Friday, September 14, 2018

रुपाच्या अरुपाचा शोध


"श्रावणातल्या निम्म्या दिवशी आई देवाला गोडाचा नैवेद्य करीत असे.
पण शुक्रवारच्या सकाळी पुरणाचा वास उदबत्तीच्या वासात एकजीव गुंफून गेल्यासारखा घरभर पसरे.
ताम्हनात आई पुरणाचा लहानसा उंडा ठेवे. बोटांनी मऊ कालवून अंगठ्याने चार खळगे केले कि त्यात तुपाची धार पडे. त्यात फुलवाती भिजल्या की पुरणाचे रूप उरत
नसे.....ते एक चार दिव्यांचे निरांजन होई.
आई आधी देवाला ओवाळी. देवावर अक्षता टाकी.
मग मला विचारी,," दिलीप, भोर कुठल्या दिशेला आले ? ''
मग त्या दिशेने ओवाळी. अक्षता टाकी.
आम्ही चारी भावंडे चार दिशांना पांगलो.
आई आज कऱ्हाडच्या घरात देवाजवळ नुसती बसलेली असेल. आणि हातात अक्षत घेऊन अजयला विचारत असेल.
पुणे कुठे आहे ?
अदितीचे अमेरिकेतील गाव कुठल्या दिशेला ?
मी मनाने आत्ता आईच्या शेजारी आहे. आणि श्रावणातला शुक्रवार जगतो आहे.."
माझे फेसबुक स्नेही दिलिप लिमये यांची ही पोस्ट गेल्या श्रावणातल्या शुक्रवारी वाचली आणि प्रकर्षाने जाणवलं, आजच्या रुक्ष, धावत्या जगात आपल्या आतला ओलावा, मनस्वास्थ्य शाबूत ठेवण्याचं आणि आध्यात्मिक समाधान देण्याचं सामर्थ्य या सणवार-व्रतवैकल्यांमध्ये आहे. त्यात आस्तिक्य ओघाने आलंच. हे सगळं नाकारुनही जगता येतंच परंतु अशी आयुष्य़ बघताना ’नास्तिक्य ही अभिमान वाटण्यासारखी गोष्ट असली तरी त्यात मनःशांती मात्र नसते’ हे सुनीताबाईंचं ’आहे मनोहर तरी’ मधलं वाक्य हमखास आठवतं.

अष्टांगयोगाप्रमाणे धर्माचेही दोन भाग मानले जातात. ’यम’ नावाचा जो भाग आहे तो बदलत नाही. उदा: सत्य, प्रेम, भूतदया इ. मूल्यं या भागात येतात. दुसरा भाग म्हणजे नियम. आपले नित्यवर्तन कसे असावे आणि कसे नसावे या विषयीचे संकेत. जे अर्थातच कालसुसंगत असायला हवे. परंतु आजचा समाज बहुतांशी दोन गटात विभागला गेलाय. एका गटाला नियम अपरिवर्तनीय वाटतात. आपल्या परंपरेतल्या प्रत्येक गोष्टीचा ते विज्ञानाशी बादरायण संबंध जोडतात. ’का’ असे न विचारता, आपल्या पूर्वजांनी सांगितलंय म्हणजे ते सरसकट बरोबरच असले पाहिजे याची त्यांना खात्री असते. तर दुसरा गट आपल्या संस्कृतीतलं सगळं काही वाईट, जुनाट, बुरसटलेलं आणि कालबाह्य आहे यावर ठाम असतो. इतर संस्कृतींशी तुलना करत आपण किती मागास याचे रडगाणॆ गाण्य़ात किंवा सांस्कृतिक प्रतीकांची खिल्ली उडवण्यात ते व्यग्र असतात. या दोन्ही गटांच्या कचाट्यात न सापडता आपण खुल्या मनाने या सगळ्य़ाचा विचार करतो का?

संगणकाच्या भाषेत सांगायचे तर आपले सणवार-व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचे ’front end' आहे आणि त्यामागची मूल्यबैठक, दृष्टीकोन हे ’backend'. एकसुरी जगण्याला यामुळे चैतन्य, अर्थ लाभतो. आनंद मिळतो. त्या त्या ऋतुनुसार साजरे केले जाणारे सणवार माणसाला निसर्गाशी जोडतात. ’मी’पणाच्या परीघातून बाहेर काढून समष्टी, सृष्टी अन् परमेष्टीशी नातं जोडायला शिकवतात. त्या त्या ऋतुनुसार रांधलेले नैवेद्य शारीरिक पोषणाबरोबरच रसास्वादाचा आनंद मिळवून देतात. विशीष्ट पद्धतीच्या रांगोळ्य़ा, मेंदी, कला जतन करतात. वृषभपूजन, उर्जादायी विघ्नहर्ता, समृद्धीचं प्रतीक असलेल्या गौरी, सृजनाचं प्रतीक असलेले नवरात्राचे घट घरोघरी मांगल्याला आवाहन करतात. चित्राहुती, गोग्रास, शिवामुठीचं, राशीचं धान्य नंतर पाखरांच्या, प्राणीमात्रांच्या मुखात जातं. महानगरातली कित्येक कुटुंब यासाठी मूळ गावी येतात. एकत्र आलेलं कुटुंब, नातलग यामुळे माणसं एकमेकांना भेटतात, बोलतात, जवळ येतात. आजच्या त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबाना याची अधिकच असोशी असते.

