Saturday, July 24, 2010

भांडण

भांडण हा माझा अगदी आवडता विषय आहे.(!!!) म्हणजे स्वतः भांडणे नव्हे (काही अपवाद सोडून! शेवटी Men are from Mars and Women are from Venus म्हणजेच ’अपवाद’ कोण ते सुज्ञास सांगणे न लगे) तर भांडण बघणे (हा माझ्या मते बर्‍याच जणांचा आवडता विषय आहे पण लोक कबूल करत नाहीत ),अर्थात भांडण म्हणजे निखळ भांडण! आईमाई वरून शिव्या घालून मारझोड करत होणारी कचाकचा भांडणं किंवा ’दखलपात्र गुन्ह्या’पर्यंत पोचणारी भयंकर भांडणं किंवा एकदम ’भारत-पाक’ ’तिबेट-चीन’ ’अमेरिका- इंग्लंड सोडून उर्वरित जग’ इ. प्रकारची ’मुरलेली’ भांडणं यात मोडत नाहीत.

मला आवडणारी भांडणं म्हणजे क्षुल्लक कारणावरून होणारी, तर्कशास्त्राशी सुतराम संबंध नसणारी, मनातल्या वैतागाचा निचरा करणारी.......आणि प्रचंड मनोरंजन करणारी! (अर्थात प्रेक्षकांचे!).तर्कशास्त्रावरून आठवलं, परवाच आमच्या दोघांपैकी मंगळवासीयांनी त्यांच्या मातोश्रींना विचारले की ’तुझी फोडणीतली मोहरी नेहमीच कशी जळते?’ यावर मातोश्री म्हणाल्या ’आज खोबरेलतेलाची बाटली तू उघडीच टाकलीस, त्याला झाकण लावायच असतं हे शीक आधी’ मग हे उत्तर किंवा विधान तर्कसंगत आहे की नाही आणि मुळात मुद्दा काय आहे (तसा ’तेल’ हा सामाईक मुद्दा दोन्ही विधानात होता असे म्हणून मला तेल ओतता आले असते....) यावर त्या दोघांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि ’एकमेकांशी बोलण्यात काही अर्थ नाही’ या मुद्यावर अखेर त्यांचे एकमत झाले. खरं म्हणजे मुळात या प्रश्नातील ’नेहमी’ या शब्दावर माझा आक्षेप होता कारण मग त्यातून ’मी काहीच करत नाही की काय’ असा अर्थ ध्वनीत होतो पण हा मुद्दा मी सध्या, पुन्हा कधी तरी, योग्य वेळी चपखलपणे वापरण्यासाठी ठेवून दिला आहे (मंगळवासी याचा उच्चार नेहमी ’चपलख’ असा करतात व मी तो दुरूस्त केल्यास ’नुसत्या भाषेच्या ज्ञानापेक्षा माणसाला व्यवहारज्ञान अधिक असायला हवे’ असे ’तर्कसंगत’(!!) उत्तर देतात मग त्यावर मी काहीही प्रतिक्रिया दिली तरी ’अपवादा’ला सुरूवात होते).असो.

अगदी पुराणकाळातही भांडणे असावीत. पाहा :पौराणिक मालिका. इकडे शंकर आणि पार्वती ढगात बसून चौपट खेळतायत ,तिकडे विष्णू शेषावर कायम पहुडलेले आणि लक्ष्मी पाय चेपतेय. नारदमुनी उगवतात आणि काहीतरी कळ लावतात. लगेच इकडे शंकराचे तांडव आणि तिकडे विष्णूचे सुदर्शन चक्र ! बाकी देवांची धावपळ ,मग कायम कमळात बसून मंदस्मित करणारे ब्रह्मदेव ते भांडण मिटवणार आणि बाकीचे सगळे देव पुष्पवृष्टी करणार... मंदस्मित,चौपट आणि पाय दाबणे पूर्ववत सुरू!( नारदमुनींचा पुन्हा प्रवेश होईतो).
आता राजकारणापासून सोसायटयांच्या मिटींगपर्यंत कुठेही अनेक कळलावे नारद त्यांचे काम चोख बजावतात. नारद अनुपस्थित असेल तरी लोक सांभाळून घेतात. उदा: रेल्वेमधली भांडणे (एसी चा अपवाद, जिकडे ’संवादच’ नाही तिकडे ’वाद’ कुठून होणार!... (हे वाक्य ’वपुं’ना अर्पण!)) सामान ठेवण्यावरून एकमेकांना ’एक टिकट क्या खरीदी जैसे पूरी गाडी खरीद ली, रेल्वेमिनिस्टर हो क्या?’ अशी प्रेमळ प्रृच्छा करणारे थोड्या वेळाने एकमेकांच्या मुलांना खिडकीतून गंमत दाखवत केळी खाण्याचा आग्रह करू लागतात. ज्या गुजराथ्याच्या बॅगेतले लोणच्याचे तेल अंगाला लागले म्हणून भांडण होते तो गुजराथी तेच लोणचे मग कोरडी बटाटाभाजी पोळी (रोल करून) खाणा‍र्‍या मराठी माणसाला वाढतो. ’बाहेरचे’ ’आतले ’होईपर्यंत दर स्टेशनवर एक नवी चकमक उडत असते. (हे वाक्य पुलंना अर्पण)पुन्हा असो.

