महाराष्ट्र टाईम्स मध्ये संपादकीय पानावरील लेख -रोबोच्या ’अंतर्मना’त !#Artificial_Intelligence_Appreciation_Day #July16
दक्षिण कोरियातील सायबोर्ग नावाच्या रोबोने ९ तास ड्युटीच्या बहुधा अतिश्रमाला वैतागून ’आत्महत्या’ (!) केल्याच्या बातम्या देशविदेशातील वर्तमानपत्रातून झळकल्या. दक्षिण कोरियाच्या गुमी सिटी कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी या रोबोचा ’मृत्यू’ झाला. त्याने पायऱ्यांवरून साडेसहा फूट खाली उडी मारून आत्महत्या (!) केल्याचे सांगितले जात आहे. मृत रोबोची ऑगस्ट २०२३ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. नागरिकांना आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे काम रोबोकडे पहिल्यंदाच सोपवण्यात आले होते. त्याला लिफ्टचा वापर करता येई. कॅलिफोर्नियाच्या बीअर रोबोटीक्स या कंपनीने हा रोबो विकसित केला होता. रोबोंचा प्रभावीपणे वापर करणार्या देशांच्या यादीत दक्षिण कोरिया बराच वर आहे. International Federation of Robotics नुसार दर १० कर्मचार्यांमागे तिथे एक रोबो काम करतो.
आत्महत्येच्या (!) घटनेच्या वेळी काही साक्षीदारांच्या मते त्यांनी सायबोर्गला जागीच गरगरताना आणि मग स्वत:ला झोकून देताना पाहिले. रोबो खाली कोसळताना त्याचे तुकडे झाले. या तुकड्यांचे कंपनीद्वारे यथावकाश विश्लेषण केले जाईल. एखादे यंत्र कायमचे नादुरूस्त होते किंवा बंद पडते तेव्हा आपण ते यंत्र ’कामातून गेले’ म्हणतो. इंग्रजीत ’डेड’ म्हणत असल्याने ’मृत’ शब्द वापरला गेला हे आपण समजू शकतो पण ही ’आत्महत्या’ असल्याचा उल्लेख बातम्यांमध्ये आहे.
मुळात रोबो ’आत्महत्या’ करू शकेल का!
’तेरी बातोंने ऐसा उलझा दिया’ या चित्रपटातली नायिका सिफ्रा (क्रिती सनॉन) एक आधुनिक गृहकृत्यदक्ष युवती रोबो असते. तिला पहिल्यांदा साडी नेसलेली पाहून तिच्या सौंदर्याची स्तुती करताना नायकाची आत्या म्हणते,"आज तो तुम पुरे शहर में आग लगा दोगी". सिफ्रा विचारते, "क्या आप चाहती है मै पूरे शहर में आग लगा दूँ ?" नायक घाईघाईने तिला सांगतो, "अरे,ये मजाक कर रही है!" यावर ’ओह ! जोक!" असे म्हणत सिफ्रा यांत्रिक (अमानवी) पद्धतीने ही ही ही करते. सिनेमातल्या या गमतीदार प्रसंगात कथा फुलविण्यासाठी थोडे स्वातंत्र्य घेतले गेले असले तरी असे रोबो केवळ ’प्रतिसाद’ देऊ शकतात व ते ही त्यांना जसे ’प्रोग्राम’ किंवा डिझाईन केले आहे त्यानुसार, हे या दृश्यावरून स्पष्ट होईल.
मदतनीस किंवा सेवा देणारे रोबो माणसासारखा संवाद कसा काय साधतात याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.
यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे हे तिचे कार्य आहे. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषा निर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामासाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते. पण माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. म्हणजे मानवी भाषाच नव्हे तर मानवी चर्येवरचे भाव आणि देहबोली सुद्धा या मदतनीस रोबोंना समजायला हवी. तरच ते अचूक संवाद साधू शकतील.
यावरही संशोधन झाले आहे.
चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कृत्रिम बुद्धीमत्ता परिषद २०२४ मध्ये फुदन विद्यापीठाने ’ग्युआनघुआ क्र. १’ या नावाचा भावनाशील ह्युमनॉईड सादर केला. याला चेहर्यावर राग, खिन्नता, दु:ख, आनंद व उल्हास यासारखे भाव प्रतिसाद स्वरूपात दर्शवता येतात. १६५ सेंमी उंची व ६२ किलोग्रॅम वजन असलेल्या या ह्युमनॉईडमध्ये ४५ कृत्रिम बुद्धीमत्ता आधारित सांधे बसवले आहेत. यामुळे तो ’कठपुतळी’ सारख्या कडक हालचाली न करता माणसासारख्या सहजतेने हालचाली करू शकतो व माणसासारखी उठबस करू शकतो. चीनमधल्या वृद्धांना मदत व्हावी या हेतूने या ह्युमनॉईडची निर्मिती करण्यात आली आहे. आवश्यक ते वैद्यकीय प्रशिक्षण देण्यात आले आहे. वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष देऊन प्रेमाने त्यांची काळजी घेऊ शकेल अशी त्याची ’इमोशनली इंटेलिजंट’ रचना आहे. तरीही माणसाचे रूप त्याला कसे येणार !
लवकरच येणार. जपानमध्ये मानवी त्वचेसारख्या प्रतीचे रासायनिक आवरणाचे रोपण रोबोवर करण्याचे प्रयोग सुरु आहेत. जसे हसताना माणसाची जबड्याची त्वचा ताणली जाते, वैतागल्यावर कपाळावर आठ्या पडतात तसे या कृत्रिम त्वचेचा वापर करून रोबोच्या चेहर्यावर घडताना दिसले तर त्याच्या आणि माणसाच्या दिसण्यातले आणि वागण्यातले अंतर हळूहळू नाहीसे होत जाईल.
आता त्याच्यात आणि माणसात फरक राहीला तो समानुभूतीचा आणि त्यायोगे होणार्या भावनानिर्मितीचा. समानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी तादात्म्य पावून तिला समजून घेणे, तिचे विचार, भावना, वृत्ती जाणून घेणे.
सादरीकरण प्रभावी असेल तर नाटक / सिनेमातल्या पात्रांना दु:ख झालेलं बघून आपल्यालाही वाईट वाटते. त्यांना आनंद झालेला पाहून आनंद होतो. समोर जे दिसते आहे ते वास्तव नाही याची कल्पना असूनही हे घडते. जित्याजागत्या माणसांबाबत तर आपण अधिकच संवेदनशील असतो. द्वेष, मत्सर, राग, प्रेम, आकर्षण या सगळ्या भावना आतून निर्माण होतात.
तंत्रहृदयी ए-आय किंवा कृत्रिम बुद्धीमत्तेला संवेदना नाहीत त्यामुळे तिला सहानुभूती कळत नाही आणि समानुभूती घेता येत नाही. अनुभूती राहो, कसलाही ’अनुभव’ घेता येत नाही. त्यांच्या डिझाइननुसार ते वस्तुनिष्ठ चिन्हांच्या आधारे समोरच्या माणसाच्या भावना ओळखून शब्दातून किंवा स्पर्शातून सहानुभूती व समानुभूती जाणवल्याचा भास निर्माण करू शकतात. मानवी वर्तनाचे अनुकरण करून त्यासाठी आवश्यक त्या हालचाली ,कृती, संवाद करू शकतात. परंतु भावनिक दृष्ट्या समरस न झाल्याने त्यायोगे कोणतेही भाव त्यांच्यात आपसूक निर्माण होत नाहीत.
मुन्नाभाई एमबीबीएस- या चित्रपटात एका बधीरावस्थेतल्या पेशंटला मॉडेलसारखे वापरून एक डॉक्टर प्रशिक्षण देताना दिसतात. ते त्या पेशंटचा उल्लेख सतत 'ऑब्जेक्ट' असा करत असतात. मुन्नाभाई त्यावर चिडून म्हणतो, ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट क्या लगा रखा है , इनका कोई नाम तो होगा". हा मानवी भाव रोबोमध्ये येऊ शकणार नाही कारण त्यांच्यासाठी सारे मानव हे फक्त 'ऑब्जेक्ट' आहेत.
