नागपूर येथील आमच्या ’डिजीटल अवेअरनेस’ कार्यशाळेमध्ये जी प्रश्नोत्तरं झाली त्यातून जाणवले की अर्धवट/ऐकीव माहिती, तंत्रज्ञानाबद्दलची भिती यामुळे अगदी सुशिक्षित लोकदेखील अनेकदा इंटरनेट-तंत्रज्ञानाचा वापर करायचे टाळतात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर करतात.
काही पथ्यं पाळली तर त्याचा वापर नेमकेपणाने आणि सुरक्षितरित्या करणे अजिबात अवघड नाही. इंटरनेटचा नीट वापर करु इच्छिणार्या 'नवोदित' मंडळींसाठी लिहीलेला हा लेख- ’व्हा डिजिटली स्मार्ट’
"माझ्या मुलाने हे ट्वीटर का काय इन्स्टॉल करून दिलय, आता ते वापरुन रेल्वे प्रवासात काही अडचण असली तर सुरेश प्रभूंना कसं कळवायचं?"
"मी एकदा मुलीने शिकवल्याप्रमाणे ऑनलाईन खरेदी केली पण त्यावर मला जास्तीचे पैसे द्यावे लागले ,मग काय उपयोग?"
"व्हॉट्सअॅप वर ग्रुप तयार न करता सुद्धा खूप जणांना एकच मेसेज पाठवायची काही सोय असते का?"
"मुलगी फेसबुकवर सारखे फोटो टाकते पण त्या फोटोंचा गैरवापर झाला तर! तो रोखता येतो का?"
असे कितीतरी स्वाभाविक प्रश्न मनात घेऊन, पारिजातक प्रतिष्ठानद्वारे नागपूरमध्ये नुकत्याच आयोजित केल्या गेलेल्या ’ऑनलाईन साक्षरता’ कार्यशाळेत अनेक जण सहभागी झाले होते. त्यात जास्त संख्या ज्येष्ठांची असली तरी मध्यमवयीन इंटरनेट वापरकर्त्यांनाही अद्याप आवश्यक तेवढा ’डिजीटल स्मार्टनेस’ आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. फक्त गाडी चालवता येणं पुरेसं नसतं. रहदारीचे नियम माहीत असणं, गाडीची जुजबी दुरूस्ती करता येणं हे किमान कौशल्य अवगत असायला हवं. इंटरनेट वापरताना देखील तारतम्य, व्यवहारज्ञान आणि किमान आवश्यक तांत्रिक ज्ञान नसेल तर अपघाताचा धोका अधिक. हे भान वाढावं हाच या कार्यशाळेच्या आयोजनामागील हेतू होता. या कार्यशाळेला जे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्याशी या लेखाद्वारे संवाद साधते आहे.
भारताची लोकसंख्या १२१ कोटी आणि मोबाइलधारक १०० कोटींहून अधिक अशी स्थिती आहे. अर्थात यापैकी केवळ २६.३ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असले तरीही एकूण भारतीयांचा ’ऑनलाईन’ वावर वाढत चालल्याचे लक्षात येते. समाजमाध्यमं (सोशल मिडीया), व्यावसायिक पोर्टल हाताळणार्या कंपन्यांसाठी भारत फक्त एक मोठी बाजारपेठ आहे. तेव्हा ग्राहक म्हणून सजग राहणे ही आपली जबाबदारी आहे. इंटरनेट वापरण्य़ासाठी लागणारा फोन, त्यातील पॅक, संगणक, वीज/इनव्हर्टर या सगळ्य़ाची उपलब्धता मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय समाजात अधिक आहे, साहजिक या गटात इंटरनेटचा वापर सर्वाधिक होतो. हा शैक्षणिक दृष्ट्य़ा सुशिक्षित असलेला वर्ग तांत्रिकदृष्टया मात्र सराईत नाही. इंटरनेट वापरताना अनेकांना अजूनही भीती वाटते. इंग्लीशची भीती, आपल्याकडून चुकीचे बटण दाबले गेले, भलतेच काही इनस्टॉल झाले तर फोन किंवा संगणक खराब होण्य़ाची भीती, समाजमाध्यमांचा (सोशल मिडीया) वापर करताना आपली माहिती चोरली जाऊन फेक अकाउंट बनवले जाण्य़ाची भीती, विशेषत: मुली किंवा स्त्रियांच्या बाबतीत फोटो-माहितीचा गैरवापर होण्याची भीती, कॅशलेस व्यवहार करताना हॅकींग होऊन लुटले जाण्य़ाची भीती, सायबर गुन्हेगारांची भीती अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. या भीतीवर मात करायची असेल तर या तंत्रज्ञानापासून दूर पळणे हा त्यावर उपाय नाही, त्यावर स्वार व्हायला हवे. विमान-रेल्वे-बसचे अपघात होतात म्हणून प्रवास करणं आपण बंद करत नाही तसच डिजीटली स्मार्ट बनणं हाच यावर ठोस उपाय आहे.
