Wednesday, June 27, 2012

अन्नब्रह्माचा अपमान

खवैयेगिरी की अन्नब्रह्माचा अपमान?
"एक और लड्डू ?" असे घाबरलेल्या चेहर्‍याने म्हणणार्‍या जावईबुवांची "इनो" ची जाहिरात आठवतेय? त्या जाहिरातीत "इनो" घेतल्यावर तेच जावईबुवा उत्फुल्ल चेहर्‍याने "हो ज्जाये लड्डू" म्हणत बाह्या सरसावतात. इनो घेऊ पण खाऊ म्हणणार्‍या आपल्या देशात खिलवण्यालाही खूप महत्व आहे. चांगलेचुंगले खाऊ घालूनच प्रेम व्यक्त करायची आपल्याला सवय झाली आहे. आग्रह खूप केला तरच पाहुणचार चांगला केला असे आपल्याकडे मानले जाते.
प्रख्यात साहित्यिक पु.लं.देशपांडे यांचा "माझे खाद्यजीवन" म्हणून एक सुंदर लेख आहे. खाण्याच्या त्या षोकामागे रसिकता आहे. पदार्थाबरोबरच त्याच्या रंग-रूप-रस-गंधाला दिलेली दाद आहे. सीमेवर रक्षण करत असताना अतिशय गारठून आत्महत्येचे विचार मनात येत असताना एका सैनिकाच्या हाती हा लेख पडला. असा खाद्यानुभव घेण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे या विचाराने त्याने सारे नैराश्य झटकून टाकले असे म्हणतात. विवीध प्रांतांचे खाद्यवैशिष्ट्य अनुभवण्याची कित्येकांना आवड असते. तर्‍हतर्‍हेचा स्वैपाक करून कुटुंबाला खाऊ घालण्यात गृहिणींना कृतार्थता वाटते. जागतिकीकरणाबरोबर लोकांच्या रूचीमधे बदल होऊ लागला आहे. २४ तास चालणारी फूड चॅनेल्स आवडीने पाहिली जाऊ लागली आहेत. खाद्यपदार्थांबरोबरच पाचकांच्या जाहिरातींनी बाजारात धुमाकूळ घातला आहे. "माणूस जगण्यासाठी खातो की खाण्यासाठी जगतो" याचे उत्तर आज तरी माणूस खाण्यासाठी जगतो, हेच आहे.

हीच खवैयेगिरी आता रसिकतेची मर्यादा ओलांडू लागल्याचे दिसते आहे. इंदौरजवळच्या एका ’ढाणी’ मधे आम्ही जेवायला गेलो असताना वीस एक पदार्थांनी गच्च भरलेले ताट त्यांनी (तिकीट सारखेच असल्याने) लहान मुलांसमोरही ठेवले. जेवण सुरू करण्यापूर्वीच आम्ही त्यातले पदार्थ कमी करण्याची विनंती केली. ते चकित झाले पण त्यांनी केले काहीच नाही. मोठया माणसांनाही एवढे पदार्थ खाणे शक्य नव्हते. न राहवून आम्हीच ते काढून ठेवले आणि मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली. त्यावर ते म्हणाले की आमच्याकडे (उत्तर भारतात) विचारून वाढणे हा पाहुण्यांचा अपमान समजला जातो(!) देशभरात कित्येक उपहारगृहांमधे रोज असे कितीतरी अन्न वाया जात असणार!
आपल्याकडे एकूणच (उत्तर भारतातच नव्हे) आग्रहाचा आणि मानपानाचा अजब संबंध लावला गेला आहे. "घर म्हणून" थोडंसं अन्न उरवण्यासाठी जास्त रांधण्याची देखील काही घरी पद्धत असते. उरलेल्या अन्नापासून थालीपीठासारखे पौष्टिक पदार्थ करून ते अन्न संपवले जाते, निदान गरीबांना दिले जाते, की सरळ टाकून दिले जाते? "आमच्याकडे सकाळची भाजी संध्याकाळी चालत नाही", "आम्ही मोजून स्वयंपाक करत नाही" असं कौतुकाने सांगितलं जातं. यात काही गैर नाही पण उरलेल्या अन्नाचे काय केले जाते? एखादेवेळेस गमतीखातर पैज लावून खवय्यांची स्पर्धा ठेवली जाते. तेवढे अन्न जिरवण्याची ताकद असलेल्या मंडळींनी ते खायला हरकत नाही. काही जण संकोची स्वभावाचे असतात तेव्हा थोडा आग्रह करण्यात वेगळीच आपुलकी आणि आनंद असतो पण बर्‍याचदा त्याचा अतिरेक होतो. अखेर ते अन्न पानात टाकून दिले जाते.


