Sunday, February 19, 2023

निळ्या दाताची तंत्रकथा


मोबाईल वापरणार्‍या प्रत्येकाचा या निळ्या दाताच्या तंत्रज्ञानाशी म्हणजेच ब्लूटूथ शी संबंध येतो. स्मार्ट वॉच वापरायचे असेल, आपल्या मोबाईलमधल्या फाईल्स शेजारच्या मोबाईलमध्ये पटकन पाठवायच्या असतील, कार चालवताना कॉल करायचा असेल, हेडफोन लावून संगीत ऐकत धावायचे असेल, लॅपटॉपला वायरविना कीबोर्ड जोडायचा असेल, वेब कॅमेरा वापरायचा असेल तर ब्लूटूथ हवेच. वायरच्या बंधनापासून मुक्ती देणारे हे ब्लूटूथ नावाचे तंत्रज्ञान आपल्या चांगल्या  परिचयाचे झाले आहे. याचा वापर मात्र मर्यादित अंतरापुरताच करता येतो. आधी ते जेमतेम  १० मीटर अंतरापर्यंत काम करायचे. नवे व्हर्शन २०० ,२५० मीटर अंतरापर्यंत काम करू शकते. 

पण ब्लूटूथ हे काही ओटीपी किंवा जीबी सारखे संक्षिप्त रूप नाही मग हे विचित्र नाव का असावे या तंत्रज्ञानाला !हे नाव सहस्त्रकापूर्वी होऊन गेलेल्या राजा हॅराल्ड “ब्लूटूथ” गॉर्मसन याच्यावरून ठेवण्यात आले आहे. राजा हॅराल्ड दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध होता: इ.स ९५८ मध्ये त्याने डेन्मार्क आणि नॉर्वेला एकत्र केले म्हणून त्याचे नाव गाजले. त्याच्या मुत्सद्देगिरीमुळे अंतर्गत युद्ध करणारे देश किंवा दोन पक्षांनी एकमेकांशी तडजोड केली असे म्हणतात.

दुसरे कारण म्हणजे त्याचा गडद निळा/राखाडी रंगाचा मृत दात. या दातामुळे त्याला ’ब्लूटूथ’ हे टोपणनाव मिळाले होते. 

तर १९९६ मध्ये इंटेल, एरिक्सन आणि नोकिया या आयटी क्षेत्रातील तीन दिग्गज कंपन्यांचे प्रमुख ब्लूटूथ या तंत्रज्ञानाच्या प्रमाणीकरणासाठी एकत्र आले. प्रमाणीकरणाविना सॅमसंगच्या मोबाईलमधले गाणे ऐकवायला सोनीच्या ब्लूटूथ स्पीकरने नकार दिला असता आणि आपली ग्राहक म्हणून चांगलीच गैरसोय झाली असती. या बैठकीदरम्यान, इंटेल कंपनीचे जिम करडॅक यांना राजा हॅराल्ड ’ब्लूटूथ’ची आठवण झाली. त्या राजाने जसे स्कॅन्डिनेव्हियाला ( मुख्यत: स्वीडन, डेन्मार्क व नॉर्वे हे लगतचे देश मिळून तयार झालेला प्रदेश) एकत्र आणले तसेच आपण नजिकच्या डिजीटल उपकरणांना एकमेकांशी जोडू पाहातो आहोत. तेव्हा या सहयोगासाठी आपण  ’ब्लूटूथ’ हा कोड शब्द  वापरूया, असे त्यांनी सुचवले आणि सर्वांना ते पटले. 

पुढे हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित होऊन बाजारात आले तेव्हा त्याला साजेसे नाव द्यायले हवे असे सर्वांना गंभीरपणे वाटू लागले. रेडिओवायर किंवा पॅन (पर्सनल एरिया नेटवर्किंग) अशी वेगवेगळी नावे सुचवण्यात आली , पॅन हे नाव आघाडीवर होते. परंतु ’ब्लूटूथ’ याच शब्दाला इंटरनेटवर हजारोंनी पसंती दिली. 

