हल्ली कुणाला लग्नासाठी स्थळ सुचवण्यात आलं की सगळ्यात आधी एकमेकांचे सोशल मिडीया प्रोफाईल, विशेषत: फेसबुक बघितले जातात. तिथे तुम्ही स्वत:ला कसे सादर करता, काय पेहराव करता, कुणाबरोबर असता, कोणते कार्यक्रम पाहता, कसे विचार करता हे सारं जोखून पुढे जायचं की नाही हे ठरवण्यात येतं. कॉर्पोरेट क्षेत्रात सुद्धा नेमणुकीआधी आता लिंक्ड-इन सह उमेदवाराचे फेसबुक प्रोफाईल तपासले जाते. पती पत्नी किंवा एकाच कुटुंबातले सदस्य एकमेकांना जितकं ओळखत नाहीत तितकं या सोशल साईट्स तुम्हाला ’ओळखून’ असतात असं गमतीने म्हटलं जात असलं तरी त्यात अतिशयोक्ती नाही. हे इथेच थांबत नाही. ..
सध्या केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सोशल मिडिया वापरुन मतदारांची कलचाचपणी करायची. त्यानुसार विशिष्ट पोस्ट्स किंवा ट्वीट्सचा मारा करुन आपल्या पक्षाला अनुकूल असे जनमत तयार करायचे ही पद्धत राजकीय क्षेत्रात रुढ होते आहे. व्यापारी कंपन्याही साधारण हेच करत असतात. आपली माहिती मिळवून नुकतेच काय ’सर्च’ केले आहे ते पाहून आपल्याला भावतील अशा उत्पादनांच्या जाहिरातींचा भडिमार होऊ लागतो. साम्यवादाची नकारात्मक बाजू अधोरेखित करणारे ऑरवेलचे ’बिग ब्रदर इज वॉचिंग यू’ आजच्या भांडवलवादी सोशल साईट्सलाही लागू होते आहे.
याबाबत काही लोकांना असे वाटते की आपल्या डाटामध्ये लपवण्य़ासारखं काही नाहीये मग घाबरायचं कशाला!, काहींना तर स्वेच्छेने करायचय शेअर तर काहींचं म्हणणं जगात असुरक्षितता कुठे नसते! हे खरं असलं तरी या भूमिकेमुळे माहितीच्या गैरवापरासाठी आवश्यक असलेला डाटा पुरवायला आपण नकळत हातभार लावत असतो. 'माहिती' हाच अशा प्रकारच्या अनैतिक सायबर व्यवसायाचा कच्चा माल आहे, तो आपण नकळत पुरवतो. सोशल साईट्स व त्यामागील अर्थकारणाचे नैतिक मूल्यमापन करण्याइतकाच महत्वाचा मुद्दा हा आहे की या बाजारात आपण स्वत:चा गिनीपिग आणि ग्राहक म्हणून वापर होऊ द्यायचा की नाही. एका मर्यादेपर्यंत ते आपल्या हातात नाही कारण आपण सोशल मिडियावर खातं उघडताना किमान माहिती देतो. सर्च इंजिन वापरतो, अॅप्स वापरतो, तेव्हा बहुतेक वेळा आपणच आपला डाटा वापरण्य़ाची ’आय अॅग्री’ असे क्लिक करुन परवानगी देत असतो.
मग आपल्या हातात उरते काय? डिलिट-फेसबुक या हॅशटॅग ट्रेंडमध्ये सामील व्हायचे, किंवा एकूणच सोशल मिडीयापासून लांब राहायचे हा एक पर्याय आहे परंतु काळाबरोबर चालणे ज्यांना आवश्यक वाटते त्यांना तो रुचणार नाही. शिवाय सोशल मिडीयाचे अनेक फायदेही आहेत. व्यक्तिगत आवडीसाठी, तांत्रिक सुविधांसाठी, नेटवर्किंगसाठी, व्यवसायासाठी, सामाजिक-वैचारिक उपक्रमांसाठी, समविचारी लोकांच्या वर्तुळात राहण्य़ासाठी इतका प्रभावी पर्याय दुसरा नाही. काल ऑर्कुट होतं, आज फेसबुक आहे, उद्या आणखी काही असेल. आपले खासगीपण जपून त्या त्या तंत्रावर स्वार होण्याचे कसब मिळवायला हवे. आपण भुरळ घालणार्या-कामुक आवाहन करणार्या असुरक्षित लिंक्सवर ’चोरुन’ (!) क्लिक करत नाही ना, https न वापरणार्या वेबसाईट्सवर आर्थिक व्यवहार करत नाही ना, अनावश्यक आणि क दर्जाचे अॅप्स डोळे झाकून वापरत नाही ना हे पहावे. आपला डिजिटल वापर होत असल्याचे जाणवले तर याच माध्यमाचा वापर करुन आवाज उठवायला हवा, तसा फीडबॅक आणि रेटिंग द्यायला हवे. उदा: ग्राहकाचे मोबाईल बॅटरी स्टेटस जाणून घेऊन त्यानुसार भाडे वाढवणार्या एका टॅक्सी-सेवा कंपनीला ग्राहकांनी हा प्रकार बंद करायला नुकतेच भाग पाडले आहे.