पंगतीत फार आग्रह होतो त्यापेक्षा "स्वरूची भोजन" ही नामी कल्पना आहे असे आधी वाटायचे पण ही बुफेची पद्धत मोजक्या लोकांसाठी ठीक आहे. समारंभात आपल्याकडे शेकडो लोक जेवायला बोलावले जातात. पुन्हा पुन्हा रांगेत जाण्यापेक्षा आत्ताच सगळे ताट खच्चून भरून घ्यावे असे लोकांना वाटते. खाण्याचे किती प्रकारचे स्टॉल्स समारंभात होते हा प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. त्यामुळे ताटात पंजाबी भाज्या, मराठी झुणका-भाकर, बंगाली मिठाई खर्‍या अर्थाने "समरस" झालेले असतात. हे कमी की काय म्हणून चायनीज पदार्थ, चाट, आईस्क्रीम.. यादी संपत नाही आणि ताटातले पदार्थ देखील! साहजिक ते तसेच टाकून दिले जातात. उत्तम दर्जाचे पण मोजके पदार्थ करण्याचा पायंडा पाडणे आणि खाऊ शकू एवढेच पानात वाढून घेणे खरच इतके कठीण आहे?

आपल्या देशात कित्येक लोक अर्धपोटी झोपत असतात, गरिबी-कुपोषणामुळे बालमृत्युचे प्रमाण वाढत चालले आहे. (एकात्मिक बालविकास योजना अपुरी पडते आहे) कुपोषणामुळे भारतातील जवळपास 42 टक्के मुले आरोग्यपूर्ण नाहीत, ही वस्तुस्थिती चिंतेत टाकणारी आहे, असे पंतप्रधानांचे या वर्षारंभीचे (१०-१-१२) वक्तव्य आहे. असे असताना अन्न टाकून देण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे काय? कुणी काय आणि किती खावे हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अन्नाची नासाडी हा नक्कीच सामाजिक प्रश्न आहे. शेगाव संस्थानच्या भक्तनिवासातील भोजनालयात भोजन सुरू असताना एक जण एक पाटी घेऊन थोडा थोडा वेळ प्रत्येक टेबलजवळ थांबतो. "हा प्रसाद आहे, उष्टे टाकून त्याचा अपमान करू नये" अशा आशयाचा मजकूर त्यावर असतो. आमटे परिवाराच्या हेमलकसा येथील लोकबिरादरीतील भोजनालयाबाहेर, अन्न वाटप केंद्राकडे खुरडत जाणार्‍या कुपोषित बालकाचा फोटो लावला आहे. (या फोटोस पुलित्झर पारितोषिक मिळाले असून बालकाची अन्नान्न दशा पाहून व्यथित झालेल्या त्या फोटोग्राफरने अखेर आत्महत्या केली असेही तेथे लिहीले आहे) तो फोटो पाहिल्यानंतर कुणी अन्न वाया घालवण्याची शक्यता नाही. परंतु अशा फोटोतून संदेश द्यावा लागावा यातच सारं आलं.

