Tuesday, December 31, 2019

रूपकुंड

 

गाडी काठगोदामला पोचली. वातावरणात एक मऊशार ओलावा भरून राहिला होता. मावळतीच्या हलक्याशा उन्हात ते टुमदार रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्मवरून पोर्चसारखी दिसणारी बिस्कीट रंगाची लाल कौलांची स्थानकाची लहानशी इमारत, ढगाळ वातावरणामुळॆ काहीशी गूढ भासणारी सभोवतालची मोहक हिरवाई आणि दूरवर.. नजर जाईल तिथवर पसरलेले गडद निळे धुकेभरले डोंगर.. बघूनच नजर निवत होती. उतरणारे बहुतेक जण पर्यटक, नैनीताल-कौसानी-रानीखेतला जाणारे. सहलीला जाणार्‍यांच्या उत्सुक चेहर्‍यावरचे बावरलेले भाव आणि नेहमी ट्रेकला जाणार्‍यांचे सरावलेले, संयत चेहरे सहज ओळखू येत होते. अदितीने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला.. ’रोज जेमतेम ३-४ किलोमीटर वॉकची सवय.. हा अवघड ट्रेक जमेल नं आपल्याला! ’ 

मोकळे केस मागे गुंडाळून त्यावर क्लच लावत, सॅक पाठीवर चढवत, तिच्या कावर्‍याबावर्‍या डोळ्य़ात पाहत शिखा म्हणाली, 

"दीदी, हम है ना, फिकर नॉट" 

मंद स्मित करत अदितीने बुटांची लेस घट्ट केली. लांबवर एक नजर टाकली, स्वत:लाच आव्हान दिल्यासारखी ! ट्रुप लीडर राघव, अदितीच्या जिवलग मैत्रिणीचा-स्नेहाचा धाकटा भाऊ, स्टॉलवरचा गरमागरम चहा घेऊन समोरून येत होता. अदितीच्या हातात चहाचा कागदी कप ठेवत राघव मस्त हसला. बोगीबाहेर कोंडाळं करून उभे असलेले अजित, मिनू, कर्तारसिंग आणि शिखा.. त्यांचे उत्फुल्ल चेहरे, त्यांचं खळाळून हसणं, एकमेकांची मस्करी करणं, प्रवासात सतत गुगलवरून आता कुठे पोचतोय ते पाहणं, मधेच सेल्फी स्टिक उंचावत फोटो काढणं. अदितीला अगदी प्रसन्न वाटू लागलं...’स्नेहाच्या आग्रहाखातर आपण राघवच्या ग्रुपबरोबर आलो ते किती बरं झालं, उत्साहाचा झरा आहेत ही मुलं म्हणजे’. 

राघव तिच्या हातून रिकामा कप उचलून घेत म्हणाला.

" दीदी.. उद्या सकाळी निघायचय इथून, ’लोहजंग’ पर्यंत बसचा आठ-दहा तासांचा प्रवास आहे. चेक इन करून आम्ही लगेच गावात चक्कर मारायला जातोय, येतेस की आराम करतेस?".

"येते राघव"..अदिती म्हणाली.


असेच लांबून शाईसारखे गडद निळेशार आणि जवळून तेजस्वी हिरवेगार दिसणारॆ.. धुक्यात बुडालेले आणि मधूनच उन्हाच्या तिरीपेत चमकून उठणारॆ डोंगर होते उटीला. मखमली हिरवळ, गर्द झाडीतून आणि धुक्यातून डोकावणारी उतारावरची चिमुकली घरं, रस्त्याची नागमोडी वळणं, भुरभुरत्या पावसात टॉय़ ट्रेनने खाली कुन्नूरला जायचं होतं अदितीला.. हे सारं राहुलच्या साथीने अनुभवत. दोघांभोवती गारवा लपेटून घेत. पण त्याने तिला हॉटेलच्या खोलीतून फारसं बाहेर पडूच दिलं नाही. 

"सगळीकडचे सनराईज आणि सनसेट पॉइंट सारखेच असतात आदि, आपण इथे एकमेकांसाठी आलोय",म्हणत तो तिला ओढून घेई. 

त्याची ती असोशी आवडायचीही तिला. त्याचा सावळा राकट चेहरा, त्याचं रोखून बघणं, कपाळावर आलेले केस बेफिकीरीने, डाव्या हाताने मागे सारत मान कलती करून स्मित करण्य़ाची त्याची लकब ..सगळं आवडायचं. तो तर फिदाच होता तिच्यावर. "संध्याकाळी तरी बाहेर जाऊया नं रे, निदान जवळचे पॉईंट्स पाहूया नं," या तिच्या कोणत्याही आर्जवाला त्याने त्या दोन दिवसात फारशी दाद दिली नाही. हट्ट वगैरे करणं तिचा स्वभावच नव्हता आणि त्रागा, वैताग या शब्दांशी एकविसाव्या वर्षी तिचा फारसा परिचयही नव्हता. 

माहेरी हवं ते मागण्याआधीच मिळायचं तिला. वस्तू निगुतीने वापरणं, मोजकं पण लाघवी बोलणं, पारदर्शी वागणं यामुळे कुणालाही चटकन आपलसं करायची ती. करियरबद्दल अदिती फारशी आग्रही नसली तरी कॉलेजमधे अभ्यासाला असलेले आवडलेले विषय मुळातून समजून घेणं, त्यातल्या संकल्पनांचं आकलन होत जातानाच्या प्रक्रियेचा आनंद घेणं, त्यासाठी तासंतास ग्रंथालयात संदर्भग्रंथ धुंडाळणं, त्यावर मैत्रिणींशी चर्चा करणं, त्या विषयांशी निगडित व्याख्यानांना न चुकता हजेरी लावणं यात ती रमून जायची. राहुल नावाचं वादळ आलं आणि तिच्या संथ, नेटक्या आयुष्यात अंतर्बाह्य उलथापालथ झाली. कॉलेजमधे सिनीयर असलेला राहुल, जीआर होण्यासाठी उभा राहिला. स्नेहा त्याच्या गटाची. निवडणुकीच्या रणधुमाळीत बाह्या सरसावून उतरलेला राहुल, त्याचे नेतृत्वगुण, त्याचा प्रचाराचा धडाका, झपाट्याने निर्णय घेणं, प्रतिस्पर्धी गटाला खुल्या चर्चेसाठी आव्हान देणं... झपाटून गेली ती. राहुल नावाच्या आवर्तात स्थिर वृत्तीची अदिती केव्हा भिरभिरायला लागली तिचं तिलाही कळलं नाही. त्याला नकार देणं अशक्य झालं तिला. राहुलच्या भोवती तिचं आयुष्य़ तिनं स्वेच्छेने गुंफलं. त्याला जपणं, त्याचं तिच्या आयुष्यात असणं हाच तिच्या आकांक्षांचा विलयबिंदू झाला.... 

उटीहून परतीच्या प्रवासाआधी थोड्याफार भेटवस्तू घेण्य़ापुरते ते बाहेर पडले तेवढेच. "एकाच स्टॊअर मधे घे काय ते.." राहुलचा काहीसा वैतागलेला स्वर. आईसाठी मसाले, घरी न्यायला चॉकलेट्स, राहुलसाठी जर्किन अशी पहिलीवहिली खरेदी करत असताना दुकानात त्यांच्याच हॉटेलमधे उतरलेलं जोडपं दिसलं. जोडीतली ’ती’ वस्तू पाहात पाहात मधेच कुठेतरी गेली. ’त्या’ने अभिवादनासाठी मान किंचित झुकवून अदितीला विचारलं, 

"मॅम ये पर्स कैसी है, प्राईस ठीक है? ले लूँ उसके लिए ?"

अदितीने पर्स बघत ’अच्छी है’ म्हणत मान डोलावली. काऊंटरपाशी हाताची घडी घालून उभ्या असलेल्या राहुलने जवळ येत त्याला थंड आवाजात विचारले, 

"पहचानते हो इन्हे?" 

"जी नही, लेकिन हम एकही जगह ठहरे है, कल रात रेस्तरॉं मे भी देखा था आप दोनोको". 

काय होतय ते कळायच्या आत राहुलने त्याला एक सणसणीत चपराक लगावली. अवघं स्टॊअर चकित होउन या तिघांकडे वळून पाहू लागलं. या आकस्मिक घटनेने अचंबित आणि अपमानित झालेल्या त्या माणसाने संतापाने थरथरत दोन्ही हातांनी राहुलची कॉलर खेचली, पण त्याच्या बायकोने जीवाच्या आकांताने त्याला ओढत, विनवत, समजावत खरेदी तशीच सोडून दरवाजा गाठला. राहुल त्याच थंड नजरेने त्यांना जाताना पाहत जागीच उभा होता. अदिती इतकी भांबावून गेली होती की तिच्या हातातली सारी लवंग, दालचिनीची पाकीटं गळून खाली पडल्याचंही तिला कळेना. कसबसं बिल चुकतं करून कानकोंड्या चेहर्‍याने ती राहुलबरोबर बाहेर पडली. रूममधे येताच तिने त्याला सांगण्य़ाचा प्रयत्न केला,

"अरे, सहज विचारत होता तो, त्याच्या बायकोसाठी घ्यायची असेल पर्स त्याला". 

"शट अप आदि, तुला जग काय चीज आहे हे माहीत नाहीये अजून.. आणखी एक, इथे हवे तसे कपडे घालतेयस, घरी तसं नकोय "


"दीदी, पुलाव लिजिए..लजीज बना है "..अदिती काहीशी दचकली. 

शिखा वाफाळता बोल तिच्या हातात देत होती. तिच्या चटपटीत हालचाली टिपत अदिती म्हणाली, "शिखा, एक विचारू.." 

