Monday, February 28, 2011

काळ

जावेद अख्तर यांच्या उर्दूमिश्रीत हिंदी कवितेच्या भावानुवादाचा माझा प्रयत्न..

काळ


काळ म्हणजे आहे तरी काय?
जो निरंतर सरतो आहे तो काळ असेल तर मग सरण्याआधी तो कुठे होता?
कुठे तरी असेल,
सरल्यानंतर तो कुठे जात असेल?
कुठे तरी असेलच..
कुठून येतो आणि कुठे जातो?
कुठपासून कुठवरचा प्रवास असेल हा ?

हा काळ आहे तरी काय !
एखादी घटना, दुर्घटना, योगायोग ?
सुख, दु:ख ,संकट ?
की आनंद ,हसू आणि अश्रू सुद्धा !
का एखादे गीत, क्षणिक सुगंध की जखमेच्या चिरंतन यातना
किंवा स्पर्शाची जादू !
हा स्वत:चा आवाज की भोवतालची साद
जी अंतस्थ निनादते आणि सारं बदलवून टाकते...
हा अस्वस्थ मनाचा विस्फोट की हृदयाची तरलता ?
की या सगळ्याच भावना म्हणजे काळ !

काळ... जणू प्रवाहासह वाहणारे पान
आत्ता इथं तर आत्ता तिथं
काळ ...अदृष्य पण अस्तित्वात असणारा ...सतत सरणारा !
जशी एखादी नदी...
कोणत्या तरी डोंगरात उगम पावून कुठल्याशा समुद्रात विलय होणारी.

प्रवासात असताना विचार येतो
गाडीतून दिसणारी झाडं विरूद्ध दिशेने पळतायत
वास्तवात ती तर स्थिर आहेत मग असं तर नाही की ...
काळ थांबलेला आहे आणि आपण चालत आहोत..
आताच्या या क्षणात..सारी युगं दडलेली आहेत
ज्याला आदि नाही आणि अंतही नाही
जो घडून गेलाय पण घडायचा आहे अजून आणि अगदी आत्ता ही घडतोय...
असा विचार येतो,
चालतो आहोत ते आपण आणि जो सरतोय असं वाटतं
तो काळ मात्र स्तब्ध आहे..
एकजीव आहे की क्षणांक्षणांतून विखुरलेला
गोठलेला आहे की विरघळणारा
कुणास ठाऊक काय आहे हा काळ !

हा धागा अथांग आहे
पण कुठेतरी त्याचं टोक असायला हवं ना!
मानवाला वाटतं या काळाच्या पिंजर्‍यात तो जन्मला,
या काळानेच त्याला जोपासलं...
पण आता कळतय त्याला
या काळाच्या पलिकडे देखील एक विश्व आहे..
आणि मग तो विचारतोय
काळ म्हणजे आहे तरी काय?

Monday, January 3, 2011

चूल-मूल

’सकाळ’ मधे दरम्यान चर्चा झाली.. महाराष्ट्रातील स्त्री गेलीय का ’ चूल-मूल ’ च्या पलीकडं ? या विषयावर, त्यावर माझं हे मत...
(picture courtesy : Ilayaraja)

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रीय स्त्रियांची परिस्थिती बरीच बरी आहे. हिंदी दूरदर्शन वाहिन्यांवरील सासबहू मालिकांमधील ’मध्ययुगीन’ वातावरणाच्या तुलनेने तर महाराष्ट्रीय स्त्रियांना आधुनिकच म्हणायला हवे.त्या निर्भयतेने घराबाहेर वावरताना, आर्थिक व्यवहार करताना दिसतात. त्यांच्या नोकरी, व्यवसायाकडे आता फारसे कुतूहलाने पाहिले जात नाही, स्त्री विषयक गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. अगदी देशाच्या राष्ट्रपतीपदावर आज एक महाराष्ट्रीय स्त्री विराजमान आहे पण म्हणून सरसकट त्या ’चूल-मूल’ याच्या पलिकडे गेल्या आहेत असे मात्र अजिबात नाही.

