कुठून येते ही उर्जा?
ज्या लक्ष्यपूर्तीसाठी कित्येक वर्षे तहान भूक हरपून मेहनत करायची, तो सुवर्णक्षण पुढ्यात असताना प्रतिक्रियांची पर्वा न करता अत्युच्च त्याग करायचा, ही जोखीम मोठीच. खेळाडूंमध्ये कुठून येत असेल हा अदम्य विश्वास? या कृतीमागे आंतरिक कौल असतो, की समयोचित तत्परता? देशातील कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचा डोंगर डोक्यावर सांभाळत अशी कृती करणे ही सोपी गोष्ट नाही. तरीही असतात असे काही जीव, जे जीवापाड परिश्रमांसमोरही मनाच्या प्रामाणिकतेशी सलगी करतात. एखादा सामना हरताना त्यांनी क्षणार्धात जगाला जिंकून घेतलेले असते. त्यागमूर्तींची यादी संपत नाही. आत्मबळ पेरणारी अशी व्यक्तिमत्वे देशाचाच गौरव वाढवितात. निवडक दाखल्यांचा उजाळा माणुसकीच्या उद्घोषाला प्रेरक ठरेल.
१९८८ चे सेउल ऑलिंपिक. कॅनडाचा लॉरेन्स लेमिक्स अटीतटीच्या नौकानयन स्पर्धेत सहभागी झालेला होता. स्पर्धा सुरु असताना दुसर्या एका शर्यतीतली नाव उलटलेली पाहून तो चक्क आपली शर्यत सोडून नौकेसह त्यांच्या मदतीला धावला. या गोंधळामुळे स्पर्धा संपली तेव्हा तो २२ व्या स्थानावर होता पण त्याला विशेष पदक देऊन गौरवण्यात आले.
१९९८ चे हिवाळी ऑलिंपिक. नॉर्वेचा बिजॉर्न डेहेल पुरुषांची क्रॉस कंट्री स्कीइंग स्पर्धा जिंकला. केनियाने या स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. केनियाच्या फिलिप बॉईटसाठी जिंकणे तर दूरच, १० किमी अंतर पार करणे हेच मुळात मोठे आव्हान होते. बिजॉर्नने आपला पदकग्रहण सोहळा फिलिप्स अंतिम रेषा ओलांडेतो थांबवला. त्याचे स्वागत केले आणि मगच पदक स्वीकारले.
२०१६ चे रिओ ऑलिंपिक. न्युझीलंडची निकि हॅम्ब्लेन आणि अमेरिकेची अॅबे अगोस्तीनो महिलांच्या ५००० किमी रॅलीच्या पात्रता फेरीतच एकमेकींना अडकून पडल्या. अॅबेला चांगलीच दुखापत झाली होती पण दोघींनी एकमेकींना आधार, प्रोत्साहन देत कसेबसे पण पूर्ण अंतर पार केले. शेवटी पोचूनही त्यांची निवड करण्यात आली.
२०२१ चे टोकोयो ऑलिंपिक. उंच उडीच्या अंतिम स्पर्धेत इटलीचा जिअनमार्को तंबेरी आणि कतारचा मुताझ इसा बरशीम यांच्यात सुवर्णपदकासाठी स्पर्धा सुरु होती. दोघांनीही सारखीच उंची गाठली त्यामुळे टायब्रेक झाला. पुढच्या ३ संधींबाबत असेच घडले. मग एक शेवटची संधी देण्याचा निर्णय झाला पण इटलीच्या खेळाडुचा पाय दुखावला गेल्यानं त्यानं ही संधी न घेता माघार घेतल्याचं जाहिर केलं. कतारचे सुवर्णपदक निश्चित होते तरीही त्याने सुवर्णपदक जिअनमार्कोशसह वाटून घेतले.
’जो जीता वोही सिकंदर’ हेच जगाचे खेळाकडे पाहण्याचे साधारण सूत्र आहे. या पार्श्वभूमीवर ही सगळी उदाहरणे वेगळेच काही सांगत आहेत. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विजय मिळवून कर्णधार अजिंक्य राहणे त्यांच्या घरी पोचला. अतिउत्साही क्रिकेट चाहते हे यश साजरे करण्यासाठी ’कांगारु’चे प्रतीक असलेला केक घेऊन गेले. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे तेव्हा हा केक कापून मी त्यांचा अनादर करणार नाही असे अजिंक्यने नम्रपणे स्पष्ट केले. खेळाच्या गाभ्याशी इतक्या निखळ, सच्च्या प्रेरणा असू शकतात हे अविश्वसनीय वाटावे अशी आज परिस्थिती आहे.
