Tuesday, March 7, 2017

किरा- चेतनेचे स्फुल्लिंग

एका स्त्रीचं आंतरिक भान किती परिपक्व, किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती देणारी एक अप्रतिम व्यक्तिरेखा म्हणजे ’किरा आर्गुनोव्हा’. आयन रॅंड या गाजलेल्या लेखिकेच्या ’वि द लिव्हींग’ या झपाटून टाकणार्‍या पुस्तकाची किरा ही नायिका. आयन रॅंड ही फक्त लेखिका नाही तर एक विचारधारा मानली जाते. रशियातल्या समूहवादाला झुगारून व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणार्‍या अमेरिकेत ती स्थायिक झाली. तिथे तिने निर्माण केलेल्या व्यक्तिवादी, वास्तववादी साहित्यकृतींपैकी एक म्हणजे ’’वि द लिव्हींग’. लेखिकेचे वैचारिक प्रतिबिंब म्हणजे ’किरा’. खरं तर १९३६ मध्ये म्हणजे जवळपास ८० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली, बरीचशी आत्मचरित्रात्मक किंवा स्वानुभवावर आधारित मानली गेलेली ही कादंबरी आहे. यातली ’चेतनेचे स्फुल्लिंग’ असलेली, व्यक्तिवादाचं तत्त्वज्ञान ठामपणे मांडणारी  किरा मात्र मला कालातीत वाटते. किराच्या संकल्पना निश्चित आहेत. ’जगणं म्हणजे काय? जगण्यातलं सौंदर्य म्हणजे काय?’ हे तिला नेमकं माहीत आहे. आजच्या स्त्रीला सुद्धा अप्राप्य वाटेल असा नि:शंकपणा, ठामपणा किरामध्ये आहे.  

तसं पाहिलं तर किरा म्हणजे कोणी असामान्य स्त्री नव्हे. जगाचा किंवा एखाद्या देशाचा इतिहास ढवळून किंवा उजळून टाकावा असं तिने काहीही केलं नाही. परंतु हेच तिचं वेगळेपण आहे. अवघं जग बदलून टाकण्याची, प्रत्यक्षात न पेलणारी, भव्यदिव्य स्वप्नं म्हणजे तिला वेडगळ कवीकल्पना वाटते. स्वत:च्या प्रतिभेच्या आणि बुद्धीमत्तेच्या बळावर स्वतःचं चिमुकलं पण परिपूर्ण असं जग निर्माण करण्य़ाची क्षमता दर्शनी नाजूक असलेल्या किराच्या मनगटात आहे. तिच्या भोवतीचं लहानसं जग बदलण्याची तिची स्वप्न वास्तववादी आहेत. त्यासाठी झोकून देण्याची तिची तयारी आहे. तिला जे मिळवायचय ते तिच्या क्षमतेवर. किरा मला भावते ती यामुळेच.

बोल्शेविक क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकारचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. लेनिनच्या मृत्युनंतर प्रतिस्पर्ध्यांना नामशेष करून स्टॅलिनने सत्ता स्वत:कडे घेतली. गुप्तहेर संस्थांमार्फत नागरिकांवर वचक ठेवून त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेऊन पहिल्या महायुद्धात रशियाबरोबरच जिंकलेल्या लहान देशांवर तो निरंकुश सत्ता चालवत होता. या कादंबरीत पडद्यामागचा सूत्रधार तोच आहे असे दिसत असले तरी यात रँडने साकारलेली किरा ही एकूणच ’सामर्थ्याच्या गैरवापराला नकार देणार्‍या, स्वत्व शाबूत असलेल्या मानवी मनोवृत्तीची’ प्रतिनिधी आहे. हे राजकीय अराजक माजलं तेव्हा आयन रॅंडने नुकतचं तारुण्यात पदार्पण केलं होतं. साम्यवादाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणारा समाज पाहिला, समाजल्याण आणि मानवतावादाच्या नावाखाली मूलभूत हक्कांची गळचेपी होताना पाहिली, त्या धगीत तीही होरपळून निघाली. या सगळ्य़ा भावभावनांचे पडसाद किराच्या व्यक्तिरेखेत उमटले आहेत. १९२२-२९ या काळात घडलेली ही कादंबरी केवळ अमुक एका काळातले आक्रंदन मांडत नाही, वेदनेचे भांडवल करत नाही. उलट वेदना महत्वाची नसून माणसाने त्याविरूद्ध दिलेला लढा, माणसाची विजिगीषु वृत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे, ते मानवी अस्तित्वाचं वैशिष्ट्य आहे हेच सार्वकालिक तत्वज्ञान आयन रँडने किराच्या भूमिकेतून मांडलं आहे.

अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवर आपल्या आकांक्षा जपत राहणारी ’किरा’ हे या कादंबरीतलं एकमेव, खर्‍या अर्थाने जिवंत पात्र. कादंबरी सुरू होते तेव्हा राज्यक्रांती दरम्यान विस्थापित झालेलं तिचं कुटुंब पेट्रोग्राडला (सत्तांतरानंतर ’लेनिनग्राड’) नुकतच परत आलेलं असतं. लहानपणापासून निसर्गात भटकणं, वाहत्या नदीत तराफ्यांवर पाय रोवून सुसाट रोरावत जाणं या सगळ्यातून किराला एक गोष्ट गवसलेली असते ती म्हणजे ’एकटेपणातला आनंद’. याचा अर्थ ती माणूसघाणी असते असा नव्हे. नातलगांशी तिचे सौहार्दाचे संबंध असतात. क्रांतीपूर्वी सुखवस्तू आयुष्य उपभोगू शकलेल्या नागरिकांची आता बूर्झ्वा म्हणून हेटाळणी होत असते. आता साम्यवादी सत्तेच्या टाचेखाली आलेल्या या नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी झगडावे लागत असताना १८ वर्षांची किरा मात्र अभियंता होऊन बांधकामतज्ज्ञ होण्य़ाचे ध्येय बाळगून असते. त्यावेळॆस एखाद्या सभ्य सुसंस्कृत मुलीने हे क्षेत्र निवडणे म्हणजे गहजबच. "स्त्री म्हणून स्वत:च्या अंगभूत गुणांचा समाजासाठी उपयोग करून द्यायचा सोडून, तू हे भलतच, पुरूषी क्षेत्र का निवडते आहेस," असं व्हिक्टर हा तिचा साम्यवादी मावसभाऊ तिला जरबेने विचारतो. "आपल्या थोर श्रमिक देशाची सेवा करता यावी म्हणूनच तंत्रक्षेत्र निवडलस ना तू?" हा प्रश्न तंत्रशाळेत नव्याने भेटलेली साम्यवादी सहाध्यायी सोनिया देखील तिला विचारते. दोघांनाही ती शांतपणे एकच उत्तर देते." फक्त स्वत:ची आवड, पॅशन म्हणून हे शिकते आहे. बस्स. लाल म्हणजेच साम्यवादी सरकारसाठी किंवा समाजासाठी नव्हे." आजही कित्येक जणांना आपल्या आयुष्याबद्दल इतक्या नेमकेपणाने निर्णय़ घेता येत नाहीत. 

लिपस्टीक सारख्या प्रसाधनाकडे सुद्धा ’व्यक्तीवादी वस्तू’ म्हणून पाहणार्‍या या देशात, सामाजिक बांधिलकी, संपत्तीचं समान वाटप अशा देखण्य़ा शब्दांमागचा पोकळपणा किरा पुरेपूर ओळखून असते. जेव्हा तिचा तंत्रशाळेतला नितळ मनाचा पण कट्टर साम्यवादी मित्र आंद्रेई टॅगानोव्ह तिला विचारतो, "साम्यवादात चूक काय आहे? माणसाने माणसासाठी जगावं याहून जगण्याचं उत्तम ध्येय काय असू शकतं?" त्यावर किरा म्हणते, "हे म्हणणं सोपं आहे पण जे लोक हुशार, प्रतिभावंत, सर्वोत्तम आहेत त्यांना समान दर्जाच्या नावाखाली कर्तृत्वशून्य, लायक नसलेल्या लोकांच्या पातळीला का ओढून आणायचं? लाखो निस्तेज, खुरडणार्‍या आत्म्यांसाठी या उत्कट, उमद्या, जीवनाचा अर्थ समजलेल्या, खर्‍या अर्थाने माणूस असलेल्या लोकांचा बळी का द्यायचा? " तिचे हे अगदी विरूद्ध पण स्पष्ट विचार ऐकता ऐकता या प्रकाशशलाकेत आंद्रेईसह आपणही गुंतत जातो. किराने मांडलेलं हे तथ्य वास्तवात येऊन त्याची परिणिती १९९० साली रशियाची शकले होण्यात झाली हे आपण जाणतोच. आदर्शवाद हा दिसायला सुंदर असला तरी व्यवहार्य असतोच असे नाही. किराचा ’वास्तववाद’ हा मला तिच्या व्यक्तिमत्वाचा एक विलोभनीय पैलू वाटतो. साम्यवादाला कडाडून विरोध करणारी, ’हे तत्त्व राबवणारी माणसे नव्हे तर हा विचारच मुळात चूक आहे’ हे ठणकावून सांगणारी किरा निव्वळ वैचारिक मतभेद आहेत म्हणून आंद्रेईशी मैत्री मात्र तोडत नाही. तिला त्यापलीकडचा माणूस दिसतो. ती तो निखळ मनाने जपते. मला वाटतं ’माणसाने माणसासाठी कसं जगावं’ हे खरं तर किराला अधिक नीट उमगलेलं आहे. साहजिकच या पारदर्शी व्यक्तिमत्वाबद्दलचे आंद्रेईचे आकर्षण, तो साम्यवादी संघटनेत वरिष्ठ पदावर पोचल्यानंतरही वाढतच राहते.