"बेशक दीदी" 

"तू मित्रांसोबत एकटी या प्रवासाला निघालीस तेव्हा घरचे काय म्हणाले, हो म्हणाले लगेच?" शिखा हसत म्हणाली,

"मै पूछती नही हू दीदी, हाँ, डिस्कस जरूर करती हु पापासे- ममासे ,लेकिन अंतिम फैसला मेरा होता है". 

"रागावत नाहीत मग घरचे! "

"नही दीदी, विश्वास आहे त्यांचा माझ्यावर. ये मेरा सातवा ट्रेक है, सफरमधे इतके वेगवेगळे सिच्युएशन फेस केले ना की मला आता कशाची भीती नाही वाटत. एकदा मनालीजवळचा ट्रेक होता, आमचा बेस कॅम्प राहिला दूर आणि मी आणि माझा एक दोस्त.. फँस गये थे कही, इस बार वो नही आ पाया.. जवळ फक्त एक चिक्कीचं पाकीट आणि दो घूंट पानी उरलेलं. रास्ता काढत कसेतरी पोचलो, आधी रात हो गई थी, सब परेशान थे. राघवसारखाच खूप चांगला आहे दोस्त आहे तो माझा, पापांच्या कलीगचा मुलगा, पण सकाळी नाश्त्याला सगळे जमले होते तेव्हा मला बोलला, मजाक मे हाँ, ’सही मौका था शिखा कल तो मेरे लिए’. सगळे हसले. मी त्याच्याकडे बघत सर्वांना क्लीअर बोलले, ’एक तर माझं लाईफ माझ्या कोणत्या बॉडी पार्टच्या मेहरबानीवर डीपेंड नाही करत और तब तो मै इतनी थक गयी थी तो शायद कुछ कर नही सकती थी पण आता तुला जिंदा ठॆवलं असतं का! कमसे कम जेलमधे तर पोचवलच असतं तुला’. एकदम चूप झाले सगळे, फिर जोरसे हसने लगे. दीदी, मुझे लगता है औरत को डर सिर्फ तीन बातो का लगता है, अपना पैसा या कीमती सामान खोनेका, दूसरा अपनोंको खोनेका और तीसरा सबसे बडा डर अपनी इज्जत खोनेका. सफर मधे काय, कुठेच मी फार कीमती सामान वापरत नाही, दूसरा.. अपने बस मे नही और रही बात इज्जत की.. वो तो मै अपने आपकी हमेशा ..हमेशा करती रहूंगी, फिर वो खोनेका डर कैसा." शीखाच्या चकाकत्या डोळ्य़ातला आत्मविश्वास अदिती मंत्रमुग्ध झाल्यासारखी पाहत राहिली. 

’खरच, इतकं सोपं असू शकतं स्त्री म्हणून जगणं? एखाद्या पुरूषाशी साधं हस्तांदोलन करावं लागलं तरी संकोचून जायचो आपण, तो कितीही परिचित असला तरी. आपल्या जगण्य़ावर ओरखडाही पडू नये म्हणून सजग राहिलो कायम. या सगळ्य़ात शिखासारखं स्वत:वर असं भरभरून प्रेम करायला कधी शिकलोच नाही ! स्वत:चा असा मन:पूत स्वीकार म्हणजेच आत्मसन्मान हे आपल्याला कधी जाणवलंही नाही! तो आपला आपण जपायचा असतो हे कधी उमगलं नाही !... तो सतत दुसर्‍यांच्या प्रतिक्रियांमधे शोधत राहिलो आपण.’

राघव बाह्या दुमडत घाईने तिथे आला आणि भराभर सगळ्य़ांना उद्याच्या लोहजंगच्या प्रवासाबद्दल सूचना देऊ लागला तेव्हा या तंद्रीतून जागी झाली ती. त्याच्याशी थोडं बोलून, निवांतपणे खाणं संपवून अदिती खोलीत गेली, तर आधीच आत गेलेली शिखा पार गाढ झोपली होती. तिच्या श्रांत, निरागस चेहर्‍याकडे पाहताना अदितीला निषादची बेदम आठवण येऊ लागली. तो असाच एक पाय पोटाशी घेउन झोपायचा. अजूनही बाहेरून चौकडीचा गप्पांचा, कर्तारच्या विनोदांवर हसण्याचा मंद आवाज येत होता. अवचित कर्तारची सुरेल पण काहीशा खर्जातल्या आवाजातली लकेर कानी पडली. "रे कबीरा मान जा ....  आजा तुझको पुकारे तेरी परछाइयाँ

बन लिया अपना पैगम्बर.. तर लिया तू सात समंदर..

फिर भी सूखा मन के अंदर ...क्यूँ रह गया.. रे कबीरा"

डोळ्यातून नकळत ओघळलेले पाणी तिने तसेच राहू दिले आणि डोळे मिटून घेतले. 

सकाळी शिखाने तिला जवळजवळ खेचूनच अंथरूणातून बाहेर काढले तेव्हा क्षणभर तिला आपण नक्की कुठे आहोत तेच कळेना. मग मात्र तिने पटापट आवरले. सगळे सामान घेतल्याची खात्री केली. निघताना आरशात डोकावली. डोळ्याखालची काळी वर्तुळं सोडली तर तिच्या तरतरीत गोड चेहर्‍यावर आणि बांधेसूद शरीरावर चाळीशीच्या खुणा अजूनही फारशा जाणवत नव्हत्या. ट्रेकसाठी म्हणून घेतलेल्या आटोपशीर, सुटसुटीत कपड्य़ात तर ती या तिशी- पंचविशीच्या तरूण टीममधे सहज सामावून जात होती. ही सगळी मुलं आपल्यापेक्षा किमान १० वर्षांनी लहान, ’दीदी म्हणणारी’, मग तरूण दिसण्य़ाचा.. रूपाचं कौतुक करण्याचा.. सतत चांगलं दिसण्याचा.. अट्टाहास कशाला, असा विचार येताच ती मनाने सैलावत गेली. मोकळं मोकळं वाटून स्वत:शीच गोड हसली. 


बाबांना फार अभिमान होता तिच्या रूपाचा. "माझ्या लेकीला मागण्या येतील मागण्या.. "असं नेहमी म्हणायचे ते नातेवाईकांमधे. सणावाराला ते सगळे अधूनमधून गावी जायचे तेव्हा पूजेच्या वेळी आई, काकीला आवर्जून घरचे सगळे दागिने बाहेर काढायला लावायची, अदितीला त्यातले काही ल्यायला लावायची. एरवी जीन्स मधे वावरणार्‍या तिला हे सारं अवघडल्यासारखं वाटायचं. दागिन्यांच्या स्पर्शाने ती कधी मोहरली नाही पण तिला तो साज घातलेला बघताना आईच्या चेहर्‍यावर जो आनंद फुलायचा त्याचा मात्र मोह पडायचा तिला. तिची हनुवटी उचलून आपल्या डोळ्यातलं काजळ तिच्या कानामागे लावून काकी दोन्ही कानशीलावर बोटं मोडायची. "सालंकृत कन्यादान करूया लेकीचं ’आपण’ .." असं विनापत्य असलेल्या काकीला सूचकपणे आई म्हणाली होती. मात्र नंतर जेव्हा तिने राहुलबद्दल घरी सांगितलं..’त्याच्याशिवाय दुसर्‍या कुणाचाच विचार नाही करू शकत’.. म्हणाली तेव्हा तर संतापातिरेकाने तिला नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर काढायला निघाले होते बाबा. आईने त्यांना आवरलं पण स्वत: कितीतरी दिवस बोलणं बंद केलं होतं. राहुलची जात आड येत होती की तिचा तिने निर्णय घेतल्याची नाराजी होती! 

"आमच्याकडे खूप मोकळं वातावरण आहे रे, तू ये ना एकदा आईबाबांना भेटायला." असं मारे म्हणायची ती राहुलला. आला होता तो, पण कॉलेज संपून ट्रेनी म्हणून कामाला सुरूवात केल्यावर.  ते ही त्यांच्या जुन्या ग्रुपबरोबर. तिच्या बाबांनी सर्वांना नावं विचारली. एक दोघांनी फक्त नावं सांगितली, तर बाबांनी पुन्हा विचारलं होतं, 

"..आणि आडनाव? आडनाव काय तुझं?.. काय करतात वडील तुझे ?" 

राहुल नंतर म्हणाला होता," आम्ही जातपात पाळत नाही, आता कुठे राहिलय तसं काही, श्रमप्रतिष्ठा मानतो आम्ही.. असं नुसतं बोलायला ठीक असतं. अशी खोदून खोदून आडनाव विचारणारी लोकं भंपक असतात आदि." नंतर तिच्या बाबांच्या विचारांचा बराचसा अंदाज आल्यावर त्याने तिला लग्नासाठी मागणी अशी घातलीच नाही. त्याच्या स्वभावानुसार थेट म्हणाला होता, 

"येत्या वाढदिवसाला मी लग्न करणार आहे तुझ्याशी." 

अदिती लाजून, काहीसं फुरंगटून म्हणाली होती, "हे सांगायला इतके दिवस का लावलेस". 

राहुल उत्तरला, "मी अमुक करणार आहे असं सांगण्य़ाआधी ,तेवढी लायकी कमावावी लागते." 

एकाच वेळी प्रभावित आणि निरूत्तर झाली होती अदिती. खूप कणखर आणि वेगळा वाटला होता राहुल.. ज्याच्या मिठीत आयुष्य झोकून द्यावं असा.   