आपल्या हातात असलेली दुसरी गोष्ट म्हणजे विवेकाचा वापर. आयुष्यात खुट्ट झाले तरी ते सोशल मिडियाद्वारे जगाला ओरडून सांगणे, इतर लोक काय करत आहेत याबद्दल अवाजवी उत्सुकता बाळगणे, सुरक्षेचे बेसिक सेटिंगही न वापरणे, शहानिशा न करता ’फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड’ च्या ढालीखाली वाटेल ते पोस्ट करणे, स्वत:सह इतरांचाही धोका वाढवणारी फेसबुकवर असलेली फालतू क्विझ खेळणे हे आपण थांबवणार की नाही! असे करुन आपली माहिती नकळत आपणच वाजतगाजत उपलब्ध करुन देत असतो. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकेषणेचा मोह टाळणे. सोशल मिडीया वापरणारे लोक बर्यापैकी सुशिक्षित असले तरीही आपली वट दाखवणारी मित्रयादी फुगवण्य़ाच्या नादात किंवा भाबडेपणामुळे हुरळून जाऊन कित्येकजण फेक अकाउंट्सचे सावज होतात. ही बनावट खाती तर आपल्या मित्रयादीत शिरुन आपल्या डाटाचा थेट दुरुपयोग करत असतात, फायदा घेत असतात. बहुतांशी सायबर गुन्हे अशा खात्यांमार्फत घडतात.
भारतात आज फेसबुकवर सुमारे २० कोटी तर ट्वीटरवर सुमारे ३ कोटी वापरकर्ते आहेत. यातली किमान दहा टक्के खाती बनावट आहेत. अशी खाती तयार करणार्यांचे हेतूनुसार ४ गट करता येतील. अ) केवळ गंमत, कुतूहलापोटी. इंटरनेटवर तांत्रिक करामती करुन पाहताना खरे अकाउंट अडचणीत येऊ नये म्हणून किंवा विशिष्ट विचारधारेचा पुरस्कार करण्यासाठी. ब) चॅटिंगद्वारे महिलांशी घसट वाढवण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्यासाठी, राजकीय डावपेचाचा भाग म्हणून किंवा व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्य़ासाठी क) अमुक इतके लाईक्स, फॉलोअर्स खात्रीने मिळवून देतो असे सांगणार्या व त्याबदल्यात घसघशीत मोबदला घेणार्या मार्केटिंग कंपन्यांद्वारे बॉट्सचा वापर करुन खोटे संख्याबळ दाखवण्यासाठी. (नुकतेच एका राजकीय पक्षाने फेसबुकपेज सुरु केले आणि एका रात्रीत पाच लाख लाईक्स मिळवून दाखवले) ड) पैसे लुबाडणे, अश्लील मेसेज करणे, मॉर्फिंग केलेले संभाषण-फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्य़ाची भीती दाखवून प्रत्यक्ष लैंगिक शोषण करण्यासाठी, ड्रग्ज किंवा तत्सम अनैतिक व्यापारात ओढण्यासाठी इ.
पहिल्या गटाच्या लोकांचा फारसा त्रास होत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते. इतर तीन गट मात्र आपल्या जगण्यात प्रचंड उलथापालथ घडवू शकतात तेव्हा त्यांचा हेतू ओळखून वास्तव जगात अपरिचित लोकांसह वावरताना आपण जशी खबरदारी घेतो तशीच आभासी जगातही घेणं ही आपल्या हातातील तिसरी गोष्ट.