इसापनीतीत प्राण्यांचे मानवीकरण केले आहे तसे माणसाने रोबोचे मानवीकरण केल्याने त्याची कार्य करण्याची क्षमता संपणे या द. कोरियातील घटनेला माणसाने ’आत्महत्या’ नाव दिले आहे. मुळात आत्महत्येआधी मानवी मनात जी प्रचंड उलथापालथ व मेंदूत ज्या घडामोडी होत असतील त्या रोबोमध्ये होणे शक्य नाही कारण त्याला ’मन’ नाही. आत्महत्या करण्याइतक्या नैराश्याच्या टोकाला जाण्यासाठी आधी ’स्व’ची जाणीव हवी. अद्याप जगातल्या कोणत्याही तंत्रज्ञानाकडे ’स्व’ विकसित करण्याची प्रणाली उपलब्ध नाही. म्हणजेच हा रोबो एक यंत्र म्हणून ’मृत’ झाला आहे
तरीही अशा मदतनीस रोबोंची गरज माणसाला भावनिक पातळीवर का वाटते ! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) हे रियल बॉटिक्स कंपनी चालवतात. त्याद्वारे डिजिटल बाहुल्यांची (रोबो) निर्मिती करताना २०१७ मध्ये त्यांनी एक प्रयोग केला होता. रोबो मदतनीसांबाबत माणसाच्या प्रतिक्रिया त्यांना आजमावून पाहायच्या होत्या. त्यांनी काही रूग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही रूग्णांना डॉक्टरांच्या डिजिटल ’अवतारा’शी बोलायला सांगितले. पेशंटच्या मते ते डिजिटल अवताराशी जास्त सहजपणे बोलू शकले कारण तो आपल्याला ’जज’ करत नाही.
सॅन यांच्या मते यातून अशीही शक्यता आहे की भावनाप्रधान माणसे या निरपेक्ष पण निर्विकार म्हणजेच यंत्रहृदयी बाहुल्यांच्या (रोबोंच्या) प्रेमातही पडतील. काही त्यांच्या इतके आहारी जातील की त्यांच्यावाचून माणसाचे जगणे अवघड होईल. यातून मानसिक आरोग्याचे नवे प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, "सजीव आणि रोबो सखी किंवा माणूस आणि रोबो मदतनीस यांची बलस्थाने व मर्यादा ओळखता यायला हव्यात. अन्यथा आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ. "
आज म्हणजेच १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेच्या भल्याबुर्या परिणामांचे विश्लेषण करण्याचा आणि त्याविषयी नव्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे.
कार्यक्षमता व उत्पादकता वाढावी या हेतूने माणसाऐवजी रोबो अधिकार्यांवर प्रचंड काम सोपवल्याने होणार्या परिणामांचा विचार करण्याची वेळ द.कोरियावरच नव्हे तर जगावर आली आहे. मुळात अतिताणामुळे मृत पावण्याइतपत म्हणजेच दुरूस्त होऊ शकणार नाही इतके बिघडण्याइतपत काम यंत्र असले तरी त्यावर लादणे योग्य किंवा नैतिक आहे का यास्वरूपाच्या चर्चा या घटनेनंतर सुरू झाल्या आहेत.
रोबोने माणसाचे काम हलके करणे अपेक्षित आहे की माणसाऐवजी काम करणे अपेक्षित आहे ! आवश्यक तिथे मजूर, परिचारक म्हणून किंवा माणसासाठी धोकेदायक अशा ठिकाणी रोबोचा वापर होतो तेवढे पुरेसे नाही का!
या संदर्भात एक मार्मिक व्यंगचित्र बघण्यात आले. त्यात एक आधुनिक महिला म्हणते आहे," ए-आय ने माझी सर्जनशील कामे करावी म्हणजे मला घरकामाला पुरेसा वेळ मिळेल हे मला नकोय. उलट ए-आय ने मला घरकामात मदत करावी म्हणजे मला माझ्या आवडीची सर्जनशील कामे करायला पुरेसा वेळ मिळेल."
तूर्त गुमी सिटी कौन्सीलने मृत सायबोर्गच्या जागी दुसरा रोबो नियुक्त करायचा विचार सध्या स्थगित केला आहे.
लक्षावधी वाहनचालकांना बेरोजगार करणार्या स्वयंचलित गाड्यांना मी भारतात प्रवेश करू देण्याच्या विरोधात आहे, अशी भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. ए-आय मुळे करियरच्या अनेक संधी निर्माण होत असल्या आणि जगणे सुकर होत असले तरीही त्या त्या देशातील धुरीणांनी नव्या तंत्रज्ञानाच्या अतिवापराचा व त्याच्या संभाव्य परिणामांचा विचार करून ठाम भूमिका घेणे आता आवश्यक आहे.
माणूस दिवसेंदिवस यांत्रिक आणि रोबो ह्युमनॉईड होत चाललेला असताना या दोघांच्या मधली पुसट होत चाललेली सीमारेषा वेळीच ठळक करायला हवी आहे.
#robotics #AI