नाव नक्की करण्यासाठी ठरवलेली मुदत संपत चालली होती आणि याहून सरस नाव सापडले नाही. शेवटी ’ब्लूटूथ’ नावानेच बारसे झाले. वेगळेपणामुळे हे नाव लवकरच सर्वतोमुखी झाले, इतके की ब्लूटूथ हा या उद्योगक्षेत्रात लघु-अंतराच्या विना-वायर तंत्रज्ञानाला समानार्थी शब्द ठरला. 

सुरूवातीला याचा लोगो राजा हॅराल्डच्या नावाची आद्याक्षरे एकत्र करून तयार करण्यात आला होता, यात आता थोडा बदल झाला असला तरी त्यातला बी कायम आहे.

संगणक इतर उपकरणांशी जोडणाऱ्या वायर्सची संख्या कमी करणे हा ब्लूटूथचा मुख्य उद्देश. या आधुनिक उपकरणांमध्ये ब्लूटूथ म्हणजे एक प्रकारची ट्रान्सीव्हर मायक्रोचिप बसवलेली असते. ब्लूटूथ स्पेसिफिकेशन प्रथम १९९४ मध्ये मध्ये हार्टसनने विकसित केले. हार्टसन त्यावेळी एरिक्सन कंपनीत  काम करत होते. २० मे १९९९ ला ’ब्लूटूथ स्पेशल इंटरेस्ट ग्रुप’ची स्थापना झाली. त्यांनी हार्टसनच्या या संशोधनामध्ये तांत्रिक भर घालून ते अद्यावत केले. या ग्रुपमध्ये एरिक्सनसह सोनी, आयबीएम, इनटेल, तोशिबा आणि नोकिया या कंपन्यांचा सहभाग होता. हे तंत्रज्ञान IEEE802.15.1 म्हणूनही ओळखले जाते. IEEE या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या मानकामुळे ब्लूटूथचा वापर जगभरातील सतराशे साठ कंपन्यांच्या शेकडो उपकरणांमध्ये एकाच पद्धतीने करणे शक्य होते.

’ब्लूटूथ कसे काम करते ते समजून घेणे सोपे आहे. आपण फोनवर बोलताना योग्य व्यक्तीशी बोलत आहोत ना याची आधी खात्री करतो. मग त्यांना आत्ता बोलणे शक्य आहे का हे विचारतो व त्यानुसार संवाद  सुरू करतो अन्यथा फोन बंद करतो. याच पद्धतीने ब्लूटूथ उपकरणे आधी संपर्क करतात. मग स्वीकृती घेऊन माहितीची देवघेव करतात. ब्लूटूथने एका वेळी जास्तीत जास्त सात उपकरणांना जोडता येते. यातल्या मुख्य उपकरणाला मास्टर किंवा प्रमुख म्हणतात. त्याच्याशी जोडलेल्या उपकरणांना स्लेव्ह म्हणजेच गुलाम म्हटले जाते. खरे तर सहकारी म्हणायला हवे कारण उपकरणांची जोडणी प्रमुख नियंत्रित करत असतो इतकाच याचा अर्थ आहे. काम सुरू नसेल तेव्हा ते टाईमआऊट होऊन बॅटरीची बचत करते. 

ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा एक धोका म्हणजे ते  जितके वापरायला सोपे तितकेच हॅक करण्यासाठीही. हॅकिंग नेमके कसे होते हे समजून घेऊया.  ब्लूटूथ ही वायरलेस संवादासाठी आवश्यक असलेली एक प्रकारची भाषा आहे. आपण ब्लूटूथ ऑन करतो म्हणजे जवळपासच्या ब्लूटूथ ऑन असलेल्या उपकरणांना ’कोई है?’ असे विचारतो. जसे मोबाईल, लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा , प्रिंटर, स्मार्ट वॉच, हेडफोन, स्पीकर, व्हिडिओ गेम वगैरे. जे आपल्या हाकेला ओ देतात त्यांची यादी आपल्याला त्यांच्या टेक्नीकल नावानिशी मोबाईलवर दिसते. त्यापैकी हवे ते उपकरण निवडून आपण आपले उपकरण त्याच्याशी जोडून घेतो व माहितीची देवाणघेवाण करतो. म्हणजे फाईल /फोटो पाठवतो, प्रिंट काढतो इ. 

