"आमची मुलं अवांतर काही अजिबात वाचत नाहीत!" आजच्या बहुतेक पालकांची ही तक्रार असते. मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेल्या आपल्या मुलाच्या वयात शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला होता हे आठवून वैतागणार्या वडिलांना आपल्या वयाचे असताना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता हे ही आठवत असतं. तेव्हा मुलांनी खूप वाचावं अशी अपेक्षा करताना वाचनाच्या बाबतीत आपण किती पाण्यात आहोत, काय आणि किती वाचतो या्चा विचार पालकांनी करायला हवा. ’तुम्ही सध्या काय वाचता?’ या प्रश्नाला (अपवाद वगळता) बहुतेकांचं उत्तर ’हॅ हॅ हॅ, वेळच होत नाही हल्ली वाचाबिचायला’ हे असतं. नाही म्हणायला लॉकडाऊनमध्ये बर्याच जणांनी वाचनाकडे पुन्हा वळण्याचा प्रयत्न केला पण घरातली कामं बरीच वाढल्याने तो उत्साह हळूहळू मावळायला लागला.
या पार्श्वभूमीवर एखादी ट्विंकल खन्ना लेकीसोबत रोज पंचवीस पानं वाचायचा संकल्प करुन त्या दोघींचा वाचतानाचा फोटो social media वर शेअर करते तेव्हा साधारणपणे पहिली प्रतिक्रिया उमटते -’तिच्याकडे छप्पन नोकर असतील कामाला मग काय वेळच वेळ!’ खरं तर ’मिसेस फनीबोन्स’ म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी ट्विंकल एक प्रसिद्ध लेखिका, ब्लॉगर, उत्तम वाचक आणि यशस्वी व्यावसायिक आहे. "पाहिलेलं किंवा ऐकलेलं काही क्वचितच माझ्या मनावर कोरलं जातं, पण जे मी वाचते ते मात्र कायमचं मनात रुतून राहतं. कदाचित यामुळेच मी अभिनेत्री म्हणून अयशस्वी ठरले असले तरी लेखिका म्हणून यशस्वी ठरले आहे", असं ती म्हणते. वाचावंसं न वाटण्याचं किंवा वाचन कमी होण्यामागचं खरं कारण ’वेळ नाही’ हे नाही हे आपल्यालाही मनातून मान्य असतं. माहितीच्या महापुरात तग धरताना जग हळूहळू समजून घेण्याविषयीची कमी झालेली असोशी आणि वाचनातून मिळणार्या आनंदापेक्षा दृकश्राव्य माध्यमातून विनासायास होणार्या रंजनाचे वाढते आकर्षण हे त्यामागचे कारण आहे. मुलांवर या माध्यमांचा पगडा पालकांपेक्षा जास्त असल्याने याचा परिणाम त्यांच्या वाचनावर होणार हे स्वाभाविकच.
मग या अपराधी भावनेतून देण्याघेण्याच्या ब्लाउजपीससारख्या चार मोफत पीडीएफ इकडून तिकडे फॉरवर्ड केल्या म्हणजे आपली वाचनविषयक जबाबदारी संपत नाही. उलट त्यातून लेखक, प्रकाशकाच्या पोटावर पाय येण्याची शक्यता असते. बाहेर जेवायला हजारएक रुपये खर्च करणार्या पण दोनशे रुपयाचं पुस्तक विकत घेताना खळखळ करणार्या, ह्ल्ली ’चांगले’ लेखक सापडत नाहीत अशी ओरड करणार्या पालकांना आज एका क्लिकवर जागतिक साहित्य उपलब्ध आहे. अरविंद गुप्तांसारख्यांनी बालसाहित्याचा खजिना ऑनलाईन खुला केलेला आहे. मुळात आपण वाचन हे ज्ञान मिळवण्यासाठी, स्वत:चा विकास घडवण्यासाठी, स्पर्धा परिक्षेत यश मिळवण्यासाठी, अमुक तमुक अशा भव्यदिव्य कारणासाठी करण्याचा जितका प्रयत्न करतो तितके आपण वाचनापासून दूर जातो. वाचन निर्हेतूक असावं. असं वाचन आपच आत मुरत जातं. बाकी ज्ञानबिन, यशबिश मिळालंच तर ते त्याचे साईड इफेक्ट्स आहेत.अजिबात किंवा फारसं न वाचताही आयुष्यात आनंदी, समाधानी, यशस्वी असलेले लोक अर्थातच आहेत पण वाचन हे स्वत:साठी करायचं असतं हे कळलं आणि त्या प्रक्रियेतला निर्भेळ आनंद गवसला की वाचन आपसूक होत जातं.
