विनोद निखळ आणि मार्मिक असेल तर तो हसवता हसवता अंतर्मुख करतो. वैचारिक खुजेपण दूर करण्यासाठी, समाजात हळू हळू का होईना, सकारात्मक बदल घडवण्यासाठी विनोदाइतके प्रभावी माध्यम दुसरे नाही. समाजाची विनोदबुद्धी आणि मनाचे उमदेपण बेताचे असेल तर मात्र ’ट्विट’मधला उपरोध लक्षात न आल्याने या वर्षाच्या सुरुवातीस मुंबई महापालिकेतून बदलीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार्या निधी चौधरींसारखी परिस्थिती वाट्याला येते. या पार्श्वभूमीवर मराठी साहित्यातील विनोदाची गंगोत्री मानल्या जाणार्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या (जून २९, १८७१ - जून १,१९३४) निर्विष आणि सहज आकलन होणार्या विनोदाची प्रकर्षाने आठवण होते. नवल म्हणजे त्यांच्या खुसखुशीत लेखनातून अधोरेखित झालेल्या सामाजिक विसंगतींचे बरेच संदर्भ तब्बल एका शतकानंतर आजही तंतोतंत लागू पडतात. पु.लं. देशपांडे यांच्या ’गुळाचा गणपती’ या चित्रपटाचे ’सबकुछ पुलं’ असे कौतुक होत असताना पुलं गमतीने म्हणाले होते, "त्यामध्ये प्रेक्षक पण धरले नसावेत म्हणजे मिळवली." याच चालीवर कोल्हटकरांच्या विनोदाचा मासला द्यायचा झाला तर त्यांनी स्वत:च्या ’संगीत मूकनायक’ या नाटकाच्या १९०१ साली लिहिलेल्या प्रस्तावनेत मिश्कीलपणे नमूद केले आहे ,"प्रस्तुत नाटक १८९७ साली लिहिले गेले आहे. ते संपूर्ण झाल्यावर तीन वर्षे नायकाप्रमाणेच मूक होऊन बसले होते." नाटककार, विनोदकार आणि वाङ्मयसमीक्षक म्हणून एके काळी प्रचंड गाजलेल्या कोल्हटकरांचे आज विक्रीसाठी उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक म्हणजे 'सुदाम्याचे पोहे'. ही वस्तुस्थिती बघता कोल्हटकरांचे साहित्यही आज जणू मूक होऊन बसले आहे. या वर्षी (२०२०) त्यांची दीडशेवी जयंती साजरी होत आहे, त्या निमित्ताने न. चिं. केळकरांनी ’मराठी साहित्यातील विनोदपीठाचे आद्य आचार्य’ अशा शब्दात गौरवलेल्या या वैदर्भीय सारस्वताच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आणि विस्मृतीत जाऊ पाहणार्या साहित्यकृतींना बोलतं करण्यासाठी, हा लेखनप्रपंच.
कोल्हटकरांनी विषयानुसार गंभीर किंवा विनोदी शैलीत, चिंतनाची डूब असलेले समीक्षालेख, पुस्तकपरीक्षणे, प्रस्तावना, साहित्य संमेलनांतील भाषणे, अभ्यासलेख आणि निबंध लिहिले. ’दुटप्पी की दुहेरी’ आणि ’श्यामसुंदर’ ह्या कादंबऱ्या लिहिल्या. गीतोपायन हा त्यांचा कवितासंग्रह. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या प्रसिद्ध महाराष्ट्रगीताची रचना त्यांचीच. त्यांचे प्रभावी साहित्य तत्कालिन वाङ्मयव्यवहाराला दिशादर्शक ठरले. कोल्हटकर ही व्यक्ती न राहता जणू संस्था बनले असे म्हणूनच म्हटले जात असावे. त्यांच्या साहित्यसेवेचा सन्मान त्यांना १९२२ साली कविसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद व १९२७ साली १३व्या साहित्यसंमेलनाचे (पुणे) अध्यक्षपद देऊन करण्यात आला. ’भारतीय ज्योतिर्गणित’ ह्या ग्रंथाद्वारे या विषयातल्या आपल्या व्यासंगाची प्रचिती देत सांगलीला भरलेल्या ज्योतिष संमेलनाचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांचा जन्म आणि १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे तर उच्चशिक्षण पुणे व मुंबईत झाले. त्यांचे वडील अमरावती येथे शिक्षक होते. एल.एल.बी नंतर कोल्हटकरांनी अकोला, खामगाव येथे व्यवसाय केला आणि १९०१ साली ते बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.एकूण जन्मापासून ते कारकीर्दीच्या आणि वयाच्या उत्तरार्धापर्यंत त्यांचे जास्तीत जास्त वास्तव्य विदर्भातच होते.
