Thursday, November 10, 2016

सुरक्षा

डिसेंबर २०१२ मधले दिल्लीतील निर्भया प्रकरण आणि कोपर्डी प्रकरण यामुळे जनमानस ढवळून निघाले. दोन्ही घटनांच्या विरोधात लोक न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरले.  दोन्ही घटना अतिशय क्रूर आणि मानवतेला काळीमा फासणार्‍या होत्या, त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटायलाच हवे होते. परंतु अशा घटना नंतर कमी झाल्या का, तर नाही. कारण या घटनांचे मूळ ज्या मानसिकतेत आहे ती फारशी बदलली नाही.

बलात्कार हे अनेकदा फक्त वासनापूर्तीचेच साधन नसते. डिवचल्या गेलेल्या तथाकथित पुरूषार्थाच्या नावाखाली, संबंधित स्त्रीला अद्दल घडवून तिला तिची जागा (!) दाखवून देण्य़ासाठी त्याचा सर्वात सोपा उपाय म्हणून वापर केला जातो. कित्येक पुरूष एकमेकांचा बद्ला घेताना विरूद्ध पक्षातील स्त्रीचा वापर करतात. दंगल, युद्ध अशा परिस्थितीत तर शत्रूपक्षातील स्त्रियांवर बलात्कार करायला मोकळे रानच मिळते असे जगाचा इतिहास सांगतो. भारतात परिस्थिती वेगळी नाही. समाजात माजलेल्या योनिशुचितेच्या अवडंबराचा या नराधम वृत्तीच्या लोकांना फायदा मिळतो. स्त्रीचं शील म्हणजे काचेचं भांडं हेच आपण ऐकत आलो आहे. तिने ते जपलच पाहिजे, पण तिची चूक नसताना ते ओरबाडलं गेलं तर तर आता ती जगायच्या लायकीची राहिली नाही असं आजही आपला समाज मानतो. "भगवान के लिए मुझे मर जाने दो, मै बर्बाद हो गयी, किसीको मुह दिखाने के काबील नही रही" म्हणत आत्महत्या करायला निघालेल्या बटबटीत हिंदी सिनेमातील नायिका त्या मानसिकतेत भर घालतात. या योनिशुचितेच्या ओझ्यापायी मुळात कितीतरी प्रकरणे कायद्यासमोर येतच नाहीत.

अत्याचाराच्या प्रत्यक्ष घटनेनंतरच्या संशयित नजरांनी, टोचून बोलण्याने त्या मुलीला जगण्यापेक्षा मरण अधिक सोपे वाटते. तिचं आणि तिच्या घरच्यांचंही जगणं मुश्किल करून टाकणार्‍या या समाजाला, कोण काय शिक्षा देतो?  स्त्रीच्या मदतीला कायदे आहेत पण ते राबवणारी यंत्रणा पुरूषप्रधान मानसिकतेचीच बळी आहे. ’सुनता है आज कौन द्रौपदी की चीख को..हर जगह दुस्सासन सिपहसालार नजर आते है’ अशी एकंदर परिस्थिती आहे. तेव्हा बलात्काराबद्दल शक्य तितकी कडक शिक्षा व्हावी व त्या तरतुदीत असे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालायला हवेत. परंतु तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे डॉ. राममनोहर लोहिया असे म्हणत की, ’बलात्काराने स्त्री भ्रष्ट होत नाही’ असा संकल्प स्त्रियांना व सर्व समाजानेही करायला हवा. कायद्यात बलात्कार करणारा पुरुष गुन्हेगार मानण्यात येतो. स्त्री निर्दोष असते. मग जे कायद्याने मान्य केले आहे ते समाजाने का मान्य करू नये !"
तेव्हाच त्याविरुद्ध तक्रार करायला स्त्रिया न घाबरता पुढे येतील, साहजिक पशुवृत्तीला जरब बसेल आणि असे कृत्य करण्याची कुणाची सहजपणे हिंमत होणार नाही.  बलात्काराने स्त्रीच्या सामाजिक स्थानाला अजिबात धक्का लागत नाही हे एकदा कळले तर किमान सूडभावनेने होणारे बलात्कार निश्चितच कमी होतील. अर्थात हे घडण्य़ासाठी आपल्याला स्वत:ला काही न रूचणारे, आपल्या मूल्यांना-परंपरांना धक्का देणारे प्रश्न विचारावे लागतील. त्यांची उत्तर शोधावी लागतील.

