Saturday, July 21, 2012

मनातला खिसेकापू

"आपल्याला वस्तूची किंमत चांगली कळते पण कशाचंही मूल्य समजत नाही" असं ऑस्कर वाईल्डने म्हटलय. "किंमत" आणि "मूल्य" यातला फरक न समजणार्‍यांसाठी असेल, पुण्यातल्या "हॉटेल विश्व" मधे पाण्याच्या पेल्याच्या तळाशी खालच्या बाजूने लिहीलेले असायचे "हा ग्लास हॉटेल विश्व मधून चोरलेला आहे". "चुकून" हा ग्लास कुणी उचलून घरी घेऊन जाण्याच्या भानगडीत पडू नये म्हणून त्या हॉटेल व्यवस्थापनाने ही पुणेरी शक्कल लढवली असावी. एकीकडे या युक्तीची गंमत वाटली पण दुसरीकडे असे लिहावे लागावे याची एक भारतीय म्हणून खंत वाटली. परद्रव्याचा (वस्तूचा) मोह पाप मानणारी हिंदू संकल्पना असो, अस्तेय तत्त्वाचा पुरस्कार करणारे जैन आचारसूत्र असो किंवा "thou shall not steal" सांगणारी बायबलमधील आज्ञा.. सगळ्याचे सार एकच. मात्र बहुसंख्य भारतीयांच्या मनात आदरणीय असलेली "मूल्यं" आणि त्यांची व्यवहारातली "किंमत" यात मात्र प्रचंड तफावत आढळते. भारतात जागोजागी (अगदी धार्मिक स्थळीदेखील) "खिसेकापूंपासून सावध राहा" अशा पाट्या असतात. या सावधगिरीबरोबर एखादा खिसेकापू आपल्याच मनात तर राहत नाही ना याचा आपण शोध घ्यायला हवा आहे.

साधं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलाला, वर्गमित्राचा पेन त्याने न विचारता "उचलून" आणला म्हणून रागावणारे वडील स्वत: मात्र ऑफीसमधला पेन-स्टेशनरी सर्रास घरी आणत-वापरत असतील तर? मग प्रामाणिकपणाचे संस्कार मुलावर करण्याचा नैतिक हक्क त्यांना आहे? सरकारी कार्यालयांमधल्या वस्तू (वस्तूच नव्हे गाड्या आणि हाताखालची माणसे सुद्धा) "आपुलकीच्या" भावनेने घरी वापरायला-कामाला उचलून आणण्यात काही गैर आहे असे मुळात आपल्याकडे कित्येक सरकारी कर्मचार्‍यांना वाटत नाही. बर्‍याच शाळांमधल्या प्रयोगशाळेतला एखादा संगणक, फर्निचर प्राचार्य किंवा इतर अधिकार्‍यांच्या घरी वापरले जाते. खाजगी कंपन्यांमधे देखील कमी अधिक प्रमाणात "पराया माल अपना" मानण्याच्या घटना घडत असतात. रात्री जास्तीचे सरकारी काम करताना, ते काम पूर्ण होताच सरकारी मेणबत्ती फुंकून टाकायची आणि खाजगी कामासाठी स्वखर्चाने दुसरी मेणबत्ती पेटवायची इतक्या उदात्त पातळीवर पोचलेले मंत्रीगण स्वातंत्र्यानंतर याच देशात होऊन गेले. मात्र आज जनतेच्या विकासकामांचा निधी जिथे कित्येक राजकारणी उचलून नेतात तिथे सामान्य माणसाच्या उचलेगिरीबद्दल काय सांगावे. आपल्या भारतीय रेल्वेमधील डब्यांची अवस्था पाहा. आरसे, दिवे अगदी स्वच्छतागृहातले मग देखील उचलून न्यायचे लोक सोडत नाहीत. बसमधल्या प्रथमोपचार पेट्या गायब होतात. सार्वजनिक पाणपोईवरच्या "साखळदंडांना न जुमानता" पेले काढून नेले जातात. "राष्ट्रीय संपत्तीवर" आपलाही हक्क आहेच अशी त्यामागे "आपलेपणाची" भावना असावी बहुधा. "उचलेगिरी" हा भारतीयांचा फार मोठा अवगुण आहे. याचा अर्थ जगातल्या इतर देशातील सगळे लोक प्रामाणिक आहेत असा नव्हे पण तुलनेने उचलेगिरीत भारतीयांचा क्रमांक बराच वरचा आहे ही शोचनीय वस्तुस्थिती आहे.

