Thursday, January 31, 2019

गोवा डायरी १

अकोला स्टेशनवर साडेआठला सगळ्या जमलो तेव्हा गोव्याला एकत्र धमाल करण्य़ाच्या कल्पनेने आम्हा मैत्रिणींचे आणि बायका गावाला जात असल्याने मिळणार्‍या मोकळीकीच्या कल्पनेने आमच्या नवर्‍यांचे डोळे आनंदातिशयाने चमकत होते.
गाडी रात्री ११ वाजता अकोल्याहून भुसावळला पोचली. गोव्याला विमानाने जायचे तर आधी रेल्वेने नागपूर किंवा मुंबईला जाणे, मधली अंतरे, तिथे अगोदर चेकइन वगैरे बघता फार तर एखादा दिवस वाचला असता. त्यामुळे तो बेत रहित केला होता. आम्हा दहा जणींना आता भुसावळ रेल्वेस्टेशनवर महिला प्रतीक्षालयात तीन तास काढायचे होते, पण आरतीने निगुतीने आणलेलं वाफाळतं मसाला दूध पीत आणि dumb charades खेळत वेळ केव्हा गेला कळलंच नाही. झोपेने तारवटलेल्या डोळ्यांनी जांभया आवरत तिथे टेकलेल्या तीन-चार बायकांचीही आमचे हातवारे पाहत बसल्याने झकास करमणूक झाली. बाजूला एक आडदांड महिला पोलीस फोनवर कुजबूजत अखंड बोलत होती. ’अग बाई, चार्जिंग सुरू असताना बोलू नये’ असं तिला सांगावसं वाटलं पण केस अवघड होती. तिचा आजूबाजूच्या जगाशी काहीही संबंध नव्हता. फोन हातातून काढला असता तर बहुतेक तिने जागीच प्राण सोडला असता.
तिचा नाद सोडून पत्ते विकत आणायला म्हणून मी आणि भाग्यश्री बाहेर पडलो. खाण्यापिण्याचे स्टॉल्स फक्त सुरू होते. वडा, दोसा, ऑमलेटचे संमिश्र वास येत होते. मग जाणवलं की रात्री १२ वाजता स्टेशनवर फिरणार्‍या आम्हा दोघींकडे लागलेल्या नजरा जरा विचित्र होत्या. नुकत्याच केलेल्या नाशिक प्रवासाची मला आठवण झाली. एकटीने परत येत होते आणि रात्री साडे १२ची गाडी. गाडी येत असल्याची सूचना ऐकून मी अपेक्षित प्लॅटफॉर्मवर अपेक्षित बोगीसमोरच्या एका पारावर घाईने येऊन बसले. तिथे फारसा उजेड नव्हता. अचानक लक्षात आलं, आजूबाजूला पन्नास एक मजूर कांबळं पांघरून कुठल्याशा गाडीची वाट पाहत उकिडवे बसलेत. क्षणभर माझा श्वासच अडकला. माझी गाडी येईपर्यंत ते १००एक डोळे आपल्यावरच रोखलेले आहेत याचा ताण न घेता बसणे म्हणजे परिक्षाच होती. त्या नजरा विचित्र होत्या हे खरं कारण त्यांच्यात बायका एकटीने फिरत नाहीत पण त्या वाईटच असतील असं का गृहीत धरावं, असा विचार करत अखेर मी शांत बसले होते. असो.
तर मंगला एक्सप्रेसची घोषणा झाली आणि सगळ्य़ा जणी लगबगीने उठल्या. बहुतेक जणी आपल्या कुटुंबासह गोव्याला एकदा तरी जाऊन आलेल्या, काही जणींचे देशभर, काहींचे परदेश प्रवास देखील झालेले पण फक्त मैत्रिणींसह स्वत: आखलेल्या या गोवा प्रवासासाठी सगळ्या प्रचंड उत्सुक होत्या. बायको बालवाडीत असल्यासारख्या नवर्‍यांच्या सूचना, मुलांच्या मागण्या, अमुक घेतलं का, आता तमुक कशाला घेतलं, वगैरे प्रतिक्रियांविरहीत अशी ही निवांत, मनमुक्त,स्वनियोजित ट्रीप असणार होती. रेसॉर्ट आणि दुचाकी, चारचाकी वाहनांचं मात्र बुकिंग करून घेतलं होतं. बुकीच्या सहाय्याने आराखडा ठरवून घेतला होता. पण आमच्या सोबत इतर कुणीही असणार नव्हतं.आपल्या जबाबदारीवर प्रवास करण्य़ात, अकल्पित प्रसंगांना सामोरे जाण्य़ातली गंमत मला नेहमीच आवडते. ’निरगाठी’ मध्ये गौरी देशपांडे लिहितात नं, ’मुलींनो सावध असा पण इतकेही जपू नका की अनुभव तुमच्या कुंपणांना घाबरुन पाठ फिरवून निघून जातील’.