एकूणच भांडण हा एक धमाल प्रकार आहे. त्यात सहभागी असलेल्या मंडळींचे निरीक्षण करणे, त्यांनी मांडलेले मुद्दे(?) समजून घेणे, त्यात ’विश्लेषणासाठी’ वापरलेल्या खास शब्दांचे अर्थ समजावून घेणे, त्यांचा विषयाचा उहापोह अनपेक्षित मुद्याकडे वळताना पाहणे हा सगळाच एक विलक्षण अनुभव असतो. त्यामुळे शक्य असल्यास मी अगदी हातातले काम टाकून ते भांडण ’बघते’.
माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक वाडा होता, त्यातल्या दोन बिर्‍हाडातील मंडळींची कायम भांडणे होत.एक कुटंब अगदी उच्चभ्रू तर दुसरे निम्नमध्यमवर्गीय. पहिल्या कुटुंबातले काका शशीकपूरसारखे दिसायचे, कुठेतरी अधिकारी( ठेवा तुमच्या घरी...इति दुसरे काका) होते. काकू शासकीय नोकरी करत (आली मोठी नाक वर करून.. त्या पेक्षा घरात लक्ष दे म्हणावं....इति दुसर्‍या काकू) असत. त्यांची अत्यंत सुंदर व हुशार कन्या सायन्स कॉलेजमधे शिकत असे आणि कलात्मक टाईपचा मुलगा , तर दुसर्‍या टीममधील काका तृतीयश्रेणी कर्मचारी( ऑल टिनपॉटस....इति पहिले काका) होते, काकू तर साक्षात दुर्गेचा अवतार (यांच्यापेक्षा आमच्या मोलकरणीला सुद्धा मॅनर्स आहेत....इति पहिल्या काकू) होत्या. त्यांची मोठी मुलगी नेहमी ’योगिनी जोगळेकर टाईप’ कादंबर्‍या वाचत असे, एक सतत नापास होणारा मधला मुलगा आणि एक वात्रट लहान मुलगा. तपशील या कुटुंबांमधील ’सांस्कृतिक,वैचारिक,आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक(बाप रे!)’ फरक समजावा म्हणून दिला आहे. तर या विरोधाभासामुळे आणि घराची एक भिंत व गच्ची सामाईक असल्यामुळे त्यांच्यात खटके उडत व त्याचे पर्यावसान सार्वजनिक भांडणात होई. ते सुरू झाले रे झाले की वरच्याच मजल्यावर राहणारा माझा बालमित्र ’चल चल भांडण स्टार्टेड’ असे म्हणत धावत येई व आमच्या खिडकीतून ’योग्य ऍंगल’ पकडण्यासाठी आमचेच एक छोटेखानी भांडण होई.
’आमची कुंडी तुम्ही मुद्दामून पाडली’, ’वाळवणं आमच्या भागात का घातली’, ’तुमचा मुलगा आमच्या मुलीच्या परिक्षेच्या वेळेसच जोरजोरात गाणी म्हणतो’ अशा कोणत्याही मुद्दयावरून सुरूवात होऊन मग ते भांडण उत्तरोत्तर रंगत जाई. प्रकरण अगदी हातघाईवर गेले तर(च) आजूबाजूचे लोक मधे पडत.

