Tuesday, May 10, 2016

शनि आणि आत्मसन्मान


"’काका हलवाईच’ का? आता ’काकू हलवाई म्हणा. चितळे बंधूच का?चितळे ’भगिनी’ म्हणा, इ-मेल का? आता ’फिमेल’ म्हणा’ वगैरे छापाच्या तृप्ती देसाई आणि मंदीर प्रवेशासाठी लढा देणार्‍या बायकांवरील विनोदांची सध्या चलती आहे. चला, श्री आणि जान्हवी सुटले. विनोद हवेच, त्याने तणाव हलका होतो, गंमत वाटते पण काही जण आता सभ्यतेची पातळी ओलांडून बोलू किंवा पोस्ट करू लागले आहेत. ’आता बापाच्या श्राद्धाला स्त्रियाही टक्कल करणार काय’, यासारख्या शब्दात त्यांची आणि पर्यायाने स्त्री वर्गाची खिल्ली उडवली जात आहे. तर्कहीन आक्षेप घेतले जात आहेत. चारित्र्यहननापासून अर्वाच्य शिव्यागाळीपर्यंत शस्त्रे परजली जाऊ लागली आहेत. एक साधा अधिकार मागितला यात समाजाने इतका थयथयाट करण्य़ासारखे आहे तरी काय हे मला कळू शकलेले नाही. व्यक्तीश: माझ्यासाठी ’शनी’ हा एक ’ग्रह’ आहे, साहजिकच त्याचे ’दर्शन’ अवकाश विभागाच्या दुर्बिणीमधून घ्यायचे असते. तरीही शनीचा चौथरा, एखादा गाभारा, किंवा देवस्थानातल्या प्रवेशासाठी या स्त्रियांनी केलेलं बंड हा टवाळीचा विषय नक्कीच नाही. ’शनी मला नाकारत असेल तर मीच त्याचं दर्शन नाकारते,’ असा आक्रमक पवित्रा घेऊ शकणार्‍या काही तरूणींना अशा आंदोलनांची गरज वाटत नाही. ’धार्मिक परंपरा निमूटपणे पाळायलाच हव्यात’ असं म्हणणार्‍या स्त्रियांनाही डोक्याला ’नसते ताप’ नको आहेत. या दोन टोकांमधल्या, ’का?’ हा प्रश्न मनात येऊ लागलेल्या, सर्वसामान्य स्त्रियांसाठी हा लढा आहे हे मुळात लक्षात घ्यायला हवे.

अर्थात हे पटवून देण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्या स्त्री संघटनांनी विवीध व्यासपीठांवरून करायला हवा होता. त्यांना आपली भूमिका आक्रस्ताळेपणा न करता, वैचारिक चर्चा करून, ठामपणे, अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडता आलेली नाही , त्यामुळॆ या आंदोलनाला समाजाचा पाठिंबा मिळवण्यात त्या कमी पडल्या. यामागे त्यांचा केवळ तात्कालिक आवेश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. स्त्रियांच्या प्रश्नांची सखोल जाण किंवा पुढच्या वाटचालीबद्दल स्वच्छ भूमिका तृप्ती देसाई आणि मंडळींच्या विचारात दिसून येत नाही. आपण हिंदूविरोधी नाही हे सिद्ध करायला आता दर्ग्यात प्रवेश करून दाखवायलाच हवा अशा स्वत:च निर्माण केलेल्या भोवर्‍यात त्या गरगरत आहेत. त्यांनी आपले भरकटत चाललेले तारू वेळीच सावरायला ह्वे आहे. अन्यथा मंदिरप्रवेश हा प्रतीकात्मक लढा न राहता, स्त्रियांना प्रवेश नाकारलेल्या जागांची यादी करणॆ आणि तिथे प्रवेशाची मागणी करत ठिय्या देणे हेच त्यांचे अनुत्पादक जीवितकार्य होऊन बसेल. त्यांची उर्जा अधिक विधायक कामांऐवजी ह्यातच खर्च होईल. त्यामुळे एकूणच त्यांच्या आंदोलनाची पद्धत आणि दिशा योग्य आहे किंवा नाही याबद्दल दुमत असू शकते, पण हेतूबद्दल शंका घेणे, हीन टीका करणे पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला शोभत नाही.

