देणेघेणे टाळून साधेपणाने लग्न करण्याची अट आम्ही मोडकांना पत्रातून कळवली होती. ती मान्य करताना भावी सुनेनंही नवं घर ’आपलं’ म्हणून स्वीकारताना कसा विचार करावा आणि कुटुंब म्हणजे काय याविषयी भाऊंनी अतिशय संयत आणि नेमक्या शब्दात पत्रोत्तर दिलं होतं. ते विचार फक्त पत्रातून छाप पाडायला नव्हते तर ते त्यांच्या जगण्याचा भाग आहेत याचा प्रत्यय मी (आणि मानसीही) सून म्हणून घेत आलो आहोत. एकंदरीत ते फक्त सासरे म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच अतिशय कूल आहेत.
ते जितकं छान लिहितात तितकं उत्तम विनोदबुद्धीमुळे कोणत्याही मंचावर झकास बोलतातही पण असे प्रसंग क्वचित येतात कारण एखादं पद मिळावं, सामाजिक सन्मान मिळावा यासाठी धडपडणं हा भाऊंचा स्वभाव नाही. त्यांच्या संयतपणाला वैतागून सासूबाई (आई) कधीकधी ’एक नाही न दोन नाही, आपणच आपली एकट्याने बडबड करायची’ असं स्वगत पुटपुटतात हा भाग वेगळा !
त्यांचं वाचन, इंग्रजीचं आणि खरं तर आयुष्याचंही आकलन खोल आहे त्यामुळे त्यांच्याकडून ऐकण्यासारखं बरंच असतं. त्यांच्याशी कोणत्याही विषयावर गप्पा मारता येतात. मी लहानपणी शाळेतून आल्यावर आईला इत्यंभूत हकीकत सांगत असे तसं महत्वाचं काही घडलं की घरी आल्यावर त्यांना आजही सांगत असते. ते ही उत्सुक चेहरा करून ऐकत असतात (सांगता कुणाला !) नातवंडंही त्यांना वेगळा फोन करून काहीबाही सतत सांगत असतात. त्यांच्या काही इब्लिस सहकार्यांचा, प्र. के अत्र्यांच्या भाषणाचा असे खास विषय निघाले की ते विशेष खुलतात. हातात दाढीचा ब्रश तसाच धरून अर्धी झालेली दाढी आणि कमरेला टॉवेल गुंडाळलेल्या स्थितीत तेव्हाचे सामाजिक, राजकीय गमतीदार किस्से सांगण्यात रंगून जातात.
आप्त-संबंधितांना जी काय मदत केली, करतायत त्याचा मात्र ते कधीही उल्लेख करत नाहीत. ते कुणाकडून तरी कळतं. आईवडिलांची शब्दश: सेवा करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. गरिबीतून वर येऊन निवृत्त सिव्हिल इंजिनीयर म्हणून स्वच्छ कारकीर्दीनंतरचं सुस्थिर आयुष्य जगताना जुन्या अप्रिय घटनांविषयी मनात कोणताही कडवटपणा कधी दिसला नाही. त्यांच्यातली अंगभूत शांतता या ’सोडून देण्यातून आली असावी. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा त्यांना गाढ झोपेतून उठवून ’चला, आपल्याला हॉस्पीटलला अॅडमिट व्हायचंय’ सांगितलं, त्यावर त्यांनी फक्त ’चला’ म्हटलं. कोणतेही प्रतिप्रश्न, त्रागा नाही.
एखादी टेस्ट करावी लागली तर तोंडून ’स्स’ ही ऐकू येत नाही. त्यांच्यासारखा प्राप्त परिस्थितीचा समजूतदार स्वीकार करता आला पाहिजे असं नेहमी वाटतं. सुरुवातीला एकदा जवळच्या भागातून जाताना महेशने सांगितलं ’हा पूल भाऊंनी बांधला आहे’. मी आश्चर्याने ’हो का, अरे वा, केव्हा, कधी’ वगैरे म्हणायच्या आत ’कामच होतं आमचं ते आणि मी म्हणजे टीम असते बांधणारी’ एवढं म्हणून त्यांनी विषय संपवला. पदाचा दुराभिमान ,त्यावर अवलंबून असलेल्या प्रतिष्ठेच्या व्याख्या यापासून ते कायम लांब राहत आले आहेत.