आता जसे आपण इतर उपकरणांना शोधू शकतो तसे ते ही आपले उपकरण किंवा मोबाईल शोधू शकतात. त्यांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या माध्यमातून ब्लूटूथची भाषा बोलत आपल्या मोबाईलमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करू शकतात. आपण मोबाईलमध्ये पासवर्ड, सुरक्षा वापरली नसेल तर आत शिरून त्याचे नियंत्रण मिळवू शकतात. त्यातील संवेदनशील माहिती चोरू शकतात. बर्‍याचदा आपल्याला याचा पत्ता ही नसतो. या प्रकारच्या हॅकिंगला ब्लूबगिंग किंवा ब्लूजॅकिंग असेही म्हटले जाते. 

घरातून प्रवासाला निघताना आपण कुलपे नीट लागल्याची चारदा खात्री करतो पण  सार्वजनिक जागी गरज नसताना आपल्या मोबाईलमधील ब्लूटूथ तसेच वायफाय खुशाल किंवा नकळतपणे ऑन ठेवतो. हॅकरला आयती संधी देतो. अशा ठिकाणी ते आठवणीने ऑफ करायला हवे म्हणजे आपण सुरक्षित राहू शकू. 

ही चीप बसवलेल्या कठपुतळ्यांना दोरांऐवजी ब्लूटूथच्या तालावर नाचवणार्‍या लोककलावंताचे व्यंगचित्र नुकतेच पाहण्यात आले इतके हे तंत्र लोकप्रिय झाले आहे. गमतीचा भाग सोडला तरी स्वयंचलित असल्यानेच ब्लूटूथची व्याप्ती वेगाने वाढते आहे. ऑन /ऑफ करण्यापलिकडे आपल्याला काहीही  करावे लागत नाही. त्याचा वीज वापर खूप कमी आहे. ब्लूटूथ उपकरणे  इतर कोणत्याही मोबाइल फोनपेक्षा तीन टक्के कमी ऊर्जा वापरतात. थोडक्यात परिसरातील डीजिटल उपकरणांना बंधमुक्त करूनही चुटकीसरशी जवळ आणणारा अतिशय सोयीस्कर असा स्वस्त आणि मस्त पर्याय म्हणजे हे निळ्या दाताचे  तंत्रज्ञान.  

----------------------------------------------------------------------------------------------

#blue_tooth
punyanagari-friday jugad ani tantradnyan 

Saturday, February 18, 2023

पेंच - गोठणगाव व्याघ्र प्रकल्प : काही नोंदी

 तारखा ठरल्या. रिसोर्ट बुक झाले. सफारी बुक केल्या. आता गाडी ठरवायची. म्हणजे वरातीमागून घोडं असा प्रकार.इनोव्हाबद्दल जुजबी बोलणे झाले. दरम्यान मध्य प्रदेशात एक रूद्राक्ष बाबा उगवले. त्यांनी फेकलेला रूद्राक्ष घ्यायला गावातली, आसपासची माणसे गाड्या भरभरून जाऊ लागली आणि आमची ठरल्या तारखेला ’कुणी गाडी देता का गाडी’ अशी स्थिती झाली. एकदाची नागपूरहून गाडी मिळाली. 

स्टेशनवरच हल्दीराम बोगी रेस्टॉरंटला नाश्ता करून पहिले ठिकाण -नागपूरहून जेमतेम सव्वा तास - उमरेड कर्‍हांडला अभयारण्याचे गोठणगाव गेट.

नागपूर आणि भंडार्‍यापासून 60 किमी, भंडारा जिल्ह्यातील पवनी तहसील आणि नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही आणि भिवापुर तालुक्यानजीकचा हा भाग. जंगली कुत्री, (अस्वलं बरीच असतात असं ऐकलेलं.  दुपारी २ ते ६ ची सफारी. टळटळीत उन्ह. 