गांधीजी पाणी पिताना तहान भागेल एवढेच पाणी पेल्यात घेत असत. अन्नाच्याही बाबतीत हा संस्कार होणे अत्यावश्यक आहे. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" इतका अलिप्त विचार श्लोकांमधून आपल्याकडे रूजवला गेला. गोळवलकर गुरूजींसारख्या संवेदनशील व्यक्ती देशातील उपाशी जनतेच्या विचाराने विकल होऊन एकभुक्त राहत असत. "मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझिया हातूनी देशसेवा, म्हणोनि मिळावी मला शक्ती देवा" असा असामान्य विचार करणारे लोकही आपल्याच देशातले. "कशासाठी- पोटासाठी" म्हणणारा चाकरमानी एवढा उदात्त विचार करू शकत नसला तरी त्याला अन्नाची आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या कष्टांची किंमत आहे. मात्र प्रतिष्टेच्या नावावर अन्न उधळून देणारे काही धनदांडगे एकीकडे आणि अन्नाला मोताद समाज दुसरीकडे हे चित्र देखील आपल्याच देशातले आहे. स्वत:च्या भुकेबरोबरच इतरांच्या भुकेची जाणीव ठेवून वेळप्रसंगी घासातला घास दुसर्‍याला देणे ही आपली संस्कृती आहे. आपला प्रवास प्रकृतीकडून संस्कृतीकडे होण्याएवजी विकृतीकडे तर होत नाहीये ना!

पूर्वप्रसिद्धी- मातृभूमि

Wednesday, May 16, 2012

सत्यमेव जयते

सत्यमेव जयते - अंधारलेल्या गर्दीत उजेडाचा शोध

आमिर खान प्रॉडक्शन्सच्या छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचे दोन भाग एव्हाना प्रसारित झाले आहेत. स्टार प्लस वाहिनीबरोबरच खेडोपाडी पोचलेल्या दूरदर्शनवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण होत असल्याने हा शो संपूर्ण भारतात गाजतो आहे. ह्या कार्यक्रमाची संकल्पना ‘सामाजिक मुद्यावरील टॉक शो’ अशी आहे. वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन, समाजातल्या विवीध स्तरातील लोकांचे अनुभव, तज्ञांचे मत व चर्चा असे ह्या कार्यक्रमाचे स्वरूप तर केवळ समस्या न मांडता त्यावर उपाय सुचवणे हे याचे खास वेगळेपण आहे. शो चा अव्वल दर्जा बघता आमीरने त्याचे "परफेक्शनिस्ट" हे बिरूद सार्थ केले आहे.

 कार्यक्रमाची वेळ, शीर्षकगीत, भारताच्या ब्रीदवाक्याचा नाव म्हणून वापर, प्रादेशिक भाषांचा-वेबसाईटचा वापर करून कार्यक्रमाची पोच वाढवण्याचा प्रयत्न, अशा प्रत्येक गोष्टीत "आमिर टच" दिसून येतो. त्यांच्या पडद्यामागील टीमने या कार्यक्रमासाठी केलेलं संशोधन आणि सत्यजित भटकळ यांचं हृद्य दिग्दर्शन हे या कार्यक्रमाचं वैशिष्टय. टीव्हीवर पहिल्यांदाच कार्यक्रम करत असल्याने आमीरच्या देहबोलीत तरूणांसारखा उत्साह व ताजेपणा आहे. कार्यक्रमात आपल्या हास्याने गंभीर परिस्थिती एकदम हलकीफुलकी करण्याचे कसब आणि संवाद साधण्याची हातोटी त्याच्यात आहे. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालण्याचं सामर्थ्य तर कार्यक्रमाच्या संकल्पनेतच दडलं आहे.
२४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर पूर्वीही अशा चर्चा सादर झाल्या आहेत. पण त्या कार्यक्रमांचे सादरीकरण बटबटीत असते. त्या मानाने "सत्यमेव जयते" अतिशय संयत पण परिणामकारक ठरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या KBC नंतर भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करू शकण्याचे सामर्थ्य आमिरच्या सच्चेपणात आहे. आमिरनेही काही बाजारू चित्रपट, अनावश्यक वाद निर्माण केले आहेत, दुसर्‍या विवाहाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या खाजगी आयुष्यातील सच्चेपणाबद्दल त्याचे कुटुंबियच सांगू शकतील परंतु गेल्या काही वर्षात आमिरच्या चित्रपटातून त्याने हाताळलेले विषय, वादग्रस्त पुरस्कार समारंभांपासून त्याचे लांब राहणे, मराठी शिकण्याचा मनापासून प्रयत्न करणे,"अतुल्य भारत" या दर्जेदार जाहिराती मानधन न घेता करणे अशा कृतींमुळे आमिरची एक सकारात्मक प्रतिमा जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे हा शो अधिक खराखुरा वाटतो. एसएमएस मधून मिळालेल्या पैशांचा देणगीसाठी विनीयोग होत असल्याने या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली आहे.


