Monday, November 21, 2022

ज्यूस

 

’ज्यूस’ हा २०१७ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झालेला फिल्मफेअर विजेता लघुपट तुम्ही पाहिला आहे का! 

एका मध्यमवर्गीय स्त्रीची तेरा मिनीटात सांगितलेली ही अंतर्मुख करणारी कथा आहे. एका संध्याकाळी एका घरी मित्रपरिवार सहकुटुंब जमलेला आहे. सगळे पुरुष मित्र बाहेरच्या खोलीत कुलर लावून ड्रिंक्स घेत, स्टार्टर्स खात, गप्पा मारत ऐसपैस बसले आहेत. मुलं बेडरुममध्ये खेळत आहेत.आहेत. मित्रांच्या बायका मंजू (शेफाली छाया) म्हणजेच यजमानीण बाईला हातभार लावायला म्हणून तिच्या काहीशा कोंदट स्वयंपाकघरात जमल्या आहेत. कामाच्या धांदलीमुळे, गॅसवर सतत पदार्थ शिजत असल्यामुळे आणि ४,५ बायकांची गर्दी झाल्याने आत प्रचंड उकडते आहे.

काम सुसह्य व्हावे म्हणून मंजूने माळ्यावरून काढलेला टेबलफॅन जेमतेम सुरु होऊन बंद पडला आहे. बायका हवालदिल झाल्या आहेत. मंजू बाहेर येऊन "पंखा सुरू होत नाहीये, जरा बघता का" असं नवर्‍याला हलक्या आवाजात सांगते. तो ’हो’ म्हणून पुन्हा गप्पांमध्ये दंग होतो. यांच्या गप्पांचे विषय म्हणजे ऑफीसमधल्या सह्कारी महिलेबद्द्ल गॉसीप, पाचकळ विनोद, आंतरराष्ट्रीय राजकारणाची आपल्याला खूप समज असल्याचे भासवणार्‍या चर्चा तर आत बायकांचे गप्पांचे विषय म्हणजे घर, स्वयंपाक, मूल झाल्यावर नोकरी सोडणे योग्य आहे की नाही वगैरे. विषयांमधला फरक नोंद घेण्यासारखा आहे.

इकडे आतला उकाडा वाढत चालला आहे. स्वैपाक होत आल्यावर यातली एक बाई बेडरूममध्ये डोकावून आपल्या लहान मुलीला "आता खेळ पुरे, आधी तुझ्या भावांना वाढ" असं जरबेच्या आवाजात सांगते. हे ऐकून मंजूच्या डोक्यात तिडिक गेलेली आहे. बाहेरून नवर्‍याच्या "मंजू, आता जेवायचं बघ जरा" अशा हाका सुरु आहेत. आतल्या बायकांपैकी एक तरुण बाई गर्भवती आहे. तिने नोकरी सोडली नाही तर तिच्या बाळाकडे कोण बघणार हा विषय सुरु आहे. आपण नाही का मुलांसाठी नोकरी सोडली, असं एक बाई म्हणताच मंजू उद्वेगाने विचारते, "जे आपण केलं ते हिनेही केलंच पाहिजे का?" मंजू पुढे उपहासाने म्हणते " अर्थात डायपर तर आईनेच बदलला पाहिजे, वडील हातातला रिमोट सोडून ते काम कसे करतील!" 


हा तिचा तिसरा आणि शेवटचा संवाद आहे. बाकी सगळं तिची नजर बोलते. आधी थंड, मग असहाय्य, मग क्रुद्ध. आता तिला हे सगळं असह्य झालेलं आहे. ही एक घटना नव्हे, पुरुषसत्ताक पद्धतीत घुसमटलेलं अवघं जगणंच. मंजू खाटकन गॅस बंद करते. फ्रीजमधला ज्यूसचा जार घेऊन बाहेर येते. कुलरच्या झोतात एका खुर्चीवर पुरुषांमध्ये येऊन बसते. तिच्या अचानक येण्याने ते अस्वस्थ झाले आहेत. नवरा आश्चर्याने व काहीशा रागाने तिच्याकडे बघतो आहे. ग्लासमध्ये ज्यूस ओतून भरल्या डोळ्यांनी एक तीव्र आणि अर्थपूर्ण कटाक्ष ती नवर्‍याकडे टाकते आणि डोळे मिटून जगाची पर्वा न करता शांतपणे थंडगार ज्यूसचा एक एक घोट घेऊ लागते. इथे लघुपट संपतो. मंजू भांडत नाही, ओरडत नाही, कुणाला काहीही ऐकवत नाही. तिला काय म्हणायचं आहे हे तिच्या नजरेवरुन नवर्‍याला कळतंच पण आपल्यालाही त्या मूक स्फोटामागची धग, तडफड आतपर्यंत जाणवते. 

हा लघुपट फक्त स्क्रीनवर नाही तर थोड्या फार फरकाने बहुसंख्य मध्यमवर्गीय घरात घडत असतो. आर्थिक स्थितीनुसार जागा, सोयी कमी जास्त असतात पण आत बायका राबतायत आणि पुरुष एकत्रीकरणाचा आनंद घेत आहेत हे चित्र सर्वत्र दिसते. अर्थात याला अपवाद असू शकतात आणि यावर आक्षेपही. 

शहरी सुशिक्षित घरातल्या  लहान कुटुंबात हल्ली पुरुष मदत करताना दिसतात, काही पुरुष भाजी, किराणा, खाद्यपदार्थ किंवा आवश्यक वस्तू आणून देणे किंवा ऑनलाईन मागवणे या स्वरुपाची मदत करताना दिसतात. क्वचित एखादा विशेष पदार्थ करतात. बायकोला यापेक्षा जास्त मदत केली तर लोक नावं ठेवतीला अशी भीती काही पुरुषांना वाटते. न पेक्षा या सकारात्मक बदलाचं निश्चितच स्वागत करायला हवं परंतु माझा नवरा, भाऊ किंवा वडील मदत करतात म्हणजे आता सगळंच बदललं आहे असा निष्कर्ष काढणं बालीशपणाचं ठरेल. 

मुळात ’मदत’ या शब्दातच गोम आहे. आपण एखाद्याला मदत करतो म्हणजे ते काम ज्याचे आहे त्याचा भार हलका करतो. इथे आपली भूमिका संपते. परंतु त्या कामाची जबाबदारी त्या व्यक्तीवरच असते. जोवर जबाबदारीचा निम्मा वाटा उचलला जात नाही तोवर त्याला न्याय्य श्रमविभागणी म्हणता येणार नाही. 

मुख्य आक्षेप हा असतो की पुरुषांनाही बाहेर राबावंच लागतं न! त्यांना पण त्यांचं काम करताना कंटाळा, थकवा येत नसेल का! नक्कीच, परंतु ते काम कधीतरी संपवून ’ज्यूस’ मध्ये दाखवलंय तसं स्वत:च्या अवकाशात, आवडीनुसार वेळ घालवण्याची संधी त्यांना परंपरेने उपलब्ध करुन दिली आहे. निम्न व मध्यमवर्गीय स्त्रियांना मात्र अव्याहत चालणार्‍या कामातून उसंत मिळत नाही. त्यांच्या कामाला सुट्टी अशी नाहीच. सगळी कामे इतरांवर ढकलून स्वत: काहीही न करणार्‍या आयतोबा स्त्रियाही असतात. पण त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मध्यमवर्गात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांना त्याचा उपयोग कमावण्यासाठी, स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी करावासा वाटतो. त्यासाठी सासरचे ’परवानगी’ तर देतात पण तळाशी बारीक अक्षरात ’अटी लागू’ लिहिलेलं असतं. "तू ’घर सांभाळून’ हवं ते कर, तुला सगळं स्वातंत्र्य ’दिलं’ आहे" असं अजब औंदार्य त्यात असतं. या दडपणामुळे सवड काढून त्या कुठे गेल्याच तर राहिलेली कामं त्यांच्या डोळयासमोर नाचू लागतात. थोडक्यात हे तुझंच काम म्हणून लादलं जातं, ते करण्यावाचून पर्याय नसतो, त्यात एकसुरीपणा येतो तेव्हा घर व नोकरी/व्यवसाय अशी दुहेरी कसरत करणार्‍या बायकांबरोबर गृहिणींनाही त्याचा प्रचंड वैताग येऊ शकतो. 

याउलट घरकाम, स्वैपाक हे बाईचंच काम असल्याचं पुरुषांबरोबरच कित्येक बायकांच्याही मनात इतकं खोलवर रुजलेलं आहे की त्यांनी ’राबणं’ हे आपलं प्राक्तन म्हणून स्वीकारलेलं असतं. खेड्यात नवर्‍याच्या बरोबरीने शेतात काम करून दमून आलेली स्त्री घरी परतल्यावर लगबगीने भाकरी थापायला घेते. ऑफीसमधून येताना भाजी ,वस्तू घेत थकून आलेली मध्यमवर्गीय स्त्री  कुकर लावायला घेते एवढाच काय तो फरक. तिच्या दिमतीला मिक्सर, मायक्रोवेव्ह सारख्या सुविधा आल्याने ’तिला असतंच काय काम! ’ असा अनेकांचा ग्रह असतो. गृहिणी असेल तर मग तिच्याकडे काय, वेळच वेळ असतो असा सार्वत्रिक समज असतो. प्रत्यक्ष कामाच्या श्रमापेक्षाही अशा पद्धतीने गृहित धरण्याचा तिला अधिक त्रास होतो. कधीतरी तिचा ’मंजू’चा झाला तसा उद्रेक होतो. त्याचे दूरगामी परिणाम मुलांवर, घरावर, नातेसंबंधांवर आणि अखेर समाजावर होताना दिसू लागले आहेत. 

नुकतेच गौरी-गणपती पार पडले. एक मध्यमवयीन मैत्रिण म्हणाली ,"माझ्याच्याने आता ही दगदग सहन होत नाही पण घरी इतक्या वर्षांची प्रथा आहे ती मोडणं मनाला बरं वाटत नाही. इतर नातलग बायका ’मदत’  करतात, तरीही सगळी तयारी करणं, इतक्या जणांची सोय करणं, नैवेद्यासह सगळं यथासांग पार पांडणं याने मी इतकी थकून जाते की मला वैद्यकीय उपचार घ्यायची वेळ येते. त्यामुळे सणवार जवळ आले की माझ्या पोटात खड्डाच पडतो." काही सुपरवुमन व्हायच्या आकांक्षेने पछाडलेल्या स्त्रियांचा अपवाद वगळला तर हे प्रातिनिधीक चित्र म्हणता येईल. सुजाण स्त्रिया यावर जमतील तसे उपाय शोधतात. अनावश्यक कर्मकांडाला परिस्थितीनुसार फाटा देतात, काही गोष्टी विकत आणण्यात कमीपणा मानत नाहीत. एखादी गोष्ट राहिली, पर्फेक्ट झाली नाही तरी त्रास करून घेत नाहीत, आपल्यावाचून घराचं अडत नाही याची खंत न करता मुलांना स्वावलंबी बनवतात. पण अशा स्त्रियांचे प्रमाण समाजात अद्याप कमी आहे. शिवाय त्यांना बेजबाबदार, आळशी वगैरे विशेषणं स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. 

बहुतेक पुरुष मात्र यावर उपाय शोधण्याऐवजी ’तू दुर्गा तू अन्नपूर्णा, तू अमुक ..... तुला वंदन’ असे मढवलेले मेसेज सोशल मिडीयावर पाठवले की आपण स्त्रियांना आणि त्यांच्या कष्टांना पुरेसा आदर दर्शवला आहे असे मानून निश्चिंत होतात. (काही भाबड्या बायका पण खूष होतात आणि आणखी चार डबे घासायला काढतात.) 

हे कमी की काय म्हणून परवा एक मेसेजमध्ये वाचलं ’जाहिरातीत दागिने ल्यालेल्या, हसर्‍या, सुंदर स्त्रिया दाखवतात पण घरात दिवाळीची साफसफाई, फराळाची तयारी करताना घामेजलेली, केस विस्कटलेली स्त्री कुणीच दाखवत नाही’. इथपर्यंत तो मेसेज स्त्रियांच्या श्रमाकडे लक्ष वेधतोय असं वाटलं. पुढे लिहिलं होतं "नकोय त्यांना तुमची मदत, फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. एखादं ग्रिटींग, चॉकलेट त्यांच्यासाठी राखून ठेवा मग बघा दिवाळी कशी झक्कास जाते ते". 

धन्य आहे! तुम्ही कोण ठरवणारे की यांना मदत नकोय. नुसत्या शाब्दिक जाणीवेचं काय लोणचं घालणार! या ग्रिटींग, चॉकलेटच्या कौतुकाने बाईचा थकवा गायब होणार आहे का! आवडीनुसार काही वेगळं करायला तिला सवड मिळणार आहे का! निम्मी जबाबदारी घ्यायला हवी खरं तर तुम्ही. घरी केलेलेच लाडू आवडतात तर एकदा स्वत: अर्धा तास गॅसपाशी उभं राहून तूप सुटेस्तो पीठ भाजून पाहा. कामं ,फराळ करून दमलेल्या बायकांना त्या रात्रीचा स्वैपाक करून गरम, आयतं जेवायला वाढा. एका खोलीची पूर्ण सफाई करा. ती असेल खरी जाणीव. सुरुवात तर करा. (जे करतात त्या मूठभर मंडळींनी यातून स्वत:ला वगळावं) 

घरोघरच्या मंजूंना व्हॉट्सअ‍ॅपवरचे हारतुरे, कौतुकाचे भारे नको आहेत. प्रत्यक्ष साथ हवी आहे. कृतीतून सन्मान हवा आहे. घर सगळ्यांचं असेल तर कामंही सगळ्यांची असायला हवी इतका हा सोपा नियम आहे. आपली आवड, कौशल्य, वेळ, गरज याचा समन्वय साधून कामं वाटून घेतली तर घराघरातल्या मंजूलाही बाहेरच्या खोलीतल्या जगाकडे उघडणार्‍या खिडकीत बसून गप्पा मारता येतील. सर्वांबरोबर बसून 'ज्यूस' किंवा फराळाचा आस्वाद घेता येईल. अशी समाधानी मंजू जाहिरातीतल्या स्त्रीपेक्षा सुंदर दिसेल. 

published in Madhurima Divya Marathi November 2022

Saturday, November 12, 2022

पूर्ण स्वयंपाक मुलांनी करायचा

 

1st Attempt

होस्टेलमधून घरी आल्यावर प्रत्येक सुट्टी (अगदी प्रिपरेशन लीव्ह असली तरीही) संपायच्या आत एक दिवस (निदान) एक वेळचा #पूर्णस्वयंपाकमुलांनी_करायचा असा मी फतवा काढला. "ए जा बॉ आई, तू फारच सिरियसली घेतेस प्रत्येक गोष्ट. आम्ही जनरल हो म्हणालो होतो." म्हणत त्यांनी यंदाही कुरकूर केली. "ते जनरल बिनरल मला काही माहित नाही, उद्या सकाळी पोळ्यांच्या मावशी अनायासे येणार नाहीयेत तर उद्याचा सकाळचा स्वयंपाक तुम्ही करायचा आहे. शिवाय नुसती बटाट्याची भाजी आणि वरण भात चालणार नाही. ते करून झालंय मागच्या वेळेला. "असं मी ठणकावलं."पुढच्या सुट्टीत करू नं! परवा पावभाजीला सगळं मीच तर चिरुन दिलं होतं", "आणि बिर्याणी केलीस तेव्हा मी सगळी मदत केली होती त्याचं काय! हे पूर्ण स्वयंपाक करायचं काय काढलंय" वगैरे निषेधाचे सूर सुरु झाले होते.  

मग त्यांना सांगितलं की आपण मदत करण्याविषयी बोलत नसून संपूर्ण स्वयंपाक करण्याबद्दल बोलतोय. अगदी मेनू ठरवण्यापासून ते मागचं आवरण्यापर्यंत सगळं तुम्ही करायचं आहे. "अगं पण आता यू ट्यूबवर पाहून करता येतं सगळं वेळ आली तर""ते एडिटेड असतं, बारीक बारीक गोष्टी स्वत: केल्याशिवाय कळत नाहीत, यावर आता चर्चा बंद म्हणजे बंद"

आता ही बाई ऐकतच नाही हे पाहून त्यांनी बाबा, आजी, आजोबांचा आधार घेऊन पाहिला. त्या त्रयीने माझ्याकडे अलका कुबल टाईपचा भावपूर्ण कटाक्ष टाकला पण मी दुष्ट बाई होत म्हटलं ," इतकी हृदयात कालवाकालव होण्याइतकं स्वयंपाक करायला लावण्यात काहीही गंभीर नाहीये. आज मी तिकडे पाऊलही टाकणार नाहीये, हां, फक्त कन्सल्टन्ट म्हणून त्यांना मी उपलब्ध आहे"

इलाजच नाही म्हटल्यावर मुलांनी फ्रीजमध्ये डोकावून पाहिलं असावं. 

"यात फक्त तोंडली आहेत आपल्याला करणेबल"

" मॅड त्याला दोडकं म्हणतात" वगैरे तारे आपसात तोडले गेले. अखेर ’तोंडलं व दोडकं दोन्ही नसलेल्या गिलक्याची भाजी, पोळी, बीटाची कोशिंबीर, आमटी आणि भात’ असा त्यांचा मेनू ठरला. 

मी जवळच्या खोलीत जाऊन लॅपटॉप घेऊन एकीकडे कानोसा घेत कामाला सुरुवात केली. 

जगातली आय मीन घरातली बहुतेक भांडी ओट्यावर आली. टडाम टुडूम आवाज येत होते. अस्वस्थ होऊन आजी एक चक्कर मारून गेल्या असाव्यात कारण  मुलांनी बाणेदारपणे आजीला "आज्जी इकडे येऊ नकोस बरं" म्हणून बजावल्याचं ऐकलं. एक गिलकं चिरून मला अप्रूव्हलसाठी दाखवण्यात आलं.  माणशी २ पोळ्या धरल्या तर किती कणिक लागेल याची विचारणा झाली.  प्रत्येकी ३ पोळ्या करणं कंपलसरी केलं होतं. जरा दया आल्याने "बाकीच्या मी करीन" असा मी दिलासा दिला पण त्याला स्पष्ट नकार मिळाला.