प्रचंड थंडीमुळे प्रत्येकीने सगळं अंग कपडयात गुंडाळलेलं पण तरीही या हौशी गाठोड्यांनी ’निघतानाचा’ फोटो काढलाच. मंगलाताई वेळेवर आल्याने सुरुवात तर छान झाली. आपापल्या बर्थवर पथारी पसरुन सगळ्य़ा गुडूप झोपल्या. नाशिकला शीतल जॉईन झाली. तिला एकटीलाच वेगळ्य़ा बोगीचे तिकिट मिळाल्याने चिंता वाटत होती. त्यावर, इकडचा एखादा बुवा गोड हसून तिकडे पाठवायचा, त्यात काय, वगैरे आमचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर बोलणे झाले होते. ’बुवा पटेल का’ या तिच्या प्रश्नावर ’इतक्या बायका गोड हसल्यावरही पटणार नाही असा बुवा अजून जन्माला यायचा आहे’ वगैरे सांगून आम्ही तिला धीर दिला होता :-) पण मुदलात पहाटे पाच वाजताच्या झोपाळू अवतारात एक तर गोड हसता येत नाही आणि अगदी ऐश्वर्या हसली तरी साखरझोपेतून उठून कोण बुवा तिकडे जाणार हे लक्षात घेऊन ती बापडी तिकडेच झोपली. सकाळी ग्रुपवर चर्चा करुन मग सामानासह ’मोठया घरी’ आली. ९ ला पनवेलला अंजू जॉईन झाली आणि कोरम पूर्ण झाला. गरमागरम वडापाव घेऊन अश्विनीची नणंद तिथे हजर होती. तसंही झोपेतून उठल्यापासून आमचं चरणं सुरूच होतं. एसीच्या दुधाळ खिडकीतून बाहेरचा रम्य निसर्गबिसर्ग फार नीट दिसत नव्हता. दुपारी जेवताना मेथीचे जगातले बहुतेक प्रकार खाऊन झाले. सगळ्य़ा सुगरणींनी इतके प्रकार आणले होते की खाण्य़ापेक्षा, आपलं यातलं काही खायचं सुटलं तर नाही ना हे शोधण्यात जास्त वेळ जात होता. पत्ते नेहमीप्रमाणे रंगले. फार हुशारी वगैरे वापरुन जजमेंट खेळून झाल्यावर कळले की बरेच पत्ते खाली पडलेले होते. मी आणि पल्लवी ३०४ चे नियम चिकाटीने समजावून, दोघीदोघींची मानगूट पकडून दोन चार देवाचे डाव खेळलो पण मेथीच्या अतिसेवनामुळे जडावलेल्या मेंदूंना बदामसत्तीपलिकडे फार काही झेपेना. पत्ते, गप्पा, गाणी आणि वाम तसेच दक्षिणकुक्षीमध्ये हा दीर्घ प्रवास केव्हाच संपला आणि थिविम (किहिम नही रे मीनल थिविम, थिविम) स्टेशनला काफिला अखेर उतरला.

प्रशस्त पार्किंगमध्य,  पिकअपसाठी आलेल्या गाडीवाल्याशी थोडा वेळ लपाछपी खेळून झाल्यावर ’काळा गुलाब’ वगैरे कोडवर्ड ठरवलेला नसतानाही एकदाची आमची-त्याची ओळख पटली आणि आम्ही हुश्श करून कँडोलिममधल्या आमच्या सँटारिटा रेसॉर्टकडे वेगाने निघालो.
आपापल्या घरी सुखरूप पोचल्याचं कळवून होताच बाहेरच्या गोव्याकडे लक्ष गेलं. स्वच्छ रस्ते, टुमदार घरं, अधूनमधून दिसणारी चर्चेस, देवळांच्या आवारातल्या दीपमाळा, माडाची डौलदार झाडं, नीटनेटक्या अंगणांतली सुंदर फुलझाडं, दिवाळी असावी तशी अनेक घरांवरची, उपहारगृहांची नेत्रदीपक रोषणाई आणि वातावरणात भरून राहिलेली उत्फुल्लता. कोकण आणि गोव्यातला हा महत्वाचा फरक. दोन्ही ठिकाणी निसर्गसौंदर्यांची लयलूट सारखीच पण कोकणातली संध्याकाळ मला कायम उदास वाटत आलेली आहे. सूर्य अस्ताला जाऊ लागतो तसतशी तिथल्या वातावरणात एक खिन्नता दाटून येऊ लागते. याउलट गोव्याची मदिर संध्याकाळ प्रचंड उर्जा घेऊन नाचतच येते. गाडी रेसॉर्टच्या जवळ आली तसतशी दुतर्फा गजबजलेली दुकानं दिसू लागली. दोन्ही बाजूंच्या रेस्टॉरंट्समध्ये निवांत बसलेली परदेशी मंडळी हुक्क्याचा, (अ)पेयांचा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होती. संगीत मोठयाने वाजत होतं. गाडी रेसॉर्टमध्ये शिरली. आम्हाला खाली एक आणि वर दोन खोल्या असा व्हिला मिळाला. त्या रेसॉर्टमधली व्हिलाजची रचना, पार्किंगमध्ये फुललेला डेरेदार चाफा, पोहोण्याचा निळाशार तलाव बघताना पहली नजरमें दिल गार्डन गार्डन हो गया. या सगळ्यामुळे आमच्या बुकीने म्हटलं होतं तशी सगळ्य़ांना एकदम ’गोवावाली फिलिंग’ आली होती.


गोवा भाग २
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post.html
गोवा भाग ३
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_2.html
गोवा भाग ४
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_3.html
गोवा भाग ५
https://mohinimodak.blogspot.com/2019/02/blog-post_4.html