अर्थात या कार्यक्रमामागे केवळ सामाजिक प्रश्न सुटण्याविषयी आमिरची कळकळ नाही कारण यातून आमिरला करोडोंनी पैसा मिळणार आहे. पण फक्त तेवढाच उद्देश असता तर आमिर कुठलाही पठडीतला लोकप्रिय कार्यक्रम देऊ शकला असता. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरने प्रेक्षकांच्या प्रती आपले उत्तरदायित्व सिद्ध केलंय. तरीही ज्यांना आमिरचा हा प्रयत्न कृत्रिम वाटतो त्यांनी एवढाच विचार करावा की कमीत कमी आमिर खान एवढे काम तरी करत आहे, ज्या बद्दल आपण नुसत्या गप्पा ठोकत असतो.
कार्यक्रमाच्या पहिल्या भागातच "स्त्री भ्रूण हत्येचा" ज्वलंत प्रश्न हाताळला गेला. तो प्रश्न भारताच्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक सामाजिक स्तराचा असल्याने त्याची आच सर्वदूर पोचली. दुसर्‍या भागात "बालकांचे लैंगिक शोषण" या मुद्याने समाजाची एक दुखरी नस समोर आणली. दाहक वस्तुस्थितीची स्पष्ट जाणीव करून देणे हाच पर्याय या शो ने निवडला आहे. 

"It is easy in the world to live after the world's opinion; it is easy in solitude to live after our own; but the great man is he who in the midst of the crowd keeps with perfect sweetness the independence of solitude." (Ralph Waldo Emerson)

दुर्दैवाने भारतीयांना प्रत्येक प्रश्नासाठी एक "मसीहा" लागतो. केवळ एका एपिसोडमधे हे प्रश्न जादूसारखे सुटणार नसले तरी त्याची उत्तरे शोधण्यासाठी ज्या "मसीहा" ची गरज भारतीयांना असते तो आता ते आमिरमधे शोधू लागतील. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तो संपविण्याची जबाबदारी अण्णांचीच आहे असे जोवर लोक मानत आहेत आणि त्याची सुरूवात स्वत:पासून करायचे टाळत आहोत तोवर काही बदलणार नाही. आमिरच्या कार्यक्रमानंतर देखील लोक त्याच्याकडून अशाच अवास्तव अपेक्षा करू लागतील.

कार्यक्रमाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेता राजस्थान सरकारला आमिरचे "फास्ट ट्रॅक कोर्ट" सुरू करण्याचे आवाहन गांभीर्याने घ्यावे लागले. मुख्यमंत्री गेहलोत यांनी आमिरला भेटून त्यासंबंधी कार्यवाही केली. "स्त्री भ्रूण हत्या" हा प्रश्न जुनाच आहे, आमिरने हा मुद्दा मांडेतो असे कोर्ट सुरू करावे असे राजस्थान सरकारला आपणहून का वाटले नाही? सामाजिक प्रश्नांवरील उपायांसाठी देखील आता ग्लॅमर-जगताला साकडं घालायची गरज भासणार का! असं असेल तर अशा प्रश्नांविरूद्ध लढण्यात सामान्य कार्यकर्त्यांनी आपलं आयुष्य खर्ची का घालावं!
बाल-मजुरी पासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक विषय या शो च्या निमित्त्याने उचलले जातील. निदान काही प्रमाणात त्यावर कार्यवाही होईल. भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची अपेक्षा या कार्यक्रमाकडून आहे."ऑल इज वेल" अशी स्थिती येण्याइतका चमत्कार हा शो करू शकेल असे मुळीच नाही परंतु भारतीयांच्या मनातली मरू घातलेली संवेदनशीलता जरी या निमित्त्याने जागी झाली तरी "सत्यमेव जयते" मागचा उद्देश सफल होईल.