दुसर्‍या कुटंबाचे अभावातून निर्माण होणारे नैराश्य असेल पण पहिल्या कुटुंबाला तसे काही सयुक्तिक कारण नव्हते. एकूणच भांडणे ही एक प्रवृती आहे आणि तिचा सांस्कृतिक,वैचारिक,सामाजिक, आर्थिक स्तराशी काही संबंध नसतो. हो,ते शैक्षणिक म्हणायचं राहिलं. साहित्य संमेलनातील मार्मिक शब्दःच्छ्ल केलेली भांडणे बघा....जसे द.भि. कुलकर्णी म्हणाले ’काही लोक चुकीच्या ठिकाणी टाळ्या वाजवतात, आता नाही समजत एखाद्याला’. झालं, ही अशी नांदी झाली की साहित्यिकांच्या कलगीतुर्‍याला सुरूवात होते. भांडण करायलाही एक कौशल्य लागतं, उदाः प्र.के.अत्रे. त्यांच्या विवीध क्षेत्रातल्या लोकांशी ( वरेरकर,फडके इ.किंवा संयुक्त महाराष्ट्रासाठी) भांडण्यालाही एक वलय असायचं. त्यांच्यासारखा मस्त भांडणारा माणूस (गेल्या दहा हजार वर्षात!) झाला नाही.
थोरामोठ्यांनाही न भांडता राहवत नाही तर सामान्यांची काय कथा!

खरं म्हणजे वयानुसार, प्रगल्भतेनुसार भांडण्याची खुमखुमी, बघण्याची उर्मी दाबण्याचे कौशल्य निर्माण होत असेलही पण मुळात ती नैसर्गिक भावना आहे. आपल्या मेंदूत म्हणे डोपामाईन नावाचे एक रसायन असते आणि त्यामुळे भांडतेवेळी आनंदाची एक विचीत्र संवेदना निर्माण होते. ती इतकी हवीशी वाटू लागते की भांडण्य़ाची वा ते भांडण बघावेसे वाटण्याची वृती बळावते. माझ्या मेंदूत ते रसायन जरा जास्तच प्रमाणात असावं. आता यात माझा काय दोष, नाही का!

Tuesday, June 22, 2010

नागरिकत्व...

सामाजिक बांधीलकी, लोकशाही आणि नागरिकत्व...
(
दिवाळी अंक २०१० साठी सामाजिक बांधीलकी विषयक एक राज्यव्यापी निबंधस्पर्धा पुण्यातील ’जनसंवाद’ या संघटनेद्वारे आयोजित केली जाणार आहे. संघटनेची सदस्य या भूमिकेतून त्यासाठी मी लिहीलेली ही एक प्रकारची प्रस्तावना .....)

चीनमधे मध्यंतरी बराच मोठा भूकंप झाला होता. जगभरातून मदतकार्य सुरू होते. त्याविषयीच्या बातम्या दूरचित्रवाणीवर सुरू असताना एक स्नेही घरी आले, आणि ती दृष्ये पाहून हेलावले, तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले की हे चीनमधे घडले आहे..भारतात नव्हे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली,"अच्छा, तिकडे चीनमधे होय!! मला वाटलं इकडेच !" आणि जणू काही त्यांचा जीव भांड्यात पडला. भारतात असे घडले असते तर त्यांना अधिक दु:ख झाले असते हे (proximity concept) आपण एक वेळ समजू शकतो, चीनमधे घडलय म्हटल्यावर त्याची तीव्रता कमी झाली हे ही समजू शकतो पण ’काहीच वाटू नये’ हे मात्र समजणे अवघड आहे. ’सहसंवेदना’ किंवा ’आपण आणि आपला समाज’ या संकल्पनेची व्याप्ती नक्की केवढी असते? आपल्या कुटंबापुरती ,आपल्या जाती वा धर्मापुरती? परिसरापुरती वा देशापुरती? काही लोकांसाठी ती सापेक्ष असू शकते... उदा: माल्कम ह्या कृष्णवर्णीय अमेरिकी नेत्याने १९६० च्या सुमारास वंशभेदाच्या पार्श्वभूमीवर आपली सामाजिक बांधीलकीची संकल्पना अशा शब्दात मांडली होती “I believe in the brotherhood of all men, but I don't believe in wasting brotherhood on anyone who doesn't want to practice it with me. Brotherhood is a two-way street.”