 फोडणीसाठी गॅसवर ठेवलेलं तेल तापत आलं तरी भाजीला योग्य चमचा सापडत नसावा. "तापलं  तापलं, आता त्या बटाट्याच्या भाजीच्या सीक्वेन्सनेच सगळं टाकू का, आई, लवकर सांग हे फुटतंय" -लेक ओरडला." त्याला तडतडणं म्हणतात, आधी गॅस कमी कर , मोहरी जळेल"- बाहेर येत मी.

साधारण या चालीवर भाजी झाली. यात दाण्याचं कूट, डाळी काय काय घालता येऊ शकतं, त्याने चवीत काय फरक पडतो याची, दाल फ्राय येत असल्याने त्यात आणि आमटीत काय फरक असतो याचीही चर्चा झाली.कुकर आधी लावला असता तर एकीकडे भाजी आणि दुसरीकडे आमटी टाकता आली असती , कणिक मुरली असती अशी त्यांची ट्यूब पेटली. 

पहिल्या पोळीचा खाकरा झाला, दुसर्‍या पोळीने तवा सोडायला नकार दिला, तिसरी बरी झाली. चौथी फुगली याचा आनंद उड्या मारून साजरा करण्यात आला तेव्हा बाजूला भाजी शिजतेय तिकडे अधूनमधून पाहायचे असते याची मी ओरडून आठवण केली. भांड्यांच्या ढिगात चिमटा अदृश्य झाल्याने ’आई झाकण कसं काढू , झाकण लावतातच कशाला" प्रश्न आले. कपड्याने झाकण उचलताना हातावर थोडी वाफ आली म्हणून स्वत:भोवती गिरकी घेऊन एकाचा हाई हुई करत झुंबा करून झाला. हाताला लागू न देता बीट किसण्याचे प्रात्यक्षिक झाले. कोणत्या कोशिंबिरीत काय काय घालायचं यावर चाललेल्या बडबडीचे, मध्येच एकमेकांवर डाफरण्याचे , खी खी करण्याचे, झाकण, वाट्या टणटणत खाली पडण्याचे आवाज ऐकू येत होते. कोणत्या पदार्थासाठी कुकरच्या किती शिट्ट्या आणि नंतर गॅस बारीक करायचा का, असा मी बसलेल्या खोलीत डोकावून प्रश्न विचारण्यात आला. यावरची वैज्ञानिक खडाजंगी फेसबुकवर वाचा सांगितलं तर ’बरंय इन्स्टावर असलं काही नसतं’ असं उत्तर आलं.  

"ओट्यावरचा राडा आवरला का , ओला कचरा बिनमध्ये टाकला का"-यावर काहीच उत्तर आलं नाही.  

"चला लवकर सगळे, बनलं जेवण"  मुलांनी ऐटीत घोषणा केली.

"त्याला ’स्वयंपाक झाला किंवा केला’ असं म्हणतात. मग हे पदार्थ आपण खाल्ले की त्याला ’जेवण झालं’ असं म्हणतात"

 "बरं आता ग्रामर नको बॉ आई, कसा झालाय ’स्व  यं  पा  क’ ते सांग"

व्याकरण, स्वयंपाकाशी जुळलेली कितीतरी क्रियापदं- शब्द, पदार्थांची नावं, भाज्या डाळी ओळखता येणं, किती प्रमाण घ्यायचं त्याचा अंदाज येणं, केलेलं नीट वाढता येणं हे सगळं ते कधीतरी शिकतील, न शिकतील, पण त्याचा त्यांना आनंद घेता यायला हवा. नाही घ्यावासा वाटला तरी स्वयंपाक म्हणजे खायचं काम नाही हे तरी कळावं. मध्ये मी त्यांना एक व्हिडिओ फॉरवर्ड केला . भाकरी करून द्यायला आई-बाप जवळ नाही म्हणून शाळा सोडायची वेळ आलेली उसतोडणी कामगारांची मुलं होती त्यात. त्या लहानग्यांना भाकरी शिकवतानाचा व्हिडिओ पाहून भरून आलं. प्रत्येकाला आपल्यापुरती तरी भाकरी थापता आली पाहिजे हे खरंय. 

स्वयंपाक खरंच चांगला झाला होता. बाबा आणि आजी आजोबांनी अगदी बोटं चाटत प्र चं ड आणि मी थोडंफार कौतुक केलं. "संध्याकाळी तुम्ही म्हणाल ते करीन जेवायला" अशी मी रिटर्न गिफ्ट ऑफर केली. मुलांनी जेवताना कॅलेंडरकडे पाहिलं. पुढच्या सुट्टीला किती वेळ आहे ते पाहत असावेत. तेव्हा काय मेनू सांगावा ते विचारीन इकडे  😊

Saturday, October 29, 2022

भविष्यातला सोशल मिडिया कसा असेल ! - व्हाईट स्पेस दिवाळी अंक 2022

सोशल मिडियाचा प्राण म्हणजे लाईक, कॉमेंट, शेअर हे त्रिकूट. कोणी काही म्हणो, इथे लोक जे काय पोस्ट करतात ते स्वान्तसुखाय वगैरे नाही तर लाईक मिळवण्यासाठी, एखाद्या पोस्ट वर मत देतात ते व्यक्त होण्याच्या नैसर्गिक इच्छेतून आणि शेअर करतात ते ’शहाणे करून सोडावे सकळ जन’ या भावनेतून. सोशल मिडियाचा श्वास म्हणजे फोमो (फीअर ऑफ मिसिंग आऊट). पॅट्रीक मॅगगिनीसने हार्वर्ड बिझनेसच्या नियतकालिकात पहिल्यांदा वापरलेला हा शब्द.आपल्या आजूबाजूच्या रंगीबिरंगी अनुभवसृष्टीतून आपण वगळले तर जात नाही आहोत ना, इतरांना माहित आहे आणि आपल्याला नाही असे काही घडले तर नाहीये ना, या चिंतेत आपण इतके गुंतून जातो की सोशल मिडियात सतत डोकावत राहणे ही आपली भावनिक गरज होऊन बसते. भविष्यात तंत्रज्ञानात कितीही क्रांती झाली आणि सोशल मिडिया कितीही बदलला तरी या चौकडीला मरण नाही. मग बदलणार आहे ते नेमके काय हे समजून घेण्याआधी आजचा सोशल मिडिया कुठले तंत्र वापरतो ते जाणून घेऊया.

समजा तुम्ही एखाद्या कॉलेजमधल्या मित्राशी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर बोलत आहात. त्याने त्याच्या कंपनीतल्या एका माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगितले. या माणसाबद्द्ल तुम्ही आज प्रथमच ऐकले आहे. नंतर तुम्ही फेसबुक उघडता तेव्हा या माणसाचे नाव तुम्हाला अचानक ’पीपल यू मे नो’ मध्ये दिसू लागते.

किंवा समजा तुम्ही गोव्याला जाणार्‍या विमान किंवा रेल्वेबद्द्ल इंटरनेवर सर्च केले तर तुम्हाला प्रत्येक सोशल मिडियावर अचानक गोव्यातील हॉटेल्स, सेवा कंपन्या  किंवा गोव्यातील दुकानांच्या जाहिराती दिसू लागतात.

इतकेच काय एखादी गर्भार स्त्री डिपार्ट्मेंटल स्टोअरमध्ये लहान मुलांना लागणार्‍या वस्तूंपाशी जास्त रेंगाळली तर तिच्या सोशल मिडियावर या वस्तूंच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. तिचे हे गुपित तिच्या जवळच्यांना माहित असेल, नसेल पण सोशल मिडियाला कळलेले असते. 

या अद्भुत तंत्रज्ञानाला आर्टीफिशल इंटेलिजन्स असे म्हणतात. 

समजा तुम्ही ट्वीटरवर एखादी कॉमेंट रागीट शब्दात केली तर तुम्हाला तुमच्या फीडमध्ये त्या विषयाच्याच जास्त पोस्ट दिसू लागतात. 

तुम्ही एखाद्याच्या पब्लिक पोस्टवर जाऊन काही मत व्यक्त केले तर त्या व्यक्तीच्या पोस्ट तुम्हाला वरचेवर दिसू लागतात.

दुसर्‍या बाजूला सतत पोस्ट करणार्‍या मित्रांच्या नव्या पोस्ट्स येऊन गेल्याचे तुम्हाला कळतही नाही. मित्र सारखे असले तरी प्रत्येकाला वेगळा कंटेंट पाहावयास मिळतो, तुमचा स्वभाव आणि आवड लक्षात घेऊन तो डिझाइन केलेला असतो.  हे सगळे ज्या तंत्ररचनेमुळे घडते त्याला अल्गोरिदम म्हणतात.  

दोन वर्षांपूर्वी ‘द सोशल डिलेमा’ हा जेफ ओर्लोवस्की दिग्दर्शित केलेला माहितीपटवजा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. कथानकाशिवाय ‘फेसबुक’वरच्या लाईक बटनचे जनक जस्टीन रोसिस्टीन, सेंटर फॉर ह्युमन टेक्नोलॉजी’चे संस्थापक ट्रिस्टन हॅरीस, ‘पिंटरेस्ट’चे माजी अध्यक्ष टीम केंडल वगैरेंच्या मुलाखती त्यात आहेत. आपल्यावर म्हणजेच सोशल मिडीया वापरणार्‍या प्रत्येकावर, वर स्पष्ट केलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदम या दोन गोष्टींचा इतका प्रभाव पडतो की त्यामुळे आपले सोशल मिडियावरचे वागणे, व्यक्त होणे अगदी विचार सुद्धा बदलू शकतात.  ‘दि वॉल स्ट्रीट जर्नल’ने जगातल्या अनेक राजकीय पक्षांप्रमाणेच भारतात फेसबुकचा वापर सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याकडे लक्ष वेधणार्‍या विरोधकांनी स्वत:चेही आयटीसेल तयार केले आहेत आणि ते सक्रीय असतात. आपल्या लाईक्स, कॉमेंट्सवरून  आपला राजकीय कल ओळखून त्यानुसार आपले मन वळवणार्‍या किंवा मनावर पूर्वीचे मत बिंबवणार्‍या  जाहिराती आणि पोस्ट दिसू लागतात. याचा परिणाम थेट निवडणूक निकालावर होताना दिसून येतो इतकी ही प्रणाली प्रभावी आणि तितकीच भीतीदायक आहे. 

सोप्या भाषेत सांगायचे तर आपण सोशल मिडियाच्या हातातले प्यादे आहोत. हे व्हायला नको असेल तर ! तर आपल्याला सोशल मिडिया वापरणे बंद करावे लागेल. ते आता शक्य आहे का ! अर्थातच नाही कारण आपली मनोरंजनाची गरज, नेटवर्किंगची गरज, माहिती मिळवण्याची गरज, आपल्या विचारांना, सेवा व्यवसायाला, उत्पादनाला प्लॅटफॉर्म मिळवण्याची गरज इतकेच काय स्वत:ची प्रतिमानिर्मितीची गरज भागवायची असेल तर सोशल मिडीयाला पर्याय नाही. गंमत म्हणजे आपण इथे वापरले जात आहोत पण आपल्याला यूजर म्हटले जाते. अर्थात द सोशल डिलेमा’ मध्ये म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला ‘यूजर’ म्हणणारे केवळ दोनच व्यवसाय या जगात आहेत आणि ते म्हणजे ‘ड्रग्स व्यवसाय’ आणि ‘सॉफ्टवेअर’. 

---------------- 

या पार्श्वभूमीवर आपले म्हणजे यूजरचे सोशल मिडियाशी नाते ’तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना’ असे आहे. 

हे नाते भविष्यात आपले अधिक शोषण करेल की आपल्या खासगी स्पेसचा मान ठेवेल! सोशल मिडीयाचे स्वरुप आगामी काळात नेमके कसे असेल. कोणे एके काळी प्रचलित असलेले ऑर्कुट आज गायब झाले आहे. यूजर साठी ’फेसबुक आजीवन मोफत असेल’ असा दावा करणार्‍या फेसबुकच्या स्वत:च्या जीवनाचे काय? ते दीर्घकाळ टिकून राहील का ! मोबाईलचा सर्वाधिक वापर लोक सोशल मिडीयाशी जोडलेले राहण्यासाठी करतात मग येत्या काळात यासाठी मोबाईल वापरणे आवश्यक राहील की तंत्रज्ञानात मोठे बदल होतील , वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक कंटेंटकडे सोशल मिडिया कसा बघेल, सोशल मीडियाचे भविष्य कसे असेल, अशा विविध प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून शोधणार आहोत. 

तंत्रज्ञ आणि माध्यमतज्ज्ञांच्या मते आगामी काळात घडणारे मह्त्वाचे बदल कोणते ते पाहूया.

 १.. AR मोठ्या प्रमाणात वापरले जाईल. मुख्य प्रवाहात येईल - 

“एआर म्हणजे ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी आणि व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. ए-आर चे उदाहरण म्हणजे पोकेमॉन-गो सारखे गेम्स. यात कॅमेरा वापरून वास्तव जग कॅप्चर केले जाते व त्याचे डिजिटल रुपांतरण केले जाते. याउलट व्हि-आर मध्ये एक पूर्णपणे नवे आभासी जग तयार केले जाते, हेडसेटच्या मदतीने दृश्यानुसार विशिष्ट आवाजाचा वापर करून ते खरे असल्याचा भास निर्माण केला  जातो.  उदा: हे तंत्र वापरून पायलटला विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.  

गुगल लेन्ससारख्या माध्यमातून आपण एआर आताही अगदी दररोज वापरतो आहोत पण ह्याला ए-आर म्हणतात हे माहित नसते. समजा तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल तर मूळ फोटो किंवा व्हिडिओ रंजक व्हावा म्हणून  काही कृत्रिम गोष्टी किंवा फिल्टर्स त्यात मिसळता म्हणजेच तुम्ही AR वापरता. परंतु सोशल मीडियावरील AR चे ऍप्लिकेशन्स फक्त यापुरतेच मर्यादित राहणार नाहीत. समजा तुम्हाला तुमच्या घरातील एखाद्या खोलीसाठी फर्निचर घ्यायचे आहे तर प्रत्यक्ष खोली कॅमेर्‍यात क्लिक करुन त्यात फर्निचरची वेगवेगळी रचना तुम्हाला दाखवली जाईल. त्यामुळे निवड करणे सोपे होईल आणि तुम्ही ही सोय असलेल्या पोर्ट्लवरून खरेदी कराल. काही अ‍ॅप्स ही सुविधा आताच देऊ लागले आहेत जी येत्या काळात सार्वत्रिक होईल. ए-आर हा आपल्या सोशल मिडियाचा अविभाज्य भाग होईल.

२. वैयक्तिक माहिती जतन करण्याला आणि खासगी निवडीला प्राधान्य मिळेल. सोशल मीडिया आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला वेढून घेईल. 

आपण सध्या थर्मोस्टॅट्स वापरतो. उदा: फिटबिट सारखी फिटनेस टूल्स आपण घड्याळासारखी वापरतो. अशी गॅजेट आपली नाडी बघतात , हृदयाचे ठोके तपासतात, आपण किती वेळ झोपलो ते सांगतात. आपण किती वेळा आणि किती वेगाने धावतो हे Nike च्या बुटांना माहीत असते. ही फक्त सुरुवात आहे. थोड्या डेटाच्या बदल्यात वैयक्तिक माहिती पुढे आपल्याला याहून सहज उपलब्ध असेल. ती ही हव्या त्या वेळी हवी तिथून म्हणजेच हव्या त्या ब्रँडकडून, घड्याळाद्वारे किंवा कॉन्टॅक्ट लेन्सवर देखील मिळू शकेल. त्यासाठी मोबाईलच जवळ हवा अशी गरज राहणार नाही. सोशल मिडीयाचे मास मिडियात रुपांतर होईल. दुसरीकडे आपण जसे एका जीमेल आयडीवरून गुगलच्या अनेक सेवा वापरु शकतो तसे आपल्या एका जागी ठेवलेल्या डाटाला वेगवेगळ्या पद्धतीने हाताळायचे अधिकार भावी सोशल मिडियावर आपल्याला अधिक मिळतील. 

३. यूजरचे मॅपिंग मोठ्या प्रमाणात होईल. 

आपण विविध वेबसाइटवर सर्फिंग करताना ते किती वेळ केले, त्यावर काय पाहिले , किती वेळा पाहिले याची आजही नोंद होते. ब्लॉग किंवा ई-मेल यूजरचे लिंग, वय हे देखील विचारात घेतले जाते. मोठे ऑनलाइन जाहिरातदार यूजरने पाठविलेले मेल स्कॅन करून त्यातील मजकुराच्या अनुषंगाने जाहिराती पाठवतात. या पाठलाग किंवा टेहळणीलाच मॅपिंग हा गोड शब्द आहे. उदा: आपण इमेल किंवा चॅटमध्ये व्हॅकेशन किंवा सुट्टी असा शब्द वापरला असेल तर आपल्याला प्रवासी कंपन्यांच्या जाहिराती दिसू लागतात. यापुढे ही प्रणाली अजूनच आक्रमक होईल. आपल्यावर सतत नजर ठेवली जाईल, प्रत्येक क्षण सतत ट्रॅक केला जाईल व आपल्याच डाटाचा स्रोत म्हणून अधिकाधिक वापर होत राहील म्हणजेच तो डाटा मोठ्या प्रमाणात बँकिंग, वित्तसेवा, इन्शुरन्स, ई-कॉमर्स, पर्यटन, मनोरंजन आदी क्षेत्रांना विकला जाईल. 