ज्या पुरूषांना खूप जास्त तास बाहेर काम करावे लागते आणि तुलनेने त्यांच्या घरातील स्त्रियांना जास्त मोकळा वेळ मिळत असेल तर अशा पुरूषांकडून स्वयंपाकात/अपत्यसंगोपनात फारशी मदत होणे शक्य नाही हे महाराष्ट्रातील स्त्रियांनीही स्वीकारले आहे व ते साहजिक आहे, पण खेड्यात शेतावर पतीच्या बरोबरीने राबणारी ग्रामीण स्त्री वा मोठ्या शहरात पतीबरोबरच कामावरून थकून परतणारी स्त्री पतीच्या मदतीची अपेक्षा नक्कीच करते.स्वयंपाक ही एक सुंदर कला आहे आणि स्त्री अन्नपूर्णा आहे हे खरे असले तरी मनात आणले तर पुरूष देखील ’अन्नपूर्ण’ होऊ शकतो. विद्या बाळ म्हणतात तशी श्रमविभागणी समानतेच्या तत्त्वावर झालेलीच नाही पण कुटुंब चालवण्याची जबाबदारी मुळात पुरूषाची आहे हे जर आणि जोवर स्त्रिया सोयिस्करपणे म्हणत असतील तर मग ती होणेही अवघड आहे. प्राप्त परिस्थितीत पुरूषांचा लहानसहान मदतीचा हातदेखील(न पेक्षा) तिचे कष्ट कमी करू शकतो.... पण बहुसंख्य घरात पुरूष परंपरेने मिळणार्‍या सुखाचा आस्वाद घेत असतात (अपवाद असणार्‍या पुरूषांची क्षमा मागून...) ही सत्य परिस्थिती आहे. काही पुरूषांना मदत करावीशी वाटली तरी ’लोक काय म्हणतील..’ याचे प्रचंड सांस्कृतिक दडपण आहे( विशेषत: तालुकेवजा लहान गावांमधे). त्यातून अपवाद असलेच तर ’मला नाही बाई, पुरूषांनी स्वयंपाकघरात लुडबूड केलेली आवडत’ असे म्हणत असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलेल्या काही स्त्रिया त्यांचा हिरमोड करतात. ’संजीव कपूर’ वा तत्सम शेफच्या आकर्षणामुळे काही हौशी पुरूष क्वचित कौतुकाने एखादा खास पदार्थ (व भरपूर पसारा) करतात, त्यानंतर सूत्र पुनश्च स्त्रीकडेच येताना दिसतात.

जयवंत दळवींच्या एका लेखात, त्यांच्या आईचे अवघे आयुष्य काळोख्या स्वैपाकघरात एकत्र कुटुंबासाठी किलो किलोच्या पोळ्या करण्यात चुलीपुढे रापून गेल्याची खंत जाणवते. तुलनेने आज विकतचे पदार्थ मिळण्याचे व बाहेर खाण्याचे वाढलेले प्रमाण आणि उपकरणांची साथ य़ामुळे स्त्रियांवरचा ताण कमी झाला आहे. तरी अजूनही बहुसंख्य स्त्रियांची उर्जा आणि वेळ करियर ,छंद याऐवजी चिरणे, चारणे आणि चरणे (शिल्लक राहील त्यानुसार..नाहीतर पुन्हा चिरावे लागते) व त्यानंतर ’उद्याच्या चार्‍याची चिंता करणे’ या पुलंच्या ’च’काराच्या चक्रात खर्च होताना दिसतो आहे. काही कर्तबगार स्त्रियांनाही आपण या कामाला फारसा वेळ देऊ शकलो नाही याचा न्यूनगंड असल्याचे दिसते म्हणजेच ज्या स्त्रिया ’चूल-मूल’ या पलिकडे पोचल्या त्यांची अवस्था त्रिशंकू आहे तर काही स्त्रिया ’सुपरवुमन’ होण्याचा नादात पलिकडे जाऊ इच्छितच नाहीत. ज्यांनी जाण्याचा प्रयत्न केला त्यांना फारसे यश आलेले दिसत नाही...’चूल-मूल’ हीच एखादीची आवड असू शकते किंवा ’नावड’ देखील असे समाज मान्य करीत नाही. ते आवडत नसेल तर मग लग्नच करू नका ना.. हया वस्तुस्थितीला अजून तरी पर्याय नाही. एकूणच ’तुझ्या हातच्या ... ला कशाची सर नाही’ किंवा ’... खावं तर तुझ्याच हातचं’ अशा वाक्यांच्या ’स्त्रीसुलभ’ मोहात पडून अजून तरी महाराष्ट्रीय स्त्री चुलीपासून लांब गेलेली नाही.