परंतु किरा गुंतली असते लिओ केव्हालेन्स्कीमध्ये. साम्यवादयांच्या हेरगिरीला, कारवायांना न जुमानता तिला आसुसून भेटायला येणारा फरार प्रतिक्रांतिवादी, देखणा लिओ! सुरूवातीला एकमेकांच्या साथीने सगळ्य़ा अडचणींवर मात करू म्हणत एकमेकात रममाण झालेले हे दोन आशावादी जीव सगळीकडून होणार्‍या सरकारी मुस्कटदाबीमुळे घुसमटू लागतात. किरा मात्र त्यांची स्वप्नं उराशी धरून लिओला धीर देत राहते. गरीबी, अन्याय, आजार आणि अपमान याला कणखरपणे तोंड देणारी किरा आपल्याला चकित करते तशीच लिओलाही. लिओ म्हणतो, "माझी आता एकच आस आहे, ती म्हणजे आयुष्यात एखाद्या गोष्टीची तीव्र आस कशी बाळगावी असावी ते मला तुझ्याकडून शिकायचे आहे." साम्यवादी विचारसरणीच्या कोणत्याही संघटनेचं सदस्यत्व घेतलं तर सरकारकडून चार सोयी मिळायच्या, रेशनकार्डावर अन्न थोडं अधिक मिळायचं, घरभाडं कमी लागायचं परंतु आपल्या विचारांशी, मूल्यांशी प्रतारणा करण्य़ाच्या बदल्यात मिळणार्‍या या सवलती लिओ आणि किरा नाकारतात. दोघांना आपली जुजबी नोकरीही गमवावी लागते. बूर्झ्वा असल्याचा शिक्का कपाळी असल्याने नवी नोकरी मिळणॆ अशक्य होते. कसंबसं दोघं शिकत राहतात पण लिओ आता खचू लागतो. ’आपण पेकाटात लाथ मारू हाकलून दिलेली दोन कुत्री आहोत’ असं तो उद्वेगाने म्हणू लागतो. एवढं होऊनही त्यांचे परस्परांवरील प्रेम सुतराम कमी होत नाही.