गरिबी आणि त्यातून निर्माण होणारी अगतिकता हे याचे कारण असावे असे मुळीच नाही. गरिबी हेच कारण असते तर निदान सुखवस्तू लोकांना उचलेगिरी करायची काय गरज? पण असे होत नाही. परदेशात, विशेषत: युरोप- अमेरिकेत जाऊन आलेले पर्यटक तिकडच्या प्रामाणिकप्रणाची स्तुती करतात. मॉल नसतील तिथे वर्तमानपत्रे, भाजी, फळे किमतीच्या बिल्ल्यासह मांडून ठेवलेली असतात. स्थानिक लोक प्रामाणिकपणे त्या बिल्ल्यावर लिहीलेल्या किंमतीनुसार शेजारी ठेवलेल्या पेटीत पैसे टाकून वस्तू घेऊन निघून जातात. पर्यटन कंपन्यांचा अनुभव असा आहे की परदेशातील अशा घटनांचे कौतुक करताना कित्येक भारतीय पर्यटक नकळत स्वत: करत असलेली उचलेगिरी विसरून जातात. हॉटेलमधल्या टॉवेलपासून शक्य असेल त्यातले बरेच काही ते घरी घेऊन येतात. प्रवासी कंपन्यांकडून फक्त ब्रेकफास्ट-जेवण पुरवले जाते, अधेमधे भूक लागली तर कशाला खर्च करा, म्हणून काही पर्यटक एका वेळी खाऊ शकणार नाही एवढे पदार्थ मागवतात. त्यातून उरलेले वाटेत खायला म्हणून खुशाल रॅप करून हळूच खिशात टाकून नेतात. नायगारा फॉल्स सारख्या जगप्रसिद्ध ठिकाणी पुनर्वापर करता येतील असे रेनकोट्स दिले जातात. ते तिथे नंतर जमा करायचे असतात. काही पर्यटक ते "आठवण"(?) म्हणून घरी घेऊन येतात. कित्येक प्रवासी कंपन्या परदेशात कसे वागावे यासाठी हल्ली प्रवासपूर्व कार्यशाळा घेऊ लागल्या आहेत. पण आपल्याच देशात कसे वागावे याच्या कार्यशाळा कोणी आणि कुठे घ्यायच्या? संत-परंपरा असणार्‍या, थोर सांस्कृतिक मूल्ये जपणार्‍या आपल्या देशात ही उचलेगिरीची कीड समाजातल्या सगळ्या स्तरांमधे का झिरपत गेली असावी ?

देशप्रेमाचा आणि सामाजिक शिस्तीचा अभाव हे यामागचे एक महत्वाचे कारण आहे. एवढं चालायचच असा लोकांचा दृष्टीकोन होऊ लागला आहे. जपानमधे त्सुनामी नंतर जो उत्पात झाला तेव्हा वीजपुरवठा खंडित झाला होता. साहजिक बिलींग- सुरक्षा यंत्रणा बंद होत्या तरीही मॉल मधून खरेदी करणारे लोक हातातल्या वस्तू जिथल्या तिथे तशाच ठेवून शांतपणे बाहेर पडले. अशी सामाजिक शिस्त आणि सचोटी आपल्यामधे उतरणे फार गरजेचे आहे. सामान्य जनतेचं सोडाच, आपले सांस्कृतिक क्षेत्रही याला याला अपवाद नाही. परदेशी कथानकांची-चित्रपटाची जशीच्या तशी नक्कल करणे हा तर आपला जणू अधिकारच आहे. मग तो शोमन म्हणून नावाजलेल्या राजकपूरचा "चोरी चोरी" असो (त्यांनी तर नावातच कबुली देऊन टाकली) वा संजय भन्सालीचा "ब्लॅक". कधी कधी तर एकाच वेळी दोन संगीतकार एकाच विदेशी गाण्याची चाल उचलतात आणि मूळ चाल (म्हणजे पहिली चोरी) कुणाची यावर वाद घालतात. दुसर्‍याची कविता आपल्या नावावर खपवण्याचे प्रकार उघडपणे चालतात. एखाद्या शैलीचा-विचारांचा कलाकृतीवर-लेखनावर प्रभाव पडणे, प्रेरणा घेणे हे कलाकारांच्या बाबतीत घडणारच पण एरवी, हे अमुक एका कलाकृतीचे रूपांतर आहे असे स्पष्टपणे मान्य करण्याचा, मूळ निर्मात्याला त्याचे श्रेय देण्याचा मोठेपणा का दाखवला जात नाही? जेथे इतर साहित्यिकांचे वेचे वापरले आहेत तिथे त्यानुसार स्पष्ट उल्लेख असायला हवा. पण लक्षात कोण घेतो? किंवा लक्षात घ्यायचेच असते कुणाला. आत्म्याच्या पारदर्शतेचे दाखले देणार्‍या अभंगांमधे "तुका म्हणे" "नामा म्हणे" अशी संतांची "स्वाक्षरी" शेवटी असल्याने नाईलाजाने का होईना ते अभंग साहित्यिक खिसेकापूंपासून सुरक्षित राहिले आहेत.