तेव्हा सामाजिक बांधीलकीचे स्वरूप हे विवीधांगी असले तरी किमान ’being concerned' ही भावना प्रत्येक सुजाण माणसात असायला हवी याबाबत दुमत नसावे. एक नागरिक म्हणून जगताना आपला अनेकांशी संबंध येतो. परस्परावलंबन ही अपरिहार्य बाब आहे. यांत्रिकीकरणामुळे आपल्याला आता इतरांची गरज उरलेली नाही असे मानणे अयोग्य आहे.
यंत्रांची देखभाल करायची तरी परस्परावलंबन आलेच, आजारपणात अद्यावत वैद्यकीय सोयी उपलब्ध असल्या तरी, डॉक्टर,परिचारिका हव्यातच, संगणकीकरण झाले तरी ते चालवण्यासाठी,परिवहनाच्या सोयी असल्या तरी त्या सुरळीत चालवण्यासाठी ,आपत्कालीन परिस्थीतीतून बाहेर पडण्यासाठी, माणसे हवीत. खरे तर ’नुसते जगण्यासाठी’ ही माणसे हवीतच. अगदी उदात्त भावनेतून असो, साधी माणुसकी म्हणून असो किंवा ’उद्या आपल्यावरही ही वेळ येऊ शकते’ या भयापोटी असो सामाजिक बांधीलकीविना परस्परावलंबन शक्य नाही. आपले आणि इतरांचे जगणे सुखकर करायचे असेल तर सामाजिक बांधीलकी जोपासण्याला पर्याय नाही.

समाजसेवा ही उत्स्फूर्त गोष्ट आहे. प्रत्येक सामान्य माणूस काही आमटे, बंग परिवारासारखे सामाजिक योगदान देऊ शकत नाही हे खरे आहे पण सामाजिक बांधीलकीचा आपला परीघ तर निश्चीत विस्तारू शकतो. बहुसंख्य सामाजिक गरजा या स्थानिक स्वरूपाच्या असतात हे समजून घेऊन परिसरातील सेवाभावी संस्थांशी स्वत:ला जोडून घेऊन खारीचा वाटा उचलू शकतो. आर्थिकदृष्ट्या आवाक्यात नसले तरी वेळ देऊन, कामात वाटा उचलून मदत करू शकतो. तेही शक्य नसेल तर अशा व्यक्तींना मानसिक पाठबळ, प्रोत्साहन तरी नक्कीच देऊ शकतो. काही वलयांकित संस्थांच्या समाजकार्यात दिखाव्याचा भाग जास्त असतो, काही व्यक्ती स्वत:च्या प्राथमिकता डावलून हे काम करतात, किंवा काही संस्था केवळ अनुदान लाटण्यासाठी समाजसेवेचे कातडे पांघरतात. अशा उदाहरणांमागे दडून ’म्हणून मी या फंदात पडत नाही’ अशी पळवाट काढणे अयोग्य आहे. ती व्यक्ती वा संस्था कोणत्या राजकीय, वैचारिक विचारधारेची आहे ,संघाची आहे की समाजवादी आहे, ग्रामीण आहे की शहरी आहे, ’आहे रे’ वा ’नाही रे’ यापैकी कोणत्या गटासाठी काम करते आहे, अशा सीमारेषांची चिकीत्सा करत वेळकाढूपणा करण्यापेक्षा ’काय कार्य करते आहे’ हा डोळस निकष त्यामागे असायला हवा. उदा: एका प्रथितयश डॉक्टरांनी या वर्षी १०००० वृक्षरोपणाचा संकल्प केला आहे, त्यांनी त्यासाठी मनुष्यबळ देखील उपलब्ध केले आहे. वृक्षांची ३ वर्षे काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे, यासाठी प्रति वृक्ष एक लहानशी रक्कम त्यांना दात्यांकडून अपेक्षित आहे. ज्यांना निसर्गाबद्द्ल आस्था आहे असे लोक यात वेगवेगळ्या पातळीवर मदत करू शकतात. दृष्टीबाधितांसाठी आज केवळ शैक्षणिक साहित्यच उपलब्ध आहे..त्यांच्यासाठी अवांतर पुस्तके संगणकाच्या सहाय्याने ब्रेलमधे तयार करायला एका संस्थेने सुरूवात केली आहे. वंचितांसाठी काम करणे,आपत्कालीन सेवा स्वयंस्फूर्त देणे असे असंख्य प्रकल्प योजणारी आणि कार्यान्वित करणारी माणसे सभोवताली आहेत, त्यांना शक्य तेवढा प्रतिसाद दिला जायला हवा. वैयक्तिक पातळीवर नेत्रदान, देहदान, रक्तदान हे देखील ही बांधीलकी जपण्याचे काही मार्ग आहेत. आपले दैनंदिन आयुष्य जगतानाच ते जगणे समृद्ध करण्याचे असे अनेक सोपे उपाय आहेत.