किरा आणि आंद्रेईची तंत्रशाळेत अधूनमधून भेट होत राहते, पण इतकी उपासमार होत असतानाही स्वाभिमानी किरा कधीही आंद्रेई जवळ परिस्थितीचे रडगाणॆ गात नाही. त्यालाच ते जाणवते. तिच्या अंतर्मनातलं सौंदर्य तिच्या चेहर्‍यावर झळकत राहतं. तिच्या देहबोलीतून व्यक्त होत राहतं. त्याची भूल लिओहून अधिक आंद्रेईला पडते. आणि आपल्यालाही. मजुरीची कष्टाची कामे करत कदान्न खात राहिल्याने प्रकृती ढासळलेल्या लिओमध्ये क्षयाची लक्षणे दिसू लागतात. त्याला हवापालटासाठी पाठवता यावं म्हणून किरा जीवाचं रान करते. ’लाखो कामगार क्रांतिकाळात गेले, एक बूर्झ्वा मेला तर काय हरकत आहे’ अशा संवेदनाहीन शब्दात तिला आर्थिक आणि सरकारी मदतीची दारे बंद केली जातात. शेवटी लिओला जगवण्य़ासाठी तिला एकच मार्ग दिसतो- आंद्रेई. त्याबदल्यात ती त्याला शरीराबरोबरच प्रेमाची खोटी कबुली देते. तिच्या आणि लिओच्या नात्याची कल्पना नसलेला, किरावर निरातिशय पण अव्यक्त प्रेम करणारा आंद्रेई तिच्यावर सर्वस्व उधळून देतो. किरा प्रेम हे मूल्य जीवापाड जपणारी आहे त्यामुळेच तिच्या प्रेमासाठी ती ’स्व-पलीकडे’ पाहू शकली असावी. अनाथालयाची कळा आलेल्या त्या शहरात लिओ बरा होऊन किरासाठी परत येतो पण फक्त शरीराने. मनाने तो जणू मृतप्राय अवस्थेत असतो. 

तडफडत किंवा साम्यवाद्यांना शरण जाऊन रोज तिळ तिळ मरण्य़ापेक्षा काळाबाजार करून उरलेले ४ दिवस चैनीत जगणे परवडले या निष्कर्षाला पोचलेला लिओ विवेक बाजूला ठेवतो. किराच्या विरोधाला न जुमानता वाममार्गाला लागतो. त्याला आतून जगावसं वाटावं, आपल्या जबाबदारीपोटी तरी त्याची नैतिकता जागी राहावी म्हणून किरा त्याला लग्नाची गळ घालू लागते तेव्हा आधीच पूर्णत: खचलेला लिओ तिला म्हणतो, "तू जर मला थांबवू शकत नाहीयेस तर ’तो लाल कारकुनाने खरडलेला एक कागदाचा तुकडा’ मला कसा थांबवू शकेल?" इथे मला किराचा विस्मय वाटतो. लिओने लग्नाला होकार द्यावा म्हणून ती त्याच्यावर भावनिक दबाब टाकू शकली असती, स्त्रीसुलभ आक्रोश करू शकली असती पण किरा असामान्य आहे. कागदोपत्री नात्यापेक्षा मनाचे भावबंध तिच्यासाठी अधिक महत्वाचे आहेत, तितकेच लिओचे व्यक्तिस्वातंत्र्यदेखील.

साम्यवादी संघटनेचा वरिष्ठ अधिकारी या नात्याने लिओवर कारवाई करण्यासाठी आंद्रेईला लिओच्या घराच्या झडतीचा परवाना मिळतो आणि तिथल्या कपाटात त्याला त्याने किराला भेट दिलेले पोशाख, वस्तू दिसतात. सुरा खुपसल्यासारखं ते सत्य काळजात रूतलेला आंद्रेई मनाने कोलमडतो. एव्हाना तथाकथित साम्यवादाचा खोटा जयजयकार करणार्‍या सहकार्‍यांची वैचरिक अधोगती पाहणार्‍या आंद्रेईला साम्यवादाचा फोलपणा जाणवू लागलेला असतो. किरा विपरीत स्थितीतही साम्यवादाला शरण जात नाही हे पाहताना ’माणूस कसा असू शकतो, कसा असायला हवा हे मी तुझ्यात पाहतो’ हे तो तिला सांगतो. तिने आपल्याला वापरलं ते स्वार्थासाठी नाही तर केवळ लिओवरच्या तिच्या निस्सीम प्रेमाखातर हे त्याला कळतं तेव्हा किरा त्याच्या नजरेला अधिकच उंच भासू लागते. ’समाजहिताच्या नावाखाली वैयक्तिक भावनांचा चुराडा करण्य़ाचा हक्क साम्यवाद्यांना नाही’ हे रोखठोकपणे सांगणार्‍या किराने आंद्रेईच्याच नव्हे तर समूहवादी मानसिकतेच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे. किरा दुसर्‍या कुणाची असणं हे पहाडासारखं दु:ख अंगावर कोसळतं तेव्हा माणसाच्या वैयक्तिक भावना त्याचं विश्व कसं आणि किती व्यापून टाकतात हे त्याला लख्ख उमगतं. साम्यवादाने नाकारलेलं माणसाचं खासगीपण हाच त्याच्या जगण्याचा आधार आणि उर्जा असते हे सत्य मान्य करून आंद्रेई आपलं आयुष्य संपवतो. 