मातृत्व हे तर निसर्गाचे मूलतत्त्व आणि अपत्यसंगोपन हे आदिमकालापासून स्त्रीचे अंगभूत कौशल्य आहे. प्रजनन ते मूल सुटे होण्याच्या काळापर्यंत मुलाला आईची सर्वाधिक गरज असते तेव्हा या काळात स्त्री आई म्हणून आपली जबाबदारी पार पाडतेच आहे मग ती एखादी जिल्हाधिकारी असो वा गृहिणी. महाराष्ट्रीय स्त्री देखील याला अपवाद नाही. मात्र हा ’मूल सुटे होण्याचा काळ’ ’मूल बालवाडीत गेल्यापासून ते त्याचा विवाह होईपर्यंत’ (विवाह झाल्यावर देखील अजून तो आईचा पदर सोडत नाही..असे काही सुनांना वाटते.) असा कितीही असल्याचे त्या त्या आईच्या मानसिकतेनुसार आढळून येते. पाळणाघरे, मातृत्व रजा या सोयी सुरूवातीलाच वापरता येतात त्यानंतर मात्र काही आया सुट्या होऊच इच्छित नाहीत किंवा बहुतेक वेळा ती अपरिहार्यता असल्याचे सभोवताली आढळून येते. बर्‍याच वडिलांना (पुन्हा अपवादात्मक वडिलांची क्षमा मागून) ’ए झाला का रे अभ्यास, चल बंद कर तो टीव्ही, किती पैसे हवेत ट्रीपला’ एवढेच ’अपत्यसंगोपन’ पुरेसे वाटते. ’पितृत्व रजा’ वगैरेकडे ते गांभीर्याने पाहत नाहीत. विशेषत: शहरांमधे मुलांची क्लासेसला ने आण करणे,त्यांचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे , त्यांचे छंदवर्ग, खाणे-पिणे पाहणे (म्हणजे पुन्हा चूल..),पालकसभांना जाणे हे सगळे महाराष्ट्रीय स्त्रिया इतर राज्यातील स्त्रियांच्या तुलनेने जास्त प्रमाणात करतात. उत्तरेतील बहुतेक राज्यांमधे व्यवसायाची मानसिकता असल्याने हा फरक असावा. सवयीने मुलांनाही हे आईचेच काम आहे असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील शहरांमधे ’हम दो हमारा एक’ प्रकार जास्त असल्याने आईचे सगळे लक्ष एकुलत्या मुला/मुलीवर केंद्रित असल्याचे दिसते आहे. त्यासाठी कित्येक जणींनी करियरशी तडजोड केली आहे. त्यातूनही ती घराबाहेर पडलीच तरी ’घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ अशीच काहीशी महाराष्ट्रीय स्त्रीची परिस्थिती आहे.

समाजाची मानसिकता बदलली तर यातून मधला मार्ग निघू शकेल पण त्यासाठी काही पुरूषांना काही काळ ’बॅकसीट’ घ्यावी लागू शकते जे प्रत्यक्षात अवघड आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, बहुतेक सामाजिक बदल प्रथम महाराष्ट्रात होतात तेव्हा ’चूल-मूल ही स्त्रीची वैयक्तिक आवड किंवा निवड असावी..अपरिहार्यता किंवा प्राक्तन नव्हे’, असा बदल सर्वात आधी व्हायची शक्यताही याच राज्यात सर्वाधिक आहे. तसे घडले तरच दर्जाच्या समानतेबरोबरच संधींची समानताही मिळायला हवी या घटनेतील शब्दांना अर्थ प्राप्त होईल.

