Monday, April 20, 2020

पिंकीपॉलिसी


सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच आपापल्या घरातल्या मदतनीसांना ’मिस’ करतायत. आम्हाला मात्र आमच्याकडे कामाला असलेल्या पिंकीची आठवण येते ती वेगळ्या कारणासाठी. तिने आम्हाला एक असा मंत्र दिलाय की जगणं एकदम सोपं झालंय. आम्ही त्याला #पिंकीपॉलिसी म्हणतो. :-)
------------------------------------ 

’काय गं तू, दोन दिवस आली नाहीस. आधी कळवलं पण नाहीस तू.’
’हो नं, मला दोन दिवस जमलंच नाही यायला आणि मी कळवलं पण नाही.’
’पण मागच्या वेळेला म्हटलं होतं नं मी, निदान फोन करुन कळवत जा म्हणून..’
’हो नं, मागच्या वेळेला म्हटलं होतं तुम्ही’
’मग तरीही केलाच नाहीस तू फोन’
’हो नं, केलाच नाही मी फोन’

एव्हाना माझा संयम संपून मी माझ्या कामाला तरातरा निघून जाते आणि पिंकी शांतपणे कुंचा हातात घेऊन झाडू लागते. पिंकी आमच्याकडे घरकामाला येते. म्हणजे आपण तिला पिंकी म्हणूया. तिशी-पस्तीशीची, बेताच्या उंचीची, काहीशा गबदुल शरीराची, पाण्यात काम करावं लागतं म्हणून घोट्याच्या बरीच वर साडी गुंडाळणारी, ठीकठाक नाकीडोळी असलेली सावळी पिंकी. साधारणत: दुपारी दुबुक दुबुक चालत येते, तिला वाटेल तेव्हा आणि नाही येत नको वाटेल तेव्हा. दहावी झाली म्हणते. सहसा शुद्ध भाषेत बोलते. काम करत असताना टीव्हीवर जाहिरात दिसली तर खांद्यावर कुंचा किंवा हातात बादली घेऊन संपेपर्यंत टक लावून बघते. तिच्या घरी डिश टीव्ही आहे. ती रात्री रोज हिंदी 'सिरेल' आठवणीने बघते. बाकी जगाशी तिला घेणंदेणं नाही. राहत्या गावाइतपतच तिचा भूगोल मर्यादित आहे. तिच्या वॉर्डाच्या नगरसेवकाचं नाव तेवढं तिला माहित आहे. तिचं जीके इथेच संपतं.

तर तिच्या हातात कुंचा पाहून माझी वेलकम सिनेमातली ’कंट्रोल ..मोहिनी ..कंट्रॊल’ अवस्था होते. मी तिला २९५ व्या वेळेस म्हणते
’अगं आधी कपडे भिजव, मग झाडपूस कर, मग भांडी घास, तोवर कपडे मुरतात, तुझंच काम सोपं होतं. किती वेळा सांगू.’
’हो नं, तुम्ही नेहमी सांगता’
’बरं, मी कपडे भिजवून ठॆवावे तर तू केव्हा येणार, येणार की नाही खात्री नसते’
’हो नं, माझी खात्री नसते’
मी पुन्हा कामाला मनात आकडे मोजत तिथून जाते. इकडे पिंकीने कपडे भिजवले असतील याची खात्री नसतेच.
पण पिंकीच्या अशा स्टँडमुळे तिच्यासमोर दुर्वास मुनी देखील शांत झाले असते. तुम्ही लाख भांडायचं ठरवा पिंकीशी, ती ’स्थितप्रज्ञ दर्शन’ किंवा ’स्थितप्रज्ञाची लक्षणं’ असलं काही न वाचताच कोळून प्याली आहे. ती उर्मट नाही, ती मूर्खही नाही. ती न्यूट्रल गिअर मध्ये जगते. तिला मी अखेर शरण जाते याचा नवरोबांना फार आनंद होतो. मग ते अधूनमधून चहा केला आणि ती काम करत असेल तर तिचाही करतात. असं इतर घरात होत नसावं. तिला तेव्हा स्पेशल वाटतं. ती ओच्याला हात पुसून आत येते ,पंखा मोठा करते आणि त्याखाली निवांत फतकल मारुन त्यांना बशी मागते आणि फुर्र करुन चहा पिते. साहेबांची कपबशी विसळून टाकते. मी तिला चहा देते तेव्हा ती फक्त आपली कपबशी विसळून कामाकडे वळते. चहा करणे हे बाईमाणसाचे कामच आहे, असे भाव तिच्या चेहर्‍यावर असतात. सणावारी जेवताना आमटीचा घोट घेऊन ती माझ्याकडे एक सूचक (म्हणजे कायच्या काय गुळचट लागतंय हे) कटाक्ष टाकते. तिला त्यात ठेचा हवा आहे हे मला कळते.
’इतकं तिखट खाऊ नये पिंकी’ या माझ्या अनावश्यक वाक्यावर ती
’हो नं इतकं तिखट खाऊ नाई’
म्हणत शांतपणे आमटीत ठेचा मिसळते. ती तिच्या नादात जगते .तिचं एरवी अन्नाकडे लक्ष नसतं. पैशाकडे नसतं. कपडे धुताना चुकून खिशात किंवा घरात कुठे सापडले तर ५ रू असो की ५००, ती आणून हातात देते.