भुलाबाईचे, मंगळागौरीचे खेळ आणि गाणी तत्कालिन स्त्रीजीवनाचे, कौटुंबिक सुखदु:खांचे प्रतिबिंब दाखवतात. त्यातले अनेक संदर्भ कालबाह्य झाले असले,अनावश्यक वाटले तरी यातले सासूसुनेचे खटके आजही  तितकीच गंमत आणतात. वर्षातून केवळ दोनचारदा असे खेळ खेळल्याने व्यायाम होतो वगैरे भलावण न करता हे खेळ म्हणजे मानसिक आनंदाचे, प्रफुल्लतेचे सोपे स्त्रोत आहेत हे स्वीकारायला हरकत नसावी.  हल्ली हे खेळ सादर करणारी मंडळं बोलावली जातात. सांस्कृतिक परंपरांचे हे एक दृकश्राव्य दस्तावेजीकरण म्हणता येईल. गावाकडच्या ऋतुचक्राच्या लयीत फिरणार्‍या लोकजीवनाचा, शिमग्याची सोंगे, उरसातले तमाशे, नवरात्रातले भराड, देवमंडपातली कीर्तने, दाराशी येणारे वासुदेव, पोतराज अशा लोकसंस्कृतीचा संस्कार तर आज दुर्मिळ झाला आहे परंतु ही उणीव घरोघरची व्रतवैकल्ये काही अंशी भरुन काढू शकतात. जेव्हा स्त्रीला उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, तिला बाहेर पडता यावं म्हणून सामुहिक व्रत-वैकल्याचे हे प्रयोग आले असावेत. आता वेगवेगळ्य़ा निमित्तानी बायकांना एकमेकींना भेटता येतं तरीही व्रतवैकल्याच्या निमित्तानी एकत्र येणं खास असतं. ठेवणीतली पारंपरिक वस्त्रं, दागिने वापरता येण्य़ाची ती छानशी संधी असते. हल्ली ज्या थीम पार्टी चालतात त्याचेच हे पारंपरिक रुप म्हणूया. हल्ली माध्यमांच्या प्रभावामुळे मधल्या काळात ’आऊटडेटेड’ होऊ लागलेले सणवार प्रकाशात आले आहेत. त्याला रोमँटिक छटा आल्याचेही दिसते आहे.

मात्र 'का' हा प्रश्न न विचारता केवळ परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून आजही केली जाणारी व्रते आणि सणवार त्यांच्या मूळ भूमिकेशी आणि बदलत्या काळाशी सुसंगत नसतील तर त्यातला तो भाग त्याज्य मानायला हवा. गाभा योग्य असेल तर तोच ठेवून पद्धत बदलायला हवी. उदा: शहरी भागातून संक्रांतीच्या,चैत्राच्या हळदीकुंकवाचं स्नेहमिलनात रुपांतर होऊ लागलं आहे.  ’सौभाग्यवती’ स्त्रियांसाठीच असलेल्या सोहळ्यांमध्ये सगळ्य़ा स्त्रिया सामावल्या जाऊ लागल्या आहेत. परंतु निमशहरी, ग्रामीण भागात मात्र असे बदल फार संथगतीने होत आहेत. कौटुंबिक सौख्यासाठी मनोभावे ही व्रतवैकल्यं करणार्‍या स्त्रियांनाच जर यातून सौख्य  मिळत नसेल तर कुटुंब सुखी होईल तरी कसे. मग एखादीला या सार्‍याचा तिटकारा येत असेल तर आश्चर्य नाही. श्रद्धा ही सापेक्ष बाब आहे. एखाद्या स्त्रीला सवड नसेल, आवड नसेल तर तिच्यावर हे कुळाचार अजिबात लादले जाऊ नयेत. हौशी स्त्रियांनीही सुपरवुमन होण्याचा नाद सोडून आनंदाने झेपतील तेवढेच सणवार करावेत. मुळात हे सगळं स्त्रीनेच का करायचं तर ती कुटुंबसंस्थेचा कणा असते म्हणून. ती घराला घरपण देते म्हणून. ती सृजनाचे प्रतीक आहे म्हणून. पण पुरुषांना गृहसौख्यासाठी काहीच करण्याची गरज वाटू नये का? आयत्या पुरणपोळ्या खाण्यापलिकडे, सामान आणणे, सजावटीला मदत या स्वरुपात दिसू लागलेला पुरुषांचा सहभाग अजून वाढायला हवा. अपवाद वगळता, सणासुदीला चारी ठाव स्वैपाकासाठी बायका घरात राबतायत आणि पुरुष निवांत लोडाला टेकून गप्पा मारतायत ही असमान श्रमविभागणी वरुन साजर्‍या दिसणार्‍या सणवारांमागचे वास्तव आहे. पुरुषांची नवी पिढी याकडे कसे पाहते यावरच या परंपरांचे आणि कुटुंबसंस्थेचे भवितव्य अवलंबून आहे.

