Thursday, June 19, 2014

आनंदाचे डोही..


' हास्य ' या शब्दाला समाजात फारसं गंभीरपणे घेतलं जात नाही. तथाकथित विद्वान मंडळींच्या चेहऱ्यावर ते क्वचितच दिसतं. खरं तर माणसाचा स्वत:पासून समष्टीकडे होणारा प्रवास हास्यामुळे कितीतरी सोपा आणि आनंदी होऊ शकेल. फेंग शुई या चिनी वास्तुशास्त्राच्या प्रसिद्धीमुळे ' लाफिंग बुद्ध ' कित्येक घरांतून ​दिसतात. असं म्हणतात की चीनमधल्या त्यांग राजवटीच्या काळात ' पु ताई ' नावाचा हा थुलथुलीत पोटाचा भिक्ष एका झोळीत धान्य, सोनंनाणं आणि खाऊ घेऊन, हे सारं वाटत वाटत भटकंती करत असे. लहान मुलं त्याची फार लाडकी. विशेष म्हणजे ज्यांना यातलं काहीच मिळत नसे तेसुद्धा त्याच्या दर्शनानेच
' जब आवे संतोष धन, सब धन धूरि समान ' या उक्तीनुसार तृप्त होत असत.

' आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग आनंदाचे ' या ओळीत तुकाराम महाराजांना यत्र तत्र सर्वत्र आनंदच दिसतो. सगुणातही, निर्गुणातही आणि त्याच्या विलयातही. आनंदाचे मूळ डोहात म्हणजेच अंतरंगात आणि पर्यायाने तो उमटतो तरंगात म्हणजेच बहिरंगात. आध्यात्मिक उंची गाठलेले हे संत स्वत:च आनंदमय झालेले असतात. वेगवेगळ्या धर्मांचे प्रेषित एकांतवासात जात आणि त्या चिंतनातून लाभलेले विचारधन वाटायला पुन्हा समाजात येत. त्यांच्या हृदयातील आनंदाच्या झऱ्याला ते समाजात मुक्तपणे वाहू देत. इतक्या मुक्तपणे की हे जग, निसर्ग त्याचाच भाग होऊन जावे. आपल्याला होणारा आनंद हा असा चिरंतन का असू शकत नाही? कारण आपण आनंद मोठमोठ्या गोष्टीत शोधत बसतो. कधी त्याला वस्तूंची नावं देतो तर कधी ’मोक्ष’ वगैरे म्हणतो. पण आनंद आपल्या आसपास असतो. लहान सहान गोष्टीत दडून बसतो.

आनंद वाटल्याने अधिक वाढतो याचा अनुभव घेण्यासाठी एक स्वच्छ मन (हे अशक्य नाही) आणि आनंदासाठी सताड उघडे ठेवलेले त्याचे दार, एवढे पुरेसे आहे. सगळं आपल्याला हवं तसं घडल्याने होतो तो सहेतुक आनंद आणि जगातल्या सौंदर्यात आणि हास्यात आपण काही भर घालू शकलो, तर होतो तो निर्हेतुक आनंद.
एक परकीय कथा नुकतीच वाचनात आली. पहाटे फिरून येताना एका व्यक्तीला एका घराच्या अंगणात झुडुपात अडकलेले सुरळी केलेले वर्तमानपत्र दिसले. घराचे दार बंद होते. त्या लोकांना हे वर्तमानपत्र कदाचित सापडणार नाही तेव्हा मदत करावी म्हणून त्याने ती सुरळी त्या घराच्या पडवीच्या दिशेने फेकली. मात्र त्याचा नेम चुकला आणि ती सुरळी जाऊन पडली थेट पडवीजवळच्या उंच झाडाच्या बेचक्यात. मग तो आपल्या घरी गेला आणि थोड्या वेळाने बाजारातून तसेच वर्तमानपत्र आणि काही ताजी फुलं घेऊन त्या घरी गेला. ' तुम्हाला विनोदबुद्धी आहे असं गृहीत धरून सांगतो, ' म्हणत त्याने सगळा प्रकार मोकळेपणे सांगितला आणि त्या मंडळींच्या दिवसाची सुंदर सुरुवात झाली.

परिस्थितीचा सहज स्वीकार करणं आणि विवेक वापरून अशा लहानसहान कृतीतून आनंद वाटणं हे नेहमीच इतकं सोपं असू शकतं. संत निकोलसचं ' सांताक्लॉज ' नावाने विख्यात असलेलं, नाताळच्या रात्री हळूच येऊन, भेटी देऊन, चिमण्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारं रूप म्हणजेसुद्धा एक प्रकारचा ' लाफिंग बुद्ध ' च. आपण स्वत: इतकं करू शकलो नाही; पण यांना शोधून यांच्या झोळीत भर घालू शकलो तर आपल्यात लपलेला ' लाफिंग बुद्ध ' आपल्याला सापडेल.

(महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २८ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख)

काय आहे अंतिम सत्य?


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात २१ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

' या जगात संपूर्णतया चूक असं काहीच नसतं, अगदी बंद पडलेलं घड्याळही दिवसातून दोनदा योग्य वेळ दाखवतंच ना! ' असं पाऊलो कोएलो या लेखकाने म्हटलंय. या वाक्यातली खोच माणसाच्या आस्तिक किंवा नास्तिक असण्यालाही लागू पडते. काळाच्या कोणत्या तुकड्यावरून, कोणत्या बाजूला उभे राहून आणि कोणत्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टीकडे पाहतो त्यानुसार आपली भूमिका ठरते. ईश्वराविषयीच नव्हे, कोणत्याही स्वरूपातील श्रद्धा म्हणजे ' आस्तिकता ' आणि ' डोळे झाकून एखादी गोष्ट स्वीकारायला दिलेला नकार ' म्हणजे ' नास्तिकता '. परंतु हे शब्द प्रामुख्याने ईश्वरनिष्ठेशीच जोडले गेले आहेत. ' माणसातला देव ' शोधणाऱ्या व्यक्तीला नास्तिक म्हणता येणार नाही. नवस बोलून देवाशी देण्याघेण्याचे ठरवणाऱ्याला आस्तिक कसे म्हणता येईल? विवेक महत्त्वाचा असतो. धर्मातील तत्त्वांवर बऱ्याचदा त्याच्या अनुयायांचा अहंकार मात करतो; तसेच काहीसे या बाबतीत घडताना दिसते.

खलील जिब्रानच्या एका लघुकथेमधे एक आस्तिक आणि एक नास्तिक विद्वानांचा वाद होतो. दोघेही तावातावाने सभेत आपापली बाजू मांडतात. सभा संपते. परंतु त्याचा परिणाम होऊन आस्तिक विद्वान नास्तिक होतो. जवळचे सारे धार्मिक ग्रंथ जाळून टाकतो. तर नास्तिक विद्वान देवालयात जाऊन आजवरच्या पापांसाठी देवाची क्षमा याचना करू लागतो; तो आस्तिक होतो. ज्यांच्या निष्कर्षांमागे वैश्विक विचार नसतो, अशा आततायी आणि संभ्रमित आस्तिक/नास्तिकांचे व्यक्तिश: आणि समाज म्हणूनही नुकसान होते. मूल्यबैठक नसलेले विज्ञान विध्वंसाच्या दिशेने जाऊ शकते; तर तर्कसंगत नसलेली श्रद्धा अंधश्रद्धेला जाऊन भिडू शकते. ज्यांच्या आस्तिक/नास्तिकतेला अभ्यासाचं आणि चिंतनाचं पाठबळ आहे, त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या-त्या भूमिकेमुळे अधिकाधिक उन्नत होते. त्याला अध्यात्मिक प्रगती म्हणायचे की वस्तुनिष्ठ विकास हे त्यांनीच ठरवायचे. गांधीजींच्या आस्तिकतेला सामाजिक परिमाणे होती. कित्येक तत्त्वज्ञ, समाजधुरिण या भूमिका बदलतानाही दिसतात; पण त्यामागे सर्वंकष विचार, विशिष्ट अनुभूती असते. सुरुवातीला आपल्या कवितेतून ' तुझ्या महिम्याची प्रचंड पुराणे, गमती तराणे अर्थहीन ' असे ईश्वराला म्हणणारे कुसुमाग्रज कालांतराने नक्षत्रांना परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न विचारतात, तेव्हा कवितेचे उत्तर असते.. ' स्मित करून त्या म्हणाल्या, मला चांदण्या काही | तो नित्य प्रवासी, फिरत सदोदित राही | उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे | त्यांनाच पुससी तू, तो आहे किंवा नाही ||'