गेटपाशी थर्माकोलच्या पेटीत पाण्याच्या बाटल्या, कोल्ड्रिंक विकणारी आजी आणि २ वनरक्षक सोडून शांतता. फक्त वार्‍याचा आणि पानांचा आवाज. २ वाजताच भरारा जिप्सी, गाईड येऊन धडकल्या. वनपर्यटक बायनॉक्युलर, मोठ्या लेन्सचे कॅमेरे वगैरे सरंजामासह टोप्या घालून तय्यार. वाळकी पाने खसाखस चेंगरत जिप्सी ४ तास गरागरा फिरत होत्या. अर्थात वाघाच्या शोधात. वाटेत अनेकदा टी पॉइंट लागायचा. मध्ये पाणवठ्यापाशी एक दीर्घ विश्रांती. तर्‍हेतर्‍हेच्या पक्ष्यांचे शांतता चिरत जाणारे वेगवेगळे आवाज. जवळचे मचाण, त्याआडून चकाकणारा सूर्य. तपकिरी, राखाडी, पिवळसर हिरवी, हिरवट पिवळी, काळपट अशा छटांची असंख्य झाडे. त्यातून डोळे दिपवत येणारी उन्हाची तिरीप. काहीशे वर्ष वयाचा स्वत:च्याच पारंब्याच्या जाळ्यात स्तब्ध बसलेला वटवृक्ष. सूर्य कलल्यावर परतताना जंगलाचा बदललेला सावळा चेहरा.


वाघाने शेवटपर्यंत दर्शन दिले नाही पण अचानक सामोरे आलेले आणि बिचकून झाडात लपलेले दोन उंचपुरे धिप्पाड नीलगाय नर, चमचमणार्‍या सोनेरी कातडीचे काळवीट, काही वानरं एवढा लाभ झाला. पुढे दोनच दिवसांनी इथे पोचलेल्या सचिन तेंडुलकरला बच्चे धरून ४ वाघ दिसले म्हणे.



रात्री मुक्काम- नागपूर-वायुसेना नगर इंद्राणीकडे. आखीवरेखीव रस्ते , ऐसपैस क्वार्टर्सची शिस्तबद्ध रचना. छोटे गावच जणू. तिने अगत्याने केलेली निवांत सोय.उशीरापर्यंत गप्पा. झकास ब्रंच करून पेंचला रवाना. दही संपवा अमुक संपवा मंजि जवळपास मिनी किचन घेऊन आली होती. 

आता मुक्काम -पेंच -पलाश रेसॉर्ट. ’जी’ एवढाच शब्द बोलणारा साधासुधा उत्तर भारतीय कुक आणि सेवेला तत्पर तिथल्याच खेड्यातला पोरगेलासा चुणचुणीत तरूण. व्हरांड्यात बसून कॉफीपान, रेसॉर्टची पाहणी, पुन्हा गप्पा. मागच्या स्विमिंग पूलमध्ये यथेच्छ डुंबून झाल्यावर स्थानिक खेडेगावात परतणार्‍या गुरांच्या कळपांना चुकवत अंधार पडेतो भटकंती. आल्यावर डेरेदार झाडाखाली पैज (पैसे नव्हे) लावून पत्ते, चहापान.मीनलचे मुठिये. कुकने तयार ठेवलेले गरमागरम जेवण. तव्यावरून पानात पडणारे गरगरीत फुलके. और क्या चाहिए !

पहाटेची सफारी ठरवल्याने सकाळच्या चहाबरोबर पाणी बिस्कीटासहित सफारी बास्केट व्हरांड्यात तयार होती. पहाटे साडे ५ च्या कुडकुडत्या थंडीत स्वत:ला नखशिखांत लपेटून घेऊन खुरसापार गेटला पोचलो. 

सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर जवळपास तीनशे चौरस किलोमीटर पसरलेला हा व्याघ्र प्रकल्प. लगतच्या पेंच नदीच्या नावावरून यालाही पेंच म्हणतात.

