प्रशांतचा अचानक "बाबा गेले" असा फोन आला तेव्हा मला काय बोलावे तेच सुचेना, मग त्याने काकूंना फोन दिला. त्या खूप शांतपणे काय घडलं, कसं घडलं सगळं बोलल्या. शशिकांतकाकांचं हे अचानक जाणं त्यांच्या आखीवरेखीव आयुष्य़ाला शोभेल असच होतं. ते अंथरूणावर खितपत पडून आहेत हे त्यांनाही आवडलं नसतं. तरीही आता ते या जगात नाहीत, आपल्यावर मनापासून माया करणारी , आपल्या लहानमोठ्य़ा कोणत्याही यशाचं भरभरून कौतुक करणारी व्यक्ती आपल्याला कायमची दुरावली याची खंत कायम राहील. ’कौन रोता है किसी और के खातिर.. सबको अपनीही किसी बात पे रोना आया..’ हेच कदाचित सत्य आहे.
काका गेले ते त्यांच्या नाशिकच्या फ्लॅट मधे. गेली बरीच वर्ष त्यांचं वास्तव्य तिथेच होतं पण माझ्या त्यांच्याशी निगडीत बहुतेक आठवणी .. खानदेशच्या, आठवले वाडयामधल्या. ८ ते १६ वर्ष वया दरम्यानच्या. आमच्या बाजूचच तिसरं घर कुलकर्णी काकांचं. फक्त एक खोली, त्यातच पार्टीशन घालून केलेली स्वैपाक खोली आणि जिन्याखालचं न्हाणीघर म्हणजे त्यांचं घर. खरं तर त्यांची रेल्वेमधली नोकरी अगदी चांगल्या दर्जाची पण तेव्हा ’राहते घर’ हे त्याचे निदर्शक नसे. पुढे त्यांनी गच्चीवर चांगला मोठा हॉल बांधला. तिथे आम्ही प्रचंड पत्ते खेळायचो आणि खेळताना खाणाखुणा केल्या म्हणून जोरजोराने भांडायचो. आवाज फारच वाढला की काका वर येत आणि चुटक्या वाजवत ’च्यला पॉत्ते बॉंद’ एवढच शांतपणे म्हणून आम्हाला रवाना करत. तोंडात तंबाखूचा बार असल्याने याहून अधिक बोलणं त्यांना शक्य होत नसावं. आम्ही दुसर्या दिवशी पुन्हा काल जणू काही घडलच नाही या अविर्भावात नव्याने खेळ (आणि भांडण) सुरू करत असू.
८० ते ९० च्या दशकातल्या त्या वाडा संस्कृतीतलं काकांचं व्यक्तिमत्व खूपच असामान्य आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटत असावा. त्यांचं वेगळेपण त्यांच्या घरापासून सुरू होई. बाहेरच्या खोलीत एक लोखंडी कॉट, त्यावर एकावर एक पसरलेला गाद्यांचा ढीग, एखादं स्टूल आणि घडीची पत्र्याची खुर्ची इतपत ’फर्निचर’ आणि ’पिवळे बल्ब’ असलेली बहुतेक घरं. त्यात त्यांचं छोटसंच पण अतिशय नीटनेटकं घर अगदी उठून दिसायचं. ’महाराष्ट्र टाईम्स’ची रद्दी अगदी काटकोनात रचलेली, गादीवरची चादर स्वच्छ आणि ताठ खोचलेली. खिडकीत चकचकीत पाण्य़ाचं तांब्याभांडं भरून ठेवलेलं, खिडकीला साडीचेच पण सुरेख रंगसंगती असलेले पडदे आणि त्याकाळी दुर्मिळ असलेला पुस्तकांनी खच्चून भरलेला भिंतीतला कप्पा. त्यातली पुस्तकं अर्थातच अगदी शिस्तबद्ध लावलेली. रेडिओवर किंवा नंतर टेपवर सतत छानशी भावगीतं, सिनेगीतं, नाट्यगीतं कायम सुरू असायची. या सगळ्य़ामुळे त्या घरात सतत एक प्रसन्नतेची झुळूक वावरत असायची. काकांना गाण्याची उत्तम समज होती, काकू देखील छान गात. विशेषत: आशाचे ’जीवलगा’ गावे तर त्यांनीच. त्यांचे माहेर पुण्याचे, शिक्षण ’स.