कर्त्या पुरुषांवरही अनेकदा अशा कार्याचा आर्थिक ताण येतो. अशा वेळी लोक काय म्हणतील म्हणून ऋण काढून सण करण्य़ाचा, अतिरेकी प्रदर्शनाचा हट्ट कशाला! एका गुरुंची लाडकी मांजर त्यांच्या प्रवचनात व्यत्यय आणित असे. त्यामुळे तिला पकडून बांधून ठेवून मगच ते प्रवचन करु लागले. पुढे गुरु आणि मांजर दोघेही राहिले नाहीत तरी कोणतेतरी मांजर पकडून आणून, बांधून मगच प्रवचन करण्य़ाची प्रथा शिष्यांनी सुरु ठेवली. आपल्या काही प्रथांचे असे तर होत नाहीये ना? एकूण आपल्या प्रथांकडे डोळसपणे पाहून मागच्या पिढीनेही ’आम्ही नव्हतो का करत, अमुक केल’च’ पाहिजे, तमुक झाल’च’ पाहिजे’ असे व्रतांचा उल्हास झाकोळुन टाकणारे, लेकीसुनांचा मानसिक तणाव आणि शारीरिक दमणूक वाढवणारे ’च’ सोडून दिले पाहिजेत.

खुलभर दुधाच्या गोष्टीत खोल अर्थ आहे पण बहुतेक व्रतांच्या कहाण्य़ांमधल्या आटपाट नगरातल्या आवडत्या- नावडत्या राण्या, वंध्यत्वाचे, पतीवियोगाचे शाप-उ:शाप, पुत्रप्राप्तीचे आशीर्वाद, वसा घेतल्याबरोबर होणार्‍या जादू या सगळयाचा आजच्या तंत्रयुगाशी काही तरी संबंध आहे का? यात स्त्रियांचा कोणता सन्मान आहे? या अतार्किक कहाण्य़ा टाळून फक्त मनोभावे पूजा केली तर ती पुरेशी नाही का! उपासाचं उदाहरण घेऊ. उपवास का करता याची खरी उत्तरं असतात - नाही केला तर सासूबाई चिडतात म्हणून, चक्क खिचडी आवडते म्हणून. ती केव्हाही खावी पण साबुदाणा, दाणे, बटाटे अधिक अ‍ॅसिडीटी म्हणजे उपास हे कोणते समीकरण! पचनसंस्थेला जराशी विश्रांती किंवा योग्य हलका आहार किंवा जे एरवी केल्यावाचून राहवत नाही ते टाळणं, संयम पाळणं हा सुद्धा उपवासच. करिअर करणार्‍या स्त्रियांना वेळेचा प्रश्न असतो. त्यांनी सोयीनुसार बदल करायला काहीच हरकत नाही. घरी कुमारिका जेवू घालायला सवड नसेल तर सुट्टीच्या दिवशी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन त्या मुलींसाठी काही केले तरी हे व्रत सिद्धीस जाईलच ना! मैत्रिणीला जेवायला बोलावून श्रावणाचा शुक्रवार रविवारी करता येतो. त्या मैत्रिणीचं वैवाहिक स्टेटस इथे आड का यावं? नवर्‍याच्या अस्तित्वावरच स्त्रियांची आपसातली नाती अजूनही अवलंबून असावी का?

पूजेला हवीतच म्हणून दुसर्‍याकडची, विकत जरी आणली तरी, फुले तोडून, झाडे ओरबाडून लक्ष वाहण्याने काय साधेल माहीत नाही पण यात कितीतरी मानवी तास वाया जातील. मंगळागौरीच्या पूजेलाही पत्री वाहण्याची पद्धत आहे. नववधूने वृक्षवेलींची व त्यांच्या गुणधर्मांची ओळख करुन घेत पूर्वी ही पत्री गोळा केली जायची. आता पत्री म्हणून बाजारु पाल्याचा ढीग वाहण्य़ाऐवजी मोजकी चार सुंदर फुलं, पानं पुरेशी नाहीत का?
पतीच्या दीर्घायुष्याची कामना मनातून प्रत्येक स्त्री करतेच पण सोयीच्या नावाखाली वडाची फांदी घरी आणून पूजा करणं हा व्रताचा कोणता प्रकार! स्वेच्छेने वडापाशी पूजेला जावंसं वाटलं तर जरुर जावं कारण पती, पत्नीनी वैयक्तिक स्तरावर परस्परांसाठी काय करावं, हा त्यांच्या आपसातील भाव-बंधाचा भाग आहे. पण हा मागासपणा वाटू नये म्हणून वडाखाली गेल्याने वर्षभराचा ऑक्सीजन मिळतो असले समर्थन मात्र करु नये. घरादाराची जबाबदारी समर्थपणे पेलणार्‍या आजच्या आधुनिक सावित्रींना कर्मकांडापेक्षा किंवा त्याबरोबर व्रतामागचा भाव ओळखण्य़ाची गरज आहे.