लोहजंगला बस पोचली तेव्हा उन्हं उतरणीला लागली होती, मधेच आभाळ इतकं भरून येई की अंधारून यायचं. मधूनच उजेडाची फिकट तिरीप ढगातून डोकवायची. वातावरणातील ही आर्द्रता अजित-मिनू एकमेकांकडे हलकेच टाकत, त्या कटाक्षातही होती. त्यांची विशेष जवळीक अदितीच्या जाणत्या नजरेने केव्हाच ओळखली. आज लोहजंगला मुक्काम होता. रात्र वाढत गेली तसतसं मघाचं मळभ ओसरून आकाश चांदण्यांनी खच्चून भरल्यासारखं दिसायला लागलं. थोडसं खाऊन ती हिरवळीवर जाऊन बसली. आजूबाजूची झाडं, दूरचे डोंगर, आवाराचं कुंपण.. सगळ्य़ा आकृत्या एकाच सावळ्य़ा रंगात बुडाल्या होत्या. सभोवर पसरलेली शांतता आत रिचवत मान मागे करून ती लखलखणारं आकाश नजरबंदी झाल्यासारखी न्याहाळत राहिली. नीरवतेच्या कुशीत नकळत डोळे भरून येत होते. 

"अशी पांखरून छाया, लावोनिया माया, आनंदाचे आसू लावी कोण ओघळाया.."

"आरती प्रभू ना?" दोघांसाठी अगदी उकळत्या कॉफीचे कप घेउन आलेला राघव केव्हातरी शेजारी येऊन बसला होता. 

"काय विचार करतेयस दीदी?" 

त्या अफाट आसमंताकडे अविचल बघत ती स्वत:शी बोलल्यासारखं म्हणाली," एरवी आपल्या घराच्या लहानशा खिडकीतून दिसणारी चार झाडं म्हणजेच निसर्ग वाटतो आपल्याला पण इथे बघ ना, त्याने आतून बाहेरून व्यापून टाकलय आपल्याला. या अफाट विश्वाच्या खिजगणतीतही नसेल आपलं अस्तित्व. आपल्या जन्माआधी शेकडो खरं तर लाखो-करोडो वर्ष किती उलथापालथी या विश्वात होऊन गेल्या असतील, पुढेही होतील, आत्ता अगदी या क्षणी होत असतील, हो ना राघव! त्या समजून घ्यायच्या म्हटलं तर आपली समज किती असणार रे! सीमित आहे ती, फार तर काही हजार वर्ष मागे आणि येत्या शेकडो वर्षांपर्यंत."

"आणि यालाच आपण आपलं शहाणपण समजत राहतो. त्याचा अहंकार बाळगतो " राघव त्या गर्द आकाशात नजर रूतवत म्हणाला.

"खरय राघव, प्रकाशवर्षांच्या तुलनेत आपलं वय, आपली पिढी, आपलं भविष्य, आपली चिमूटभर सुखदु:ख या सगळ्य़ाच कल्पना किती हास्यास्पद वाटतात. काळ धावतोय असं आपल्याला वाटतं, खरं तर काळाच्या कुठल्यातरी नगण्य ठिपक्यावर आपण धावतोय, कुठे आणि का ते माहीत नाही." 

राघव म्हणाला, "ते शोधणं म्हणजेच आयुष्य असतं नं दीदी. फक्त याच उंचीवरून आपल्या जगण्याकडे पाहता आलं पाहिजे." 

तिथे आलेला कर्तार दोघांचे काहीसे गंभीर चेहरे पाहून, बाजूला तसेच निवत राहिलेले कॉफीचे प्याले त्यांच्या हातात देत मिश्कीलपणे म्हणाला, "जल्दी पी लो, वरना कोल्ड कॉफी के रेट लगायेंगे वो"

अदिती कर्तारकडॆ बघत खळखळून हसली. एक एक करत सगळे जण आले. पाय लांबवत गोल करून निवांत बसले. राघव, कर्तार, शिखा.. नेहमीचे सरावलेले ट्रेकर्स. राघवजवळ तर ट्रेकींगच्या चित्तथरारक अनुभवांचा खजिनाच. त्यामुळे गप्पांना खंड नव्हता. मिनू खास अजितच्या आग्रहामुळे आलेली असावी. अजित अगदी कमावलेल्या शरीराचा, बोलका तर मिनू त्या मानाने नाजूक, लाजरी आणि अबोल. शिखा अजितच्या पाठीवर थाप मारून गमतीत म्हणालीही...

"कल डीडना गाव तक चलना है बॉस, ९-१० कि.मी, मिनूला उचलून चालावं लागणार बहुतेक तुला" 

झालंही तसच. कोवळ्य़ा किरणांच्या साक्षीने, घरट्यातून नुकत्याच बाहेर झेपावलेल्या पाखरांच्या चिवचिवाटात त्यांनी लोहजंग सोडलं. हिमालयाचं अनुपम सौंदर्य डोळ्यात साठवत आपापल्या सॅक पेलत सगळे खिदळत निघाले. राघवने सगळ्य़ांना दटावले... 

"फार बोलू नका, ही खडी चढाई आहे, ८००० फूट अल्टिट्यड वर पोचायचं म्हणजे दम टिकवावा लागेल. सलग चालायचय आपल्याला ५-६ तास". 

अर्ध्या अंतरानंतर मिनू दमून मागे पडू लागली. अजित तिला धीर देत पुन्हा पुढे घेऊन यायचा. शेवटचे दोन कि.मी तर तिला थकव्याने रडूच यायला लागलं. अजित तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला, "उचलून घेऊ?" .त्याला ढकलून हसत आणि मधेच डोळे पुसत मिनू चालायला लागली. त्यांच्यात अलगदपणे गुंफला जाणारा तो मोहक बंध बघताना अदितीला आतून ’तथास्तु’ म्हणावसं वाटत होतं, त्याच वेळी ’असेच गुंतून राहतील ना हे कायम!’, याची काळजी मनात दाटून येत होती. नकळत कालचे कर्तारचे सूर ती स्वत:च गुणगुणू लागली.. 

"कैसी तेरी खुदगर्ज़ी ...लब नमक रमे ना मिसरी 

कैसी तेरी खुदगर्ज़ी ..तुझे प्रीत पुराणी बिसरी.." 


"अदिती...." निषादला स्कूलबस जवळ पोचवून अदिती घरात येते न येते तोच राहुलचा तीव्र स्वर तिच्या कानावर पडला. 

संगणकाच्या पडद्यावर तिच्या इनबॉक्स मधला सुशीलचा एक इ-मेल उघडलेला दिसत होता. ससुल्या हे निषादचं लाडाचं नाव, पासवर्ड म्हणून त्याने सहज गेस केलं असावं. त्या मेलमधे तिने आणि सुशीलने नुकत्याच सोबत पाहिलेल्या नाटकाबद्दल त्याने काहीतरी लिहीलं होतं. 

"कधीपासून सुरू आहे हे सगळं?" राहुलचा चमत्कारिक धारदार स्वर तिचं काळीज कापत गेला. 

"राहुल प्लीज नीट ऐक, आम्ही बालमित्र आहोत आणि अधूनमधून भेटतो. कधी त्याचं कुटुंब असतं सोबत, तर कधी आम्ही दोघच. फक्त एक वर्षासाठी म्हणून न्यूयॉर्कला गेलास तू , ते पावणेदोन वर्षांनी परवा येतोयस. कंपनीने बेंचवर बसवलं नसतं तर कधी परत आला असतास कुणास ठाऊक. बाबांना हार्टअटॅक आला तेव्हाही आला नाहीस, ठीक आहे मी समजून घेतलं, ते वाट्टेल तसं बोलले होते तुला..जात काढली होती तुझी. पण मला तेव्हा गरज होती रे तुझी. विचारलसं तू निषाद सोडून कधी इतर कुणाबद्दल! फोन करायचास तेही उलटतपासणीसारखे. निषादवर इतका जीव आहे तुझा.. त्याला बरं नव्हतं माहितीये ना गेल्या महिन्यात! तेव्हा सुशीलनेच सगळी धावाधाव केली होती. शेजारी राहायचो आम्ही बरीच वर्ष. सुशीलच्या बाबांची बदली झाली तेव्हापासून आमचा संपर्क कमी होत होत तुटला होता. पण आईची त्याच्याशी कसल्याशा कार्यक्रमात अचानक भेट झाली तेव्हा माझा फोन नंबर मिळाला त्याला. बंगलोरहून इथे बदलून आलाय तो गेल्या वर्षी तेव्हापासून आम्ही भेटतोय."

राहुल एकटक तिच्याकडे रोखून पाहत होता. अदितीचा आवाज किंचित चढला होता, त्याची दाहक नजर सहन न होऊन ती क्षणभर थांबली. हातातला रूमाल घामेजला होता. स्वत:ला शांत करत, त्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली,

"आधी त्याने बोलावलं होतं मला घरी, आठवतय? मी बोलले होते फोनवर तुला, तर पुरतं ऐकूनही न घेता ’जायचं नाहीस’ बजावलस तू. कारण काय तर म्हणे ’तो कोण, कसा आहे’ हे तुला माहीत नव्हतं. फाईन, नाही गेले मी तेव्हा, पण वाटलं समजवावं तुला की मलाही माणसं ओळखता येतात आणि... जगातला प्रत्येक पुरूष वाईट नसतो राहुल. मी गेले नाही तर तोच आला दुसर्‍या दिवशी पत्ता शोधत. किती दिवसांनी इतकी हसले मी, मनमुराद जेवले. सुंदर गेला तो दिवस माझा. मग एकदा त्याची फॅमिली आणि मी अन निषाद सहलीला गेलो. मग अधूनमधून जेवण, नाटक अशा निमित्ताने २,३ दा भेटलो. तू आकांडतांडव केलं असतस उगाच म्हणून नाही कळवलं तुला यातलं काही. राहुल, खूप छान स्वभावाचा, उमद्या मनाचा, हुशार मित्र आहे तो माझा. निषादच्या येत्या वाढदिवसाला त्याला बोलावून तुमची नीट ओळख करून द्यायची होती मला. इतक्या मैत्रिणी आहेत पण माझी तार सर्वात जुळते ती सुशीलशीच, बस. या इ-मेल मधे सुद्धा वावगा एक शब्द दाखव मला. तू समजतोस तसं काही नाहीये आमच्यात."