Sunday, November 21, 2010

समृद्ध अडगळ

"व्यक्त होणं' ही बहुसंख्य माणसांची गरज असते, आपल्याच कोषात राहणार्‍या काहींचा अपवाद! कलावंत व्यक्ती सृजनशीलतेमुळे पण त्याचबरोबर व्यावसायिक गरजेतूनही व्यक्त होतात,व्यावसायिक व्यक्ती प्रतिमानिर्मीतीच्या हेतूने व्यक्त होतात किंवा निव्वळ जगण्यातून निर्माण होणारी संवादाची भूक भागवण्यासाठीही लोक व्यक्त होऊ पाहतात.
अशा सर्वांसाठी सोशल नेटवर्किंग साईट वरचा वावर हा प्रत्यक्ष जगातील वावराइतकाच अपरिहार्य ठरतो आहे. मायस्पेस,ट्वीटर,लिंक्ड इन,ऑर्कुट,फेसबुक यासारख्या साईट्स पैकी एकावरही ज्याचे प्रोफ़ाईल नाही असा नेटीझन विरळाच. .. कुतूहलापोटी किंवा आपण अगदीच मागासलेले वाटायला नको म्हणून आपले प्रोफ़ाईल एखाद्या सोशल नेटवर्किंग साईट वर बहुसंख्य नेटीझन तयार करतातच. शहरी वर्गात याचे आकर्षण अधिक आहे, या साईटद्वारे संपर्क करणे व उर्वरित वेळात त्याबद्द्ल बोलणे ही जीवनपद्धती रूढ होऊ लागली आहे.

ब्लॉग प्रकार सर्वांना आपलासा वाटत नाही, स्वत:च्या कवितांचे पुस्तक स्वत:च छापून ते समोरच्याला जबरदस्ती वाचायला लावण्यासारखाच तो एक प्रकार आहे. त्यात प्रतिसाद नेमका आणि त्वरित येत नाही, ई-मेल चे महत्त्व अबाधित असले तरी तो एका अर्थी एकांगीच संवाद प्रकार आहे, यामुळेच परस्परसंवादाची गरज थेटपणे भागवणार्‍या सोशल नेटवर्किंग साईट प्रचंड लोकप्रिय झाल्या असाव्यात.

शिवाय या साईट्स देखील तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत, हा बघा अमुक अमुक आणि एवढे तुमचे कॉमन मित्र, चला चला आपला मित्रपरिवार वाढवा... काही उत्साही मंडळी मग अशा साईट्स वर भरमसाठ मित्र जमवतात, ’आज काय मस्त पाऊस पडतोय’ इथपासून ’अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगच्या धोरणा’ पर्यंत या सगळ्यांशी स्क्रॅप, वॉल वर बोल बोल बोलतात किंवा ट्वीट करतात.आपण लोकांना जसं दिसावं असं त्यांना वाटतं त्यानुसार प्रोफाईल तयार करतात.. मग हळूहळू या सगळ्या आभासी जीवनाचा... ’मित्राच्या बहिणीच्या लग्नातल्या फोटोवर कमेंट करण्याचा’, ’परदेशात कुठेतरी धुके पडले म्हणून इथे बसून चीत्कारण्याचा”, उगाच बसता उठता ’wow’ म्हणण्याचा कंटाळा येऊ लागतो... आणि ही मंडळी वास्तवात येऊ लागतात. काही जणांना जगण्याच्या प्रवाहात गहाळ झालेले सुह्रृद पुन्हा सापडतात ते अशाच साईट्स च्या कृपेने. त्यांचं आणि आपलं मधल्या काळातल जगणं अपडेट करून झालं की मात्र निर्माण झालेल्या पोकळीत ते आपापल्या टोकांना धरून पूर्ववत जगू लागतात. बर्‍याच जणांच्या प्रोफाईलचे आयुष्य हे मित्रमंडळाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. कलाकार आणि व्यावसायिकांना मात्र या साईट्स म्हणजे यशस्वी होण्याचा एक स्वस्त आणि मस्त मार्ग आहे. याशिवाय त्यांच्या सृजनशीलतेलाही येथे अफाट वाव आहे...