रूडयार्ड किपलिंगला जंगल बुक लिहिण्याची प्रेरणा पेंचमधून मिळाली असं म्हणतात. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या या प्रकल्पात हिमालयातल्या सुमारे २१० पक्ष्यांच्या प्रजाती येतात, गिधाडांच्या दुर्मिळ जाती आणि गवेही खूप आढळतात असं ऐकलं होतं. यातलं काय काय दिसतं याची उत्सुकता होती. पक्षीप्रेमी मैत्रिणींना थोडी जास्तच.

दिव्याच्या धुवट प्रकाशात १५-२० जिप्सी रांगेत उभ्या. ५,६ जिप्सीमध्ये उत्सुक चेहर्‍याचे गोरे पर्यटक. सराईतपणे वावरणारे आपसात गोंड भाषेत चटरपटर करणारे स्थानिक चालक आणि गाईडची गर्दी. गाईडमध्ये मुलींची संख्या लक्षणीय. ६ च्या ठोक्याला एकामागोमाग एक जिप्सी सुटल्या. आमची पहिलीच म्हणून आम्ही ऐटीत पण हाय राम ! नंतर कळलं की पहिल्या ५,६ पुढे जाताच मागच्या बर्‍याच जिप्सींना गेटच्या लगतच वाघोबांनी निवांत दर्शन दिलं. जाऊदे! वाघ म्हणजेच जंगल नव्हे, नाही का! आता फटफटायला लागल्याने दात वाजणार्‍या थंडीतही पेंचच्या घनदाट जंगल सफारीचा आनंद वेगळाच होता. 

एका पुलावर पंधरा-वीस मिनीटं गाडी बंद. चालक गाईड खाटखुट करत होते. तेव्हा दर्शन दिलं असतं तर! पाचांवर धारण बसणे म्हणजे काय हे कळलं.

कोवळ्या उन्हात पक्ष्यांच्या चिवचिवाटात सोलर नियंत्रित पाणवठे, हिरव्या रंगाच्या अगणित छटा, अधूनमधून दिसणारे सांबर, रानकुत्रे, मोर, वानरं यांना टिपत ब्रेक पॉइंटला पोचलो. तिथे चहापाणी आटोपून नव्या उमेदीने कूच. 

जिप्सी एकमेकांना क्रॉस होत तेव्हा एकच प्रश्न ’दिखा क्या !’ आणि गोंड भाषेत त्यांची खुसूरपुसूर. शेवटपर्यंत नहीच दिखा पण उंचच उंच झाडांनी वेढलेल्या जंगलाचा विशिष्ट वास, कुठे पाण्याचा नाजूक आवाज, प्राण्यांची चाहूल, त्यांचं ओझरतं दर्शन, डोळे भरून पाहावं की कॅमेर्‍यात टिपून आपल्या पिल्लांना पण दाखवावं याचा गोंधळ, ’त्या’ची प्रतीक्षा, प्राण्यांचे कॉल समजून घेण्याची धडपड, ते सांगणारे गाईड, रोरावत इकडून तिकडे खडबडीत रस्त्यांवरून धावणार्‍या जिप्सी, ’तो’ दिसलेल्यांच्या विजयी आणि न दिसलेल्यांच्या नाराज मुद्रा या नादात मन रोजच्या आयुष्याला विसरून पार जंगलमय झालेलं.

 हा हिरवा अनुभव आणि सोबतीने सफारीचा अपवाद वगळता अखंड गप्पांसह केलेली धमाल केवळ अविस्मरणीय. 









Wednesday, February 1, 2023

साहित्य संमेलन आणि तरूणाई

वर्धा येथे होत असलेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रश्नसंच तयार करून मी काही स्थानिक, काही परिचयातील ,काही समाजमाध्यमातून ओळख झालेल्या तरुण तरूणींशी संवाद साधला. 

कला-वाणिज्य पदवी, एलएलबी, अभियांत्रिकी इ. शाखांचे हे विद्यार्थी आहेत. काही स्पर्धा परिक्षा देणारे, काही नोकरी करणारे आहेत. 

काही जणांना कसले तरी संमेलन वर्ध्याला होते आहे हे माहित होते तर काहींना याचा पत्ता नव्हता. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना या संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर आहेत  हे माहित होते तसेच त्यांच्याविषयी माहिती होती. एकदोघांना वर्धा संमेलनात पुस्तकांच्या स्टॉल्सला भेट द्यायची होती. एका यूट्यूबरने’तिथे व्हिडिओ करू दिला तर मी जाईन’, असे उत्तर दिले.