शक्ती मिल घटनेतील छायाचित्रकार तरूणीने यावरचं उत्तर शोधलय. बलात्काराच्या घटनेनंतर तीही हादरली पण तिने स्वत:वर वैद्यकीय उपचार करून घेतले. खंबीर मनाने कायद्याचा पाठपुरावा करून त्या नराधमांना कारागृहात पाठवून तिने तिच्या करियरला पुन्हा जिद्दीने सुरूवात केली आहे. तिच्या बाबत ही घटना घडली तेव्हा ही मुलगी तिच्या कामाचा भाग म्हणून चित्रण करण्य़ासाठी ’शक्ती मिल’ परिसरात गेली होती. त्यावर बरेच जण म्हणाले मुलीच्या जातीने अशा नोकर्‍या करूच नये. अशी उत्तर ऐकल्यावर वाटतं, स्त्रियांना माजघराच्या अंधारातून बाहेर आणून जगातला सूर्यप्रकाश दाखवणार्‍या आगरकर, कर्वे, फुले या सार्‍यांच्या कष्टावर हे लोक बोळा फिरवत आहेत. बरं, मग घरातच असणार्‍या स्त्रिया ,मुली तरी सुरक्षित असतात काय? कित्येकींवर त्यांच्या घरातल्यांनीच किंवा जवळच्या नातेवाईकांनी अत्याचार केल्याच्या केसेस समोर आल्या आहेत. तेव्हा आता तरी स्त्रियांनी काय करावं हे त्यांना ठरवू देत. आर्थिक गरज, शिक्षणाचा उपयोग, काही करून दाखवायची जिद्द यातल्या कुठल्याही कारणाने असो, बाहेर पडणार्‍या स्त्रीला मनात एक भीतीचं ओझं सतत बाळगावं लागतं. फक्त नोकरदार स्त्रियाच असुक्षित आहेत असे नाही तर गृहिणींनाही ही भीती चुकत नाही. खेड्यातून स्त्रियांसाठी सोयींचा प्रचंड अभाव आहे.- दूरवरून पाणी आणणार्‍या, अंधारात -पहाटे प्रातर्विधीसाठी अडोशाला जाणार्‍या महिला-मुलींवर अत्याचाराचं प्रमाण अधिक आहे. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्यात आत्मसन्मानाची भावना कशी जागी होणार.

या संदर्भात वाचलेली एक कविता अशी आहे.
’लक्ष्मणाने सीतेसाठी ओढली एक रेषा..लक्ष्मणरेषा
तिने ती ओलांडली आणि घडले ..रामायण
आम्हासाठी दाही दिशा लक्ष्मणरेषा
त्या ओलांडाव्याच लागतात
रावणांना सामोरे जावेच लागते
फरक इतकाच की घेत नाही  पोटामधे...भुई दुभंगून’
काही गैर घटना घडली तर धरणीने पोटात घ्यावे अशी आळवणी करण्य़ाचे दिवस आता संपावेत. 'उठो द्रौपदी वस्त्र सम्हालो.. अब गोविंद ना आयेंगे' हे स्त्रीने नीट समजून घ्यावं.
आजच्या मुलींनी आपल्या करियरला, जीवनाला आत्मविश्वासाने सामोरे जावं. मोबाईलवर सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करावा. गुन्हेगारावर पटकन फवारता येतील असे स्प्रे उपलब्ध आहेत ते जवळ ठेवावे. महत्वाचे नं जवळ ठेवून, फोनद्वारे घरच्यांच्या संपर्कात राहून, सावध-सतर्क राहून ,विचार करून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर मुलींची सुरक्षितता या मुद्द्याचा वेळॆशी संबंध राहणार नाही. यासाठी सर्वात महत्वाच्या २ गोष्ट समाजाने स्वीकारल्या पाहिजेत, पहिली म्हणजे जे संस्कार आपण मुलींवर करतो तेच मुलांवर करायला हवेत. कुठेतरी वाचलेले हे वाक्य तर फारच महत्वाचे- 'मुलीचे चारित्र्य घड्याळाचे काटे ठरवत नाहीत.'
हे समजून घ्यायला हवे. या बाबतीत आशेचा किरण म्हणजे एमएआरडी सारख्या संघटना, ज्याद्वारे अनेक समंजस पुरूष महिलांच्या पाठीशी उभे राहत आहेत.