यथाशक्ती पूजा करण्याबरोबरच किंवा त्याऐवजीही आपल्याला रुचेल अशा एखाद्या सामाजिक उपक्रमाशी, वैचारिक संस्थेशी जोडलं जाण्य़ाचं, व्रत हे एक निमित्त व्हावं. जातीपातीपलिकडे जाऊन त्यात सगळ्य़ा स्त्रियांना सामावून घेण्याचा प्रयत्न व्हावा. नवरात्रीला नवरंग वापरण्याच्या, मार्केटिंग फंड्य़ातून साकारलेल्या नव्या  प्रथासुद्धा  मूर्ख ठरवण्य़ापेक्षा ज्यांना त्यात आनंद वाटतो त्यांना तो घेऊ द्यावा. कौटुंबिक रहाटगाडग्यातून बदल, सख्यांसह धमाल हे या व्रतवैकल्यांमागचे आकर्षण असले, त्या निमित्त्याने नटणं-मुरडणं, साडी-दागिन्यात जीव रमवणं हाही आनंदाचाच भाग असला तरी त्यातच गुंतून न राहता वसा घ्यायला हवा नवं काही शिकण्य़ाचा, नवं काही वाचण्य़ाचा, नवं काही बघण्य़ाचा. गरज आहे ती जगणं सुंदर करणार्‍या आपल्या रिवाजांकडे नव्याने पाहण्याची, त्यातलं कालबाह्य ते बदलण्य़ाची आणि उत्तम ते मन:पूर्वक जतन करण्याची.

 ऋतुनुसार बदल करुन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणं, तनामनातला उत्साह वाढवणं, फुललेल्या निसर्गाकडे लक्ष जाणं, कृषीसंस्कृतीचा आदर होणं, अनेक हातांना काम मिळणं असे अनेक हेतू या रिवाजांमागे आहेत.पण सदाचरण, निरामय जीवन, मनन, चिंतन, संयम, क्रियाशीलता याचं महत्व अधोरेखित करणं हे त्यामागचं खरं उद्दिष्ट्य. ते साध्य होतं का? इतकी आदर्श माणसं आपण असतो का? नसतो. म्हणूनच स्वत:मध्ये डोकावून पाहण्य़ासाठी आवश्यक असलेली उसंत माणसाला देणं आणि त्यांना एकमेकांशी जोडणं हेच या व्रतवैकल्यांमागचं अंतिम प्रयोजन उरावं.

डीजेच्या गोंगाटात, थर लावण्य़ाच्या अहमहमिकेत, राजकारणाच्या, इव्हेंटच्या विळख्यात घुसमटू लागलेली आपली संस्कृती मन:शांती देणार्‍या व्रतवैकल्यांच्या सात्विक कवेत मोकळा श्वास घेऊ शकते. अखंड महत्वाकांक्षांनी धगधगलेलं अहंकारी अशांत मन आणि या सगळ्य़ाच्या पल्याड पोहचलेलं निवलेलं शांत मन यांच्या मधला प्रवास व्रतांमुळे सोपा होऊ शकतो. त्याचं मर्म समजून घेणं हाच आजच्या युगाचा नवधर्म ठरावा.