एकीने सांगितले, " मला एकदा कवीकट्ट्यावर संधी मिळाली होती. त्यात कवींची इतकी गर्दी होती की माझा नंबर कधी येईल या गडबडीत मी  इतर कार्यक्रम पाहू शकले नाही. "

एकाने त्याच्या गावातील संमेलनात एक कार्यशाळा केल्याची आठवण सांगितली. परिसंवादांबाबत बहुतेकांना फारशी माहिती किंवा रस नव्हता. 


यंदाचे संमेलन अगोदरच झाले असून त्याचे अध्यक्ष  नागराज मंजुळे होते व त्यात त्यांनी भाषेच्या शुद्धतेविषयी काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचे एक जण म्हणाला. 

मंजुळ्यांचे ते वक्तव्य संमेलनातले नसून ‘मुंबई टाइम्स कार्निव्हल’ मधले होते असे मी सांगितले. 

एकीने विचारले ,"गेल्या महिन्यात मुंबईला झालं ते काय होतं मग?" ’ते राज्य सरकारने आयोजित केलेले ’विश्व मराठी संमेलन’ होते असे मी सांगितले. 

"मग वर्ध्याचे आयोजक कोण आहेत ?" यावर मी ’अखिल भारतीय साहित्य महामंडळ’ असे सांगितले. 

यावर काही जणांनी ’अशी एकूण किती संमेलने असतात’ असे विचारले.  

’विद्रोही संमेलने असतात. जाती धर्मनिहाय असतात. बाल, कुमार, युवा, शिक्षक, कामगार आणि स्त्रियांचीही असतात. बोलीभाषांची असतात. वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या स्तरावर अशी संमेलने आयोजित करत असतात. अ.भा.साहित्य महामंडळ ही महाराष्ट्रातील चार प्रादेशिक संस्थांची शिखरसंस्था आहे म्हणून या संस्थेच्या संमेलनाची अधिक चर्चा असते’, असे मी सांगितले.

प्रश्नसंच त्यांनी तयार केला असून उत्तरे मी देते आहे असे या संवादाचे स्वरूप उलट झाले होते.

हे तरूण समस्त मराठी युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करतात असा माझा दावा नाही पण त्यांच्या प्रतिक्रिया चिंतनीय आहेत. प्रस्थापित साहित्य संमेलनांविषयी युवा पिढीला अनास्था वाटते,  हे सत्य त्यांच्या संमेलनातील जेमतेम उपस्थितीवरून सहज लक्षात येईल. संमेलने बहु झाली या स्थितीमुळे ते गोंधळले आहेत. या वेगळ्या चुली नसून हे साहित्याचेच उपप्रवाह आहेत, हे त्यांना समजावून सांगण्याचे आव्हान आणि जबाबदारी त्या त्या आयोजकांची आहे.  

तरूणांचा वरचा वर्ग इंग्लीश बेस्ट सेलर्स, गॉसिप मासिकं वाचतो. ती ही किंडलवर. संमेलन वगैरे त्यांच्या गावीही नाही. मध्यमवर्गी तरूण समाज माध्यमावर काय ते वाचतात, बघतात. वेब मालिका पाहतात. करियरचं दडपण त्यांना वाचनाकडे गांभीर्याने पाहू देत नाही. निमशहरी किंवा खेडेगावात पदवी घेत असलेल्यांना दर्जेदार शिक्षणाअभावी किंवा आर्थिक तणावामुळे सकस साहित्याची गोडी लागत नाही. लागली तरी पदरमोड करून संमेलनास जाणे त्यांना परवडत नाही.  

मग साहित्य संमेलनाला जाणारे लोक नेमके कोण असतात? 