दारुड्या नवर्‍याच्या मारहाणीला विटून लहान मुलासह ती माहेरी परत आली आहे. तिची आई समजूतदार असल्याने तिला पुन्हा त्याच्या तोंडी न देता घरी राहू दिले गेले आहे. आई इतर घरी कामाला जाते. वडिलांना सुदैवाने व्यसन नाही. भाऊ कोणत्याच कामावर टिकत नाही, मग गावभर उंडारतो. त्याने घरी राहू दिल्याच्या बदल्यात पिंकी त्याची आणि घरची बहुतेक कामं करते. दमून आजारी पडते. सारखं पाण्यात काम म्हणून सर्दी होते. मग ती दांड्या मारते. मला हे बघवलं नाही की मी तिला, भावाला तरी आपली कामं स्वत: करायला लाव, असं सांगते. पिंकी ’हो, सांगते’ म्हणते. तिला त्याशिवाय पर्याय नाही हे आम्हा दोघींना माहित असते. तिचा मुलगा कधी तिच्याबरोबर आला आणि खाऊ घेऊन टीव्ही समोर बसला की ’आमच्या टीव्ही वर मामा फक्त ’गाने अन् पिच्चर’ लावतो’ असं सांगतो. मी तिला आमच्या घरातला पेपर तरी वाचत जा म्हणते पण चळवळी आणि राजकारण समजलं तरी तिच्या जगण्य़ात फरक पडणार आहे का या विचाराने अस्वस्थ होते. त्यापेक्षा आपण तिच्याशी कसं वागतो यावर तिची आणि कदाचित तिच्या मुलाची नजर तयार होणार आहे, फरक पडलाच तर त्याने पडणार आहे या विचाराशी मी येऊन थांबते. नकारात्मक बातम्यांनी आपलं डोकं खराब झालेलं असताना तिचा कोरा चेहरा पाहून she doesn't know that she doesn't know हेच बरं आहे असं मला वाटू लागतं.
मग वाटतं आपल्याला तरी सगळं जग कळलं आहे का? कळू शकणार आहे का?
जगात कुणाच्या तरी दृष्टीने आपलाही आयक्यू आणि भूगोल पिंकीएवढाच असू शकेल. जाऊदे.
तिला बचत करायला मात्र शिकवली आहे. मुलाच्या शिक्षणासाठी आरडीत पैसे जमा करायला हवे एवढे तिला कळते. पगाराचे बहुतेक पैसे, बोनसचे पैसे ती जमा करते.