Tuesday, September 4, 2018

टेक केअर गुड नाईट



पाकीटमार स्वत:च गर्दीत ओरडतो ’खिसा पाकीट संभालो’, अनेकांचे हात नकळत पाकीट ठेवलेल्या खिशाकडे जातात. पाकीटमाराचं काम सोपं होतं. ’टेक केअर गुड नाईट’ बघताना वपुंचं हे वाक्य आठवलं. इंटरनेटवर यालाच फिशिंग म्हणतात. तुम्हाला तुमची माहिती विचारणार्‍या फसव्या मेल येतात. शहानिशा न करता तुम्ही त्यांना माहिती देता. खर्‍या जगात वावरताना अतिशय स्मार्ट असलेली माणसं सुद्धा याला बळी पडतात तिथे फारशी तंत्रमैत्री नसणार्‍या सर्वसाधारण लोकांबद्दल काय बोलावे. विद्या वॉक्सचं नवं गाणं, नेटफ्लिक्सच्या हिट वेब सिरिजपासून फॅशनच्या लेटेस्ट ट्रेंड्स पर्यंत सगळे अपडेट्स असलेल्या कित्येक मुलींना इन्स्टा किंवा एकूणच सोशल मिडीयावर वावरताना, चॅट करताना, अनोळखी मित्रविनंती स्वीकारताना काय काळजी घ्यावी याची जाण नसते.
आपण याला डिजिटल धांदरटपणा म्हणूया. आता इंटरनेटवर रुळलेल्या लोकांनी सुद्धा सुरुवातीला कमीअधिक प्रमाणात तो केलेला असतो. याचे परिणाम किती भयावह असू शकतात हे सायबर गुन्हेगारीच्या बातम्यांद्वारे लोक पाहतात, वाचतात, ऐकतात, दुसर्‍या कानाने सोडून देतात. ’हे सगळं नायजेरियन लोक करतात आणि नोएडा किंवा मुंबईत घडतं ते सगळं, आपल्याला काय करायचय,’ असं म्हणत, येतील त्या पोस्ट्स खात्री न करता फॉर्वर्ड करण्याचा परोपकार संतवृत्तीने सुरु ठेवतात.
’टेक केअर गुड नाईट’ या अशा मंडळींसह तुम्हा आम्हा सगळ्य़ांना भानावर आणणारा सिनेमा आहे.

सायबरयुगात बदलत चाललेल्या कौटुंबिक नातेसंबंधावरही तो सहज भाष्य करतो. पालकत्वाकडे बघण्याची नवी नजर देतो. हे नातेसंबंध केंद्रस्थानी ठेवायचे की ’डिजीटल साक्षरता फक्त पुरेशी नाही तर डिजिटल व्यवहारज्ञान असणं आवश्यक आहे’ हा संदेश द्यायचा याबाबत सिनेमा गोंधळलेला नाही. उलट ही दुपेडी रचना गुंतवून ठेवते. कोरड्य़ा वाटू शकणार्‍या तांत्रिक विषयाला भावनिक अस्तर देते. वेगवान आणि उत्कंठावर्धक घटनांमधून सायबर गुन्हेगाराचे सावज ठरलेल्या एका कुटुंबाची कहाणी उलगडत जाते. ताकदीचे कलाकार, बांधीव पटकथा आणि चांगली निर्मितीमूल्य असल्याने सिनेमा प्रेक्षणीय झाला आहे. यात कथेशी संबंध नसलेली गाणी गात बागडणारी पात्रे नाहीत, आयटम सॉंग किंवा कोणताही मसाला नाही, बर्‍याच सस्पेन्स थ्रिलर सिनेमांमध्ये असतं तसं अंगावर येणारं संगीत नाही. सर्व स्तरातल्या प्रेक्षकांना सहज समजेल अशी तंत्रभाषा, खुसखुशीत संवाद आणि योग्य कास्टींगमुळे सिनेमा रंजक झाला आहे. झकास संवादफेकीमुळे इन्स्पेक्टर पवारच्या भूमिकेतले महेश मांजरेकर विशेष लक्षात राहतात. सतत लादल्या जाणार्‍या तांत्रिक बदलांना नकार देणारे मध्यमवयीन वडिल सचिन खेडेकर यांनी, तर समुपदेशक असूनही पोटच्या तरुण मुलीच्या भावनिक गुंत्याबद्दल कल्पना नसलेली आई इरावती हर्षे यांनी नेमकेपणे उभी केली आहे. पर्ण पेठे, संस्कृती बालगुडे, आदिनाथ कोठारे आपापल्या भूमिकांमध्ये फिट बसले आहेत.

आजच्या शहरी तरुणांचे प्रश्न, मूल्यांच्या बदलत्या व्याख्या, सायबर गदारोळात वावरत असूनही जाणवणारं एकटेपण, सॅच्युरेशनमुळे आलेलं रिकामपण, सायबर गुन्हेगारीसाठी आवश्यक असलेलं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक व्यवहारांबद्दलचं त्यांचं सुप्त आकर्षण अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात सिनेमा यशस्वी ठरला आहे. विषय तंत्रज्ञानाशी संबंधित असूनही तो अजिबात किचकट वाटत नाही. स्वत: टेक्नोसॅव्ही असल्याने, नाट्यक्षेत्राचा दीर्घ अनुभव असल्याने, ’रुद्रम’ फेम लेखक-दिग्दर्शक गिरिश जोशी यांनी सिनेमाची ’डॉक्युमेंटरी’ होऊ नये याची काळजी घेत, त्यातले नाट्य रंगवत हा विषय अतिशय उत्तम हाताळला आहे. गुन्हेगाराबाबतच्या उत्सुकतेमुळे पूर्वार्ध खिळवून ठेवतो. मात्र शहरात चांगल्या कंपनीत मोठ्य़ा पदावर काम करणार्‍या, युरोप बिरोपला सहलीला जाणार्‍या, मुलाला उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवणार्‍या, आणि केसमधल्या तपशीलांकडे बर्‍यापैकी लॉजिकली पाहणार्‍या डिप्लोमा इंजिनीयरला ओटीपी नामक भानगड माहितच नसते तसंच एवढा आटापिटा करुन गुन्हेगारापर्यंत पोचल्यावर त्याच्या ’जरा आत जाण्याच्या’ विनंतीला इन्स्पेक्टर पवार फारच प्रेमळपणे मान देतात, ये दो बाते कुछ हजम नही हुई. अर्थात त्याने एकूण सिनेमाच्या प्रभावावर फारसा परिणाम होत नाही. ’माणूस खोटं बोलतो म्हणजे काय करतो तर जे घडावसं वाटतं ते घडलं म्हणून सांगतो’ यासारखे संवाद किंवा वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलीचं बदलत गेलेलं मन तिच्या फोटोंमधल्या डोळ्य़ातून आई शोधू पाहते यासारखे प्रसंग, या पण-परंतु वर सहज मात करतात.