पन्नाशीला पोचल्यावर स्थैर्य आलेले किंवा निवृत्त मध्यमवर्गीय पुस्तकप्रेमी, भाषाविषयाचे स्वयंसेवक विद्यार्थी, प्राध्यापक, समाज माध्यमावर लाईक मिळू लागल्याने आपल्या कविता, लेखनावर संमेलनाच्या मान्यतेची मोहोर लागावी अशी आकांक्षा असलेली मंडळी, उपस्थिती अनिवार्य असलेले आयोजक संस्थेशी संबंधित लोक, स्वागताध्यक्षांचे निकटवर्तीय आणि प्रतिकूल स्थितीतही साहित्यविश्वाच्या संपर्कात असलेले मूठभर तरूण. 

तरूणांशी बोलल्यावर जाणवले की साहित्य संमेलने युवकांना आपली वाटावी व सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रस्थापितांच्या विचार पद्धतीत बदल होणे आवश्यक आहे.

पहिला बदल म्हणजे कागदावर छापून येते तेच साहित्य नसते हे स्वीकारायला हवे. साहित्य म्हणजे भोवताल टिपणे. त्याचे स्वरूप छापील पुस्तकांव्यतिरीक्त  स्कीट्स, विविध सादरीकरणांची संहिता, समाज माध्यमावरील लेखन, ब्लॉग्ज, व्ही-लॉग्ज, मुलाखती किंवा मीम असेही असू शकते. 

चांगल्या साहित्यनिर्मितीसाठी संमेलनांतर्गत आयोजित पटकथा, गीत-गजल-ब्लॉग लेखन, डिजिटल पब्लीकेशन यासारख्या कार्यशाळांना अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रचारावर भर द्यावा.  संमेलनातील निरर्थक वादांपेक्षा वृत्तपतत्रातून या विषयीच्या बातम्या प्राधान्याने याव्यात. 

अगम्य विषयावरील परिसंवादात, हितसंबंध जपण्यासाठी अनेक वक्त्यांची वर्णी लावून श्रोत्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जातो. अपवाद वगळता निवडीला गुणवत्तेचा निकष आहे की नाही अशी शंका यावी असे सुमार वक्ते, रटाळ कवी रसिकांच्या वेळेचा अपव्यय करताना दिसतात. यावर अंकुश यावा.

संमेलनपूर्व राजकीय कलगीतुरे हे देखील तरूणांनी संमेलनांकडे पाठ फिरवण्याचे मह्त्वाचे कारण आहे. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित आणि साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आता मागे घेतला असला तरी त्यांनी राजकीय हस्तक्षेपाविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त केली होती. संमेलनासाठी निर्धारित सरकारी निधी वाढावा म्हणजे संमेलनाला राजकीय नेत्यांच्या अधीन राहावे लागणार नाही. राजकीय सहकार्य अवश्य असावे पण राजकीय विश्लेषक नसलेल्या साहित्यिकांनी व्यासपीठाचा वापर आपल्या राजकीय भूमिकेच्या प्रदर्शनासाठी करू नये. राजकीय हेव्यादाव्यांचा वीट आलेल्या तरूणाईला इथेही फक्त तेच ऐकवायचे असेल तर त्यांनी संमेलनाला का यावे ! 

या तरूणांशी बोलताना लक्षात आले की त्यांच्या विरोधातील आधीच निष्कर्ष ठरवलेले तथ्यहीन विषय संमेलनातील परिसंवादासाठी घेतले तर त्यांना ते आवडणार नाहीत. उदा:  समाजमाध्यमांचे नकारात्मक परिणाम वगैरे. त्यांचे म्हणणे, आम्हाला मोबाईलच्या अतिवापरावरून उपदेश करणारी मधली पिढी स्वत:च व्हॉट्सअ‍ॅपच्या आहारी गेली आहे तेव्हा त्यांनी दुटप्पी वागू नये. आमची पिढी ऐकणारी आणि (व्हिडीओ, रील्स) बघणारी पिढी आहे. वाचन म्हणजे हातात पुस्तक घेऊन वाचणे एवढेच नव्हे. जग पॉडकास्ट किंवा ऑडियोबुक्स आणि चॅट-जीपीटीपर्यंत पोचले असताना बहुसंख्य संमेलनांचे आयोजक एक तर ’स्वामी- मृत्युंजय, पुलं-वपु” मध्ये किंवा दुसरीकडे नकारात्मकतेत व अभिजन-बहुजन वादात अडकून पडलेले दिसतात. 