त्यांना आम्ही कधीही संतापताना, मोठ्या आवाजात बोलताना पाहिलेलं नाही. त्यामुळे आई-भाऊ चुकून कधी भांडत असले तर ते ही कळत नाही. आई कधी कधी रमीचा डाव (जो भाऊंना कंपलसरी रोज दुपारी खेळावा लागतो) अर्धवट टाकून तरातरा आत आल्या आणि भराभरा चहा ठेवला तर काहीतरी बिनसल्याचा अंदाज येतो. पण दुसर्या दिवशी पुन्हा दोघं तितक्याच शांतपणे टीव्हीवर पाच वाजेची चित्रगीतं पाहात रमी खेळताना दिसतात. (त्या खेळाचे सगळे नियम आई म्हणतात ते असतात). म्हातारपणी यांची मुलं पण अशीच गुणी वागतील या आशेवर मी व मानसी आहोत. 

आम्हा दोन्ही जोड्यांच्या भांडणात मात्र ते कायम आमच्या म्हणजे सुनांच्या बाजूने असतात. त्यांची मुलं आमची तक्रार करत असली तर ते नरो वा कुंजरोवा करत आढ्याकडे पाहतात. चूक मुलांची असली तर थंड चेहर्याने एखादा जोरदार सिक्सर लगावतात. नातलगांवर त्यांचा प्रचंड जीव आहे. त्या बाबतीत आमच्याकडून हयगय झाली तरच त्यांच्या चेहर्यावर आठी दिसते.
त्यांच्या आणि आईच्या समाधानी सहजीवनाचं मूळ दोघांच्या व्यक्तिमत्वांमधल्या वेगळेपणामध्ये असावं. भाऊ वर्क इज वर्शिपवाले तर आई पारंपरिक विचारांच्या. कोकणातली अगदी समुद्रकिनार्यालगतच्या घरातली मुलगी विदर्भातल्या विरूद्ध तापमानाच्या आणि रुक्ष वातावरणातल्या घरात आली त्याला आज ६० वर्ष पूर्ण झाली. उकडीच्या मोदकाला न सोडता त्यांनी तळणीच्या मोदकालाही सहज स्वीकारलं. तेव्हाच्या पद्धतीनुसार दहावीपर्यंतच शिक्षण झालं असलं तरी त्यांनी स्वत: बँकेचे व्यवहार करण्यापासून घराचा अर्थविभाग आणि नातलगांचा गोतावळा एकहाती समर्थपणे सांभाळला. आजही ते पाश घट्ट आहेत पण गुंता झालेले नाहीत.
आई म्हटली की पहिली आठवण तिची खासीयत असलेल्या पदार्थांची येते. त्यांच्यासारखे पाकातले लाडू, चकल्या, कोशिंबीरी आजही आम्हाला जमत नाहीत. मी पहिल्यांदा यांच्या घरी आले होते तेव्हा त्यांनी साधा उपमा पण इतका चविष्ट केला होता की तेव्हा धड स्वयंपाक न येणार्या मला धस्सच झालं होतं. सुरुवातीला मी त्यांना नुसत्या भाज्या चिरून देत असे, आता त्या मला भाज्या चिरून देतात. पुढच्या महिन्यात येणार्या सणाला काय करायचं याची त्यांना या महिन्यापासूनच चिंता असते. त्या शेंगोळ्यांइतक्याच आवडीने पास्ताही खातात. तसं नको, असंच हवं वगैरे फारशा भानगडी नाहीत त्यामुळे त्यांचं (आणि त्यामुळे आमचंही) आयुष्य सोपं झालं आहे.