’पुरोगामी विचारसरणी' हे महाराष्ट्राचे नेहमीच एक वैशिष्ट्य़ मानले गेले आहे. परंतु मुलभूत मूल्यांशी फारकत घ्यायची असेल तर महाराष्ट्राने स्वत:ला पुरोगामी नेमके कशासाठी म्हणवून घ्यायचे, फक्त नेत्यांच्या भाषणापुरते?  प्रत्येक धर्मात कोणत्या तरी काळी काही कारणामुळे पडलेला पायंडा आधी प्रथा मग नियम मानला जाऊ लागतो. तो कालसुसंगत आणि तर्कशुद्ध आहे काय, हे आपण तपासायचे की नाही? मूल्ये शाश्वत असली तरी त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होते आहे की नाही हे तपासले गेले नाही तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये एके काळी सर्वात महत्वाची ठरलेली पुरोगामी विचारसरणी नव्या विचारप्रवाहांसह पुढे जाणे थांबवून गाळासारखी साचून राहील. तसे घडू नये म्हणून काही नाकारलेली सत्ये एका टप्प्यावर स्वीकारावी लागतात तर काही बदलांचे स्वागत करावे लागते. जुनाट विचारांची कावड झापडे बांधून वाहणार्‍यांचा प्रवास अखेर विनाशाकडे होतो हा जगाचा इतिहास आहे. मग ’धर्माची चिकित्सा’ हे अतिशय महत्त्वाचे मूल्य ’आमच्या भावना का दुखावल्या’ या बडग्याखाली चिरडले जाऊ द्यायचे का! खरं म्हणजे मागे वळून पाहिलं तर गेल्या शंभर वर्षापासून सुरु असलेल्या कठोर धर्मचिकित्सेमुळे हिंदु समाजाचे नेहमीच भले झाले आहे.

’पण मग बायका पुन्हा कर्मकांडाकडेच तर जात आहेत, मग ही कसली डोंबलाची धर्मसुधारणा!’ असा जोरदार आक्षेप घेतला जातो आहे. आस्तिक समाजाच्या ’देव’ या संकल्पना विविध स्वरूपाच्या असतात. आस्तिकतेमुळे जगणं आश्वासक होतं. मात्र बहुसंख्य आस्तिक हे कर्मकांड मानणारे असतात. त्यातूनही महिलांवर कर्मकांडांचा आणि त्यातून तयार झालेल्या धार्मिक संकेतांचा प्रचंड पगडा असतो. आयटी इंजिनीयर मुलींनाही डिझाईनर नऊवारी नेसून केलेल्या पूजाअर्चेचे फोटो शेअर करायला आवडतात. जगण्य़ातल्या समस्यांशी लढताना काव्य शास्त्र विनोदातील आनंदापासून अजून खूप दूर असलेल्या ग्रामीण महिला व्रतवैकल्यांच्या निमित्त्याने थोडीफार हौसमौज करून आपला आनंद शोधतात ही वस्तुस्थिती आहे. इथवर कर्मकांडांचा त्यांना स्वत:ला किंवा समाजाला त्रास नसतो. मात्र कर्मकांडाच्या कह्यात गेलेल्या महिला ’साडेसातीतून’ सुटका होण्य़ासाठी शनीला साकडे घालतात, मासिक धर्माच्या काळात त्या देवालयात पाऊल टाकत नाही. असे नियम स्त्रियांनी मोडले तर ’पाप’ लागते हे त्यांच्या मनावर पक्के बिंबलेले आहे. काहींची तर हे नियम ’देवानेच’ केले आहेत अशी ठाम समजूत आहे. आंदोलनकर्त्यांना विरोध करणार्‍या महिला याच मानसिकतेच्या बळी आहेत. परंतु कायद्याने खणखणीतपणे आणि विश्वस्तांनी नाईलाजाने का होईना, प्रवेशाला दिलेल्या परवानगीमुळे एवीतेवी कर्मकांडे सोडू न शकणार्‍या श्रद्धाळूंना एक नवा दॄष्टीकोन तर गवसला. तो म्हणजे, ’काळानुसार विचार आणि नियम बदलणे म्हणजे पाप नाही, धर्म ही पुरूषांची मक्तेदारी नाही आणि स्त्रिया अपवित्र नाहीत, त्यांनाही दर्शनाचा समान अधिकार आहे.’ शनीला तेल वाहत राहणे कालांतराने बंद होईलही पण निदान आपण अपवित्र असल्याची भावना या स्त्रियांच्या मनातून आज जात असेल तर ते सुचिन्ह नाही का! तरी देखील, ’हाजी अली दर्गाप्रवेशाचं नाव काढताच पाहा, कडव्या मुस्लीम संघटना कशा चवताळून उठल्या, एकत्र झाल्या, नाहीतर आपण! ’ अशी अजब मते व्यक्त होतात तेव्हा खेद वाटतो. धार्मिक कट्टरतेचे समर्थन करून आपल्याला तालिबानकडे वाटचाल करायची आहे काय? या घडामोडींमुळे उलट हिंदु धर्म हा काळानुसार बदलणारा सहिष्णु धर्म आहे हे सिद्ध करता आले आहे. पूर्वीचे शाहबानो, आजचे शायराबानो प्रकरण किंवा दर्गाप्रवेश विरोध पाहता मंदीर प्रवेशाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे हिंदू धर्माचे काही बिघडले तर नाहीच उलट हिंदू धर्माची मान उंचावली हे लक्षात घ्यायला हवे. मग ही प्रगतीशील धर्मसुधारणा नव्हे काय?