उचलेगिरी ही चोरीच आहे ही जाणीव मुळात मनात भिनली पाहिजे. बर्‍याचदा "नाहीतरी कुणाला कळतय" म्हणून "कुणी पाहत नाही" म्हणून अशी उचलेगिरी सर्रास केली जाते तेव्हा ही बोधकथा आठवते. एका आश्रमातील शिष्य एका लहानशा पक्ष्याला पकडतो आणि गुरूंना विचारतो "मी याला मारू का? ".गुरू म्हणतात "अवश्य, पण कुणीही ते पाहता कामा नये". शिष्य त्या पक्ष्याला घेऊन निर्जन स्थळी जातो. तो पक्ष्याला मारणार तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की हा पक्षी पाहतो आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "मी" पाहतो आहे. मनोमन गुरूला नमस्कार करून शिष्य त्या पक्ष्याला सोडून देतो. इथे गुरूइतकाच, आत्मज्ञान झालेला शिष्य श्रेष्ट ठरतो. ज्याचे आपण वरवर सुकृती म्हणून समर्थन करतो अशा आपल्या प्रत्येक कृतीकडे, या शिष्यासारखेच आत्मदीप पेटवून, योग्यायोग्यतेचा निकष लावून, आपण "स्वत:" पाहायला हवे.

वाल्या ते वाल्मिकी

वाल्या ते वाल्मिकी - चांगुलपणाच्या शोधाचा प्रवास

माणूस जन्मत:च चांगला किंवा वाईट नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. मात्र चुकांची कबुली देण्याचं धाडस त्याने दाखवलं तर आयुष्य त्याला आणखी एक संधी देऊ शकतं. बर्‍याचदा साधे सरळ जीवन जगणारे लोक क्षणिक उद्वेगात, रागाच्या भरात मोठी चूक करून बसतात आणि जन्मभरासाठी गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्या कपाळी येतो. काही जण नशेमधे, काही जण आत्मसंरक्षणासाठी तर काही जण दबावामुळे असे काही कृत्य करतात ज्याचा त्यांना जन्मभर पश्चाताप करावा लागतो. शिक्षा भोगता भोगता त्यांच्यातले माणूसपण आतच विझू लागते. अट्टल गुन्हेगारांच्या संगतीत निर्ढावायच्या आत त्यांच्या आतल्या माणूसपणाला साद घालण्याचा प्रयत्न केला गेला तर तो प्रयत्न त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरू शकतो. गुन्हेगाराला माणूस म्हणून पुन्हा एकदा जगण्याच्या प्रवाहात आणू शकतो.
"वाल्मिकी प्रतिभा" ही रविंद्रनाथ टागोरांनी लिहीलेली नाटिका, वाल्या कोळ्याचा वाल्मिकी कसा झाला त्याची ही कथा. या नाटिकेत क्रूर डाकूंची एक टोळी जंगलात वास्तव्य करीत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून आणतात. मला मारू नका-मारू नका असे ती मुलगी आर्तपणे विनवू लागते पण डाकूंना धुंदी चढली असते. ते तिला बळी देणार इतक्यात त्या कोवळ्या मुलीचा करूण चेहरा पाहून, त्या डाकूंच्या सरदाराचे मन एकदम द्रवते, तलवार फेकून तो त्या मुलीला हृदयाशी धरतो. इतर डाकू हे पाहून संतापतात आणि सरदाराला बोल लावतात. परंतु त्या क्षणी हृदयपालट झालेला सरदार आमूलाग्र बदलतो..वाटमारीचा धंदा सोडून त्या बालिकेचा सांभाळ करू लागतो. सरस्वती देवी प्रकट होऊन त्याला म्हणते "मीच या बालिकेचे रूप घेऊन तुझी परिक्षा पाहिली व त्यात तू उत्तीर्ण झालास", एवढे बोलून आपली वीणा सरदाराच्या हाती सोपवून सरस्वती अंतर्धान पावते. नाटिका संपते.