पण मुळात एक सुजाण नागरिक म्हणून जगायला तरी आपण भारतीय शिकलो आहोत का? बिरबल-बादशहाची ही कथा सर्वपरिचीत आहे. बिरबल रस्त्याच्या मधोमध एक मोठा दगड ठेवतो... कुणी दुर्लक्ष करतं,कुणी बादशहाच्या कारभाराला नावे ठेवत तो दगड टाळून पुढे जातं, कुणी त्याला आपटून पडतं... राज्यात ’डोळस, सजग नागरिक ’ किती हे एका छोट्याशा प्रयोगातून बिरबल दाखवून देतो. ’दगड उचलायचा कुणी’ हा प्रश्न इतक्या वर्षांनी आजही सोडवता आलेला नाही. लोकशाही हे लोकांचे राज्य मानायचे आणि इकडे सगळी जबाबदारी सरकारवर टाकून मोकळे व्हायचे ही मानसिकता आजही बदललेली नाही. सरकारातील लोक हे देखील त्याच मानसिकतेचे बळी असल्याने ते ही जबाबदारी आणखी कुणावरतरी ढकलतात असे हे दुष्टचक्र आहे.
अब्जाहून अधिक लोकसंख्येच्या आपल्या या देशात,उत्तम प्रकारे लोकशाही राबवूनही ती सुदृढ का होऊ शकली नाही याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ज्या अभिजन वर्गाने सरकारला जाब विचारायचा त्या वर्गाची मतदानाबाबतची उदासीनता (मुळात भारतात स्थायिक होण्याबाबत अनास्था).दुसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ’नागरिक’ म्हणून समाजाची घडणच झालेली नाही. अभिजन वगळता उर्वरीत समाज दारिद्र्य, बेरोजगारी, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार अशा मुलभूत समस्यांशी झगडण्यात गुंतलेला असताना आणि जेमतेम तग धरून जगत असताना त्यांच्याकडून लोकशाहीचे सबलीकरण व्हावे, नागरिकत्वाचे भान जपले जावे अशा अपेक्षा करणे चुकीचे आहे. मॅस्लोच्या सिद्धांतानुसार माणूस आधी मुलभूत मग सुरक्षाविषयक गरजांना प्राधान्य देतो, सामाजिक गरजा त्यानंतर आणि आत्मभान वगैरे तर अगदी शेवटी! मग या प्रश्नावर उपाय काय?

आपण नागरिक म्हणून अजूनही परिपक्व का होऊ शकलो नाही.......कारण आपल्या शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र शिकवले जाते, नागरिकत्वाचे भान म्हणजे काय हे मात्र शिकविले जात नाही. सुशिक्षीतांना वाटते त्यात काय शिकायचे पण ऍरिस्टॉटल यांचे हे वाक्य बोलके आहे "प्रत्येक चांगला माणूस हा एक चांगला नागरिक असतोच असे नाही."
अगदी आदर्श नाही पण चांगला नागरिक होण्याची चतु:सूत्री अगदी सोपी आहे, ’रहदारीच्या नियमांचे पालन, कचरा व्यवस्थापनाची समज, रांगेची शिस्त आणि वक्तशीरपणा’ एवढे जरी या प्रशिक्षणात प्राथमिक स्तरावर शिकवले व अवलंबले गेले तरी समाजात प्रचंड सकारात्मक बदल घडून येऊ शकतो..लोकशाही आणि नागरिकत्व हे मुद्दे खरे तर वेगळे नाहीत, नागरिकांमधे आदर्श लोकशाही रूजवण्यासाठी उपलब्ध असलेले पण वापरले न जाणारे सर्वात सशक्त माध्यम म्हणजे सामाजिक बांधीलकी. माध्यमांसह जगण्याचा विवेक,विज्ञानवादी दृष्टीकोन,कलेबाबतची आस्था,विवीध सामाजिक प्रवाहांचा संतुलितपणे विचार या सगळ्या त्यानंतरच्या माध्यमिक प्रशिक्षणाच्या पायर्‍या....

