Sunday, April 17, 2016

विराट विचार


http://epaperdivyamarathi.bhaskar.com/akola/354/17042016/0/1/ published in Divya Marathi

  नुकताच क्रिकेट २०-२० विश्वचषक २०१६ सोहळा पार पडला. या स्पर्धेत भारतीय संघ उपांत्यफेरीपर्यंतच पोचू शकला मात्र पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने अप्रतिम खेळी केली. क्रिकेटप्रेमी भारतीयांना तेव्हा आनंदाचे उधाण आले होते आणि त्या भावनांना सर्वांनी सोशल मिडीयावर वाट करून दिली. कथित प्रेमप्रकरणामुळे विराटबद्दलच्या संदेशांमधे अभिनेत्री अनुष्का शर्माचे नाव जोडले गेले. एका मर्यादेपर्यंत गंमत म्हणून हे ठीक होते. परंतु अनेक संदेशांमधे सभ्य विनोदाची पातळी ओलांडली गेली. अश्लाघ्य पद्धतीने टीकाटीप्पणी केली गेली तेव्हा मात्र ही परिस्थिती विराटने अतिशय खंबीरपणे हाताळली. या अतिरेकामुळे उद्विग्न होउनही त्यांने खणखणीत शब्दात सुशिक्षितांना त्यांच्या वाढत्या ‘सवंग’पणाची जाणीव करून दिली. ‘‘माझ्या खेळातील गुण-दोषांनंतर अनुष्काला टीकेचे लक्ष्य करणाऱ्या लोकांची मला कीव कराविशी वाटते. अशा व्यक्ती जर स्वत:ला सुशिक्षित समजत असतील तर ही शरमेची बाब आहे.’’असे त्याने सुनावले. अनुष्काशी त्याचे ‘ब्रेक-अप’ झाले की नाही ही खाजगी बाब चघळणार्‍यांना चपराक देत कोहली म्हणाला, "तिने मला कायम प्रेरणा आणि सकारात्मक दृष्टिकोनच दिला आहे. सार्वजनिक ठिकाणी तुमच्या बहिणीला, मैत्रिणीला किंवा बायकोला जर कोणी टीकेचे लक्ष्य करत असेल तर ते कसे वाटेल, याचा एकदा विचार करा’’

ज्या सोशल मिडीयातून विराट-अनुष्का वर कॉमेंट्स झाल्या त्याच सोशल मिडीयाचा वापर करून विराटने सर्वांना भानावर आणले. याची प्रशंसनीय परिणीती म्हणजे भारतीय संघ वेस्ट इंडीजविरूद्धचा सामना हरल्यानंतर विराट-अनुष्कासंबंधात एकही पोस्ट आली नाही. आपल्या परिचयातील सहकारी किंवा नातलग स्त्रिया, मैत्रिणी यांची आपल्यामुळे अकारण बदनामी होत असेल तर त्यांची प्रतिष्ठा कशी जपावी याचा धडाच यानिमित्त्याने विराटने घालून दिला. विराट एक उत्तम खेळाडू आहेच पण तो विचारांनीही उमदा आहे हे त्याने त्याच्या सडेतोड वक्तव्याने आणि नेमक्या कृतीने दाखवून दिले आहे. आजचे तरूण विराटला आदर्श (आयडॉल) मानत असतील तर त्यांनी फक्त त्याच्या खेळाचे, केशरचनेचे किंवा त्याच्या हातांवरील टॅटूचे अनुकरण न करता त्याच्या विचारांचे आणि वर्तनाचे अनुकरणही करायला हवे.

हल्ली ’व्हायोरिझम’ म्हणजेच ’दुसर्‍याच्या खाजगी आयुष्यात डोकावायचे आणि त्यातून विकृत आनंद मिळवायचा’ ही वृत्ती वाढत चालली आहे. विकृतीच्या टोकाला न जाता कमी अधिक प्रमाणात ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात असते, पण त्यावर मात करणे आणि सामाजिक संकेत जपणे यालाच आपण सुसंस्कृतपणा म्हणतो. दुर्दैवाने सोशल मिडीयासारखे हत्यार मिळाल्याने ही दडपलेली भावना अजूनच वर येऊ लागली आहे. याच व्हायोरिझम चा वापर करून ’बिग बॉस’ सारख्या कार्यक्रमांचे उखळ पांढरे होते कारण आपल्या मनोरंजनाच्या कल्पना सवंग होऊ लागल्या आहेत. समाजधुरीणांसह प्रत्येक संवेदनशील व्यक्तींने याबाबत आत्मपरीक्षण करायला हवे आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या व्यक्तीच नव्हे तर सर्वसामान्य पुरूषांनाही याचे चटके बसू लागले आहेत. परंतु याचा सर्वात जास्त परिणाम म्हणजे महिलांविषयक वाढते सायबर गुन्हे. ८ मार्च म्हणजेच महिला दिनाला यासंदर्भात अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. चव्हाण यांची मी मुलाखत घेतली होती. त्यांनी खंत व्यक्त केली की सायबर सेल, ’दृष्टी’ सारखे अ‍ॅप, ’जागर तरूणाईचा’ यासारखे उपक्रम असे पर्याय देऊनही मुली-महिला तक्रार करायला पुढे येत नाही. मुळात गुन्हे कमी होण्य़ासाठी ,झालेच तर दाद मागण्य़ासाठी आणि समाजभान जागे करण्यासाठी मुलींना त्यांच्या परिचित सहकारी-नातलग पुरूष, महाविद्यालयीन मित्रांकडून विराटसारखी भक्कम साथ मिळायला हवी. तसे घडले तर हे चित्र नक्कीच बदलू शकेल.