या नाटिकेचा प्रयोग मध्यंतरी पुण्यातील एका सांस्कृतिक कार्यक्रमात झाला. त्याचे वेगळेपण म्हणजे यात भूमिका करणारे सगळे कलाकार कलकत्त्याच्या प्रेसिडेंसी जेलमधले कैदी होते. या कैद्यांची राहायची-ने आण करण्याची व्यवस्था पुणे पोलिसांनी केली होती असा या बातमीत आवर्जून उल्लेख करण्यात आला होता. यातील सरदाराची- मुख्य भूमिका करणारा कलाकार तर जवळपास १७ केसेसमधे अडकलेला गुंड. या कैद्यांना घेऊन ही नृत्यनाटिका बसवणार्‍या आलोकनंदा यांच्यामुळे या गुन्हेगाराचे मन:परिवर्तन झाले. ही नाटिका म्हणजे जणू त्याचीच कथा. एक मनस्वी व्यक्ती, एक उत्तम कलाकृती आणि त्या कलेचा गुन्हेगाराच्या हृदयातील मरू घातलेल्या भावनांना झालेला हळुवार स्पर्श, काय करामत करू शकतो त्याचेच हे उदाहरण!

मनाबरोबरच जीवनपरिवर्तनाचं उदाहरण ठरलेलं एक वृत्त येथे सांगायलाच हवं. चाळीतल्या मुलांबरोबर उनाडक्या करणार्‍या लक्ष्मण गोळेने वयाच्या १६व्या वर्षी भांडणातून एकावर वस्त-याने वार केला आणि तो तुरुंगात गेला. पुढे त्याच्यावर हाफ मर्डरसह जवळपास १९ गुन्हे दाखल झाले. घरच्यांनी त्याच्याबरोबरचे संबंध तोडले. नाशिकमधील तुरुंगात असताना 'माझे सत्याचे प्रयोग' हे महात्मा गांधींचं आत्मचरित्र त्याच्या वाचनात आलं. महात्मा गांधींनीदेखील आयुष्यात चुका केल्या होत्या, मात्र त्यांनी त्या मोकळेपणी कबूल केल्या, हे त्याला त्यातून जाणवलं आणि तो त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. त्याने हळूहळू स्वत:मध्ये बदल घडवण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांना पत्र लिहून आपले गुन्हे कबूल केले. त्याची वर्तणूक पाहून त्याला शिक्षेत सूट देण्यात आली. जेलमधून सुटल्यानंतर त्याने पूर्वी ज्या ज्या लोकांना त्रास दिला होता, त्या सर्वांची पत्र लिहून माफी मागितली. लहानमोठ्या नोकर्‍या केल्यावर आज तो मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. त्याने लग्न केलं. मुलगीही झाली. चांगलं बनण्याचा प्रयत्न केवळ समाजाच्या साथीने यशस्वी होऊ शकतो असं म्हणणारा लक्ष्मण "it's never too late" या उक्तीचा प्रत्यय देतो.
लक्ष्मण तर गुन्हेगार असून बदलला. मुळात आपली कायद्याची प्रक्रिया इतकी संथ आहे की गुन्हा सिद्ध न झालेले कित्येक आरोपी केवळ खटला प्रलंबित आहे म्हणून नाईलाजाने तुरूंगात खितपत पडलेले असतात. याचा अर्थ ते निर्दोषच असतात असा नसला तरी तुरूंगातील वातावरणात छोट्या गुन्हेगार्‍यांना अट्टल गुन्हेगारांकडून मोठ्या गुन्ह्यांचे जणू प्रशिक्षणच मिळत असते. यामुळे त्यांच्या सुधारणेच्या शक्यता मावळू लागतात. अर्थात हे सगळ्या गुन्हेगारांना लागू होत नाही. क्रौर्याची परिसीमा गाठणार्‍या कसाब सारख्या नराधम गुंडांच्या वर्तणूकीत पश्चातापाचा लवलेशही आढळत नाही, अशा खुनशी गुन्हेगारांना मानवाधिकाराच्या नावाखाली माणसात आणण्याचा प्रयत्न करणे हा मूर्खपणाच नव्हे तर त्यांच्या अमानुषतेचे बळी ठरलेल्या निरपराध जीवांचा घोर अपमान आहे. मात्र माणूसपणाची धुगधुगी उरली आहे असे ज्या गुन्हेगारांच्या वर्तनातून जाणवते त्यांना शिक्षा करणार्‍या हातांऐवजी पुनर्वसन करणार्‍या हातांचा आधार मिळायला हवा. तरच त्यांना आयुष्यात नव्याने उभं राहता येईल.