सुजाण नागरिक म्हणून घडणं आधी आणि अधिक महत्वाचं.... ही निरंतर तसेच टप्प्याटप्प्याने चालणारी प्रक्रिया आहे..... संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांनी हे सोप्या शब्दात मांडले आहे, "No one is born a good citizen; no nation is born a democracy. Rather, both are processes that continue to evolve over a lifetime. Young people must be included from birth. A society that cuts off from its youth severs its lifeline."
मूल्यशिक्षण ही संस्कारातून शिकवण्याची बाब जर शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकते तर ’समाजशिक्षणाचा’ अंतर्भाव का होऊ नये! जगातील काही देशांमधे ’नागरिक प्रशिक्षण” शाळांमधून आवर्जून दिले जाते. कॉर्पोरेट क्षेत्रात सुसूत्रता यावी म्हणून प्रशिक्षणाला जसे आणि जितके महत्व आहे, तितक्याच गांभीर्याने या गोष्टीकडे बघितले गेले पाहिजे.या क्षेत्रातील एक तज्ञ व्हर्जिनीया लेरी यांनी नागरिकत्वाची संकल्पना अशी मांडली आहे "citizenship is a bundle of rights -- primarily, political participation in the life of the community, the right to vote, and the right to receive certain protection from the community, as well as obligations." हक्कांबरोबर कर्तव्याची जाणीव असणे हेच नागरिकत्वाचे भान...
शालेय स्तरापासून हे प्रशिक्षण भावी पिढ्यांना दिले जाणे ही काळाची गरज आहे...खर तर दहशतवाद, धार्मिक कट्टरतेमुळे होणारी सामान्य नागरिकांची मुस्कटदाबी, लादलेले आर्थिक निर्बंध अशा अनेक समस्यांची उकल करण्याचे सामर्थ्य या प्रशिक्षणाच्या संकल्पनेत दडलेले आहे.
’जनसंवाद’ सारख्या संस्था याचा पाठपुरावा करत आहेतच, गरज आहे ती अशा संस्थांचे हात बळकट करण्याची! सकारात्मक प्रतिसादाची !

Tuesday, April 13, 2010

मक्तेदारी

१० एप्रिल २०१० च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत ’(तूच राहा..)स्वयंपाकघराची सम्राज्ञी’ लेख आला होता. स्त्रियांनाच स्वयंपाकघरातील मक्तेदारी हवी आहे, मदत करू इच्छिणार्‍या पुरूषांना घालून पाडून बोलून त्या त्यांचा उत्साहभंग करतात...खरं आहे का हे? की अशा अनुभवाचे हे सोयिस्कर उदात्तीकरण आहे?...अशा अर्थाचा तो लेख होता, त्यावर ’खमंग वाद-चर्चा’ शिर्षकांतर्गत वैयक्तिक अनुभवांवर आधारित अभिप्राय मागवण्यात आले होते. मी हा अभिप्राय दिलाय....


कुठल्याही परिवर्तनाचा मार्ग हा कधीही सुकर नसतो. सध्याची भारतीय व विशेषत: नागरी ’स्वयंपाकघरं’ या मार्गावर धडपडत वाटचाल करतायत.काही अपवाद वगळले तर ही वाटचाल पुरूषांसाठी फारशी सुखावह नाही आणि खरी अडचण आहे ती इथेच. ’स्वयंपाकघरातील सत्ता सोडण्यात स्त्रीलाही स्वारस्य नाही आणि ती घेण्यात पुरुषालाही रस नाही’ अस जे म्हटले जातं त्याचा केवळ उत्तरार्ध खरा आहे आणि त्यामुळे पुर्वार्ध ही स्त्रीच्या वाट्याला आलेली अपरिहार्यता आहे,त्यावर जबरदस्तीने मक्तेदारीचा शिक्का मारणे अयोग्य आहे.