सोशल मिडीया मोफत नाही, त्याचे बिल आपण आपल्याच डाटाच्या रुपात पुढेही भरत राहणार आहोत.  विविध उद्योगात मॅपिंगचा बराच वापर होण्याची शक्यता आहे. उदा: विक्री न झालेला स्टॉक सोशल मीडिया आणि मॅपिंगच्या माध्यमातून  खुला करणे, टेस्ट ड्राइव्हसाठी निमंत्रित करणे असे प्रकार करून वाहन उद्योग स्वतःची भरभराट करून घेऊ शकतात.

४. ’थांबला तो संपला’ त्यामुळे लवचिक तंत्रज्ञान टिकून राहील-

आज फेसबुक सोशल मिडियाचा राजा आहे. जगभरात त्याचे १.७ अब्ज वापरकर्ते आहेत. ७२% इंटरनेट वापरकर्त्यांकडे फेसबुक खाते आहे. लवचिक धोरण ठेवलेले असल्याने फेसबुक आगामी काळात टिकून राहील मात्र त्याचे रुपडे अगदी वेगळे असेल. Twitter, Instagram आणि Snapchat चे आयुष्य तुलनेने मर्यादित असेल. कदाचित आजपासून दहा वर्षांनी किशोरवयीन मुले "ट्विट" शब्दाचा अर्थ काय ते शोधतील. फेसबुक काळानुसार आणि गरजेनुसार बदलत राहील. त्यात सतत नवनवीन वैशिष्ट्ये दिसत राहतील. काही नवे प्लॅटफॉर्म येऊ शकतील. ते कसे असतील हे  आताच सांगता येणे अवघड असले तरी ते होलोग्राम, वेअरेबल तंत्रज्ञान किंवा व्ही आर चष्म्यांच्या माध्यमातून वापरले जातील. होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा, वेअरेबल म्हणजे परिधान करता येणारे तंत्रज्ञान. आपला कुर्ता किंवा त्यावरील एखादे बटन, शरीरावर बसवलेली इलेक्ट्रॉनिक चिप असे त्याचे स्वरूप असेल. विचित्र वाटते आहे ना! काही वर्षांपूर्वी आपण रस्त्याने फोनवर बोलत हवे तिथे जातो आहोत हे देखील विचित्र आणि अकल्पनीय वाटत होते. 

५. जगाचे राजकारण आणि राजकीय जग यात सोशल मिडियाच्या साहाय्याने प्रचंड उलथापालथ होत राहील. 

डिसेंबर 2010 मध्ये ट्युनिशियामध्ये लोकशाही स्वरुपाचा नागरी उठाव सुरू झाला. त्याने मध्य पूर्वेत कितीतरी घडामोडी झाल्या. या उठावामुळे ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबिया सारख्या देशांतील शासकांना सत्ता सोडणे भाग पडले. ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या मदतीने लोक दडपशाहीचा निषेध करून त्या विरोधात क्रांती करु शकले. ब्लॅक लाईव्हज मॅटर किंवा मीटू सारख्या विविध हॅशटॅग चळवळींनी ’पर्सनल इज पॉलिटीकल’ हे सिद्ध करायला मदत करत महत्वाचे सामाजिक प्रश्न ऐरणीवर आणले आहेत. यूजरच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने भविष्यात असे ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरु होतील.

दुसर्‍या बाजूला हेच माध्यम घातपाती ठरण्याचा धोका देखील वाढेल. आज बहुतांशी दहशतवादी कारवायांचे नियोजन सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून केले जाते आणि काम होताच तो ग्रुप डिलिट केला जातो. 

आगामी काळात नव्या टूल्सच्या साहाय्याने या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. फेक आयडीवर नियंत्रण मिळवता आले तरच याला वेसण घालता येईल परंतु हे सोपे नाही.  आज तब्बल १.७ अब्ज सक्रिय फेसबुक वापरकर्ते आहेत, त्यापैकी 82 टक्के यूएस आणि कॅनडाबाहेरील आहेत. ट्विटरवर 270 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत, दररोज, 4 अब्ज व्हिडिओ YouTube वर पाहिले जातात आणि 6 कोटी फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले जातात. सातत्याने वाढत चाललेली ही अवाढव्य आकडेवारी पाहिली तर सोशल मिडियाची ताकद लक्षात येईल. 

येत्या ४ ते ५ वर्षात जगातील २.४४ अब्ज लोकसंख्या सोशल मिडियावर असेल. राजकीय क्षेत्रात सोशल मिडीया विश्लेषकांच्या मदतीने त्यावर आलेल्या नवनव्या टूल्सचा वारेमाप वापर केला जाईल. दहा वर्षांनी सोशल मीडियाचा वापर सर्वव्यापी होईल. 

६. सोशल मिडियामुळे अर्थजगत, व्यवसायाचे जग आमूलाग्र बदलेल -

सध्या सोशल मिडिया कंपन्या जाहिरातबाजीसाठी इन्फ्ल्युअर्सना भरपूर पैसा देतात. इन्फ्ल्युअर्स म्हणजे ग्राहकावर प्रभाव टाकू शकणार्‍या व सोशल मिडीयावर प्रचंड चाहते असणार्‍या वलयांकित व्यक्ती. कलाकार, खेळाडूंचे प्रमाण यात जास्त असते. उदा: विराट कोहलीने घातलेल्या ब्रँडचा टीशर्ट आपल्याकडे असावा किंवा प्रियांका चोप्राच्या हातात दिसली तशी पर्स आपल्याकडे असावी असे त्यांच्या चाहत्यांना वाटते. येत्या काळात मायक्रो व नॅनो इन्फ्ल्युअर्सना महत्व मिळू लागेल. यांचे फॉलोअर्स कमी असले तरी ते अधिक खोलवर विचार करणारे व त्या व्यक्तीचे निकटवर्तीय समजले जातात. मोठे इन्फ्ल्युअर्स लाखो लोकांवर प्रभाव पाडत असले तरी प्रत्यक्षात त्यातले काही शे लोक खरेदी करतात. मायक्रो इन्फ्ल्युअर्स काही हजारांवरच प्रभाव पाडत असले तरी अंतिम खरेदी करणार्‍यांची संख्या साधारण सारखीच असते. मायक्रो इन्फ्ल्युअर्सना तुलनेने कमी व नॅनो इन्फ्ल्युअर्सना त्याहून कमी पैसे द्यावे लागतात असे हे गणित असणार आहे. सोशल मिडीयावर विशिष्ट जाहिरातींवर घुटमळणार्‍या ग्राहकांना हेरून चॅटबॉटच्या मदतीने ’मदत हवी का’विचारले जाते आणि या संवादातून संभाव्य ग्राहक तयार होतात.  असे चॅटबॉटचे अजून आधुनिक आणि वेगवान पद्धतीने काम करतील. स्टोरीज, स्टेटस याचे महत्व वाढेल व त्यासाठी अनेक सुविधा देऊन त्याचे आकर्षण वाढते ठेवले जाईल. लाईव्ह व्हिडिओचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल. प्रत्यक्ष संवाद साधता येत असल्याने त्यात असलेला जिवंतपणा ग्राहकाला अधिक भावतो त्यामुळे हे तंत्रज्ञान अत्याधुनिक होईल. 


७. ब्रेकिंग न्यूजचे चे स्वरूप पूर्णपणे बदलेल -कंटेंट (माहिती) अगदी थोडक्यात आणि वेगात पोचवली जाईल.

कोरी बर्गमन,  या ’ब्रेकिंग न्यूज’ च्या सह-संस्थापकांच्या मते घडलेल्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार शेकडो व्हिडिओ अपलोड करतील. ही माहिती एका व्हिडिओत समाविष्ट करून अशा प्रकारे दाखवली जाईल की जणू आपण त्या वेळी घटनास्थळी उपस्थित राहून सगळे काही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. आपण त्या घटनेचाच भाग आहोत. उदा: एखादा अपघात घडला तर तो कसा घडला असेल याचे सध्या ग्राफीक्स दाखवले जातात. त्याचे अनेक व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर त्यातून असा काही परिणाम साध्य होईल की बघणार्‍याला आपण तो अपघात होताना पाहत आहोत असा अनुभव येईल,. एकूणच प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिकाधिक थेटपणे घेता यावा यावर भर दिला जाईल. 

टीव्ही वाहिन्यांवर ५ मिनीटात १०० बातम्यांचा पाऊस यासारखे प्रकार आधीच सुरु आहेत. येत्या काळात जेन-झी म्हणजेच टीनएज ते पंचविशी या वयोगटातली जनरेशन झेड शॉर्ट्स (कमी वेळेतले छोटे व्हिडिओ) ला प्राधान्य देईल. नामवंत ब्रँड्स ग्राहकांची काळजी थेट सोशल मिडीयावरून घेतील. जाहिरातविश्व त्यावर विसंबून राहील. तातडीची मदत हवी असल्यास ती येथेच उपलब्ध असेल. ऑडिओ तंत्रज्ञान मुख्य प्रवाहात येईल. 

८. सोशल मिडिया वापरण्याची आयुधे  वेगळी असतील कारण तंत्रज्ञानात अफाट बदल होतील

जेरेमी गोल्डमन हे “गोइंग सोशल” या फायरब्रँड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात, दूरसंवाद आणि अनेक कामे प्रामुख्याने आवाजाच्या साहाय्याने सूचना देऊन होतील. आता आपण अ‍ॅलेक्सासारख्या सुविधा पाहतोय त्या बाळबोध वाटतील इतके तंत्रज्ञान प्रगत होईल आणि कीबोर्ड, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन हळूहळू कालबाह्य होऊ लागतील. नोकियाचे सीईओ पेक्का लुन्डमार्क यांच्या मते ए-आर आणि व्हि-आर (ऑगमेंटेन्ड रिऍलिटी आणि व्हर्चुअल रिऍलिटी) यावर  आधारित प्रणाली स्मार्टफोनची जागा घेईल. माणसाच्या शरीरातच एखादी इलेक्ट्रॉनिक चिप इन्स्टॉल केली जाईल. त्यांचा हातच विशीष्ट ठिकाणी स्पर्श करून स्मार्टफोनसारखा वापरता येईल. इलेक्ट्रॉनिक टॅटू जैवतंत्रज्ञानावर संशोधन सुरु झाले आहे. ओटिस किमझे हे सिंपली मेजर्डचे संचालक भविष्यातल्या सोशल मीडियाबद्दल बोलताना म्हणतात, तो आपल्या कपड्याच्या फॅब्रिकचा भाग असेल किंवा आपण घालतो त्या चष्म्याचा किंवा आपण घातलेल्या बुटाचा सुद्धा. गॅझेट्स हे यापुढे आपल्या हातात धरण्यासाठी उपलब्ध नसतील तर आपल्या स्वतःचा भाग असतील." 

VR म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचा वापर प्रचंड वाढेल. उदा: एखादे चित्र-प्रदर्शन आपण एकेक दालन पार करत प्रत्यक्ष पाहत असल्यासारखे फिरु शकू. हे काही प्रमाणात आजही घडते आहे. मनोरंजनाच्या मैफिली, क्रीडा इव्हेंट, शिक्षण, पर्यटन, प्रवास, व्यावसायिक मीटिंग, डॉक्टरांच्या भेटी आणि बरेच काही व्ही आर द्वारे नियंत्रित केले जाईल. 

या दशकाच्या अखेरीस ६जी येईल. दुसर्‍या बाजूला बायोमेट्रीक तंत्रज्ञान विकसित होते आहे त्यामुळे प्रत्यक्ष व्यक्तीऐवजी त्याचे होलोग्राम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा संवादात भाग घेऊ शकतील. एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरॉलिंक कॉर्पोरेशन या तंत्रज्ञानावर काम करते आहे. या न्यूरो तंत्रज्ञानात काम करणाऱ्या कंपनीच्या वतीने मानवी शरीरात इम्प्लांट होऊ शकतील असे ब्रेन मशीन इंटरफेस (BMI) विकसित केले जात आहेत. 

९. मानवी वर्तनात बदल होतील. तंत्रज्ञानातील प्रगती धोकादायक ठरू शकेल.

जगभरात हायपर-रिअलिझम हा आधीपासूनच सोशल मीडियाचा एक प्रमुख घटक आहे. सोशल मीडिया सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात अक्षरश: घुसला आहे. त्यामुळे त्याच्या वर्तनात असंख्य बदल झाले आहेत. लाईक्सचा आकडाखाली गेला तर निराश वाटणे, कोणी विरोधी कॉमेंट केली तर बेचैन होणे, कटू प्रतिक्रियेने अस्वस्थ होऊन आक्रमक उत्तर देणे, सहज उपलब्ध झालेला पॉर्न आशय स्क्रोल् करताना वारंवार दिसत राहिल्याने  त्याची चटक लागणे, स्वत:ची माध्यमातील आकर्षक प्रोफाईल आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यातील फरकामुळे नकारात्मक वृत्ती वाढीस लागणे वगैरे दुष्परिणाम सहज दिसून येत आहेत. येत्या काळात आपली कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता अधिक कमी होत जाईल. ए-आर , व्हि-आर मुळे सगळे काही हातात येऊन आपल्यातल्या सर्जनशीलतेला फारसा वाव मिळणार नाही. 

आपल्या राज्यघटनेने १९ (१) (अ) नुसार प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. स्वातंत्र्याबरोबरच मर्यादाही राज्यघटनेत नमूद केल्या आहेत. पण, त्याची नेमकी अंमलबजावणी सोशल मिडीयावर होताना दिसत नाही. मुळात त्यावरील माहितीचाअ विचार करता सत्यता आणि अचूकपणा यासारख्या तत्त्वांचा तिथे अनेकदा अभाव असल्याचे दिसते. माहिती हे आता नवे चलन म्हणून वापरले जात असल्याने व्ह्यूज वाढण्यासाठी एकांगी, सनसनाटी निर्माण करणारा बटबटीत आशय वाढत जाणार आहे.  अशा माहितीचा इतका भडीमार अपल्यावर होतो आहे की माहिती साठवणे  हे आजच मेंदू समोरील एक आव्हान आहे. तिचे आकलन आणि विश्लेषण करणे यातच मेंदूचा बराच वेळ आणि उर्जा खर्च  होत असल्याने मेंदू शिणून पुढील प्रक्रिया थांबवतो. थोडक्यात आपण डोके वापरणे कमी करतो आणि जे दिसेल, पोस्ट होईल ते तसेच्या तसे स्वीकारू लागतो. येत्या काळात मानवाच्या  आकलन व विश्लेषण क्षमतेवर सोशल मीडिया चे  दूरगामी परिणाम होणार आहेत. मानवी भावनांमध्येही विस्कळीतपणा आणि रुक्षपणा वाढत जाणार आहे. 

सोशल मिडियाचे अर्थकारण मानवी भावनांवर चालते त्यामुळे या परिणामांशी सोशल मिडीयाला आजही देणेघेणे नाही व पुढेही नसेल, उलट भावना जितक्या तीव्र तितके सोशल मिडीयाचे अल्गोरिदम अचूक काम करतात आणि त्यावर आपली पोळी भाजून घेतात. त्या भावनांना अनुकूल अशा पोस्ट्स यूजरला दिसू लागल्या की तशी सांख्यिकीमध्ये नोंद होऊन जाहिरातदाराला पोच मिळाल्याचे समाधान सोशल मिडीया देतो. भावनिक गुंत्यात जास्त यूजर जास्त काळ सोशल मिडिया वापरत राहतात आणि सोशल मिडियाला तेच हवे आहे. 

या पुढची पायरी म्हणजे आयबीएमने  मेंदूतील स्मृतीकक्षामध्ये एका चिपमध्ये सेव्ह करता येतील अशा तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले आहे. या चिपमुळे त्या व्यक्तीच्या स्मृतींमध्ये उलथापालथ होईल. कदाचित स्मृती हॅक होऊ शकतील. नव्या कल्पना स्मृतीरुपात साठवल्या जाऊ शकतील. भूतकाळातील आठवणी पुन्हा तयार केल्या जातील आणि सहजपणे पुनर्रचित केल्या जातील. रील आणि रिअल मधली रेष अदृश्य होऊ लागेल. याचे परिणाम काय होतील ते आताच सांगता येणार नाही. 

फोटोशॉप वापरून खोट्या पोस्ट, बनावट फोटो याचा वापर करून समाजात अस्थिरता निर्माण करणे, ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण, मानसिक छळ, आर्थिक लुबाडणूक करणे, हे प्रकार आजही सुरु आहेत. तंत्रज्ञानाच्या पाठबळावर ते अधिक क्रूर होत जातील. डीप फेकचा वापर वाढेल. डीप फेक म्हणजे एखाद्या माणसाचा आवाज व दृश्य स्वरुपाचे अनेक सॅंपल वापरून त्याची अगदी खरीखुरी वाटेल अशी डिजिटल प्रतिमा तयार करणे. यामुळे खर्‍या खोट्यातील सीमारेषा धूसर होईल. उदा:  एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाच्या भाषणाचा व्हिडिओ आपण पाहतो आहोत. तो संदेश खरा मानून स्वीकारत आहोत पण तो माणूसच कृत्रिम /खोटा असेल तर! डिप फेक वापरले असल्यास व्हिडीओमधली व्यक्ती अगदी खरी वाटते. त्याचाआवाजही अस्सल वाटतो. त्याची शहानिशा करणे मानवी मेंदूसाठी सोपे नसते त्यामुळे डीप फेक व डार्क वेबच्या भुयारातून पेंडूराच्या बॉक्समधून निघावे तसे काहीही निष्पन्न होऊ शकेल. हे भयावह तसेच सामाजिक स्वास्थ्यासाठी अतिशय घातक असेल. जागतिक स्तरावरील नियामक संस्थाना याबाबत या दशकाच्या उत्तरार्धात कठोर पावले उचलावी लागतील. 


