Tuesday, December 6, 2016

रांग आणि आपण


नुकत्याच व्यवहारातून बाद केल्या गेलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी प्रचंड मोठ्य़ा रांगा लागल्या. आता जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी जुन्या नोटा रांगेत उभं राहून बदलून घेणं, ज्यांच्याजवळ इतर आर्थिक व्यवहाराचे पर्याय नाहीत त्यांना यासाठी प्राधान्य देणं, ही सामाजिक शिस्तीशी संबंधित साधी आणि देशहिताचीच गोष्ट आहे. परंतु या रांगातून आपल्याला दोन मनोवृतींचे दर्शन झाले. मोदीविरोधकांनी सरकारच्या या देशपातळीवरच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांची कशी गैरसोय होते आहे याची ओरड सुरू केली, ओरड करणारे सगळे रांगेत स्वत: उभे होते असे मुळीच नाही. दुसर्‍या बाजूला मोदीसमर्थकांनी या रांगेत उभं राहण्य़ाच्या सहनशीलतेची तुलना थेट सीमेवर अविरत खडा पहारा देणार्‍या भारतीय सैनिकांच्या मनोबलाशी करून आपण देशासाठी प्रचंड काहीतरी करतो आहोत असा त्याला रंग दिला. अर्थात त्या भावनेमुळे का होईना, एरवी रांगेला वैतागणार्‍या बहुसंख्य जनतेने फारशी कुरकुर न करता परिस्थितीचा स्वीकार केला हे सत्य आहे. नोटांचा पुरवठा निर्धारित वेळेत करण्य़ात काही प्रशासकीय त्रुटी जाणवत आहेत, हे काही अंशी खरे असले तरी मुळात आपल्याकडे समंजस ’रांग-संस्कृती’ नसल्याने त्राग्याची तीव्रता ’वाढवण्य़ात’ आली हे नाकारता येत नाही.

लग्नसराई किंवा शालेय सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची झुंबड उडते. सार्वजनिक बस मधे ’खिडकीतून रूमाल टाकून’ किंवा आतल्या एखाद्या भोळसर दिसणार्‍या व्यक्तीला शेजारची सीट आपल्यासाठी राखून ठेवायला बजावून, ऐटीत जाऊन जागा पकडायची भन्नाट पद्धत चढताना रांग लावण्यापेक्षा कित्ती सोपी. स्वत:ऐवजी आपल्या चपला रांगेत ठेवून स्वत: मोबाईल मध्ये डोकं घालून बाकावर बसलेल्या मंडळींचा एक फोटो मध्यंतरी सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाला होता. एकूणच भारतीयांना, नोटबदल घटनेसारखे अपवाद सोडले तर रांगेत उभं राहणं हे फार कंटाळवाणं, कटकटीचं तर काहींना ते चक्क कमीपणाचं वाटतं. त्यापेक्षा त्यांना अशा युक्त्या सोयीच्या(!) वाटतात. दोन इंग्रज माणसं एखाद्या काऊंटरवर काही कामासाठी गेली तर शेजारी शेजारी उभं न राहता ते एकामागे एक असे रांगेत उभे राहतात असे त्यांच्या मनोवृत्तीचे वर्णन केले जाते. इंग्रज हा देश सोडून जाताना भारतीयांवर चार बर्‍या गोष्टींची छाप सोडून गेले. त्यापैकी महत्वाच्या काही म्हणजे स्वच्छता व टापटीप याचं भान, जगण्याशी संबंधित प्रत्येक घटकातले सौंदर्य शोधण्याची वृत्ती आणि शिस्त. अर्थात त्या बदल्यात दीडशे वर्षात ते ’डुगना लगान’ घेऊन आपल्याला पुरते लुटून निघून गेले. देश स्वतंत्र झाल्यावर आपण साहेबाकडून लादली गेलेली इंग्लीश भाषा आणि क्रिकेटप्रेम पुरेपूर उचलले, पण सामाजिक शिस्त आणि प्रत्येक गोष्ट दर्जेदार करण्य़ाची वृत्ती मात्र मन:पूर्वक स्वीकारली नाही. मुंग्यांना सुद्धा ज्याचे महत्व कळते ती रांगेची शिस्त तर अद्यापही आपल्यामधे पूर्णपणे भिनलेली नाही. ’हम जहाँ खडे होते है, लाईन वहीसे शुरू होती है’.. अमिताभ बच्चन यांचा हा अजरामर संवाद कृतीत आणण्याचा प्रयत्न आपल्यापैकी अनेक जण आजही निकराने करत असतात.