तरीही जेव्हा काही(काहीच) पुरुष स्वयंपाकघरात काहीबाही करू पाहतात तेव्हा बायका त्यांना ते सुखाने करू देत नाहीत हे काही अंशी खरे आहे. माझी दोन्ही विधाने परस्परांना छेद देत आहेत असे वाटेलही पण वस्तुतः ती पूरक आहेत.आपण या स्वयंपाकघरातील परिस्थितीची तुलना स्त्रिया जेव्हा वाहन चालवायला शिकू लागल्या त्याच्याशी करूया. सुरूवातीला सायकल चालवणारी बाई ही ’वळून बघण्याचे’ प्रकरण होते,त्यावर काही कुत्सित शेरेही दिले जात.आता ग्रामीण स्त्रिया सहज सायकल चालवतात किंवा शहरी स्त्रिया स्वयंचलित दुचाकी चालवतात किंवा काही अगदी वैमानिक म्हणून देखील काम करतायत. आता समाज या गोष्टीकडे ’त्यात काय मोठेसे’ म्हणून पाहतो कारण ही वाहन चालवणार्‍या स्त्रियांची दुसरी पिढी आहे. स्वयंपाकघरात सध्या ’खुडबुडणार्‍या’ पुरुषांचीही ही पहिली पिढी आहे म्हणून त्यांना जsरा अवहेलनेने पाहिले जाते ही वस्तुस्थिती आहे पण पुढच्या पिढीत चित्र नक्कीच बदलले असेल. अजूनही ज्या बायका पुरूषांकडून गाडी चालवायला शिकतात त्यांना ’वेंधळेपणा करू नकोस’,’गीअरकडे लक्ष दे जराss','इंडिकेटर काय वळल्यावर देणार का?’,’बास झाली हौस आता’ अशा ’प्रेमळ’ सूचना ऐकून घ्याव्या लागतात. त्याच धर्तीवर स्वयंपाकघरात पुरूषांना बायका थोडेफार ऐकवत असतीलही पण त्याचा सोयिस्कर अर्थ त्यांना तेथील सत्ता सोडायची नसते असा घेतला जाऊ नये.
शिवाय बायकांच्या या प्रतिक्रीयांमागे त्या त्या घराचा काही ’इतिहास’ देखील असतो. उद: बहिणीच्या फर्मास पदार्थांनाही भावाने कधी दाद दिली नसेल किंवा आईने खपून केलेले पदार्थ खाताना मुलाने चेहरा नेहमी मक्ख उर्फ निरागस ठेवला असेल किंवा बायकोच्या खास पदार्थालाही ’पण आईसारखं नाही जमलं’ अशी चुकीची दाद दिली असेल तर त्या पुरूषांच्या (३६५ दिवसातून एकदोनदाच केलेल्या) ’त्यांच्या स्टाईलच्या दाल फ्राय ला’ बहिण/बायको/आई इ. एकदम गहिवरून वगैरे जाऊन कौतुकाची पावती कशी देतील! शिवाय त्यानंतरचा ’आवरणे’ नावाचा प्रकार जर हे शेफमहोदय स्वत: करणार असतील तर ठीक अन्यथा ’दाल फ्राय नको पण पसारा आवर’ असे म्हणायची वेळ बायकांवर येते.

ज्या पुरूषांना खूप जास्त तास बाहेर काम करावे लागते आणि तुलनेने त्यांच्या घरातील स्त्रियांना जास्त मोकळा वेळ मिळत असेल तर अशा पुरूषांकडून स्वयंपाकात/कामात मदत होणे अपेक्षित नाही हे स्त्रिया स्वीकारतातच व ते साहजिक आहे, पण खेड्यात शेतावर पतीच्या बरोबरीने राबणारी ग्रामीण स्त्री वा मुंबईसारख्या शहरात पतीबरोबरच थकून परतणारी स्त्री पतीच्या मदतीची अपेक्षा नक्कीच करत असेल.येथे प्रश्न स्त्री मुक्तीचा नसून साध्या माणुसकीचा आहे. किमान चहा करणे,भाजी चिरणे,लसूण सोलणे,पापड भाजणे,पान मांडणे यासारख्या लहानसहान मदतीचा हातदेखील(न पेक्षा) तिचे कष्ट कमी करू शकतो. पण बहुसंख्य घरात वाटेत पेला पडला असेल तरी पुरूष तो न उचलता ओलांडून जातात ही परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याबरोबरच दमून आलेल्या बायकोचे कष्ट ,पाहून न पहिल्यासारखे करत, खुशाल टीव्ही पाहत बसणार्‍या आणि नंतर जेवताना वरून ’जगात दुधी,दोडकं,कोबी सोडून काही मिळतं की नाही!’ या वा तत्सम प्रतिक्रिया देणा‍र्‍या महाभागांना काय म्हणावे कळत नाही.