अत्यंत सुधारक विचारांच्या कोल्हटकरांनी त्र्यंबक शंकर शेजवलकर, र. धों कर्वे अशा कर्तृत्ववान पण समाजाने अव्हेरलेल्या व्यक्तींना कायम प्रोत्साहन दिले. 'समाजस्वास्थ्य' मध्ये आलेला एकमेव मृत्युलेख म्हणजे कोल्हटकरांवरचा! ’घंटानादाच्या कंपनांमधून निर्माण होणार्या उर्जेमुळे कोरोनाचे विषाणू मरून जाणार असल्याच्या’ अशास्त्रीय आणि विनोदी म्हणाव्या अशा पोस्ट्स आजही समूहमाध्यमांवर भाबडेपणाने व्हायरल होतात, राजकारण जातीभोवती घुटमळत राहते मग विसाव्या शतकाच्या सुरूवातीची सामाजिक स्थिती किती कठीण असेल! जातीभेदाच्या वेटोळ्यात पुरत्या अडकलेल्या समाजाबाबत कोल्हटकर लिहितात,‘‘आपला समाज व्यक्तींचा बनलेला नसून जातींचा व पोटजातींचा बनलेला आहे. अशा समाजांत ज्ञानाचा किंवा संयमनाचा प्रसार करणें अशक्य नसलें तरी अत्यंत दुर्घट असतें. सर्व जीवात्मे परमात्म्याचींच स्वरूपें आहेत या अभेदप्रतिपादक सिद्धांतास हिंदु धर्माच्या तात्त्विक अंगांत जरी महत्त्वाचें स्थान आहे तरी त्याच्या वर्णव्यवस्थारूप आचारात्मक अंगावर त्याचा थोडासुद्धां परिणाम झालेला दिसत नाहीं." कोल्हटकरांनी लिहिलेली शेकडो पत्रे आणि त्यातून हाताळलेले विषयवैविध्य पाहता ते त्या काळाचे एक रंजक भाषेतले सामाजिक दस्तावेजीकरण म्हणता येईल. मात्र या पत्रांमधील विषयांच्या केंद्रस्थानी त्यांचे माणूसपण आहे.
कोल्हटकरांनी आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीची सुरुवात ’संगीत विक्रम-शशिकला’ नाटकावरील टीकेने (१८९३) केली. न. चिं. केळकरांच्या ’तोतयाचे बंड’ या नाटकाच्या समीक्षेत त्यांनी नाट्यलेखनकले विषयी तर ’रागिणी’ या वामन मल्हार जोशी लिखित कादंबरीच्या समीक्षेत कादंबरीलेखनकले विषयी विवेचन केले आहे. त्यांची समीक्षा जडजंबाळ नसायची पण तर्कशुद्ध आणि सखोल असायची. मराठीतील स्त्री लिखित पहिले गद्य नाटक म्हणजे गिरीजाबाई केळकरांचे ‘पुरुषांचे बंड’. यालाही कोल्हटकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी संगीत वीरतनय, मूकनायक, गुप्तमंजूष, मतिविकार, प्रेमशोधन, वधूपरीक्षा, सहचारिणी, जन्मरहस्य, परिवर्तन, शिवपावित्र्य, श्रमसाफल्य आणि मायाविवाह अशी पंचाक्षरी शीर्षकाची नाटके लिहिली. पैकी आठच रंगभूमीवर येऊ शकली. असे म्हणतात खुद्द कोल्हटकरांची सुद्धा खाडिलकर किंवा देवलांसारखी, रंगभूमी गाजवून टाकणारी एखादी तरी सांगितिका आपण लिहावी अशी मनीषा होती पण त्याच वेळेस ’सुदाम्याचे पोहे’ हा आपला हुकुमी एक्का असल्याचे ते जाणून होते.
