Friday, July 6, 2018

रणांगण

 ’रणांगण’ वाचताना असे वाटू लागते जणू आपण ’नो मॅन्स लँड’वर (म्हणजे दोन देशांच्यामधली अशी जागा ज्यावर कोणत्याच देशाचा हक्क नाही) उभे आहोत. त्यातली ’राष्ट्रीयत्व’ या मुद्द्याची चिकित्सा आपल्याला हादरवून सोडते. रोकडे सवाल करते. मराठी साहित्याचा मानदंड मानली गेलेली, विश्राम बेडेकरांनी लिहिलेली ही (एकमेव) कादंबरी.

वैश्विक पटावरुन राष्ट्रीयत्वाकडे, माणसाच्या मनोव्यापारांकडे, स्त्री-पुरुष संबंधांकडे पाहण्याची प्रगल्भ नजर देणारी त्याचबरोबर आपल्या वैचारिक खुजेपणाची जाणीव करुन देणारी. "समुद्र जमिनीच्या कुशीत शिरत होता, बोट जवळ जाऊ लागली तसतसे तिच्यावर दीपमाळेचे रोमांच उभे राहू लागले.." यासारख्या त्यातल्या शब्दप्रतिमा थक्क करतात. केवळ सव्वाशे पानांची कादंबरी त्यातल्या आशयामुळे आणि बेडेकरांच्या चित्रमय लेखनशैलीमुळे आपल्याला झपाटून टाकते.

’रणांगण’ १९३० च्या सुमारास घडते. पहिल्या महायुद्धाचे सावट आणि दुसर्‍या महायुद्धाची लागलेली चाहूल या पार्श्वभूमीवर ही कथा साकारली आहे. कथानायक चक्रधर इंग्लंडहून मुंबईमार्गे शांघायला जाणार्‍या बोटीवर जर्मन ज्यू असलेल्या हॅर्टाला भेटतो. दोघे प्रेमात पडतात. भारत ब्रिटिश अंमलाखाली असल्याने चक्रधर ब्रिटिश पारपत्र बाळगणारा तर हॅर्टा स्वदेशातून हद्दपार करण्यात आलेली. इंग्लंड-जर्मनी द्वेषभावनेमुळे तिला मुंबईतच नव्हे तर पॅलेस्टाईनला उतरण्याचीही परवानगी नसते. प्रेमाची परिणीती लग्नात होणे शक्य नाही याची जाणीव असलेल्या हॅर्टाला, बोटीवरचा प्रत्येक क्षण चक्रधरसह उपभोगायचा असतो. त्यात समर्पणाचा निस्संकोच आवेगही असतो. चक्रधर म्हणजेच तिचा ’बॉब’, मुंबईला उतरुन गेल्यावर विरहवेदनेने वैफल्यग्रस्त झालेली हॅर्टा अखेर आयुष्य संपवते.

परंतु ही कादंबरी केवळ या दोघांची अयशस्वी प्रेमकथा नाही. यात कातडीच्या रंगभेदाचे अडसर ओलांडून बोटीवरच्या सर्वांना लळा लावणा‍‍र्‍या चिमुकल्या लुईसारखी इतर पात्रे देखील आहेत. विवाह हाच प्रेमाचा चरमबिंदू आणि अंतिम ध्येय मानावे का? विश्व व्यापून उरणार्‍या प्रेमाला अशा मर्यादा घालता येतात? माणसाने कोणत्या सीमारेषा महत्वाच्या मानाव्यात? नैतिकतेच्या ? मग ती नीतीमूल्यं नेमकी कोणी, कोणत्या देशाने, कोणत्या धर्माने ठरवलेली असावी? की राष्ट्रीयत्वाच्या? वेगवेगळया वंश-धर्मांचे आणि देशांचे लोकही या बोटीवर होते मग समुद्रावर तरंगणार्‍या विश्वाच्या या लघुरुपाला राष्ट्रीयत्वाचे नेमके कोणते निकष लागू होतात? महायुद्धांमुळे अवघ्या जगाचं रुपांतर एका रणांगणात होतं, त्यांच्या प्रभाव आणि परिणामांमुळे निर्माण होणार्‍या अशा अनेक प्रश्नांचं काहूर आणि भावनांचं रण आपल्या मनात माजतं.

सखेद आश्चर्य म्हणजे जागतिकीकरणानंतरचं आजचं जग आणि दोन महायुद्ध्यांच्या दरम्यानचं या कादंबरीतलं जग, दोहोंतल्या भावभावना, अस्मिता आजही तितक्याच टोकदार आहेत. चकित करणारे भौतिक बदल घडले पण माणूस म्हणून आपण कितपत प्रगत झालो याचे उत्तर शोधायला ही कादंबरी बाध्य करते. वाचताना मला नकळत जावेद अख्तर यांच्या या ओळी आठवल्या.
पंछी, नदीयाँ, पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके..
सरहदे इन्सानोंके लिए है, सोचो तुमने और मैने क्या पायाँ इन्साँ होके..