FutureTechnology
आज चाळीशी ओलांडलेल्या पिढीने कॅसेट ते म्युझिक अॅप्स असा भारतीय संगीताचा प्रवास पाहिला आहे. डायल करावे लागणारे फोन ते व्हिडिओ कॉल, दूरदर्शन ते ओटीटी, टाईपरायटर ते व्हॉईस टायपिंग. आगगाडी ते मेट्रो रेल्वे असे बदल अनुभवले आहेत. काळाबरोबर सतत बदलणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. १० कोटी लोकांपर्यंत पोचायला फेसबुकला ९ वर्ष लागली पण चॅटजीपीटीला फक्त २ महिने. हे बघता बदलाचा वेग किती वाढला आहे हे लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर २०२३ हे वर्ष संपत आलेले असताना उद्याचे म्हणजे येत्या दोन दशकातले तंत्रज्ञान कसे असू शकेल याबाबत तंत्रज्ञ, माध्यमतज्ञ व अभ्यासक काय म्हणतात ते पाहूया.
पुढील दोन दशकात एआर आणि व्हीआर मुख्य प्रवाहात येईल. एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअॅलिटी. एआर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. यामुळे गुगल मॅप सारखी सुविधा जणू आपले बोट धरून प्रत्यक्ष वाटचाल करेल. व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअॅलिटी. खरे असल्याचा भास. सध्या हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण आभासी आकाशात दिले जाते. भविष्यात व्हीआरच्या मदतीने दुसर्या गावातील किंवा देशातील प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा सामने, शिक्षण, पर्यटन, मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी इ. बरेच काही व्हीआर द्वारे नियंत्रित केले जाईल.
जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, अनेक कामे केवळ आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण सिरी, अॅलेक्सासारख्या ज्या सुविधा पाहतोय त्या फारच साधारण वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल.
ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल. कोरी बर्गमन, या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे शेकडो व्हिडिओ साक्षीदार अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर बातमी बघणार्याला आपण तो अपघात होताना तिथे हजर आहोत असा अनुभव येईल,.
मोबाईल फोन वापरून आपण सध्या जी कामे करतो त्यातली बहुतेक कामे स्मार्ट घड्याळे करतील. वेअरेबल म्हणजे परिधान करता येणार्या तंत्रज्ञानाचा वापर सुरु होईल. ओटिस किमझे हे ’सिंपली मेजर्ड’चे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याचा भाग असेल किंवा आपल्या चष्म्याचा किंवा बुटाचा सुद्धा. तेव्हाची गॅझेट्स आतासारखी हातात धरायची गरज राहणार नाही कारण ती आपल्या अंगाखांद्यावर कुठेतरी असतील. आपला हात किंवा तळवा विशिष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल.
अशक्य वाटते आहे ना ! काही वर्षांपूर्वी आज नॉर्मल वाटणारा व्हिडिओ कॉल सुद्धा अशक्य वाटत असे.
बायोमेट्रीक तंत्रज्ञान सध्या विकसित होते आहे. येत्या काळात प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचा होलोग्राम म्हणजे त्रिमितीय (थ्रीडी) प्रतिमा त्या व्यक्तीच्या वतीने मिटींगला उपस्थित राहू शकेल. एलॉन मस्क यांची न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन ही कंपनी या न्यूरो तंत्रज्ञानावर काम करते आहे. मानवी शरीरात रोपण करता येईल असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) ही कंपनी विकसित करते आहे.
लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील. आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे सुमारे ३ अब्ज वापरकर्ते आहेत. ते टिकून राहील मात्र त्याचे रुप वेगळे असेल. अन्य प्लॅटफॉर्मचे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ शोधतील. पॉडकास्ट ,शॉर्ट व्हिडिओ व लाईव्ह व्हिडिओची चलती असेल. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल. त्यात अत्याकर्षक फीचर्स येतील.
जागतिक राजकारणात सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भल्याबुर्या घडामोडी होत राहतील.
डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात लोक क्रांती करु शकले. ’ब्लॅक लाईव्हज मॅटर’ किंवा ’मी टू’ सारख्या हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. भविष्यात असे ट्रेंड जास्त मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.
दुसर्या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच ग्रुप डिलिट केला जातो. आगामी काळात ए-आय व नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. बनावट खात्यांवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.
जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक घातक परिणाम आहे. लाईक्स कमी आले की निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, ट्रोल करणे, सहज उपलब्ध झालेल्या पॉर्न आशयाची चटक लागणे इ. दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. हे प्रचंड वाढतील.
आपण विविध वेबसाइटवर फिरत असताना त्यावर कोणी, काय व किती वेळ पाहिले याची नोंद होते. त्यावरू आपली आवड लक्षात येते. आपल्या आवडीशी जुळणार्या जाहिराती आपल्याला सोशल मिडिया फीडमध्ये दिसू लागतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा राजरोस शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये किंवा फोनवर बोलताना ’व्हॅकेशन’ किंवा ’सुट्टी’ असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल. तो डाटा अधिक मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. खासगीपण फारसे उरणार नाही.
खोट्या बातम्या, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळामुळे ते अधिक क्रूर होत जातील. ए-आयबरोबर डीप फेकचा वापर वाढेल. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थांनी याबाबत वेळीच कठोर पावले उचलली नाही तर हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकेदायक असेल.
ए-आय (कृत्रिम बुद्धीमत्ते) मुळे सर्जनशीलतेला आव्हान निर्माण होईल. माणसाच्या आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडियामुळे नकारात्मक परिणाम होतील. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाईल.
या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. विस्मृती किंवा त्यासारख्या आजारांसाठी हे उपकारक ठरेल. पण कदाचित स्मृती हॅक होऊ शकेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही.
कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. दुर्दैवाने ती न शिकताच बेधडकपणे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले आहे. सोशल मिडिया व ए-आय वापरताना कुठे थांबायचे हे आतापासूनच प्रत्येकाने ठरवायला हवे. (उदा: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताने नवतंत्रज्ञानाचा स्वीकार केला असला तरी चालकांचे काम हिरावून घेणारी ए-आय आधारित स्वयंचलित वाहने भारतात धावणार नाहीत याची ग्वाही दिली आहे.)
तांत्रिक सुविधा आणि गॅझेट्सच्या ढिगार्यातून आपण किती व काय निवडतो, त्यावर किती विसंबून राहतो आणि काय फॉरवर्ड करतो यावर आपल्या मनाचे, कुटुंबाचे आणि समाजाचे स्थैर्य अवलंबून असणार आहे.
#futuretechnology #punyanagari