हे सारं एका दमात बोलली ती पण राहुलच्या तिच्यावर रोखलेल्या करड्य़ा नजरेत होता..फक्त अविश्वास. 

’असं का वागतोय हा, एकटेपणामुळे आपल्या बाबतीत अति हळवा झालाय की मालकी हक्क गाजवतोय आपल्यावर... ! आईवडील अपघातात अकाली गेल्याने वाट्याला आलेलं पोरकेपण पेलता नाही आलं ह्याला की मुळातच हा असा होता. त्याचे रॅशनल विचार, त्याचं वेटरला सुद्धा सन्मानाने वागवणं.. हाच का तो राहुल.. की तो त्याचा देखावा होता..! नवलाईच्या दिवसात त्याच्या बाईकवर भटकत असताना भन्नाट वेगात सिग्नल तोडून ती पुढे दामटणं हे त्याला वेढुन मागे बसताना थ्रील वाटलं आपल्याला, मग हळूहळु जाणवत गेली त्याची बेपर्वा वृत्ती. त्याच्या प्रत्येक वाक्यात ’मी, माझं यश, माझं आयुष्य़’ असेच उल्लेख येत गेलेत. इतका स्वकेंद्री का होत गेला असेल तो? त्याला त्या कोषाबाहेर काढायला, गुंतवून ठेवायला मी कुठे कमी पडले? त्याला हवी तशी झेप घेऊ दिली, स्वत: मात्र संध्याकाळी घरट्य़ात परतता येईल इतकेच पंख पसरले.. तरी तो माझा का राहिला नाही? त्याच्या नजरकैदेत घुसमटतेय मी हे त्याला कळत का नाही? राहुलचं आपल्यावर प्रेम होतं म्हणजे नेमकं काय...केवळ त्या ओढाळ, नवथर वयातल्या प्रेम या भावनेवर त्याचं प्रेम होतं की फक्त... त्याच्या अनेक महत्वाकांक्षांपैकी आपण एक होतो?’ प्रश्नांच्या गुंत्यात ती अधिकच मूक होत गेली.


डीडना कॅंपचा मुक्काम आटोपून आता बेदनी बुग्यालला निघायचं होतं. दमलेली मिनू पुढे जायचं नाही म्हणून मुसमुसत होती, 

"इथुनच परत जाउया ना.." म्हणून विनवत होती आणि अजित अतीव मायेनं तिची समजूत काढत होता. 

"ऐक ना मिनू, मी आहे ना, आपण थांबत थांबत जाऊ पुढे, मग तर झालं" 

मिनूच्या कपाळावर भुरभुरत येणारे केस बोटांनी मागे सारत, तिचा चेहरा हातात घेउन अजित पुन्हा पुन्हा समजावत होता तिला. 

शिखा भुवयांची मजेदार हालचाल करत अदितीच्या कानात कुजबुजली, ’हाऊऊऊ रोमँ...टिक!’. 

राघव आणि कर्तार पण मिस्कील हसत होते. 

गुडघ्यांना हातांची मिठी घालून डोलत बसलेल्या शिखाला अदिती स्मित करत म्हणाली, "तुझा नाहीये का असा कोणी खास ’अजित’?". 

शिखा हसत हसत विशेष गुपित सांगत असल्यासारखे डोळे बारीक करून हलक्या आवाजात म्हणाली ,"अरे दीदी, हम जैसी लडकिया लडकोको सिर्फ अ‍ॅज ए दोस्त अच्छी लगती है. मिनू जैसी नाजूक शर्मिली लडकी.. मर्द जिसका खयाल रख सके..जो उसकॊ मर्दानगी का एहसास कराये... अशाच मुली आवडतात जनरली मुलांना." 

अदिती म्हणाली, "नाही गं, तुलाही मिळॆल की तुझ्यासारखा बिनधास्त, खुशमिजाज कोणीतरी".

कर्तार लगेच म्हणाला "दीदी, उसको सम्हाल सके ऐसा मच्योर लडका मिलना चाहिएँ..वो भी उसके जैसा रमता जोगी होगा तो दोनोके लाईफकी तो.... वाट लग जायेगी."

यावर शिखा कर्तारच्या पाठीवर जोरदार बुक्का लगावण्याच्या बेतात होती..तो तिला चकवून हसत पुढे पळाला.

अदिती आणि शिखाचं हसणं, गप्पा थांबेना, तेव्हा राघवने दोघींना हात धरून उठवलेच. घोड्यांवर सामान लादून ’बेदनी बुग्याल’चा प्रवास सुरू झाला. राघव मिनूला गप्पात रमवत होता, 

"बेदनी बुग्याल इतकं सुंदर ठिकाण आहे मिनू, की तिथे पोचल्यावर अजितचे आभारच मानशील तू." 

"बुग्याल म्हणजे नगर का राघव".. मिनू ने स्वत:हून केलेला पहिला प्रश्न. 

राघवला बरं वाटलं असावं," नाही, गढवाली भाषेत बुग्याल म्हणजे उंचावरची, पहाडाच्या उतरणीवर लांबवर पसरलेली पोपटी कुरणं. इतकी मस्त दाट हिरवळ असते ना बेदनीला की सामान लादल्याने जडावलेले घोडे अगदी लोळतात त्याच्यावर.. त्यामुळे त्या भागाला घोडा लोट्णी नाव पडलय". 

मिनूने लगेच तिची डायरी काढून त्यात काहीतरी टिपून घेतलं. "काय लिहीतेस एवढं?" अजितने विचारलं.

"बुग्यालचा अर्थ. गेल्यावर आई विचारेल ना मला सगळं सविस्तर". 

मग आईच्या आठवणीने काहीशी कातर होत मिनू म्हणाली "अ‍ॅम मिसिंग हर". 

अदितीने अलवार हात फिरवला तिच्या केसांवरून, तेव्हा निर्व्याज हसली मिनू...निषादसारखीच.


निषादचं दहावीचं वर्ष. निदान त्यात त्याला आई-बापामधला वाढत चाललेला दुरावा जाणवू नये यासाठी अदितीची धडपड असायची. निषादचं मात्र सारं मनापासून करायचा राहुल. रमून जायचे बाप-लेक एकमेकात... बाईकवर भटकंती, सायन्सचे प्रकल्प, नवं काहीतरी गुगल करणं. निषादला बापापासून तोडायला नको म्हणून गेली काही वर्ष अदितीने स्वत:ला मिटून घेतलं होतं. मन निवळत गेल्यावर आई इतक्या वर्षात पहिल्यांदा राहायला आली आणि अदितीने काही न सांगताच तिला बरच काही उमगलं. वाढत्या वयाच्या निषादच्या मनात तरी राहुलसारखं काही विष भिनायला नको म्हणून सुशीलशी मोकळेपणे बोलुन आणि त्याला हात जोडून अदितीने त्यांच्या मैत्रीचा धागा तोडून टाकला होता. 

’केव्हाही हाक मार.. मी असेन’ हे त्याचे निरोपाचे शब्द आठवून गहिवरून येई तिला. 

मन रमवायला आणि जरा मोकळा श्वास घ्यायला म्हणून अदिती, स्नेहाने सुरू केलेल्या कर्णबधीर मुलांच्या शाळेत शिकवायला जायला लागली होती. त्यादिवशी अवचित लवकर घरी आली तर राहुल फेसबुकवर तिचं अकाउंट उघडून तिची वॉल तपासत होता. 

"काय करतोयस राहुल?" 

तिने काहीशा तीव्र स्वरात विचारताच अजिबात न चपापता, तिच्या एका फोटोवर स्नेहाच्या नवर्‍याने केलेली ’ब्यूटिफुल स्माईल..’ ही कॉमेंट तिला दाखवत राहुल उत्तरला,

"बायकोने काही नवीन दिवे लावलेत का ते पाहातोय"

संतापाने कानशीलं गरम झाली तिची. 

"वाटेल ते बरळू नकोस राहुल, देवमाणूस आहे तो, स्वत:चा मुलगा कर्णबधीर असल्याचं निदान झालं तेव्हापासून कर्णबधीर मुलांसाठी स्वत:चं आयटी करियर सोडून काम करतोय. काहीही लपवण्य़ासारखं असतं ना माझ्या आयुष्यात तर ऑटोलॉगइन नसतं राहू दिलं मी. इट्स जस्ट अ कॉंप्लीमेंट, रादर तू नेटवर रात्री काय दिवे लावतोस ते मला चांगलं माहितीये पण मला त्यात काडीचाही रस नाहीये म्हणून मी बोलले नव्हते." 

सण्णकन एक लगावली राहुलने तिला ..दारात अवचित येऊन उभ्या असलेल्या आईसमोर. आईला तिच्या डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांचा, रात्री जाग आली की छताकडे टक लावून बघत राहण्य़ाचा, कुणाचा फोन आला तरी कधी कधी दचकून चाचरत बोलण्य़ाचा संदर्भ आता नीट उलगडला होता. राहुल दार आपटून तिरिमिरीत निघून गेला बाहेर. 

"असच वागत आलाय हा आजवर? मग का सहन केलस अदिती, कशासाठी? "आईने कळवळून विचारलं. 

"राहुलला गदागदा हलवून कधी भानावर का नाही आणलस? का नाही बोललीस त्याच्याशी?" 

अदिती विमनस्क चेहर्‍याने पुटपुटली "खूपदा बोलायचा प्रयत्न केला गं, पण कळलं ..आय हॅव अ प्रॉब्लेम इन बीईंग हर्ड.." 