-----

माणसा सारखाच सोशल मीडिया उत्क्रांत होत चालला आहे. त्याने अगोदरच आपल्याभोवती विळखा घालायला सुरुवात केली आहे. भविष्यात आपण त्याच्या कह्यात गेलेलो असू.  दीर्घकालीन मानवी विकासासाठी सोशल मिडीया फारसा उपयोगी ठरणार नाही असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. नवनवीन आशय आणि माहिती ऐकण्यात , पाहण्यात आणि वाचण्यात आपला बहुमोल वेळ जात राहिला तर नवे काही निर्माणाधीन होणे अवघड होईल.  कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते तर त्याला ज्ञानाचा आधार असावा लागतो. वेगवेगळी कौशल्ये शिकावी लागतात, ती विकसित करावी लागतात. सोशल मिडिया यासाठी एका मर्यादेपर्यंत मदत करेल , पण बरेचसे अंतर आपल्याला त्याचे बोट सोडून चालावे लागणार आहे. तो आपले दैनंदिन जीवन अधिक  सोपे , सुटसुटीत करेल यात शंका नाही पण ते साधे आणि  सुखकर करणे मात्र आपल्या हातात आहे. आपण काय निवडतो, कुठे क्लिक करतो यावर ते अवलंबून असणार आहे. यासाठी आतापासूनच आपला समाज माध्यमशिक्षित होणे अतिशय गरजेचे आहे. 

एक सूत्र आपण भविष्यातील सोशल मिडीयाला सामोरे जाताना कायम लक्षात ठेवायला हवे.  सोशल मिडीयाचा वापर आनंद वाटण्यासाठी आणि विकासप्रक्रियेला हातभार लावण्यासाठी व्हायला हवा आहे. ते शक्य नसेल तर निदान आपण  त्यात नकारात्मकता पेरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. सोशल मिडीया हे एक सामूहिक विश्व आहे. इथली प्रत्येक व्यक्ती आपल्याइतकीच मूल्यवान आहे त्यामुळे वैयक्तिक आकांक्षेच्या पलिकडे जाऊन येथील समूहाच्या भल्याचा विचार आपल्याला करता यायला हवा. शेवटी सोशल मिडीयावर कुणीही असलो तरी आपण सगळेच प्रत्यक्ष जगाचे यूजर आहोत... नाही का!   

Published in White Space Diwali Issue 2022

Thursday, September 15, 2022

ओटीटी : ’अर्थ’पूर्ण मयसभा

 ’कंटेंट इज द किंग’ या मथळ्याचा निबंध बिल गेट्सने १९९६ साली म्हणजे तब्बल २६ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टच्या वेबसाईटवर लिहिला होता. "येत्या काळात इंटरनेटवर कंटेंटच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने कमाई करता येईल. अर्ध्या शतकापूर्वी झालेल्या टेलिव्हिजन क्रांतीने टीव्ही सेटच्या निर्मितीसह अनेक उद्योगांना चालना दिली पण माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात कंटेंटचे महत्व ज्यांनी ओळखले ते या व्यवसायात अधिक यशस्वी होणार आहेत." असं भाकीत त्यात नोंदवणा‍र्‍या बिल गेट्सने बदलत्या काळाची पावलं किती अचूक ओळखली होती त्याचा प्रत्यय आज आपण ओटीटी (उदा: अमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स इ.) च्या पार्श्वभूमीवर घेत आहोत. माहिती आणि मनोरंजन क्षेत्राने आपलं जगणं व्यापून टाकलंय आणि अर्थकारणासह या सगळ्याच्या नाड्या कंटेंट नामक राजाच्या हातात आहेत. 

पण कंटेंट म्हणजे नेमकं काय - इंटरनेट सारख्या परस्परसंवादी नेटवर्कचा विचार केला तर कंटेंटची ऐसपैस व्याख्या करता येईल. उदाहरणार्थ, संगणकातील किंवा मोबाईलमधील सॉफ्टवेअर हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा कंटेंट आहे. पण याचा आपल्याशी म्हणजे ग्राहकाशी थेट संबंध येत नाही. आपल्या दृष्टीने विचार केला तर आपण जे जे इंटरनेटवर किंवा इंटरनेटद्वारे बघतो, वाचतो, ऐकतो, डाउनलोड करतो ते सारे म्हणजे कंटेंट. आपण एखादे ई- वर्तमानपत्र वाचत असू, फेसबुक पोस्ट वाचत किंवा शेअर करत असू किंवा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असू किंवा अमेझॉन प्राईमवर एखादा सिनेमा, तर ही सगळी कंटेंटची विविध रुपं आहेत. या माहितीच्या ढिगार्‍यातलं काय निवडायचं हे आपण त्या कंटेंटच्या गुणवत्तेनुसार ठरवतो. मग हे कंटेंट प्रकरण या आधी नव्हतं का! अर्थातच होतं. आधी ते अगदी मर्यादित स्वरुपात होतं. कोणती पुस्तकं वाचायची, कोणते वर्तमानपत्र वाचायचे हे आपण त्या कंटेटचा दर्जा आणि मुख्य म्हणजे उपलब्धता पाहून ठरवत असू. म्हणजे चांगले इंग्रजी चित्रपट तेव्हा फक्त मोठ्या शहरातच झळकत असत. काही राज्यस्तरीय वर्तमानपत्रे विशिष्ट शहरांमध्येच वितरित होत. तरीही निवडीला थोडा फार वाव होता परंतु दूरदर्शन आणि आकाशवाणीला आयुर्विम्यासारखाच पर्याय नव्हता. त्यावर मिळतील त्या कंटेंटमध्ये आपण समाधान मानत असू. काही प्रमाणात गुणवत्ता नक्कीच होती, मूल्यव्यवस्थेचा पाया प्रत्येक संहितेला होता पण शासकीय चौकट आणि आर्थिक मर्यादा असल्याने काही कार्यक्रम अत्यंत एकसुरी आणि कंटाळवाणे देखील असायचे. मग मुक्त अर्थव्यवस्थेच्या हातात हात घालून आल्या सॅटेलाईट वाहिन्या. अहोरात्र उपलब्ध असणार्‍या या अमर्याद कंटेंटमधून निवड करायचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले त्यामुळे स्पर्धा, उलाढाल वाढली आणि या क्षेत्रात रोजगार/ व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण झाल्या. परंतु खेळ, संगीत यांना वाहिलेल्या आणि उत्तम माहितीपट प्रदर्शित करणार्‍या काही वाहिन्यांचा अपवाद सोडला तर लवकरच बहुतेक वाहिन्यांद्वारे सुमार कार्यक्रम प्रेक्षकांच्या माथी मारले जाऊ लागले. ’सूर्यवंशम’ हा एकच सिनेमा एका वाहिनीने इतक्या वेळा दाखवला आहे की त्याची जागतिक रेकॉडमध्ये नोंद व्हावी. रिअ‍ॅलिटी शोच्या नावाखाली बालिश नाट्यमयता, इस्टेटीसाठी सालस नायिकेला छळणार्‍या बटबटीत मेकअपमधल्या खलनायिका, जग २१ व्या शतकात असताना नागिणीचा सूड वगैरे कथानकातच रमलेल्या टुकार आणि साचेबद्ध मालिका, अशा कंटेंटना वैतागलेला शहरी तरुण प्रेक्षकवर्ग कल्पनेच्या पलिकडल्या विषयांवर उत्तम ’ग्लोबल’ कंटेंट देणार्‍या ओटीटीकडे वेगाने ओढला गेला. कोरोनामुळे आलेला लॉकडाऊन शहरी वर्गासाठी सुसह्य करण्याचं बरचसं श्रेय ओटीटीवरील सिनेमा व वेब सिरीजना द्यायला हवं. चित्रपटगृहं बंद असल्याचा फटका सिनेक्षेत्राला बसला असला तरी ओटीटीमुळे अनेक चित्रपटांना ते उघडायची वाट बघत न बसता मोठा प्रेक्षकवर्ग मिळू शकला.

एकूण खर्‍या अर्थाने मनोरंजन क्षेत्रात आर्थिक क्रांती झाली ती ओटीटी प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप. आधी टीव्ही सेटला जोडलेला अँटेना जे काम करायचा ते ओटीटी तंत्रामुळे आपल्या हातातला इंटरनेटशी जोडलेला मोबाईल करु लागला. त्यामुळे मनोरंजन शब्दश: आपल्या मुठीत आले. इंटरनेटचा माध्यम म्हणून वापर करत वेबसाईट किंवा अ‍ॅपच्या मार्फत मुख्य सर्व्हरवरुन थेट आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर अवतरत अनेक मनोरंजन केंद्र सुरु झाली त्यात 2008 मध्ये रिलायन्स एंटरटेनमेंटने लॉन्च केलेला बिगफ्लिक्स हा भारतातील पहिला प्लॅटफॉर्म. मग झी फाईव्ह आणि सोनी लिव्हच्या लाँचनंतर 2013 मध्ये ओटीटीची जोरदार घोडदौड सुरु झाली. डिस्ने हॉटस्टार 2015 मध्ये मैदानात उतरला. मल्टीप्लेक्सला एखादा सिनेमा बघावा तेवढ्या दरात यावरचे सिनेमा, शो किंवा वेबमालिका आपल्या सोयीने हव्या त्या डिव्हाईसवर बघता येत असल्याने ग्राहकात रुपांतरित झालेले प्रेक्षक ओटीटीला प्राधान्य देऊ लागले. ’बिंज वॉच’ करायची म्हणजे एका सपाट्यात आवडत्या वेब मालिकेच्या एका सीझनचे सगळे भाग पाहण्याची क्रेझ वाढली. 

सध्या ओटीटीवर गाजत असलेल्या काही भारतीय कार्यक्रमांकडे नजर टाकली तर त्यांचे विषय वैविध्य आणि आवाक्यामुळे आपण चकित होतो. यावरील सिनेमा किंवा वेबमालिकांचे विषय ’लोकल ते ग्लोबल’ असतात. त्यात तांत्रिक सफाई असते. त्यात माणसातल्या ग्रे शेड्स दिसतात. त्यात असामान्यांच्या कहाण्या असतात. त्यात समाजाची बधीर, गोठलेली अवस्था भंग करण्याची, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद असते. हे कंटेंट कधी प्रेक्षकांना विचारात पाडतात तर कधी भव्य काल्पनिक पट उलगडत निखळ मनोरंजन करतात. प्राईमवरील ’पुष्पा’ आणि ’दृश्यम २’ या तुफान गाजलेल्या सिनेमाने दाक्षिणात्य चित्रसृष्टीकडे अवघ्या देशाचं लक्ष वेधून घेतलं. सबटाय़टलमुळे भाषेचे अडसर गळून पडले. ओटीटीवर प्रदर्शित होणं म्हणजे कमीपणा वाटणार्‍यांचा गैरसमज दूर झाला. मधल्या काळातल्या उत्तम पण लुप्त झालेल्या सिनेमांना नवे करार होऊन ओटीटीमुळे झळाळी आणि नवा प्रेक्षक मिळाला. विद्या बालनच्या ’शेरनी’ किंवा ’जलसा’ सारख्या सिनेमांना कमी बजेटमध्ये ओटीटीमुळे यशाची चव चाखणं सोपं गेलं.

वेब मालिका हे तर ओटीटीचं खास वैशिष्ट्य. ’सोनी लिव्ह’वरील विक्रम साराभाई व होमी भाभांच्या जीवनावरील ’रॉकेट बॉईज’ ही मालिका. एका पुरस्कार सोहळ्यानंतर अचानक गायब होणार्‍या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यावर व त्या रहस्यावर बेतलेली माधुरी दीक्षित अभिनीत ’नेटफ्लिक्स’वरची ’द फेम गेम’ ही मालिका, सर्वसामान्य भारतीय जीवनाचे अंतरंग खुसखुशीतपणे उलगडणारी ’सोनी लिव्ह’ वरील ’गुल्लक’ मालिका. अमेझॉन प्राईमवर लोकप्रिय ठरलेली ’गिल्टी माईंड्स’ ही दोन विरुद्ध विचारप्रवाहांच्या वकिलांच्या संघर्षावर आधारित मालिका. याच वाहिनीवरची ग्रामीण राजकीय जीवनपटाचा स्लाईस दर्शवणारी ’पंचायत’ मालिका, ’लंडन फाईल्स’ ही एका खुन्याचा शोध घेणारी अर्जुन रामपाल अभिनीत व्हूटवरील मालिका. व्हीनस आणि सेरेना विल्यम्स या आपल्या गुणी मुलींची टेनिस कारकीर्द घडवणार्‍या जिद्दी वडिलांची कहाणी सांगणारी ’किंग रिचर्ड’ ही ’अहा’ वरची मालिका. किती उदाहरणं द्यावीत! लैंगिक आणि हिंसक दृश्यांचा अतिरेक व शिवराळ भाषा हा सुरुवातीला या कार्यक्रमांचा व सिनेमांचा लसावि होता. जम बसल्यावर त्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. बहुतेक कार्यक्रमांच्या प्रोमोजमध्ये अशा दृश्यांचा अंतर्भाव आजही असला तरीही आर माधवन ची ’डिकपल्ड’, ’पंचायत’ सारख्या नितळ मालिका किंवा ’जय भीम’ सारखे सिनेमे ही इथेच आहेत. मुळात आधुनिक ओटीटीचा आणि टीव्ही, सिनेमा, नाटक वगैरे आजवरच्या मनोरंजन माध्यमांचा बाज पूर्ण वेगळा आहे. ग्राहक खेचण्याचा आकड्यांचा खेळ हा कलाकार किंवा लेखक-दिग्दर्शक कोण यापेक्षा कंटेंटवर (नंतर मार्केटिंगवर) अवलंबून आहे. 

बहुतेक ओटीटी प्लॅटफॉर्म एक दोन महिने फुकट सबस्क्रिप्शन देताना दिसतात. त्यानंतर उदा: 'नेटफ्लिक्स'साठी आवडीच्या प्लॅननुसार भारतात ३०० ते ८०० रु., 'हॉटस्टार प्रीमियम'साठी २०० रु. ते ४०० रु. महिन्याला आकारले जातात तर 'अल्ट बालाजी'चे वार्षिक सबस्क्रिप्शन्स ३०० रुपये आहे. याशिवाय कंटेंटनुसार ब्रँड प्रायोजक मिळवून नफा कमावला जातो. शहरी सुशिक्षित ग्राहकवर्गाला आकृष्ट करण्यात यशस्वी ठरलेल्या ओटीटीच्या व्यवसायाला आता भारतातली निमशहरी अवाढव्य बाजारपेठ खुणावू लागली आणि मराठी सारख्या स्थानिक भाषेतले कंटेंट देऊ करणार्‍या प्रादेशिक प्लॅटफॉर्मनी स्पर्धेत उडी घेतली. सुरुवातीला हिंदी-इंग्रजी वेबसिरिजची भ्रष्ट आणि केविलवाणी नक्कल करता करता आता ते स्वबळावर दमदार कंटेंट देऊ करत आहेत. भाडिपा’चा सारंग साठ्ये आणि पॉला मॅग्लेनने निपुण धर्माधिकारीच्या साथीने हिट व्हिडिओजपासून जोरदार सुरुवात करुन आता ’एम एक्स प्लेयर’द्वारे वेबसीरिजच्या जगात मुसंडी मारली आहे. ’प्लॅनेट मराठी’ वरची चर्चेत असलेली ’रानबाजार’ किंवा ’सोनी लिव्ह’ वरच्या धमाल ’पेट पुराण’ चे नावीन्यपूर्ण कंटेंट आणि रंजकता बघता याचा प्रत्यय येतो.

नेटफ्लिक्सवरचा ’डिसायपल’ सारखा संवेदनशील चित्रपट, प्राईमवरचा ’झिम्मा’  सारखा हलकाफुलका चित्रपट केवळ ओटीटीमुळे पार्लेठाण्यापुण्याची वेस ओलांडून लहान गावांपर्यंत सहज पोचू शकले. 

ओटीटी उद्योग इतक्या वेगाने वाढत चालला आहे की येत्या तीन वर्षात त्याची उलाढाल ४० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. बोस्टन कन्सल्टन्सीच्या एका अहवालानुसार पुढच्या तीन वर्षांमध्ये फक्त भारतात पाच अब्ज डॉलरचा व्यवसाय होईल. भारतीय बाजारपेठेत सर्वात आधी प्रवेश केलेल्या नेटफ्लिक्सवर दररोज १.७ दशलक्षाहून अधिक भारतीय लॉग इन करतात. भारतात त्याचे एकूण ४७.४ दशलक्ष म्हणजेच युरोपमधल्या एखाद्या देशाच्या लोकसंख्येइतके ग्राहक आहेत. इतर स्पर्धक वाहिन्यांचीही घोडदौड सुरु आहे. ओटीटीवरील कार्यक्रम दोन प्रकारचे असतात. स्वनिर्मित किंवा प्रसारणाचे हक्क विकत घेतलेले कार्यक्रम. दोन्हीसाठी ओटीटीवर साधारणपणे ३ प्रकारची व्यावसायिक प्रारुपे वापरण्यात येतात.

१) AVOD : (Ad-Based Video on Demand)

यात ग्राहकाला व्हिडिओ मोफत बघता येतात. त्यावर जाहिरात दाखवण्यासाठी जाहिरातदार ओटीटी प्लॅटफॉर्मशी करार करतात. 

२) SVOD (Subscription Video on Demand)

प्लॅटफॉर्मचे सशुल्क सदस्यत्व घेऊन ग्राहकाला हवे ते कार्यक्रम हवे तेव्हा बघता येतात. 

३) TVOD (Transactional Video on Demand)

ग्राहकाला प्रत्येक व्हिडिओ/ डाऊनलोडसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाते.