Saturday, May 5, 2012

मैं ’माधुरी दीक्षित’ बनना चाहती हूँ

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. शहाण्याने कलाक्षेत्राची पायरी चढतानाही दहादा विचार करावा."मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ" या नावाचा कलाक्षेत्रातील "स्ट्रगलर्स" च्या आयुष्याची आणि स्वप्नांची चित्तरकथा सांगणारा एक सिनेमा मागे येऊन गेला. त्यातल्या मुख्य भूमिकेतील अंतरा माळीचं नाव सुद्धा कित्येकांना आज आठवत नसेल. नवोदित कलाकार पावसाळ्यातील कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगवून एक-दोन चित्रपट, मालिकांमधे चमकून कायमचे पडद्याआड जातात. त्यांच्या जागी पुन्हा नवे चेहरे दिसू लागतात. कलाक्षेत्रातील धडपडीला "स्ट्रगल" म्हटले जाते. आज नावारूपाला आलेल्या कोणत्याही कलाकाराला तो चुकलेला नाही. शाहरूख खानचे दिल्लीमधे एक छोटेसे घड्याळाचे दुकान होते, अक्षय कुमार एक आचारी होता तर विद्या बालन लहानमोठ्या जाहिरातींमधून काम करत होती. पण प्रत्यक्षात या क्षेत्रात धडपडणार्‍यांपैकी जेमतेम ५ टक्के यशस्वी होतात. बाकीचे व्यथित जिणे जगत राहतात.

पूर्वी ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन इतका नकारात्मक होता की कलाक्षेत्रात जाणे म्हणजे वाया जाणे मानले जाई. नाटकात काम करायचे म्हणजे घरातून पळून वगैरे जायला लागायचे. तुलनेने आता या क्षेत्राला प्रचंड वलय लाभले आहे. प्रसिद्धीचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही, रातोरात स्टार बनवणार्‍या या जादुई कलानगरीने तरूणाईला भुरळ घातली नाही तरच नवल. या वलयामागे दूरचित्रवाणी आणि त्यावरील "रीऍलिटी शो" चा मोठा हात आहे. त्यातील स्पर्धकांना परिक्षकांच्या "माईंड ब्लोईंग, फॅंटास्टिक, आपने तो ओरिजनल से भी अच्छा परफॉर्म किया" अशा कॉमेंट्समुळे स्वर्ग दोन बोटे उरतो. त्यांचे आईवडील भरून पावतात.
याचा अर्थ अशा स्पर्धांमधे भाग घेऊ नये असे नव्हे, या निमित्त्याने "गॉडफादर" नसणार्‍या गुणी कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. पण कलाक्षेत्रातील प्रवासाची ही केवळ सुरूवात आहे हे आधी समजून घ्यायला हवे. प्रत्यक्षात असे क्वचित होते. प्रेक्षकांसाठी ते फक्त दोन घटकेचे मनोरंजन असते आणि कलाकारांसाठी थेट आयुष्याचा प्रश्न. लता-आशा यांनी कलेसाठी आयुष्य झोकून दिले आणि त्या अजरामर झाल्या. तेवढी चिकाटी या स्पर्धकांकडे नसते आणि असली तरी या क्षेत्रात इतकी स्पर्धा आहे की तुमच्यात काही अभूतपूर्व गुण असतील तरच एखादी सुनिधी चौहान किंवा श्रेया घोषाल बनू शकते. नाहीतर पहिला इंडीयन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतोय? नंतरच्या इंडीयन आयडॉल्सची तर नावेही आठवत नाहीत.
नाट्यक्षेत्रातून अनेक उत्तम कलाकार पुढे आले. चरित्र अभिनेते म्हणून त्यांनी नाव कमावले असले तरी व्यावहारिकदृष्ट्या त्यातले किती यशस्वी झाले? प्रसिद्धीचे परमोच्च शिखर पाहिलेल्या बालगंधर्वांसारख्या थोर कलावंतांनाही शेवटी उपेक्षेचे जिणे वाट्याला आले. काही अपवाद सोडले तर मधल्या पिढीतल्या बहुतेक नाट्यकलाकारांनी हिंदी चित्रपटातून फुटकळ भूमिका करत तडजोडी केल्या. मराठी चित्रपटात नायक म्हणवणार्‍या अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांसारख्या गुणी नटांनीही हिंदीमधे मिळतील त्या नगण्य भूमिका केल्या.