आईसमोर सगळ्य़ा जखमा उघड झाल्याचा ताण सहन न होऊन भिंतीला धरून खाली बसत ती म्हणाली, "मनस्ताप ,शब्दांचे घाव सहन करत गेले जमेल तितकं... असं वाटायचं प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, पण पहिल्यांदा त्याने हात उचलला तेव्हा असह्य होउन पोलीस स्टॆशनला गेले आई मी.. त्यांनी तक्रार ऐकून घेतली पण मलाच ’चांगल्या घरच्या दिसताय.. शांत व्हा’ म्हणाले, वर हे ही सुचवलं की आता रात्रीचं शक्यतो घरी परत जाऊ नका, उद्या सकाळी तक्रार नोंदवू, तुमच्या घरच्यांना बोलावून. मग स्नेहाच्या सोबतीने शाळेतच रात्र काढली कशीबशी. सकाळी राहुलने पोलीस स्टॆशनला येउन ’आपल्या निषादसाठी तरी घरी चल’ म्हणून हात जोडले,

’संतापात ताबा सुटला, पुन्हा कधीही हात उचलणार नाही’ म्हणाला. 

’आदि..’ म्हणाला, कितीतरी वर्षांनी. मी ही पोरासाठी द्र्वले." 

आई मऊ हातांनी तिला थोपटत राहिली. आईचा हात हातात घट्ट धरत अदिती रूद्ध आवाजात म्हणाली..

"पण याने आदल्या रात्री निषादला काय काय सांगितलं होतं माहीत नाही गं. तक्रार दाखल झाली नसली तरी मी घरातली गोष्ट जगजाहीर केली, त्याला माझी माफी मागावी लागली भर पोलिस स्टॆशनमधे यासाठी मला धडा शिकवायचा असावा राहुलला की अजून काही, माहीत नाही. ’तू मला एकटयाला टाकून निघून गेली होतीस हे मी कधीच विसरणार नाही’, असं म्हणाला निषाद मला. आणि ..आणि तेव्हापासून मी कितीदा समजावलं तरी..", अदिती पिळवटून पुढे म्हणाली,

"तरी तो मला ’आई’ नाही म्हणत.. ’अदिती’.. अशीच हाक मारतो."  


बेदनी बुग्यालच्या पाचू लखडलेल्या वाटेवर आनंदाश्चर्याने सगळ्य़ांचे डोळे विस्फारू लागले. शब्द संपले. एरवी इथे नुसतं बर्फाचं मख्ख साम्राज्य असतं. उन्हाळ्य़ात सुद्धा इथल्या रात्री आतून गोठवून टाकणार्‍या असतात. एरवी गच्च बर्फात गुरफटलेली हिमशिखरं उन्हाळ्य़ापासून हळू हळू वितळू लागल्याने आता वातावरणात चैतन्य जाणवत होतं. गुराखी गुरं चारायला रमतगमत बाहेर पडले होते. हिरव्याकंच वाटा, लहानखु‍र्‍या झाडाझुडपातून सुर्रकन जाताना अवचित नजरेस पडणारे लहानसे जंगली प्राणी, पक्ष्यांची कानात रूणझुणणारी गोड किलबिल.. भान विसरायला झालं सर्वांना. सर्वदूर पसरलेल्या, अजूनही शिखरांवर बर्फाच्छादित असलेल्या शुभ्रधवल पर्वतरांगांवर नजर ठरत नव्हती. निसर्गाची आसमंतातली गाज सोडली तर हृदयात खोलवर भरून राहिलेली नि:शब्दता श्वासात भरून घेत, स्तब्ध होत सगळे पिंडारी नदीकाठच्या दगडांवर बसले. पाण्य़ाचा खळाळ टिपत.  

"ओ माय गॉड..पडलं ना कार्ड मिनू, कुठॆ लक्ष असतं ग तुझं" अजितच्या ओरडण्य़ाने तिची समाधी भंगली. 

अजितच्या कॅमेर्‍यात नवीन मेमरी कार्ड घालताना मिनूकडून ते अनवधानाने ओसंडत्या प्रवाहात निसटून गेलं होतं. 

"आता रे.." कसनुशी झाली होती मिनू. 


’किती कासावीस होतो आपण आपल्या वस्तूंसाठी’. अदितीला राहुलचं सतत गॅजेट्स बदलणं आठवत राहिलं. 

"चैन, मौज यांनी भरलेलं बालपण निषादला देण्यात गैर काही नाही, लाड कर ना, पण किती अरे... त्याला अजिबात नकार ऐकायची सवय नाही, शेअर करण्य़ाची सवय नाही, कळतय का तुला!" 

राहुलला ती असं काही समजावायला गेली की तो म्हणायचा 

"त्याला नशीबाने मिळतय तर एन्जॉय करू दे, तू सुस्थितीत वाढलीयस.. तुला नाही कळणार. मी तरसलो आहे एकेका गोष्टीसाठी. तळमळत वाट बघितलीय, लायकी नसणार्‍यांना सगळं उपभोगताना पाहिलय, आज मी मिळवलय ते सगळं"

"हो राहुल, मला वावडं नाहीये आनंदात राहण्य़ाचं पण आनंद आतून अनुभवायचा असतो आणि तो फक्त वस्तूंमधे नसतो हे निषादला आपणच सांगायला हवं ना. आपला ब्रँडेड बूट घातलेला निषाद जेव्हा कुणा अनवाणी, धूळ भरल्या पावलांना भेटतो तेव्हा त्यांची किंमत तो त्यावरून करतो. त्याला त्यामागची माणसं नको का दिसायला? आपण कोणते डोळे, कसलं मन देतो आहोत त्याला हे पण तितकच मह्त्वाचं नाही का." ती त्याला कळकळीने सांगायची. 

"काळजाचा तुकडा आहे तो माझ्या, त्याचं हित- त्याचा आनंद कशात आहे ते मला चांगलं कळतं. स्सालं.. जगात कोणी तरी गरीब आहे, राहणारच आहे, म्हणून आपण आपल्या हक्काचं, स्वकमाईचं सुख उपभोगायचं नाही का? दर वेळी हे रडकं तत्त्वज्ञान नको उगाळत जाऊस, मूड घालवतेस सगळा " अशी उत्तरं राहुलकडून मिळायची तरीही. 

तिला न सांगता सवरता नवा कोरा व्हिडीओ गेम आणि त्यासाठी बावन्न इंची स्क्रीन घेऊन राहुल दारात उभा होता. निषाद तर अत्यानंदाने जाऊन गळय़ातच पडला त्याच्या. कायदेशीर विभक्त होताना निषादला नियमित भेटू देण्य़ाची परवानगी मिळवली होती त्याने. निषादसमोर कधीही कोणताही तमाशा न करण्याची राहुलने नेहमीच खबरदारी घेतली होती त्यामुळे निषादसाठी त्याचा बाबा ’बेस्ट’ होता. निषाद आणि अदितीला मिळणार्‍या प्रत्येक मोकळ्य़ा वीकएंडला तिने एखादं प्रदर्शन पाहूया, दुर्गभ्रमण करूया असं काही ठरवावं तर बाप-लेकाचे प्लॅन त्याही आधी ठरलेले असत. राहुलची स्कोडा येऊन हॉर्न वाजवत उभी राही, निषाद अधीर होऊन बाबाच्या येण्याची वाट पाहत असायचा. कधी बाहेर जेवण, कधी सिनेमा, कधी मॉलमधे खरेदी तर कधी वॉटरपार्क. अदितीने स्नेहाच्या शाळेतली निवासी व्यवस्थापकाची जागा स्वीकारली होती. निषादचे क्लासेस, त्याचं खाणंपिणं व्यवस्थित सांभाळता येतं होतं. बाहेरगावच्या कर्णबधीर मुलांना तिथेच राहता यावं ही स्नेहाची इच्छा सुद्धा त्यामुळॆ पूर्ण झाली होती. त्या मुलांशी संवाद साधण्यासाठी अदितीने वेगळं प्रशिक्षण घेतलं होतं. त्या मुलांचे निष्पाप चेहरे, शब्द-भाषा समजून घेण्याची धडपड, कानाचं मशीन सांभाळत जमेल त्या उच्चारात, खाणाखुणा करत मारलेल्या गप्पा...अदिती स्वत:लाही विसरून जायची त्यांच्या चिमण्य़ा जगात. एकटी असली की मात्र ती अस्वस्थ असे. काचणारा दोर कापला तरी, त्याचे व्रण बुजले नव्हते. राहुलबद्दल तिने निषादच्या मनात कोणतच किल्मिष निर्माण केलं नाही, तिला ते करायचही नव्हतं पण तो जग वाचत जाईल तसतसं आपल्याला नक्की समजून घेईल अशी आशा हृदयात कुठेतरी जीव धरून होती. तोच तिचा श्वास होता. टीनएज मधल्या निषादला तिचं शाळेतल्या दिव्यांग मुलांभोवती गुरफटलेलं जगणं नीरस वाटणं साहजिक होतं पण निषाद ज्या आवेगाने राहुलकडे झेपावायचा, गॅजेट्सच्या ओढीने त्याची आसुसून वाट बघायचा ते पाहून काळजात कळ यायची तिच्या...


अकस्मात ती शहारली. राघवने सहज म्हणून पात्रात फेकलेल्या गोट्यामुळॆ तिच्या चेहर्‍यावर थंडगार तुषार उडाले होते. एक वेगळाच निनाद त्या तरंगांवर उमटत गेला. न राहवून तिने बूट उतरवले. नदीच्या खळाळत्या, नितळ, गारेगार पाण्य़ात पाय ठॆवताच एक जीवघेणी शिरशिरी अन तितकाच सुखद शहारा तिच्या अंगाअंगातून उमटला. तो थंडावा तनामनात भिनत गेला. 