यातील दुसरे म्हणजे वार्षिक सदस्यत्व घेऊन विशिष्ट प्लॅटफॉर्मवरचे हवे ते कार्यक्रम बघण्याची मुभा देणारे प्रारुप सर्वाधिक लोकप्रिय व त्यामुळे प्रचलित आहे. सदस्यत्व टिकवून ठेवले व नवे सदस्य मिळवत राहिले तरच व्यवसायवृद्धी होणार हे सरळ आहे. त्यासाठी हवे आगळेवेगळे नवेकोरे कंटेंट. उलाढालीच्या आकडेवारीवरुन लक्षात येते की आकर्षक कंटेंट निर्माण करु शकणार्‍या सर्जनशील मंडळींना करियरची अनेक दालनं आंतरराष्ट्रीय पातळी पासून प्रादेशिक स्तरापर्यंत ओटीटीमुळे सहज खुली झाली आहेत. बिगबजेट चित्रपटाला मागे टाकेल एवढी कलाकार, कर्मचारी, तांत्रिक एक्सपर्ट्सची फौज यामागे अथक काम करते आहे. कोणती आहेत ही करियर्स! 

लेखक : 

दमदार कथानक, सशक्त पटकथा, चटपटीत संवाद लिहिणे. अनुवाद करणे. प्रोमोज, दृकश्राव्य जाहिरातींची संहिता लिहिणे. सिनेमा/ शो ची मदार लेखनावर असल्याने हटके लेखकांना खूप मागणी आहे. एक साधे उदाहरण द्यायचे तर ’फ्लॉवर नही फायर है मै’ हा अल्लु अर्जुन म्हणजेच ’पुष्पा’ सिनेमातला संवाद किंवा ’कभी कभी लगता है हम खुद ही भगवान है’- हे नेटफ्लिक्सवरच्या ’सॅक्रेड गेम्स’ मालिकेमध्ये गणेश गायतोंडे म्हणजेच अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीने अंडरप्ले पद्धतीने उच्चारलेले वाक्य. सिनेमा बघून झाला, मालिका संपली तरी प्रेक्षक ते विसरत नाहीत. सबस्क्रिप्शनही थांबवत नाहीत. ही कंटेंटची कमाल आहे. एकेका भागासाठी लेखकांना २५ ते ३०००० डॉलर्स मिळू शकतात.

सादरकर्ते : 

हे कंटेंट प्रेक्षकांना स्क्रीनवर खिळवून ठेवतील अशा स्वरुपात सादर करणे म्हणजेच दिग्दर्शन, तंत्रसाहाय्य, कलादिग्दर्शन, निर्मितीसाहाय्य, संगीतसंयोजन. कुवत व अनुभवानुसार ते १० ते २५ दशलक्ष डॉलरपर्यंत प्रति प्रकल्प कमाई करु शकतात. मुख्य कलाकारांना मिळणारे काही लाखांपासून कोट्यवधींचे मानधन हे त्यांच्या लोकप्रियतेवर, नेटवर्कवर व मागील यशस्वी कलाकृतींच्या संख्येवर अवलंबून असते. उदा: अभिषेक बच्चन हा प्रस्थापित सिनेक्षेत्रात फारसा हिट न झालेला अभिनेता ओटीटीवर भरपूर रेटिंग मिळवतो आहे.

पोस्ट-प्रॉडक्शन : 

विशेष इफेक्ट्स चा वापर, वेळेच्या चौकटीत तो तो भाग बसेल आणि रोचक वाटेल असे अचूक संकलन करणे 

शूटिंग असिस्टंट :

कलाकारांचा कपडेपट, मेकअप, नेपथ्य, शूटिंगच्या वेळा व तारखा सांभाळणे, प्रत्यक्ष शूटिंगमध्ये समन्वय ठेवणे

मिडिया मॅनेजर्स : 

सिनेमा /मालिका/ शो तयार होऊ लागताच त्याचे दिलखेचक रंजक प्रोमोज विविध माध्यमांद्वारे अपेक्षित प्रेक्षकवर्गापर्यंत पोचवण्यासाठी आवश्यक असलेले पारंपरिक आणि डिजिटल मार्केटिंग करणे. या माध्यमांद्वारे कार्यक्रमाशी संबंधित स्पर्धा आयोजित करणे, वेगवेगळ्या पद्धतीने त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करणे 

व्यावसायिक सर्जनशील अनालिस्ट्स- प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर नजर ठेवणे, कोणी किती वेळ काय बघितले ह्याची नोंद घेणे

वेब वाहिनीवरील प्रत्येक कार्यक्रम हा एक मह्त्वाचा कंटेंट आणि एक प्रकारचा डाटा असला तरी या डाटाबद्दल अधिक माहिती पुरवणारा डाटा म्हणजे मेटाडाटा. समजा एखादा सिनेमा या वाहिनीवर उपलब्ध करण्यात आला असेल तर तो प्रदर्शित कधी झाला, कोणत्या भाषेतला आहे, त्यातले कलाकार आणि पडद्यामागील तंत्रज्ञ कोण आहेत त्यांची यादी, सिनेमाचा गोषवारा, त्याचे रेटिंग, सिनेमाशी निगडित घटनांच्या नोंदी, तो कोणत्या वयोगटासाठी आहे, त्यातील आशय कशा स्वरुपाचा आहे ही सगळी माहिती म्हणजे सिनेमाचा मेटाडाटा. तो त्या सिनेमाला/ कलाकृतीला  टॅग करणे.

शो-रनर : 

ओटीटी प्लॅटफॉर्म आणि कार्यक्रमाचे निर्माते-दिग्दर्शक यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार्‍या शोरनर्सना कार्यक्रमाचे प्रसारण अपेक्षित वेळी कोणतीही तांत्रिक किंवा कंटेंटविषयक अडचण न येता होत आहे ना याकडे लक्ष द्यावे लागते. उदा. द्यायचे तर नेटफ्लिक्स वर गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेच्या प्रत्येक भागासाठी १ ते ३ लाख डॉलर्स शोरनरला दिले जात. भारतीय वाहिन्यांमध्ये काम करणार्‍या शो-रनरला प्रत्येक भागासाठी ५ ते १० लाख रु. गुणवत्ता व अनुभवाप्रमाणे मिळू शकतात.

शो-कास्टर : 

कंटेट कितीही उत्तम असले तरी ते पोचवणारा कलाकार नव्या दमाचा, हटके अभिनय करणारा नसेल तर कार्यक्रमाची चर्चा आणि प्रसिद्धी पुरेशी होत नाही व कार्यक्रम पडतो. त्यामुळे प्रत्येक भूमिकेनुसार योग्य कलाकार निवडणे आणि तो/ती व दिग्दर्शक यांच्यात दुवा म्हणून काम करणे हे शोकास्टरचे काम. कलाकार निवडताना त्यांच्या समाज/समूह माध्यमांवरील चाहत्यांची संख्या, त्यांचे युट्यूबवरील व्हिडिओ, त्यांची वर्तमान प्रतिमा याचा साकल्याने विचार केला जातो. बॉबी देओलसारख्या मागे पडलेल्या अभिनेत्याला ’आश्रम’ सारखी मालिका मिळाली किंवा प्रतीक गांधी सारख्या थिएटर कलाकाराला ’स्कॅम ९२’ मालिका मिळाली ती याच पद्धतीने. पंकज त्रिपाठी सारखे अभिनेते यातून पुढे येऊन मुख्य धारेच्या सिनेमात पहिल्या फळीतील अभिनेते होऊ शकले ते ओटीटीवरील मालिकेतून कमावलेल्या नावामुळे.

याशिवाय 

एव्हि (दृकश्राव्य) प्रोड्यूसर, रिटन कम्युनिकेशन मॅनेजर, एच आर मॅनेजर, वेगवेगळे करार बघणारे कायदेतज्ज्ञ, अर्थव्यवस्थापन बघणारी चमू अशी अनेक करियर्स आणि व्यावसायिक संधी ओटीटीने निर्माण केल्या आहेत. 

ओटीटी म्हणजे एक प्रकारची मयसभा आहे पण ती उभी करायला शेवटी माणसेच लागतात. ओटीटी म्हणजे माणसांनी माणसांसाठी निर्मिलेली मयसभा. जपून समजून उमजून प्रेक्षक म्हणून पाऊल टाकले तर डोळे दिपवणारी नवलाई अनुभवता येईल, व्यावसायिक म्हणून करियर घडवता येईल. निव्वळ क्रेझ म्हणून घुसलेल्यांना पाय घसरण्याचा धोका आहे. मुक्त कंटेंट हा यूएसपी असलेल्या ओटीटीचे सिनेमाशी विशेषत: कलेशी नेमके कसे नाते असते! टॉलस्टॉयच्या मते कला हा माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा, त्याचबरोबर कलाकृतीचे आकलन सहज व्हायला हवे. तर ’पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये’ असा आग्रह क्रोचे या इटालियन तत्वज्ञाने धरला होता. त्याने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. न-नैतिक कलाप्रकार (जसे पूर्वीचे तमाशा, नौटंकी) केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असे अपेक्षित होते. परंतु आता या कलाप्रकाराने ओटीटीवर मक्तेदारी मिळवली आहे. उदा: ’अल्ट बालाजी’ जे टीव्हीवर दाखवू शकत नाही ते ओटीटीव्दारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसर्‍या बाजूला सेन्सॉरशिप नसल्याने आपापल्या सामाजिक आणि राजकीय विचारसरणीला पूरक असा आशय सहजगत्या व्हायरल करणारे मुक्त व्यासपीठ म्हणून वेब सिरिजचा वापर होतो आहे. त्याचबरोबर ’द बिग बँग थिअरी’ सारखे अनोखे विषयही इथेच आपल्या भेटीला येत आहेत. प्रादेशिक सिनेमा आता बंगाली, मराठी किंवा तेलुगू राहिला नाही तो ’भारतीय’ सिनेमा झाला आहे, तो ही इथेच म्हणजे ओटीटीवर. 

यातून ’काय निवडायचे’ हे आपण विवेक वापरून ठरवायचे आहे. आपल्याला पैशाच्या मोबदल्यात फक्त ताजा आशय असलेले कोरे करकरीत मनोरंजन हवे आहे की गुणवत्ता व दर्जाही हवा आहे हे ठरावायचे आहे. ओटीटीमुळे अभिरुचीचे सांधे आणि आस्वादकतेचे आयाम वेगाने बदलत आहेत. सिनेमा हाच धर्म असलेल्या भारतात आर्थिक विषमतेमुळे त्याचे पडसाद तुलनेने हळूहळू उमटत असले तरी फोर-जी तंत्रप्रणाली आवाक्यात आल्यापासून पिटातला व बाल्कनीतला प्रेक्षक एका स्तरावर आला आहे. ओटीटीमुळे घडत आणि बदलत असलेला ’डिजीटल इंडिया’ हा एक अर्थपूर्ण संधी आणि त्याचबरोबर समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीने एक आव्हान बनून उभा राहिला आहे. 

काही संदर्भ : 
https://www.tribuneindia.com/
https://www.mazsystems.com/

Published in Daut_Lekhani Traimasik 

Friday, July 15, 2022

Time

Time

It's in a haste.. always

It does wish to halt for a moment though..

to feel it's own existence


Then it hurriedly hides itself in the clouds

but gets restless n wanders desperately...

It dives deep in the sea

and the next moment 

emerges on it's surface as an impulsive tidal wave...


It settles on a lush green leaf 

as a dew drop...

then the bubble bursts

With the blink of an eye


It starves for ages in despair in an empty bowl..

The careless time...Tramples a kitten rudely on the

crowdy streets 

When it's giant wheel rotates

anonymous lives get literally ragged into pieces


It's aloof, neutral.. endears none

Where does it head to !

It doesn't wait for breastfeeded lips 

nor does it wait to pass over the skin ,over the hair

even over the heart..callously


It travels on and on and never returns

Does it really exist ?


Time.. everlasting ..Full of life...

When it's all over for one

It's just a beginning for the other...

When it pauses for us 

Is that a termination ! 

It's not...

We keep flowing 

With the wind 

with the dust 

with the light...


Then what does time mean to us ?

Just a little span of our existence...

Which ends 

With our senses 

with us.


(काळ या कवितेचा अनुवाद)

- Mohini Limaye Modak

----------------------------

 काळ?

अखंड सुरू असते त्याची लगबग

त्यालाही थांबायच असतं क्षणभर खरंतर

अनुभवायचं असतं त्याचं असलेपण


मग तो ढगात लपतो,पण भांबावून सैरैवैरा होतो.

समुद्राच्या खोल तळाशी जातो तर

उद्वीग्न लाट होउन आदळत येतो

बसतो हिरव्यागार पानावर

टप्पोरा थेंब होऊन कधीतरी थांबतो

तर त्याचा बुडबुडा फुटतो


भुकेल्या कटो-यात तडफडून अर्धमेला होतो

बेफिकीरीने कधी 

भररस्त्यात मांजरीच्या पिल्लाला तुडवून जातो

कधी फिरतात अफाट त्याची चाकं

आणि भरगर्दीत कुणी चिंध्या चिंध्या होतं


तो अलिप्त, तो तटस्थ, त्याला कुठलाच मोह नसतो

कुठे पोहचायचय त्याला?

थांबत नाही तो, दुधकोवळ्या ओठांसाठी

तो जातो त्वचेवरुन... केसांवरून....

ह्रदयावरून सुद्धा?

जातो फक्त! येत का नाही?.


काळ खरच असतो?

काळ अखंड जिवंत!  तरूण!

एकासाठी संपलेला असतांना

दुस-यासाठी दौडत असतो !

तो आपल्यासाठी थांबतो

म्हणजे का नष्ट होतो आपण?

आपण तर वहात राहतो

वा-याबरोबर ,धुळीत, प्रकाशात अखंड...


मग काळ खरच कोण असतो ?

की आपण आपल्यापुरता एक काळ असतो?

जो आपल्या सोबत संपतो.


- ऍड. मंदाकिनी पाटील


–--------


Wednesday, June 29, 2022

आयआयटी_बीआयटी : Book Review


 #पुस्तक_परिचय आयआयटी_बीआयटी #महाराष्ट्र_टाइम्स

IIT मधून इंजिनियर होणं काय असतं , मुळात इंजिनियर होणं म्हणजे काय याविषयीच्या संकल्पना स्पष्ट करणारं, IIT बॉम्बे (पवई) ची सहल घडवत तिथल्या अतरंगी प्रेरणादायी घडामोडींच वर्णन करणारं
सुकन्या पाटील या टॉपर IITean ने लिहिलेलं रंजक पुस्तक.

नंदन नीलकेणी, रोहिणी गोडबोले, सुधींद्र कुळकर्णी, अच्युत गोडबोले, ओला कॅब्जचे भाविश अग्रवाल तसेच दिवंगत नेते मनोहर पर्रीकर ही नावे आपल्या अगदी ओळखीची आहेत. आपापल्या कार्यक्षेत्रात या सगळ्यांनी उत्तुंग झेप घेतलेली आहे. या सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे ही व्यक्तिमत्वे घडली आहेत आयआयटी बॉम्बे (पवई) मधून. तांत्रिक शिक्षणासाठी आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) राष्ट्रीय स्तरावरच नव्हे, जगभरात नावाजली गेलेली महत्त्वाची संस्था आहे हे विदित आहे. पण केवळ कुशल अभियंत्यांची फौज तयार करणे इतकेच या संस्थेचे संकुचित ध्येय नाही.
मग ’आयआयटी बॉम्बे’ हे प्रकरण नेमके आहे तरी काय !
तिथून बाहेर पडताना जग बदलून टाकण्याच्या आकांक्षेने झपाटलेल्या अभियंत्यांना अशी कोणती उर्जा ही संस्था देते, याचे उत्तर ’आयआयटी बीआयटी’ या पुस्तकात मिळते.
याच संस्थेच्या मुशीतून घडलेली, दोन सुवर्ण आणि एका रजतपदकासह आयआयटी बॉम्बेतील (पवई) सर्वोच्च मानाचे समजले जाणारे ’इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल’ पटकावणारी जळगावची सुकन्या पाटील या पुस्तकाची लेखिका आहे.
सध्या ’मायक्रोसॉफ्ट’मध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत असलेली सुकन्या ही ग्रामीण भागातून पुढे आलेली, मराठी माध्यमातून शिकलेली, बुद्धीमान, विचारी, निसर्गप्रेमी आणि मिनिमलिस्टीक तरुणी. साहजिकच ती पुस्तक लिहिते तेव्हा ते फक्त ’आयआयटी मध्ये प्रवेश कसा मिळवावा’ किंवा ’जेईईची तयारी कशी करावी’ हे सांगणारे गाईड नसते. आयआयटी म्हणजे ’ग्लोबल संधी’, आयआयटी म्हणजे गलेलठ्ठ पॅकेज, आयआयटी म्हणजे ’लाईफ बन गयी’ अशी प्रतिमा असल्याने तिथे प्रवेश मिळवणे ही अनेक भारतीय विद्यार्थ्यांची महत्वाकांक्षा असते. या ध्येयाने पछाडलेल्यांवर ’कोटा फॅक्टरी’ सारख्या वेबमालिका देखील तयार केल्या गेल्या आहेत.
प्रचंड प्रयत्न करूनही थोडक्यात संधी हुकली तर निराशेच्या गर्तेत जाणार्यांची संख्याही कमी नाही. मुळात प्रवेश परिक्षा देणार्यांपैकी किती मुले ’इंजिनीअर होणे’ म्हणजे काय हे आधी समजून घेतात!
सकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा भरला आहे.
नकारात्मक विचार करणारा माणूस म्हणतो - पेला अर्धा सरला आहे.
हाडाचा इंजिनीयर म्हणतो - एकंदरीत पेला गरजेपेक्षा दुप्पट आकाराचा आहे.
लॅटिनमध्ये इंजिनिअम म्हणजे नैसर्गिक क्षमता, गुणवत्ता. नैसर्गिक संसाधनांचा आणि वैज्ञानिक संकल्पनांचा कल्पक वापर करून अवघड समस्या सोडवणे, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी साकार करणे म्हणजे इंजिनीअरींग. अशी वस्तुनिष्ठ ’व्हिजन’ ठेवून ’इंजिनीअर’ होणे, त्यातूनही ’आयआयटी’ तून इंजिनीअर होणे याचे वेगळेपण सहजतेने सांगत होतकरुंना या क्षेत्राविषयी स्वच्छ नजर देणार्या वाटाड्याचे काम सुकन्याचे ’आयआयटी बीआयटी’ हे पुस्तक करते.
’थ्री इडिय़ट’ सारख्या चित्रपटातून नव्या पिढीच्या ’पॅशन’चे महत्व पालकांना समजावण्यात आले आहे. ’तुमची स्वप्ने मुलांवर लादू नका, त्यांना त्यांची स्वप्ने पाहू द्या’ वगैरे त्यांना हल्ली सतत सांगितले जाते आहे. प्रत्यक्षात पॅशनला स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पकता, सामान्य ज्ञान आणि विवेक यांची जोड असेल तरच ती परिपूर्ण बुद्धीमत्ता. अन्यथा नुसत्या स्वप्नांना अर्थ नसतो. इथे आयआयटी बॉम्बे सारखी संस्था मह्त्वाची ठरते कारण तिथे या सगळ्या पैलूंची मशागत होते. यासाठी आयआयटी उत्प्रेरकाचे काम कसे करते, तिथे शिक्षण घेण्य़ाकडे किती वेगवेगळ्या पद्धतींनी पाहिले जाते याची खुमासदार उदाहरणेही या पुस्तकात लेखिका देते.
’मला तिथे माझे स्वत्व गवसले’ असे लेखिका म्हणत असली तरी हे तिचे आत्मचरित्र वगैरे नाही. ती या पुस्तकातून ’आयआयटी बॉम्बे’ची सहल घडवून आणते. तिथला निसर्गरम्य परिसर, वैविध्यपूर्ण होस्टेल लाईफ, तिथल्या कला, क्रीडा, तांत्रिक, उद्योजकीय, सांस्कृतिक घडामोडी इ. विषयी सांगते. आत्मविश्वास वाढवणारा इंग्लीश लर्निंग प्रोग्राम, उद्यमशीलतेचे धडे देणारा ऑन्त्रप्रेन्युअर सेल, तंत्रक्षेत्राची क्षितीजे रुंदावणारा टेकफेस्ट, व्यवस्थापन कौशल्याची कार्यशाळा म्हणावा असा प्रसिद्ध ’मूड इंडिगो’ यांसारख्या भन्नाट उपक्रमांची माहिती देते. लॉजिकल रिझनिंग, स्ट्रक्चर्ड थिंकिंग ही कौशल्य इथे कशी विकसित होतात याविषयीही ती रंजक पद्धतीने सांगते.
एका बाजूला इंजिनिअर होण्याची आणि दुसर्या बाजूला माणूस म्हणून घडण्याची सर्वसमावेशक प्रक्रिया हे अंगभूत वैशिष्ट्य असलेल्या ’आयआयटी बॉम्बे’च्या पार्श्वभूमीवर लिहिलेले हे पुस्तक. ते विद्यार्थ्यांची जाण तर वाढवतेच पण आपल्या पाल्याच्या इंजिनियरिंगच्या पदवीच्या कागदाकडे डोळे लावून बसलेल्या पालकांना नवे भान देते.
मराठीत या स्वरुपाचे आणि अशा विषयावरचे हे बहुधा एकमेव पुस्तक आहे.
पूर्वप्रकाशित : #मटा नागपूर edition 29 जून

