महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात ११ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेला लेख
आपण एखाद्याच्या दु:खात सहज सहभागी होतो पण त्याच्या सुखात खरच असूया बाजूला ठेवून सहभागी होऊ शकतो का? की त्यात कुठेतरी आपले दु:ख दडलेले असते? आपण आनंदात असताना कधीही हा विचार करत नाही की हे सगळं सुख माझ्याच वाट्याला का यावं? तेव्हा आपण हर्षोल्हासात मग्न असतो. त्या आनंदाचा पुरेपूर उपभोग घेत असतो. वेदना किंवा दु:ख वाट्याला आलं तर मात्र मनात पहिला विचार येतो तो, 'मीच का?', 'हे माझ्याच बाबतीत का घडतं?' प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर म्हणतात, 'जीवनात घडणाऱ्या सर्व घटना या आपणच घेतलेल्या योग्य-अयोग्य निर्णयामुळे, बाह्य परिस्थितीमुळे किंवा संभाव्यताशास्त्राच्या (probability) नियमानुसार घडतात.' वाट्याला आलेल्या सुखाचं श्रेय बहुतेक लोक स्वकर्तृत्वाला, स्वयंनिर्णयाला देतात; मात्र पदरी आलेल्या दु:खाची जबाबदारी सोयिस्करपणे दैवावर ढकलतात. तेव्हा त्यांना अचानक ईश्वराची आठवण होते. परंतु 'सुख मे सुमिरन ना किया, दु:ख में करते याद। कह कबीर ता दास की, कौन सुने फरियाद॥'
खरं तर जगातल्या कुरूपतेमुळेच सौंदर्य या शब्दाला अर्थ आहे. सगळे नेहमी छान छान, सुंदर, मनाजोगे घडत गेले तर कालांतराने जगण्यात कुठलेच आव्हान न उरल्याने नीरसता येईल. जगात अंधार नावाची गोष्टच नाही, प्रकाशाच्या अभावाला आपण ते नाव दिले आहे. तसेच कदाचित सुखाच्या अभावाला आपण दु:ख मानतो. कशाला सुख मानायचे आणि कशाला दु:ख हे नीट कळले नाही आणि त्यासाठी फक्त ऐहिक निकष वापरले तर 'मै फकीरोसे भी सौदा करता हू अक्सर...। जो एक रूपए मे लाख दुवाए देता है' अशी आपली परिस्थिती होते. 'सुख दु:खे समे कृत्वा। लाभा लाभौ जयाजयौ॥' हे गीतेतील वचन 'सुखामुळे हुरळून जाऊ नका आणि दु:खामुळे खचून जाऊ नका,' असे सांगते. प्रत्यक्षात सुख दु:खाचा तटस्थपणे स्वीकार करणे आपल्याला शक्य होत नसले तरी गीतेने सांगितल्याप्रमाणे कर्म करत राहणे तर शक्य आहे ना!
भुकेल्या पोटाला उपदेश नाही, भाकरी हवी असते. त्यामुळे सकारात्मक असंतोष हवाच; कारण त्यातच प्रयत्नांचे आणि प्रगतीचे बीज रूजते. आपल्या आवाक्यात असलेल्या गोष्टीत आपले सुख आणि आवाक्याबाहेर असलेल्या गोष्टीत आपले दु:ख दडलेले असते. यावर प्रयत्नवादी राहून आपला आवाका वाढवणं हाच उपाय आहे..
लो.टिळकांनी एक सोपे उदाहरण दिले आहे. तहान लागल्यावर प्यायला मिळणारे पाणी हे जर सुख असेल तर मनुष्य पाण्यात बुडाला तेव्हा तो सुखात बुडाला असे आपण का म्हणत नाही? म्हणूनच ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे इंद्रिय सुखापेक्षा मनाचे सुख आणि त्याहीपेक्षा बुद्धीचे सुख श्रेष्ठ आहे.
शरीराला क्लेश होत असताना मन प्रसन्न आणि सुखी ठेवण्याची ताकद प्रार्थनेत आहे. 'मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥' एकदा मनाचे आणि बुद्धीचे सुख गवसले की कितीही मोठे दु:ख आले तरी ते पेलण्याची क्षमता निर्माण होते. त्याचे कारण शोधून त्यावर मात करण्याची ईर्षा जागी होते आणि पुढच्या वाटचालीत दगडाला अडखळून पडण्याऐवजी त्याच दगडावर उभे राहून दूरवर नजर टाकता येते.