"अजित हे घे" पर्समधून तिच्याजवळचं मेमरी कार्ड काढून त्याच्या हातात देत ती म्हणाली. 

"आणि मग तुला लागलं तर ,दीदी?" 

"मला आता गरज नाही या कशाची". अदिती स्मित करत उत्तरली. खळाळत, फेसाळत, रोरावत जाणार्‍या त्या शीतप्रवाहाकडे ती मुग्धपणे पाहत राहिली. 

उरातली काहिली निवत, वितळत, विरघळत त्या पाण्य़ात मिसळून वाहून जाताना होणारी विलक्षण थरथर साहत तिने डोळे मिटून घेतले. 


"आता बेगुवाशाला पोचल्यावर तंबूत मुक्काम करायचाय, या पाण्य़ाहून जास्त गार हवा असेल तिथे", राघवच्या शब्दांनी ती भानावर आली. बघते तर मिनू अचानक रडवेली झालेली, 

"ओह गॉड.. स्लीपिंग बॅग विसरलेय मी आणायची". 

राघव तिला समजावत म्हणाला "मी करेन तिकडे काहीतरी व्यवस्था, रिलॅक्स". 

शिखा अदितीला मिस्कीलपणे म्हणाली," मिनू काहीही विसरेल..पण मेकअप किट! वो कभी नही भूलेगी. ते आधी टाकत असणार बॅगमधे."

कर्तार म्हणाला, "मुझे भी बहोत शौक था पहले, हर लोकेशन पर अलग ड्रेस, क्लिक करो, पोस्ट करो, लाईक्स चेक करो. फिर जॉब के कामसे श्रीलंका गया था तब मेरे लगेज का एअरपोर्ट पर कुछ प्रॉब्लेम हो गया था. बस कॅबिन बॅग मे एक सेट था कपडोंका और जरूरी चीजे , बाकी सब दूसरी बॅग मे, लौटनेसे पहले बॅग मिल तो गया लेकिन पूरा हफ्ता मैने कमसे कम सामान मे अ‍ॅडजस्ट किया और तब पता चला, बापरे, हम कितना बोझ लेकर घूमते है, जबकी हमे जरूरतही नही होती इतनी चीजोंकी. अब मेरे पास बस एक सॅक रहती है." 

अदिती म्हणाली, 

"खूप लवकर शिकलास तू कर्तार..ओझी कमी करायला. मी अजूनही शिकते आहे. पण आता जास्तीचं सामान मागे सोडत प्रवास करतेय... हलकं हलकं वाटायला लागलय." 

कर्तार आणि शिखाला तिच्या सरोवरासारख्या डोळ्य़ांचा ठाव लागेना. 


"अदिती, मी बाबाबरोबर राहायचं ठरवलय." ठाम स्वरात निषाद बोलत होता. 

बाहेरच्या पावसाळी वातावरणात चमकणारी वीज तावदान फोडून आत आल्यासारखं वाटलं अदितीला. ’तिचा निषाद’ हे बोलत होता. तिच्याभोवती घर फिरायला लागलं. बधीर अवस्थेत अंधारात चाचपडल्यासारखं तिने स्वत:लाच परक्या वाटणार्‍या आवाजात विचारलं. "का निषाद? अचानक?" 

"अचानक नाही, खूप दिवस विचार करतोय, तू तशी एकटी पडणार नाहीस, तुला तुझं काम आहे, त्याचा इतका व्याप आहे, इतकी कर्णबधीर मुलं आहेत तुझ्यावर अवलंबून. इंजिनीयरिंग होईतो मी बाबासोबत राहणार. पुढे शिकायला, बाबा म्हणतॊ, तू अमेरिकेला जा" 

"ओह, तर सगळं ठरलेलच आहे तुमचं!" 

निषाद तिची नजर टाळत म्हणाला "अ‍ॅम जस्ट बीइंग प्रॅक्टीकल अदिती, बाबाला जगातले बदलते ट्रेंड्स, आंतरराष्ट्रीय राजकारण, आऊटसोर्सिंग पॉलिसीज, कॉर्पोरेट जग सगळ्य़ाची अफाट माहिती आहे. तो करियरबद्दल नीट गाईड करू शकेल मला. तुला माझी प्रगती व्हावी असं वाटत असेलच ना गं." 

अदिती रित्या चेहर्‍याने त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेने अस्वस्थ होत काहीशा कापर्‍या आवाजात निषादने त्यांच्या नात्यातली निरगाठ सोडवत म्हटलं,

"तुझा नाईलाज होता तेव्हा तू पण गेलीच होतीस न मला सोडुन, मग मी माझा विचार केला तर काय चुकलं!" 

अदिती अवाक झाली होती. ’राहुलने त्याला हवं ते दिलं पण दुसरीकडे स्वत:च्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून वापरलं, आपण तरी काय वेगळं केलं! निषादला आपल्या भावनिक आधारासाठी घट्ट धरून ठेवताना, त्याचा कोंडमारा समजून घेतला का आपण? त्याला आश्वासक वाटेल, हक्काने मान ठेवावीशी वाटेल असा खांदा आपणही द्यायला हवा होता..केला तसा प्रयत्न पण स्वत:च्या दु:खात मश्गुल होता होता त्यात कमी पडलो का आपण, की एक आई म्हणून त्याच्या माणूसपणाच्या क्षमता वाढवायला कमी पडलो!’ 

स्वत:ला सावरून घुसमटत्या स्वरात ती इतकच उच्चारू शकली "कधी निघतोयस?" .....


श्वास मधूनच कोंडल्यासारखा वाटत होता. खोलवर श्वास घेतला की बरं वाटत होतं. पुन्हा ऑक्सिजन कमी असल्याचं जाणवत होतं. अदितीचे डोळे मिटत होते पण थंडगार वार्‍याचे झोत काही सुचू देत नव्हते. शिखा, मिनू स्लीपिंग बॅगमधे जबरदस्ती झोपण्य़ाचा प्रयत्न करत होत्या. तशातही कर्तार मजेत गात होता. बाजूच्या तंबूत त्या तिघांची कवितांची -गाण्य़ाची मैफिल रंगात आली असावी. त्याचा खडा स्वर कानावर पडला, 

"टूटी चारपाई वोही ..ठंडी पुरवाई.. रास्ता देखे ..दूधों की मलाई वोही ..मिट्टी की सुराही.. रास्ता देखे..

"कैसी तेरी खुदगर्जी ना धूप चुने ना छाव... कैसी तेरी खुदगर्जी किसी ठोर टीके ना पाव.. रे कबीरा मान जा ..रे फ़कीरा मान जा .." 

राहुलचा पहिला स्पर्श पुन्हा एकदा आठवू लागला, पाठमोरा निषाद अदितीच्या डोळ्य़ांसमोर दिसू लागला. पण आता डोळ्य़ात नेहमीसारखा अश्रूंचा पडदा तरारला नव्हता. जे. कृष्णमूर्तींच आवडलेलं वचन उलगडायला लागलं होतं. "To Be is to be related and to be related is to be in conflict." आतला आणि बाहेरचा सगळा कोलाहल शमत आला होता. "जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा... न कुठले नकाशे न अनुमान काही" ...राघवच्या मऊ, हृदयस्पर्शी आवाजातल्या खरेंच्या ओळी आणि पाठोपाठ अजितची दिलखुलास दाद कानावर पडली. हळूहळू ते आवाजही शांत होत गेले.

    

"चलो चलो उठो ना दीदी.." 

"कोण बोलतय हे मध्यरात्री !"... अदितीने मोठ्या कष्टाने डोळे किलकिले केले. 

"भूल गई आप? ढाई बजे निकलना है हमे आगे, रूपकुंड के लिए"

"ओह, रूपकंड..!" ह्याचसाठी केला होता सारा अट्टाहास. 

भराभर सर्वांनी सामान बांधलं. मिनू चक्क सर्वात आधी तयार. तिच्या नजरेत आता एक नवी चमक दिसत होती. विजेर्‍यांचे झोत लांबवर टाकत नव्या उमेदीने सगळे निघाले. हाडात रूतणारा गारवा आणि विरळ हवेमुळे लागणारा दम ..कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं. सभोवताली पसरलेल्या थंडगार काळ्य़ासावळ्या शांततेत बर्फात रूतणारे बुटांचे आणि श्वासांचे आवाज तेवढे ऐकू येत होते. वाटाड्य़ाशी हलक्या स्वरात बोलत राघव बराच पुढे चालत होता... पहाट व्हायला लागली असावी. आकाशात अस्फुट कोवळ्य़ा रंगांच्या उमटत जाणार्‍या छटा, उगवत्या दिवसाबरोबर गडद होऊ लागल्या होत्या. पोचेतो सकाळचे सात वाजून गेले आणि... रूपकुंड दॄक्गोचर झाले. कधी नीलवर्णी तर कधी गडद हिरव्या जलाच्या मनोवेधक छ्टांनी सूर्यप्रकाशात चमचमणारे अंडाकृती कुंड एकटक बघत राहिली अदिती. वरच्या त्रिशूल आणि गंगोत्री पर्वतरांगा सोनेरी रंगात न्हाऊन गेलेल्या दिसत होत्या. एका अनामिक उत्तेजनेने सगळ्य़ांनी एकमेकांचे हात गच्च धरून ठेवले. सोळाहजार फुटांवरचा अंतरात खोलवर भिनत जाणारा निसर्गाचा अनुपम अविष्कार अनुभवताना सारे स्तिमित झाले होते. इवलाले विषाद त्या भव्यतेत नि:शेष झाले होते. आता लख्ख दिसू लागलं होतं. नजर भिरभिरू लागली आणि रूपकुंडाच्या आजूबाजूला पसरलेले मानवी सांगाडे स्पष्टपणे दिसू लागले, त्यातच काही घोड्य़ांच्या अस्थी, भांडी, वस्तू, चपला देखील पडलेल्या होत्या. 