प्रख्यात विचारवंत रिचर्ड डॉकिन्स एका टप्प्यावर स्वत:ला ' अज्ञेयवादी ' मानू लागले. ' देवाच्या अस्तित्वाचं ज्ञान मला अजून झालेलं नाही त्यामुळे मी नास्तिकही नाही, ' अशी त्यांची भूमिका होती. गौतम बुद्धांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकजण सत्याचा शोध घेता घेता ज्ञानी झाले. आस्तिकता असो वा नास्तिकता; तो या सत्यशोधनाच्या मार्गावरचा एक थांबा आहे. अंतिम सत्य नव्हे. आपल्यासारख्यांना किमान या थांब्यापर्यंत पोचायचे असेल तर त्यासाठी वैचारिक घुसळण व्हायला हवी. वैयक्तिक अनुभवांवर आधारलेली आपलीच भूमिका योग्य असा अट्टाहास नसावा. हा प्रवास ज्ञानाच्या दिशेने होत असल्याने त्यात आपले आणि पर्यायाने मानवजातीचे कल्याणच आहे.
 ' तुका म्हणे होय मनासी संवाद,
आपुलाचि वाद आपणासी।
सत्य-असत्याशी मन केले ग्वाही,
मानियेलें नाही बहुमत।। '

मीपण फोडिता फुटेना


महाराष्ट्र टाईम्स मधील ’सगुण निर्गुण’ या सदरात १४ डिसेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख

उसळणाऱ्या लाटांचे रौद्र रूप पाहात एखाद्या महासागराच्या तीरावर किंवा खळाळत कोसळणाऱ्या एखाद्या महाकाय प्रपातासमोर आपण उभे असलो तर निसर्गाचे हे विराट रूप पाहून आपण स्तिमित होतो, स्तब्ध होतो. आपल्या आयुष्याची पत आणि प्रत काहीही असली तरी या भव्यतेपुढे आपण नतमस्तक होतो. आपल्याला आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव होते. एका अर्थी ' मी ' आपल्यापासून बाजूला होतो. परंतु ही भावना बऱ्याचदा क्षणभंगुर असते.
' जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो।। ' असे कवी बा. भ. बोरकर सांगून जातात. दासबोधात सांगितलेले ' मी पणा ' चे हे परिणामदेखील आपल्याला उमजत असतात. ' मीपणे मीत्री तुटे। मीपणे प्रीती आटे। मीपणे लगटे। अभिमान अंगी।। मीपणे विकल्प उठे। मीपणे कलह सुटे। मीपणे संमोह फुटे। ऐक्यतेचा।। ' आपल्याला हेदेखील मान्य असते... ' मीपण कोणासिच न साहे। ते भगवंती कैसेनि साहे। म्हणौनि मीपण सांडूनि राहे। तोचि समाधानी।। ' मात्र भल्याभल्यांचा ' मी ' पणा सुटत नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय! आपण रोजच्या आयुष्याकडे वळताच, दूर नेऊन सोडून दिलेल्या मांजराच्या पिल्लासारखा, हा ' मी ' पुन्हा मूळ जागी परत येतो. समर्थ रामदास म्हणतात, ' मीपण शस्त्रे तुटेना। मीपण फोडिता फुटेना। मीपण सोडिता सुटेना। काही केल्या।। '

मग ' मी या सगुण-निर्गुणाचाच एक सूक्ष्मतम अंश आहे ' या दृष्टीने ' मी ' कडे पाहिले तर कदाचित त्याचा सकारात्मक स्वीकार करणे शक्य होईल. जपानी भाषेमधे ' वाताशी ' या शब्दाचा अर्थ ' मी ' असा आहे. पण जपानी लोक बोलताना क्वचितच ' वाताशी ' या शब्दाचा उपयोग करतात. जिथे ' मी ' आवश्यक असतो तिथेही ' वाताशी ' शिवायच क्रियापद वापरता येते, असे निरीक्षण लेखिका सानिया नोंदवतात. ' मी ' पासून ' आम्ही ' पर्यंतचा प्रवास हेच तर जपानच्या प्रगतीचे मर्म नसावे? मात्र हे वैयक्तिक स्तरावर सोपे नाही. ' मी पणा ' सोडणं दूरच, ' मी ' शोधायचा प्रयत्न केला तरी ' बुरा जो देखन मै चला बुरा न मिलया कोय। दिल खोजा जो मै अपना मुझसे बुरा न कोय।। ' या संत कबीरांच्या दोह्यातून त्याचे खरे रूप दिसते. ' मी ' शोधावासा वाटणं ही आध्यात्मिक प्रगतीची पहिली पायरी असावी आणि ' मी पणा ' सुटणं ही अंतिम.

रात्रीच्या सुमारास एक मित्र दुसऱ्या मित्राला घ्यायला रेल्वे स्थानकावर आला. घरी जाताना सिग्नलचा लाल दिवा पाहताच त्याने गाडी थांबवली. चौकात चिटपाखरूही नव्हते. मित्र म्हणाला, ' कोणीच पाहत नाहीये, चल की! ' तेव्हा तो म्हणाला, ' अरे, आपण तर पाहत आहोत ना? '
 ' मी ' सुटला नाही, पण ' जागा ' असला तर हेही नसे थोडके.