प. महाविद्यालयातले’ त्या काळचे इंटर, त्यांची बहीण आक्का मराठी चित्रपटात काही सात्विक भूमिका केलेली. त्या ’स्त्री सखी’ मंडळात जात. इतर बायका ’शेवया करूया, पाटल्या नव्या केल्या का, ह्यांची महिनाभर ४-१२ च सुरू आहे’ वगैरे आपसात बोलायच्या, त्यापेक्षा काकूंच्या गप्पांचे विषय वैविध्यपूर्ण असत. प्रशांत देखील हरहुन्नरी आणि ’व्हॉईस ऑफ किशोरकुमार’ होता. हरितालिकेला किंवा कोणत्याही एकत्रीकरणात त्या दोघांची गाणी ऐकायची हे ठरलेलं. या संगीतमय वातावरणाचे श्रेय मात्र काकांचे. ते घरी असले की बहुतेक वेळा चष्मा लावून खिडकीशी सतत वाचताना दिसत किंवा गुणगुणत असत. सर्वसाधारण उंची, देशस्थी सावळा रंग, थोडेसे विरळ होत गेलेले मागे वळवलेले कुरळे केस, तोंडात तंबाखूचा बार त्यामुळे मुखरस सांभाळत मिश्कील बोलणारे, टापटीप परीटघडीच्या कपडयातले, हसरा चेहरा आणि रसिक वृत्तीमुळे कायम सतेज दिसणारे काका शेवटपर्यंत तसेच दिसायचे.
पहिलीत मी पहिले भाषण लो. टिळकांवर केले आणि मला बक्षीस मिळाले. घरी येताच मी आधी धावत जाऊन त्यांचे घर गाठले आणि त्यांच्या पायरीवर ’सावधान’ पोझ मधे उभे राहून अख्खे भाषण खाडखाड म्हणून दाखवले. ही आठवण तेच मला नेहमी हसत हसत सांगत. पाचवी की सहावीत ’भुताळी जहाज’ हे भा.रा.भागवतांचे पुस्तक मी त्यांच्या कप्प्यातून काढून वाचायला मागितले आणि एका रात्रीत वाचून परत केले. यावर खूष होऊन त्यांनी त्यांचा पुस्तकांचा कप्पा मला खुला केला आणि माझं वाचन अधिक उत्साहाने सुरू झालं. सार्वजनिक वाचनालयात काकांनी काढलेलं गदिमांच अप्रतिम चित्र लावलेलं होतं, अजूनही असावं. काकांचा कुसुमाग्रज, ना.धों महानोर अशा कितीतरी मोठ्य़ा साहित्यिकांशी परिचय तसच वैयक्तिक पत्रव्यवहार होता. मला हे कळले तेव्हा ते सारे फार अद्भुत वाटले, आपल्याला शाळेत ज्यांचे धडे, कविता आहेत त्यांच्याशी काका प्रत्यक्ष बोलतात, पत्र पाठवतात म्हणजे किती ग्रेट! मग मी पण गिरीजा कीर यांना पत्र लिहून माझ्या तेव्हाच्या अकलेनुसार काही प्रश्न विचारले, आणि त्यांचे मोत्यासारख्या वळणदार अक्षरात मला चक्क उत्तर आले ते मी धावत जाऊन आधी काकांना दाखवले. त्यांनी मला खाऊसह शाबासकी दिली हे अजूनही आठवतं.