Friday, June 10, 2022

दोन माणसांचा गुळांबा


म्हणजे काय! दोन माणसांपुरता? एवढाच करायचा तर इतका कुटाणा कशाला, असं तुम्हाला वाटत असेल. तर ते तसं नाही.

ही #गुळांबा कसा करावा याची रेसिपी नसून न-रेसिपी आहे. 🫢
ये उन दिनोंकी बात है जेव्हा उन्हाळी वाळवणं किंवा विशेष पदार्थ अजूनही सासूबाईच करत असत.
एका उन्हाळ्यात त्या परगावी गेल्यानं यंदाच्या गुळांब्याचं काय करायचं हा प्रश्न समोर उभा राहिला.
आपण अत्यंत हुशार असून ’त्यात काय मोठंसं’ असं मी स्वत:ला सांगितलं आणि सासूबाईंना सर्प्राईज द्यायचं ठरवलं.
सुरुवातीच्या दिवसात असले झटके बहुतेक सगळ्याच नवविवाहितांना येत असतात 😁 तर ते असो.
तेव्हा फेसबुक वगैरे नसल्याने एका रविवारी मी घरातलं मंगला बर्वेंचं ’अन्नपूर्णा’ पुस्तक बाहेर काढून त्याबरहुकूम सगळी तयारी केली.
सगळे त्यात दिल्याप्रमाणे केले.
पितळी पातेल्यात रटरटणार्या त्या सोनेरी तांबूस गुळांब्याकडे बघताना कैरी किसताना हाताला थोडंस लागल्याचं दु:ख विरून गेलं.
दरम्यान सासूबाईंचा फोन (अर्थात ट्रिंग ट्रिंग वाला) आला.
हा विषय वगळून मी त्यांच्याशी बोलत बसले.
मध्येच पळत येऊन डावाने ढवळून गुळांब्याची कन्सीस्टन्सी तपासून गेले.
अजून तरी तो सैल वाटत होता.
फोन सुरुच राहिला, गुळांबा सैल वाटत राहिला.
फोन संपला तरी गुळांबा सैल वाटत राहिला. 🤔
चांगला दाट झाल्यासारखे वाटल्यावर केव्हातरी अंदाजाने मी गॅस बंद केला.
माझा पहिलावहिला गुळांबा गार झाल्यावर खूष होऊन मी बरणीत भरायला घेतला पण त्यात घातलेला डाव पातेले सोडेचना. 🙄
मग मी खाली बसून बरणी घट्ट धरून ठेवली आणि कुठल्यातरी गडबडीत असलेल्या नवर्याला थांबवून त्यांच्या मदतीने पातेल्यातलं मिश्रण त्यात शक्तीनिशी लोटलं.
उरलेलं चाटून पाहिलं तर ते अप्रतिम खमंग लागत होतं.
थोड्या वेळाने नॉर्मल होईल याची उगाचच खात्री होती.
मग ताजं लोणी कढवलं. गरम पोळी पानात घेतली.
आता गुळांबा घेऊन त्यावर साजूक तूप घालून लहानपणापासून प्रिय असलेली चव अनुभवायची होती.
बरणीत चमचा घातला तर तो बिचारा वाकडा झाला पण आतला ऐवज घेऊन बाहेर यायचं नाव घेईना. 🤨
मग मात्र जाड डाव आत खुपसला.
पुन्हा नवर्याला बोलावून बरणी मागच्या बाजूने घट्ट धरून ठेवायला लावली आणि डावभर गुळांबा दोन्ही हातांनी ओढून बाहेर काढला.
चिक्कीकडे झुकलेलं ते प्रकरण लागत बाकी भारी होतं.
दरम्यान एकदा अचानक जेवायला ओळखीच्या एक काकू आल्या.
शेवटी काहीतरी गोड हवं म्हणून ’वाढ गं जरासा गुळांबा वगैरे काहीतरी’ म्हणाल्या. मी भीत भीत वाढला.
त्यांना कवळी असल्याने ती आत बहुतेक गुळांब्यासह खडखडू लागली असावी. गुळांब्याचा नीट आनंद न घेता आल्याने वैतागून
किंवा तो बरणीतून काढण्याची आम्हा ’दोघांची’ सर्कस पाहून
त्यांनी त्याचं नामकरण ’दोन माणसांचा गुळांबा’ असं केलं. 😬
त्या नन्तर एका लग्नात त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्याच, "झाला की नाही यंदाचा ’दोन माणसांचा गुळांबा’ करून !".
तर दोन नव्हे पण चमच्याने सहज निघणारा ’एका माणसाचा गुळांबा’ करुन झालेला आहे.
फोटोत किंचित सरसरीत वाटत असला तरी निवल्यावर तो अगदी व्यवस्थित झालाय बरं का! 😃
तुमचा झाला का तयार? एका माणसाचा गुळांबा !!

Monday, May 30, 2022

एका पुस्तक प्रकाशनाची गोष्ट

 मी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा जिच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होतं ती माझी आवडती लेखिका-कवयित्री मैत्रिण बोलायला नुकतीच उभी राहिली होती. चला, म्हणजे आधीचे सोपस्कार झाले असावेत. ज्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होते त्या नवलेखकाच्या नातलगांनी आमचे मनापासून स्वागत केले. माझ्यासोबत माझी आणखी एक मैत्रिण होती. अशा कार्यक्रमात धीर द्यायला सोबत कुणी असलेले बरे असे आम्हा दोघींचेही मत होते. आम्ही तिथे (ठरवून) उशीरा टपकल्याने कसनुसं हसत चटकन मागच्या ओळीतली कोपर्यातली खुर्ची धरली. एव्हाना स्टेजवरच्या लेखिका मैत्रिणीने माझ्या अपेक्षेला न्याय देत छान छान मुद्दे मांडायला सुरुवात केली होती. सृजन म्हणजे काय, लिहिण्याची उर्मी हा काय नेमका प्रकार असतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, सद्यस्थितीत लेखकाने स्वत:ला कसं घडवावं वगैरे. लेखकाच्या पुस्तकातल्या मर्यादा आणि बलस्थानंही तिने ओघवत्या शैलीत सांगितली. बारकाईने ऐकल्यावर जे लक्षात आले ते असे - पुस्तक यथातथा किंवा बंडल आहे. इकडे लेखिका मैत्रिण आता भाषणात रंगली आणि पुढचा गिअर टाकून अनुभव, अनुभूती आणि त्याची परिष्कृती असं लईच उच्च उच्च बोलू लागली. लेखकाचं समाजाशी नातं, समष्टीशी नातं वगैरे. तिच्याच बोलण्यातून अंदाज आला होता की ’उतारवयातल्या पुरुषाला कोवळया वयात आवडलेली सुबक ठेंगणी वयाच्या या टप्प्यावर पुन्हा भेटते’ या एकमेव थीमभोवती कथा(!) रचलेल्या होत्या. कसलं सृजन, कसला समाज अन कसली समष्टी. पण ती बिचारी प्रमुख पाहुणी असल्याने स्तुती न करुन करते काय! तरी प्रसंगाचे औचित्य चतुराईने सांभाळून तिने नवलेखकांना पुढील लेखनासाठी शुभेच्छांसह काही रोखठोक सूचना दिल्या आणि बोलणे संपवले.

उपस्थितांमधल्या बहुतेक बायका, लेखकाच्या नात्यातल्या असाव्यात. त्या दिवशी काहीतरी सणवार असल्याने इकडून परस्पर हळदीकुंकवाला जाऊया, या हिशेबाने खच्चून नटून आल्या होत्या. त्या चुळबूळ करु लागल्या. बहुतेक पुरुष हे लेखकाचे मित्र, रविवारची दुपार जरा बरी गेल्याने तेवढाच एक दिवस कटला, या आनंदात ते ऐकण्यात रमले होते. दरम्यान नातलगांची लहान मुलं त्या छोटेखानी हॉलच्या एका कोपर्यात शिवाशिवी खेळू लागली. भरपूर मेकअप केलेली एक युवती त्यांना दटावू लागली. युवतीने एक लांबलचक बट केशरचनेच्या बाहेर काढून सेट केली होती, ती सेट आहे ना हे चाचपण्यात तिचं सगळं लक्षं लागलं होतं. निवेदकाने माईक ताब्यात घेऊन लेखिका-मैत्रिणीला धन्यवाद दिले व
’रंजक भाषण आपुले, कान अमुचे तृप्त जाहले..’
तत्सम काहीतरी यमक जुळवले. ’अतृप्तीच्या वाटेवर’ छाप नावांचे एक दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेली मंडळी दिसतात तसे ते होते. त्यांनी आता मंचावरच्या मान्यवर डॉ. ना पाचारण केले.
’मला फक्त पेशंटशी बोलता येतं बुवा पण तरी मी आपले चिमखडे (!) बोल (हा, ते बालरोगतज्ज्ञ असल्यामुळे) सादर करतो’,
असे सांगून डॉ. नी आयक्यू आणि इक्यू यातला फरक सांगितला. ते पुढे म्हणाले,
’लेखक व्हायचं तर एकवेळ आयक्यू नसला तरी चालेल (बापरे!) पण तुमचा इक्यू चांगला हवा’.
मग निवेदकाने त्यांना, म्हणजे निवेदकाला फक्त आयक्यू असूनही (उत्सवमूर्ती लेखकांनी) नोकरीसाठी मदत केल्याबाबत आभार मानले व मंचावरील पोलिस अधिकारी म्याडमना बोलण्यासाठी पाचारण केलं.
म्याडम चांगल्या सणसणीत व्यक्तिमत्वाच्या होत्या. कुर्त्याच्या बाह्या दुमडत माईकपाशी येत एक कडक लुक देत त्या म्हणाल्या,
" मघाशी प्रकाशक म्हटले, आम्ही प्रोत्साह्न देतो नवीन लेखकांना तर आता मला पण माझे पोलिस विभागातले भन्नाट अनुभव लिहावेसे वाटून राहिले आहेत."
जर यांचं पुस्तक निघतं तर माझं तर निघूच शकतं, असा त्यांचा सूर होता. पुढे त्या म्हणाल्या ’यांचे (लेखक) गुण किती सांगावे (त्यांना आठवेना) तितके कमीच.’ लेखकाशी असलेल्या घरोब्याच्या संबंधांमुळे नाईलाजाने म्याडम या ठिकाणी उपस्थित झाल्या असाव्यात.
डॉक्टर, पोलिस या दोन असंबद्ध व्यक्तींनंतर आता सुसंबद्ध व्यक्तीला आमंत्रित करण्यात आलं. लेखकाच्या संस्थेतल्या साहित्याची आवड असलेल्या एक म्याडम. त्या स्टेजवर जायच्या कल्पनेने गांगरलेल्या दिसत होत्या. चुरगाळलेला कागद आणि रुमाल घेऊन माईकजवळ गेल्या, त्या घाबरलेल्या असल्यामुळे दोन्ही खाली पडलं, त्या भीतीवर मात करत कागद उचलून सरळ करत म्याडमनी एकदम तारस्वरात बोलायला सुरुवात केली. लेखकाच्या लेखन कारकीर्दी(!)ला शुभेच्छा देताना अधूनमधून त्यांनी स्वरचित कवितेच्या २-२ ओळी पेरल्या होत्या.
’व्हावे लेखन इतुके की आभाळाने यावे खाली.. (!)
नंतर काही तरी ’ही तर कथुली झाली’
असे यमक होते. शेवटची लाईन दोनदा म्हटली की ती कविता असते म्हणून आम्ही पण इतर श्रोत्यांबरोबर इमानेइतबारे टाळ्या वाजवल्या.
लेखिका मैत्रिण तिच्या मंचावरच्या स्थानाला साजेसा गंभीर चेहरा ठेवून बसली असली तरी माझ्याकडे लक्ष जाताच अवसान गळून तिला खुदकन हसू फुटे. या बिकट स्थितीवर उपाय म्हणून तिने हॉलमधील झुंबरावर नजर केंद्रित केली. ती बहुतेक त्याचे लोलक मोजत असणार.
आता संस्थाध्यक्ष उठले, त्यांना बोलावणं तर कंपलसरीच असणार. लेखकानी आपल्या कथांचे तुकडे स्फुरले तसतसे यांना ऐकवले असावे, त्याचा पुरेपूर सूड अध्यक्षांनी आपल्या भाषणात घेतला. आम्हाला कोण कोणास काय म्हणाले काहीही कळलं नाही.
निवेदकाने म्हटले, "यांच्या भाषणावरुन ते संस्थेत किती जबरदस्त इंटरव्ह्यू घेत असतील याची कल्पना तुम्हाला आलीच असेल." हे कौतुक होते की टोमणा या गोंधळात अध्यक्ष आणि श्रोते असतानाच त्यांनी ’आणखी कोणाला मनोगत व्यक्त करायचे असल्यास यावे’, असे म्हटले.
तोवर मागच्या काउंटर्सवर आगमन झालेल्या पावभाजीचा खमंग सुवास दरवळू लागल्याने आणि शिवाशिवी खेळणार्या मुलांचा सूर टीपेला पोचल्याने आता कुणीही बोलायला उठलं नाही.
लेखकांचे कुणी नातलग आभारप्रदर्शनाला उभे राहिले. कार्य चांगलं पार पडल्याचे कृतकृत्य भाव चेहर्यावर लेऊन ते उभे राहताच मी
’आभाराचा भार कशाला अन् शब्दांचे हार कशाला’
या आभारवाल्यांच्या अत्यंत आवडत्या ओळी मनात म्हणत त्याच पुन्हा ऐकायला कान टवकारले आणि माझा अजिबात अपेक्षाभंग न करता त्यांनी त्या ओळी म्हटल्याच.
या ओळी न म्हणणारा आभारवाला दाखवा अन हजार रुपये मिळवा. मग आभारयादीला संस्थाध्यक्षांपासून सुरुवात करुन लाईटिंगवाला आटोपेतो बहुतेक लोक पावभाजीच्या तर काही मोजके लोक बुके धरले अवघडलेले हात मोकळे करायला लेखकाच्या दिशेने धावले. आम्ही मैत्रिणीच्या दिशेने धावलो. हौशी लेखक आता आयेस्बीएनवाले ऑफिशीयल लेखकराव किंवा निवेदकाच्या भाषेत (डायरेक्ट) ’साहित्तिक’ झाले. प्रकाशन सोहळा समाप्त झाला.
---------
आता एवढ्या खर्चिक प्रकरणापेक्षा फ्री एफबी लाईव्ह येणं आणि तीन तास ते प्रकाशन प्रकरण अटेंड करण्यापेक्षा लाईव्ह कवितेला लाईक ठोकून पुढे स्क्रोल करणं यातलं दुसरं कित्तीतरी सोपं आहे. शिवाय सध्याच्या लॉकडाऊन क्र. य आणि भविष्यातील कोरोनोत्तर काळात प्रकाशनापासून बहुतेक सगळंच ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. कवितावाले निदान ५-१० मिनीटात तुम्हाला मोकळं करतात. गद्यवाले एकदा आले की तास-तासभर सोडणार नाहीत (वि.सू :हाय, नमस्कार, वॉचींग असं लिहून नंतर पळून जाणार्यांना ते ओळखून असतात) त्यामुळे गद्य मंडळींची बाजू घेण्यात तसा काहीही अर्थ नाही. (हे वाचणारे तुम्ही बावनकशी कॅटेगरीवाले आहात, ’ते’ वेगळे आहेत तेव्हा मला उगाच अनफ्रेंड करु नये 🙂 ) तुम्ही पूर्ण पोस्ट वाचावी म्हणून हे कन्क्लुजन शेवटी लिहिलं. बाकी कै नै.