मी सिनेसमीक्षक नाही. सामान्य प्रेक्षक आहे पण चित्रपटाचा विषय माझ्या कामाशी निगडीत आहे. अर्थात यावर लिहावसं वाटण्य़ाचं आणखी एक कारण आहे. आपल्यासाठी सायबर जगावरचे सिनेमे म्हणजे बलाढ्य सरकारी यंत्रणांची गुप्त कागदपत्रं, न्युक्लिअर पॉवर प्लांटसंबंधीची गोपनीय माहिती, बँकामधले करोडो डॉलर्स वगैरे लुटण्यासाठी केलं जाणारं हॅकिंग, अशा चित्रविचित्र विषयांभोवती घोटाळणारे ब्लॅक हॅट, फिफ्थ इस्टेट सारखे भव्यदिव्य हॉलिवूड सिनेमे. ते आपण आ वासून पण त्रयस्थपणे बघतो. त्या अजब विश्वाशी आपला फक्त प्रेक्षक म्हणून संबंध असतो. मराठी भाषेतल्या (सबटायटल्स अचूक आहेत- साऊथ इंडियन सिनेमांसारखे विनोदी नाहीत), मध्यम बजेटच्या ’टेक केअर गुड नाईट’शी मात्र आपला थेट संबंध आहे. तो काल्पनिक सायबर जगाबद्दल नाही तर सायबर थ्रेटची जाणीव नसलेल्या आपल्या रोजच्या जगण्याबद्दल बोलतो. वास्तवाबद्दल बोलतो. कुटुंबांमधल्या तुटत चाललेल्या संवादाबद्दल बोलतो. सावध करतो. tc.gn सहकुटुंब पाहावा असा सिनेमा आहे. खर्‍या अर्थाने आजचा सिनेमा आहे. आपला सिनेमा आहे.

Saturday, September 1, 2018

तिची ऑनलाईन खरेदी

’एखाद्या तरुणाने ऑनलाईन लॅपटॉप विकत घेतला तर कोणता घेतलास, या प्रश्नाचं उत्तर देताना तो ब्रँड आणि फीचर्स सांगेल, तरुणी मात्र ’पिंक कलर’चा असं उत्तर देईल. एखादी बाई भारताचा झेंडा जरी घ्यायला गेली तरी ’यात अजून रंग दाखवा ना’ असं हमखास म्हणेल.’ समूहमाध्यमांवर असले विनोद कितीही व्हायरल होत असले तरी महिला या सर्वात महत्वाच्या आणि स्मार्ट ग्राहक असतात ही वस्तुस्थिती उत्पादक कंपन्या ओळखून आहेत. बायकांना खरेदीचा नाद असतो असं म्हटलं जातं पण त्यामागचं खरं कारण हे की त्या विवेकी आणि अधिक संवेदनशील असतात. आपल्या ऐपतीनुसार आपल्या कुटुंबातल्याच नव्हे तर आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तिसाठी त्यांना प्रसंगानुसार काही ना काही खरेदी  करायची असते. लहानमोठ्या भेटवस्तूंद्वारे त्या आपल्या नातेसंबंधांची वीण घट्ट करत असतात. आवश्यक ती वस्तू दर्जेदार पण शक्य तितक्या कमी भावात मिळवण्यासाठी घासाघीस करण्य़ाचं कौशल्य महिलांमध्ये असतं. त्यासाठी लागणारी चिकाटी आणि उत्साह देखील त्यांच्याजवळ असतो. ऑनलाईन खरेदीबाबतही हेच चित्र आहे. साहजिक अ‍ॅमॅझॉन, फ्लिपकार्ट असो किंवा बिगबास्केट, त्यांच्या बहुतेक जाहिराती महिला ग्राहकवर्ग डोळय़ासमोर ठेवून तयार केल्या जातात. 