खेळात अधिकाधिक अर्थकारण गुंतल्यापासून बहुतेक खेळाडूंना जिंकायचे आहे ते आर्थिक लाभासाठी. विशेषत: लीग स्वरुपाच्या खेळात तर खेळाडूंवर बोली लावली जाते त्यामुळे कसे जिंकावे यासाठी वेगवेगळे डावपेच आखले जातात. उत्तेजक द्रव्यांची मदत घेतली जाते. मॅच फिक्सींगपासून अनेक नियमबाह्य प्रकार सर्रास केले जातात. ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज फर्म झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामत याने मध्यंतरी एका ऑनलाइन चॅरिटी सामन्यादरम्यान बुद्धीबळातील माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता. नंतर कामतला आपण संगणकाच्या मदतीने फसवणूक केल्याची कबुली द्यावी लागली. खेळात कायम जिंकावे असे वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यातून मिळणारी प्रचंड प्रसिद्धी हे यावरून लक्षात येईल.
जिंकायलाच हवे असे वाटण्यामागचे तिसरे आणि सर्वाधिक भावनाप्रधान कारण आहे राष्ट्रप्रेम. क्रिकेट जणू धर्म असलेल्या आपल्या देशात क्रिकेटखेळाडूंना जवळपास देव मानून मनात त्यांची प्रतिष्ठापना करणारे चाहते सामना हरल्यावर त्याच खेळाडूंचे पुतळे करून जाळायला मागेपुढे पाहात नाही. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना तर जणू मैदानावरचे युद्ध मानले जाते. तिथली हार-जीत ही संघाची नव्हे तर देशाची हार-जीत मानली जाते. देशाची अब्रू खेळाच्या मैदानावर जणू पणाला लागते. ऑलिंपिकमधल्या एकेका पदकाच्या प्राप्तीकडे तर अवघा देश डोळे लावून बसलेला असतो. खेळाडू तिथे देशाचे प्रतिनिधी म्हणूनच जात असतात. मीराबाई चानूने कास्यपदक मिळवले तरी ते फक्त तिचे पदक नसते. देशाच्या आकांक्षांच्या पूर्ततेचे ते प्रतीक असते. खेळात प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची ईर्षा असणे, विजिगीषु वृत्ती असणे हे अगदी स्वाभाविक आहे परंतु पदक मिळवायच्या, जिंकायच्या दडपणामुळे जिंकण्याच्या मार्गापेक्षा आणि खेळापेक्षा मह्त्व मिळते ते फक्त ’जिंकण्याला’. कोणताही देश याला अपवाद नाही. उदा: खोर्याने पदके मिळवणार्या चीनमध्ये यशस्वी खेळाडू ’निर्माण’ करणार्या राष्ट्रीय क्रीडासंस्थांमध्ये परतीचा मार्ग बंद झालेली अनेक बालपणं भरडली जातात कारण ’जिंकण्याला’ पर्याय नसतो.
या सगळ्या चौकटीला छेद देणारे काही असे काही प्रसंग घडतात जिथे कुणीच हरत नाही फक्त ’खेळ’ जिंकतो. केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई 2012 मधील स्पेन क्रॉस कन्ट्री स्पर्धेच्या शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेच्या जवळ आला होता. त्याने सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते. अचानक अंतिम रेषा समजून तो एक मीटर आधीच थांबला. त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या हे लक्षात येताच त्याने आधी ओरडून नंतर सरळ ढकलुन त्याला अंतिम रेषेपर्यंत पोचविले. पहिला येण्याची संधी ’घालवली’ असे इव्हानला वाटले नाही कारण अबेल पहिला आलेलाच होता. त्याच्या गोंधळाचा फायदा घेऊन सुवर्णपदक पटकावणे इव्हानला शक्य होते पण त्याने तसे न करता आपली हार स्वीकारली. इथे खरे तर तो माणूस म्हणून जिंकला. अशा खेळाडूंमुळे ते ज्या देशाचे प्रतिनीधीत्व करतात तो देश पदकतालिकेवर कोणत्याही क्रमांकावर असला तरी जेताच असतो. पूर्ण प्रयत्नांती खेळाडू जिंकला की हरला याइतकेच त्याच्यातला ’माणूस’ जिंकला हे आपण महत्वाचे मानायला हवे. या ऑलिंपिकमधील बॅडमिंटनच्या सामन्यात सिंधूच्या हातून रजतपदक गेल्यानंतर लगेच ’तिने आता निवृत्त व्हावे’ अशी टीका काही जणांनी सुरु केली. याच सिंधूने मागील ऑलिंपिकमध्ये कॅरोलिना मरिनकडून पराभव झाल्यानंतर तिने आनंदाच्या भरात फेकलेली रॅकेट विचलीत न होता शांतपणे उचलून तिच्या हतात दिली होती. सगळे क्रीडाजगत तिच्या या समंजस कृतीकडे कौतुकाने पाहत होते. अथक मेहनतीनंतरही केवळ तिने मिळवलेल्या पदकाचा रंग बदलला म्हणून तिच्या या उमदेपणाचा आपल्याला विसर पडू नये. खेळाडूंच्या मनाची मशागत इतक्या नेमकेपणाने झाली असेल तर प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज जिंकतो आणि पर्यायाने राष्ट्र जिंकते. राष्ट्र ही सामूहिक संकल्पना आहे पण राष्ट्रप्रेम ज्यातून सिद्ध होते ती कृती मात्र वैयक्तिक असते. जिंकण्याची ही आगळीवेगळी व्याख्या आणि खिलाडूवृत्ती अशा मोजक्या खेळाडूंपर्यंतच मर्यादित न राहता नागरिकांपर्यंत झिरपायला हवी.