याचे प्रतिबिंब समाजमाध्यमावरही पडत असले तरी लोकल ते ग्लोबल असा त्याचा प्रचंड आवाका आहे. माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात समाजमाध्यमाची भूमिका महत्त्वाची आहे. तिथे अनेक लेखनविषयक स्पर्धा होत असतात. तरूणांचे साहित्य कट्टे फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप वर आहेत. कला प्रदर्शनाचे कट्टे इन्स्टाग्राम व यूट्यूबवर आहेत. अधिक गंभीर चर्चा रेडीट व कोरावर घडत आहेत. इथे सुमार लिहिणारे अनेक असतील पण बोलीभाषेत उत्तम लिहिणारे निमशहरी लेखक इथे आहेत तसेच प्रमाण भाषेत सकस लिहीणारे शहरी तरूणही. त्यांची ताकद, त्यांची प्रतिमा त्यांना आलेल्या संमेलनाच्या आमंत्रणावर ठरत नसून त्यांची लेखणी ठरवते. इथे थेट प्रतिसाद मिळतो तशी टीकाही झेलावी लागते. संमेलनांनी आपल्या कक्षा रूंदावून या सार्‍याला सामावून घेतले तर तरूणांचाही संमेलनांकडे ओढा वाढेल. 

लोकशाही व्यवस्था बदलण्याचे आणि विचाराची पोच अमर्यादित स्तरावर नेण्याचे सामर्थ्य या माध्यमात असल्याने यावरील चांगल्या लेखनाला साहित्याचा दर्जा दिला जावा अन्यथा नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या ताज्या टवटवीत सोशल मिडिया संमेलनांनाच काय ते भवितव्य उरेल व जुन्या पठडीतली संमेलने कालबाह्य ठरतील. 

वर्धा संमेलनातील कार्यक्रम बघता यातील बहुतेक अपेक्षांना न्याय देण्याचा आयोजकांनी मनापासून प्रयत्न केलेला दिसतो आहे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर संमेलनात पहिल्यांदा चर्चा घडते आहे. मुद्रित माध्यमांच्या संपादकांनी समाजमाध्यमाबद्दल बोलणे, लेखकांनी थेट व्यक्त होणे, मुक्तसंवाद, परिसंवादात वंचित समाजाच्या साहित्यापासून ललितेतर साहित्यापर्यंत व प्रबोधन परंपरेपासून अनुवाद व स्त्री-पुरुष तुलनेपर्यंतचे  वैविध्य हे संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. चांगल्या साहित्यविषयक चळवळी हे समाजाच्या जिवंतपणाचेच नव्हे तर सक्रियतेचे लक्षण आहे. अशा उपक्रमांमधून समाजातले साचलेपण दूर होते. वैचारिक जळमटे दूर होऊन नव्या विचारांची वाट मोकळी होते. दक्षिण भारतीय , हिंदी व बंगाली साहित्यवर्तुळात हे घडताना दिसते आहे.

मराठी साहित्यक्षेत्रात देखील कोणत्याही संमेलनाचे मंडप काढल्यानंतर पुरस्कारांचा मोह, वैयक्तिक महत्वाकांक्षा, उत्सवप्रियता, लागेबांधे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन जागल्याचं काम करणारे साहित्यिक आणि रसिकांचे निखळ साहित्यप्रेम तळाशी उरायला हवे. जागतिक बदलांचे वारे इथवर पोचायला हवे तरच तरुणांना साहित्य संमेलने हवीशी वाटतील आणि आणि ती त्यांच्यासाठी दिशादर्शक ठरतील.

https://www.evivek.com/Encyc/2023/2/1/Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan-2023-and-youth.html?fbclid=IwAR15eOevuHKKYhrIyOtn04ZlhwM6qyrhDorFmn9-VUHyg8MxvM4pIP8kNag

साप्ताहिक विवेक - साहित्य संमेलन विशेष अंकातील ’युवाकट्टा’ या सदरातील लेख