"काळ चंद्र सूर्यांच्या झांजा वाजवत पुढे चालला होता.." एका वाक्यात असं अद्भुत लिहिणार्या गेल्या पिढीतल्या ह.ना.आपटयांपासून, "discomfort is good. In discomfort we are real” असं रोखठोक लिहिणार्या गेल्या वर्षीच्या बुकरविजेत्या मारिएके रिज्नेवेल्डपर्यंत, काहीही निरुद्देश वाचताना जे धक्के, तरंग, विलक्षण क्षण अनुभवायला मिळतात ते अलौकिक असतात. त्यात अनेक उत्तरं नकळत सापडत जातात. ती आपली मालमत्ता असते. अर्थात काय वाचावं याबाबत मतभिन्नता असू शकते पण "तुम्ही जर चारचौघांसारखं चाकोरीतच वाचन केलं तर तुमचे विचारही चारचौंघांसारखेच राहतील" असं मुराकामी बजावतात. तेव्हा वाणसामान गुंडाळलेल्या कागदांपासून वेब कंटेंटपर्यंत सरसनिरस न ठरवता वाचत जाणं आणि एका ट्प्प्यावर आपला कल कळला की त्यानुसार निवडक वाचन करणं या वाचनाच्या पायर्या म्हणता येतील. प्रत्येक पायरीवरची मौज अनुभवत पालकांना पुढे जाता आलं तर त्यांना मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. तरुणपणी आपण उत्तम वाचक होतो म्हणणार्या अनेक मराठी पालकांच्या वाचनाच्या कल्पना त्याच पठडीत अडकून पडलेल्या दिसतात. ’श्यामची आई’ वाचताना आजची पिढी गहिवरुन येणार नाही, स्वामी-मृत्युंजय तिला कृत्रिम आणि भाबडं वाटू शकेल, अत्रे-पुलंचे विनोद काळ बदलल्यामुळे डोक्यावरुन जाऊ शकतील, बोरकर-कुसुमाग्रज फारच ’डिफिकल्ट’ वाटू शकतील, विद्रोही साहित्य एकसुरी वाटू शकेल. पालकांनी हे समजून घ्यावं. काय उत्तम ते सांगत राहावं परंतु मुलांचं वाचन जगाबरोबर बदलू द्यावं. पालक स्वत: छापील पुस्तकांना प्राधान्य देत असले तरी मुलांच्या वाचनाच्या पद्धती ई- बुक, ऑडिओ बुक, किंडल, व्लॉग (v-log) अशा बदलत जात आहेत, त्यांच्या वाचनाचं माध्यम मराठीच राहणार नाहीये हे ही त्यांनी स्वीकारावं.
’फेरारी की सवारी’ या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे. वडिल मुलाला पाठीमागे बसवून स्कूटरवरुन वेगाने जाताना घाईगडबडीत सिग्नल तोडतात. तो त्यांचा नेहमीचा रस्ता असल्याने परिचयाचा हवालदार त्यांना टोकत नाही. आपल्याकडून सिग्नल तोडला गेल्याचे लक्षात येताच वडिल परत फिरतात आणि हवालदाराला दंडाची पावती करायला सांगतात. हवालदार ’जाने दो साब, किसीने नही देखा’ असं म्हणतो. त्यावर वडिल म्हणतात,’लेकिन मेरे बच्चेने देखा ना! बच्चा जो देखेगा वही सिखेगा’ पालकत्वाचं सार कदाचित या वाक्यात आहे. वाचनही त्याला अपवाद नाही. थोडक्यात मुलांनी वाचायला हवं असेल तर नाक मुरडण्याऐवजी ट्विंकलकडून प्रेरणा घेऊन त्यांना पुस्तकांचं सान्निध्य द्यावं लागेल, वाचनातला आनंद आपल्याला त्यांच्या सोबतीने नव्याने शोधावा लागेल.
(published in Divya Marathi - Madhurima - 9 feb 2021)