रेल्वेचा दुर्गोत्सव तिथे मोठ्य़ा प्रमाणावर होत असे. काकांचा त्यात सक्रीय सहभाग असायचा. निवेदन, कार्यक्रमाची आखणी, उत्तमोत्तम कलाकारांचे आगतस्वागत ही सगळी जबाबदारी ते सहज पार पाडायचे. अशा मंडळींशी संवाद साधायला जी सांस्कृतिक उमज असायला हवी त्यासाठी काकांसारखी दुसरी योग्य व्यक्ती नसावी. त्यांचे त्या कार्यक्रमातले, नाटकात काम केल्याचे बरेच फोटॊ पाहिल्याचे मला आठवते. तेव्हाची आजूबाजूची इतर ’वडील’ मंडळी ही फारच रूक्ष आणि साचेबद्ध. रेल्वेतल्या त्रासदायक नोकरीने सतत कावलेली असायची. ’काही अप काही डाऊन’ अशीच आर्थिक स्थिती आणि बोलण्य़ात फक्त ’रेल्वेचे विषय’. या सर्वांचे स्वभावाने रागीट असणे, मुले चुकून समोर आलीच तर त्यांच्यावर ’अभ्यासाला बस’ म्हणून डाफरणे आणि बायकोशी फक्त ’वाढ’ म्हणण्य़ापुरता संवाद (!) असणे हे अगदी सार्वत्रिक वैशिष्ट्य़ होते. या पार्श्वभूमीवर काका मला खूप वेगळे वाटत. त्यांची विनोदबुद्धी उत्तम आणि अंगात अभिनय असल्याने त्यांच्याकडून घेतलेली उधारी चुकावणारे, आजूबाजूचे काही नमुने यांच्या ते झकास नकला करत. प्रशांतसोबत काही ना काही हस्तकला करताना, काकूंशी त्यांना चक्क ’गप्पा’ मारताना पाहून आम्हाला आश्चर्य वाटे. फिरायला किंवा बाहेर जाताना ते दोघे मागे पुढे न चालता सोबत जात असत. महालक्ष्म्यांची त्यांनी केलेली सजावट पाहण्य़ासारखी असे. इतर बायका ऐपत असली तरी ’करायच्या काय’ म्हणून लग्नात ’आलेल्या’ वायलच्या साड्या नेसत पण काकूंच्या साड्या मात्र सुंदर लेस लावलेल्या, प्लेन टवटवीत रंगांच्या आणि मऊ पोताच्या असत. त्यातलीच एक मागे भिंतीवर सोडून घरातलेच साहित्य वापरून काका नेत्रसुखद रचना करायचे. गणपतीतही काका सुरेख मखर करायचे. त्यांच्या घरची प्रसादाची खमंग वाटली डाळ आणि सढळ हस्ते तूप घातलेल्या बेसनाच्या लाडूची चव चाखण्य़ासाठी त्यांची विसर्जनाची वेळ गाठण्याची आमची कोण लगबग असायची. दिवाळीचे अभ्यंगस्नान झाले की आधी मी नवा ड्रॆस काका-काकूंना दाखवायला जायचे. मी नव्या फ्रॉकच्या घेराची दोन्ही टोके हातात धरून गिरकी मारायची आणि त्यांनी ’कंपलसरी’ माझे कौतुक करायचे असा आमचा रिवाजच होता.