कोल्हटकरांनी १९०२ साली लिहिलेला 'साक्षीदार' हा आधुनिक मराठी वाङ्मयातला पहिला विनोदी निबंध मानला जातो. ’शपथेशिवाय तोंडून एकही शब्द न काढणारा’, काढलाच तर ’धादांत खोटे बोलणारा’, माणसाच्या पागोट्याचा रंग वगैरे बारीकसारीक तपशीलात कालापव्यय करणारा पण स्वत:चे नेमके वय सांगू न शकणारा, कायद्याला नाचवणारा, व्यावसायिक साक्षीदार त्यांनी खुबीने रंगवला.
कोल्हटकरांनी हिंदू धर्मातल्या अनेक अनिष्ट आणि खुळचट प्रथा नष्ट व्हाव्यात आणि विवेकी समाज निर्माण व्हावा म्हणून आपले विनोदाचे हत्यार प्रतिगामींच्या वर्तनातील विसंगतीवर चातुर्याने चालवले. कर्मकांडाच्या अतिरेकावर टीका करताना कोल्हटकरांनी म्हटले आहे," दुष्काळात गरिबांस पोटास पुरेसे अन्न व पाठीस पुरेसे वस्त्र मिळत नसताना बायकांच्या लक्ष वाती तुपात जळत असतात. परकीयांनी आमची संपत्ती लुटून न्यावी पण आमच्यामधील पराक्रमी पुरुषांस ती परत खेचून आणण्यासाठी देशाची मर्यादा ओलांडण्याची सक्त मनाई? कोणत्याही कार्यास यश येण्यासाठी त्याच्या साधनांचे पूर्ण ज्ञान व त्यावर विश्वास असावा लागतो पण आपण मात्र प्रत्येक कार्याचा संबंध दैव, कर्म, ग्रह, घुबडे, मांजर, पाली अशा असंबद्ध गोष्टींशी लावतो."
आपण प्रथेच्या बाजूचे असल्याचे भासवून त्या प्रथेतला फोलपणा वक्रोक्तीचा वापर करून दाखवण्याची पद्धत कोल्हटकरांनी त्यांच्या बऱ्याच निबंधांमध्ये वापरली आहे. उदा: ’माझी भीष्मप्रतिज्ञा’ या निबंधात तत्कालिन लग्नपद्धतीवर कोरडे ओढताना प्रतिगामी ’उपवधू’ निवेदकाचे दिव्य विचार कोल्हटकर या शब्दात मांडतात, "मुलींना शिक्षण दिले म्हणजे त्यांना वल्लभास प्रणयपत्रिका पाठवता येऊन त्या वाममार्गास प्रवृत्त होतात अशी माझी पक्की समजूत असल्याने मी तिच्या बापास म्हटले, ती हे धडे विसरुन जाईल याची आपण काळजी घेऊ." आज ’मुली मोबाईलमुळे बिघडत असून त्यामुळे त्या पळून जाऊन लग्न करतात’ अशी मुक्ताफळे उधळणारे खासदार पाहिले की समाज आतून अजिबात बदललेला नाही फक्त साधने बदलली आहेत आणि कोल्हटकरांसारख्या लेखकाची अजूनही गरज नुरलेली नाही हेच ठळकपणे जाणवते.