मुळात सर्वसामान्य व्यक्तींनी अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट सरळ डिलिट कराव्यात. मात्र व्यावसायिक हेतूसाठी सोशल मिडीया वापरणार्यांना, सामाजिक कामात अग्रेसर असणार्यांना, किंवा कलाकारांना, कवी-लेखकांना असं करुन चाहत्यांना नाराज करता येत नाही. मग तंत्रमैत्री नसलेल्यांनी सोशल मिडियावरील बनावट खातेदारांना ओळखायचं कसं?
एखाद्या मादक मॉडेलचा फोटो प्रोफाईलला वापरुन पुरुषांना आणि साध्या बाईचा फोटो वापरुन महिलांना मित्र-विनंती पाठवली जाते. प्रोफाईल फोटो कृत्रिमरित्या आकर्षक केलेला वाटत असेल तर तो डेस्कटॉपवर ओढून गुगल इमेज सर्चवर ड्रॉप केला की गुगल त्या फोटोबद्दल अधिक माहिती देतं. बनावट खातेदार कुटुंब, मित्रपरिवार, कार्यालयीन सहकारी यांच्यासह काढलेले फोटो पोस्ट करत नाहीत. मित्रयादी- फार लहान (१०० च्या आत) किंवा फार मोठी (हजारावर) असते. मित्रयादीत सामाईक मित्र शोधावे, ज्यांना आपण या व्यक्तीबद्दल विचारणा करू शकतो. ते नसतील आणि जगभरातले, चित्रविचित्र वाटणारे लोक यादीत असतील तर सावध व्हायला हवं. अशा व्यक्तींचा इंट्रो-परिचय त्रोटक असतो किंवा त्यात संगती आणि तथ्य जाणवत नाही. ४०-५० किंवा अधिक व्यक्तींना वारंवार टॅग केले जात असेल तर संशयाला जागा आहे. त्यांच्या टाईमलाईनवर फारशा पोस्ट्स नसतात. थोड्याफार असल्यास कोणत्या विषयावरच्या आहेत, त्यातली भाषा योग्य आणि फोटो असल्यास ते सभ्य आहेत हे पाहावे.
अशी व्यक्ती आपल्याला मित्र म्हणून हवी आहे का हे आपण स्वत:ला विचारावे. उत्तर नकारार्थी असेल तर रिक्वेस्ट डिलिट करावी, चुकून स्वीकारली गेली असेल तर ताबडतोब अनफ्रेंड करावे, तरीही रिक्वेस्ट येत असेल तर ब्लॉक आणि रिपोर्ट करावे. अकाउंट खरे असले तरी एखाद्या व्यक्तीकडून भारंभार लाईक्स, सवंग किंवा असंबद्ध कॉमेंट्स येत आहेत, इनबॉक्सवर गुलूगुलू बोलण्य़ाचा प्रयत्न होतो आहे असे जाणवले तर स्क्रीनशॉट्स घेऊन लगेच ब्लॉक आणि सकारण रिपोर्ट करावे. म्हणजे त्या अकाउंटवर साईटद्वारा योग्य ती कारवाई केली जाईल. सायबर गुन्हा नोंदवतानाही याचा उपयोग होऊ शकेल. वैयक्तिक मेसेजेसला उत्तर देणं टाळावे. गरज नसताना लोकेशन देऊ नये. भावनिक संवादात गुरफटू नये. आर्थिक तपशील शेअर करु नयेत. पब्लिक सेटिंग ऐवजी फ्रेंड् सेटिंग करावे. जनता-चोर-पोलिसांचा खेळ कधी न संपणारा आहे, तो सोशल मिडियावरही खेळला जातो आहे इतकच. विचार ठाम असले आणि तारतम्य बाळगले तर आपण आपलं डिजिटल पाकीट सांभाळून सोशल मिडियावरच्या मुखवट्यांच्या जत्रेत खर्या चेहर्याने मजेत वावरू शकतो.
#CyberSecurity #CyberCrime #SocialMedia #FriendRequest #FakeAccounts #MaharashtraTimes
#सायबर_सिक्युरिटी #सायबर_क्राईम #सोशल_मिडिया #महाराष्ट्र_टाईम्स