दुसर्‍या बाजूला, कर्मकांडाशी संबंधित अधिकार मागितल्याने, स्त्री-पुरूष समानतेच्या प्रश्नासाठी गंभीरपणे लढणार्‍या चळवळींची यामुळे हानी झाली असे काही बुद्धीवादी मंडळींना भय वाटू लागले आहे. उलट ज्या सर्वसाधारण महिला अशा चळवळींना ’नास्तिक शहरी बायकांचा गट’ समजून त्यापासून चार हात दूर राहत होत्या, त्या या निमित्त्याने बदलाची भाषा शिकू लागल्या आहेत. कमीत कमी चाकोरीबाहेरचा विचार करू लागल्या आहेत. त्यांना कर्मकांडापासून पूर्णत: तोडण्याचा हेका धरला तर स्त्रीवादी चळवळी आणि सर्वसामान्य स्त्रिया यांच्यातली दरी कधीच भरून निघणार नाही. प्रस्तुत समाजव्यवस्थेतच समानतेचा आग्रह धरण्य़ाच्या उद्देशाने, स्त्रीप्रश्नांच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी मंदिरप्रवेशासाठी याचिका दाखल करून समंजस मार्ग निवडला. धर्म नाकारून आततायी क्रांती करण्य़ापेक्षा धर्मातील कालबाह्य रूढींना फाटा देऊन हळूहळू बदल घडवणे अधिक व्यवहार्य आहे हा विचार या निमित्त्याने रूजतो आहे.

तरीही ’आत्ताच बरे यांना हे सुचले’ असा सवाल केला जातो आहे. याची सुरूवात नेमक्या कोणत्या घटनेने झाली ते आठवून पाहा, एक मुलगी चुकून चौथर्‍यावर गेली तर तो चौथरा गोमूत्राने ’शुद्ध’ करण्यात आला, याला स्त्रियांनी अपमान समजायचा नाही का? ज्या स्त्रियांना स्वेच्छॆने नियम पाळायचेत त्यांनी पाळावे, परंतु स्त्री प्रवेशाने ती जागा अपवित्र होते या अंधश्रद्धेला आव्हान द्यायचे की नाही? मग सावित्रीबाई, जिजाऊंची जयंती-पुण्य़तिथी साजरी करायची कशाला? कर्वे ,फुले, आगरकरांचा वारसा सांगायचा, तो कशाला? ’बरं, मिळाली ना एकदाची परवानगी, मग आता जाणार आहेत का या ’दांभिक’ बायका रोज दर्शनाला?’ असा प्रश्न विचारणार्‍यांना हे ’प्रतीकात्मक’ दर्शन होते हे कळायला हवे. स्त्रियांना देवाजवळ प्रवेश हवा आहे तो फक्त धार्मिक भावनेपोटी नाही. दलित हिंदूंना प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह आठवा. त्यांनी सांगितले होते ’आम्हाला देवाचे दर्शन घेऊन काहीही पुण्य कमवायचे नाही, परंतु ’प्रवेशबंदी’ हा अपमान आहे, कलंक आहे, तो आम्हाला पुसायचा आहे’.