केव्हाही उठून त्यांच्या घरी जाणे आणि काका असले तर त्यांच्याशी काहीतरी हटकून बोलणे ही तशी साधी घटना असली तरी मुलांशी इतर काका मंडळी फारशी बोलत नसल्याने मला तिथे जायला विशेष आवडायचे. काकांचे बालपण अतिशय कष्टात गेले असे काकू नेहमी सांगायच्या पण भूतकाळाचे सावट त्यांच्या ’आज’ वर कधीच जाणवायचे नाही. सामाईक गोष्टींवरून वाड्य़ात जी अपरिहार्य भांडणे होत त्यात काकांचा स्वर कधी टीपेला गेल्याचे किंवा त्यांनी अर्वाच्य भाषा वापरल्याचे मला आठवत नाही. त्यांच्या बाजूचे म्हणजे ४ थे घर विचित्र वृत्तीचे, एका पाठॊपाठ एक अशा सात मुली झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले, सदा कलकलाट करणारे. त्या गृहस्थांचे पिऊन येणे आणि कुरापती काढून काकांना भांडायला सतत आमंत्रण देणॆ कधी थांबले नाही. या कटकटीला वैतागुन कुणीही चवताळून एकदा तरी त्यांच्यावर धावून गेला असता. ’मग आमच्यात फरक तो काय उरला’ असं म्हणणार्या काकांच्या समंजस, सुसंस्कृत, नीटनेटक्या व्यक्तित्वाची त्या वयात माझ्यावर छाप पडली ती कायमचीच.
मी शिकायला बाहेर पडल्यावर आमचा संपर्क काहीसा कमी झाला आणि तोवर काकांची नासिकला बदली झाली. सामाईक ओळखीचे कुणी भेटले तर एकमेकांच्या चौकशीपुरताच संबंध राहिला. पण अनेक वेळा त्या त्या सणाला, तशा घटनांच्या प्रसंगी काका-काकूंची आठवण यायची. १० वर्षांपूर्वी जीएसइ निमित्त्याने नासिकला जाणे झाले. फोन करून काकांकडे गेले, इतक्या वर्षांच्या साठलेल्या गप्पा झाल्या. प्रशांतचे जवळच घर होते, त्याच्या बायकोमुलीची ओळख झाली. बाहेर एकत्र जाणं झालं. काका स्वत: मला इंटरव्ह्यू च्या जागी पोचवायला आले आणि माझी निवड झाली हे कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. माझे तिकीट रद्द करणे, दुसरे काढणे, मला स्टॆशनवर पोचवणे सगळं ते उत्साहाने, काळजीने, प्रेमाने करत होते. आमचा संपर्क पुन्हा पूर्ववत सुरू झाला. बहुतेक वेळा फोनवरच. दिवाळी, नव वर्ष अशा निमित्ताने मी फोन करायचे तर माझे लेख वाचल्यावर अधूनमधून त्यांचा फोन येई. त्यांची साहित्यिक आस्वादकता खूपच उत्तम, माझा लेख त्या दर्जाचा नसला तरी त्यात कौतुकाचा भागच सर्वाधिक असायचा याची मला जाणीव असायची.. एव्हाना त्यांचा पुस्तक संग्रह प्रचंड वाढला होता. वाचन अव्याहत सुरू असायचे. एकदा सहपरिवार त्यांच्याकडे जाऊन आले, तेव्हा त्यांनी नवर्याशी अवांतर बोलण्यापेक्षा बहुतेक वेळ माझे लहानपणापासूनचे किस्से सांगत नवरा वैतागेल इतके कौतुक केले. नंतर कामानिमित्ताने नासिकला एक दिवसाच्या धावपळीच्या ट्रीप्स झाल्या पण मुलांसाठी लगेच परतायच्या घाईत काकांना घरी भेटण्य़ाइतकी सवड मिळू शकली नाही.
गेल्या नासिक भेटीत ठरवले, की पुढच्या वेळेस कसेही करून भेटायला जायचे. बालपणीची उर्जादायी प्रतिमा मनात ठसल्याने काका, काकू आता थकले आहेत हे कदाचित लक्षातच आले नाही. ते गेल्याचा प्रशांतचा फोन आला तेव्हा हतबल वाटलं.. पोरकं झाल्यासारखं खोल काहीतरी कापत गेलं, आणि जाणवलं, देअर इज नॉट ऑलवेज अ टुमारो.