Wednesday, April 20, 2022

व्याकुळ कोंब

How quickly you finish

everything served on the plate

with restraint 

like a conquering emperor


Couldn't  you inhale

the aroma of the delicacies..

Couldn't  you savour them 

in delight !


Couldn't you acknowledge earnestly !

if not with words

with a gratifying glance at least !


Instead

you get up with a belch

wiping your mouth 

and 

the anguished tender sprout 

of my hunger

withers and dies within...


Translated by Mohini



 व्याकुळ कोंब


किती पटापट संपवलं

ताटातलं सगळं

निग्रहानं विजय मिळवणाऱ्या 

एखाद्या सम्राटासारखं 


साठवून घेता आला असता 

पुढ्यातल्या पदार्थांचा दरवळ

अन् लज्जतही अनुभवता आली असती खरंतर


देता आली असती

उत्स्फूर्त दाद

फक्त एका कृतार्थ नजरेने


तू तोंड पुसून उठतो

ढेकर देऊन तेव्हा

कोमेजून, मृतप्राय होतो 

जेमतेम उगवू पाहणारा

माझ्या भूकेचा व्याकूळ कोंब!


संघमित्रा खंडारे



Tuesday, March 1, 2022

'भारतीय स्त्रीत्वाचे तेजाळ दर्शन’ - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील लेख


महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास - 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथातील माझा लेख

महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास म्हणजे गेल्या शतकातलं महाराष्ट्रातलं व्युत्पन्न चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ’चालतेबोलते विद्यापीठ’ असा त्यांचा उल्लेख बापूजी अणे करत. नवीन पिढीलाच काय आपल्या पिढीलाही त्यांची विद्वत्ता, व्यासंग, पांडित्यपूर्ण साहित्यनिर्मिती, ओजस्वी वक्तृत्व, मूलगामी राष्ट्रचिंतन, सांस्कृतिक-प्रबोधनाचं अतुलनीय कार्य याची फारशी माहिती नाही.
जन्मशताब्दी निमित्ताने महामहोपाध्याय बाळशास्त्रींच्या साहित्याचा परिचय नव्या पिढीला करून देणार्या 'पुत्र ज्ञानदेवतेचा' या गौरवग्रंथाचं लोकार्पण मुंबई इथे मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय कार्यक्रमात झालं. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
प्रख्यात वक्ते, अग्रणी लेखक श्री.आशुतोष अडोणी हे या ग्रंथाचे संपादक. बाळशास्त्रींनी ’भारतीय जीवनादर्श’च्या माध्यमातून रामायण व महाभारतातील व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. यातल्या स्त्री व्यक्तिरेखांबद्दलचं माझं आकलन मी लेखातून मांडलं आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जाज्ज्वल्य देशाभिमानी आणि वक्तादशसहस्रेषु म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाळशास्त्री हरदास यांना महामहोपाध्याय, वेदान्ततीर्थ, काव्यतीर्थ, साहित्याचार्य अशा अनेक उपाध्यांनी का ओळखले जात असावे याची चुणूक दाखवणार्‍या त्यांच्या अनेक वाड्मयीन शिल्पांमध्ये ’भारतीय जीवनादर्श माला’चा समावेश होतो. बाळशास्त्रींनी यात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने प्राचीन वाड्मयातील विशेषत: महाभारतकालीन व्यक्तिरेखांचे चरित्रचित्रण करून वाचकांना एक नवी दृष्टी प्राप्त करून दिली आहे. श्रीमन्महाभारतावरील व्याख्यानांच्या सत्रात त्यांनी महाभारतीय स्वभावचित्रे उलगडताना गांधारी, कुंती व द्रौपदी अशा तीन स्त्रीरेखा चित्रित केल्या होत्या. पुढे त्याच मालिकेत सावित्री, कुंती यांचा त्यांनी समावेश केला. त्यांच्या रामायणावरील ग्रंथात ’एक स्वर्गीय पुष्प’ या शीर्षकांतर्गत सीतेचे स्वभावचित्र आलेले आहे. १९७५ हे स्त्रीवर्ष म्हणून घोषित करण्य़ात आले होते. त्याचे औचित्य साधून या सर्व स्त्रीस्वभावरेखांचा संग्रह ’भारतीय जीवनादर्श’ (भाग १) या नावाने प्रसिद्धीस आला. बाळशास्त्रींच्या सुविद्य पत्नी वीणाताई या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, "महाभारत हा इतिहास आहे की केवळ एक काव्य, त्यातील घटना खर्‍या आहेत की काल्पनिक याचा आपल्याशी संबंध येत नाही. जीवनाचा श्रेष्ठ ध्येयवाद निश्चित करणारा तो ग्रंथ आहे. महर्षी व्यासांच्या दिव्य प्रतिभेतून ज्या अनेक व्यक्ती चित्रीत झाल्या त्यातील काही प्रमुख शास्त्रीबुवांच्या लेखणीनं रेखाटल्या आहेत. त्या आजही आपल्याला पथदर्शक ठरतील अशी त्यांची धारणा आहे." दुर्गुणांचा अतिरेक झाला तर विनाश अटळ असतोच पण सद्गुणांचा अतिरेक झाला तरीही कार्य नासतं हेच व्यासमहर्षींनी महाभारतातल्या विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. या मुद्द्याचा विचार करता प्रस्तुत पुस्तकातील स्त्रीव्यक्तिरेखांमधील बहुतेक व्यक्तिरेखा धर्मकार्पण्य़ाच्या बळी ठरलेल्या दिसतात. धर्म आणि तत्त्वज्ञान यांनी सामर्थ्याला नियंत्रित करण्य़ाऐवजी सामर्थ्यच त्यांना नियंत्रित करू लागले. अधर्माचे तम दाटले आणि दिशा अंधारल्या. या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या या स्त्रीव्यक्तिरेखा एखाद्या विद्द्युल्लतेप्रमाणे भासतात. प्रथदर्शनी त्या हतबल वाटतात परंतु लेखकाचे अभ्यासपूर्ण विवेचन समजून घेत गेले की या स्त्रियांनी अधर्मशरणता ठामपणे नाकारत आपल्या धर्मशील आचरणाच्या तेजाने आपले केवळ व्यक्तिमत्वच नव्हे तर समाजमनदेखील झळाळून टाकलेले दिसते. स्त्री आणि भूमी ही नवनिर्मितीची केंद्रे आहेत. त्यातूनच विश्वनिर्मितीमागचे जे अदितत्त्व आहे तेही स्त्रीरूप आहे या धारणेतून देवतांचा उगम झाला. ’यत्र नार्यस्तु पूज्यन्ते ,रमन्ते तत्र देवत:’ हे आपले सांस्कृतिक गृहीतक मानले गेले. असे असले तरी प्रत्यक्षात वैर्‍यालाही देऊ नये अशी वागणूक या स्त्रियांना केवळ आप्तस्वकीयांनीच नव्हे तर त्या ज्यांना परमेश्वरस्वरूप मानत, ज्यांच्याशी या स्त्रियांचे आयुष्य गुंफले गेले होते अशा पतीनेही दिल्याचे चरित्रवर्णनात दिसून येते. अशा प्रसंगांच्या अग्नीपरिक्षेतून जाताना या स्त्रीव्यक्तिरेखांनी आपले स्त्रीत्व मात्र होरपळू दिले नाही हे बाळशास्त्रींच्या विवेचनातून प्रत्ययास येते. असामान्य गुणांच्या या शलाका त्यात लीलया उत्तीर्ण तर झाल्याच उलट त्यांच्या दिव्यत्वापुढे परिक्षा घेणारे खुजे ठरले. या स्त्रियांनी आपले स्त्रीत्व अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे नजर उचलून पाहणे सर्वसामान्यांना अशक्य व्हावे. ’महासती गांधारी’ या लेखातले बाळशास्त्रींचे सुरूवातीचेच वाक्य आपल्याला गांधारीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देते. ते लिहितात, ’दुर्योधनासारख्या कलिपुरूषाची माता आणि राजा धृतराष्ट्रासारख्या पाताळयंत्री खलपुरुषाची पत्नी होण्याचे दुर्दैव जिच्या वाट्याला आले ती महासती गांधारी भारतातील स्त्रीरत्नांच्या अग्रभागी शोभण्याच्या योग्यतेची आहे.’ श्रीशंकराची आराधना करून शतपुत्रप्राप्तीचा वर मिळवणारी गांधारी, ज्या अर्थी आपला पती सृष्टीच्या दर्शनसुखाला आचवला आहे त्याअर्थी त्याच्या सुखदु:खाशी एकरूप होणे हेच खरे विवाहबंधन मानून त्यासाठी आपले नेत्र कापडाने सदाचे झाकून घेणारी आणि त्याच्यासह आपला देह वनातील वणव्याच्या अग्नीत समर्पण करणारी दृढनिश्चयी आणि पतीपरायण गांधारी आपल्याला परिचित असते. परंतु आपल्या दिव्यदर्शी न्यायप्रियतेने वात्सल्याच्या स्वाभाविक मोहपाशावर मात करणा‍र्‍या गांधारीशी बाळशास्त्री आपला परिचय करू देतात. युद्धानंतर मृतावस्थेत धुळीत पडलेल्या दुर्योधनाकडे पाहून विलाप करणारी, ज्यांना धर्माचे आधारस्तंभ मानावे अशा पांडवांनी आपल्या पुत्रांना अधर्माने मारले हे पाहून चवताळून उठलेली, कुरूकुलनाशाला श्रीकृष्णाला जबाबदार संबोधून ’तुझ्या स्त्रियाही अशाच हतपुत्र व निहतबांधव अवस्थेत विलाप करतील’ असा घोर शाप देणारी विकलहृदयी माता हे गांधारीचं एक सर्वसामान्य रूप किंवा स्त्रीस्वभावाचे स्वाभाविक वैशिष्ट्य. राजसभेत संधीच्या वाटाघाटी चालू असताना न्याय व धर्म यांच्या नियमाप्रमाणे अर्ध्याच नव्हे तर सर्वच राज्याचे अधिपती पांडव असल्याचे- त्यांची मागणी न्याय्य असल्याचे दुर्योधनाच्या तोंडावर राजसभेला सुनावणारी गांधारी, युद्धाला प्रयाण करण्यापूर्वी दुर्योधन तिचा आशीर्वाद घ्यायला आला तेव्हा ’जिकडे धर्म त्या पक्षाचाच जय होईल’ असे तटास्थपणे ऐकवणारी गांधारी, ’काम-क्रोध जिंकील तोच पृथ्वी जिंकील आणि तोच राजधर्म आहे’ असा दुर्योधनाला भर सभेत उपदेश करणारी गांधारी, ही तिची असामान्य रूपे. तिला महाभारतात महाप्राज्ञा व दीर्घदर्शिनी अशी विशेषणे जोडलेली का आढळतात हे बाळशास्त्रींच्या लेखातून सप्रमाण स्पष्ट होते. ’राजमाता कुंती’ हा या पुस्तकातील दुसरा सविस्तर लेख. निर्जीव धनाप्रमाणे तिच्या पित्याने तिला कुंतिभोजाला देऊन टाकले. लहानपणी पित्याने व मोठेपणी श्वशुराने तिची वंचना केली. दुर्वासांनी तिला दिलेल्या वरदानामुळे औत्स्युक्यापोटी ज्यांना आवाहन केले ते सूर्यनारायण उपस्थित झाले आणि ’देवाचे दर्शन व्यर्थ न व्हावे’ या त्यांच्या आग्रहातून तिला तेजस्वी, कवचकुंडलमंडित कर्ण या पुत्राची प्राप्ती झाली. नकळत घडलेल्या या अपकृत्यामुळे लज्जित होऊन तिने त्या पुत्राचा त्याग केला. अर्जुनाने कर्णाला पहिल्या शस्त्रपरिक्षेत आव्हान दिले तेव्हा तिने कर्णाला ओळखले. त्याला भेटून तिने ’तू सूतपुत्र नाहीस, माझा पुत्र आहेस, कौन्तेय आहेस, तेव्हा तुझ्या बंधूंना संरक्षण दे’ अशा शब्दात त्याचा अनुनय केला. त्याच्या वधानंतर तरी त्याला सद्गती लाभावी यासाठी तिचे मातृहृदय तळमळत होते. कुंतीची ही कथा सर्वश्रुत आहे. बाळशास्त्री या राजमातेचे त्या पलिकडचे पैलू अधोरेखित करतात. अंत:करणात किंचितही सापत्नभाव न ठेवता माद्री या सवतीशी प्रेममय संबंध निर्माण करणारी कुंती, ’स्त्रीसंग केल्यास मरण ओढवेल’ या शापवाणीमुळे राजभोगाचा मोह सोडून पती पांडूला तपस्यामय जीवनात बरोबर राहू द्या म्हणून विनवणी करणारी कुंती, निपुत्रिकपणाच्या दुर्गतीतून पतीला वाचवण्यासाठी नियोग पद्धतीने तीन पुत्रांना जन्म देणारी व पतीनिधनानंतर माद्रीच्या दोन पुत्रांसह पांडवांचा ममत्वाने सांभाळ करणारी वत्सल विशालहृदयी कुंती बाळशास्त्रींनी या लेखातून चितारली आहे. ज्येष्ठ पुत्राच्या द्यूतप्रियतेमुळे राज्य गमावण्यापासून द्रौपदी वस्त्रहरणापर्यंत झालेली अवहेलना पाहून तिचे अंत:करण शतश: विदीर्ण होऊन गेले परंतु त्याही स्थितीत तिने विजनवासात निघालेल्या द्रौपदीला खंबीर राहण्य़ाचे आवाहन करून धैर्याने निरोप दिला. तेरा वर्षे पुत्रवियोगाचे दु:ख भोगल्यावर अपमानाचा सूड घेऊन आपले पुत्र राज्य परत मिळवतील ही तिची रास्त अपेक्षा होती परंतु ते तर राहोच, आपले पुत्र केवळ पाच गावे मागून संधी करत आहेत हे कळताच प्रदीप्त होऊन उठलेली कुंती आणि तिचे ऐहिकापेक्षा पारलौकिकाचे आकर्षण बाळशास्त्रींनी अगदी नेमकेपणे मांडले आहे. आपल्या पुत्रांच्या हातून धर्म घडावा म्हणून शत्रूंनी केलेल्या उपहासाची, नालस्तीची आणि त्या विटंबनेचा सूड घेण्य़ाच्या कर्तव्याची त्यांना जाणीव करून दे, असा तेजोगर्भ निरोप श्रीकृष्णाला देणार्‍या कुंतीच्या वक्तव्यात पतित राष्ट्राचे उत्थापन घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे असे बाळशास्त्री प्रतिपादित करतात. तरीही तिचे खरे वैशिष्ट्य त्यांना आढळते ते तिच्या अपूर्व त्यागात. वीरमाता म्हणून कर्तव्यपूर्ती करून युद्धात विजयी झाल्यानंतरही राजोपभोग घेण्याऐवजी पुढील कर्तव्य म्हणून कुंती, गांधारी व धृतराष्ट्र यांच्या शुश्रुषेत निमग्न राहिली. त्यांच्याचबरोबर तिने आपले शरीर वनातील वणव्यात समर्पित केले. कुंतीच्या जीवनप्रवासाच्या नंदादीपाच्या प्रकाशात खर्‍या आर्यस्त्रीजीवनाची प्रचिती येते हे बाळशास्त्रींच्या वाक्यावाक्यातून प्रत्ययाला येते. आर्य स्त्रीच्या तेजस्वितेचा कुंती हा देदिप्यमान आणि दाहक असा अविष्कार त्यांनी प्रस्तुत केला आहे. युधिष्ठीराच्या धर्मकार्पण्याचे कुंतीहून अधिक करूणास्पद बलिदान म्हणजे द्रौपदी. अग्नीपासून उत्पन्न झालेल्या तेजस्विनी द्रौपदीच्या व्यक्तिवैशिष्ट्याची बीजे बाळशास्त्रींना तिच्या वैचित्र्यपूर्ण जन्मकथेत तर पुढील महाभारताची बीजे तिने तिच्या स्वयंवरात लक्ष्यवेधाचे आव्हान स्वीकारणार्‍या कर्णाला सूतपुत्र म्हणून रोखताना केलेल्या वक्तव्यात आढळतात. द्यूतात पराजय झाल्यानंतर रजस्वला स्थितीतील द्रौपदीची झालेली घोर विटंबना, तिचा करूण विलाप आणि पतींसह सर्व आप्तस्वकीय खाली माना घालून बसलेले असताना श्रीकृष्णानी केलेले तिचे लज्जारक्षण, विराटपर्वातील कीचकवध हा महाभारतातील भाग सर्वपरिचीत आहे. यापलिकडची ओजस्वी, क्षत्राणी द्रौपदी बाळशास्त्री रेखाटतात. या घटनांनंतर युधिष्ठीर आणि भीमाला अग्नीज्वालेसमान प्रखर वृत्तीच्या द्रौपदीने त्यांचे अंत:करण जळेल, त्यांच्या अस्मितेला चेतवेल असे स्फुल्लिंगासारखे तप्त, खडे बोल सुनावून निरूत्तर केले. गांधारीने तिला वर मागावयास सांगितला तेव्हा तिने युधिष्ठीराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला, धृतराष्ट्राने दुसरा वर माग म्हटले तेव्हा बाकी ४ पांडवांचे शस्त्रास्त्रांसहित स्वातंत्र्य मागितले आणि तिसरा वर माग म्हटल्यावर त्या महामानिनीने ’लोभ धर्माचा नाश करतो, स्वतंत्र झाल्यावर माझे पती स्वकर्तृत्वाने गेलेले वैभव परत मिळवतील’ असे क्षात्रधर्माला शोभणारे उत्तर दिले. द्रौपदीची व्यक्तिगत जीवनातली गृहकृत्यदक्ष वागणूक आणि तिचे सहजीवनासंबंधीचे विचार या लेखात तिच्या आणि सत्यभामेच्या संवादातून समोर येतात. तत्कालानुसार पती हाच परमेश्वर हे केंद्रस्थानी ठेवून या विचारांची मांडणी केलेली असली तरी त्या संवादातून झळकणारे तिचे अष्टपैलूत्व आणि आत्यंतिक परिपक्वता आपल्याला नतमस्तक करते. समकालीन गृहकलहांमधील अनेक प्रश्नांची उत्तरे द्रौपदीच्या प्रगल्भ विचारपद्धतीतून सहज मिळू शकतात. तिच्या व्यक्तिमत्वाचे हे असामान्यत्व बाळशास्त्री उलगडतात तेव्हा तिचा समावेश बाळशास्त्रींनी भारतीय जीवनादर्श मालिकेत का केला असावा याचे उत्तर मिळते. सीता व द्रौपदीची तुलना करताना बाळशास्त्रींनी म्हटले आहे," सीतेचे महनीय सद्गुण महासती द्रौपदीइतकेच उज्ज्वल आहेत, दोघीही अयोनिजा आहेत, परंतु त्यांच्या भाग्यरेषेत मात्र भिन्नता आहे. सीतेची दु:खे श्रीरामचंद्रांच्या दिव्य कर्तव्यनिष्ठेतून उद्भवली आहेत त्यामुळे दु:खाग्नीत देखील कर्तव्यपूर्तीसाठी बलिदान घडत असल्याचे समाधान सीतेला लाभले." सीता आणि रामचंद्रांचा देह जरी वेगळा असला तरी त्यांची हृदये एकरूप होती. त्यांचे रम्य दंपतीजीवन बाळशास्त्रींनी वर्णिले आहे. कैकेयीच्या वरानुसार भरताला राज्य मिळावे म्हणून श्रीरामचंद्रांना वनवास पत्करावा लागला तेव्हा तिच्या आदर्श वर्तनाने आणि चारित्र्याच्या दिव्यतेने जगाला भारले, प्रत्येकाच्या अंत:करणात तिच्याविषयी आदराची भावना उत्पन्न झाली. तिच्या वादकौशल्याचे, बुद्धीमत्तेचे आणि धर्मशास्त्रातील पांडित्याचे यथोचित वर्णन बाळशास्त्रींनी केले आहे. लोकापवाद टाळण्य़ासाठी व राजसिंहासनाची इभ्रत राखण्यासाठी श्रीरामाने गरोदर स्थितीतील सीतेचा जेव्हा परित्याग केला तेव्हा त्यांच्या कर्तव्यपालनामागील अगतिकत्व समजून घेण्याइतकी तिच्या हृदयातील विशालता बाळशास्त्रींच्या वर्णनातून अनुभूत होते. लवकुशांच्या जन्मानंतर तिचा स्वीकार करण्यापूर्वी अग्नीदिव्य करण्याची अट तिला श्रीराम निरुपायाने घालतात तेव्हा मात्र आपले निष्कलंकत्व पटवून देतानाच ती देवी वसुंधरेला आपल्या उदरात आश्रय देण्याचे स्वाभिमानी आवाह्न करते. देवी सीतेच्या दैवी चारित्र्याचा तितकाच भव्यदिव्य अविष्कार बाळशास्त्रींच्या लेखणीने घडवला आहे. या वर्णनांमधील अनेक स्तिमित करणार्‍या घटना या दंतकथा असू शकतात. मूळ कथानकावर थर पडत गेलेले असू शकतात. उदा: ज्ञात स्त्रोतांनुसार भारतात लोखंडी उपकरणे इ.स.पू. चौथ्या शतकापासून आढळतात पण प्रगत लोखंडाचा प्रभाव गुप्तकालीन म्हणजे इ.सनाच्या चौथ्या-पाचव्या शतकातला ठरतो. परंतु या स्त्रियांच्या संबंधित कथानकांमध्ये विशिष्ट धनुष्याचे उल्लेख येतात. त्यामुळे याकडे रुपक अर्थाने पाहणे तर्कसंगत ठरते. आचार्य विनोबा भावे यांनीही महाभारतातील गीतेला केवळ धार्मिक ग्रंथ न मानता कौरव आणि पांडवांमधील द्वंद्व म्हणजे आपल्याच मनातील सद्भावना आणि असद्भावना यांच्यातील द्वंद्वाचं एक कविकल्पित रूपक मानलं आहे. बाळशास्त्रींच्या स्त्रीव्यक्तिरेखांच्या आयुष्यात देखील माणूस आणि मूल्य यांच्यामधला चिरंतन लढा सातत्याने दिसून येतो. या लढ्यात आपल्या मूल्यांशी सदैव प्रामाणिक राहून आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणार्‍य़ा या स्त्रिया विलक्षण ठरतात. त्यासाठी त्यांनी जे सोसले, जो त्याग केला त्याचे वर्णन बाळशास्त्रींनी अत्यंत उत्कटपणे केले आहे. या स्त्रियांना आपल्या कर्तव्याचे भान आहे तितकीच हक्कांची जाण आहे. जीवनाची ओढ आहे तितकीच विवेक आणि मूल्यांच्या बदल्यात मिळणार्‍या अशाश्वत सुखसमृद्धीबद्दल अनासक्ती आहे. त्यांचे पती अनेकदा हे भान विसरले परंतु या तेजस्वी स्त्रियांनी आपले पाय सत्याच्या भूमीवर कायम स्थिरपणे रोवून ठेवले. प्रसंगी त्यांनी जगण्याच्या पारंपरिक मर्यादा अमान्य केल्या आहेत. स्वत:चे नवे क्षितिज निर्माण केले आहे. जसजशी यातील एक एक स्त्री आपल्या समोर बाळशास्त्रींच्या लेखणीतून तळपत सामोरी येते तसतसे तिच्या प्रतिभ दर्शनाने आपण दिपून जातो. पुस्तकातील इतर लेख तुलनेने लहान पण तितकेच अर्थगर्भ आहेत. सावित्री उपाख्यानाच्या कविला सर्वश्रेष्ठ महाकवि मानणार्‍या डॉ. विंटरनिट्झ यांच्या विचारांचे दाखले बाळशास्त्रींनी वेळोवेळी काही लेखात दिले आहेत. जडवादी पाश्चात्य मनावर ज्या भारतीय विचारांनी मोहिनी घातली आहे त्यात सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे असे बाळशास्त्री म्हणतात. मद्रदेशाची राजकन्या असूनही ऐश्वर्यशील जीवनाचा मोह तिच्या अंत:करणात उत्पन्न झाला नाही तसेच मृत्युसारखी भयानक गोष्ट देखील तिच्या विलक्षण चारित्र्याच्या ध्येयवादाला बाधा उत्पन्न करू शकली नाही. बाळशास्त्रींच्या शब्दात सांगायचे तर, ’जीवनाचे चंदन जितके उगाळले जाईल तितका त्याचा परिमल अधिक दरवळेल हाच भारतीय स्त्रीजीवनाच्या व्रताचा विषय असलेल्या सावित्रीच्या जीवनाचा अर्थ आहे.’ पती सत्यवानावर मृत्युदेवतेने आपले पाश फेकल्यानंतर ऋजुता, बुद्धीचातुर्य, वाक्पटुत्व आणि दिव्यतेने तिने प्रत्यक्ष मृत्युला जिंकले. आपल्या कृतीने सावित्री भारतीय स्त्रियांच्या पूजास्थानी पोचली. सावित्रीची आत्मसाधना अलौकिक आहे. सावित्रीचे उपनिषद हे ज्ञानोपनिषद आहे त्याचबरोबर यावरील लेखातील बाळशास्त्री लिखित संवाद स्त्रीत्वाच्या केवळ पतीपरायणतेचा नव्हे तर तिच्या चातुर्याचा तसेच पतीपत्नीतील अनुबंधाच्या मांगल्याचा साक्षात्कार घडवणारे आहेत. उदा: द्यायचे झाले तर, तिला ’पतीच्या जीवनाव्यतिरिक्त हवा तो वर माग’ असे सांगणार्‍या मृत्युशक्तीच्या अधिष्ठात्याला सावित्री उत्तर देते, "मातृभावना ही स्त्रीजीवनाचे सांदीकोपरे व्यापून राहणारी भावना आहे. क्षत्रियाच्या कुळाला योग्य असे बलवान आणि पराक्रमी पुत्र मला असते तर मला समाधान लाभले असते." म्रुत्युदेवतेने तसा आशीर्वाद देताच तिला पेचात पकडत सावित्री विचारते," आपण मला शतपुत्रांची माता होशील असा वर दिला परंतु पतीचे जीवित देण्य़ास मात्र आपण सिद्ध नाही. आर्यधर्मानुसार माझ्या पात्तिव्रत्याला कलंक लागणार नाही असे मातृत्व मला मिळण्याची शक्यता कशी आहे?" या शब्दांनी भानावर आलेल्या देवाधिदेवांना मग मृत्युच्या पाशातून सत्यवानाची मुक्तता करणे भाग पडते. . नलदमयंतीआख्यानातील लावण्यवती विदर्भकन्या दमयंती तसेच शाकुंतलोपाख्यानातील दुष्यंताच्या प्रतारणेने घायाळ झालेली मानिनी शकुंतला, पुत्राला रणोत्साही करणारी महाभारतातील माता विदुला, या तिघींबाबत मात्र बाळशास्त्रींनी विवेचनाऐवजी रंजनवादी कथाकाराची भूमिका घेतल्याचे दिसते त्यामुळे कुंती, सीता, गांधारी, सावित्री आणि द्रौपदीइतके त्यांचे दिव्यत्व मनावर ठसत नाही. तरीही अंतिमत: बाळशास्त्रींच्या लेखणीने (होमरच्या ’इलियड आणि ओडिसी’ या ग्रीक महाकाव्यांपेक्षा सात पटीने) मोठ्या अवकाशाच्या- महाभारताच्या पार्श्वभूमीवरील या स्त्रियांच्या जीवनाचे आदर्शत्व ज्या अंगभूत प्रतिभेने अधोरेखित केले आहे त्यातून, मानवी जीवनाचे असे एकही अंग नाही ज्याला व्यास कवेत घेत नाहीत अर्थात, ”व्यासोत्छिष्टं जगत्सर्वं’ या उक्तीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपल्या साहित्यात रामायण (आदर्शवादी) आणि महाभारत (वस्तुनिष्ठ) असे दोन साहित्यप्रवाह मानले जातात. बाळशास्त्रींनी या दोन्ही प्रवाहांच्या अंतर्गत गोफाची अतिशय व्यासंगी नजरेने नोंद घेतलेली दिसते. त्या ताण्याबाण्यात विणल्या गेलेलं भारतीय स्त्रीजीवनातील आदर्शांची संयमी तरीही परखडपणे केलेली मांडणी एक समाजशास्त्रीय, मनोवैज्ञानिक घटित असल्यामुळे अभ्यासनीय ठरते. विचारातील निस्संदिग्धतेमुळे मुख्य व्यक्तिरेखेबाबतचे समकालीन वास्तव मांडताना तसेच त्यांचे आदर्शत्व अधोरेखित करताना संस्कृती जतन- संवर्धनाच्या नावाखाली तत्कालिन परिस्थितीचे किंवा कोणत्याही व्यक्तिरेखांचे अकारण समर्थन किंवा उदात्तीकरण बाळशास्त्रींनी केलेले नाही. आदर्श व्यक्तिकडूनही मानव्याचा अनुस्यूत भाग असलेले काही अपराध होतात त्याला या स्त्रिया अपवाद नाहीत परंतु कसोटीच्या क्षणी त्यांचे असामान्य वर्तन त्यांना जीवनादर्शाच्या पातळीवर घेऊन जाताना दिसते. पौराणिक संदर्भात लिहिताना ललित शैलीचा अतिरेक, त्यामुळे होणारा सत्याचा अपलाप, भारतीय इतिहासातले-संस्कृतीतले सारे कसे महन्मंगल असे मानण्यातला बाळबोधपणा यापासून त्यांची विद्वतापूर्ण शैली दूर राहिली आहे. त्यांच्या प्रतिपादनांना व्यासंगाची, ज्ञानाची आभा आहे. ’साहित्यिक’ हा शब्द वाटेल तसा वापरला जाण्य़ाचा आजचा काळ. त्याचा बावनकशी अर्थ समजून घ्यायचा तर हे पुस्तक वाचायलाच हवं. बाळशास्त्रींची शैली हा तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यांचा लेखनकाळ लक्षात घेता आजच्या सोशल मिडीयावरील मिंग्लीशच्या तुलनेत त्याची भाषा एखाद्या घरंदाज, भारदस्त व्यक्तिमत्वासारखी संस्कृतप्रचुर क्वचित दुर्बोध तरीही अतिशय आकर्षक वाटते. उदा: निषधाधिपती नलाबद्दल ते लिहितात,’ब्रह्मण्य, वेदवेत्ता, महान धनुर्धर, विजितेंद्रिय व सत्यवादी अशा या राजाची शाश्वत कीर्ती प्राचीन भारताच्या इतिहासात स्थिरपद झालेली असून पुण्यश्लोक पुरुषश्रेष्ठांच्या प्रात:स्मरणीय मालिकेत त्याला पहिले स्थान लाभले आहे.’ त्यांची एकेक विशेषणे कलदार नाण्य़ासारखी खणखणीत नाद करतात. श्रीराम-सीतेचे वनवासातील सुरुवातीचे रम्य सहजीवन बाळशास्त्रींनी अतिशय अलवारपणे रेखाटले आहे. श्रीराम सीतेला सभोवतालची माहिती देत आहेत, आपल्या पराक्रमांबद्दल सांगत आहेत आणि सीता आपल्या प्राणसख्याचे शब्द मनोभावे श्रवण करित आहे हा प्रसंग सांगताना सीतेच्या मुखावरील भावाचे वर्णन बाळशास्त्री त्यांच्या मोहक शैलीत असे करतात,’ सर्वांगाचे कान करुन आपल्या हृदयसंपुटात श्रीरामांचा प्रत्येक शब्द जपून साठवीत असताना अभिमानाच्या नव्या नव्या लहरींनी जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरुषाची सहधर्मिणी म्हणवण्य़ाचे भाग्य लाभलेल्या त्या स्त्रीच्या चेहर्‍यावर तांडव चालवले आहे हे दृश्यच किती हृदयंगम व अविस्मरणीय आहे.’ भरसभेत ओढून आणलेल्या द्रौपदीचा आक्रोश बाळशास्त्रींच्या लेखणीतून प्रकट होतो तेव्हा कारुण्यरसाबरोबरच तिचे शुचित्व आणि तिच्या धर्मविषयक संकल्पना अवघ्या काही शब्दांच्या योजनेतून ते लीलया साकार करतात, ’युधिष्ठीर धर्मबंधनाने बांधलेले आहेत. धर्म अत्यंत सूक्ष्म असून त्याचे रहस्य विचक्षणांनाही कळत नाही. या स्थितीतदेखील माझ्या पतींचे गुण सोडून त्यांच्या परमाणूएवढ्या सूक्ष्म दोषांचे अविष्करण करण्य़ाची माझी इच्छा नाही.’ परंतु बाळशास्त्री शैलीच्या मोहात गुरफटलेले नाहीत. लेखाच्या मुळात हिर्‍यासारख्या तेजस्वी गाभ्याला त्यांची शैली पैलू पाडते इतकेच. दुर्गाबाईंच्या शब्दात सांगायचं तर बासरी वाजवणारा बासरीत आपला श्वास ओततो तेवढ्याच आत्मीयतेने बाळशास्त्री हरदासांनी या स्त्रीव्यक्तिरेखा चितारल्या आहेत. महासती गांधारी, राजमाता कुंती, द्रौपदी, सावित्री, विदर्भकन्या दमयंती, विदुला, सीता आणि मनिनी शकुंतला या आदर्शवत् स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाचे विविध कंगोरे बाळशास्त्रींच्या सिद्धहस्त लेखणीतून उजागर होतात. या स्त्रियांचे थोरपण हे त्यांच्या सम्राज्ञीपदात नसून जीवन ही केवळ आत्म्याची गतिमानता आहे हे जाणून घेऊन त्यातील आव्हानांना सामोरे जाऊन त्यातही अनंताचे दर्शन घेण्यात आहे, हे बाळशास्त्री दाखवून देतात. स्त्रीजातीचे सनातन तेज आणि विवशता टिपताना तत्कालिन राजकीय, आर्थिक, धार्मिक अंगांचा शोध बाळशास्त्री घेतात. त्यातून त्या समाजाची विकासप्रक्रिया, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, कायदेव्यवस्था असे कित्येक पैलू समोर येतात. अर्वाचीन समाजाचा एक घटक आणि एक वाचक म्हणून आपण समृद्ध होत जातो.
---------------------------