१९९४ चा मॅगसेसे पुरस्कारविजेत्या माजी महिला पोलिस अधिकारी किरण बेदी यांनी तिहार जेलचे रूपांतर तिहार आश्रमात करून हे सिद्ध करून दाखवले होते. पृथ्वीवरचा नरक म्हणावा अशा वातावरणातला, केवळ २५०० कैद्यांची क्षमता असूनही ८००० पेक्षा जास्त कैदी कोंबलेला तिहार तुरूंग अंमली पदार्थ, कमालीची अस्वच्छता, टोळीयुद्ध, माफिया कैद्यांचे साम्राज्य, हतबल अधिकारी आणि भ्रष्ट कर्मचारी यांच्या विळख्यात सापडला होता. किरण बेदींनी आधी कैद्यांशी सुसंवाद सुरू केला. तुरूंग पंचायत सुरू केली. ग्रंथालय सुरू केले, ध्यान-केंद्र सुरू केले, मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले, कैद्यांना पुढील शिक्षणाला प्रवृत्त करून मुक्त विद्यापीठाचे दालन सुरू केले, कैद्यांचे जीवनमान सुधारले. त्यांच्यातल्या माणसाला जागवले. किरण बेदींचे हे प्रयत्न कित्येक कैद्यांना नवजीवन देऊन गेले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक तुरूंगाधिकार्‍यांनी या योजना राबवायला सुरूवात केली.

वाल्या ते वाल्मिकी हे दोन माणसांमधलं द्वंद्व नाही तर एकाच मनाचा अविष्कार असलेल्या दोन वृत्तींमधील द्वंद्व आहे. या द्वंद्वाची जाणीव होणे हीच माणसाच्या बदलण्याची सुरूवात असते मग तो माणूस आमूलाग्र बदलू शकतो. खरं तर परिवर्तन हा माणसाचा स्थायी भावच आहे. त्याचे प्रकट मन नकारात्मक विचार करत असते पण अप्रकट मनाची स्वत:ला बदलण्याची आस चांगुलपणाच्या पहिल्या पायरीवर त्याला घेऊन जाते. गरज आहे ती चांगलं बनण्याची त्याची धडपड समजून घेऊन समाजाने त्याच्या पाठीमागे उभं राहण्याची.. त्याच्या जीवनातला टर्निंग पॉईंट शोधायला मदत करण्याची. एखादी व्यक्ती, कला, पुस्तक, विचार, शैक्षणिक यश, शाबासकीची थाप, मायेचा शब्द... यापैकी कशातही हा टर्निंग पॉईंट दडलेला असू शकतो. आल्फ्रेड नोबेल यांनी आपल्या एका संशोधनाने जगाला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते पण आपल्याच निधनाचे चुकीचे वृत्त वाचून ते हादरले..बदलले.. इतके की आज त्यांच्या नावाचं नोबेल प्राईझ जगविख्यात आहे. तिहार तुरूंगातल्या एका सुशिक्षीत कैद्याचे हे शब्द किरण बेदी यांच्यावर लिहीलेल्या "आय डेअर" या पुस्तकात नोंदले गेले आहेत. तो आपल्या कैदी विद्यार्थ्यांना सांगत असे "भूतकाळात जे घडून गेले ते तुमच्या हातात नव्हते पण भविष्यकाळात तुमच्यातील माणुसकीच बाहेर यायला पाहिजे, तोच प्रयत्न आपण आता करायचा आहे".