समाजसुधारणा करण्याची विलक्षण ताकद विनोदाच्या अंगी आहे, हे कोल्हटकरांनी ओळखलं. शिमग्यातील अश्लाध्य चालीरीतींवर त्यांनी उपहासाचा वापर करत यथेच्छ टीका केली. प्रवृतीपेक्षा निवृत्तीचे वर्चस्व वाढलेल्या समाजातल्या पापपुण्याच्या हास्यास्पद कल्पनांची ’चित्रगुप्ताचा जमाखर्च’ लेखातून रेवडी उडवली. ’उपासाच्या कच्च्या मालाचे पक्क्या मालात रुपांतर करायला’ पत्नीस सवडही न देणार्या पांडुतात्यांच्या तथाकथित निर्जळी एकादशीवर मिश्कील भाष्य़ करत तर कधी सनातनी आणि सुधारक अशी परस्पर विरोधी पात्रे उभी करून सनातनी समाजाच्या वर्तनातल्या विरोधाभासाचे आणि बेगडीपणाचे त्यांनी मनोज्ञ दर्शन घडवले. ’साहित्यपरिषदेची तयारी’ या निबंधात त्यांचा प्रतिगामी विचारांचा कथानायक लेखकराव होण्यासाठी परदेशातून कथावस्तू चोरतो. मूळ कथेनुसार शेवट करायचा तर सुधारकी जोडप्याला सुखात पडलेले दाखवण्याचे धर्मसंकट त्याच्यावर ओढवते. मग तो लेखक त्यांच्या गाडीचा अपघात करवतो आणि त्याच डब्यातील सनातन्यांच्या पुण्याईने ते जोडपे त्यातून वाचल्याचे दाखवून तो आपली कशी सुटका करवून घेतो या घटनाक्रमाचे खोचक पण मनोरंजक चित्रण कोल्हटकर लीलया करतात.
"कोल्हटकरांच्या विनोदात्मक लेखनपद्धतीमध्ये व्यंगोक्ती, वक्रोक्ती, अतिशयोक्ती वगैरे मुख्य घटक असून हास्योत्पादन व तदद्वारा करमणूक व बोध हे तिचे परिणाम होत. कोल्ह्ट्करांच्या विनोदाचे हत्यार कल्पनेवर पडते. व्यक्तीवर ते उचललेही जात नाही." असे या पुस्तकाच्या प्रस्तावनेत न. चिं. केळकर लिहितात. "कवी हा संवादित्व शोधतो तर विनोदी लेखकाचे लक्ष विसंवादित्वावर असते." असा भेद केळकर त्यात स्पष्ट करतात पण कोल्हटकर जेव्हा याच विसंवादित्वाची मानसपुत्रांच्या माध्यमातून नेम साधून हजेरी घेतात तेव्हा "भाविक समाजाच्या दृष्टीने यातून काही भाग वगळले असते तर बरे झाले असते" असे केळकर सुचवतात.
प्रसिद्ध जर्मन कवी गटे याचे ब्रीदवाक्य ’सत्य, कर्तव्य व सौंदर्य’ असून त्यात मनुष्याच्या बौद्धिक, नैतिक व भावनात्मक ध्येयांचे सार आले आहे असे कोल्हटकर मानत. या तत्त्वांची कसोटी तत्कालिन समाजाला लावताना कोल्हटकरांना त्यात जे अंतर आढळले त्याचा आरसा समाजाला दाखवण्यासाठी त्यांनी विनोदाचा वापर केला. शाब्दिक कोट्यांचा आणि कल्पनाचमत्कृतीचा अतिरेक यामुळे क्वचित कोल्हटकरांचा विनोद काही ठिकाणी नीरस आणि कृत्रिम झाला आहे असे त्यांचे टीकाकार म्हणत. पुलं कालबाह्य झाले आहेत किंवा कसे, वगैरे वाद समूहमाध्यमांवर झडत असतात. तेव्हा पुलंच्याही बर्याच मागच्या पिढीतल्या कोल्हटकरांच्या विनोदाचा आस्वाद आजचा वाचक घेऊ शकेल का याबाबत शंका असू शकते पण त्यांच्या निर्विष विनोदाने मराठी माणसाला जीवनाकडे खेळकरपणे आणि विवेकाने पाहायला शिकवले हे निर्विवाद.
- मोहिनी महेश मोडक
----------------------------------------------------------------------------------------------- -----------------------------
संदर्भ -
http://lib.unipune.ac.in:8080/xmlui/bitstream/handle/123456789/7767/08_chapter%203.pdf?sequence=8&isAllowed=y
मराठी विनोदी कथा - संपादक डॉ. द. ता. भोसले
सुदाम्याचे पोहे - श्री. कृ. कोल्हटकर
मराठी विश्वकोश
(Published in Maharashtra Times Diwali Ank 2020 )