मी घरी नसते तेव्हा बाहेरुन आल्यावर घर व्यवस्थित पुसलेले नाही आणि कोपरे नीट झाडलेले नाहीत हे मला दिसते. तेव्हा तिचा कपडे धुण्य़ाचा म्हणजे दोनदा पाण्य़ातून कपडे बुचकळून काढून थोडा झटका देऊन गळत्या धारेसह दोरीवर भिरकावण्याचा प्रकार सुरू असतो. मी तिला आत बोलावून ३४३ व्यांदा सांगते.
’हे बघ, स्वत:भोवती गिरकी घेऊन जितकं झाडलं जाईल तितकच तू झाडलयंस, कोपर्‍यात केर तसाच आहे.’
’हो नं तसाच आहे’
’आणि नीट पुसण्याचा तर प्रश्नच नाही’
’हो नं, आज मी नीट पुसलंच नाही’
’मग झाड नीट’
’हो झाडते’
’आता ओल्या फरशीवर कसं झाडशील?’
’हो नं ओल्या फरशीवर कसं झाडणार!’
’जाऊदे, मी घेईन नंतर कोपरे झाडून. उद्यापासून झाडत जा आता नीट’
’हो, घ्या झाडून, उद्यापासून झाडत जाईन नीट’

या पिंकी पॉलीसीने आमचं लाईफ सोप्प करुन टाकलंय. डेल कार्नेगी किंवा रॉबीन शर्मा वाचून किंवा शिवानीदीदीचे व्हिडिओ पाहून मला जे जमलं नाही ते सगळं या पिंकी पॉलीसीमुळे जमू लागलं. यामुळे प्रश्न सुटतोच असं नाही तरी वाद नाही की ताण नाही.
उदा: मुलाने वैतागून म्हटलं," अर्र भेंडीच का आज, किती बोर भाज्या करतेस ग तू"
तर पूर्वीची मी- "मी तरी रोज काय वेगवेगळ्य़ा भाज्या करणार, सगळ्या भाज्या खायला हव्या, उद्या होस्टेलला गेल्यावर काय करशील, ज्यात त्यात पनीर मी बिलकुल घालणार नाही. मुळात ही भेंडी पण तुला पंजाबी मसाला आवडतो म्हणून तो घालून केलीय तरी काय कुरकूर आहे. स्वत: करत जा म्हणजे कळेल, पानात पहिलं वाढलं तेवढं मुकाट्याने खायचं ...ब्ला ब्ला ब्ला...."
आताची मी - ’हो नं, आज भेंडीच केली मी’

नवरोबांशी वाजणं बंद झालं नसलं (नाहीतर मज्जा काय) तरी वादंग संपले.
उदा: पाडव्याला गुढी उभारणे
पूर्वीची मी- ११ वाजायला आले, लोकांनी गुढ्या उभारुन दोन तास झाले तरी आपली गुढी अजून उभारलेली नाहीये. आता जेवणं झाल्यावर दुपारी उभारणार का! ५ मि. च्या कामासाठी किती वेळा आठवण करुन द्यायची. मुळात दर वेळी का आठवण करायची मी. स्वत:हून कधी एक गोष्ट करायची नाही. मी आज गोड करायला विसरले तर चालेल का? मग मी म्हणू का आठवण का नाही केली. ब्ला ब्ला ब्ला....
पूर्वीचे नवरोबा- नवर्‍यानेच गुढी उभारली पाहिजे असं ब्रह्मवाक्य कुठे लिहिलं आहे का? एवढी टाईम्स स्क्वेअरला एकटी फिरणारी तू (हे ध्रुवपद म्हणजे एक वेगळी स्टोरी असते) तुला साधी गुढी उभारायला माझ्यावर अवलंबून कशाला असायला पाहिजे! समजा ११ नंतर उभारली गुढी, तर पाडवा होत नाही की काय साजरा..ब्ला ब्ला ब्ला...
आताची मी- गुढी उभारायची राहिलीय, ११ वाजायला आले.
आताचे नवरोबा- हो नं, ११ वाजायला आले. उभारतो.
विषय समाप्त. 