Wednesday, June 27, 2012

पाऊस कवितेतला

पाऊस कवितेतला....पाऊस मनातला
पहिला पाऊस पडला आणि मृद्गंध दरवळला की बहुतेक प्रत्येक माणूस मृण्मय होत असावा.. पर्जन्याच्या रूप-गंध-स्पर्शाने कवी होत असावा. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामनात अशा कविता सहजपणे लिहून जाते. (मात्र इतरांच्या कानांवर अत्याचार न करता त्या कविता स्वत:च स्वत:ला ऐकवायच्या असतात...) एरवी निसर्गाकडे पाहायला वेळ नसलेलं मन पावसाच्या आणि काव्याच्या सरीत न्हाऊन निघतं. आपल्यासारख्या सामान्यांची ही तर्‍हा, मग प्रतिभेचं देणं लाभलेल्या प्रज्ञावंत कवींना पावसाने आकृष्ट केलं नाही तरच नवल! हिरव्या वाटेवरचे, ना.धों. महानोर हे संवेदनशील निसर्गकवी. त्यांचा शब्द न शब्द हा ओला प्रत्यय देतो..
"मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले.. घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले..
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी... शिडकावा संथ येता पाने निळी कुसुंबी.."
पाऊस पडून गेल्यानंतरचे निसर्गाचे सौंदर्य कवी बा.भ.बोरकर शब्दबद्ध करतात तेव्हा आपणही ते निसर्गचित्र नकळत पाहू लागतो..
"पाऊस रात्री होऊन गेला रानामाळांवर सोन्याचे ऊन
अजून माती कोवळी ओली पानापानातून कालची धून.."
पाऊस कसा पडतो याचं पाणी-वाफ-बाष्पीभवन अशा रूक्ष शब्दांमधलं उत्तर आपल्याला माहीत आहे पण हेच सूत्र कवी ग.दि.माडगूळकर किती गोजिरवाण्या शब्दात मांडतात..
"नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर... अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर..
सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर... तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर...
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन.. नदी तरंगत जाते पंख वार्‍याचे लेऊन...
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा...पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा..."

पावसाचा आणि प्रिय व्यक्तीच्या आठवणीचा एक विलक्षण संबंध आहे. पाऊस पडण्यापूर्वीचं वातावरण काहीसं बेचैन करणारं असतं. पण पावसाच्या नुसत्या चाहुलीने आठवणींच्या सरी बरसू लागतात.. हीच मनोवस्था कवी मंगेश पाडगावकर अशा शब्दात गुंफतात
"संथ संथ सरकणारे पहिले वहिले पावसाळी ढग
गढूळ डोळ्यांच्या घरांचे मोर झाले अचानक..."
पावसाआधीची हुरहूर कवयित्री इंदिरा संतांच्या शब्दातून अचूक व्यक्त होते..
"ओथंबून आलेले पावसाळी आभाळ... घननीळ सावल्यांनी धुंदावलेला माळ..
काहूर भरला व्याकूळ वारा.... मनोमनींच्या छेडतो तारा.. "
पावसाकडे तरूण मन काहीशा रोमँटिक भावनेने पाहतं. पावसाळी संदर्भाशिवाय प्रेमाला पूर्णत्व येत नाही.
"अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे.. उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहूर थरारते रानभर.. तसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर" (कवी संदीप खरे) असे "त्याला" पावसाच्या साक्षीने वाटते तर "तिची" स्थिती कवयित्री शांता शेळकेंच्या शब्दात अलगदपणे उलगडते..
"वीज कडाडतां, भय दाटे उरीं ..एकलि मी इथे, सखा राहे दुरी
मन व्याकूळ, सजणाच्या ध्यासांत ग .."
मनस्वी माणसाच्या मनोवस्थेला कवी वा. रा. कांत "पाऊस जरि बाहिर पडतो ..आतून कुणीतरी भिजतो.." असे समर्पक शब्दरूप देतात.