पहिली पायरी म्हणजे तारतम्य. चांगली इंजिनीयर झालेली व्यक्ती ’रात्री कॉसमॉस किरणे येणार असल्याचे, अमुक वेळा पाठवल्यास आपोआप बॅटरी चार्ज होण्य़ाचे’ मेसेज पुढे पाठवते. अगदी उच्चशिक्षित व्यक्ती सुद्धा ’मला अमक्याकडून आला म्हणजे खरंच असेल’ असं म्हणत एखादा अंधश्रद्धा पसरवणारा मेसेज सर्रास पुढे पाठवतात. नाना पाटेकर सांगतात, मी कधीच ब्लॉग लिहीत नाही पण त्यांच्या नावाचे शेकडो मेसेज फिरतात. कोणत्याही कवितेखाली स्वत:चे नाव घालून, इतिहासाची तोडफोड करून, कुठलेही व्हिडीओ-पोस्ट पाठवल्या जातात. अफवा पसरवल्या जातात. सामाजिक स्वास्थ्यासाठी आणि आपल्या देशाची पत राखण्यासाठी हे आपण थांबवलं पाहिजे. समाजमाध्यम हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर समजून उमजून करता आला पाहिजे. आपण पाठवलेला मजकूर खरा असल्याची खात्री नसेल, तो समाजविघातक असेल, अनावश्यक-निरुपयोगी असेल तर तो पाठवण्याचा मोह आवरला पाहिजे. एका मर्यादेपर्यंत मनोरंजनाला हरकत नसावी परंतु ’आपली पोस्ट पाठवण्य़ाची नस्ती हौस म्हणजे इतरांचा वेळ अधिक फोन मेमरी’ हे सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे.
’फेसबुक’चा वापर स्नेही, हितचिंतक यांच्याशी संपर्क राखून संबंध वृद्धींगत करण्य़ासाठी, जे जे उत्तम-उदात्त-उन्नत तसच अत्यावश्यक ते ते शेअर करण्य़ासाठी व्हावा. प्रतिमानिर्मितीसाठी, लघु-उद्योजकांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी ’फेसबुक पेज’ चा अवश्य वापर व्हावा. दर्जेदार फोटोंचं झटपट शेअरिंग ही इन्स्टाग्रामची खासीयत समजून घ्यावी. कमीत कमी (१४०) शब्दात नेमकेपणे मजकूर लिहीण्य़ाचं कौशल्य ट्वीटर द्वारे आत्मसात करावं. महत्वाच्या-आवडत्या व्यक्तींना फॉलो करण्य़ासाठी, पब्लीक सर्व्हिसेसकडे आपल्या अडचणी मांडण्यासाठी ट्वीटरचा योग्य रितीने वापर करावा. आपला व्यवसाय किंवा करियर विकसित करण्य़ासाठी, उद्योगक्षेत्रातल्या घडामोडी समजून घेण्य़ासाठी ’लिंक्ड-इन’ सारख्या साईट्सचा अचूक वापर करण्य़ाचे कसब शिकून घ्यावे. समाजमाध्यमं वापरताना ज्या तांत्रिक अडचणी येतात त्याची उकल होण्य़ासाठी त्यांची ’हेल्प’ पेजेस, गुगल सर्च तसच यू ट्यूबसारख्या साईट्सची मदत घ्यावी. ’हाऊ टू’ ने सुरू होणार्या सर्चची लेखी उत्तरे किंवा सोपे व्हिडीओ दोन्ही ठिकाणी अनुक्रमे उपलब्ध आहेत. ’-’ चिन्ह वापरून अमुक शब्द वगळून शोधणे, * हे चिन्ह पत्यातील जोकरसारखे वापरणे, 'usd in inr' वापरून चलनबदल करणे अशा अनेक क्लुप्त्या यावर वापरता येतात. त्यासाठी नक्की ’काय शोधायचे आहे’ याची स्पष्टता असावी म्हणजेच योग्य त्या की-वर्ड चा वापर करता यायला हवा. इंग्लीश नीट येत नसल्यास किंवा ठरवून वापरायची नसल्यास मराठीसह इतर अनेक भाषांमध्ये देखील या सुविधा उपलब्ध आहेत. जसे मोबाईलवर गुगल इंडीक कीबोर्ड वापरून हिंदी-मराठी टाईपिंग करता येते.