रांगेत परिक्षा असते संयमाची, सहनशक्तीची पण आपल्याला प्रचंड घाई आहे, कशाची कोण जाणे! सिग्नलला उभ्या असलेल्या पुढच्या गाड्या जर दिवा हिरवा होण्य़ाची वाट पाहत असतील तर त्यांना ओलांडून मागच्या रांगेतील गाडीवाल्यांना पुढे जायचे असते. बरं, तेवढी आणीबाणी असेल म्हणावे तर यातल्या कित्येकांना पुढच्या चौकात थांबलेल्या मित्राला भेटून फार तर पान तेवढे खायचे असते. एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट काढावे तर तिकीट घेताना हात बाहेर येणे मुश्कील कारण बर्‍याचदा त्या लहानशा खिडकीत आपल्यासोबत मागच्या एकदोन माणसांचा हात अडकलेला असतो. गाडीत चढता उतरताना रांग लावण्य़ाऐवजी दोन्ही पार्ट्यांचा घोळका पार गाडी सुटायची वेळ येईतो दारातच एकमेकात अडकून राहतो. उच्चभ्रू लोकदेखील याला अपवाद नाहीत, विमानतळावर रांगेची शिस्त मुकाट्याने पाळणारे बरेच लोक पार्कींग करताना मात्र गाड्य़ा योग्य त्या अंतरावर रांगेत न ठेवता ’आपल्याला गाडी काढताना सोयीचे होईल ना’ एवढाच निकष वापरतात. निदान शक्य आहे तिथे थोडा धीर धरला आणि रांगेचे नियम पाळले तर फारशा समस्या निर्माण होणार नाहीत.

जिथे रांगेला पर्याय नसेल, जसे पेट्रोल भरणे किंवा महाविद्यालयात प्रवेश घेणे, तिथे रांग हाताळण्याची बहुतेक कर्मचार्‍यांची चुकीची पद्धत, लोकांची संधी साधून ’मधे घुसण्य़ाची’ मानसिकता यामुळे आपण रांग-संस्कृती विकसित करू शकलो नाही. अशा कर्मचार्‍यांनी आपल्यालाही कधी ना कधी इतर कामासाठी कुठल्यातरी रांगेत उभे राहावे लागतेच हे विसरू नये. एखाद्या कंपनीची खास ऑफर, सिनेमाचा पहिला शो यासाठी स्वेच्छेने लागणार्‍या रांगांमधे सुद्धा हाणामार्‍या, गोंधळ, गडबड होणे आपल्याला नवीन नाही. यंदाच्या नोटबदल घडामोडीत मात्र बहुसंख्य बँक कर्मचार्‍यांनी ग्राहकांच्या रांगांना अतिशय कौशल्याने जादा तास वेगाने काम करून प्रतिसाद दिल्याच्या बातम्या येत आहेत ही अतिशय सकारात्मक गोष्ट आहे.

असा बदल सर्व क्षेत्रात व्हायला हरकत नाही पण आपल्यासमोर लोकांच्या रांगा लागणं हे अनेकांना भूषणावह वाटतं. उदा: बहुतांशी डॉक्टर मंडळींना व्यवस्थापकीय तंत्र वापरून रूग्णांना विशीष्ट वेळ उपलब्ध करून देणं अशक्य नसतं. पण ताटकळत बसलेल्या रूग्णांच्या रांगेची लांबी हे जणू संबंधित डॉक्टरच्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) व्यावसायिक यशाच्या मापनाचं एकक झालं आहे. रांगेच्या समस्यांवर उपाय आहेत पण शोधण्याची इच्छाशक्ती हवी. रांग बिल भरण्य़ासाठी असो, की काही आर्थिक कागदपत्रांसाठी, अनेक रांगांच्या अवाढव्य लांबीला सर्वसामान्य भारतीयांची तंत्रज्ञानविषयक अनास्था देखील कारणीभूत आहे. एकतर अंतिम मुदत संपायला आली की आपल्याला जाग येते. अनेक सुशिक्षीत लोक ’ऑनलाईन’ व्यवहार करायला अद्याप भितात. केलेच तर ’कॅश ऑन डिलीव्हरी’चा पर्याय निवडतात. रोख रकमेसाठी पुन्हा एटीएम ला रांग लावतात. दारिद्र्य्ररेषेखालील लोकांची हतबलता आपण समजू शकतो परंतु सुमारे २२ कोटी भारतीय (संदर्भ- द हिंदू) स्मार्ट फोन्स आणि ४० कोटी भारतीय इंटरनेट वापरत असूनही फोन अथवा नेट बँकिंग समजून घेऊन त्याचा वापर करण्याचे प्रमाण तुलनेने फार कमी आहे. बँकेने दिलेल्या तांत्रिक सूचनांचे नीट पालन केले तर यात हॅकींगचा धोका फारसा नसतो. रोख पैसे बाळगण्य़ापेक्षा नक्कीच कमी असतो. अगदी उच्चशिक्षीत लोक सुद्धा पेट्रोल वाया घालवून, हाफ डे घेऊन धडपडत लांबवर बिल भरायला जातात, रांगेतील गर्दीच्या नावाने खडी फोडतात, पण ऑनलाईन सुविधा वापरत नाहीत. खरं तर ’व्हॉट्स अ‍ॅप’ वापरण्याइतकच ते सोपं आहे. डिजीटल मनी, प्लास्टीक मनीचा वाढता वापर रांगेची गरज, अपरिहार्य असलेल्या रांगेची लांबी आणि त्यात होणारा वेळेचा अपव्यय निश्चित कमी करू शकेल.