काही आयुष्यांना गरिबीचा, अवहेलनेचा, विरहाचा शाप असतो, "जीवनाची" कडवट सत्य पचवलेल्यांना पाण्याची रूपं मोहं तरी कशी घालणार! पावसाच्या मार्‍यापासून आपला गळक्या छपराचा-गाडग्या-मडक्यांचा संसार जपू पाहणारी एखादी ती त्या पावसाला कशी कळवळून विनवते हे सांगून कवयित्री इंदिरा संत आपल्याला अंतर्मुख करतात. ती म्हणते..
"नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी अन दारात सायली.."
अशा वेळी चार्ली चाप्लीनचे शब्द आठवतात.. "मला पाऊस आवडतो कारण पावसात माझे अश्रू कुणाला दिसत नाहीत" कवी चंद्रशेखर गोखलेंनी चितारलेलं पाण्याचं हे रूप तर अंगावर काटा आणतं...
"पाण्याचं वागणं.. किती विसंगत... पोहोणार्‍याला बुडवून.. प्रेताला ठेवतं तरंगत.."
बळीराजासाठी पाऊस म्हणजे वरदान आणि अतिवृष्टी किंवा अवर्षण दोन्हीही शाप.. वाट पाहून डोळे शिणायच्या आत जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकर्‍याचे डोळे आनंदाने पाणावतात. पेरणी होते. सृजनाचा हा उत्सव कवी वसंत सावंतांच्या या शब्दांनी साजरा होतो..तो अंकुर जणू म्हणतो..
"उरी नांगराचा रूते फाळ माझ्या.. भुईतून मी सारखा वाढतो
असा वाढताना नभोमाऊलीचा.. उमाळून पान्हाच मी चाखतो.."

पावसाचा प्रलयकारी अवतार सोडला तर त्याची सगळीच रूपं अतिशय मनोहारी असतात. काही गद्य माणसं असतात म्हणा... त्यांना पाऊस म्हटलं की चिखल, रबरबाट, निसरडं, तुंबलेली गटारं, नादुरूस्त छत्री, बंद पडलेली गाडी, शिंका, ओला वैताग हेच आठवतं....कुणी म्हणेल मुंबईच्या धावपळीत "मिठी " ओसंडून वाहिल्यावर आणि लोकल अडकल्यावर दुसरं काय आठवणार. हे खरं असलं तरी पाऊस या एका शब्दानेच बहुतेकांच मन निवतं आणि त्याच्या अनुभूतीने अगदी गारीगार होतं.. कल्पना करा..गरमागरम कांदाभजी- सोबत वाफाळता चहा- हातात एखादं छानसं पुस्तक किंवा एखाद्या आवडत्या गझलेचे-गीताचे सूर आणि खिडकीबाहेर निथळणारा पाऊस. सुख सुख म्हणतात ते हेच असावं. याहीपेक्षा रेनकोट न घालता, छत्री न घेता त्या पावसाला थेट जाऊन भेटून येण्यातला आनंद तर केवळ अवर्णनीय...
पावसाचा आणि मानवी भावनांचा अतिशय निकटचा संबंध आहे. भावना उत्कटपणे व्यक्त करण्याचं कदाचित पाऊस हे केवळ माध्यम असावं... मनातला गहिवर मेघांसारखा दाटून येतो आणि आनंदाश्रू किंवा दु:खाश्रूंच्या रूपाने ओघळतो-बरसतो म्हणूनच कुणी कवी असेही म्हणतो
"पाऊस ऋतुचे निमित्त करूनि दिसतो..
पाऊस पापणीआड कधिचा असतो.."

(पूर्वप्रसिद्धी- म.टा नागपूर)