२०१३ पर्यंत ऑनलाईन खरेदी ही भारतात तरी पुरुषांची मक्तेदारी होती. नंतर घरातील पुरुषांचा जुना फोन वापरणार्‍या महिलांकडे स्वत:चा स्मार्ट फोन आला, कमावत्या महिलांच्या संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली, यामुळे महिला खरेदीदारांचे प्रमाण वाढत गेले. भारतातील २८ टक्के इंटरनेट वापरकर्त्यांपैकी तब्बल ५ कोटी चाळीस लाख ग्राहक पहिल्या ऑनलाईन खरेदीनंतर पुन्हा या फंदात पडलेले नाहीत. दुसर्‍या बाजूला ५ कोटी ग्राहक आजही नियमित ऑनलाईन खरेदी करत आहेत. त्यांचे प्रमाण या वर्षी १२ कोटीपर्यंत पोचेल तर २०२० पर्यंत फक्त महिला खरेदीदारांची संख्या १५ कोटीपर्यंत जाईल असा इकॉनॉमिक्स टाईम्सचा होरा आहे. यात निमशहरी व शहरी भागातल्या, विशेषत: १८ ते ४५ वर्षे वयोगटातील महिला ग्राहकांचा समावेश आहे. 

आता त्यांच्या ऑनलाईन खरेदीचे निकष ’भला उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसे’ या असूयेपलिकडे गेले आहेत. फक्त सौंदर्यप्रसाधनं नाही तर नित्योपयोगी वस्तूंपासून फर्निचरपर्यंत विविध उत्पादनं त्या घेत असतात. झिवामी वेबसाईटच्या रिचा कर यांचा दावा आहे की पहिल्यांदा ऑनलाईन खरेदी करणार्‍या महिलांपैकी १८ टक्के महिला आमच्या वेबसाईटवरुन अंतर्वस्त्र खरेदी करतात. याशिवाय वैविध्यपूर्ण, आपल्या गावात सहज मिळू न शकणार्‍या, प्रचलित फॅशनच्या नवनव्या वस्तू महिला खरेदी करत असतात. 

ब्रिगेट ब्रेनन या महिला ग्राहकांच्या मानसिकतेच्या अभ्यासक आहेत. फोर्ब्सच्या अहवालात उत्पादक कंपन्यांना उद्देशून त्या लिहितात," खरेदी हे प्रकरण स्त्रियांच्या गरजांशी नाही तर त्यांच्या भावविश्वाशी जोडलेलं असतं म्हणून तुमच्या जाहिराती जर त्यात डोकावू शकल्या तरच तुमच्या उत्पादनाचा खप वाढू शकेल. शिवाय महिलांना खरेदीबद्दल चर्चा केल्याशिवाय राहवत नाही. साहजिक तुमच्या उत्पादनाची प्रसिद्धी होते त्यामुळे त्यांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जाहिराती नकळत तुम्हाला नवे ग्राहक मिळवून देत असतात". ही जाण असलेले ऑनलाइन शॉपिंग ॲप्स महिलांची ‘सर्च हिस्टरी’ वापरून, त्यानुसार जाहिरात, सवलती ‘पॉपअप’ करत त्यांना स्वत:च्या उत्पादनात गुंतवून ठेवतात. यामुळे बरेचदा वाहवत जाऊन त्या अनावश्यक खरेदीही करतात. त्यातून मेंदूत डोपामाइन हे संप्रेरक वाढतं आणि तात्पुरता का होईना उत्साह येतो, आनंद मिळतो त्यामुळे काही जणी याच्या आहारी जाऊ लागतात तर अनेकींसाठी खरेदी हा मनावरचा ताण घालवायचा नामी उपाय असतो. वेब सीरिज आणि सोशल नेटवर्किंग वेबसाइट्‌समुळे तरुणांमध्ये ब्रॅंडेड कपडे, पर्सेस, शूज, अ‍ॅसेसरीज खरेदी करण्य़ाचं आकर्षण वाढत चाललं आहे. अर्थात भौतिक गरजांच्या पलिकडे जाऊन युदेमी सारख्या वेबसाईट्सवर ऑनलाईन कोर्सेस खरेदी करणार्‍या तरुणींची संख्याही वाढते आहे. परंतु बरेचदा सेल्फी हटके वाटावा म्हणून किंवा आपण जगाबरोबर आहोत हे दाखवण्यासाठी देखील खरेदी केली जाते. विशेषत: १९ ते २६ वर्षे वयोगटातील मुली ’I can give up shopping but I am not a quitter’ म्हणत पुन्हा पुन्हा ऑनलाईन खरेदीकडे आकर्षित होतात. हे मात्र खरं की त्यांच्या आई-मावशीच्या पिढीच्या तुलनेने त्या ऑनलाईन आर्थिक व्यवहार किंवा तांत्रिक बाबी समजून घेण्याच्या बाबतीत आत्मनिर्भर असतात. 