रांगेचे व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे. अनेक विकसित देशात याच्या प्रणालींचा वापर सुपरमॉल सारख्या ठिकाणी केला जातो. तरीही याच्या उपयोगितेबद्दल स्टॅनफोर्ड विद्यापीठातील डॉ. मार्टिन म्हणतात ,"मानवी वर्तनाचं कोडं जोवर सुटत नाही तोवर रांगेचं व्यवस्थापन या संकल्पनेत तथ्य शोधण्य़ात अर्थ नाही." आपल्याकडे मात्र रांगेच्या व्यवस्थापनचं एक उत्तम उदाहरण आहे, ते म्हणजे दर्शनबारीतील लहानथोर सर्वांचा ’माऊली’ म्हणून एकाच पातळीवर सन्मान करणारं, विदर्भातील शेगाव येथील धार्मिक संस्थान. केरळ राज्यात पर्य़टनासाठी गेले असताना एका प्रसिद्ध मंदिरात ’तात्काळ’ दर्शन घेता यावे म्हणून आम्ही ’देणगी’ दिली. रांगेत जास्त वेळ गेला तर पुढचे स्थलदर्शन हुकेल इतक्याच हेतूने ते केले. परंतु दर्शन घेऊन बाहेर पडताना कडेवर लहान मूल घेतलेल्या स्त्रिया, वृद्ध पुरूष यांच्यासह अनेक जण लांबलचक दर्शनबारी मधे तिष्ठत उभे असलेले पाहिले आणि अतिशय अपराधी वाटले. रांगेचा फायदा सर्वाना मिळायला हवा याची नैतिक जाणीव झाली. रांगेचा अपमान करणारा, ’पुढे घुसण्याचा’ असा अधिकृत परवाना, किमान आपण तरी यापुढे घ्यायचा नाही हे मनोमन पक्के ठरवले.

रांग कुणाला चुकलीय. अगदी चार खांद्यांवरून स्मशानात जातानाही ती चुकत नाही. परंतु पाण्य़ाच्या टॅंकरसाठी किंवा सिलेंडरसारख्या मुलभूत गरजांसाठी लागणार्‍या रांगा ही मात्र देशासाठी अभिमानाची बाब नाही, अशा रांगांची आवश्यकता न उरणे ही खरी प्रगती. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळॆस इंग्लंड मधे अंड्यांचा तुटवडा भासत होता. ब्रिटीश सरकारने त्यांच्या नागरिकांना सैनिकांसाठी अंडी राखून ठेवा असे आवाह्न केले. अनेक नागरिकांनी तेव्हा रांगा लावल्या, पण त्या रांगा खरेदी केलेली अंडी परत करण्य़ासाठी होत्या. ही वदंता आहे की सत्यकथा माहित नाही पण देशप्रेमी नागरिकांची अशी रांग हीच देशाची खरी संरक्षक भिंत आहे असे म्हणता येईल. आपण आपले देशप्रेम नुसत्या नारेबाजीऐवजी रांग-संस्कृतीसारख्या लहानसहान बाबी नीट जोपासून व्यक्त करायला काय हरकत आहे ! जपानच्या प्रगतीत त्या देशातील सुदृढ रांग-संस्कृतीचा महत्वाचा वाटा आहे असे मानले जाते. आपल्याकडे सुद्धा सर्वंकष प्रगतीसाठी रांगांची संख्या आणि लांबी कमी व्हावी, मानवी तास वाचावेत. अर्थात वाचलेले मानवी तास सत्कारणी लागावे हे देखील तितकेच महत्वाचे.

उच्चपदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका वयस्कर स्नेह्यांना सगळे तंत्रज्ञान अवगत आहे, त्यांच्याकडे डेबिट -क्रेडिट कार्ड सगळे काही आहे. अगदी आवश्यक असेल तेव्हा ते या तंत्राचा नीट वापर करतात परंतु एरवी बँक, पोस्ट, बिलभरणा केंद्र, चित्रपटगृह अशा बहुतेक ठिकाणी ते शक्यतो चालत जातात आणि रांगेत उभे राहून आपले काम करतात. कुणाला अडचण असेल तर फॉर्म वगैरे भरायला मदत करतात. "या निमित्ताने माझा व्यायाम होतो, वेळ छान जातो, रांगेची शिस्त एकूणच आपल्या जगण्य़ात उतरते, रांगेमधे आपण कुणी ’खास’ नसतो त्यामुळे आपण ’जमिनीवर’ राहतो, मुख्य म्हणजे माणसं दिसतात, भेटतात, अनुभवता येतात आणि या सगळ्य़ात एक वेगळीच गंमत आहे." असं त्यांचं म्हणणं. अशा विचारांच्या माणसांची आपल्या देशातली रांग मात्र कधीच संपू नये.

Article published in sunday special Divya Marathi
http://digitalimages.bhaskar.com/thumbnail/703x1096/divyamarathi/epaperimages/20112016/19akola%20city-pg10-0.jpg?11