"एरवी हे कुंड, सगळा परिसरच गोठलेला असतो, उन्हाळ्य़ात बर्फ वितळतं त्यामुळॆ आता हा विलक्षण नजारा दिसतोय़." राघव सांगत होता.

"कार्बन डेटींग परिक्षणानुसार नवव्या शतकातले हे सांगाडे आहेत असं म्हणतात बुवा. हिमपातात मेलेले लोक असणार हे अर्थात. मानववंशशास्त्रज्ञांसाठी एक आव्हान आहेत हे सांगाडे". 

शिखा म्हणाली," हाँ, और मैने पढा है, कन्नौजका राजा, उसकी प्रेग्नंट रानी, और नौकरचाकर, सारा काफिला नंदादेवी गया था, येताना जोरदार गारपीट झाली, त्यात अडकले ते, उनके भी कंकाल होंगे इसमे", 

"ती तरी वदंता आहे पण खरच, आत्ता इथे हिमपात झाला तर रे !" मिनू अजितला बिलगत घाबरत कुजबुजली. 

"तो क्या, ऐसेही हमारे कंकाल देखने के लिए अगली सदी के लोग आया करेंगे" कर्तार हसत हसत म्हणाला. 

अजित त्यावर म्हणाला," बरोबर, ’राघव आणि ग्रुप’ चे सांगाडे सामील होतील यात, पण आपला राघव काही कन्नौजचा राजा नाही त्यामुळे आपली तर काही आख्यायिकाही सांगणार नाही कोणी". 

वाटाड्य़ा त्याच्या पहाडी लहेजात सांगत होता, "महादेव और पार्वतीमाँ कैलास जा रहे थे तो यहीसे गुजर रहे थे, बडी प्यास लगी पार्वतीमाँ कों. महादेवा की पावर ऐसी के यहाँ जो मारा त्रिशूल और वो निकला पानी. लेकिन पार्वतीमाँ पानी पिना भूल ही गई और कुंड मे झाकणे लगी, बैठी अपणा सुंदर रूप निखारते हुए.. इसिलिए ये कुंड को लोग रूपकुंड करके जाणते है " 

राघव चेष्टेने म्हणाला," जळी स्थळी प्रतिबिंब पाहण्य़ाचा मोह पडला नाही तर ती बाई कसली.." 

शिखा उत्तरली, "बिलकूल गलत, राघव, तुम्हे पता है ना, मै कभी आईना नही रखती अपने पास "

अदिती ही सारी निखळ किलबिल निर्लेपपणे ऐकत होती. समष्टीशी स्वत:चं जुळू लागलेलं, उमलत गेलेलं नवं नातं पूर्णत्वाने फुलून आलेलं पाहत होती. मृण्मय होण्य़ाच्या प्रतीक्षेत शतकानुशतकं पडून असलेल्या सांगाड्यांकडे बघताना पिसासारखं हलकं होत होत शून्य होतानाची अद्वितीय अनुभूती घेत होती. काळाची परिमाणं बदलतील तसं गोठत जाऊन भोवतालच्या विराट हिमराशींशी एकरूप होणारं आणि या क्षणी त्या भव्यदिव्य श्वेतपटलावर एखाद्या इवलाल्या नीलमण्य़ासारखं भासणारं, सजीव होऊन संथपणे चकाकणारं रूपकुंड ती अनिमिषपणे पाहत होती. 

’रे फकीरा...मान जा’... न शोधताही तिला काहीतरी सापडत गेलं होतं.. साधलं होतं. डहुळलेल्या पाण्य़ातले तरंग विरत जाऊन ते निश्चल, नितळ व्हावं तसं पारदर्शी मौन ती अनुभवत होती. त्यानंतर मनात उमटलेला प्रत्येक शब्द भयमुक्त, स्थिर आणि सच्चा असल्याची प्रचिती घेत होती. क्षमेच्या अद्भुत स्पर्शाने नि:शंक झालेल्या अदितीला आता आपलं प्रतिबिंब बघण्य़ासाठी कुठल्या रूपकुंडाची गरज नव्हती.

--------------------------समाप्त ----------------------


कथा लेखिका - मोहिनी मोडक

पूर्वप्रसिद्धी - तरुण भारत ’दीपोत्सव’ (दिवाळी अंक) २०१९


Sunday, December 15, 2019

नसतोस घरी तू जेव्हा..

सोमवारची धावपळीची सकाळ. रोजच्यासारखी पीकेव्ही मधून फिरुन आले. तिथे आज मस्त दाट धुकं होतं, परत येईतो त्यात उगवत्या सूर्याचा केशरट प्रकाश मिसळला होता, मुख्य चौकात दोन मैत्रिणी अचानक भेटल्या, एक मोर अगदी जवळून दिसला आणि तिथल्या पुलावरच्या भाजीवालीकडे ताजी कोथिंबीर फारच स्वस्त मिळाली, चला आता कोथिंबीर समोसे करता येतील, त्यामुळे दिल एकदम गार्डन गार्डन हो गया था. छान मूडमध्ये घरात शिरताना वळून फाटक बंद करायला गेले. समोर कुणीतरी नवीन भाडेकरु बाई राहायला आली आहे. तिने ’आली मोठी स्टाईलमारु, माझ्याकडे नसतो फिराबिरायला रिकामा वेळ पण घर पाहा माझं, चकाचक असतं’ असा मला लुक कम कॉम्प्लेक्स देऊन गॅलरीवर हातातल्या कापडाचे फटके मारणं सुरू ठेवलं. सायन्स के बोझ का मारा लेक एका क्लासहून आला होता आणि दुसर्‍या क्लासला जायच्या गडबडीत होता. आधी घाईने त्याला नाश्ता करुन दिला. तेवढ्या गोंधळात जोकरच्या जागी कोणता नवा कलाकार घेतलाय याचा व्हिडिओ त्याच्या फोनवर त्याच्या आग्रहास्तव हातातल्या चिमट्यात पातेलं तसंच पकडून पाहिला. त्याला बाय करून वाचायच्या राहिलेल्या कालच्या पुरवण्या जमा करुन ठेवल्या. आजच्या हेडलाईन्स पाहिल्या. समोरच्या बाईचा फटक्यांचा म्हणजे साफसफाईचा आवाज ऐकून अचानक आपले अंगण पाचोळ्याने भरल्याचे आठवले आणि तरातरा झाडायला गेले. अंगण चकाचक झाल्यावर तिच्या गॅलरीकडे हळूच एक कटाक्ष टाकला पण ते पाहायला ती एरवी गॅलरीतच पडीक असलेली बयाबाई नेमकी गॅलरीत थांबली नव्हती, जाऊदे. मग आजची कामं क्रमाने आठवत मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ’त्याची’ कडकडून आठवण आली....  म्हणजे मोबाईलची.

चार्जिंगला लावलेला नव्हता. उशीखाली राहिला का! नाही. लेकाच्या टेबलवर नव्हता. किचनमध्ये.. नाही. पेपरच्या ढिगाखाली! नाही. मी अंगण झाडलं तिथे कुठे.. कचर्‍याच्या डब्यात नाही ना टाकला पाचोळ्याबरोबर! ते पण उपसून पाहिलं.. नाही. हे पाहा, मी फिरुन येताना अशी गाडी आत आणली मग शूज काढले मग .. ज्या क्रमाने जे केलं तसा अ‍ॅक्शन रिप्ले केला. पण नाही. . ट्रॅक पँटच्या खिशात! नाही. वाटेत खिशातून नाही ना पडला. की फिरताना पीकेव्ही मध्ये कुठे पडला. पण पडला तरी आवाज न यायला तो काय रुमाल आहे का! कुणीतरी आवाज देऊन सांगितलं असतं की. आणि आज चालताना मी गाणी ऐकली नाहीत म्हणजे नेला होता की नाही मुळात?

तेवढ्यात सासूबाई गडबडीने माझ्याजवळ येत म्हणाल्या, ’आज मोबाईल डोक्याशी ठेवून झोपू नकोस, नासाने सांगितलंय, कॉसमॉस किरणं मध्यरात्री पृथ्वीवर येणार आहेत, (तुझ्या आधीच सरकलेल्या) मेंदूला चांगलं नाही म्हणे. हे बघ मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलं आहे’. मी त्यांना २३५ व्यांदा शांतपणे सांगितलं की हे काही खरं नसतं.
’अगं पण नासाने का सांगितलं मग.’
’नासाबिसाने काही सांगितलेलं नसतं ओ, लोक नासा, नाना पाटेकर असली नावं टाकून काय वाटेल ते लिहितात.’
’पण लोक उगाच कशाला असं करतील!’
माझे म्हणणे फारसे न पटून त्या पुन्हा नासा किंवा नाना पाटेकरांनी आणखी काय काय म्हटलंय ते वाचण्यात गढून गेल्या. मी त्यांना थांबवून त्यांच्या फोनवरुन स्वत:ला फोन लावला आणि गुप्तहेरासारखी दबकी पावलं टाकत टवकारलेल्या कानांनी घरभर हिंडले. घरात कुठेही रिंग ऐकू येईना, वरुन हे ऐकू आलं ’इस समय आपको कोई उत्तर नही दे रहा है, कृपया थोडी देर बाद पुन: प्रयास करे’