लॉकडाऊनमुळे घरातले वादविवाद वाढले असतील, असतील काय असणारच. मग ही पिंकी पॉलीसी वापरुन पाहा. :-)

Friday, April 10, 2020

दिवे : यांचे - त्यांचे - माझे - आपले


काळोख पडला की सर्वात आधी आपण काय करतो, तर दिवे लावतो. मग तो दिवा वीजेवर चालणारा असेल, ती देवघरातली समई असेल, मोबाईलचा टॉर्च सुद्धा असेल. प्रकाश आपल्याला धीर देतो, त्याच्या उजेडात सगळं स्वच्छ दिसू लागलं की आपण शांत होतो. कोरोनाच्या कभिन्न सावल्या एव्हाना आपल्या देशावरही पडू लागल्या आहेत. सर्व स्तरावर त्या रोखण्याचे निकराने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच आपल्या पंतप्रधानांनी घरासमोर दिवा लावण्याचं आवाहन केलं होतं. काहींना प्रतीकात्मकतेपेक्षा आता फक्त कृतीवर भर द्यायला हवाय असं वाटलं तर बहुतेकांनी मात्र या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद दिला. हातावर पोट असलेल्या व्यक्तींपासून उद्योगपती रतन टाटांपर्यंत अनेकांनी मनोभावे दिवा लावला.
दिवा लावायचा होता तो सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी- ती झाली का? नक्कीच. बरेच जण आपापल्या घरासमोर, गॅलरीत येऊन शेजार्‍यापाजार्‍यांशी बोलले, हसले, काही जणांनी घराघरांवर लखलखणारे दिवे आपापल्या मोबाईल कॅमेर्‍यात कैद केले. काहींनी सोशल मिडियावर जरा त्रागा केला पण त्यापैकी संकल्पनेला विरोध नसलेल्यांनी दिवे लावले.
दिवा लावायचा होता कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी- वैद्यकीय क्षेत्रातले, शासकीय कर्तव्य बजावणारे, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, पोलिस, समाजसेवक, ज्यांच्याकडे दिवा लावायलाच काय चटणीवर घ्यायलाही तेल नाही किंवा लॉकडाऊनमुळे मिळवणं शक्य नाही अशांची काळजी घेणारे स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते.. यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी.
तर दिवे लागले. वरवर सगळं रुटीन चालू असलं तरी कदाचित आपण सगळे जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर उभे आहोत, अशा वेळी आपण एकटे नाही, हा लढा सगळ्यांचा आहे, ही उमेद देऊन गेले.

आता पुढे काय!
सोशल मिडीयावर राजकीय दंभ मिरवत हमरीतुमरीवर येऊन वादावादी करणारे सोफापटू, टाळ्य़ा वाजवण्याऐवजी थाळ्य़ा वाजवत जत्थ्याने मिरवणुका काढणारे थोर लोक, शासकीय आदेश धुडकावून अकारण बाहेर हिंडणारे अतिहुशार नागरिक, छद्म विज्ञानावर आधारित पोस्ट उपरोधिक आहे एवढीही समज नसल्याने ती अभिमानाने फॉरवर्ड करणारे भाबडे जीव, स्वयंघोषित कोरोना तज्ज्ञ- ग्रीड तज्ज्ञ, सामाजिक विलगीकरणाशिवाय दुसरा कोणताही उपाय समोर दिसत नसतानासुद्धा लॉकडाऊनमुळे देशाची कशी वाट लागणार आहे याबद्दल घरबसल्या टीका एके टीका करत राहणारे स्वयंप्रकाशित अर्थ तज्ज्ञ.... अशी ज्ञानदीप पाजळणारी बरीच मंडळी सभोवती दिसत असल्याने खंत वाटत असली तरी प्रत्यक्षात माणुसकीने वागणार्‍यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हे पाहून बरं वाटतंय. मग तो गरीब रुग्णाची राहिलेली इच्छा म्हणून त्याला मासे-भात भरवणारा चेन्नईचा डॉक्टर असेल किंवा एखाद्या पालावर अन्नाची पाकिटे वाटणारा अनाम तरुण. स्वयंसेवी संस्थांचे, संघाचे कार्यकर्ते असतील किंवा लंगर मध्ये मुस्लीम बालकांच्या भोजनाची सोय करणारे शीख बांधव. मदत करताना आपल्यालाही लागण होण्याचा धोका पत्करुन, विरुद्ध राजकीय कल, वैचारिक भिन्नता हे सगळं बाजूला ठेवून या जैविक युद्धात आपल्या समाजासोबत ठामपणे उभे असलेले असे निरलस नागरिक प्रत्यक्ष कृतीतून दिवा लावतायत. उजेड पेरतायत.