आपल्या पाठीमागे किरा आणि आंद्रेई यांच्यात निर्माण झालेल्या संबंधांबद्द्ल कळल्यावर किराने आपला विश्वासघात केला असं समजुन लिओ व्यथित होतो. परंतु त्या आधीच त्याने सॅनिटोरियम मध्ये ओळख झालेल्या स्त्रीच्यासोबत परदेशात जाऊन आयुष्य़ घालवायची बेगमी केलेली असते. इथे लिओ कणाहीन झाल्याचे स्पष्ट दिसते. किरा त्याला आंद्रेई बद्दल कोणतेही स्पष्टिकरण देत नाही कारण तिचा आत्मा निष्कलंक असतो. ’जर तू जिवंत असलास आणि विसरला नाहीस तर भेटू’ अशी अनिश्चितता त्यांच्या प्रत्येक भेटीच्या निरोपाच्या क्षणी स्वीकारणारी किरा आतून शांत राहते ती यामुळेच. ज्याच्या प्रेमासाठी आपण आपलं शील पणाला लावलं त्याने आपल्याला त्यागावं याचा खेद ती वाटून घेत नाही.  निरपेक्ष प्रेम कदाचित यालाच म्हणत असावेत. किरा स्त्रीवादी असती तर कदाचित या अन्यायाने पेटून उठली असती पण किरा स्त्री-पुरूष या भेदांच्या पलीकडे खुल्या मनाने पाहणारी, व्यक्तिवादी आहे कदाचित म्हणूनच ती या घटनाक्रमाकडे विद्ध मनाने पण वस्तुनिष्ठपणे पाहू शकली आहे. एकाकी किरा स्वप्नांची साथ सोडत नाही. वैध मार्गाने परवानगी मिळत नाही म्हटल्यावर छुप्या मार्गाने देशाबाहेर पळ काढण्याचा निकराचा प्रयत्न करते. अश्रू ओघळल्याने सुद्धा वेदना व्हाव्यात अशी कडाक्याची थंडी साहत रात्रभर चालत राहते. सीमेवरील साम्यवादी सरकारी पहारेकर्‍याची गोळी तिचा वेध घेते तेव्हा हाडं गोठवणार्‍या बर्फातून स्वातंत्र्याच्या दिशेने चालत राहिलेल्या किराचं शरीर कोसळतं पण आत्मा तसाच राहतो..अलांच्छित, अवध्य, अभंग आणि अविनाशी. 

नायिका म्हणून आपल्या नजरेसमोर किरा अचूक उभी करण्य़ात लेखिकेची साहित्यिक प्रतिभा महत्वाची आहेच परंतु किरा एक विचारदीप घेऊन उभी आहे आणि वाचनाअंती तो ती आपल्या सुपूर्द करते. त्यागमूर्ती म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या, सामाजिक, धार्मिक अपेक्षांच्या दडपणाखाली घुसमटणार्‍या अनेक स्त्रियांना त्यांना काय हवं आहे याचा उच्चार करण्याचं, निर्णय घेण्याचं धैर्य किरा देऊ शकते. केवळ स्त्रियांनाच नव्हे तर झुंडशाहीमुळे दडपलेल्या गेलेल्या अनेक आवाजांना हुंकारण्य़ाचं बळ देण्य़ाची ताकद किरामध्ये आहे. खुज्या विचारांच्या काळोखात किरा तिच्या स्वयंप्रेरणॆने चमकत राहते आणि इतर अनेक आयुष्यांना कळत- नकळत प्रेरणा देत राहते. आपणही तिच्यासवे जगण्य़ातली मूल्यं प्रामाणिकपणे पण वास्तववादी भूमिकेतून जपण्यातलं सौंदर्य शोधायला लागतो. मग वाटायला लागतं, क्षणाचं असो वा दीर्घ, आयुष्य असावं तर किरासारखं, स्वतंत्र आणि अपराजित. 

Ref :
(We the living by Ayn Rand
marathi version - Manjiri Joshi)
मधुरिमा- दिव्य मराठी विशेष पुरवणीसाठी लिहिलेला लेख