मदत ही गरजेनुसार करण्याची गोष्ट असते,त्याचा धर्म,लिंग वा संस्कृतीशी संबंध जोडून उगाच बाऊ केला जातो.. काही मंडळी म्हणतात की पुरूषांना मुळात स्वयंपाकातले कळत नाही.(कळवून घ्यायचेच नसल्याने! अन्यथा समभाग निर्देशांकांच्या चढ उताराचे क्लिष्ट आकडे पाठ असणार्‍या पुरूषांना कुकरच्या ३ शिट्या देखील मोजता येत नाहीत हे कसे शक्य आहे? अवघड प्रोग्रामिंग लीलया करणार्‍या अभियंत्याला भेंडीच्या भाजीत पाणी घालू नये एवढे साधे ’लॉजिक’ कळत नसेल हे कसे शक्य आहे?) काहींना तर ’स्वयंपाकघरात काम करणारी स्त्री’ यात एक आगळेच सौंदर्य आहे असे ही वाटते....(त्यांना तिचे कष्ट जरा कमी करून ते सौंदर्य का काय, अधिक टिकवावे असे का वाटत नाही?)

’मला नाही बाई, पुरूषांनी स्वयंपाकघरात लुडबूड केलेली आवडत’ असे म्हणणार्‍याही काही स्त्रिया आहेत..पण य़ा स्त्रियांना इतर कोणत्याच क्षेत्रात काही करण्यात एकतर रस नसतो वा गती नसते, मिळालेल्या वेळाचे काय करावे याचे उत्तर नसते किंवा मग तशी परिस्थिती नसल्याने असुरक्षिततेची भावना भेडसावत असते.पण त्यांचे प्रमाण अत्यल्पच! ’इच्छा असते पण नीट जमत नाही..म्हणून...’ अशी ही एक पळवाट बहुसंख्य पुरूष काढतात व ही मक्तेदारी सोयिस्करपणे स्त्रियांकडेच ठेवतात. मुली देखील काही जन्मत: तिखटमीठाचे प्रमाण वा गोल पोळी लाटायला शिकून आलेल्या नसतात...तेव्हा थोडक्यात ASK(attitude,skill,knowledge)... हे तत्व या विषयालाही लागू होते. मुळात ’स्वयंपाकात मदत करणे हे गैर(बायकीपणा वगैरे) न मानणे, त्याचे तंत्र समजून घेणे आणि पद्धत माहित करून घेणे’ इतके हे साधे सोपे काम आहे....अर्थात करायचे म्हटले तर!

माझे वडील आईला बरे नसताना वा बदल म्हणून कधीतरी स्वयंपाक करत. आईने भावात व माझ्यात फरक न केल्याने त्यालाही बर्‍यापैकी स्वयंपाक येतो. मी व्यावसायिक असल्याने ,वेळेचे नियोजन सुदैवाने करू शकत असल्याने,एकत्र कुटुंब असल्याने,पोळ्यांना बाईंची मदत असल्याने (आणि मुख्य म्हणजे पती अधूनमधून का होईना ’स्वतःच्या स्टाईलची दालफ्राय’ करत असल्याने) या बाबतीत सुखी आहे असे म्हणायला हरकत नाही. मुल मोठी होतील तेव्हा आपापल्या जोडीदाराला गरजेप्रमाणे स्वयंपाकघरातच नव्हे तर सहजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नक्कीच मदत करतील...आणि त्यानुसार त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी माझ्यासारख्या प्रत्येक आईची (तसेच बाबांचीही..पण हा विषय़ ..पुढच्या खमंग वाद-चर्चेकरता राखून ठेवूया) आहे असं मला वाटतं :-)