यात आपल्या परीने आपणही सामील आहोत का?
आपल्या घरच्या मदतनीसांना पगारी रजा देणं, व्यावसायिक असलो तर कर्मचार्‍यांना पगारी रजा देणं किंवा शक्य असेल तिथे घरुन काम करण्य़ाचा पर्याय देणं, जे रोजंदारीविना किंवा आपल्या घरी पोचू न शकल्याने अडकून पडले आहेत त्यांची पोटापाण्याची सोय करणार्‍यांना आर्थिक बळ देणं. इतकं तर प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार करु शकतो ना!
ते ही करुन झालं?
आता आपलं कसं होणार याची चिंता अनेकांना विशेषत: खाजगी उद्योगक्षेत्राला सतावते आहे. नोकरी टिकेल ना! व्यवसाय पुन्हा पहिल्यासारखा उभा होईल ना! अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत.
कुटुंबाला वेळ देता येत असल्याच्या नवलाईचं रुपांतर आता रुटीनमध्ये झालंय. लहान घरं असलेल्यांना घरात सतत माणसं असल्याने अडचण होऊ लागली आहे. अशा स्थितीत घरुन काम करणं अवघड व्हायला लागलंय. मनसोक्त आराम करुन झाला, नातलगांशी, जुन्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारुन झाल्यात, आता पुढच्या कॉल मध्ये नव्याने बोलायचं काय असे प्रश्न पडू लागलेत. आवडीचे मेनू चाखून झालेत, राहिलेले सिनेमे, वेब सिरीज पाहून झालेत. खरं तर आता मनोरंजनात जास्त वेळ घालवला की अपराधी वाटायला लागलंय. एकूण वरवर आपण खूष असल्याचं दाखवत असलो, एकमेकांना मीम्स पाठवत असलो तरी आतून आपण घाबरलेलो आहोत. मग वस्तुस्थितीचा स्वीकार करुन कोणालाही दूषणं न देता, येत्या काळाला सामोरं जाण्यासाठी आपण तयार आहोत का!
त्यासाठी घरात सतत सोबत असलेल्या व्यक्तींमध्ये तणाव वाढू नये यासाठी शब्द जपून वापरायला हवे आहेत. सोशल मिडियावर तावातावात प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्याला प्राधान्य द्यायला हवे आहे. काळ कठीण आहे पण अशा वेळीच परिपक्वतेची कसोटी असते. आपण आजवर माणूस म्हणून जसं घडलो आहोत ते योग्य आहे ना हे तपासायची, आपल्या आतला दिवा लख्ख करण्याची ही संधी आहे. नैराश्य वाटत असेल तर ते मान्य करणं ही त्यातून बाहेर पडण्य़ाची पहिली पायरी आहे. एकदा ते कळलं तर संगीत, वाचन, अध्यात्म, सकारात्मक विचार, व्यायाम, कुटुंबासह केलेली एखादी अ‍ॅक्टिव्हिटी, ऑनलाईन समुपदेशकांची मदत अशा पर्यायांच्या साहाय्याने या नकारात्मकतेतून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य नाही.