अमिताभ बच्चन यांना सुद्धा मधल्या काळात अपयशाने झोडपून काढले पण उत्तम अभिनयगुण, संस्कार, परिश्रम आणि जिद्द यांच्या आधारे त्यांनी तोल ढळू न देता महानायकपद पुन्हा खेचून आणले. परंतु हा अपवाद, त्या वेळचे तथाकथित सुपरस्टार राजेश खन्ना, विनोद खन्ना आज कुठे आहेत! शाहरूखसारखा सहज अभिनय किंवा आमीर खानसारखा परिपूर्णतेचा ध्यास नसलेल्या नव्या अभिनेत्यांना(अगदी स्टारपुत्रांना देखील) त्यांच्या भवितव्याची खात्री नाही. नुसते गॉगल उलटसुलट करून अमाप लोकप्रियता मिळवणार्‍या रजनीकांतसारखे, दैव सगळ्यांवर फिदा नसते (शिवाय अशा भूमिकांमधून "कलेचे समाधान" वगैरे मिळण्याचा काही संबंध नाही)
अभिनेत्रींची अवस्था तर अधिकच वाईट होते. नायिकाप्रधान चित्रपट आधीच कमी, त्यात आपल्याकडे विवाहित अभिनेत्रीला प्रेक्षक नाकारतात. त्या भितीने त्यांचे विवाहाचे वय लांबणीवर पडते. "झाडामागून पळण्याचे" वय संपले की करियरच्या उतारावर त्या एकेकाळच्या आपल्याच नायकांच्या आई-बहिणीच्या भूमिका करतात किंवा एखाद्या बड्या हस्तीशी लग्न करून कायमच्या पडद्याआड जातात नाहीतर वैफल्यग्रस्त होतात. हॉलीवूडमधेच नव्हे अगदी मराठी चित्रसृष्टीत देखील कित्येक नायिकांच्या शोकांतिका त्यांच्या आत्मचरित्रातून उमटल्या आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका करून आजही स्वत:ची छाप पाडणारी शबाना आझमी किंवा नृत्यकला आणि सौंदर्याचे वलय जतन करणारी हेमामालिनी एखाददुसरीच. नव्या इनिंगसाठी भारतात परतलेल्या माधुरीने आता सशक्त भूमिका स्वीकारल्या नाहीत तर तिला देखील "मैं कभी माधुरी दिक्षित थी" असेच म्हणावे लागेल.
नवीन अभिनेत्रींची स्थिती याहून अवघड आहे. खुद्द हेमामालिनीच्या मुलीलाही अखेर चित्रसृष्टीला रामराम ठोकावा लागला. केवळ दिसायला बरी आहे म्हणून काही मुलींना मॉडेलिंगचे अल्पजीवी जग खुणावायला लागते आणि चित्रपटक्षेत्र तर जणू आपली वाटच पाहत थांबलं आहे असं त्यांना वाटू लागतं. सौंदर्यस्पर्धांमधून अभिनेत्री होऊ पाहणार्‍यांचे नवे लोंढे येतच राहतात. "भूमिकेची गरज" या नावाखाली त्या अंगप्रदर्शन करायलाही तयार होतात. त्यातल्या ५ टक्के कॅटरिना, प्रियंका किंवा करीना कपूर बनू शकल्या तरी उरलेल्या ९५% जणींच भवितव्य काय? या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही हे यश टिकवून ठेवण्यासाठी जे परिश्रम घ्यावे लागतात तेवढी तयारी आणि कास्टींग काऊचला तोंड देण्याची क्षमता किती जणींमधे असते?