सध्या विरोधकांमधे प्रत्येक घटनेचा दोष मोदींना देण्याची आणि मोदी समर्थकांनी सगळ्य़ाचे खापर गेल्या ६० वर्षाच्या अकार्यक्षमतेवर फोडण्य़ाची स्पर्धा सुरू आहे. अशा काही मंडळींना हे विरोधकांचे राजकीय कारस्थान वाटते. या बायकांना प्यादे म्हणून वापरून फडणीस सरकारविरूद्ध केलेलं षडयंत्र वाटते. तसे असेल तर उलट हे पुरोगामी बदल फडणीस सरकारच्या पथ्यावरच पडले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबतीत सकारात्मक कौल दिला होता. विरोध केला तर प्रतिगामी ठरू या भीतीने का होईना ,या आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. परंतु हे निर्णय फडणीस सरकारच्या कार्यकाळात झाल्याने उलट त्या सरकारला याचे श्रेय जाते आहे. थोडक्यात विरोधकांनी सरकारच्या शिरपेचात आयता तुरा खोवून दिल्याबद्दल समर्थकांनी त्यांचे आभारच मानायला हवे. आंदोलनकर्त्या स्त्रियांचा हा निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे, असा काहींचा आक्षेप आहे. आंदोलनकर्त्या संघटनेतील फूट आणि दर्शनाला सर्वात आधी पोचायची चढाओढ बघता यात तथ्य असावे. परंतु ’२४ तास काय बरे दाखवावे’ या चिंतेत असल्याने देसाई यांच्या प्रत्येक शब्दाला ’मथळा’ बनवणार्‍या माध्यमांची ही देण आहे. अर्थात ही प्रसिद्धी देसाईंना पूनम पांडे छाप सवंग पद्धतीने फुकटात मिळालेली नाही. या बदल्यात धमक्यांचे फोन, शारिरीक मारहाण आणि मानसिक दडपणाचा ’आहेर’ त्यांना समाजाने दिला आहे. शिवाय ’आपण काय जेवलो, आत्ता काय करतोय’ हे जगाला सतत सांगून प्रसिद्धीचा खटाटोप करण्य़ाच्या फेसबुकी जमान्यात समाजात काही सकारात्मक बदल घडवून प्रसिद्धी मिळवणे केव्हाही श्रेयस्कर!

या बायकांवर बहुतेक जणांचा आरोप आहे असा आहे की, ’ मंदीर प्रवेशाचा हट्ट कशाला? स्त्री भ्रूण हत्या, स्त्रियांवरील अत्याचार, हुंड्य़ासाठी छळ अशा शंभर समस्या आहेत, त्या सोडवा ना आधी’ हातात कधीही बॅट न धरलेली मंडळी ’धोनीचे’ काय चुकले यावर तावातावाने चर्चा करतात, त्यातलाच हा प्रकार आहे. आपण स्वत:लाच विचारावं, १०० तल्या एका तरी प्रश्नाला या महिलांनी हात घातला. आपण यातल्या किती प्रश्नांना भिडलो? आयुष्यात एका तरी ध्येयासाठी आपण असा जिगरबाज लढा दिला आहे काय? नसेल तर हरकत नाही, आपलं रोजचं काम नीट करणं सुद्धा कमी महत्वाचं नाही पण जे त्या पलीकडे काही करू पाहतात त्यांच्यावर किमान विखारी टीका करून आपण त्यांचं खच्चीकरण करू नये. सर्वात महत्वाचं म्हणजे स्त्रियांशी संबंधित तमाम समस्यांच्या मुळाशी ’स्त्री दुय्यम आणि अपवित्र आहे’ ही घट्ट बसलेली भावना आहे, ती आपापल्या बुद्धी आणि कुवतीनुसार उखाडण्य़ाचा प्रयत्न तरी करण्य़ाचे धाडस या महिलांनी दाखवले आहे. वर्षानुवर्षे बंद असलेली दारे किलकिली करण्य़ाचा प्रयत्न केला तर ती करकर वाजणारच पण त्याशिवाय नवे मार्ग चोखाळता येत नाहीत. आपण अशा धडपडींना, अडखळत्या पावलांना समजून घ्यायला हवे. बदल पचवून पुढे जायला हवे, हेच खर्‍या प्रगत आणि प्रगल्भ समाजाचे लक्षण असते. तेव्हा मंदिर अथवा गाभारा अथवा दर्गा प्रवेश हे अंतिम ध्येय नाही हे देसाईंनी समजून घ्यावे. त्याचबरोबर आपण देखील हा आत्मपरिक्षणाच्या मार्गावरचा केवळ एक टप्पा मानायला हवा.

हे खरय की हा हक्क झगडून मिळवल्याने आजच्या स्त्रियांच्या दैनंदिन जगण्यात फारसा (टीकाकारांच्या मते ’कवडीचा’) दर्शनी फरक पडलेला नाही. परंतु आत्मसन्मानाच्या भानाचा दिवा असाच अंतरी पेटता राहिला तर त्या प्रकाशात निदान पुढच्या पिढीतील स्त्रियांच्या पाऊलवाटा निश्चित उजळून निघतील.