क्रीडामानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम खेळाडूंची मानसिकता ओळखून त्यानुसार कोणते बदल उपकारक ठरतील याचा सतत अभ्यास करत असत. शारिरिक प्रशिक्षणाइतकेच महत्व ते मानसिक प्रशिक्षणाला देत असत. इतरांचं अगदी विरुद्ध पक्षाचं सुद्धा जे चांगलं असेल ते स्वीकारणं आणि त्यांचा अनुभव, मत, ज्ञान यांचा आदर करणं आपण शिकलो तरच वैयक्तिक आणि गटाचा विकास शक्य आहे, यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ते म्हणत ,"चुरशीची स्पर्धा असतांना मैत्र आणि नाती ही प्रेमाने आणि संघभावनेने मजबूत करायची असतात. द्वेष, मत्सर, शत्रूत्व या उपटसुंभ भावनांना मूठमाती द्यायची असते. म्हणजे मग आयुष्य ख-या अर्थाने संपन्न होत असते. हे सारेच स्पर्धात्मक खेळांतून शिकता येते. ते पालक, शिक्षक व प्रशिक्षक यांनीही शिकून घेऊन आपल्या वागण्याने पुढच्या पिढीवर संस्कार करायचे असतात."
हे शिकता आले, आचरणात आले, तर 'सहनाववतु' म्हणजेच आमचा कुटुंब म्हणून, समाज म्हणून, देश म्हणून आणि अंतिमतः विश्व म्हणून एकत्रित विकास होवो, या प्रार्थनेला अर्थ लाभेल. आपण 'हे विश्वची माझे घर' असे मनाच्या तळाशी स्वीकारलेले असते; परंतु ही भावना तिथेच राहते. ती व्यवहारात येत नाही. तसे असते, तर प्रत्येक देशाला विकासकामांपेक्षा जास्त खर्च संरक्षण व्यवस्थेवर करावा लागला नसता. परंतु खेळ इथे दुवा म्हणून काम करु शकेल. ज्यातून संवादाची संधी निर्माण होऊ शकेल. वैश्विक शांतता निर्माण व्हावी आणि देशांमध्ये परस्पर सामंजस्य वाढावे, हेच प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट्य असते. खेळात जिंकण्याची मौज काही वेगळीच; पण माणूसपणाची सरशी तितकीच महत्त्वाची आहे. ते भान रुजवणे, हेच खेळाचे साध्य आहे. यासाठी अगदी सोपा नियम मार्क ट्वेन त्यांच्या मार्मिक शैलीत सांगून गेले आहेत. "It's good sportsmanship to not pick up lost golf balls while they are still rolling". कतारच्या बरशीमने सुवर्ण पदकात इटलीच्या तंबेरीला वाटा देत घेतलेली उंच उडी, स्टेडियम पार करून कित्येकांच्या मनापर्यंत पोचली. अशी अद्भूत उर्जेची उदाहरणे पाहता 'नहीं जिता वो भी सिकंदर' म्हणायला हवे कारण तो जगातील मानसिक परिपक्वतेचा, विवेकाचा विजय ठरतो.
published in महाराष्ट्र टाईम्स- संवाद पुरवणी -8 Aug 2021