पुरुष ग्राहक ऑनलाईन स्टोअर्समध्ये फेरफटका मारुन किंमतीचा अंदाज घेतात टीव्ही, फ्रिज सारख्या उत्पादनांच्या खरेदीसाठी अनेकदा स्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य देताना दिसतात. साधारणपणे पुरुषांना काळा, पांढरा, निळा, तपकिरी या जेमतेम चार रंगातच काय ती कपडा खरेदी उरकायची असल्याने असेल, ऑनलाईन कपडे विकत घेणे मात्र त्यांना आवडते. याउलट वेबसाईटमधल्या मॉडेलच्या अंगावर झुळझुळीत दिसणारे जॉर्जेट प्रत्यक्षात खरखरीत निघाल्या्च्या किंवा चुकीच्या मापाच्या कपड्याची डिलीव्हरी मिळाल्याच्या काही कटु अनुभवांमुळे बर्‍याच महिला कपडे, साड्या मात्र ऑनलाईन विकत घेण्य़ाचे टाळतात. शिवाय प्रत्यक्ष कपडा हातात घेऊन, त्याचा पोत अनुभवल्याशिवाय (आणि चारपाच दुकानातल्या सेल्समनला जेरीस आणल्याशिवाय) या खरेदीत मजा नाही असे बहुतेकींचे म्हणणे आहे. 

मुद्रा भरतनाट्यम स्कूलच्या संचालिका, जळगावच्या नेहा जोशी म्हणतात, "खास काहीतरी मिळत असेल तरच मी ऑनलाईन खरेदी करते. उदा: ज्यातून द्रवपदार्थ अजिबात सांडणार नाही अशा बाटल्या नात्यातल्या एका बाळाला भेट देण्यासाठी मला मागवता आल्या. सुरुवातीला ऑनलाईन ऑफरला बळी पडून केस सरळ करण्य़ाचे यंत्र मागवले, ते खराब निघाले. आता मी विचारपूर्वक खरेदी करते." टाटा टेक्नॉलॉजिजमध्ये डिझाईन इंजिनीयर म्हणून काम करणार्‍या पुण्याच्या अश्विनी काकडे म्हणतात," इ-कॉमर्स वेबसाईट कोणती यावर मी नेटबँकिंग वापरायचे, कार्ड वापरायचे की कॅश ऑन डिलिव्हरी हे ठरवते. ट्रेंडी दागिने, पुस्तकं आणि स्वैपाकघरात लागणारी आधुनिक उपकरणं मी आवर्जून ऑनलाईन विकत घेते." कविता मय्यानी या मुंबईच्या कॉर्पोरेट प्रशिक्षक म्हणतात,"वेळ आणि इंधन वाचतं म्हणून दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच ’सेल्फ हेल्प’ पुस्तकांची खरेदी मी ऑनलाईनच करते". आर्थिक व्यवहाराचा भाग मात्र त्या आपल्या सीए मुलीवर सोपवतात. 

एकूण वाढत्या डिजिटल साक्षरतेबरोबर महिला ग्राहकांची ऑनलाईन खरेदी वेगाने वाढत जाणार आहे. त्याचबरोबर उत्पादकांना वेबसाईटची सोपी, आकर्षक आणि इंग्लीशसह प्रादेशिक भाषेतील रचना, उत्पादनाची गुणवत्ता, आर्थिक व्यवहाराच्या सुरक्षित पर्यायांसह माल लवकरात लवकर पोचवण्याची सुविधा आणि विक्रीनंतरची तत्पर सेवा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांनी देखील फसवणूक होऊ नये म्हणून खरेदीपूर्वी रिव्ह्यू पाहून वस्तूंसह मिळणारी विमा सुविधा, https सारखे तांत्रिक बारकावे इ. समजून घेणे आवश्यक आहे. चंगळवाद आपल्याकडे मॉल संस्कृतीमुळे रुजला असला तरी ऑनलाईन शॉपिंगमध्ये महिलांचे वाढते स्वारस्य फक्त ’काहीतरी विकत घेणे’ यापुरते मर्यदित नाही. त्यांना ऑनलाईन खरेदी करायला आवडते ती मुख्यत: दोन कारणांमुळे. तिथे मिळणारी स्वत:ची डिजिटल स्पेस आणि निवडीचे स्वातंत्र्य. दाढीच्या रेझर पासुन बुटांपर्यंत बहुतेक जाहिरातींचा अविभाज्य भाग ठरलेली स्त्री ही ईव्हपासून आजवर कायम ’ऑब्जेक्ट ऑफ डिझायर’ मानली गेली आहे. एंटर बटणावर ताबा ठेवला तर ऑनलाईन खरेदी करणारी आजची स्त्री मात्र ’सब्जेक्ट ऑफ डिझायर’ नक्की होऊ शकते.