बलात्कार हे स्त्रीच्या मानभंगाचं टोक मानलं तरी दररोज घडणारे घरगुती हिंसाचार स्त्रीचं मानसिक खच्चीकरण स्लो पॉयझनिंग सारखं करत असतात. तक्रार केली तर पहिले बोट तिच्याच चारित्र्यावर रोखले जाते. आधी तिला बर्‍याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्यापैकी सर्वात पहिला आक्षेप समाजातून नोंदला जातो तो तिच्या पोषाखावर. फक्त पोषाखामुळे अत्याचार होत नाहीत- तसे असते तर लहान बालिका, वृद्धा, मतीमंद मुलींवर अत्याचार नसते झाले. इंटरनेटवर पॉर्न साईट्स, तर मोबाईल वरचे पॉर्न व्हिडीओ याचं प्रमाण प्रचंड आहे. त्या माध्यामावर कुणाचा अंकुश नाही. अशा वातावरणात ज्या वासनांध पुरूषांचा सांस्कृतिक गुणांक कमी आहे, त्यांना पाश्चात्य किंवा वेगळा पोशाख केलेल्या मुलींकडून अश्लील संकेत मिळत असल्याचा ग्रह होतो आणि अनेकदा त्याची परिणीती छेडछाड, विनयभंगापासून ते बलात्कारापर्यंत होते हे सत्य आहे. तेव्हा तत्वत: पेहरावामुळे बलात्कार होतात हे तर्काला धरून नसले तरी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपण जेथे जात आहोत तेथे आपला पोशाख अनुचित वाटणार नाही ना याचे भान स्त्रियांनी ठेवणे आणि आपल्या देहबोलीतून, शब्दांमधून, पोषाखातून चुकीचा संदेश जात नाही ना याची काळजी घेणे भाग आहे .ते अत्याचारामागचं एकमेव कारण नसलं तरी स्रीला उपभोग्य वस्तू मानणार्‍या आपल्या समाजातल्या वाढत्या स्त्री अत्याचारांमागच्या अनेक कारणांपैकी एक कारण असू शकतं. त्याचबरोबर बहुसंख्य विकसित देशात स्त्रीने कोणता पोशाख घातला आहे, यावरून तिचं चारित्र्य कधीही जोखलं जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं आणि असं असूनही तेथील स्त्री अत्याचारांचं प्रमाण भारतापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. ही समस्या भारतात कमी होण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते लैंगिक शिक्षण. त्याबद्दल अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. योग्य लैंगिक शिक्षणामुळॆ मनात निर्माण होणार्‍या वासनेचे दमन करण्यासाठी एखाद्या स्त्रीला अवजारासारखे वापरणे म्हणजे पुरूषार्थ नव्हे ही समज येते. वासनेमधली नैसर्गिकता स्वीकारून ती उर्जा सकारात्मक कार्याकडे कशी वळवता येइल याची जाण येते किमान ती हाताळता येतेआणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री फक्त मादी नसून मन, भावना असलेली हाडामासाची माणूस आहे याचे लख्ख भान येते.

स्त्रियांना कायद्याची फारशी माहिती नसते शिवाय आजही कोर्टाची पायरी शक्यतो चढू नये अशी वृत्ती आहे. त्यामुळे अनेक गुन्हे गुलदस्त्यातच राहतात. अपराध्याला कायद्याने शिक्षा झाली तर निर्दोष असणारी परंतु फिर्याद करणारी स्त्री ही आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावून बसते.
लेकीचा ग जलम । भाड्याचा बईल
कधी इसावा हुईल । देवा ठावं
अशी तिची अवस्था असते. उदाहरण द्यायचं तर, ‘हुंडाप्रतिबंधक कायदा’ सुरू होऊन बरेच दिवस झाले पण रोज वर्तमानपत्रात आपण हुंड्यासंबंधीच्या विविध बातम्या वाचतो असतो. मग असे वाटते की, तेव्हा लागू केलेला हुंडाप्रतिबंधक कायदा कुठे गेला ? आता घरगुती छळ - महिला सुरक्षा कायदा अमंलात आलेला आहे. या कायद्यामध्ये शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक व भावनिक, आर्थिक छळ तसेच छळाची धमकी देणे यासारख्या गोष्टींचा समावेश, शिक्षणव्यवस्थेत जाण्यास मनाई करणे, विशिष्ट व्यक्तीसोबत विवाह करण्यास राजी करणे, आत्महत्येची धमकी देणे यासारख्या बाबींचा समावेश होतो. पण हा कायदा खरेच ग्रामीण, आदिवासी भागातील लोकांपर्यंत जाऊच द्या, शहरी महिलांपर्यंत तरी पोहोचला आहे का ? अश्लीलताविरोधी कायदा सुद्धा आपल्याकडे आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ ते २९४ मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तकं, चित्र आदी माध्यमांतून महिलांची विटंबना करणाऱ्या चित्र किंवा लेखनातून अश्लीलता सादर करणाऱ्याला वॉरण्टशिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, तिच्या वस्त्रांना हात घालणे अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता ३५४ खाली शिक्षेची तरतूद आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांना फक्त महिला पोलिस सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापू्र्वी अटक क,रू शकतात. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येते.