मराठीतल्या प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या शब्दात सांगायचे तर " लेखनाचे अनेक फॉर्म्स हाताळूनही विचारांचे तुकडे, काही अनुभव शिल्लक राहतात.तुमची मन:स्थिती तुम्ही इथं मोकळेपणे शेअर करू शकता. तसच समोरच्याचा अनुभव आपण स्वीकारायचा की नाही याचीही मोकळीक आपल्याला असते, जी फोन,एसएमएस किंवा प्रत्यक्ष भेटीत मिळणं कठीणच."
सिनेसृष्टीतले तारे तारका आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जनसामान्यांना असणारे सुप्त आकर्षण या साईट्स च्या माध्यमातून वाढवत राहतात, आगामी कलाकृतीची प्रसिद्धी करून याचा पुरेपूर वापर करून घेतात. शशी थरूर सारख्या राजकारणी मंडळींना मात्र समाजाशी असलेली ही आभासी जवळीक कधी कधी महागात पडते.
व्यावसायिक कंपन्यांना बाजारातली पत सांभाळायला याच साईटस चा आधार घ्यावा लागतो. मोबाईल कंपन्यांना याचा किमान टेक्स्ट भाग ग्राहकांना उपलब्ध करून द्यावा लागतो.

एअरवाईड सोल्युशन्स च्या अहवालानुसार या साईट्स एसएमएस ला पर्याय म्हणून वापरण्याचे प्रमाण वाढणार आहे.
आता काही जणांना ऑर्कुट चे स्क्रॅप फेसबुकच्या दिलखुलास वॉल च्या तुलनेने कंटाळवाणे वाटू लागलेत,(कॉमस्कोअर या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार भारतात फेसबुकने ऑर्कुट व याहूला मागे टाकले आहे.) काही ’लिंक्ड इन’ वाली मंडळी इतर सोशल नेटवर्किंग साईट्स वापरणार्‍यांकडे ’फक्त डिस्कव्हरी वाहिनी पाहणार्‍यांनी’ सामान्य प्रेक्षकांकडे पाहावे तसे पाहतात तर काहींना ट्वीटर ची एसएमएस सारखी शब्दमर्यादा भावते आहे..

अर्ध्या अब्जाहूनही अधिक युजर्स असलेल्या फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग याची १५ नोव्हेंबरला सॅन फ्रॅन्सिस्को येथे पत्रपरिषद झाली. त्यात त्याने म्हटले आहे की भविष्यात इ-मेल ची जागा ऑनलाईन संभाषण घेईल. @facebook.com या पत्त्यावर ही मेसेजिंग प्रणाली काम करेल.

हे सारे तंत्रज्ञान एखाद्या प्रपातासारखे आपल्यावर कोसळते आहे, यापासून दूर न पळता याचा समंजस स्वीकार करायला हवा.
मानसशास्त्रज्ञांना अशा साईट्स च्या वाढत्या प्रभावाची चिंता वाटते कारण यात बर्‍याचदा मूळ व्यक्ती व तिची प्रोफाईल प्रतिमा यात तफावत असते. मला वाटतं एरवी जगतानाही लोक मुखवटे घालतातच ना! नेहमीच्या आयुष्यात जशी भलीबुरी माणसे असतात तशीच ती यावरही असतात आणि असणार.पण या माणसांबरोबरच सलील कुलकर्णीपासून शकीरापर्यंत, पुलंपासून पाऊलो कोएलो पर्यंत, आर आर पाटीलांपासून ओबामापर्यंत, कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंत कशाशीही स्वत:ला जोडणं अगदी सोप आहे फक्त साईन इन करायचा अवकाश.

वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती नेटवर खुली करताना काळजी घेतली, यातून निर्माण होणार्‍या तोतया प्रोफाईल बाबत सावधगिरी बाळगली, हाडामासाच्या माणसांना पुरेसा वेळ देऊन मग यावर किती वेळ घालवायचा याचे भान ठेवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मित्र निवडताना संख्या वाढवण्यापेक्षा गुणात्मक निकष वापरले तर या साईट्स नक्कीच तुमचे जगणे समृद्ध करतात. नेमाड्यांच्या भाषेत सांगायचे तर सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे ’इंटरनेटवरची एक समृद्ध अडगळ.’