कोरोनाने जगाला वेढलं आहे ,या पार्श्वभूमीवर भविष्यात काम करण्याच्या पद्धती, ग्राहकाची मानसिकता, गरजा यात आणि त्यामुळे एकूणच उद्योग-व्यवसायक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहे.
या बदलांसाठी आपण तयार आहोत का?
ASK (अ‍ॅटिट्यूड-स्कील- नॉलेज) या त्रयीच्या साथीने प्रगती होते हे सत्य मात्र अद्यापही बदललं नाही मग या उरलेल्या ब्रेकचा उपयोग आपण त्यासाठी नक्कीच करु शकतो. या ब्रेकमध्ये काही नवीन स्कील्स शिकता येतील, एखादा वेगळा विषय नीट समजून घेता येईल, आपले व्यावसायिक संबंध संवादी राहून दृढ करता येतील, अशा काळात साधलेला संवाद अधिक चांगली प्रतिमानिर्मिती करणारा ठरेल. आजवर शिकलेलं रिचवण्यासाठी आणि पचवण्य़ासाठी या वेळेचा वापर करुन आपण स्वत:ची मानसिक आणि बौद्धिक स्थिती सावरु आणि उंचावू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक महत्वाच्या नेत्यांनी कारावासात असताना जागतिक दर्जाची साहित्यनिर्मिती केलेली आहे. आपला तेवढा व्यासंग, आवाका नसला तरी आपल्याच घराच्या चार भिंतीत कैद असल्याने आपल्या वकुबानुसार आपल्या सर्जनशीलतेला वाव नक्कीच देता येईल, उद्योग-व्यवसायातील नव्या कल्पनांवर खोलवर विचार करता येईल. असं म्हणतात व्यावसायिकाने किमान पुढच्या ५ वर्षांचं नियोजन करावं. सध्या पुढचं सगळं इतकं संदिग्ध असताना ते कसं करणार! परवा सॅटर्डे क्लबच्या आमच्या एका ’झूम’ मिटिंग मध्ये वक्ते आणि प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक केळकर यांनी याबाबत छान उदाहरण दिलं. जसं धुक्यात गाडी चालवताना आपण हेडलाईटच्या झोतात अंदाज घेत हळू हळू थोडं पुढे जात राहतो तसंच आपल्याला करावं लागणार आहे. वेगात निघालो तर पुढे दरीही असू शकते. हे सगळं केवळ व्यावसायिकांना नाही तर नोकरी करणार्‍यांना, गृहिणींना, विद्यार्थ्यांनाही लागू होणार आहे. केवळ व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या पलिकडे मोबाईलचा वापर करुन आपण बरंच काही करु, शिकू शकतो हे एव्हाना बहुतेकांच्या लक्षात आलंय. याकडे संधी म्हणून पाहूया. माझंच उदाहरण द्यायचं तर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याबाबत मी काहीशी निरुत्साही होते. वेबिनार अनेकदा अटेंड केले असले तरी स्वत: शिकवताना प्रत्यक्षात वाटणारी सहजता, थेट संवादातून येणारा नेमकेपणा त्यात नाही असं मला वाटायचं. आता शिकणारे यासाठी मानसिक आणि तांत्रिकदृष्ट्या तयार झाले आहेत मग ऑनलाईन तीच सहजता असणं शक्य असल्याचा प्रकाश डोक्यात पडला आहे.

कोरोनानंतरचा समाज अतिशय वेगळा असू शकेल. त्या समाजाचा भाग म्हणून देखील आपल्याला स्वत:मध्ये बदल करावे लागणार आहेत. भातात एक मटारदाणा घातला तरी आता तो पुलाव वाटतोय, पण सध्या जरी आपण ९० च्या दशकात गेल्यासारखं आणि साधं सोपं जगतोय असं वाटत असलं तरी ही उपरती तात्पुरती आहे हे आपल्याला माहित आहे. लॉकडाऊन संपताच सगळे जण जे काय मिस केलं त्यावर तुटून पडणार आहेत. मी माझ्या पातळीवर यावर नियंत्रण ठेवू शकेन का! फार अर्जंट असं काही नसतं हे कळलंय तर जरा ’माईंडफुलनेस’ कडे लक्ष देऊ शकेन का! भांडी घासणार्‍या पुरुषांवरच्या विनोदांपलिकडे जाऊन बर्‍याच भारतीय पुरुषांना घरकामाला हातभार लावण्याची चांगली सवय लागलीय ती ते जपू शकतील का! विकसीत, विकसीनशील सगळे स्तर भेदून जग आता नाईलाजाने एका पातळीवर आलंय. बदलतंय. मग लॉकडाऊन संपल्यानंतर मी पुन्हा पूर्वीचीच व्यक्ती तर होणार नाही ना! नसेन, तर हे ही दिवा लावणंच आहे.

https://www.esakal.com/blog/mohini-modak-article-about-corona-279022