लोकशाही जगाच्या पाठीवर अवतरल्या नंतरच स्त्रीला माणूस आणि नागरिक मानले पाहिजे असा विचार मूळ धरू लागला. सर्वच लोकशाही राष्ट्रात घटनेने आणि कायद्याने स्त्रीला नागरिक मानून समान स्थान दिले असले तरी आपल्याकडे ते फक्त कागदोपत्री. घरात वडील आईचा नकार सहन करू शकत नाही, तिची चारचौघात अक्कल काढतात हे पदोपदी दिसत असल्याने एखाद्या मुलीने आपल्याला नकार द्यावा, कोणत्याही बाबतीत वरचढ व्हावे हे मुलांना सहन होत नाही. त्यामुळे सर्वात आधी कुटुंबसंस्थेत लोकशाही खर्‍या अर्थाने रूजवायचे आव्हान आज आपल्यापुढे आहे. त्यासाठी समाजरचनेत काही बदल करावे लागतील. (उद्धृत संदर्भ - स्त्रिया आणि सुरक्षितता - दिव्य मराठी, मधुरिमा) अमुक कामे पुरूषांची आणि अमुक स्त्रियांची ही चौकट सुद्धा हळूहळू मोडावी लागेल. सुदैवाने मंद गतीने का होईना आजच्या तरूणांमधे बदल होतो आहे. घरावरच्या पाटीवर ते सहचारिणीचे नाव सन्मानाने आवर्जून लिहू लागले आहेत. एकूण स्त्री ला सुरक्षितपणे जगता यावं यासाठी समाजाने बदलायला हवं.

स्त्रिया याच समाजाचा सुमारे ५०% भाग आहेत, म्हणजे स्त्रीनेही बदलायला हवंच. समानता फक्त सोयीपुरती वापरण्य़ाची गोष्ट नाही ,त्यामुळे अनेकदा असेही वाटते, की काही स्त्रियांना समान अधिकार, स्वातंत्र्य, समता नको आहे का, की त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीची त्यांना भीती वाटते? मुलीचा बाप अगतिक असतो असे मानले तरी शिकलेल्या व कमावणाऱ्या मुलींनी अगतिक का व्हावे ? हुंडा घेणाऱ्या मुलाशी आम्ही लग्न करणार नाही अशी भूमिका त्यांना का स्वीकारता येऊ नये? मी एक आई म्हणून -मुलाला फक्त पुरूष म्हणून आणि मुलीला फक्त स्त्री म्हणून न घडवता एक समंजस, संवेदनशील, खुला विचार करणारा माणूस म्हणून घडवीन असा विचार आजच्या स्त्रीने का करू नये? स्त्रीला एक सन्मानाचं सुरक्षित आयुष्य़ पुरूषांच्या सहकार्याशिवाय लाभणं शक्य नाही. स्त्रियांच्या उन्नतीसाठी कित्येक पुरूषांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. स्त्री पुरूष समन्वयातूनच एका सुदृढ समाजाची निर्मिती होऊ शकते परंतु काही करंट्या पुरूषांनी स्त्रीच्या अस्मितेला लावलेली ही कीड आता मुळापासून उपटण्य़ासाठी मुलींनी स्वत:ला बद्लायला सुरूवात करायला हवी. शिक्षणाची आस, संस्कार आणि वाचनाची कास धरलेल्या मुलीचं व्यक्तिमत्व लखलखीत होतं. योग्य आहार घेतला, खेळाला, शारिरिक चापल्याला आयुष्यात स्थान दिलं तर धडाडी वाढते. जगाबरोबर ताठ मानेने चालण्याचं आणि समोरच्याच्या नजरेला नजर भिडविण्याचे बळ तिच्यात येते. कोणीतरी मदतीला येईल, यापेक्षा मी स्वत: कशी सक्षम, समर्थ होईन यासाठीही ती जागरूक राहते. परप्रकाशी चंद्र होण्यापेक्षा ती स्वयंप्रकाशी काजवा झाली तरी हरकत नाही. आत्मभान जागा असेल तर त्या तेजस्वी स्त्रीचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही.

स्त्री सुरक्षा म्हणजे फक्त स्त्री देहाची सुरक्षा नाही तर तिच्या आत्मसन्मानाचे जतन, संवर्धन. भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला समृध्दी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण देणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञान देणारी महासरस्वती असते. अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. ही स्त्री शक्ती आता फक्त प्रतीकात्मक न राहता अस्तित्वात यावी.

-Lokmat Diwali 2016