिलेली प्रत्येक गोष्ट , बोललेला प्रत्येक शब्द भयमुक्त असतो , खरा असतो , त्यात लोभ नसतो , अस्वीकृतीचा त्रागाही नसतो.

परा , पश्यन्ति , मध्यमा व वैखरी अशी वाणीची चार स्थित्यंतरं मानली जातात. विचारांचे बीज ज्या चेतनेमुळे रूजते ती परा , त्याला आलेलं मूर्त स्वरूप म्हणजे पश्यन्ति , त्याचं शब्दरूप म्हणजे मध्यमा व त्याचा उच्चार म्हणजे वैखरी. अव्यक्ताकडून व्यक्ताकडे होणाऱ्या या प्रवासात आपण जे बोलू इच्छितो त्याला
Is it true? Is it kind? Is it necessary?
हे प्रश्न विचारले तर वाणीला विवेकाची जोड मिळेल. मौन साधू शकलो नाही तरी त्या संकल्पनेच्या आपण जवळपास पोहोचू शकू. कवी सुमित्रानंदन पंत यांच्या शब्दात सांगायचं तर ,
 ' न जाने , खद्योतों से कौन , मुझे पथ दिखलाता तब मौन!
अहे सुख-दुःख के सहचर मौन! नहीं कह सकता तुम हो कौन! '