एकदा याचा नीट वापर करता आला की दुसरी पायरी म्हणजे सायबर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या अनेक प्रकारच्या फिल्टर्सचं तांत्रिक ज्ञान. उदा: फेसबुकसारख्या समाजमाध्यमांवर पोस्ट केलेले फोटो कुणी पाहावेत, पोस्ट कुणाला जावी याचे सेटींग करता येतात. नको असलेल्या इ-मेल्स ला अनसबस्क्राईब करता येतं, अनावश्यक मेसेजला स्पॅम म्हणून नोंदता येतं, त्रासदायक व्यक्तीला ब्लॉक करता येतं. जगाशी जोडलं जाण्य़ाच्या नादात आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. अनोळखी व्यक्तींना मित्रयादीत सामावून घेऊ नये. फोन नं जाहीरपणे पोस्ट करू नये. वैयक्तिक संवाद इन-बॉक्स वर करावा. अश्लील-धमकीचा मेसेज आल्यास स्क्रीनशॉट घेऊन ठेवावा तसेच सायबर सेलला तक्रार दाखल करावी. कोणतीही बँक, विमा कंपनी फोनवर आर्थिअक तपशील वा खात्याची माहिती विचारत नाही. प्रलोभनांना बळी न पडता असे फोन नं ब्लॉक करावे. आपले काम होताच त्या त्या साईटवरून न विसरता लॉग-आऊट व्हावे. मुलांच्या फोन, संगणक वापरावर नियंत्रण ठेवण्य़ासाठी ’आयनेटक्लीन’ सारख्या ’पॅरेंटल कंट्रोल’ अॅपचा वापर करावा.
डिजीटल स्मार्टनेसची तिसरी पायरी म्हणजे ’शक्य तेव्हा कॅशलेस व्यवहार’. यामुळे आर्थिक व्यवहारातली पारदर्शकता वाढून भ्रष्टाचार कमी व्हायला मदत होईल, देशाच्या कर उत्पन्नात भर पडेल आणि त्याचा उपयोग शेवटी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठीच होईल. ऑनलाईन व्यवहारांसाठी दोन बँक खाती ठेवावीत. mahavitaran, olacabs, irctc, Book my Show, BHIM, SBI Buddy यासारखे अॅप बिल भरणे, ऑनलाईन खरेदी करणे, रेल्वे तिकीट, सिनेमा शो, टॅक्सी बुक करणे, पैसे पाठवणे अशा कामांसाठी गुगल प्ले स्टॊअर वरून इन्स्टॉल करून घ्यावेत. याबाबत सविस्तर माहिती माझे सहकारी सुभाष गोरे यांनी कार्यशाळेत दिली होती. या व्यवहारांसाठी नेटबँकिंग सुरू करावे. अॅपवरून व्यवहार करण्य़ासाठी एकच खाते वापरावे व त्यात जुजबी पैसे ठेवावेत. त्यात दुसर्या खात्यावरून लागतील तसे पैसे टाकावे. पासवर्ड बदलत राहावे आणि मोबाईल मधील नोटपॅडमधे ते सांकेतिक शब्दात लिहून ठेवावेत. क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अंथरूणाबाहेर पाय पसरले जातात, शिवाय सरचार्ज लागतो तेव्हा शक्यतो डेबिट कार्डचा वापर करावा. धोका जाणवला तर लगेच कार्ड ब्लॉक करावं. हे त्यांनी आवर्जून सांगितलं.
दोन हजार रुपयांपर्यंतच्या कार्ड व्यवहारांसाठी सेवाकर लागत नाही. डिजीटल प्रणालीने इंधन खरेदी, रेल्वे तिकिटे, महामार्गाचा टोल, विमा खरेदी या सर्वांवर विशिष्ट सूट मिळते. सध्या कार्ड वापरलं की दीड-दोन टक्के जादा रक्कम घेतात. येण्याजाण्याचा वेळ, वाहनखर्च आणि सोय याचा विचार करता ही रक्कम फार नाही. व्यवहारांची नोंदणी नको असलेले काही विशिष्ट व्यापारी, लाचखोर कर्मचारी अशांचा कॅशलेस विरोध मोडून काढण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. असे व्यवहार वाढले तर एटीएममधून पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याचीही गरज राहणार नाही. सरकारचा चलनछपाईचा खर्च कमी होईल. कॅशलेस व्यवहारांमुळे खर्चाचा मागोवा घेणे, आयकर विवरणपत्र भरणे, महिन्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे इ. सोपे होते. अद्याप बँकेत ठेवण्याइतपतही पैसे नसणारे, हातावर पोट असणारे अनेक लोक या देशात आहेत. परंतु चहा-भाजी विक्रेते सुद्धा पे- टीएम, स्वाईप मशीन सारख्या सुविधा वापरण्य़ाचा -उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा ग्लोबल जगाचे नागरिक होऊ पाहणार्या मध्यम-उच्चमध्यवर्गीयांना व्यावहारिक दृष्ट्या कॅशलेस होणे, डिजीटली स्मार्ट होणे अवघड का वाटावे ! गरज आहे ती फक्त इच्छाशक्तीची.
(महाराष्ट्र टाईम्स नागपूर -मैफल २२ जुलै २०१७)