कोकणी शिडशिडीत वाण असल्याने त्यांचा कामाचा झपाटा आणि चटपटीतपणा अजूनही जोरदार आहे. त्यांना वयाची आठवण करून देऊन स्टुलावरून खाली उतरवावं लागतं. हळू चाला सांगावं लागतं. घरात कुणी अचानक आलं आणि नेमकं काही संपलेलं असलं तर त्या मी को... म्हणेपर्यंत चटकन साडी बदलून बाहेर पडलेल्या असतात आणि कांदा चिरेतो ...थिंबीर कोपर्यावरून आणलेली असते. चेंगटपणा त्यांना अजिबात आवडत नाही. कुणाला १२ ला जेवायला बोलावलं तर यांचा स्वयंपाक दहालाच तयार असे. सुनांच्या रेजिम मध्ये समजा मी ’गरम वाढू’ म्हणून भात लावायचा राहू दिला आणि घर आवरत बसले तर त्या अस्वस्थ होतात. आमची चुकून भांडणं झालीच तर ती अशा जागतिक कारणांवरून होतात. त्यामुळे कारण विसरून त्या दोन तासात पूर्ववत बोलू लागतात.
पहाटे उठून पोथी वाचन, जप, फुलं तोडणं, पूजा हे जितकं नियमित तितकं मैत्रिणींचा अड्डा जमवून व्हॉट्सअॅपवर प्लॅनिंग करून आठवड्याला किमान एक डबापार्टीही नियमित. ती नं झाल्यास ’कसं तरी’ होत असल्याने दवाखान्यात चक्कर मारावी लागते. भ्रमंतीच्या आवडीमुळे त्यांनी बहुतांश राज्य आणि लगतचे २,४ देश पाहिले आहेत. आता वयानुसार लांबचे प्रवास शक्य नसले तरी एक दिवसाच्या सहली अखंड सुरु असतात, तेच त्यांचं टॉनीक आहे. त्यांना भरभरून जगायला आवडतं. तरूणपणात जबाबदार्यांना प्राधान्य दिल्यानं करायचं राहून गेलेलं त्या उत्साहाने करत असतात. त्यांच्या प्लॅनमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त दुधावरच्या सायीचा, नातवंडांचा. आता त्यात नातसुनेची भर पडली आहे. आजी त्यांचाही वीक पॉइंट आहे.
छोट्या छोट्या गोष्टीत रमत असल्याने आईंना कंटाळा येत नाही. त्यांनी आजवर एकही टीव्ही मालिका पाहिलेली नाही, पाहत नाहीत हे तर त्यांच्या पिढीकडे बघता आठवं आश्चर्यच आहे. टीव्हीसमोर कधीतरी बसल्याच तर पाच मिनीटात ’सारखं आपलं शरद पवार आणि मोदी..बरं एक वेळ ते ठीक आहे पण रेल्वे बजेटची भाषणं ही काय तासंतास ऐकायची गोष्ट आहे का !’ असं भाऊंना उद्देशून पण स्वगत म्हणत त्या आत जातात.
टीव्ही सारखाच गॉसीप, हेवेदावे या गोष्टींशी त्यांचा संबंध नाही.

आम्हा दोन्ही सुनांना त्यांनी कोणतीही तुलना न करता कायम कृतीशील पाठिंबा दिला आहे. जे काय अवांतर कामधाम आम्ही करू शकलो/ शकतो आहोत ते त्यांच्या जीवावर. जुळ्यांच्या जन्मानंतर एक दोनदा मध्यरात्री जाग आली तर त्या आईच्या मायेने माझे पाय दाबत बसलेल्या होत्या. अशा अमूल्य आणि चिरंजीव आठवणींपुढे सगळे राग लोभ क्षुल्लक आणि क्षणिक वाटतात.
आई भाऊंच्या सहजीवनातही अनेक राग लोभाचे प्रसंग येऊन गेले असतील पण अशाच काही अनमोल आठवणींच्या बळावर त्यांनी त्याची साठी आज कृतार्थतेनं पार केली आहे. त्यांचं घरात असणं हीच आमची उर्जा आहे. त्यांचे आशीर्वाद आम्हाला सदैव लाभोत. त्यांचे हास्य कायम राहो ही आजच्या शुभदिनी प्रार्थना. दोघांनाही आम्हा सर्व कुटुंबियांकडून अधिक समृद्ध सहजीवनाच्या आणि निरामय आरोग्याच्या अनेकानेक शुभेच्छा आणि आदरपूर्वक नमस्कार 