तात्कालिक यश मिळाले तरी त्यामागून येणारे अपेक्षांचे ओझे पेलण्याइतकी प्रतिभा आणि मायानगरीतील अस्थिरतेला स्वीकारण्याची मानसिक कणखरता ज्यांच्यात नाही त्यांनी कलाक्षेत्राच्या वाटेला जाऊ नये. याचा अर्थ कुणी कलाकार होऊच नये का? आर्थिक समृद्धी हेच कलाकाराच्या यशाचं माप असावं का? हाडाच्या कलावंताची तडफड फक्त त्यालाच कळते. गुरू ठाकूर यांनी ही वेदना परिणामकारक शब्दात "नटरंग" मधे मांडली आहे.
" ईश्वरा जन्म हा दिला, प्रसवली कला, थोर उपकार...
तुज चरणी लागली वरणी, कशी ही करणी करू साकार
एकला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग...
 नटरंग उभा, ललकारी नभा, स्वर ताल जाहले दंग "

पण जगण्यासाठी शेवटी व्यावसायिक तडजोड करावीच लागत असेल तर मग कलेच्या प्रेमाचा उरबडवेपणा कशाला! कलाकार म्हणून यशस्वी होण्यासाठी उपजत उत्तम कलागुण तर हवेतच. पण त्याला व्यासंगाची-वाचनाची-अभ्यासाची-रियाजाची डूब आणि व्यावहारिकतेची जाण असायला हवी. शाळा-महाविद्यालयातील एखाद्या नाट्यस्पर्धेत, गायनस्पर्धेत बक्षिस मिळाले म्हणजे आता कला हेच माझं करियर असा "चला मुरारी हीरो बनने" छापाचा स्वप्नाळू विचार न करता या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहायला हवं. आपल्या व्यक्तिमत्वासमोर वस्तुस्थितीचा आरसा धरला तर सगळी खरी उत्तरे मिळतात. कलाक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी रंगमंचावर किंवा पडद्यावर आपला मुखडाच झळकला पाहिजे हा अट्टाहास सोडला तर या क्षेत्रात करण्यासारखं खूप आहे. नवे प्रयोग होत आहेत. गायन-वादन-अभिनय क्षेत्रात तांत्रिक बाजूंचे महत्त्व वाढले आहे. छायाचित्रीकरण, लेखन, संपादन, दिग्दर्शन, नेपथ्य, ग्राफीक्स, ध्वनीमुद्रण, पेहराव-दागिने डिझाईनींग, मेकअप कला, आहार-फिट्नेस सल्ला, स्वर-साथ, कार्यक्रमांचे आरेखन, इव्हेंट मॅनेजमेंट यामध्ये प्रचंड नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या सगळ्यासाठी आवश्यक असणारं व्यावसायिक, तांत्रिक प्रशिक्षण घेऊन त्याला अंगभूत कलेची जोड दिली तर आर्थिक यशाबरोबरच निर्मितीचं आणि आवडीच्या क्षेत्रामधे काम करण्याचं समाधान मिळेल. सच्च्या कलाकाराला अशा स्वानंदापेक्षा आणखी काय हवं!