चोर कशाला देणार म्हणा उत्तर. म्हणजे, अरे देवा! चोरीला गेला असेल की काय माझा मोबाईल! त्यातून नवा कोरा. जुना अगदीच हँग व्हायला लागला, इतका की लोक दयार्द्र नजरेने पाहू लागले म्हणून नुकताच घेतलेला. लेटेस्ट. चांगला ४८ एमपी कॅमेरा असलेला. नवर्‍याला ’भला इसकी रॅम मेरे रॅम से जादा कैसे’ असा हेवा वाटायला लावणारा.
काय काय महत्वाचं होतं त्यात, ते कुणाच्या हाती लागेल का! महत्वाचे आयडी पासवर्ड कोड भाषेत लिहुन स्वत:लाच मेल करुन ठेवलेत. पण इतके कोड भाषेत की मलाच आपण हे काय लिहिलंय ते काही वेळेला कळत नाही तर इतरांना काय कपाळ कळणार! (परवा नेटबँकिंगच्या पासवर्डचं असंच झालं, आठवेचना. सुरक्षिततेतची खबरदारी म्हणून पासवर्ड सेव्ह्ड ठेवला नव्हता. कोड भाषा कळेचना मग स्वत:शी क्वीझ खेळत बसण्यापेक्षा ’फर्गेट पासवर्ड?’ला शरण गेले. त्यात त्याने जो गुप्त प्रश्न विचारला त्याचंही उत्तर आठवेना, मेमरी आहे का खोकं असं झालं अगदी, शेवटी ओटीपी बीटीपी, दादा, पुता करून एकदाचा तो पासवर्ड नवा केला. आता पुन्हा तो लक्षात ठेवा. पासवर्ड कसा असावा यावर लेक्चर देणं सोपं, तो लक्षात ठेवणं महाकठीण.चला, निदान कॉंटँक्ट्सचं बॅकअप आहे. पण केव्हाचं तर १९४२ सालचं म्हणजे नंतर अ‍ॅड केलेलेल कॉंटँक्ट्स गेले की!! अ‍ॅप्स पण पुन्हा इन्स्टॉल करावे लागतील. करु काय ते पण आजच्या कामांचं कसं करायचं! आणि मेल ऑटोलॉगइन आहे. बापरे, असा कसा मॅडसारखा ऑटो मोड ठेवला मी, लोकांना सायबर सिक्युरिटीचं ब्रह्मज्ञान देता देता. पण ओके, त्याचा आधी पासवर्ड बदलते लॅपटॉपवरुन. चोर भी क्या याद करेगा! काही हाती नाही लागू देणार त्याच्या. अर्र पण इतर काही फ्री अ‍ॅप्सचे अ‍ॅक्सेस मिळतीलच आणि गॅलरीला पण लॉक नाही. फोटोचा गैरवापर केला तर! त्याला शिकवीन चांगलाच धडा. फिंगर लॉक आहे की, फिकर नॉट. बरं आत्ता फोन ब्लॉक करावा का! पोलीस कम्प्लेंट करावी तर काही तर आठवायला हवं नं! IMEI ट्रॅकर साठी तो पण आठवत नाहीये. डायरीत लिहिलाय वाटतं. नाही दिसतंय! अ‍ॅमॅझॉनच्या ऑर्डर इनव्हॉइस मध्ये मिळेल की. अरे वा अपना दिमाग भी चाचा चौधरी की तरह कंम्प्यूटरसे तेज चलता है. शंभर प्रश्न डोक्यात फिरु लागले.

मग आठवलं, नवरोबांचा फोन दसर्‍याच्या झेंडू खरेदीच्या गडबडीत कुणीतरी मारला तेव्हा त्यांनी पोलिस कम्प्लेंट केली होती. दुसर्‍या दिवशी ते अपेक्षेने पोलीस स्टॆशनला गेले तर डंग डंग आवाज करत फिरणार्‍या पंख्याखाली धूळभरल्या खुर्चीत बसलेल्या एका पोलिसाने त्यांनाच उलट विचारलं, लागला का काही तपास फोनचा. एकूण पोलिस फार काही करतील अशी आशा ठेवणं वेडेपणाचं होतं. चला पुन्हा रिंग करुन पाहू, न जाणो पीकेव्हीतल्या कुणी तरी स्वत:जवळ उचलून ठेवला असेल. जगात चांगले लोक नक्कीच जास्त आहेत. रिंग जात राहिली आणि चक्क... नवरोबांचं अगदी गोड, हळू आवाजात ’हॅलो’ ऐकू आलं. युरेका ! म्हणजे फोन या बुवाकडे आहे तर, चला. मी सुटकेचा निश्वास सोडला. पण अ‍ॅ, हं किंवा ’काय आणायचंय’ च्या ऐवजी हॅलो ! आणि इतका गोड आवाज!

’माझा फोन तुझ्याकडे कसा आणि मी इतक्या रिंग दिल्या तेव्हा का नाही उचललास?’
’कामात होतो, आत्ता व्हायब्रेट झाला तेव्हा लक्ष गेलं. ते मी सकाळी, हे ते .. तू आधीच उठलीस अलार्मच्या, तर अलार्म बंद करुन जाता जाता तुला आणून द्यायला फोन खिशात ठेवला आणि चुकून तो माझ्याबरोबर आला.’
’तो चुकून आला!’
’नाही म्हणजे मी चुकून आणला.’
’मग असं कर्तरी प्रयोगात बोल ना!’
पुन्हा गोड स्माईल (स्वत:ची चूक असल्यामुळे अतिदुर्मिळ योग)
एकूण माझा मोबाईल आता पन्नास किमी लांब गेलेला होता आणि दुपारी दोन शिवाय परत मिळणार नव्हता.
माझ्या बाजूने इतकी शांतता पाहून त्यांनी विचारलं, ’खूप महत्वाचं काम राहून जाईल का तुझं? तुझा दहा हजार करोडचा टर्नओव्हर एकद्म खालीबिली येईल का! तसं असेल तर मी करतो काहीतरी व्यवस्था अर्जंट पाठवायची’. मी बीपी न वाढू देता म्हटलं, ’मी करीन लॅपटॉपवरुन काम. जाऊ दे.’

मी कामाला लागले. नेहमीपेक्षा दुप्पट वेगात काम झालं कारण उगाच इकडे तिकडे मोबाईलमध्ये डोकावण्याचा वेळ वाचला. कामाव्यतिरिक्त थोडं लेखन झालं. घरातलं काम आटोपलं. कालचं राहिलेलं एक काम सुद्धा पूर्ण झालं. कालच्या बाकी राहिलेल्या पुरवण्यातले काही लेख वाचून झाले. वेळच होत नाही हे जे आपण म्हणतो ते केवळ या कर्णपिशाच्चामुळे हे अगदी पटलं. खूप महत्वाचं काम असेल तर मी ’रीड ओन्ली’ मोड वर असते पण आपण उत्तर दिलं नाही तरी कामाशिवाय नासा आणि नाना पाटेकर छाप निरर्थक पोस्ट स्क्रोल करण्यात वेळ जातोच नकळत. त्यात ’थंड केलेल्या लिंबाचे परिणाम’ छाप मंद पोस्ट किंवा ’बायकांनी बुरखा घालावा म्हणजे त्या सुरक्षित राहतील’ छापाच्या मूर्ख पोस्ट वाचून टाळकं सरकतं ते वेगळच. नेट ऑफ करणं किंवा सोशल मिडिया उपास बिपास असले उपाय माझ्या अजिबात कामाचे नाहीत कारण माझं काम ऑनलाईनच करावं लागतं, रोजचे टास्क पण व्हॉट्सअ‍ॅप वरच असतात आणि चेक करुन तिथेच पुढचं लिहिलं जातं. पण या निमित्ताने बॅकअपच्या बाबतीत आपण अजून काही गोष्टी (इतरांना नेह्मी मारे सांगतो त्याच) लक्षात घ्यायला हव्या आहेत हे जाणवलं. गुगल ड्राईव्हवर प्रत्येक मह्त्वाच्या गोष्टीची कॉपी ठेवलीय की नाही हे चेक करायला हवं आहे हे नीटच कळलं. (ठेवली आहे, पण अपडेट केलीय का!) मोबाईल मला कंट्रोल करायला लागलाय हे ही लक्षात आलं. मोबाईल स्वेच्छेने काही वेळ बाजूला ठेवणं वेगळं, ते मला बर्‍यापैकी जमायला लागलं असलं तरी ’मोबाईल नाहीच आहे’ अशा परिस्थितीतही काही वेळ जगता येणं मुश्कील है लेकिन नामुमकीन नही याची पण खात्री पटली. हे चुकून झालेलं मॉक ड्रील बरीच अक्कल शिकवून गेलं.

२ वाजले. मोबाईलसह त्याला ’चुकून घेऊन जाणारा बुवा’ घरी पोचला. आज दुधी भोपळ्याची भाजी असूनही त्याच्या चेहर्‍यावरचे स्मित हास्य लोप पावले नाही.
’काय मग कसा गेला अर्धा दिवस! तुझ्याशी संपर्क न झाल्याने शहा आणि मोदींचे काही निर्णय पेंडिंग तर नाही ना राहिले!’
मी ते काही मनावर न घेता.. ’छान गेला, भरपूर कामं झाली माझी. एकदोन कामं अडून राहिली खरी पण त्यामुळे काही प्रलय नाही आला. ती आता करता येतील.’
’अरेच्चा, मला वाटलं की तू आता तुझी किती अडचण झाली याचा नॉनस्टॉप पाढा वाचणार. इतकी कूल राहिलीस म्हणजे नवलच आहे.’
आता त्यांना कशाला सांगा की एक तर या मोबाईलविना जगण्याच्या शॉर्ट ट्रेलरबद्दल मला त्यांचे खरं तर आभारच मानायला हवेयत आणि दुसरं ,सर्वात महत्वाचं ,पुढे माझ्याकडून ’चुकून’ असं काही झालं तर तेव्हा वापरायला हे ’कार्ड’ राखून ठेवलेलं बरं ना! :-)