Friday, January 31, 2020

विद्याताई

 


जनसंवाद, पुणे आयोजित एका निबंधस्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित राहू शकले नव्हते. नंतर पुण्याला गेले तेव्हा आयोजक तपस्वी सरांना भेटले. ते म्हणाले, ’आली असतीस तर हे बक्षीस विद्याताईंच्या हस्ते मिळालं असतं”. मला थोडं वाईट वाटलं. अचानक ते म्हणाले, ’वेळ असेल तर आपण जाऊया का त्यांच्या घरी!’. पूर्वपरवानगी घेऊन आम्ही गेलो. विद्याताईंना प्रत्यक्ष, टीव्हीवर, ऐकलेलं, पाहिलेलं, वाचलेलं पण ते सगळं वन वे. त्यांच्या हस्ते त्यांच्याच घरात बक्षीस स्वीकारताना खूप भारी वाटलं. साधं, शांत, नेटकं घर. विद्याताईंचा प्रसन्न वावर. आमच्याशी बोलताना त्या मध्येच बशीत काही खायला ठेवून कपडे वाळत घालायला गेल्या, एकीकडे गप्पा सुरु. म्हणजे त्यांच्या आणि तपस्वी सरांच्या. मी हो, नाही पलिकडे फार काही बोलल्याचं आठवत नाही. त्यांचं मृदु बोलणं, निर्व्याज हसणं, टीपॉय वरच्या ढिगातून चटकन एखादं पुस्तक काढून त्याचा संदर्भ देत काही सांगणं, सगळं मी गप्प बसून पाहत होते.

डावी असो वा उजवी, या स्तरावर पोचलेली फार कमी माणसं इतकी साधी, समंजस, दुसर्याचं शांतपणे ऐकून घेणारी आणि ठाम तरीही ऋजु असतात. समाजात बदल व्हावा असं ज्यांना मनापासून वाटतं त्यापैकी अनेकांचा स्वर आक्रस्ताळा, उर्मट आहे असं जाणवतं. त्यांनी विद्याताईंकडून एवढं उचललं तरी खूप फरक पडेल. आपलं मत तर्कसंगत, मुद्देसूद, स्निग्ध शब्दात आणि संयतपणे मांडलं तर ते स्वीकारलं जातं, किमान त्यावर निकोप चर्चा होऊ शकते, नाहीच पटलं/ मान्य केलं तरी दोन्ही बाजूंनी निदान विचार केला जातो मग वाचक/ श्रोते/ प्रेक्षक कोणत्याही विचारसरणीचे असोत. विद्याताईंनी विचार मांडण्याची ही जी पद्धत वापरली (ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं स्वाभाविक अंग होतं) त्यामुळे विरोधकही त्यांचा नकळत आदर करत असं मला वाटतं.

गेल्या वर्षी याच सुमारास लेखाच्या गाभ्याला मारक ठरेल असं वादग्रस्त शीर्षक हेतूपुरस्सर देऊन एका ऑनलाईन वाहिनीने त्यांचा लेख प्रकाशित केला. लेख न वाचताच केवळ शीर्षकावरुन निष्कर्ष काढून अनेकांनी मग विद्याताईंवर टीका केली. त्या लेखात आक्षेपार्ह असं काही नव्ह्तंच उलट परंपरेच्या चौकटी न मोडताही त्यातली स्त्रियांच्या एकत्रीकरणाची कल्पना उचलून धरुन एक सोपा, नवा विचार त्यांनी रुजवला होता. बहुतेक स्त्रियांनी आनंदाने तो विचार बर्याच अंशी स्वीकारलेला आहे असं आता दिसतंय. शनीचौथरा प्रवेशासाठी त्यांनी स्त्रियांना पाठिंबा देणं काही स्त्रीवादी कार्यकर्त्यांसह अनेकांच्या भुवया उंचावून गेलं. स्त्रियांना शेवटी कर्मकांडाकडेच ओढणार्या मंदिरप्रवेशाची गरज काय यावरुन दुफळी झाली. मुलभूत अधिकाराची जपणूक व्हायला हवी आणि विषय धार्मिक असला तरी स्त्रियांना स्वत:च्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हवा याबाबत विद्याताई आग्रही असल्याने त्यांची भूमिका याला सुसंगत अशीच होती. काही अपवाद वगळता विद्याताईंची भूमिका पटली नाही असं झालं नाही.
विद्याताईंनी स्त्री-पुरुष नात्याकडे पाहण्याची एक स्वच्छ नजर दिली. आपण ज्या समाजात वावरतो तिथे इतकं आदर्श काही घडत नाहीये याचा त्रास त्यामुळे आधीपेक्षा जास्त होऊ लागला पण बदल व्हायला वेळ लागतो, संयम लागतो हे ही त्यांनीच त्यांच्या लेखनातून, बोलण्यातून शिकवलं. समानतेच्या व्याख्येबाबत सुरुवातीला गोंधळ असल्याने पुरुषांचा आणि त्यांच्यासह एकूणच समाजाचा राग राग करण्यापासून उगाचच्या बंडखोरीपर्यंत आणि तिथपासून ते संवादी राहून परस्परपूरकतेची आवश्यकता समजून घेण्यापर्यंतचा माझा प्रवास शेवटच्या टप्प्यात त्यांच्या विचारांचं बोट धरुन झाला. स्त्रियांच्या तुलनेने काहीसा कमी असला तरी पुरुषप्रधान व्यवस्थेचा त्रास पुरुषांनाही वेगळ्या प्रकारे भोगावा लागतो हे कळू लागलं. आत्मभानाइतकंच समाजभानही महत्वाचं असतं हे कळलं. विद्याताईंनी असं देणं अनेकांना दिलं आहे. कृतज्ञ आहे.

माणूसपण म्हणजेच विचारी मेंदू आणि संवेदनशीलता म्हणजेच माणुसकी यांच्याशी इमान राखत मी जगते आहे, असं म्हणणार्या विद्याताईंच्या स्मृतिला विनम्र अभिवादन.